आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत.
माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे.