Skip to main content

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत. रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती. कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्‍या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे. सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची. रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही. सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत. विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले. सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते. त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत. सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता. सावरकरांच्या घरगुती आयुष्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही येऊ द्या.

वाचने 40088
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

चांगलं संकलन आहे. माणूस आतून-बाहेरून एकच असावा याचा उत्तम आदर्श: माईंनी जेवणासाठी थांबू नये, आपल्यामागे 'घराणेशाही' सुरू होऊ नये, इ.इ. अदिती

समयोचित लेख आवडला.

उत्तम संकलन. धन्यवाद भोचक.

चांगली माहीती. सावरकरांचे "हिंदू" आणि "हिंदुत्व" शब्दावरील विचार आचार अतिशय स्पष्ट होते. त्यात अंधश्रद्धा अजिबात नव्हती. मात्र "जो पर्यंत जगात इतर धर्मांवरून ओळख होते, तो पर्यंत मी स्वतःला देखीन हिंदूच म्हणवून घेईन" अशा अर्थाचे त्यांचे म्हणणे होते. जे त्यांनी लोकांना सांगितले तेच स्वतः आचरले. त्यांच्यावर त्यांच्या येसू वहीनीचे संस्कार होते. "तू धैर्याची अससी मुर्ती, माझे वहीनी, माझे स्फुर्ती" असे त्यांच्या मला वाटते "सांत्वन" कवितेत त्यांनी येसू वहीनींना लिहीले आहे. संघाचा आणि त्यांचा तात्विक/सैद्धांतिक म्हणजे तुम्हाला कुठला अपेक्षित आहे, ते माहीत नाही, पण मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती. हिंदूत्वाचा अर्थ देखील दोघांच्या मते समानच होता/आहे. पण तो विषय वेगळा आहे. जर कुणाला अधिक बोलायचे असल्यास कृपया वेगळी चर्चा टाका. :) वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. कशा बद्दल? त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले. हे व्यक्तिगत आर्थिक प्रश्न होते का कसले? -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

वरील लेखातील दोन संदर्भांचे अर्थ समजले नाहीतः
अगदी याच दोन संदर्भांबद्दल मीही साशंक आहे.
पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची.
याबद्दल आणखी माहिती आवश्यक आहे असे वाटते.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.
ही विधाने ज्या पद्धतीने लिहिली आहेत, त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. कदाचित प्रत्यक्षात तसे नसेलही, परंतु त्या परिस्थितीत अधिक स्पष्टीकरणाची (आणि या वाक्यांच्या काळजीपूर्वक पुनर्लेखनाची) आवश्यकता आहे असे सुचवावेसे वाटते. (सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, आणि म्हणूनच आज ते आकाशातून आपल्याकडे पाहत असण्याची शक्यता अतिशय कमी आहे. परंतु जर का असे झालेच, तर ते "देवा, यांना क्षमा कर. कारण हे (माझ्या नावावर) जे काही लिहितात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही." असे म्हणत असण्याची शक्यता दाट वाटते.)
सावकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी
याबद्दल अधिक माहिती लेखकाकडून मिळाल्यास आवडेल. बाकी समयोचित लेख. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

त्यातून दुर्दैवाने आर्थिक अपव्यय अभिप्रेत होतो. असेच वाटले म्हणून तो प्रश्न विचारला. सावरकरांसारख्या तर्कनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि देवावर रूढार्थाने विश्वास न ठेवणार्‍या माणसाचा बहुधा मरणोत्तर अस्तित्वावरही विश्वास नसावा, असे मानण्यास जागा आहे, त्या काळात पटकन मान्य न होणारी गोष्ट त्यांनी स्वतःच्या बाबतीत केली होती म्हणजे मंत्रविधीविना अंत्यसंस्कार आणि तेही विद्यूतदाहीनीत. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

संघाचा आणि त्यांचा ........................... मतभेद नक्की होता. मात्र तो जास्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील होता. त्याचे प्रमुख कारण सावरकरांचे ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यातील हिंदू संघटन होते. नंतरच्या काळात समाजसुधारणा हे होते. तर संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे आणि आजतागायत संघाचे ध्येय हे केवळ हिंदू संघटन, राष्ट्रनिर्माण आणि देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी झटणे इतकेच आहे. जेणे करून स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याच्या नष्टचक्रातून भारतभूमी सुटेल...
ह्यावरून मला समजले ते हे की: १. सावरकरांना (अ) स्वातंत्र्यप्राप्ती व (ब) हिंदू संघटन ह्याची प्रायोरिटी होती. २. संघास (अ) राष्ट्रनिर्माण, (ब) हिंदू संघटन व (क) देशाला परमवैभवाकडे नेणे ह्यांची आस होती. आणि म्हणून पुढे तुम्हीच लिहीले आहे की...'त्यात असलेली समाजसुधारणा ही दोघांना समान होती'' मग जर (अ), (ब) हे समान होते, तर त्यांच्यात नक्की मतभेद कसले होते? [हा मी निव्वळ प्रश्न उपस्थित केलेला आहे, म्हणून नवा धागा काढत नाही].

वा चांगले संकलन.. काहि माहिती (जसे लाखाची थैली, मजबूत घर वगैरे) नवीन आहे. धन्यवाद.. बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

बाकी त्यांचे कर्मकांडाविरोधी, जानवे चाव्या अडकण्यासाठी उत्तम, गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन!
चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय? फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात. जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते. अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व. सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व. याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.) त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.) थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.) - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमरः मी सध्याच्या प्रचलित अर्थाने हिंदुत्ववादी आहे असे मला वाटत नाही. इतर अर्थांबाबत विचार केलेला नाही.)

In reply to by पंगा

जियो गागाभट्ट !! एक नंबर प्रतिसाद !

चांगली माहिती... :) मदनबाण..... Jealousy is nothing more than a fear of abandonment.

सावरकरांबद्दल बरेच घरगुती तपशील माहिती नव्हते. धन्यवाद.

ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची ???

मंगेशकर घराण्यातील बहुतेक मंडळी, अगदी दीनानाथांपासून सावरकरांचे चाहते/अनुयायी. सावरकरांची अनेक गाणी मंगेशकरांच्या स्वरांनी, संगीताने सजली आहेत आणि अजरामर बनली आहेत. वेळोवेळी हृदयनाथ, लताबाई यांच्या बोलण्यातून सावरकरांविषयीचा आदर जाणवतो. असे ऐकून आहे की कधी कधी लताबाई स्वतः सावरकरांकरता मांसाहारी पदार्थ करुन देत असत. कारण बहुधा सावरकरांच्या घरी ते बनत नसत. तुम्ही कोणी हे ऐकले आहे का?

वीर सावरकर यांच्याविषयीची अधिकची माहिती ~~ (१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता. त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल. हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....) (२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे. पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी. अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पुन्हा एकदा धन्यवाद ! तुम्हाला ही माहिती कुठे मिळाली ? मला सावरकरांवरील अजुन पुस्तके वाचायला आवडतील.

इंद्रराज.. फार सुंदर माहिती. धागाही छान आहे. आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

In reply to by प्राजु

"....आणखीही वाचायला मिळाले तर आवडेल...." आनंद झाला मला खरंच, वरील वाक्यामुळे. वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

फार मोठा माणूस. (होय, माणूसच. देव नाही.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by Pain

देवमाणूस असे कोणीही नसते. एक तर देव, नाही तर माणूस, नाही तर राक्षस. ह्या तीन योनी आहेत. तुमची योनी कुठली ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

तसे पाहता देव आणि राक्षसही नसतात. पण एखाद्या माणसातील गुण, कर्त्रुत्व, चारित्र्य विचारात घेउन त्याला देवमाणुस किंवा राक्षस म्हणण्याची पद्धत किंवा terminology आहे.

In reply to by मिसळभोक्ता

तुमची योनी कुठली ?
"तुमची" हा शब्द काळजाला भिडला ... असो =)) (तुमची प्रेमी) तुमचाराम

"फार मोठा माणुस" असेच म्हणते. लेख अतिशय सुंदर. इन्द्राजदांची माहिती ही फार चांगली. भोचक आणि इन्द्राजदा तुम्हा दोघांचे आभार. (स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

In reply to by स्पंदना

खूप नवीन माहीती कळली. धन्यवाद. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by स्पंदना

(स्वतःकडे असलेली माहिती पुढे होउन लिहिली तर बाकिची माहिती आपोआप पुढे येते. लिहित रहा) धन्यवाद अपर्णा जी... वर आत्ताच प्राजुताई यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले आहे ते तुम्हालाही लागु असल्यामुळे तेच इथे देत आहे.....:: वीर सावरकर यांच्याबद्दल मी खूप वाचले आहे आणि काही प्रसंगी तर डोळ्यात अश्रूही जमा झालेले अनुभवले आहे. फार मोठी आणि काळाच्या पुढे गेलेली अशी व्यक्ती होती ही. यांची महती इतकी मोठी की खुद्द "महात्मा गांधी" सावरकरांना भेटायला रत्नागिरीच्या त्या घरी गेले होते. "भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

बरीच अधिकची (आणि मला माहीत नसलेली) महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रतिसादांच्या निमित्ताने (आणि मार्फत) येत आहे, हे स्वागतार्हच आहे. यथाशक्ती ती पचवण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, एका क्षुल्लक मुद्द्याच्या अनुषंगाने एक शंका आहे.
"भाषा अभ्यासक" म्हणून तर त्यांना आपण ओळखतोच, पण हे सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सावरकरांनी "कुराण" उर्दु भाषा शिकून वाचले होते; आणि त्यावर सटीक व्याख्यानदेखील देत असत.
ही गोष्ट काही पचनी पडली नाही. कुराण हे उर्दू भाषेत नसून अरबी भाषेत आहे अशी माझी समजूत होती. आणि कुराणाचे यदाकदाचित उर्दू भाषेत भाषांतर झाले असेलच, तर त्या भाषांतराच्या अधिकृततेबद्दल साशंक आहे. त्यामुळे उर्दू भाषा शिकून कुराण वाचून ते सटीक व्याख्यान देण्याइतपत समजणे कितपत शक्य आहे याबाबत शंका आहे. कृपया हा आपल्या मुद्द्यातील खोडी काढण्याचा प्रयत्न समजू नये. (एरवी अशा प्रकारच्या खोड्या काढण्याची माझ्यात भरपूर क्षमता असली तरीही.) कदाचित यात अधिक स्पष्टीकरण असू शकेल, त्या परिस्थितीत ते नमूद व्हावे, किंवा तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे. आभारी आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

"....तपशिलाची एखादी महत्त्वाची चूक झालेली असल्यास ती दुरुस्त होऊन जे काही तथ्य असेल ते नि:संदिग्धपणे पुढे यावे, एवढाच उद्देश आहे...." जरूर.... मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या स्त्रोताकडून (ज्यात गावातील अत्यंत ज्येष्ठ आणि अभ्यासू, अधिकारी लोकांचा समावेश आहे...) या संदर्भातील माहिती घेतो व त्यानुसार आवश्यक वाटल्यास संपादन करेन. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा रूंदावतात त्या अशा प्रकारे कुणी शंका वा चूक लक्षात आणून दिली तरच, अन्यथा लिखित स्वरूपात आले म्हणजे ते अंतीम प्रमाण असे मानले जाते. त्यामुळे मी तरी आपण "खोडी" काढली असे कधीही म्हणणार नाही, नव्हे म्हणूच शकत नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

>>गाय हा उपयुक्त पशु वगैरे विचार पचवु शकणारे हिंदुत्त्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन! हा सुदिन सध्याच्या हिंदुत्ववादी पक्षाच्या एका राज्यात खरोखरच उगवला आहे. गोवंशाची केवळ उपयुक्तता पाहून तेथे फक्त गायींनाच जन्माला येऊ दिले जात आहे. गोवंशाचे जे घटक फारसे उपयुक्त नाहीत (पक्षी: बैल) त्यांना जन्माला येऊ दिले जात नाही. म्हणजेच आता या राज्यात गाय हा केवळ उपयुक्त पशू म्हणूनच पाहिले जात आहे. :) >>गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर.... जाणून बुजून आरोपी करण्याएवढे सावरकर त्याकाळी राजकीयदृष्ट्या सिग्निफिकंट नेते नव्हते असे मला वाटते. दुसरीकडे १. नथुरामशी सावरकरांचे संबंध होते हे उघड होते. २. गांधींच्या तथाकथित मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणावर सावरकर वेळोवेळी टीका करीत होते. ३. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसेचा वापर करण्यास प्रत्यवाय नसल्याचा सावरकरांचा ज्ञात इतिहास होता. अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. (सावरकरांची स्थानबद्धतेतून फायनल सुटका १९३७ मध्ये काँग्रेसची प्रांतिक सरकारे स्थापन झाल्यावरच झाली होती). (या धाग्यावर हे सर्व अवांतर आहे पण वरील वाक्य लिहिले गेल्याने उत्तर देणे भाग पडले. मूळ वाक्य संपादित झाल्यास माझ्या प्रतिसादातला हा भाग उडवायला हरकत नाही). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

स्वतंत्र उत्तर देत आहे. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by नितिन थत्ते

अशा वेळी संशयित म्हणून सावरकरांना आरोपी करणे स्वाभाविक होते. आकसाने अडकवायचेच असते तर विशेष न्यायालयाने मुक्तता केल्यावरसुद्धा अपीलात जाणे, इतर खटल्यांत अडकवणे वगैरे गोष्टी केल्या गेल्या असत्या. सावरकरांना १९५० साली बेळगावात अटकेत ठेवले होते (पाकीस्तानी पंतप्रधानाच्या भारत भेटीच्या वेळी) हा आकस नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by Dipankar

