केव्हा तरी पहाटे...
आकाश तारकांचा उतरून साज गेले
अर्धोन्मिलीत नयनी एक स्वप्न साजलेले
हा मंदगंध वारा विसरून तोच गेला
निष्पर्ण सावलीचे एक पर्ण तरंगलेले
बेधुंदल्या कळ्यांचे निःश्वास दाटलेले
उन्मीलनाचे स्वप्न स्वप्नात पाहिलेले
हलक्याच पावलांची ती वाट धुकटलेली
स्मृतिगंधल्या मनांचे हृदय स्पंदलेले
पौगंडल्या उषेचा प्रियकर नभी तो आला
थरारले अधरही, आरक्त गाल झाले
निस्तब्ध शांतताही विस्कटून सारी गेली
पंखांतली कुजबूज, आसमंत व्यापलेले
चेहर्यावरी बटांचे रेंगाळणे उगाच
निःश्वासही उगाच, उगाच कूस बदलणे
शराबल्या नजरेनं मनपक्षी कैद केला
पुन्हा त्याच मिठीत हरवून सारे गेले...
काव्यरस
मिसळपाव
पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन् कधी रुसते
कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन् बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते
कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन् लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते
लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन् कोसळते
कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन् मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन् रिमझिमते
विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजत