✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पारंपारिक प्रतिस्पर्धी

म
मृत्युन्जय यांनी
Wed, 03/30/2011 - 13:18  ·  लेख
लेख
तुम्ही कधी साप आणि मुंगुसाला भांडताना बघितले आहे? दोघेही जीव खाउन लढतात. कारण ती अस्तित्वाची लढाई असते. आजवर कधी पाहण्याचा योग आला नसेल तर आज बघा. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० मिनिटांनंतर २ देशातले २२ खेळाडु साप आणि मुंगुसासारखे लढणार आहेत. हा केवळ त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही आहे तर २ देशांच्या अस्मितेचा सुद्धा प्रश्न आहे. आजचा भारत - पाकिस्तान सामना हा तिसर्‍या महायुद्धापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात हे २ देश कधीही उपांत्य फेरीच्या सामन्यात समोरासमोर आले नाहीत. याआधी कधीही त्यांची लढाई अस्तित्वाची लढाई नव्हती. त्यामुळे आजचा सामना न भूतो न भविष्यति महत्वाचा झालेला आहे. २ देशांमधले वैर स्वातंत्र्यापासुन अबाधित असले आणि खेळात वैरभावना असु नये अशी काही लोकांची पांचट प्रतिक्रिया असली तरी जेव्हापासुन दोन्ही देशांनी स्वतंत्र्यरीत्या क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासुन दोघांचे मैदानावरचे वैर टिकुन आहे. दर स्पर्धेगणिक वाढते आहे. विश्वचषक म्हटल्यावर तर त्याला युद्धाचेच स्वरुप प्राप्त होते. दोन्ही देशांकडच्या खेळाडुंच्या सुदैवाने पहिले ४ विश्वचषक हे २ देश समोरासमोर आले नाहीत. पहिल्या विश्वचषकात दोघेही साखळी सामन्यातच गारद झाले. १९७९ मध्ये पाकडे उपांत्य फेरीत पोचले पण भारत साखळीतच गारद झाला. १९८३ मध्ये दोघेही उपांत्य फेरीत पोचले पण दोघेही वेगवेगळ्या प्रतिस्पर्द्यांविरुद्ध खेळले आणि पाक उपांत्य फेरीत गारद झाले तर भारताने इतिहास घडवला. १९८७ मध्येदेखील या द्वंद्वाने क्रिकेटरसिकांना हुलकावणी दिली. मात्र १९९२ मधले संघ एवढे सुदैवी नव्हते. त्यांनी या थराराचा अनुभव घेतलाच. १९९२ मध्ये स्पर्धेचे स्वरुप थोडे वेगळे होते. त्या आधी प्रत्येकवेळेस भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात विभागले गेले होती. पण १९९२ च्या विश्वचषकात मात्र सर्व संघ एकमेकांशी झुंजले. अर्थात भारत - पाकिस्तान लढतीचा देखील नंबर लागला. दोन्ही संघ किमान कागदावर तगडे होते. भारताकडे फलंदाजीला जडेजा, श्रीकांत, सचिन, अझहर, कांबळी, कपिल, मांजरेकर, किरण मोरे आणि मनोज प्रभाकर अशी तगडी फौज होती तर पाकिस्तानची फलंदाजी देखील आमिर सोहैल, इंझी, मियांदाद, सलीम मलिक, इम्रान खान, मोइन खान, अक्रम अशी झुंजार फलंदाजी होती. गोलंदाजीतही दोन्ही संघ समसमान होते आपल्याकडे कपिल, श्रीनाथ, प्रभाकर होते तर त्याच्याकडे अक्रम, आकिब जावेद, इम्रान खान अणि मुश्ताक महमद अशी चांडाळ चौकडी होती. क्षेत्ररक्षणात देखील दोन्ही समानप्रमाणात गचा़ळ होते. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावा काढल्या. यात जडेजाच्या ४६ आणि सचिनच्या ५४ तर होत्याच त्याचबरोबर कपिलने देखील त्याची तलवार वेगात फिरवली आणि २६ चेंडुत ३४ धावा ठोकल्या. ३४ धावांवर जाउ नका. त्या काळात १००+ धावगतीने धावा काढणे ही काही येरागबाळ्याची बात नव्हती. नंतर कपिलने सुरुवातीलाच पाकड्यांना धक्का देत इंझमामला घरी पाठवले. पाठोपाठ प्रभाकरने फैजलला बाद केले. नंतर या दोघांचा नापाक फलंदाजांनी धसका घेतला आणि दोघांच्या २० षटकात मिळुन अवघ्या ५२ धावा केल्या आणि ४ बळी फेकले. सचिनने गोलंदाजीतही चुणुक दाखवत फेविकोल लावुन खेळणार्‍या सोहेलला ६२ धावांवर परतवले. आणि मग ठराविक अंतराने पाक फलंदाज परतत राहिले. १७३ धावांवर पाकला गुंडाळुन भारताने सामना जिंकला. नंतर पाकिस्तानने रडतखडत का होइना विश्वचषक जिंकला. भारतीयांसाठी भारताने पाकिस्तानला धुतला हेच महत्वाचे होते. शिवाय या सामन्यात भारतियांनी पाकिस्तानला फ्रस्ट्रेट केले होते हे महत्वाचे. समोरच्याला किती वैताग तरी आणावा याचे उत्कृष्ट उदाहरण होते किरण मोरेसमोर जावेद मियांदादने मारलेल्या ३ माकड उड्या. कोणी माकड उड्या म्हटले कोणी कांगारु उड्या. पण आजही मियांदाद म्हटले की मला त्याच्या ८०००+ धावा आठवत नाहीत. त्या माकड उड्या आठवतात. त्या बघुन किरण मोरेसारखा निधड्या छातीचा माणूसदेखील २ मिनिटे ब्लँक झाला होता. १९९६ चा सामना तर संस्मरणीय होता. त्या सामन्याने भारतीय फलंदाजांची विजिगुषु वृत्ती दाखवुन दिली. सामना जिंकण्यापेक्षा समोरच्याला ठेचणे हे जास्त महत्वाचे असते. समोर पाकिस्तान असले की खुपच जास्त. ९६ च्या विशवचषकात जडेजा आणि प्रसादने तेच केले. तो उपउपांत्य फेरीचा सामना होता. मार्च महिनाच होता. टु बी मोर प्रिसाइज ९ मार्च १९९६. भारताने प्रथम फलंदाजी घेतली. सिक्सर सिद्धु ने आपल्या षटकार मारण्याच्या उर्मीवर ताबा ठेवुन संयमी ९३ धावा काढल्या. तेंडुलकर, अझहर, कांबळी, मांजरेकर या सगळ्यांनीचा उपयुक्त २०-३० धावा केल्या. आणि मग जडेजा मैदानावर आला. त्याने मुळावरच घाव घातला. वकार युनुसला एका षटकात त्याने अक्षरश: तुडवला. १९९६ मध्ये २६० ही जिंकणेबल धावसंख्या मानली जायची. त्याकाळात फलंदाज साधारण तेवढीच धुवाधुवी करायचे. तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने तब्बल ४५ धावा कुटल्या. या मारामारी मुळे युनुस आणि आकिब जावेद दोघेही १० षटकांमध्ये ६७ धावांना धुतले गेले. शेवटी युनुसने जडेजाचा बळी घेत बदला घेतला पण तोपर्यंत जडेजाने सामना पुर्ण एंजॉय केला आणि चिन्नास्वामी वरच्या ४००००+ लोकांनी सुद्धा. त्यांच्या एंजॉयमेंट मध्ये कुठेही खंड पडु नये याची पुर्ण काळजी नंतर आमिर सोहेल आणि वेंकटेश प्रसादने घेतली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्‍यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे. मी स्वत: तर जवळजवळ उड्याच मारत होतो. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा. सोहैल - अन्वर नंतर पाक फलंदाज ठराविक क्रमाने बाद होत गेले. सलिम मलिक - जावेद मियांदादने थोडा प्रतिकार केला खरा. मात्र वाढत्या धावगतीने त्यांना निष्प्रभ केले. सोहैलच्या बळीने आत्मविश्वासाच्या डोगरावर चढलेल्या प्रसादने नंतर इंझमाम आणी इजाझ अहमद हे खंदे फलंदाज परतवले. सामना भारताने ४० धावांनी जिंकला. सामन्याचा मानकरी सिद्धु होता पण सामन्याचा हीरो प्रसाद ठरला. Venkatesh Prasad had his moment of success supported by unparrallal bliss. या विश्वचषकानंतर जावेद मियांदाद या महान फलंदाजाचा अस्त झाला. १९९९ च्या विश्वचषकाच्या वेळेस वैरभाव परमोच्च शिखरावर होता. भारताने नुकतेच पाकिस्तानला कारगिलमध्ये धुवुन काढले होते. हुतात्म्यांच्या चितेची राख अजुन गरम होती. तो सामना जिंकणे दोन्ही संघासाठी विश्वचषक जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचे होते. तो हाय टेंन्शन सामना भारताने जिंकला. साखळीमध्ये प्रथमच भारत पाकिस्तान एकाच गटात होते. शोएब अख्तरचा तो बहुधा पहिला विश्वचषक होता. आधीच्या २ लढतींप्रमाणे भारताने प्रथम फलंदाजी घेतली आणि २२७ धावा केल्या. त्यात सचिनच्या ४५ आणि द्रविड - अझहरची अर्धशतके होती. अझहर प्रचंड अडखळत खेळला पण त्याच्या ५९ धावा शेवटी निर्णायक ठरल्या. प्रत्युत्तरादाखल पाकडे केवळ १८० धावा करु शकले. आणि यावेळेस मात्र सामन्याचा मानकरी होता वेंकटेश प्रसाद. त्याने त्याच्या गोलंदाजीचा प्रसाद देत ५ बळी मिळवले आणि ते सगळे तगडे फलंदाज होते. सईद अन्वर, इंझमाम, सलीम मलिक, मोइन खान आणि वासिम अक्रम. श्रीनाथनेदेखील ३ बळी घेत त्याची कामगिरी पार पाडली. भारताने त्याव्यतिरिक्त या विश्वचषकात काहीही कमावले नाही. But who cares? आम्ही पाकिस्तानला हरवले. त्यानंतर स्टेडियम मध्ये बहुसंख्येने असलेल्या पाकड्यांनी (सामना इंग्लंडमध्ये होता आणि मॅचेस्टर मध्ये पाकिस्तानी लोकसंख्या बरीच आहे) हुल्लडबाजी केली. तिरंगा जाळला. पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीव्ही फोडले. आत्महत्या केल्या. यावरुन या सामन्यात स्टेक्स किती जास्त होते हे लक्षात येइल. २००३ मध्ये मार्चच्या पहिल्या दिवशी भारत पाक परत एकदा लढले. सईद अन्वरच्या घणाघाती शतकाच्या जोरावर पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने २७३ धावा कुटल्या. त्यातल्या ७४ धावांचे आंदण आपल्या चेहेरापाड नेहेराने दिले. अर्थात अन्वर आणि अब्दुर रझ्झाक हे २ बहुमुल्य बळी देखील मिळवले. आणि त्यानंतर समस्त भारतीयांनी विश्वचषकातील भारतीयांच्या सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक खेळी पाहिली. शोएब अख्तर विरुद्ध सचिन तेंडुलकर हा हाय प्रोफाइल सामना सचिनने अवघ्या चौथ्या चेंडुवर शोएबच्या बाउन्सरवर थर्ड मॅनला षटकार ठोकुन संपवला. नंतरचे २ चेंडुदेखील सीमेपार गेले. सचिनने त्या दिवशी समस्त क्रिकेटजगताला प्रतिहल्ल्याचे धडे दिले. त्याचा एकेक चौकार अनमोल मोत्याप्रमाणे होता. सचिन सेहवाग जोडीने पाकिस्तानी क्रिकेट इतिहासातील एका सर्वोत्तम गोलंदाजीचे अक्षरशः धिंडवडे काढले. वकार, वासिम अक्रम, अफ्रिदी, रझ्झाक आणि शोएब अख्तर सगळे फेल गेले. सेहवागने वकारला एक सोन्यासारखा चौकार मारला. त्याला वकारनेच परतवले. सचिनही शोएबचा कचरा करुन त्याच्याच गोलंदाजीवर ९८ धावांवर परतला. पण द्रविड आणि युवराजने (नाबाद ५०) कार्य सिद्धीस नेले. भारताने सामना ४६व्या षटकातच खिशात घातला. सचिनचे शतक नाही झाले. पण त्या ९८ धावा द्विशतकाएवढ्या मौल्यवान होत्या. सामनावीर तेंडुलकरच ठरला. आत्तापर्यंतच्या विश्वचषकातल्या या चारही लढती भारताने जिंकल्या आहेत. अगदी सहजपणे वर्चस्व गाजवत. मागच्या लढतीतले हीरो सचिन आणि युवराज अजुनही संघात आहेत. आज पाचवा सामना जिंकुन भारताने पाकिस्तानला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा हीच श्रीचरणी प्रार्थना.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
क्रीडा
राजकारण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
शुभेच्छा
लेख
प्रतिसाद
अभिनंदन
बातमी
अनुभव
प्रतिक्रिया
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11707 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

आज पाचवा सामना जिंकुन भारताने

गणपा
Wed, 03/30/2011 - 13:24 नवीन
आज पाचवा सामना जिंकुन भारताने पाकिस्तानला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा हीच श्रीचरणी प्रार्थना.
आमेन. :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम आढावा .. प्रसाद बहुधा

गणेशा
Wed, 03/30/2011 - 13:29 नवीन
अप्रतिम आढावा .. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा .. एकदम बरोबर .. ती मॅच पाहतानाचा आलेला हुरुप अजुन लक्षात आहेच .. पण सचीन ची २००३ ची सर्वोत्तम खेळी ही खुप आवडलीच होती .. आज सहवाग च्या आतिषबाजीच्या प्रतिक्षेत ...
  • Log in or register to post comments

भारत - पाकिस्तान सामना म्हणला

५० फक्त
Wed, 03/30/2011 - 13:34 नवीन
भारत - पाकिस्तान सामना म्हणला की फक्त प्रसाद आठवतो आणि सचिननं शोएबला स्लिपवरुन मारला होता तो शॉट.
  • Log in or register to post comments

झकास लेख बाकी आपण २००३ नंतर

स्पा
Wed, 03/30/2011 - 13:36 नवीन
झकास लेख बाकी आपण २००३ नंतर २००७ च्या टी-२० विश्वचषकात पाकड्यांना ठेचले होते, ते सुद्धा फायनल मध्ये
  • Log in or register to post comments

एकदम झक्क्कास

प्रचेतस
Wed, 03/30/2011 - 13:40 नवीन
मियांदादच्या माकडउड्या वेंकटेश प्रसादचा दणका
  • Log in or register to post comments

तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४

मुलूखावेगळी
Wed, 03/30/2011 - 13:43 नवीन
तेव्हा जडेजाने २५ चेंडुत ४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने तब्बल ४५ धावा कुटल्या. या मारामारी मुळे युनुस आणि आकिब जावेद दोघेही १० षटकांमध्ये ६७ धावांना धुतले गेले. शेवटी युनुसने जडेजाचा बळी घेत बदला घेतला पण तोपर्यंत जडेजाने सामना पुर्ण एंजॉय केला आणि चिन्नास्वामी वरच्या ४००००+ लोकांनी सुद्धा. त्यांच्या एंजॉयमेंट मध्ये कुठेही खंड पडु नये याची पुर्ण काळजी नंतर आमिर सोहेल आणि वेंकटेश प्रसादने घेतली. २८७ धावांचा पाठलाग करताना आमिर सोहैल - सईद अन्वर द्वयीने भारतीयांच्या तोंडचे पाणी पळवले. ३२ चेंडुत ४८ धावा काढुन अन्वर परतला. पण सोहैलचा धडाका कायम होता. समोर वेंकटेश प्रसादसारखा गोलंदाज असेल तर क्या कहने. त्याने प्रसादला धुतला. एक चेंडु सीमापार धुडकवुन त्याने प्रसादला त्याची जागा दाखवली. आणि नंतर न भूतो न भविष्यति घटना घडली. एरवी ज्याच्या चेहेर्‍यावरची माशी कधी हलायची नाही अश्या प्रसादने पुढच्याच चेंडुवर सोहैलच्या यष्ट्या वाकवल्या आणि पॅविलियनकडे बोट दाखवुन तो चिन्नास्वामीवरच्या आनंदाने वेड्यापिश्या झालेल्या क्राउडसमोर सोहैलवर बरसला "Go home, you f****** bastard". शिव्या देणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे हे विसरुन तमाम भारतीयांनी त्या क्षणी बहुधा प्रसादला स्टँडिंग ओव्हेशन दिले असावे. मी स्वत: तर जवळजवळ उड्याच मारत होतो. प्रसाद बहुधा त्या एका क्षणासाठी आयुष्य जगला असावा.
ह्या चा उल्लेख आवडला आनि ती मॅच ही आठवतेय.डोळ्यासमोर उभे केलेत चित्र. तेवड्याच१ च कारनासाठी जडेजा न प्रसाद नेहमी आठवनीत आहेत.कारन मी गिनेचुने च मॅचेस बघ्ते मस्त लिहिलेस आजच्या मुहुर्ताचा मान ठेवुन. आनि
आज पाचवा सामना जिंकुन भारताने पाकिस्तानला ५-० असा व्हाईटवॉश द्यावा हीच श्रीचरणी प्रार्थना.
+१०००००
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

गवि
Wed, 03/30/2011 - 13:52 नवीन
उत्तम लेख.
  • Log in or register to post comments

प्रसाद आणि पकिस्तान

चावटमेला
Wed, 03/30/2011 - 14:20 नवीन
एरवी अगदी पापभीरु सखाराम गटणे वाटणार्या प्रसाद (ह्याच्यापेक्षा कुंबळेचा वेग जास्त होता ;))च्या अंगात पाकिस्तान विरुद्ध मात्र दहा हत्तींचे बळ संचारायचे, त्या ९६ च्या सामन्यानंतर, पकिस्तान विरुद्ध तो बोलिंगच काय पण ब्याटिंग सुद्धा जीव तोडून करायचा.
  • Log in or register to post comments

गणपाशी सहमत!!!

प्रीत-मोहर
Wed, 03/30/2011 - 18:39 नवीन
गणपाशी सहमत!!!
  • Log in or register to post comments

बीबीसी

विकास
Wed, 03/30/2011 - 18:42 नवीन
बीबीसीने म्हणल्याप्रमाणे "mother of all battles" चालू आहे... काल पाऊस पडून गेला असल्याने बॅटींगमधे गडबड झाली आहे का? तसे असल्यास भारताने बॅटींग का घेतली असा प्रश्न पडला आहे... असो. आत्याबाईंच्या नसलेल्या मिशावर नंतर चर्चा करता येईल. :-)
  • Log in or register to post comments

पाकिस्तानचे तोंड काळे करून

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/31/2011 - 00:12 नवीन
पाकिस्तानचे तोंड काळे करून व्हाईटवॉश दिल्या गेलेला आहे. :-)
  • Log in or register to post comments

सुपरलाईक

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/31/2011 - 09:07 नवीन
सुपरलाईक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

चांगला आढावा

सखी
गुरुवार, 03/31/2011 - 00:37 नवीन
चांगला आढावा घेतला आहे, आपण जिंकल्यामुळे अजुनच आनंदात भर पडली. फक्त ते मोरे-मियांदादचे संदर्भ बरोबर आहेत का? मला वाटते किरण मोरेपण काहीतरी खोड्या काढत होता, आणि आधिचा बॅट्समन गेल्यावर त्याने तश्या पण चांगल्या :) उड्या मारल्या होत्या. पुढच्या एकदोन बॉलमध्येच मियांदाद रनआऊट होता होता वाचला, आणि त्याने अगदी माकडउड्याच मारल्या. दुवा http://cricketnext.in.com/news/when-more-got-under-miandads-skin/55928-13.html माझे संदर्भ चुकीचे असतील कदाचित पण आतातरी असे अंधुकसे आठवते आहे.
  • Log in or register to post comments

किरण मोरे खुप जास्त अपील करत

मृत्युन्जय
गुरुवार, 03/31/2011 - 10:45 नवीन
किरण मोरे खुप जास्त अपील करत होता. आदल्याच बॉलवर त्याचा आणि मियांदादचा कशावरुन तरी खटका उडाला होता. मियांदाद स्वतः देखील खुप फ्रस्ट्रेट झाला होता. कसे आहे इतर टीमा स्लेजिंग करतात तेव्हा त्या वाईट आपला मोरे बडबड करतो तेव्हा ते प्रामाणिक अपील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

अपील आणि स्लेजींग मधे फरक

शिल्पा ब
गुरुवार, 03/31/2011 - 21:58 नवीन
अपील आणि स्लेजींग मधे फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ऐतिहासिक सामना जिंकल्या

शिल्पा ब
गुरुवार, 03/31/2011 - 01:12 नवीन
ऐतिहासिक सामना जिंकल्या गेल्या आहे...
  • Log in or register to post comments

बर...

अनिता
गुरुवार, 03/31/2011 - 02:25 नवीन
म. छान लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मस्त आढावा

संदीप चित्रे
गुरुवार, 03/31/2011 - 19:50 नवीन
कालच्या सामन्याचीही ह्यात भर घालणार का?
  • Log in or register to post comments

पुढच्या विश्वचषकाच्यावेळेस

मृत्युन्जय
Fri, 04/01/2011 - 11:04 नवीन
पुढच्या विश्वचषकाच्यावेळेस लेख लिहिन तेव्हा कदाचित खालील उतारे वापरीनः भारत ५-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने पाकिस्तानशी ३० मार्च २०११ रोजी उपांत्य फेरीच्या सामन्यात पाचव्यांदा झुंजला. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे राजनैतिक संबंध बरेच बिघडले होते. ते सुधारण्यासाठी म्हणा किंवा अतिरेकी हल्ल्याची शक्यता धूसर करण्यासाठी म्हणा, मनमोहन सिंगांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सामना पाहण्याचे आमंत्रण दिले. ते स्वीकारुन पाक पंतप्रधान गिलानी स्वतः सामन्याला हजर सुद्धा राहिले. या सामन्याच्या निमित्ताने अनेक आंतरजालीय विनोदांना तोंड फुटले होते. मोहाली पाकिस्तानी बॉर्डरपासुन जवळ असल्यामुळे हारल्यानंतर पाकड्यांना घरी जायला जास्त तगतग करायला लागणार नाही असा एक विनोद जोरात होता. गिलानींना स्वत:च्या देशात स्तुती ऐकण्याची फारशी सवय नव्हती. पण त्या निमित्ताने भारतीय आंतरजालाने त्यांची खुपच स्तुती केली. पाकिस्तानी खेळाडुंवर प्रेम करणारा त्यांची काळजी घेणारा माणूस म्हणुन त्यांची प्रतिमा रंगवली गेली. अर्थात विनोदाने. गिलानी खेळाडुंची इतकी काळजी घेतात की त्यांना घेउन जाण्यासाठी ते स्वतः आले आहेत असा विनोद खुप प्रसिद्ध झाला होता. उपउपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यामुळे ११ कागारुंना मारल्यामुळे वन खाते भारतीय खेळाडुंच्या मागावर आहे पण ११ अतिरेक्यांचा वध केल्याशिवाय भारतीय संघ शरणागती पत्करणार नाही असे धोनीने जाहीर केले आहे असाही एक विनोद सांगितला जात होता. एकुण मीडिया हाइप प्रचंड होती. हार पत्करणे कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. सामन्याच्या दिवशी अखेरच्या क्षणी फॉर्मात असलेल्या अश्विनला वगळुन अफ्रिकेविरुद्ध गचाळ गोलंदाजी करणार्‍या चेहेरापाड नेहेराची निवड जेव्हा धोनीने केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. इतिहासाची आठवण ठेवुन धोनीने टॉस जिंकुन प्रथम फलंदाजी घेतली (त्याआधीचे ४ पैकी ३ विजय प्रथम फलंदाजी घेउन मिळवले होते). सुरुवात तर झक्कास झाली. सेहवागने उमर गुलच्या एका षटकात ५ चौकार मारुन त्याचा आत्मविश्वास गुल केला. पहिली जोडी अर्धशतकी भागिदारी करेल असे वाटत असतानाच सेहवाग आउट झाला. पण तगडी फलंदाजी असल्याने आणि मुख्य म्हणजे सचिन मैदानावर असल्यामुळे फारशी चिंता नव्हती. पण नंतरची ३० षटके सचिनने चिंता चितेसमान असते याचा वारंवार प्रत्यय आणुन दिला. सामन्याआधी सचिनला शतक करु देणार नाही अशी डरकाळी अफ्रिदीने फोडली होती. कर्णधाराचे मनसुबे फोल ठरवण्याची प्रतिज्ञा करुन बहुधा पाक क्षेत्ररक्षक मैदानावर उतरले होते तर शतक करुन भारताच्या पराभवाला जबाबदार ठरण्यापेक्षा (त्याआधीच्या २०११ च्या विश्वचषकातल्या ज्या २ सामन्यात सचिनने शतक ठोकले होते ते दोन्ही सामने भारत जिंकु शकला नव्हता) आउट होउन अफ्रिदीचे समाधान करावे या इराद्याने सचिन खेळत होता. त्याला तब्बल ६ जीवदाने मिळाली. त्याआधी कधीही एवढी जीवदाने एकाच खेळीत मिळाली नव्हती अशी कबुली खुद्द सचिनने दिली होती. अखेर ८५ धावांची सुरेख फटक्यांनी नटलेली आणी तरीसुद्धा ६ जीवदानांमुळे अनाकर्ष़क ठरलेली सचिनची खेळी ८५ धावांवर संपुष्टात आली आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अफ्रिदीने, सचिनच्या वि़केटवर डोळा असणार्‍या पाकड्यांनी आणि हा आत्ता जातो का मग या काळजीने पोखरल्या गेलेल्या भारतीयांनी सुद्धा. ३७ व्या षटकाच्या अखेरीस १८७ धावसंख्या असताना सचिन परतला त्या पुर्वी वहाब रियाझ या तोपर्यंत फारसा यशस्वी