जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.
बादवे चित्रपटाचे पुर्ण नाव: जानी दुष्मन: एक अनोखी कहानी की अनोखी प्रेम कहानी असे काहिसे आहे. चित्रपटात भूत आहे म्हणुन तुम्ही या चित्रपटाला हॉरर चित्रपटाचा दर्जा देऊ शकता. यात हाणामारी आहे म्हणुन अॅक्शनपटही म्हणु शकता. नाग - नागिणी आहेत म्हणुन नागपट म्हणु शकता, त्या दोघांचा रोमान्स आहे म्हणुन रोम्यांटिक चित्रपटही म्हणु शकता. यात शाप देणारे ऋषीमुनी आहेत म्हणुन चित्रपट पौराणिकही होउ शकतो. पण चित्रपटाचे मुख्य जेनर चक्क इनोदी आहे. जसपाल भट्टीच्या फ्लॉप शो मध्ये दिग्दर्शकाला सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटाचे पारितोषिक दिल्यावर तो म्हणतो " मैने तो ट्रॅजेडी बनाइ थी. ये कॉमेडी कैसे बन गयी?" जानी दुष्मन बघतानाही असेच होते. हॉरर / नागपट किंवा अॅक्शनपट बनवता बनवता दिग्दर्शकाने कॉमेडी केली आहे आणि प्रेक्षकांची ट्रॅजेडी.
आता चित्रपटाची स्टार कास्ट बघा (अभिनेत्यांची नावे म्हणण्याचे पाप माझ्याच्याने होत नाही आहे. कारण कोणीही अभिनय केल्याचा आव आणत नाही आणि आपल्यालाही तसा चुकुनही भासदेखील होत नाही.):
सनी देओल
अक्षय कुमार
सुनील शेट्टी
अर्शद वारसी
आफ्ताब शिवदासानी
आदित्य पांचोली
शरद कपूर
सोनु निगम
अर्मान कोहली
रजत बेदी
सिद्धार्थ
राज बब्बर
रंभा
आणि
मनिषा कोइराला
आणि मनिषा कोइराला कारण तिच्या भूमिकेला अनेक पदर आहेत (मल्लिकेच्या साडीला जेवढे पदर असतात ना तेवढेच आणि त्याच प्रकारचे पदर. असुन नसल्यासारखे किंवा नसले तरी चालले असते असे म्हणण्याइतके) एक म्हणजे मनुष्य रुपात, दुसरे भूत रुपात, तिसरे नागिणीच्या रुपात. आता भूमिकेतच इतके पदर असल्याने तिने अभिनयात फारसे दाखवले नाहीत. त्यापेक्षा तिच्या भूत रुपातल्या साडीला जास्त पदर आहेत. असो. मी ४-२ नावे विसरत असेन तर माफ करावे. माणसाच्या स्मृतीला मर्यादा असतात. चित्रपटात प्रत्येक दुसर्या नटाला एक प्रेयसी आहे. त्यांची नावे मला माहिती नाहीत आणि माहिती असली तरी आठवणे केवळ दुरापास्त आहे. त्यामुळे त्याबद्दलही जाहीर माफी. याशिवायही चित्रपटात अतुल अग्निहोत्री, जसपाल भट्टी, जॉनी लिव्हर आणि अमरीश पुरीदेखील आहेत.
तर हे वरचे सगळे एका पाक पाद्राच्या (राज बब्बर) कालेजात शिकत असतात आणि एकमेकांचे मित्र असतात (सनी देओल वगळता. तो पास्ट स्टुडंट असतो). आदित्य पांचोली, शरद कपूर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी हे घोडे कॉलेजात शिकणारे विद्यार्थी कसे असु शकतात हा प्रश्न विचारु नका. जर आंदोलन मध्ये संजय दत्त आणि गोविंदा विद्यार्थी असु शकतात, जर हेडमास्तर असेल असे वाटणारा धर्मेंद्र आणि शम्मी कपूर कृष्णधवल जमान्यात विद्यार्थी म्हणुन वावरु शकतात तर मग हे घोडे का नाही?
त्यातले सिद्धार्थ आणि रजत बेदी मनिषा कोइरालाची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करतात आणि तिचा प्रेमी असलेल्या सनी देओलकडुन कुत्र्यासारखे स्वत:ला बडवुन घेतात. त्यानंतर लगेच सनी आणि मनिषा एका लग्नात "चल कुडिये" या अप्रतिम गाण्यात नाचत असतात. त्या गाण्यानंतर ते लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्याआधी सनी व्यवसायानिमित्ताने परदेशात जातो. तो परदेशात जाण्याआधी आपल्याला कळते की सोनु त्याचा सावत्र भाऊ आहे. सनी परदेशात गेल्यावर एके दिवशी एका झाडापाशी मनिषाला कोणाचातरी आवाज ऐकु येतो. तो एक इच्छाधारी नाग असतो. त्याच्या कृपेने मनिषाला तिचा गतजन्म आठवतो. हा नाग म्हणजे आपला हिरो कम व्हिलन अरमान कोहली.
मग अचानकपणे नागजन्मातले मनिषा कोईराला आणि अरमान कोहली झाडांभोवतीं बागडायला लागतात. त्यादरम्यान मनिषा कोईराला आणि अरमान कोहली एका गुहेवरच्या सपाट जागेवर जाउन एरोबिक्स करायला लागतात (म्हणजे तसे ते नाचत असतात पण उद्या मनिषा कोइराला ने तिच्या पॉवर योगा ची सिडी काढलीच तर त्याच्यात तो सो कॉल्ड डान्स एरोबिक्स म्हणून आरामात खपुन जाइल.) असला एरोबिक्स मी नाच म्हणुन करताना स्वतःला बघितले तर धरणी दुभंगुन मला पोटात घेतले तर बरे होइल असे मला वाटते. तसेच होते. त्या गुहेवरची जमीन दुभंगते (दारु पिउन सुटलेल्या पोटाच्या कोइरालाच्या वजनाने तसे होते अशी मला दाट शंका आहे) आणि नेमके त्यामुळे त्याच्याखाली बसलेला एक साधु (अमरीश पुरी) जखमी होतो आणि त्याची अनेको वर्षाची तपस्या भंग होते. त्यामुळे चिडलेला अमरीश पुरी या दोघांना शाप देतो की नागिन मरेल आणि नाग एक्ट्याचे जीवन कंठेल. अखेर जेव्हा दोघे दगडावर डोके आपटुन प्राण देण्याची धमकी देतात आणि तसे करायला लागतात (अरेरे. त्यांना तसे का करु दिले नाही. नंतर प्रेक्षकांना दगडावर डोके आपटुन घ्यावेसे वाटले नसते) तेव्हा पाघळुन जाउन अमरीश पुरी उ:शाप देतो की २१ वी सदी मे त्या दोघांचे परत मिलन होइल आणि तोवर अरमान कोहली वडाच्या झाडात बंदिस्त राहुन तिची प्रतिक्षा करेल. २१ वी सदी मे मनुष्यरुपातली मनिषा त्याला आवाज देइल आणी तो अपरंपार शक्ती धारण करुन वडातुन बाहेर पडेल आणि दोघांचे मिलन होइल. मागच्या जन्मीतली हीच ती मनिषा या जन्मी माणूस होते आणि लवकरच मरुन भूत होते.
बॅक टु प्रेझेंट, रजत बेदी आणि सिद्धार्थ बदला घेण्यासाठी मनिषा कोइरालाला फसवुन एका निर्जन ठिकाणी बोलावतात आणि यावेळेस ते मनिषाबरोबर नको ते करण्यात यशस्वी होतात. तिला फसवण्यासाठी रजत बेदी इतर सर्व पुरुष सहाद्यायांच्या आवाजाची नक्कल करतो त्यामुळे मनिषाला असे वाटते की त्या सगळ्यांनी मिळून तिला फसवले आहे. खरे म्हणजे ते सर्व बिचारे निर्दोष असतात. अशी काही बनवाबनवी झालेली त्यांना माहितीच नसते. ती त्या सर्वांसमोर आत्महत्या करते पण मरण्यापुर्वी त्या सर्वांना मारण्याचे वचन अरमान कडुन घेते. ती स्वतः भूत होते ही गोष्ट वेगळी.
