मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गझल

पेटुनी आरक्त संध्या...

सत्यजित... ·
लेखनविषय:
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

ग़ज़ल - म्हटलेच होते

वेल्लाभट ·
लेखनविषय:
काव्यरस
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं. म्हटलेच होते... होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटते वाट अन खुलतेही एक प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते - अपूर्व ओक २०-३-१७

तू नभीचा चंद्रमा हो...

सत्यजित... ·
लेखनविषय:
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा... तू मला भेटायला ये..एकदा येवून जा! शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे... तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा! तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा... पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा! वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे... या नदीला सागराची वा दिशा देवून जा! सूर्य विझता रातही चालून येते नेमकी... तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा! —सत्यजित

होऊन आज सूर्य (गझल)

शार्दुल_हातोळकर ·
लेखनविषय:
काव्यरस
होऊन आज सूर्य अंधार प्यायलो मी आभुषणे आगीची देहास ल्यायलो मी माझ्या पराभवाची चिंता तुला कशाला झेलुन वार सारे मस्तीत गायलो मी केला किती तयांनी जन्मांतरी दगा तो त्यांनाच गोडव्याचे हे दान द्यायलो मी युद्धात दुःखितांच्या योद्धा कठोर होतो भेटुन सज्जनांना अश्रुंत न्हायलो मी बांधुन ठोकताळे जोखु नको मला तू ते घास विस्तवाचे आजन्म घ्यायलो मी पर्वा जरी नसे ती उन्मत्त भामट्यांची बोलास लाघवाच्या किंचित भ्यायलो मी जातो आहे किनारा तो गूढ लांब आता नौकेत या कळेणा नि काय न्यायलो मी? - शार्दुल हातोळकर

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित... ·
लेखनविषय:
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

सत्यजित... ·
लेखनविषय:
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी... तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा! चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती... तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा! कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा! मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा... अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा! —सत्यजित

राउळी या मनाच्या

वेल्लाभट ·
लेखनविषय:
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोड

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao ·
लेखनविषय:
काव्यरस
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव

माणूस

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.) माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ? बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो? नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ? पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो? पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो ! विशाल कुलकर्णी ...

वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
शोधतो मौनात कविता, वाहणे आता नव्याने मूळ अस्तित्वास फिरुनी शोधणे आता नव्याने कोणत्या त्या राऊळी वसतो हरी सांगा गड्यांनो माणसांच्या अंतरी डोकावणे आता नव्याने भूक, तृष्णा, वासनाही वाटती कां क्षुद्र आता? अस्मितेला मृगजळी धुंडाळणे आता नव्याने तू मला गोंजारणेही सोडले आहे अताशा वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने माणसांना शोधतो मी श्वापदांची कोण गर्दी लष्कराच्या भाकरी बघ भाजणे आता नव्याने मोल भक्तीला न उरले, 'जा'च तू येवू नको रे विघ्नहर्त्या हात जोडुन मागणे आता नव्याने विशाल कुलकर्णी