चातक जितक्या आतुरतेने पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघतो त्यापेक्षा आतुरतेने आम्ही त्या घामाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत होतो. मागचे काही दिवस मुंबईचं हवामान पार म्हणजे पारच बिघडलं होतं. थंडीच्या मोसमात मुंबईत चक्क थंडी? हा काय आचरटपणा आहे? मुंबईकरांना थंडी हवी असती तर आम्ही सिमल्याला नसतो गेलो?
लोकल ट्रेन, टॅक्सी, बेस्टची बस, सी लिंक, गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, धारावी, बॉलिवूड, वडा पाव ह्यांच्याप्रमाणेच 'घाम' ही मुंबईची ओळख आहे. घामट्टपणा ही मुंबईकरांची आवडती अवस्था आहे. मुंबईची हवा म्हणजे तर बोलायलाच नको. जाज्वल्य अभिमान एटसेट्रा नाही पण मुंबईत येतो तसा घाम जगात कुठेही येत नाही.