यानंतर अरमान कोहली टारझन सारखी आरोळी ठोकतो आणि फुंकर मारुन चहा गार करावा तसे फु़ंकर मारुन वादळ निर्माण करतो. तो तिथे पाणी निर्माण करुन त्सुनामीसुद्धा निर्माण करु शकला असता पण राजकुमार कोहलीला (चित्रपटाच दिग्दर्शक. अरमान कोहलीचे पूज्य. आत्ता कळाले अरमान कोहली मुख्य भूमिकेत कसा आहे ते) बहुधा तोवर त्सुनामी काय असते ते माहिती नसावे. त्या वादळात सगळे इकडे तिकडे उडतात, एक हिरोइनी स्वत:ची अंतर्वस्त्रे दाखवत उडते. पण मरत कोणीच नाही (मग वादळ कशाला तयार केले बाबा? ) सगळे प़ळुन जातात. एका सिद्धार्थला मात्र अरमान कोहली सापाचे रुप घेउन जबड्यात त्याचे डोके प़कडुन मान मोडुन त्याला मारतो. रजत बेदीला कोइराला मारते आणि मग उरलेल्यांना मारण्याचे सुडसत्र सुरु होते.
मग रानात एकट्याला गाठुन अरमान कोहली शरद कपूरला मारतो. हे करताना शरद कपूरच्या गाडी मागे पळता पळता तो हवेतुनच मोटारसायकल उत्पन्न करुन त्यावर बसतो. हे करताना त्याच्या डोळ्यावर आपोआप गॉगलही उत्पन्न होतो. ( आपला बाप जन्मला आहे हे समजल्यामुळे मध्ये काही काळ रजनीकांत मानसिक धक्का बसुन इस्पितळात दाखल झाला होता म्हणे). मग मोटारसायकलचे चाक मानेवर ठेउन अरमान कोहली शरद कपूरची मान मोडतो आणि त्याचे रुप घेउन निघुन जातो. दुसर्याच दृष्यात सुनिल शेट्टीला इंस्पेक्टर सांगत असतो की मानेवरुन मोटारसायकलचे चाक गेल्यामुळे शरद कपूर मेला पण आसपासच्या क्लोज सर्किट कॅमेर्यामध्ये एकही मोटारसायकल गेलेली दिसत नाही. रानात क्लोज सर्किट कॅमेरे? ?????
असो तर त्यादरम्यान इतर सगळे अक्षय कुमारच्या बर्थडे पार्टी मध्ये “ ११ बजे या १२ बजे “ या अतिशय सुश्राव्य गीतावर नाचत असतात. अर्शद् वारसी एकटा त्याच्या बायडीला एका खोपच्यात घेउन बसलेला असतो. आपला हीरो तिथे येउन त्याला पहिल्या मजल्यावरुन स्विमिंग टँकमध्ये फेकतो. एवढ्याने तो मरत नाही म्हणुन त्या टँकच्या पाण्यात वीज सोडुन त्याला खपवतो.
मग राज बब्बर यांना येउन सांगतो की "आज जहासे हमारी सायन्स खतम् होती है वहीसे इन ताकतो की शुरुआत होती है." हा पॅरासायकॉलोजीचा प्रोफेसर असतो. तो प्लँचेट न मांडता केवळ आवाहन करुन मनिषाच्या भूताला बोलावतो. ती परत या सगळ्यांवर तेच आरोप करते. यावर चिडुन जाउन अक्षय कुमार तिला गोळ्या मारतो आणि ती गायब होते? आत्म्याला गोळ्या मारतो??? आणी हा कॉलेजमध्ये बंदुक घेउन येतो?
नंतर राज बब्बर या सगळ्या माकडांना ओम, अल्लाह, क्रोस असलेला ताईत देतो. उगाच रिस्क नको. वाचवायला शंकर येइल. तो कुठे अडकलाच तर अल्लाह येइल. तो बिझी असेल तर किमान येशु तरी येइल. असा हा डिव्हाइन ताईत घालायला नास्तिक अक्षय कुमार मात्र नकार देतो. मात्र हा ताईत त्याच्या हातात असताना अरमान कोहली त्याच्या अंगवर गाडी घालतो तेव्हा ती गाडी मध्यातुन चिरली जाते. अक्षय कुमार मात्र वाचतो. यामुळे ताईताची शक्ती पटुन तो ते घालतो. नास्तिकाचा आस्तिक होतो. सगळे नास्तिक लोक वाचाताहेत ना हे? तुम्हालाही एक दिवस देव अशीच अक्कल देइल बरे.
