मंडळी, सर्वात आधी क्षमाच मागतो. अहो त्याचं काय आहे की, बोलवायचं-बोलवायचं करून राहूनच गेलं बघा. नाही म्हणजे, हल्ली आमच्याकडच्या गणपतीला सार्वजनिक ठेवलाच नाहीये आम्ही. फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. वाटलेलं, इकडच्या सर्व मंडळींना आमंत्रण (की निमंत्रण, जे काय असेल ते) धाडेन या वर्षी, पण नाही जमलं.
काय विचारलत, आमच्या मंडळाच्या गणपतीमधे विशेष काय म्हणून? अहो, आमच्या मंडळाचा गणपती आहे ना त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याच नवसाला पावत नाही.