तारूण्य सळसळतं, जोमदार, उत्साहाने परीपूर्ण असतं नव्हे ते तसच असलं पाहीजे. वार्याने भरलेलं शीडाचं तारू पूर्ण जोमाने आपल्या ध्येयपूर्तीकडे निघावं तसं काहीसं. "हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे" या ओळी तारूण्याला चपखल लागू पदतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. अफाट उत्साह, अमाप शक्ती, सकारात्मक दृष्टीकोन, अशक्यप्राय काहीही न वाटणं, संप्रेरकांचे उधाण - जे जे काही चांगले ते ते या काळात वाट्याला येते. स्वप्न, ध्येय, महत्त्वाकांक्षा यांची लयलूट म्हणजे तारूण्याचा सोनेरी ऋतू. जगाच्या शाळेत नुकतच पाऊल टाकलेलं असतं. दुर्दम्य आशावाद मी मी म्हणत असतो. प्रत्येक अनुभव जवळून घ्यावासा वाटतो.