मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमचा नवसाला (न) पावणारा.....

भारी समर्थ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मंडळी, सर्वात आधी क्षमाच मागतो. अहो त्याचं काय आहे की, बोलवायचं-बोलवायचं करून राहूनच गेलं बघा. नाही म्हणजे, हल्ली आमच्याकडच्या गणपतीला सार्वजनिक ठेवलाच नाहीये आम्ही. फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. वाटलेलं, इकडच्या सर्व मंडळींना आमंत्रण (की निमंत्रण, जे काय असेल ते) धाडेन या वर्षी, पण नाही जमलं. काय विचारलत, आमच्या मंडळाच्या गणपतीमधे विशेष काय म्हणून? अहो, आमच्या मंडळाचा गणपती आहे ना त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याच नवसाला पावत नाही. सहाजिकच, २४ तास ते ५ किलोमीटर (भाषानिष्ठांनी किलोमीटरला पर्यायी शब्द सुचवावा) या अगाध आकड्यांच्या रांगा त्याच्यासाठी लागत नाहीत. त्या तसल्या रांगेतल्या (किंवा सिद्धिविनायकाच्या सोमवार रात्रीपासून मंगळवार संध्याकाळच्या रांगेतल्याही) गणपतीनिष्ठांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, "लालबागके और तत्सम तथाकथित नवसको पावनेवाले गणपती और घरके फोटुवाले गणपती में क्या-क्या फरक होते हय?" असो, तर अमुक-तमुक नगरचा राजाही नाहीये आमच्या मंडळाचा गणपती. मुर्तीही 'छप्परचुंबी' नाहीये शिवाय किर्तीही आमच्या २-४ चाळींपुरतीच. कोणावरचीही संकटं वगैरे पार करायला किंवा सगळ्यांना सुखी ठेवायला अजिबात धावून जात नाही. त्याच्यासमोर तारांकीत लोक दर्शनाला येऊन, वर त्यालाच उपकृत केल्यासारखं मिडीयासमोर भाषणं करत नाहीत. आत गणपतीसाठीचे भव्य देखावे आणि बाहेर कार्यकर्त्यांच्या पत्त्यांच्या नवनवीन बंगल्यांचेही देखावे नाहीयेत. विसर्जनाच्या मिरवणूकीत गुलाल तसेच, दारू(फटाक्याची आणि 'शोभेची')ही नसते. आमच्याकडच्या गणपतीला बोलवायचं कारण इकडे प्रत्येकजण गणपतीच्या दैवी मान्यतेपेक्षा मानतो तो टिळकांच्या ऊत्सव सुरू करण्याच्या स्पिरीटला. कोणताही कार्यकर्ता किंवा भक्त मंडपात गणपतीकडे गार्‍हाणं मांडायला न येता सार्वजनिक संघटनेच्या वैयक्तिक गरजेची पूर्तता करायला येतो. रात्री दिव्यातलं तेल संपतं म्हणून आमचा गणपती कोपत नाही. रोज भले मोठाले हारही लागत नाहीत त्याला कारण मुर्तीची उंचीच मुळी २ फूट. उगाच 'उशीरा आलो तरी पुढच्याचा आधी मी' असे कोणीच म्हणत नाही कारण मूळात ताठकळत रहावं लागेल एवढी रांगच नसते. असल्या ऊत्सवासाठी खंडणी काढली जात नाही. रस्त्यात मधेच मंडप उभारून, चोरीची विज घेऊन लोकांची गैरसोय केली जात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपतीच्या नावाखाली स्वत:ची प्रसिद्धी करायचा सोस कोणालाच नाही. बघा मग, पुढच्या वर्षी जमलं तर या नक्की. भारी समर्थ

वाचने 2804 वाचनखूण प्रतिक्रिया 14
>> "लालबागके और तत्सम तथाकथित नवसको पावनेवाले गणपती और घरके फोटुवाले गणपती में क्या-क्या फरक होते हय?" >> :D मस्त विनोदी लेख. नाही म्हणायला त्या २ फूटी गणपतीची जरा दयाच आली :(

In reply to by शुचि

chipatakhdumdum 24/09/2010 - 21:20
त्याच्यासमोर तारांकीत लोक दर्शनाला येऊन, वर त्यालाच उपकृत केल्यासारखं मिडीयासमोर भाषणं करत नाहीत. नाही म्हणायला त्या २ फूटी गणपतीची जरा दयाच आली . तै भानावर या असल्या comment ने खरी तुमची कीव करतो .

In reply to by chipatakhdumdum

यात कीव करण्यासारखं काय आहे? भल्या थोरल्या ३०-३० फुटी गणपतीपुढे त्या इवल्याश्या मूर्तीची कल्पना करून मला जरा दया आली असं मी गंमतीनी म्हंटलं तर त्यात बिघडलं काय? मी असं तर नाही म्हणत आहे की ३० फुटी =लै म्होटी थोरवी, २ फुटी = नगण्य शक्ती. तुम्हाला जो अर्थ लावायचा तो तुम्ही लावू शकता. ज्याची त्याची जाण ज्याची त्याची समज.

गणेशा 24/09/2010 - 20:14
मनातील तळमळ कळाली . छान पद्धतीने हसत खेळत मांडली आहे. पुढच्या वर्षी नक्की येइन वरती रिप्लाय विनोदी आहे असा आला, म्हणुन तळमळ असा शब्द वाप्रु की नको अशे झाले. उगाच चुकीचे बोलतोय असे वाटते आहे. पण जे मनात आले पहिल्यांदा ते लिहिले.

धमाल मुलगा 24/09/2010 - 20:23
जियो! मस्त लिहिलंय. एकदम हळुच करकरीत चिमटे काढलेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना. बाकी, मला गंमत वाटते एखाद्या विशिष्ट जागच्या देवाला गर्दी करणार्‍या हौसे गवसे नवसे लोकांची.

पैसा 24/09/2010 - 20:32
अहो मूर्ती २ फुटी असो नाहीतर २० फुटी. लोकाना श्रद्धा असो, मज्जा असो, तेवढीच वाटते! आणलात ना, मग झालं तर! सगळे मिपाकर नक्की येतील पुढच्या वर्षी. तुम्हीच कंटाळाल पाहुणचार करता करता. ध. मु. ने म्हटल्याप्रमाणे चिमटे मस्त! (आणि बाप्पाचं विसर्जन झालं का? की भांडुपच्या गणरायासारखा रुसून बसलाय?)

In reply to by पैसा

२६ तारखेला बघु ना ? भो तारिख दिलि ना? बाप्पा ने? त्येला जादा पैसा लागेल ट्र्क लागल क्रेन लागल आजुन पैसा लागल वेळ लागल काय काय लागल ? ते बाप्पालाच ठाव ...... ठाव नसलेला ......

ईन्टरफेल 24/09/2010 - 21:27
लय भारि लिवलय राव मेरेकु भि आसले उत्सव आवड्ता नहि यार पन काय ? करेगा ये हिंन्दुस्तान मंधि र्‍हावा लगता हॅ.......... भारि भरि.चा समर्थक>>>>>>>>>>

बेसनलाडू 25/09/2010 - 01:54
उत्तम, मार्मिक, समयोचित भाष्य. आवडले. पण हात आखडता का घेतला? आणखी येऊ द्यात. (गणेशभक्त)बेसनलाडू

अरुण मनोहर 25/09/2010 - 06:20
नक्की कोणाला बोलावता? निमंत्रितांनाच, की वर्गणीदार, की फक्त वर्गणी देणारे निमंत्रीत? >>>फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. (ह्.घ्या. ; वींकची स्मायली)

प्रकाश घाटपांडे 25/09/2010 - 10:06
अशा प्रकारचा अंनिस चा गणपती असावा अशी कल्पना आम्ही पुर्वी मांडली होती. पण देवाधर्माबाबत अंनिस ची तटस्थ रहाण्याची भुमिका आहे. आमच्या मते सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक नाहीच आहे मुळी. काही देवांचा नवस फेडण्यासाठी देशी दारुची क्वार्टर लागते. [ अधिक माहिती साठी उत्तम कांबळे यांचे प्रथा अशी न्यारी वाचावे]

आप्पा 25/09/2010 - 10:49
नमस्कार मंडळी, मी नास्तीक नाही पण अंधविश्वासु पण नाही. परंतू या दिवसात चिंचवड येथे जे काही पाहिले त्यावरुन हा विचार मनात आला. या दहा दिवसात दिड दिवस, ५ दिवस, ७ दिवस, १० दिवस, ११ दिवस व अनंत चतुर्दशी असे गणपती विसर्जन झाले. बिर्ला हॉस्पिटल जवळील पुलावरुन पहायचो. घोट्याएवढे पाणी असायचे, सर्व गणपती वेडेवाकडे पाण्यात पडलेले, मुले तिथे काही सापडते का ते पहाण्यासाठी नाचत होते. गणपतीवर पाय पडत होते. आपल्याच दैवताच विटंबन पहाव लागत होत. अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी महापालीकेने ते सर्व गणपती नदीतुन काढुन ट्रकने नेले तेंव्हा जरा बरे वाटले. भावीकांनी जर हे गणपती कॄत्रीम तलावात विसर्जन केले असते तर देवाची अशी विटंबना पहावी लागली नसती.