पुढच्याच फ्रेमला तो रंभाला सांगत असतो की फोन ठेवायच्या आधी तो तिला भेटायला येइल. पण प्रत्यक्षात अरमान कोहली आधी येतो आणी तिला बेहोष करुन तो अक्षय कुमारला तिचे रुप घेउन भेटायला जातो. भेटल्यावर सरळ मारायचे ना त्याला? तर हा "जानेमन तु खुब है" असे गाणे म्हणुन त्याच्याबरोबर कंबर हलवुन हलवुन नाच करतो. नंतर स्वत: हवेत अधांतरी राहुन अक्षयला दरीत पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरी रंभा बहुधा दूरदृष्टीने ते कुठे आहेत हे शोधुन काढते आणि त्याला दरीत पडण्यापासुन वाचवते.
पुढच्याच फ्रेम मध्ये ते टीव्ही पहात असतात आणि टीव्हीवर एक माणूस स्वतःचे रुपांतर मुलीत आणि मग पोपटात करुन दाखवतो आणि मग गायब होतो. हा काय वेडेपणा आहे असे अक्षय म्हणतो तेव्हा तो टीव्ही होस्ट हा वेडेपणा नाही.पाहिजे असल्यास सिद्ध करुन दाखवतो असे म्हणत टीव्हामधुन अक्षयच्या दिवाणखान्यात दाखल होतो. हा अरमान कोहलीच असतो. यात गुंजभर देखील अतिशयोक्ती नाही. हे सगळे असेच होते.
यानंतर दोघे मारामारी करतात. पण अक्षयच्या गळ्यात ताईत असल्याने (आणि मुळातच तो अक्षयकुमार म्हणजे मिनी रजनीकांत असल्याने) तो अरमान कोहलीला भारी ठरतो. अखेर अरमान कोहली पळ काढतो आणि अक्षय कुमार त्याच्या मागे लागतो. या सगळ्या गदारोळात त्याचा ताईत कुठेतरी पडतो आणी मग अरमान कोहली त्याला बुकल बुकल बुकलतो. तो मेला असे समजुन त्याला तिथेच टाकुन निघुन जातो. पण मुळात तो मिनी रजनीकांत असल्याने मरत नाही तर फक्त कोमात जातो.
यानंतर अरमान कोहली आपला मोर्चा आदित्य पांचोलीकडे वळवतो. त्याचे आणि आफ्ताबचे एकाच मुलीवर प्रेम असते. त्या मुलीचे आफ्ताबवर प्रेम असते पण आदित्य पांचोलीच्या उपकारांच्या ओझ्याखाली असल्याने ती त्याल भाव देत असते. अखेर बरेच रामायण घडते आणि मनिषा कोइराला आफ्ताबच्या शरीरात प्रवेश करुन आदित्या पांचोलीला उडवतो. त्याच्या खुनासाठी खरे म्हणजे अफ्ताबला फाशीच व्हायची पण त्याची प्रेमिका त्याच्याबाजुने खोटी साक्ष देउन त्याल वाचवायचे ठरवते. हे कळाल्यावर अरमान त्याच्या प्रेमिकेचे रुप घेउन त्याच्याविरुद्ध कॉर्टात साक्ष देउन त्याला अडकवतो, एका दिवसाता सुनावणी होउन आफ्ताबला फाशी देखील दिली जाते. :). कोण म्हणते भारतीय न्यायव्यवस्था खुप संथ आहे म्हणुन???
मग अरमान - मनिषा सुनील शेट्टीकडे वळतात. २-३ प्रयत्न करुनही ते त्याला मारु शकत नाहित तेव्हा मनिषा त्याच्या शरीरात प्रवेश करुन त्याला इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. यावेळेस अर्थात त्याचा तो ताईत हरवलेला असतो.
सगळ्यात शेवटी सोनु निगमची पाळी येते. हा सनी देओलचा भाऊ असतो. त्याने जावेद भाई सो रह्यले हे गाणे गाउन झाल्यावर अरमान त्याच्यावर प्राणघातक हल्ला करतो आणि त्या मध्ये सनी ला अडकवतो. हा पण त्या आधी केवळ नजरेने सोनुला हवेत उडवणे, सोफ्यावर बसवुन सोफा हवेत गरगर फिरवणे असले गम्माडी जंमत खेळ करुन दाखवतो. पण सोनु निगम देखील अक्षयकुमार आणि झुरळाप्रमाणे चिवट असतो. तो मरत नाही. अरमान परत त्याला मारायला हॉस्पिटलात जातो. सोनु निगम पोटात सुरा खुपसुन जखमी झालेला असुनसुद्धा अंगावर एकही बँडेज न बाळगता जीव खाउन पळत सुटतो. अरमान त्याच्या मागे असतो. तेव्हा अक्षय कुमार अचानक कोमातुन जागा होतो (हा मेला नाहिये अजुन हे तुम्ही विसरला होता ना? खरे सांगा. खरे सांगा. :) ) आणि अचानक कुठुनही कुठेही प्रकट होण्याच्या असामान्य ताकदीच्या जोरावर तो सोनु निगम आणि अरमान कुठे आहे हे शोधुन काढतो आणि सोनुला वाचवण्यासाठी मध्ये टपकतो.
केवळ मिनी रजनीकांत असण्याच्या पुण्याईवर तो अरमान ला टफ देतो पण ताईत नसल्याकारणाने अरमान शेवटी त्याच्या पोटात सुरा खुपसुन आणि त्या सुर्यावर पाय देउन त्याला अखेरचा झोपवतो. मधल्या काळात अक्षय सोनुला कसम देउन पळुन जायला भाग पाडतो. सोनु मोटारबोट घेउन समुद्रात घुसतो. अरमान त्याच्या पाठोपाठ समुद्रावर पळत पळत जातो. त्याला अर्थातच बोट वगैरे काही लागत नाही. अरमान सोनुला पकडणार इतक्यात पोटात सुरा खुपसुन आणि त्याच्यावर अरमानने पाय देउनही जिवंत राहिलेला अक्षयकुमार (हो तो मेलेला नसतो.) मध्ये पडतो. मग दोघे समुद्राच्या पाण्यात मारामारी करतात. अरमान शेवटी त्याला पाण्यात गुदमरवुन मारुन टाकतो आणि पॄष्ठभागावर येतो तेव्हा सोनु निगम पळुन गेलेला असतो. अखेर अरमान तिथुन निघुन जातो. आणि मग.................................... अक्षयकुमार जिवंतच असतो. त्याने मेल्याचे नाटक केलेले असते.
दरम्यान सनी देओल एका लाथेत तुरुंगाचा लोखंडी दरवाजा तोडतो. आणि एका फटक्यासरशी एक यारेटने पोलिसांना पाडुन (चिफ इन्स्पेक्टर किरणकुमार सोडुन. तो मुख्य असल्याने त्याला नामोहरम करायला २ फटके लागतात) पळून जातो. अक्षय वेळा जिवंत राहिलेला अक्षय त्या दरम्यान राज बब्बर कडे पोचतो आणि "इंसान और आत्मा की जंग मे जीत परमात्मा की होनी चाहिये" असे म्हणुन सोनु निगमला वाचवण्याची विनंती करतो. भारी हृद्य प्रसंग आहे तो.
दरम्यान अरमान कोहली बरोब्बर त्याच जागेवर पोचतो जिथे सोनु पळालेला असतो. केमिकल फॅक्टरी सदृष्य जागा असते ती. सोनुला तो मारणार इतक्यात बहुधा अंतर्ज्ञानाने ते दोघे कुठे आहेत हे जाणुन सनी देखील तिथेच पोचतो आणि भालासदृष्य लोखंडी पाइप फेकुन त्याला मारतो. तो पाइप अरमान कोहली जसाच्या तसा बाहेर काढतो. त्याला काहेही झालेले नसते. नंतर घमासान युद्ध होते. अरमान अखेर लोखंडी पाइप सनीच्या पोटात आरपार खुपसतो आणि त्याला मारुन सोनु कडे वळतो. त्यादरम्यान पाद्री राज बब्बर हात हवेत उंचावुन डोळे उर्ध्वरेषेत लावुन काहितरी मंत्र पुटपुटत असतो. त्याचा उपयोग होउन अल्लाह, इश्वर आणि येशुची शक्ती एकत्र येउन त्याचा एक तेजोगोल तयार होतो तो राज बब्बरच्या शक्तीने सनी देओल मध्ये घुसुन त्याला परत जिवंत करतो. मग सनी आणि अरमान परत कुत्र्यामांजरासारखी मारामारी करतात. मग अरमान मरतो. मग मनिषा त्याच्या शरिरात घुसते. मग परत दोघे भांडतात. मग सनी अखेर अरमान रुपी मनिषाचे अक्षरशः २ तुकडे करुन त्याला २ केमिकल टँक मध्ये टाकतो. अखेर अरमान मरतो आणि आत्मारुपात त्याचे आणी मनिषाचे मिलन होते.
हे सगळे बघितलेले सर्व लोक जीव देतात आणि उरलेला एक शेवटचा माणूस या चित्रपटाची समीक्षा करण्यासाठी जिवंत उरतो. तुम्ही हे सर्व वाचुन अजुन या भूतलावर असाल तर मी तुम्हाला सलाम करतो. :)
हिंदी चित्रपटात लॉजिक शोधायला जाऊ नये. नाग नागीनीच्या चित्रपटात तर अजिबात नाही. पण तरीही हा चित्रपट तार्किकतेच्या सगळ्या सीमा ओलांडतो:
१. अर्धा डझनभर वेळा प्राणघातक हल्ला होउनही प्रत्येकवेळेस अक्षय कुमार आणि सोनु निगम जिवंतच
२. अक्षय कुमार, रंभा, सनी देओल, अरमान कोहली कधीही कुठेही जातात. आपल्याला पाहिजे ती लोकं कुठे आहे ते त्यांना आपोआप कळते.
३. केवळ हात उंचवुन २ मिनिटे पुटपुटल्यावर शंकर, अल्लाह आणि येशु घाईघाईने आपल्या शक्त्या राजबब्बर कडे पाठवुन देतात.
४. अरमान कोहली हा इच्छाधारी नाग असतो हे कळाले. पण तो गरज पडेल तशी जादू करतो, पळता पळाता बाइक्स तयार करतो, पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे पोचतो, पाण्यावर चालतो, हवेत उडतो, इतरांना उडवतो.
५. अरमान कोहली आणी मनिषा कधीही कोणाचेही रुप घेउ शकतात आणी कोणाच्याही शरिरात प्रवेश करु शकतात.
असो. इतके सगळे सांगुनही तुम्हाला चित्रपट बघायचा असेल तर युट्युब वर बघा, कारण जंग जंग पछाडुनही मला याचा टॉरेंट अथवा सिडी मिळालेली नाही आहे.
आमेन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे काय हे ?
अहो जे कुठे मिळत नाही ते
मला इंतेहा या नावाचा एक
हे घ्या :-
अर्रे तुला कुठुन मिळते हे
ज्ञान फुकट वाटू नये म्हणतात.
धन्यवाद
शेवटची फायटिंग टर्मिनेटर
औषधोपचार कला नृत्य संगीत
असे
सलाम...
!@#$%^&*
_/\_
परिक्षण आणि प्रतिसाद
त्यांना सगळी ष्टोरी माहीतीच
हाहाहा!.... धर्मेंद्र आणी
रेवती आज्ज्जी प्रश्न एकच पडतो
अगदी खरं गं. आपल्याला का नाही
टर्मिनेटर + मॅट्रिक्स + एम आय १,२
खतर्नाक!
नाही नाही शेवटी अरमानच मरतो.
अगागागा ! दिग्दर्शक हे वाचुन
धमाल परीक्षण
व्यास, वाल्मिकी वा होमर च्या तोडीचा कथालेखक.
"चित्रपटाचे नाव खुप जालीम
इंदोर मुबै प्रवासात एक
आय माय स्वारी. अक्षयकुमार
"सहावा डोस कुत्रा चावल्यानंतर
त्यासाठी सहानुभूती आहे. पण
नव्या बाटलीत जुने पाणी?
नाही त्याचा रिमेक नाही आहे.
अगदी सीन टु सीन न विसरता,
नि:शब्द...
अगागागा
कमालीचा सहनशील माणूस आहेस रे
म्हणतात ना ! स्त्री म्हणजे
आज सामजले कि तू स्वातला
हा हा हा चांगलाचा पिठ्ठा
छान छान
खतरनाक
ख प लो
झक्कास फाडू प्रिक्षन
+१०० टू अमृत
उत्तम, एकदा आपला सत्कार
ते चपला आणि सत्कार वाला