इंद्रराज पवार स्वतंत्र काहीतरी लिहिणार आहेत त्यावेळी उत्तर देईन. नितिन थत्ते

In reply to by वेताळ

आपले स्वागत..... शिवाय आपण इच्छुक असाल तर काही दुकानाची नावेही मी तुम्हाला देईन जिथून अशी दुर्मिळ माहितीची पुस्तके तुम्हाला मिळतील. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

@भोचक: घरगुती सावरकरांबद्दल माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. @इन्द्र्राज पवार: तुमच्यामुळे माहितीत नेहमीच नवीन भर पडत असते. तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by भारद्वाज

आपले आभार भारद्वाज जी.... वास्तविक अशा पध्द्तीच्या माहितीचे जे काही असेल ते श्रेय त्या धागा कर्त्यालाच दिले गेले पाहिजे. श्री.भोचक यांनी हा विषय सुरू केला नसता तर ज्या कुणी अधिकची माहिती इथे दिली ती त्यांना देता आली नसती. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भोचकराव, खूप छान धागा. बरीच नविन माहिती कळली. फार काही सांगता येईल.... मी स्वतः खूप भावुक होऊन जातो या व्यक्तीच्या केवळ नामस्मरणाने ! जरूर या धाग्यावर अधिकचे लिहिन. पवार साहेब, जरूर लिहा तुम्ही. वाचायला आवडेल.

छान चर्चा वाचावयास मिळाली. अभिनय कुलकर्णीँसह इंद्रराज पवारांनाही धन्यवाद.

नितिन जी. "गांधी हत्या" हा विषय खूप मोठा आवाका असलेला विषय आहे आणि जर त्यावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी केवळ आपण दोघांनी नव्हे तर हा धागा (किंवा तत्सम..) वाचणार्‍यांनी त्या खटल्याशी संबंधित असलेल्या सर्व बाबींकडे अत्यंत तटस्थपणे पाहणे फार गरजेचे आहे. "मी शाखेचा/सभेचा स्वयंसेवक आहे, म्हणून केवळ सावरकरच काय तर त्या खटल्यातील सर्व संबधित निर्दोष आहेत..." असे प्रतिपादन करणे जेवढे हट्टीपणाचे आहे तितकेच "मी गांधींचा उपासक आहे म्हणून त्यांचा वध होण्यास ज्या काही बाबी कारणीभूत झाल्या त्याच्याशी निगडीत असणारे सर्वजण हे निखालस आरोपी आहेत आणि त्यांना फासावर लटकाविले पाहिजे...." हे म्हणणे देखील तितकेच अपरिपक्वतेचे लक्षण दाखविणारे आहे. मी एक "मराठा" युवक आहे.... आणि मी स्वत: सावरकर प्रेमी आहे... त्यांच्या विचाराचा भक्त आहे, पण माझे प्रेम वा भक्ती ही त्यांच्या सर्वच विचाराशी प्रवास करू शकत नाही. उदा. सावरकरांची "भाकड गायी" विषयी काय मते होती हे तुम्ही स्वत: देखील जाणताच. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलही, त्याच्याशी मी सहमत असो वा नसो, पण "सावरकर विचाराचा मी भक्त" म्हणून उद्या सामिष भोजनासाठी मी गाय मारा असे कधीही म्हणू शकणार नाही. तीच गोष्ट "महात्मा गांधी" या महामानवाबद्दल. सावरकरांच्याबद्दल मी दहा पाने लिहिली तर दुसरीकडे गांधी यांच्या तत्त्वज्ञानावर मी १०० पाने लिहू शकेन इतका त्यांच्या जीवन आणि कार्य याविषयीचा माझा अभ्यास आहे... किंबहुना तो अभ्यास कधी संपत नाही असेच म्हणू या. नेहरूंच्या "इंग्लिश" चा तर मी अक्षरश: दिवाना आहे. हे सुरुवातीसच सांगायचे कारण इतकेच की तुमच्या आक्षेपांना उत्तर देताना आपल्या दोघांचीही पाटी (या विषयाबाबत) कोरी असणे फार गरजेचे आहे, तरच त्या घटनेवर प्रकाश टाकणे योग्य होईल. ६२ वर्षे होऊन गेली भारताच्या इतिहासातील त्या प्रसंगाला आणि खटल्याशी संबंधित सुप्रिम कोर्ट लायब्ररीत जे काही रेकॉर्ड आहे, त्या व्यतिरिक्त अधिकचे अधिकृत पुरावे गोळा करणे मला वाटते गरजेचे नसावे. त्या अनुषंगाने हे उत्तर स्वरूपातील लिखाण : "गांधी हत्या" खटल्यातील एक प्रमुख आरोपी "मदनलाल पाहवा" हा पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेला एक सर्वार्थाने उध्वस्त झालेला हिंदू युवक जो मुंबईत प्रोफ. जगदीशचंद्र जैन (रामनारायण रुईया कॉलेजमध्ये हिंदी व अर्धमागधी शिकवीत...) यांच्याकडे घरगडी म्हणून कामास होता, तो मुंबई वास्तव्यात हिंदू महासभेचा सदस्य झाला आणि गोडसे, आपटे, करकरे यांच्या संपर्कात आला. पुढे या गटाने "मुस्लिमांचा वाढता अनुनय आणि फाळणीनंतर पाकिस्तानला गांधीनी द्यायला लावलेले ५५ कोटी रुपये" या कारणास्तव त्यांचा वध करण्याचे निश्चित केले त्यावेळी (३० जानेवारी १९४८ पूर्वी) जे काय एक दोन प्रयत्न झाले त्यात प्रामुख्याने मदनलाल याने बिर्ला भवन येथे केलेला गावठी बॉम्बचा स्फोट होता. दिल्लीत मदनलाल याला अटक झाल्यावर "तो या संदर्भात (काही जहाल हिंदुत्ववादी युवक गांधींचा वध करणार आहेत...) माझ्याबरोबर एक दोन वेळा तसे तो पुसटसे बोलला होता...