गावाचं तेव्हा शहर व्हायचं होतं.वाड्याला लागून वाडे होते . छेडा-गाला-ठक्कर नावाची माणसं फिरकत नव्हती. गावाला गुजराथ्यांचं वावडं नव्हतं.गावात गुजराथी कुटुंब बरीच होती. त्यांना गुज्जर म्हणायचे. धारीया ,सेठ , शहा अशी नेमकीच आडनावं होती. गुज्जरांची मोजणी वेगळी नसायची. हळूहळू बदल येत गेला.भाडोत्री नावाची कुटुंब वाड्यात रहायला आली.त्यांना गावाबद्दल कधीच प्रेम नव्हतं.त्यांना त्यांचंच गाव आवडायचं .पण पोट भरायला बिचारी आमच्या गावात आली होती.पण हळूहळू बदल येत होता. पंचायतीची इमारत उभी राहीली.टेलीफोनच्या लायनी रस्त्यावरून लोंबायला लागल्या. शाळा मोठी झाली.