समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक.
दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे.
शांतता आणि अस्वस्थता एकाच वेळी जाणवते अश्यावेळी, शांतता म्हणजे दुपारची काहिली संपणारी असते म्हणून, आणि अस्वस्थता यासाठी कि संधिप्रकाशाचा खेळ सुरु होणार काही वेळाने म्हणून. एक एक पळ युगासारखा भासतो, श्वासांचे स्पष्ट येणेजाणे दिसते, येणारा लौकर जातो पण जाणारा मात्र रेंगाळत राहतो.