त्यामुळे सबब आता जर काही दुर्घटना झालेली नसली तरी पुढे होणारच नाही असे म्हणून सरकारने गांधी सुरक्षेबाबत गाफील राहू नये" असे म्हणत प्रोफ. जैन यांनी मंत्रालयात थेट मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ना. मोरारजी देसाई यांची भेट घेतली. मोरारजीना त्यात विशेष असे काही तथ्य वाटले नाही तरीही त्यांनी कमिशनर जिमी नगरवाला यांना बोलावून त्यांची व प्रोफ. जैन यांची गाठ घालून दिली. घटना दिल्लीत आणि तक्रार रिपोर्ट मुंबईत ही बाब नगरवाला यांनी दुर्लक्षित म्हणून सोडून दिली... इतकेच नव्हे तर त्यांनी प्रोफ. जैन यांची टरदेखील उडविली. जैन निराशेने परतले पण त्यावेळी मुंबईच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचा चांगला दबदबा असल्याने ते बर्‍याच ठिकाणी वैयक्तिक पातळीवर मदनलालच्या "त्या" इशार्‍याबाबत बोलत राहिले. अखेर "ती" घटना घडलीच.... आणि "वधाच्या जागेवर पकडला गेलेला युवक" हा एक ब्राह्मण असून तो महाराष्ट्रातला आहे ही बातमी विजेच्या वेगाने देशभर सर्वत्र पसरली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्वाना माहित आहे. खरा धक्का बसला तो मुंबई पोलिसांना.. विशेषत: मोरारजी देसाई आणि कमिशनर जिमी नगरवाला यांना. त्यांना साक्षात्कार झाला की आपणास याची योग्यवेळी "वॉर्निंग" मिळाली होती. ३१ जानेवारीला दिल्ली पोलिसांनी तपास चालू केल्यानंतर समजून चुकले की "गांधी वध" ही घटना केवळ एका व्यक्तीची नसून ती एक Conspiracy आहे. आता "कट" म्हटले की साहजिकच त्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असणे क्रमप्राप्त असते. नेहरू आणि पटेल यांनी तातडीने या बाबीवर खोलवर तपास सुरु करण्याचे आदेश दिले, अर्थात तो पर्यंत गोळ्या झाडणारा तरुण हा "महाराष्ट्रा"तील आहे हे समजले होतेच शिवाय नथुराम दिल्लीत "हिंदू महासभे" च्या निवासस्थानात राहत होता हे उघडकीस आल्यावर मग काय होणार ते सांगणे न लगे. ज्याअर्थी गोडसे, आपटे, करकरे, बडगे, पाहवा हे हिंदू महासभेचे अधिकृत सदस्य त्या तत्वानुसार या वधामागील कर्ताकरवितात्या संघटनेचा अग्रणी म्हणजेच "विनायक दामोदर सावरकर" हेच असणार यावर झटकन शिक्कामोर्तब झाले. आणि दिल्लीवरून आदेश आल्याक्षणी नगरवाला यांनी मुंबईत "सावरकर सदन" वर छापा घातला व सावरकरांची खाजगी कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली तीत १४३ फाईल्स व अंदाजे १०,००० पत्रे होती. पण पोलीस खात्याच्या दुर्दैवाने प्रत्यक्ष "गांधी वधा" च्या वेळेस सावरकर मुंबईत असल्याने त्यांना त्याक्षणी अटक करता येणे शक्य नव्हते.... नाहीतर मोरारजी खूपच उतावळे झाले होते त्या गोष्टीसाठी. केवळ कटात सामील असलेले तरुण 'त्यांनी स्थापित केलेल्या संघटनेचे सदस्य' या अत्यंत विरळ धाग्याच्या आधारे सावरकर अटकेस पात्र ठरत नव्हते ही बाब नगरवाला यांना चांगलीच माहित होती. केवळ प्रोफ. जैन यांनी मदनलाल पाहवा याच्या बरोबर झालेल्या बोलण्याच्या आधारे सावरकर यांना आरोपी म्हणणे पोलिसांना कागदोपत्री शाबित करणे अशक्य झाले. पण देशभरातील त्यावेळची स्थिती पाहता सरकारला "आपण काहीतरी मोठा कट शोधून काढला आहे" हे दाखविण्याची घाई झाली होती आणि जे काय चार तरुण सापडले होते त्यांची नावे तर राज्यकर्त्यांच्या नजरेत किरकोळ होती. गांधी हत्येच्या मागे "कोणीतरी बडा" असणारच ही खात्री त्यांनी मनी बाळगली होती आणि त्या दिवसात महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता. मोरारजीच्या काळात मुंबईत सरकारातील ना.स.का.