मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .