माझीच मी...

लेखनविषय:
काव्यरस
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी.. लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे उसवता अलवार टाका उसवले माझीच मी सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी! © अदिती

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

काव्यरस
जगात साऱ्या ओळख पक्की झाली या देशाची खूप तरक्की झाली हाती मोठे घबाड आल्यावरती नियत आपली चोरउचक्की झाली दोन दिशांनी आलो होतो आपण वाट वेगळी तिथेच नक्की झाली दाणादाणा जमवीत आली जनता: पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली पाउल माझे तेव्हा चुकले आहे नजर तुझी जेव्हाही शक्की झाली डॉ. सुनील अहिरराव

बेशिस्त

लेखनविषय:
काव्यरस
पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे आधार काडीचा घेऊन तगून गेलो शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो - शैलेंद्र

कोणते माझे वतन होते

काव्यरस
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

सावल्यांची सरमिसळ होते ..

काव्यरस
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

लेखनविषय:
काव्यरस
वेळ दु:खाला दिलेली पाळतो मी सुखाची भेट घेणे टाळतो फारसे घडले नसावे कालही मी उगाचच रात सारी चाळतो ही फुलांची वाट आहे पण इथे ऱोज एखादातरी ठेचाळतो कोणते असते हवेमध्ये जहर रंग प्रेमाचा कसा डागाळतो केवढी जडशीळ दुनिया वाटते देव जाणे कोण ही सांभाळतो चालला असता तुझा साधेपणा मी कुठे रंगारुपावर भाळतो डॉ. सुनील अहिरराव

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

लेखनविषय:
काव्यरस
चार दिवस पुरणारे अत्तर असते प्रेम तसे मग बाकी खडतर असते सुटकेचा आयास निरर्थक असतो कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते आपण अपुली सांभाळावी दुनिया सूख जरासे दु:ख निरंतर असते आकाशाला हातच पोचत नाही नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते प्रश्न तुला मी तोच कितीदा केला तुझे आपले एकच उत्तर असते कुठून कोठेतरी जायचे नुसते.. प्रेम शेवटी एक अधांतर असते डॉ. सुनील अहिरराव

आरसा हरवेल तेव्हा ये ..

लेखनविषय:
काव्यरस
आरसा हरवेल तेव्हा ये (चेहरा गवसेल तेव्हा ये) केवढी गर्दी तुझ्याभवती.. एकटे वाटेल तेव्हा ये पोकळी आहे जशी येथे ही तिथे दाटेल तेव्हा ये दाह सोसावा कसा तुजला हा ऋतू बदलेल तेव्हा ये वाहती आहेच ही दुनिया पण कधी आटेल तेव्हा ये.. डॉ.सुनील अहिरराव

शेवटी संपन्न हा वनवास झाला..

लेखनविषय:
काव्यरस
जो जसा झाला तसा, पण खास झाला शेवटी संपन्न हा वनवास झाला पाप माझे राहिले शाबूत अवघे पुण्यकर्माचा त्वरेने र्हास झाला मी जरी अध्यात ना मध्यात होतो केवढा दुनियेस माझा त्रास झाला देव प्रत्यक्षात नाही पाहिला मी पण मला दगडात त्याचा भास झाला जीव कोठेही कधी रमलाच नाही मग असा नुसताच टाइमपास झाला डॉ.सुनील अहिरराव

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

लेखनविषय:
काव्यरस
चार शब्दांचा सहारा होत नाही तेवढ्यावरती गुजारा होत नाही खूप काही लागते जगण्यास येथे प्रेम काही ऊनवारा होत नाही गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण चांदतार्यांचा नजारा होत नाही जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन रोज आताशा इशारा होत नाही टाळले मजला बरे केलेस तूही (दु:ख दु:खावर उतारा होत नाही) मी मनाला शिस्त आहे लावलेली फारसा आता पसारा होत नाही डॉ.सुनील अहिरराव
Subscribe to gazal