पाटील सम "मराठी" पुढार्‍यांची काय पत्रास होती नेहरू आणि मोरारजींच्या विरुद्ध बोलायची ! एकदाचे "कट खटल्यात" सावरकरांचे नाव गोवले गेले आणि त्यांना दिल्लीला आणले गेले. १७ फेब्रुवारी १९४८ च्या "उलट तपासणीत" प्रोफ. जैन यांनी स्पष्ट सांगितले की, "मी पोलिसांना किंवा मोराराजीभाईंना हे कधीच सांगितले नाही कि मदनलालने मला जी गांधी हत्या योजनेची माहिती दिली त्यात सावरकर यांचे नाव त्याने घेतले होते." खुद्द मदनलाल याने (त्याला दिल्ली पोलिसानी दाखविलेल्या/दिलेल्या पाशवी छळानंतरही...) भर कोर्टात ठासून सांगितले की, "गांधी हत्या कट प्रकरणात मी प्रोफ. जैनच काय पण कुणालाही 'यात सावरकर देखील आहेत' असे सांगितले नाही.. कारण मला फक्त गोडसे, आपटे आणि करकरे यांचीच माहिती होती.... (त्यावेळी तर राहू देच पण त्याने रितसर जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर वीस वर्षांनी देखील लेखी स्वरूपात हेच विधान केले होते...) खटला जसजसा पुढे सरकू लागला तसतसे कोर्ट जस्टिस कपूर , तसेच सरकारी वकिलांची फौज यांच्या लक्षात येऊ लागले होते की गांधी वधात "सावरकर" यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा पुढे येत नाही....आणि अखेर जानेवारी १९४९ मध्ये त्यांची खटल्यातून "निर्दोष" म्हणून मुक्तता करण्यात आली. सावरकर यांना या प्रकरणात गुंतविण्याचा प्रामुख्याने नेहरू यांचा फार मोठा सहभाग होता. त्याला कारण म्हणजे सावरकर यांची हिंदुत्ववादाची भूमिका आणि नेहरूंचे ठरलेले मुस्लीम मनधरणी राजकारण. खटल्यानंतर "१६ जून १९८३" च्य पुण्याच्या श्री. एस. आर. दाते संपादित "काळ" या दैनिकात (म्हणजे सुमारे ३५ वर्षानंतर....) एक लेख प्रकाशित झाला होता. तो लेख होता सावरकरांचे लाल किल्ला खटला केस मधील वकील श्री. ल. ब. भोपटकर (आण्णासाहेब भोपटकर यांनी केलेल्या एका रहस्याभेदावर.....ते थोडक्यात खालीलप्रमाणे...) "दिल्लीत खटल्याचे कामकाज चालू असताना एके दिवशी सकाळी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी केसची कागदपत्रे वाचत असताना भोपटकरांना तेथील सेवकाने "तुम्हास फोन आला आहे" असे सांगितल्यावरून ते फोनच्या ठिकाणी गेले व फोनकर्त्याला आपली ओळख सांगीतली. पलीकडील बाजूस खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते जे नेहरू मंत्रिमंडळात "कायदा मंत्री" होते. भोपटकरांचे आश्चर्य कमी होण्याच्या अगोदरच आंबेडकरांनी त्यांना सांगितले की, "आज संध्याकाळी तुम्ही मला मथुरा रस्त्याच्या सहाव्या मैल थांब्याजवळ भेटा. मी वाट पाहतो." फोन बंद झाला. कोर्टाचे काम संपल्यानंतर भोपटकर मथुरा रस्त्यावर ठरलेल्या संकेतस्थळी गेले तर त्या अगोदरच एक कारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची वाट पाहत होते. स्टिअरिंग व्हील वर ते स्वत:च होते. थोडावेळ तसाच पुढे प्रवास झाल्यानंतर एक ठिकाणी त्यांनी गाडी थांबविली आणि भोपटकरांच्याकडे वळून म्हणाले, "अण्णासाहेब, खरे सांगायचे म्हणजे आमच्याकडे तात्यांच्या विरुद्ध कोणताही निश्चित स्वरूपाचा आरोप नाही; पुरावा नाही. मी कायदा मंत्री आहे त्यामुळे माझ्यासमोर जे पुरावे सादर करण्यांत आले ते शून्य किंमतीचे देखील नाहीत. विश्वास ठेवा की आमच्या कॅबिनेट मंत्रीमंडळातील बहुतांशी मंत्री त्यांना (सावरकर यांना...) या खटल्यांत गुंतविण्याच्या विरुद्ध आहेत... पण केवळ एका व्यक्तीमुळे हा सारा प्रकार चालू आहे... सरदार पटेल यांना देखील आता हे पटत आहे तरीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. पण माझा शब्द प्रमाण माना, तुम्ही तुमच्या अशीलाची केस जिंकालच...." ~~ आणि झालेही तसेच. आता "ती" प्रभावशाली व्यक्ती म्हणजे जवाहरलाल नेहरू... दुसरे कोण ? ("काळ" मधील वरील प्रसंग त्यानंतर १६.२.१९८९ मध्ये "सावरकर मेमोरिअल कमिटी" ने प्रकाशीत केलेल्या गौरव अंकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

...तर असं हाय व्हय :? तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. जय महाराष्ट्र

In reply to by इन्द्र्राज पवार

...तर असं हाय व्हय :think: तुमच्याकडे तर माहितीचा खजिनाच आहे !!! धन्यवाद पवारकाका. असेच म्हणतो. ना.स.का पाटील हॅहॅ

In reply to by इन्द्र्राज पवार

जागा भयास्तव काहीही लिहायचे बाकी ठेवु नकोस.सत्य काय ते सगळ्याना कळाले पाहिजे. वेताळ

In reply to by इन्द्र्राज पवार

ख जि ना हा शब्द तोकडा पडावा. कित्येक पुस्तके वाचुन मिळालेले हे ज्ञान असे छान ताटलीत वाढुन समोर आलेय .. आम्ही नशिबवान खरे !!

In reply to by इन्द्र्राज पवार

१. माझा "सावरकर दोषी होते" असा अजिबात दावा नव्हता. तुम्ही नेहरू-पटेल यांनी आकसाने आरोपी केले असे लिहिले होते त्यावरच आक्षेप होता. (नव्या उत्तरात तुम्ही खुबीने पटेलांचे नाव गाळले आहे. कारण तुमच्या संघीय विचारसरणीला ते सुटेबल नाही). २. तुम्ही एक मराठा युवक आहात या माहितीचा येथे काय संबंध हे कळले नाही. ३. तुम्ही जसे आहात तसाच मी काही बाबतीत सावरकर भक्त आहे. पण त्या काही बाबतीत स्वातंत्र्यलढा ही बाब खूप वरची नाही. विज्ञाननिष्ठा, कर्मकांडाला विरोध आणि जात्युच्छेदन या बाबी वर आहेत. ४. गांधींच्या खुनाची पार्श्वभूमी म्हणून जे तुम्ही लिहिले आहे ते १०००००००००+ वेळा ऐकले आहे. त्यापैकी ५५ कोटीचे प्रकरण खोटे आहे हेही अनेकांनी दाखवून दिले आहे.. तरीही 'नेहरूंनी आकसाने सावरकरांना आरोपी केले' या मुद्द्याशी संबंध नसताना तुम्ही ते सर्व लिहिले आहे. प्रत्यक्षात असा कटाचा आरोप ठेवणे हे स्वाभाविकच होते हे तुमच्याच लेखनातून सूचित होते. ४. सावरकर हे मोठे नेते (नेहरूंना थ्रेट निर्माण करण्यासारखे) अजिबात नव्हते. महाराष्ट्रातील विरोधी गटातील मोठा नेता म्हणजे "विनायक दामोदर सावरकर" जो सार्‍या देशातील तरुणांचा आणि ब्रिटीश साम्राज्य ठोशास ठोसा या न्यायानेच नाहीसे करता येईल असे मानणार्‍या गटाचा "हिरो" होता या कल्पनेच्या भरार्‍या आहेत. तसे मोठे नेते असलेच तर ते पटेल आणि राजेंद्रप्रसाद असतील. ५. कटाचा आरोप ठेवण्यात दिगंबर बडगेची साक्ष हा महत्त्वाचा दुवा होता. पण त्याला कोरोबोरेट करणारे पुरावे सरकार दाखवू शकले नाही. ६. आंबेडकर आणि भोपटकर यांच्यातले संभाषण ९९% काल्पनिक असावे. काळ या भोपटकरांच्याच मालकीच्या पेपरात ते लिहून आलेले दिसते. तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. नेहरूंनी एका दृष्टीने सावरकरांवर उपकारच केले. (नाहीतर आपण संजूबाबाच्या सुटकेबद्दल बोलतो तसे त्या सुटकेबद्दलही बोलत राहिलो असतो. किंवा सावरकरांच्या अंदमानातून सुटकेविषयी बोलले जाते तसे याही सुटकेबाबत बोलले गेले असते). तपशीलातील चूकः जस्टिस कपूर हे गांधी खुनाचा खटला चालवत नव्हते. १९६६ मध्ये स्थापन केलेल्या चौकशी आयोगावर ते होते. त्यांच्या अहवालात "सावरकरांविरोधात पुरावा नसला तरी एकूण परिथिती सावरकरांच्या आणि त्यांच्या गटाच्या कटाकडेच निर्देश करते" असे म्हटले होते. ७. नेहरू आणि लियाकत अली यांच्यात एक करार झाला होता. त्या करारानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटावे अशी काळजी घेतील असे ठरले होते. त्या कराराला सावरकरांनी विरोध केला. त्यानंतर लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती. नंतर सावरकरांनी १३ जुलै १९५० रोजी आपण कुठल्याही राजकीय कार्यात भाग घेणार नाही आणि आपल्या मुंबईच्या घरातच राहू असे हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिल्यावर त्यांची सुटका झाली. त्यानंतर २० जुलै रोजी त्यांनी हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. पण माझा उद्देश फक्त आकसाने खटल्यात गोवले या मुद्द्याचा प्रतिवाद करणे हा आहे. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिन जी... या सर्व मुद्यांवर मी सविस्तर लिहू का? ~~ मात्र अकारण आपल्यात कटुता वाढणार असेल तर इथेच थांबू या. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

कटुता वाढायचे काही कारण नाही. पण माझा एकाच मुद्द्याला आक्षेप होता. खरे तर ते वाक्य तुम्ही लिहिले नसते तर मी एवढे प्रतिसाद दिले नसते. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही. म्हणून थांबू या. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

>>इकडे अनेकांना तुम्ही दिलेली माहिती आवडली आहे. तशी खूप नावडती माहितीही देता येईल. तुम्ही उत्तरे दिलीत तर मीही देणार. त्यात सावरकर विरोधात (केवळ स्वातंत्र्यलढा, सशस्त्र क्रांती, सत्याग्रह, गांधी, नेहरू या बाबत) मजकूर असणार. जो एकूणात मिपावर पचेल असे वाटत नाही.
; ही माहीती वाचण्यास उत्सुक आहे. फक्त नवीन धाग्यात दिली तर वाचणीय होईल.

In reply to by नितिन थत्ते

तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच. मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय? लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो

In reply to by नितिन थत्ते

सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ? नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.

In reply to by आनंदयात्री

थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही. मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे..... पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.

In reply to by नितिन थत्ते

जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)

In reply to by नितिन थत्ते

१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल. २) तो खुलासा लेखकाबद्दल ३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ? ५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते. ७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका. ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ? ८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते. उदा. वाटेल तेवढी. (तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील) शेवटी: १) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते. २) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली. यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.

In reply to by नितिन थत्ते

य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे. याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार? नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे. नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण? बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.

In reply to by हुप्प्या

~~ खुलासा केला आहे.... ~~ ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो. इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).

In reply to by Pain

थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

पवार साहेब, अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन ! मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय. पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...

दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे... दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे... दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे... धागाकर्त्यालाही धन्यवाद

In reply to by भडकमकर मास्तर

असेच म्हणतो. @नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्‍यातला तू नाहीस. मग एकदम असे का? लिहिच. बिपिन कार्यकर्ते

नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती. या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्‍याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

सहमत!!! थत्ते आणि इंदर दोघेही संयमित लिहितात, तेंव्हा दुसर्‍या एका धाग्यात ही चर्चा होऊ द्या ही विनंती/आग्रह.

In reply to by आळश्यांचा राजा

"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....." नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्‍याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही. सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत. सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही. पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच. नितिन थत्ते

मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की, ...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही. ...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही. ...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्‍या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्‍यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो. ...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"