आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आनंद कसा घ्यायचा ते विसरले आहेत अशी तक्रार जागोजागी ऐकू येते. समृद्धीचे चणे वाढले असले, तरी दात ते चणे खाण्याऐवजी एकमेकांना विचकून दाखवणे, कोणावर तरी धरणे, कराकरा खाणे, स्वत:चाच ओठ चावणे, वगैरे गोष्टींमध्येच गढून जाताना दिसतात. 'थांबा आणि गुलाबांचा वास घ्या' या उक्तीप्रमाणे वागायची इच्छा असली तरी कधी कधी नुसते दुर्गंधीचे भप्कारेच येतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यात सध्या आयटीने जी क्रांती केलेली आहे, तीमुळे इतकी वर्षं मुकाट्याने काम करणाऱ्या बायकाही आता मारे हपिसात जाऊन चकाट्या पिटून संध्याकाळी नवऱ्याप्रमाणेच थकून भागून आल्याचं सांगतात.