✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

ख
खेडूत यांनी
Mon, 07/13/2015 - 19:00  ·  लेख
लेख
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे? की तीच त्यांची खरी योग्यता होती आणि चुकून इंजिनियर झाले की काय? एकूणच, मागणीपेक्षा पुरवठा प्रचंड वाढल्याने ही स्थिती आलीय हे खरं ! हे इतर क्षेत्रातल्या शिक्षणालाही कदाचित लागू पडेल पण इथे अभियांत्रिकी शिक्षणातल्या या सगळ्या बदलाचा सुरुवातीपासून आढावा घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. १८५४ होय....! एकोणीसशे नव्हे, अठराशे चोपन्न ! 'Poona Engineering Class and Mechanical School',पुणे नावाने इंग्रजांनी पुण्यात तांत्रिक शिक्षण देणे सुरु केले. आधी यांत्रिकी आणि स्थापत्य विभागाचे शिक्षण सुरु झाले. हेच बहुधा पहिले भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालय. सुरुवातीची १० वर्षे भवानी पेठेत असलेले हे कॉलेज शिवाजीनगरला आता आहे तिथे हलविले. या इमारतीच्या पायाभरणीला येत्या ५ ऑगस्ट रोजी दीडशे वर्षे होत आहेत! आदरणीय भारतरत्न , सर विश्वेश्वरैय्या हेही इथले माजी विद्यार्थी. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस '' इंजिनियर्स डे '' म्हणून भारतात साजरा होतो. तर या कॉलेजात कालांतराने विद्युत, उत्पादन, धातुशास्त्र वगैरे इतर नऊ शाखा सुरु झाल्या. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे गेली १६१ वर्षे दिमाखात उभे आहे. समाजाला अनेक रत्नं इथुन मिळाली. अनेक न टाळता आलेल्या कारणांमुळे मागच्या शतकातला दरारा आणि दर्जा त्यांना टिकवून ठेवता आला नसला तरी आजही 'आय आय टी' पाठोपाठ इथे जाण्यासाठी मुलांची पसंती असते - कारण मिळणारे नाव. वातावरण, सहकारी. आणि पुढे चांगले करियर. इथे शिकल्यामुळे आणि पुढे कांही वर्षे शिकवण्याची संधी मिळाल्याने मला साहजिकच या कॉलेजबद्दल आपुलकी वाटते आणि सांगण्यासारखं बरंच आहे, ते पुढे कधीतरी! १९८० कसा होता हा काळ? चित्रपटातले चाळीशीत दिसणारे पन्नास वर्षीय नायक अद्यापही 'बी ए पास झालो' म्हणून मातोश्रींनी करूनच ठेवलेले मुळ्याचे पराठे अथवा गाजर हलवा वगैरे हादडत असत. माफक डिस्को वगैरे करत. तुलनेने मराठी सांस्कृतिक क्षेत्र अत्यंत बहरलेले होते. लोकांना जीवनाचा आनंद घ्यायला वेळ होता! सायकलवर जाण्याची लाज वाटत नसे. फोन आला नाही तरी माणूस घरी येईपर्यंत वाट पाहायला धीर असे. नॉर्मल लोक्स सरकारी नोकरी, रेल्वे, बँक किंवा कुठलेतरी महामंडळ, शिक्षकी मग उद्योगक्षेत्र इथं साधारण अशाच प्राधान्यानं नोकरी पहात. स्थिरता महत्वाची! शिवाय त्यासाठी कुठलीही पदवी चालत असे. राजकारणापासून अलिप्त रहाता येई किंवा त्याची थेट झळ पोहोचून मनस्ताप होत नसे. नोकरी करणाऱ्यांच्या अपेक्षा मर्यादित होत्या. पैसा हेच सर्वस्व झालं नव्हतं ! अशा त्या काळात अभियांत्रिकीला जाणे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाई. डॉक्टर किंवा इंजिनियर होणे म्हणजे उत्तम करियर असा समज होता आणि तो फार चुकीचा नव्हता . काही शहरी पालक मुलांना सी. ए. किंवा सनदी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करायला सांगत.त्याहून उच्चभ्रू थेट अमेरिकेला कसे पाठवता येईल याचं नियोजन करत. पण शेती किंवा व्यवसाय? नको. घरचा काहीबाही व्यवसाय असलेले पालकही मुलाला व्यवसायात आणायला उत्सुक नसत. अर्थात सन्माननीय अपवाद असतीलच ! महाराष्ट्रापुरते पाहिले तर इथे अवघी सहा अभियांत्रिकी महाविद्यालये होती- अर्थातच सगळी सरकारी आणि निमसरकारी होती. तीन- किंवा चार प्रमुख शाखा आणि साठ विद्यार्थी प्रवेश क्षमता. म्हणजे सुमारे अकराशे प्रवेश आणि बारावी शास्त्रशाखा उत्तीर्ण होणारे पन्नास हजार विद्यार्थी. म्हणजे आजच्या मेडिकलप्रमाणे दीड-दोन टक्के मुलांना प्रवेश मिळे. दुसरा पर्याय तंत्रनिकेतनात डिप्लोमा करण्याचा होता. अशी तंत्रनिकेतने वीसेक होती - मग उरलेले इच्छुक तिकडे जात. आणि बाकीचे बी. एस्सीला जात. सगळं कसं सरळ होतं. आय आय टीला मूळचेच हुशार आणि हुच्च लोक्स जात. आम्ही तर अभियांत्रिकीला जाईपर्यंत ते नाव ऐकलं पण नव्हतं ! औद्योगिक क्षेत्राची वाढ होताना शहरी भागात सर्वत्र अभियंत्यांना मागणी येत होती. पूर्वी लहान गावात फारतर साताठ अभियंते असत- वीज मंडळात, सार्वजनिक बांधकाम खात्यात आणि जवळच्या एमायडीसीत काही जण. बस्स. एकूण संधीच कमी होत्या. पुढे शहरीकरणामुळे हे प्रमाण वाढायला लागलं - आर्थिक उदारीकरणामुळे परदेशी कंपन्या आल्या. मागणी वाढली पण पुरेसे अभियंते नव्हते. डिप्लोमाधारकांचे कामही चांगले असल्याने त्यांना आणि बी एस्सी झालेल्या मुलांना अनुभवामुळे चांगली संधी मिळत असे. याच काळांत खासगी कॉलेजमधून पुरवठा सुरु झाला. त्यातच अमेरिकेत संधी वाढल्या. बरेच जण युरोप- अमेरिकेत जाऊ लागले. सर्वत्र खासगी कॉलेजात कम्प्युटर शाखा आधी सुरु झाल्या. दिरंगाईमुळे शासकीय खाती उशिरा जागी झाली, आणि त्यांनीही हा अभ्यासक्रम आणला . ही वाढती मागणी आणि होणारे बदल खासगी संस्थांच्या पथ्यावर पडले.विद्यार्थी मिळवायला त्यांना फार कष्ट न पडता आपोआप समाजाची मानसिकताच बदलली. १९८३ कै. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना १९८३-८४ च्या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शिक्षणसंस्थाना परवानगी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटकात अशी महाविद्यालये आधीच होती. तिथल्या सत्ताधारी काँग्रेसच्या नेत्यांनी हा नवा व्यवसाय अंगिकारला होता, आणि कमाई इतकी होती की हे कलियुगातले कुबेरच जणू!. ते पाहून मराठी नेत्यांचे डोळे पांढरे झाले. एकाच पक्षात असल्याने त्यांनी तंत्रशिक्षणाचं बाजार तंत्र चांगलं अवगत करून घेतलं. परंपरागत साखर कारखानदारी चालू ठेवून हा उद्योग करता येणार होता. तांत्रिक विषयां पाठोपाठ त्याच संकुलात अन्य प्रकारची महाविद्यालये सुरु केली - जसे बी एड / डी एड / नर्सिंग, इत्यादी -ज्यातून आधी देणगी घेऊन प्रवेश आणि नंतर आपल्याच संस्थांना तिथूनच कर्मचारी स्वस्तात मिळवता येत. शेतीला जोडधंदा म्हणून कर्मचारीवर्गालाही शेताजवळ नोकरी - हे सगळं फायद्याचं होतं. त्यातून साखर कारखान्यांच्या बाजूला टुमदार इमारती उभ्या राहिल्या. त्यात कॉलेज , वसतीगृह , मेस विविध दुकाने - क्लासेस, भाड्याने घरे अशी बाजारपेठ वाढली. प्रवासी कंपन्याना प्रवासी वाढले. 