परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो,
सगळं बदललय!
हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही,
सगळ्यांकडे गाड्या आहेत.
सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही,
घराघरात टीवी आलेयत.
पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही,
सगळीकडे बल्ब लागलेयत.
शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत,
शिकवण्या असतात.
मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत,
स्मार्टफोन आलेयत.
लहान मुले गुरव काकांकडे पेटी, बासरी, तबला शिकायला येत नाहीत,
कराटे आणि स्पोकन इंग्लिश आलंय.
मामाच्या घरी जेवताना पहिल्यासारख्या गप्पा, हसणं -खिदळणं होत नाही,
खंडोबाची मालिका असते.