वृक्षवल्ली आम्हा सोयरी

काव्यरस
जसे वाळवंटी असे निर्जरा, जसे सागराच्या तळाशी धरा, तसा एक तू जीव या भूवरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।। कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला, तया जीवनी एक आधार तू, कुणी वृक्षवैरी न ठावे तुला, करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू, जसा देव नांदे सदा अंतरी ... वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

अनन्तयात्री

लेखनविषय:
काव्यरस
अनाम नक्षत्रातील तारा झळाळताना गगनी अनाहताच्या झंकाराची दुमदुम आली कानी इंद्रियगोचर विभिन्न अनुभव एकवटोनी गेले स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील भेदही गळून पडले सुदूर बघता बघता अवचित क्षितिज बिंदूवत उरले अडले पाऊल कुंपण तोडून अनन्तयात्री झाले

लोकशाहीला नाही वर्ज्य

लेखनविषय:

कुणी म्हणाले दलित भटक्या कुणी म्हणाले हाडाचा कुणबी तो ठणकावून सांगितले बिनकाम रित्या डोक्यांना विषय चघळाया नवा खडा तुरट जातीचा बेशर्म जिभांना हवा स्वये श्रीरामप्रभू मातले जनचर्चा त्या बाधली जनसामान्य इथे तर सारे नेत्यांच्या आधीच हवाली देवळाबाहेरच्या रांगेतला एकेक मोजला जाईल हक्काचा मतदार, त्याची जात पडताळणी होईल लोकशाहीला नाही वर्ज्य कुणीही, माणूस वा देव तुझ्यावरच आले आता मारूतीराया, तुझी जात समोर ठेव \p> - संदीप चांदणे (२२/१२/२०१८)

रदीफ नाही कधी जुळला ...

लेखनविषय:
काव्यरस
रदीफ नाही कधी जुळला न कधीही काफिया सुचला गजल जगण्यातला तरिही कैफ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार युध्दाचा जखम ओली असुन केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफसोस ना केला

वृद्धाश्रम

लेखनविषय:
वृद्धाश्रम आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं तीच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं ती निराश होती हतबल होती दाराकडे नजर रोखून वाट बघत होती काय चुकलं तिचं की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय सार काही मुलाला देऊन तिला मात्र अस जगावं लागतंय डोळ्यातले अश्रु ही तिचे काही वेळाने थांबून गेले पुण्य केलं की पाप हे तिला ही कळेनासे झाले म्हणुनच म्हणते की …….. नका रे मुलांनो वागु असे आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणी नसे त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या उर्वरित आयुष्य त्यांना आनंदाने घालवु द्या ….. Trupti Sameer Tilloo Vrud

शुभ्र सारे जीवघेणे

लेखनविषय:
काव्यरस
एकटा मी चालताना सावली सोडून गेली तापत्या सार्‍या उन्हांना हसत ओलांडून गेली वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली

तुझे नाव

लेखनविषय:
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे -- विशाल

शब्दांच्या घनगर्द सावलीत

लेखनविषय:
काव्यरस
तार्‍यांनी गजबजल्या रात्री चांदणवर्खी प्रकाशलाटा शब्दांच्या घनगर्द सावलीत धूसरल्या अर्थाच्या वाटा त्या लाटांवर हरपे जाणीव त्या वाटांवर अगणित संभव जाणिवेतुनी ठिबके नेणीव संभव सरता उरे असंभव

पूर

लेखनविषय:
इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार "तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ? पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ? चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो -- विशाल

निघताना....

मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya
Subscribe to माझी कविता