'झेरॉक्स' कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका मित्राकडून ऐकलं होतं, की अन्य सर्व क्षेत्राच्या एकत्र मिळून फोटोकॉपीजपेक्षा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची फोटोकॉपीची एकूण मागणी जास्त होती. बौद्धिक संपदा हक्क वगैरे कुणाच्या गणतीतच नव्हते. सर्व देशी-परदेशी लेखकांची पुस्तके नकला मारून तालुका पातळीवरच्या गावात टपरीवर निम्म्या किमतीत मिळत! सर्व क्षेत्रांवर असा अप्रत्यक्ष प्रभाव वाढत होता. राजकीय संगनमताने हा धंदा सुरु झाल्याने प्रशासकीय अडथळे आधीच दूर केले जात. सर्वप्रथम राजकारण्यांना सोयीचे नियम आणि निकष बनवले गेले. AICTE कडून या विभागाचं नियंत्रण होतं- आणि राज्यात DTE (तंत्रशिक्षण संचालनालय) काम करतं. या ठिकाणी महत्वाच्या पदावर आपल्या मर्जीतील अधिकारी आणून अनिर्बंध कारभार सुरु झाला. काही प्रामाणिक अधिकाऱ्याचा बाजारीकरणाला विरोध होता, त्यांना बाजूला काढले गेले. पाच लाख रुपये अनामत रक्कम तंत्रशिक्षण मंडळाकडे जमा करून कॉलेज सुरु करता येऊ लागले. इमारत असण्याची गरज नव्हती. एखादी शाळा - चाळ किंवा एमायडीसीतली बंद पडलेली इमारत काहीही चालत असे. ज्यांच्याकडे गुणवत्ता असेल अश्या लोकांकडे हे उपद्व्याप करण्याची क्षमता नव्हती. किंबहुना त्यांनी यात पडू नये, यातच पुढाऱ्यांचे हित होते . अश्या विद्वान लोकांना निवडून प्राचार्य, संचालक वगैरे करण्यात आले. विरोध करू शकणाऱ्याना सामील करून घेतल्याने प्रश्न उभेच रहात नाहीत , हे राजकारणात मुरलेल्यांना ठाऊक होतं. निवृत्तांना तर ही पर्वणीच वाटू लागली. पस्तीस वर्षांच्या सेवेत भरपूर काम करून फारतर विभागप्रमुख होऊ शकलेल्या प्राध्यापक मंडळींना प्राचार्य म्हणून दाराशी कॉलेजची गाडी येते याचे कोण अप्रूप वाटे. अशी सर्वप्रथम वजनदार नेत्यांची कॉलेजेस सुरु झाली. बाकीचे स्वप्नं पाहू लागले. कॉलेज तर सुरु झालं , पण आता हवेत विद्यार्थी! सुरुवातीला उत्तर भारत आणि गुजरात- राजस्थानमधले धनाढ्य लोक त्यांचे गिऱ्हांईक होते. त्याकाळी परप्रांतीय लोक आठ हजार फी आणि पाच ते आठ लाख रुपये देणगी देत असत. अगदी सुरुवात असूनही धंदा इतका तेजीत, की चार सहा कोटी देणगी आणि चाळीस लाख शुल्क दरवर्षी (त्यां काळी !) - खर्च साधारण पंचवीस लाख असं अप्रतिम बिझनेस मॉडेल! फक्त पुढारी पाठीशी हवा- संस्थेचं नांव गांधी- नेहरू कुटुंबांपैकी कुणाचंतरी ठेवलं की त्रासच नाही! मंत्री असलेल्यांनी अन्य राज्यांत स्वतःचे कार्यकर्ते कमिशन एजंट म्हणून नेमून वर्षभर जाहिरातबाजी सुरु केली. काहींनी तर थेट अन्य राज्यात पण कॉलेजेस सुरु केली. शिक्षकांची उणीव फारशी कधी भासली नाही- पुढे भासणार तर नाहीच. पहिल्या चार वर्षांत तिथूनच पास झालेले विद्यार्थी प्राध्यापक झाले, ते आता पाचसात वर्षांत निवृत्त होऊ लागतील. त्यांची जागा घ्यायला पुढचे लोंढे तयार आहेत! १९९० मराठी मध्यमवर्गाला हा प्रकार रुचला नव्हता. एक तर खासगी कॉलेजात जाणे कमीपणाचे वाटे आणि देणगीपोटी मोठी रक्कम द्यायची तयारीही नव्हती. त्यातच पहिल्या वर्षी मालेगावला समूह कॉपीचे प्रकरण उघडकीस आले. अन्यत्र काही ठिकाणी त्याची पुनरावृत्ती झाली . राजकीय दबावाखाली ती प्रकरणे मिटली , पण मराठी मध्यमवर्गाने धास्ती घेतली, की बदनाम संस्थेतल्या या मुलांना पुढे नोकरी तरी मिळेल का ? ही भीती व्यर्थ ठरली - लोक सगळे विसरून गेले. मराठी पालकांना हे जमायला आणि स्वीकारायला पहिली दहा वर्षे गेली. पैसे ओतून आलेली कांही मुले पहिल्या वर्षी नापास होत किंवा दोन-तीन वर्षे पास होत नसत आणि सोडून निघून जात. मुलांचा दर्जा आणि शिक्षक, प्रयोगशाळा आणि एकूणच व्यवस्था नसणे यामुळे हे साहजिकच होते. शिक्षण सम्राटांनी मग क्लुप्ती शोधली : व्यवस्थापन कोट्यातून आलेल्याची चारही वर्षांची फी एकत्रच घ्यायला सुरुवात केली. मग पूर्ण करा की नको- घेणं नाही. आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये BE पास असलेल्या वराला दहा ते पंचवीस लाख हुंडा मिळे. शिकूनही ही मुले शेती किंवा घरचा व्यापार सांभाळणार हे ठरलेले होते. कारण इंजिनियरला दरमहा पगार जास्तीजास्त दोन ते तीन हजार मिळे. त्यामुळे ठराविक राज्यांतून फक्त पासिंगचं उद्दिष्ट घेऊन मुले येऊ लागली. या काळात मुलींचे आरक्षण नसल्याने ग्रामीण भागात त्या एक टक्काही नसत! पैसे देऊन प्रवेश घेतला तरी पास होणे बहुतांना शक्य होत नसे. निकालाची टक्केवारी पन्नास टक्क्याच्या खाली असे. या गळतीला उपाय म्हणून ATKT (अलाउड टू कीप टर्म्स) हा नियम आला. म्हणजे दहापैकी तीन विषयात नापास असेल तरी पुढच्या वर्गात जाता येऊ लागले. मंडळी निगरगट्ट झाली- ''केटी लग गयी? चलो अच्छा हुआ यार!'' असे संवाद ऐकू येऊ लागले. वर्ष वाचलं तरी ते तीन विषय आणि पुढच्या वर्षाचे दहा विषय त्यांच्या इवल्याश्या बुद्धीला झेपत नसत. मग गम्मत काय व्हायची, ते तीन विषय पास होतानाच पुढच्या वर्षातले चार विषय रहात असत ! नियम असा होता, की पहिल्या वर्षाचे विषय घेऊन तिसऱ्या वर्षात जाता येत नसे. मग तीन ऐवजी पाच विषयांना केटी द्या अशी मागणीही मान्य झाली. असे निर्णय प्रत्येक विद्यापीठाच्या विद्वतसभेत (!) घेतले जात आणि त्यावर मंजुरी घेतली जात असे. शेवटी हा प्रकार इतका टोकाला गेला की १९९२ मध्ये पुणे विद्यापीठाने कॅरी ओव्हर - म्हणजे सर्वाना अंतिम वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचे धोरण तात्पुरते स्वीकारले. कारण म्हणे अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यांचा परिणाम म्हणून इ.स. २००० पर्यंत त्या बॅचची मुले परिक्षां देतच राहिली. मधल्या काळात धुळे-जळगाव-नाशिक यांचे वेगळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुरु झाले. ते विद्यापीठ या मुलांची परीक्षा घेत नसे म्हणून तिकडून मुले (?) - तोपर्यंत बाप्ये झालेवते- ते पुण्याला येउन परीक्षा देत. शेवटी दहा वर्षानंतर सर्वाना उत्तीर्ण करून टाकावे लागले . या मधल्या काळात दोन वेळा अभ्यासक्रमाचे नूतनीकरण झाले होते. अभ्यासक्रमात सोप्प्या गोष्टींचा समावेश करून,विभागांतर्गत गुणांचे प्रमाण थोडे वाढवून घेतले. मिनी प्रोजेक्ट, उद्योगात प्रत्यक्ष काम, सेमिनार या मार्गाने जास्तीजास्त मुले पासच होतील अशी व्यवस्था करण्यात आली. आता १९९५ पर्यंत जिल्ह्याच्या गावातून तालुका पातळीवर या संस्था पोहोचल्या होत्या. सुरुवातीला जागा मिळेल तिथे सुरु झालेल्या संस्था हळूहळू गावाबाहेरील जमिनी स्वस्तात घेऊन किंवा हडप करून वाढल्या. या मिळालेल्या देणगीच्या पैशातून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या.आणि भूक इतकी वाढली की अजून जागा- अजून कोर्सेस - आणखी देणग्या आणि इमारती असं सुरूच राहिलं. १९८३ ला सुरु झालेली सर्व महाविद्यालये ३२ वर्षे झाली तरी आजही इमारती बांधतच आहेत ! आणि त्याला अपवाद मात्र नाहीय ! ( क्रमशः )
  • तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २
  • तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

Book traversal links for तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

  • तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
इतिहास
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिक्रिया
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
24589 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

वाभाडे काढले आहेत.. वाखुसाआ.

एस
Mon, 07/13/2015 - 19:39 नवीन
वाभाडे काढले आहेत.. वाखुसाआ.
  • Log in or register to post comments

समर्पक लिहीले आहे.

बबन ताम्बे
Mon, 07/13/2015 - 20:16 नवीन
आमच्या खेड्यातले इंजिनिअरींग कॉलेज विद्यार्थ्यांअभावी बंद पडले आहे.
  • Log in or register to post comments

खरं आहे

रामपुरी
Mon, 07/13/2015 - 20:42 नवीन
डि वाय पाटील आणि पतंग कदम ही अतिशय चपखल उदाहरणे ठरतील.
  • Log in or register to post comments

डिटेलींग लै जब्राट. येऊ द्या

उगा काहितरीच
Mon, 07/13/2015 - 20:46 नवीन
डिटेलींग लै जब्राट. येऊ द्या पुढील भाग लवकर .
  • Log in or register to post comments

१)आता कंपन्यांना { कायमचे

कंजूस
Mon, 07/13/2015 - 20:56 नवीन
१)आता कंपन्यांना { कायमचे पगारी } एंजिनिअरच नको आहेत.आउटसोर्सिंग उर्फ बाहेरून 'जॅाबवर्क' करून घेण्याने कायमचा डोइजड {overheads ?}खर्च वाचतो शिवाय मालकास मलिदा मिळतो. २)टेंडर पद्धतीने ओर्डर्स घ्याव्या लागतात कंपनीस कायमचे गिह्राइक मिळत नाही. ३)स्ट्राबेरी ,मशरुम,कोरफड,एमु पालन याचे रॅकिटप्रमाणेच एंजिनिअर करून देतो "त्याचे एवढे मार्केट आहे एवढे पैसे मिळतील छाप" बनवेगिरी आहे .प्रत्यक्ष अवातव्य खर्च करून मार्केट ला माल नेतो तेव्हा भाव कोसळलेले असतात.
  • Log in or register to post comments

क्या बात आहे

चैतन्य ईन्या
Mon, 07/13/2015 - 20:59 नवीन
जबराट. उत्तम निरीक्षण भावा. आह्मी पण झालो विन्जीनियर. उगाचच माज होता आपण लई भारी. नंतर कळते कि जॉ व्यायसाय करून जॉब्स तयार करतो तो खरा महान. गुज्जुना असेच असतात. ते मारवाडी न एकदम चिक्कू. आह्मी बघा कसे शिकून मोठे झालो आणि ह्यांच्याकडे पाणी भरतो. बाकी तशीही आता शिक्षणाची भयंकर चेष्टा चालवली आहे. परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार. त्यातल्या त्यात विन्जीनियर बरे म्हणायचे मग.
  • Log in or register to post comments

तुम्हाला माहिती आहे का जागेवर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 07/13/2015 - 22:32 नवीन
तुम्हाला माहिती आहे का जागेवर बसुन काय झालेलं त्या मुलीला ते? अ‍ॅनेस्थेशिया खुपचं गुंतागुंतीची गोष्ट असते. कदाचित त्या मुलीच्या केसमधे दुसर्‍याही काही गुंतांगुंत असु शकत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

परवाच सकाळला बातमी होती ३

अजया
Mon, 07/13/2015 - 21:38 नवीन
परवाच सकाळला बातमी होती ३ वर्षांच्या मुलीचे रूट कणाल करताना गुंगीचे डोस जास्त झाले म्हणून ती मुलगीच मेली. आता ३ वर्षांच्या मुलीचे रूट क्यानल करा सांगणारा डॉक्टर आणि ते आईकणारे आईबाप तर त्याहून महान. पण काय हो करणार काय. निम्म्या लोकांना डोके असून जागा मिळत नाहीत. ज्यांना डोके नाही ते पैशांच्या जीवावर डॉक्टर होतायत कुठून कुठून कारण आई-बापाचे हॉस्पिटल आहे. हे कोण चालवणार.
नक्की या क्षेत्रातल्या कोणत्या माहितीवर आधारित आपण उचलली जीभ आणि लावली टाळ्याला?
  • Log in or register to post comments

gharat ahe na udaharan

चैतन्य ईन्या
Tue, 07/14/2015 - 00:25 नवीन
amachyach natyat ahe naa udaharan. porila 55% takke barawila milale. hattane dentist kelay kuthun tari marathwadyatune. donetion dewun. ata chan practise chalate. madhye patients bombabale tenvha denture karane band kele. bakiche chalu ahe ho. ata bola.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

या उदाहरणावरुन आपण वरील भाष्य

अजया
Tue, 07/14/2015 - 06:50 नवीन
या उदाहरणावरुन आपण वरील भाष्य केले आहे का? चान चान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

एकाच नाय हो. ४ आहेत.

चैतन्य ईन्या
Tue, 07/14/2015 - 16:33 नवीन
अगदी रिझर्व्हेशन चालू झाले नव्हते तेंव्हाच पहिले आहे. २ लोक तेंव्हाच कुठून कुठून आसाम वगैरे हून डाक्तर होवून आली. असो. तुम्हाला पटत नसेल तर राहिले. पण ह्याचे परिणाम सगळ्यांच भोगावे लागतात. सगळीकडून भ्रष्टाचार संपवणे कठीण आहे पण निदान आहेत त्या संस्था धड चालाव्यात हे तरी सरकारचे काम आहे. जिथे पोलिसी मेकिंग आहे तिथे गोची आहे. त्याचे फटके हे असे बाहेर येतात. आता काय आयुर्वेद आणि होमिओपॅथी वाले पण अलोपाथ औषधे देणार. हे असे पोलिसी मेकिंग सगळीकडे आहे. सध्या विन्जीनियर लोक जात्यात आहेत. अर्थात लोक्संखेने जास्त आहेत म्हणून. उद्या असेच डॉक्टर झाले कि ते पण येतील जात्यात. आत्ताच आहेत. तुम्ही चांगले आहे ते मला कसे कळायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

इन्याभौ

पगला गजोधर
Tue, 07/14/2015 - 09:47 नवीन
विनंती आहे की कृपया अफवा पसरवू नका, हे मिपा आहे कस्काय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

यानी जीभ उचलून फक्त टाळ्याला

विजुभाऊ
Tue, 07/14/2015 - 10:25 नवीन
यानी जीभ उचलून फक्त टाळ्याला लावलेली नाहिय्ये तर ती बहुतेक थेट आभाळालाच लावली आहे. या इथे सम्बन्ध नसलेली बातमी तसेच गुजराथी मारवाडी लोकाना उगाच चर्चेत ओढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या

संगणक संबंधी तंत्रशिक्षणाचेही वाभाडे काढा

सामान्यनागरिक
Mon, 07/13/2015 - 21:40 नवीन
असेच काही संगणक संबंधी खासगी शिक्षणाचे ही झाले आहे. दहावी बारावी पास नापास लोकांना आय टी मधल्या मोठया नोकऱ्या मिळण्याची आमिष दाखबुन तीन सहा माहिन्यांचा कोर्स २५ ते ५0 हजार रूपये घेतले जातात आणि अक्षरशः गल्ली बोळात असे शेकडो कलासेस चालतात. कसेबसे CCNA,MCSE वगैरे होऊन हे लोक उम्बरठे झिजवत रहातात .......
  • Log in or register to post comments

उत्तम निरीक्षण.

NiluMP
Mon, 07/13/2015 - 23:27 नवीन
उत्तम निरीक्षण.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे अनुभवसंपृक्त लेख

आदूबाळ
Tue, 07/14/2015 - 02:26 नवीन
नेहमीप्रमाणे अनुभवसंपृक्त लेख. लय भारी!
  • Log in or register to post comments

लेख वाचतेय, उत्तम लिहिलं आहे.

यशोधरा
Tue, 07/14/2015 - 05:16 नवीन
लेख वाचतेय, उत्तम लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

अचुक हाणलयं. काल प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 07/14/2015 - 06:28 नवीन
अचुक हाणलयं. काल प्रतिक्रिया टाईप केली आणि पोस्ट करायला विसरलो
  • Log in or register to post comments

क्या बात है

श्रीरंग_जोशी
Tue, 07/14/2015 - 07:48 नवीन
एकदम मार्मिक आढावा. हे वास्तववादी लेखन खूपच आवडलं.
  • Log in or register to post comments

एक उत्तम

नाखु
Tue, 07/14/2015 - 09:11 नवीन
लेखमाला माझ्यासारख्या बेकाम आणि बेजबाबदार पालकाला अतिशय उपयोगी.
बे = २ बालक
  • Log in or register to post comments

एक नंबर!!!! डीटेलिंग जब्राट

बॅटमॅन
Tue, 07/14/2015 - 12:15 नवीन
एक नंबर!!!! डीटेलिंग जब्राट आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत! लौकर येऊद्या पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

काढा पिसं, फाडा टराटर, सुट्टी

भीमराव
Tue, 07/14/2015 - 12:42 नवीन
काढा पिसं, फाडा टराटर, सुट्टी नका दिवु आता. आसं बी न तसं बी लय कळा काडत्यात विंजनेरची आजकाल. रिजल्ट लागल्याव पुण्यासारख्या शेहरात त लोंढा यतो राव पास आऊट लोकांचा. तुमी आपलं भारी केलय डायरेक कॉलेजवाल्यानलाच टारगेट वर ठिवलय. हेच्या फुडचं बी लवकर लवकर हाना मजी कसं......
  • Log in or register to post comments

उत्तम आढावा. पुभाप्र.

मधुरा देशपांडे
Tue, 07/14/2015 - 12:58 नवीन
उत्तम आढावा. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

उत्तम निरीक्षण आणि

पद्मावति
Tue, 07/14/2015 - 14:06 नवीन
उत्तम निरीक्षण आणि मुद्द्यांची योग्य शब्दात मांडणी. पुढच्या भागाची वाट बघणार नक्कीच.
  • Log in or register to post comments

इंजिनियर्सवर सगळेच खार खाऊन असतात

सिरुसेरि
Tue, 07/14/2015 - 16:12 नवीन
या लेखातले विचार जरी खरे असले तरी , इंजिनियर्सवर सगळेच खार खाऊन असतात हेही तितकेच खरे आहे .इंजिनियर्सच्या पास , नापास होण्याची ,कॉलेजच्या दर्जाची , रोजगार /बेरोजगार असण्याची , कमाई कमी/जास्त असण्याची जेवढी चर्चा , चांगली -वाईट टीका - टोमणेबाजी व इतर शाखांशी/इतर शाखांमधील लोकांशी तुलना केली जाते तेवढी इतर कोणत्याही शाखेच्या बाबतीत होत नाही . इंजिनियर्ससुद्धा ही गोष्ट ओळखून असतात .
  • Log in or register to post comments

समाजात इंजिनियर्स इतर

खेडूत
Tue, 07/14/2015 - 16:21 नवीन
समाजात इंजिनियर्स इतर व्यावसायिकांपेक्षा अधिक संख्येने असणार असा अंदाज आहे- साहजिकच चर्चा होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

छान लेख.

राही
Wed, 07/15/2015 - 12:11 नवीन
लेख आवडलाच, पण माझे थोडेसे वेगळे विचार: भारतात आणि बाहेर संगणकविकासामुळे इंजीनियर्सची मागणी अचानक वाढली आणि मागणीनुसार शिक्षणसंस्थाही वाढल्या. या लाटेत राजकारणी आणि धनदांडग्या लोकांनी आपली गाडगी-मडकी भरून घेतली हे तर खरेच, पण याच लाटेमुळे कित्येक तहानलेल्यांना पाणी मिळाले हेही तेव्हढेच खरे. आजकाल (२५ वर्षांपूर्वीसुद्धा त्या काळाच्या मानाने) जमिनींचे भाव भडकलेले असताना कोणाही सत्प्रवृत्त पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही, आणि सत्प्रवृत्त दांडगा हे काँबिनेशन दुर्मीळ आहे. सर्व भ्रष्टाचार आणि खाबूगिरी जमेस धरूनही, या धनवान आणि सत्तावान लोकांनी संस्था उभारल्या ही इष्टापत्तीच ठरली. उद्योगांच्या, नोकर्‍यांच्या संधी समोर होत्या आणि शहरी/ग्रामीण मध्यमवर्ग त्यांचा फायदा उठवू शकत नव्हता. १९९५ साली जेव्हा वाय टू के च्या निमित्तने अमेरिकेत घबाड योग आला तेव्हा आंध्र-कर्नाटकातील इंजीनीयर्सच्या दहा बॅचेस त्यासाठी अनुभवासकट जय्यत तयार होत्या. १९७०मध्ये बँक-राष्ट्रीयीकरणानंतर बँकिंग सेवांचा दर्जा घसरला आणि खाबूगिरी वाढली तरी खेडोपाडी बँकिंग सेवा पोचली आणि रोजगाराबरोबरच आतापर्यंत अज्ञात अशा आर्थिक विश्वातल्या व्यवहारांची गुहाच ग्रामीण भागात उघडली. या बदलाची तुलना पुढे घडलेल्या आय.टी क्रांतीशी होऊ शकेल. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले, पण दर्जा घसरला अशी ही 'गड आला पण सिंह गेला' प्रकारची सिचुएशन आहे. मागणी सरली की या संस्था आपोआप बंद पडतील किंवा अन्य मागण्यांनुसार पुरवठा सुरू करतील. आज अनेक ग्रामीण युवक देशीपरदेशी तुलनात्मकरीत्या सुखात आहेत याच्या पाठीमागे पंचवीस वर्षांपूर्वीची इंजीनियरिंग कॉलेजांची संख्यावाढ हे कारण थोडेफार तरी आहे. लेखमाला आहे, तेव्हा क्रमशः मध्ये हा मुद्दा पुढे येईलच कदाचित.
  • Log in or register to post comments

अंशतः सहमत. वेगळ्या विचाराचे

खेडूत
गुरुवार, 07/16/2015 - 08:49 नवीन
अंशतः सहमत. वेगळ्या विचाराचे स्वागत आहेच !
पण निर्बळ लेच्यापेच्याला कुठलीच संस्था शहरात (जिल्ह्याचे ठाणे) उभी करणे शक्य नाही,
हे शक्य होऊ नये याची व्यवस्थित काळजी घेण्यात आली. अत्यंत जवळून हे सर्व पाहिल्यामुळे आणि त्या क्षेत्रात भरपूर वर्षे काम केल्यानेच हे समजू शकते. कर्नाटक मॉडेल मधूनच हे सर्व शिकले होते. अन्यथा चारपाच लाख जमवणे बुद्धीजीवींना तेव्हाही सहज शक्य होते. तसे प्रयत्न हाणून पाडले गेले. त्यांना मॅनेज करून राजकीय लोक पुढे गेले. तहानलेल्यांना घोटभर पाणी देणे ठीक, पण उद्देश तो नव्हताच- ते वाईटात चांगले शोधणे झाले. त्याचे साईड इफेक्ट्स बरेच मोठे होते. साखर कारखाने तोट्यात आणणारेच या खेळात पुढे होते. तेच सत्तेत पुढे अनेक दशके रहातील याची व्यवस्था यातून तयार झाली. हे सर्वात वाईट झाले. आणखी एक नुकसान म्हणजे या क्षेत्रावर राजकीय नियंत्रण मिळाल्याने काही चांगल्या अराजकीय संस्था यांच्या अप्रत्यक्ष नियंत्रणात राहिल्या. तरीही आज त्याच संस्था सरकारी कॉलेजांच्या बरोबरीने विद्यार्थी आकर्षित करतात आणि त्यांच्याकडूनच काहीतरी चांगल्याची आशा आहे. म्हणणे इतकेच आहे, की हे अजून चांगले होऊ शकले असते. पण चुकीच्या लोकांमुळे हे आजची परिस्थिती आली आहे. बँक राष्ट्रीयीकरणाबाबत फारशी माहिती नाही, त्यावेळी आम्ही पाळण्यात होतो- पण त्यामुळे खेड्यापाड्यात गंगा वगैरे पोहोचली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं आमचं गाव आजूबाजूच्या चाळीस गावांचं केंद्र होतं. तिथेच वीज-पाणी नव्हतं १९८५ पर्यंत . २००० पर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकच ७५% वित्तपुरवठा करत होती, साधारण १०% सावकार, आणि उरलेले राष्ट्रीयीकृत बँकेत, हा प्रकार अगदी २०१० पर्यंत होता - जोपर्यंत सरकारने सहकार क्षेत्र खाउन फस्त केले नव्हते. हे असं का झालं हे फार रोचक आहे, पण इथे अवांतर . (मी स्वतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अनेक वर्षे खातेदार आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

हा ही भाग उत्तम

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 07/16/2015 - 09:07 नवीन
मी इंजिनिअरींगला जाऊ शकलो असतो तर ते वर्ष होते १९९९. २००० सालापासून आयटी ही नवी शाखा अन कॉम्प्युटर सायन्स अन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखांच्या जागा एकदम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या. इथे अमेरिकेत मी सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या पोझिशन्ससाठी इंटरव्ह्युज घेत असतो. बहुतांश उमेदवार भारतातील इंजिनिअरिंग करून अमेरिकेत येऊन एम एस उत्तीर्ण झालेले असतात. वर त्यावर त्यांना काही वर्षांचा अनुभवही असतो. तरी पण थोडेही टिपिकल प्रश्न न विचारता सिनॅरिओ बेस्ड प्रश्न विचारले की अनेकांची भंबेरी उडते. ज्या प्रकारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन भारतात करतात त्याच प्रकारे बहुधा अमेरिकेत येऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्यानंतर सतत नोकर्‍या बदलत राहताना वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिजवर काम करतात अन नव्या ठिकाणी इंटरव्ह्य्य देताना ज्या टेक्नॉलॉजीसाठी इंटरव्ह्यु होत आहे तिच्यातच वर्षानुवर्षे काम केले असल्याचे भासवायचा प्रयत्न करतात. आजकाल बर्‍याच अमेरिकन कंपन्या महत्वाच्या प्रोजेक्ट्सचे काम भारतात पाठवायाला तयार नसतात. अधिक पैसे लागले तरी चालतील पण काम इथे त्यांच्या ऑफिसेसमध्येच व्हायला हवे असा आग्रह असतो.
  • Log in or register to post comments

सहमत.

खेडूत
गुरुवार, 07/16/2015 - 09:19 नवीन
सहमत. आपले हे अनुभव सविस्तर लेखात येऊ द्या. त्यामुळे नवोदित मंडळीचे भलते समज दूर होतील. १९९८ मध्ये मी पुणे विद्यापीठातल्या आय टी अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीवर होतो. त्यावेळी अनेक बहुराष्ट्रीय कम्पनीतल्या लोकांना भेटत असे. त्यांचा असा अभ्यासक्रम वेगळा करायला विरोध होता - कारण इंजिनियर म्हणून ज्या अत्यंत मुलभूत अपेक्षा असतात त्या या लोकांकडून पूर्ण होत नाहीत. शिवाय '' कठीण समय येता '' यांनाच पहिला झटका बसणार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा