समाजाचं वास्तव झपाट्याने बदलत आहे. काही बदल टाळता येत नाहीत, हे मान्य. ते राजकीय असोत की आर्थिक, सांस्कृतिक; त्यांना मर्यादांची सीमा असावीच लागते. माणसाचे बंधमुक्त जगणे सीमित अर्थाने आवश्यकच; पण सर्वबाजूंनी बंदिस्त जगणं कसे समर्थनीय असेल? जागतिकीकरण, संगणक, मोबाईल, माहितीचे मायाजाल जगाच्या सीमा आणखी लहान करीत आहे; पण त्यामुळे संवादाचे सेतू उभे राहण्याऐवजी संकुचितपणाच्या भक्कम भिंती बांधल्या जातायेत. आत्मकेंद्रित अभिमान वाढतो आहे. येथेही समान विचारांचे अनुसरण करणाऱ्यांचे कळप तयार होतात. ते दुसऱ्या कळपाच्या भूमिकांना तपासून पाहतात, नाहीतर नाकारतात. आणि दुसरे पहिल्यांच्या भूमिका झिडकारतात. यात मजा अशी की, यातल्या प्रत्येकाला आपणच समाजशील, प्रयोगशील, प्रगत वगैरे असल्याचे प्रत्यंतर येत असते. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांना समानस्तरावर आणून उभे केले आहे. विज्ञानतंत्रज्ञानात कोणताही आपपर भाव नसतो. पण वापरणाऱ्यांच्या विचारांमध्ये तो नसेल कशावरून? बऱ्याचदा अभिनिवेशाने वागणारे एकतर समर्थनाच्या तुताऱ्या फुंकतात किंवा विरोधाचे नगारे बडवत असतात. माध्यमांमध्ये सहज संचार करणे सर्वांसाठी सुलभ असले, तरी समाजात सगळ्यांचा वकुब तेवढा असतो का? नाहीच, कारण अद्यापही ज्या समाजाची रचना विषमतामूलक पायावर उभी असेल, तेथे समानता स्थापित करणे सहज, सुगम कधीच नसते. म्हणूनच समाजात समानता किती आली आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज हाती लागणं अवघड असतं.