न ठरलेल्या गोलंदाजाने भारताची मधली फळी कापुन काढली होती. त्याने सेहवाग, कोहली आणि स्पर्धेत प्रचंड फॉर्मात असणार्‍या युवराज सिंगला परतवले होते. युवराज तर पहिल्याच बॉलवर एका सुरेख चेंडुवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर स्पर्धेतल्या आपल्या फॉर्मला जागुन धोनीने २५ धावा केल्या आणि वहाबलाच आपली विकेट बहाल केली. रैना नसला असता तर भारताची त्या सामन्यात पार दैना झाली असती. पण सुरेश रैनाने कोसळणार्‍या खालच्या फळीला हाताशी धरुन स्वतः ३६ धावा काढल्या. पोवरप्ले मध्ये त्याच्या कृपेने त्या स्पर्धेत भारताने प्रथमच थोड्या बर्‍या धावा काढल्या. भारताने ५० षटकात २६० धावा काढल्या. पाकिस्तानची फलंदाजी देखील बलाढ्य होती. भारतीय गोलंदाजीसमोर तर अशीही बांग्लादेशची फलंदाजीदेखील बलाढ्य वाटली होती. पाकिस्तान हळुहळु लक्ष्याकडे वाटचाल करत होता. पण फलंदाजीत साफ निराशा केलेल्या युवराजने गोलंदाजीत मात्र कमाल केली. त्याने लागोपाठच्या २ षटकात असद शफीक आणि धोकादायक युनुस खानला परतवले. त्यानंतर आलेला उमर अकमल धावगती वाढवत होता आणि मिसबाह उल हक संथगतीने खेळुन ती कमी करत होता. अखेर हरभजन सिंगचा एक चेंडु चक्क वळला असे वाटत वाटत वळलाच नाही आणि अकमलच्या यष्ट्या उध्वस्त करुन गेला. हरभजननेच नंतर अफ्रिदीची मोस्ट प्रेशियस विकेट मिळवली. जोवर अफ्रिदी होता तोवर सामना पाकिस्तानच्या हातात होता. नंतर मात्र धावगती वाढत राहिली आणि विकेट्स पडत राहिल्या. शेवटपर्यंत टिकलेल्या मिस्बाह ने अखेर काही सुंदर फटके मारले पण तोवर खुप उशीर झाला होता. ९ विकेट्स पडल्यामुळे मिसबाह उल हकला एकेरी धावा काढता येत नव्हत्या. अखेर शेवटचा बळी तोच ठरला. नेहेराने सामन्यात चक्क उत्कृष्ट गोलंदाजी करत ३३ धावांच्या मोबदल्यात शेपटाचे का होइना पण २ बळी मिळवले. भारताने अखेर ५-० चा वाईटवॉश दिलाच. भारताच्या सगळ्याच गोलंदाजांना २ -२ बळी मिळाले. हा विजय खर्‍या अर्थाने सांघिक होता. विजयात सगळ्यांचे योगदान लागले. इतर कोणीच नेत्रदीपक कामगिरी केली नसल्यामुळे असेल कदाचित पण ६ जीवदाने मिळुन सुद्धा सचिनलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या यशाने प्रेरीत झालेल्या भारताने नंतर विश्वचषकाला गवसणी घातलीच. रावणाला हरवण्यासाठी रामाने इंद्राचा रथ वापरला होता. इथेदेखील महेंद्रच्या रथावर स्वार होउन रामरुपी सचिनने अखेर लंकेला चीत करुन भारताला दुसरा विश्वचषक मिळवुन दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

ही ताजी बातमी वाचा.

चिंतामणी
Fri, 04/01/2011 - 01:41 नवीन
पराभवामुळे पाकिस्तामध्ये संतप्त प्रतिक्रिया इस्लामाबाद - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात "कट्टर प्रतिस्पर्धी' भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तनमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. झहीर खानच्या चेंडूवर मिस्बा बाद झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी समर्थकांनी टीव्ही सेटची तोडफोड केली, एका विद्यार्थ्याने विष प्राशन केले. याशिवाय, "भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान सरकारने भारताला हा सामना बहाल केल्या'ची याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सवीस्तर येथे वाचा. http://www.esakal.com/esakal/20110401/5721744738360737471.htm
  • Log in or register to post comments

शाहीद आफ्रिदी ने पाकिस्तानी

निनाद मुक्काम …
Sun, 04/03/2011 - 14:54 नवीन
शाहीद आफ्रिदी ने पाकिस्तानी प्रसार माध्यमांना व पाकिस्तानी जनतेला खुला सवाल केला . आखिर कीस बात पे ...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा