मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************

वाचने 230963 वाचनखूण प्रतिक्रिया 589

निनाद Mon, 01/10/2022 - 08:49
मणिपूर आणि त्रिपुरा दरम्यान जनशताब्दी रेल्वे सुरू. मणिपूर, त्रिपुरा आणि दक्षिण आसाममधील लोकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करून, पहिल्या जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे ला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे आसाममार्गे मणिपूर आणि त्रिपुराला जोडणार आहे. आसाममधील अरुणाचल स्टेशन (सिलचर) मार्गे मणिपूर ते त्रिपुरा ही पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस ट्रेन जिरीबाम आणि आगरतळा या दोन टर्मिनल स्थानकांव्यतिरिक्त सिलचर, बदरपूर, न्यू करीमगंज, धर्मनगर आणि अंबासा यासारख्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक शहरांना जोडेल. या सेवेमुळे तीन राज्यांसह या भागातील व्यापार, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला चालना मिळणार आहे. सध्या मणिपूर आणि त्रिपुरा दरम्यान कोणतीही थेट ट्रेन नाही आणि आगरतळा आणि सिलचर दरम्यान फक्त एक ट्रेन धावते ती देखील सकाळी. जनशताब्दी ट्रेन आता मणिपूरच्या लोकांना शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांसाठी त्रिपुराला जाणाऱ्या थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि त्रिपुरातील लोकांना व्यापार, पर्यटन इत्यादीसाठी मणिपूरला भेट देण्याची संधी मिळेल ज्यामुळे प्रदेशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

In reply to by निनाद

जेम्स वांड Wed, 01/12/2022 - 07:40
सकाळी सकाळी काय बातमी वाचली ! सुंदरच, लास्टमाईल कनेक्टिव्हिटीसाठी एक महत्वाचे पाऊल आहे हे. ह्या सरकारच्या मेजर आचिमेंट्स पैकी टॉप ५ मधील एक माझ्यासाठी कायम पूर्वोत्तर भारतात रेल्वे अन इतर पायाभूत सुविधा विकास करणे हा असेल, हे बरेच ड्यु होते अन ते पूर्णत्वास जाते आहे हे उत्तमच होते आहे.

In reply to by जेम्स वांड

निनाद Wed, 01/12/2022 - 09:11
ज्या प्रवासाला रस्त्याने १०.५ तास लागत त्याला आत ६ तास लागणार आहेत. हे कार्य असेच चालू राहो - आणि एकदिवस आपल्या सर्वांना अरुणचल प्रदेशातील अफाट जैविक विविधता असलेले दिबांग वन्यजीव अभयारण्य पाहायला रेल्वेने जायला मिळो हीच सदिच्छा!

हेमंतकुमार Mon, 01/10/2022 - 21:41
नुकतेच राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वेला सर्वोत्तम पर्यावरणपूरकता आणि स्वच्छता यासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड Wed, 01/12/2022 - 07:36
गंमतच म्हणायची ! च्यामायला त्या शेंट्रल लाईनच्या लोकल पाहून तर असे काही असेल अशी शक्यता वाटत नाही, अर्थात लोकल ट्रेन्स पेक्षा सेन्ट्रल रेल्वेजची व्याप्ती मोठी आहेच हे मान्यच.

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार Wed, 01/12/2022 - 09:06
सोलापूर स्थानकात माझे जाणे-येणे असते. स्वच्छता व टापटीप नजरेत भरण्यासारखी आहे . एकदा तिथे थांबलो असताना कल्याणचा एक माणूस माझ्याशी गप्पा मारत होता. तेव्हा त्याने सोलापूर स्थानक बघून आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती आणि मला तसे बोलून दाखवले होते ! सोलापूर स्थानकाला बरेचदा स्वच्छतेचे बक्षीस मिळते. पण तेच रेल्वे स्थानकातून बाहेर पडून रस्ता ओलांडला की, मनपाला अस्वच्छतेचे सुद्धा पहिले पारितोषिक द्यायला हरकत नसावी !

हेमंतकुमार Sat, 01/15/2022 - 14:47
१. बहुप्रतीक्षित भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेस (Bhusawal-Igatpuri Memu Express) सुरु झाली आहे. ok ............................................... २. अवघ्या पावणेदोन तासांत गाठता येणार नाशिक-पुणे; भावी प्रकल्प

कंजूस Sun, 01/16/2022 - 06:30
खरं म्हणजे नाशिक ते कसारा अशी घाटमार्ग रेल्वे हवी आहे. मनमाड मुंबई एक्स्प्रेस आहे पण ती एकच सकाळी येते आणि संध्याकाळी परत जाते. तपोवनही लांब पल्ल्याची आहे. सकाळी मुंबईतून नाशिक कडे जाणारी भुसावळ पसेंजर बराच वेळ ( एक तास) खडवली स्टेशनात उगाचच रखडवतात. बाकीच्या एक्सप्रेस गाड्या सकाळी खूप असल्या तरी त्या महाराष्ट्राच्या नाहीत. पुण्यासाठीच्याच रेल्वे आहेत तशा नाशिकच्या नाहीत.

कंजूस Sun, 01/16/2022 - 08:34
रेल्वेची स्वत:ची apps NTES आणि Irctc booking ही passenger trains (unreserved )चे टाइमटेबल देत नाहीत. शिवाय एक्सप्रेस ट्रेन्सचे कोच पोझीशनही देत नाहीत. ते स्टेशन फलाटावर इकडे तिकडे धुंडाळून चार्टमध्ये पण शोधावे लागते. वरच्या इंडिकेटरवरही गाडी येण्याच्यावेळी लावतात. मग सामान घेऊन गर्दीतून वाट काढत जावे लागते. मग त्यासाठी Railyatri ( Android app) उपयोगी पडते. (( https://play.google.com/store/apps/details?id=com.railyatri.in.mobile)) कोच पोझीशन या app ची बरोबर असते.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Sun, 01/16/2022 - 08:40
उपयुक्त माहिती रेल्यात्री ॲप मात्र काही वेळेला गंडते तेव्हा गुगल वरून अन्य एखादी वेबसाईट चांगली माहिती देते.

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Sun, 01/16/2022 - 09:46
केल्यावरच पाहावे. कोच पोझीशन आणि पसेंजरसाठी रेलयात्रीला दुसरा पर्याय नाही. पण NTES अपडेट करून खात्रीशीर माहिती घ्यावीच. म्हणजे की ज्या दिवशी ट्रेन असेल त्या दिवशी आपली ट्रेन cancelled/diverted/rescheduled यादीत आहे का पाहावे. एका मोठ्या ग्रुपला मी अगोदरच सूचना दिली आणि त्यांचा त्रास वाचला. तिकिट रद्द करून टाकले. तिकिट कनफर्म असले तरी चार तास बाकी असताना पुन्हा एकदा pnr test केला तर अपग्रेड झालेलं{ असल्यास} कळतं आणि त्याच डब्यात आपण अगोदर शिरतो.

कंजूस Sun, 01/16/2022 - 08:39
हेसुद्धा एक्सप्रेस ट्रेन्स जिथे थांबते त्या स्टेशनांचीच नावे दिसतात. Rahilyatri मात्र थांबणाऱ्या स्टेशनची नावे ठळक आणि मधली न थांबणारीही देते. रात्री ट्रेन कुठे थांबल्यास आपण नक्की कुठे आहोत आणि पुढचा स्टॉप कोणता हेही कळते. Gps tracking पाहायची गरज नसते.

In reply to by मदनबाण

गामा पैलवान Sun, 02/06/2022 - 16:16
स्थानकाला दिलेलं राणी गाई-दिन-लियु हे नाव आवडलं. इंग्रज आक्रमणासमोर ही शूर राणी वयाच्या १३ व्या वर्षी उभी राहिली होती. अधिक माहिती : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82 -गा.पै.

निनाद Mon, 02/07/2022 - 04:11
भारतीय किसान रेलने एक हजार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत! ३ फेब्रुवारी २०२२रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र राज्यातील सावदा ते दिल्लीतील आदर्श नगर या किसान रेल्वेच्या १००० व्या प्रवासाला हिरवा झेंडा दाखवला. सावदा ते दिल्लीच्या आदर्श नगर या किसान रेल्वे ट्रेनमध्ये ४५३ टन केळ्यांची वाहतूक केली. हा उपक्रम दीर्घकालीन झाला आहे हे पाहून बरे वाटले.

निनाद Mon, 02/07/2022 - 04:14
केंद्रीय अर्थसंकल्पात पुढील तीन वर्षांमध्ये, ४०० नवीन पिढीतील अर्ध-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस गाड्या विकसित आणि तयार केल्या जातील. स्वदेशी विकसित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या आवृत्ती २ चे डिझाइन पूर्ण झाले आहे. नवीन वंदे भारत आवृत्तीची चाचणी एप्रिल महिन्यापासून सुरू होईल आणि पुढील ऑगस्ट-सप्टेंबरपासून या ट्रेनचे उत्पादन सुरू होईल.

In reply to by निनाद

जेम्स वांड Fri, 02/11/2022 - 07:41
वंदे भारत सिरीज मधल्या ट्रेन २० (का २१) ची वाट पाहणे सुरू आहे, बेस्ट असतील, वंदे भारत ट्रेन सेट्स फक्त स्लीपर सीट्स/ बर्थ कॉम्बिनेशन सह, मला वाटतं ही संकल्पनाच अतिशय आकर्षक आहे.

निनाद Fri, 02/11/2022 - 07:53
बेंगळुरू मेट्रो फेज-२ साठी मेट्रो कारच्या पहिल्या लॉटची डिलिव्हरी विलंबित झाली आहे. CRRC ला २०१९ मध्ये २१६ मेट्रो कार पुरवण्यासाठी २४ दशलक्ष डॉलर्स चे कंत्राट देण्यात आले. करारानुसार, २४ मेट्रो कार चीनमधून पाठवल्या जातील, उर्वरित १९२ आंध्र प्रदेश राज्यातील श्री सिटी येथे नियोजित सुविधेत भारतात उत्पादित केल्या जातील असे सांगितले गेले. CRRC ही चीनी कंपनी आहे. आणि चीनी कंपन्या चीन बाहेर कोणतेही उत्पादन करण्यास तयार नसतात. आता न्यायालयीन हस्तक्षेप घडवून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून सगळ्याच मेट्रो कार चीन मधून आणण्याचा डाव कंपनी खेळू शकते. म्हणजे भारतात मेट्रो कारचे उत्पादन कधीच होणार नाही.

In reply to by निनाद

जेम्स वांड Fri, 02/11/2022 - 08:07
म्हणजे भारतात मेट्रो कारचे उत्पादन कधीच होणार नाही.
मला वाटते अल्सटोम का बोंबर्डीयरचा एक प्लांट गुजरातला वडोदऱ्याला आहे, वडोदरा अहमदाबाद रेल्वेने जाताना डावीकडे एका मोठ्या जागेत कैक मेट्रो रेक्स झाकून ठेवलेले दिसत असत, अर्थात ती प्रोडक्शन फॅसिलिटी आहे का गोडाऊन आहे ते मात्र मला सांगता येणार नाही.

In reply to by जेम्स वांड

निनाद Fri, 02/11/2022 - 08:44
म्हणजे CRRC मार्फत भारतात मेट्रो कारचे उत्पादन कधीच होणार नाही. असे हवे होते ते वाक्य!

जेम्स वांड Fri, 02/11/2022 - 08:04
. (डब्ल्यू डी जी 5) WDG-5, ह्याचे अजूनही जास्त ताकदवान व्हर्जन सध्या अंडर टेस्ट असून रोझा आणि गांधीधाम लोको शेड्सला प्रत्येकी एक WDG-6 इंजिन दिलेले आहे (नाव बहुतेक अंगद ठेवले आहे लोको क्लासचे) . (डब्ल्यू डी जी 6 जी) दुर्दैवाने ही लोकोज सहज दिसणार नाहीत कारण ही G क्लास आहेत अन जास्त पॉवर असल्यामुळे ही फक्त फ्रेट कॉरिडॉर, मालगाड्या अन इतर मालवाहतुकीच्या वापरातच असतील, प्रवासी वाहतुकीच्या नाही.

हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 08:32
भारतीय रेल्वेची प्रगती लिहीणारे प्रतिसाद आणि वरील फोटो सर्व छान शुभेच्छा !

कंजूस Fri, 02/11/2022 - 09:32
या ट्रेन्स छोटे प्रवास करणाऱ्यांसाठी ठीक आहेत. एका प्रवाशाकडे एकच bag नेणारे. https://youtube.com/c/XtremeRoads या चानेलवरच्या बऱ्याच ट्रेनस पाहिल्यावर आतील रचना समजते. सीट्सखाली इतर स्लीपर डब्यांत जसे भरपूर सामान राहाते तसे यामध्ये नाही.

In reply to by कंजूस

जेम्स वांड Fri, 02/11/2022 - 10:08
ट्रेन्स ह्या तूर्तास (चेअर कार कॉम्बो) फक्त शताब्दी ट्रेन्सला रिप्लेस करायला बनवल्या आहेत सरकारने, त्यामुळे तुम्ही सांगताय त्यात नवीन किंवा ब्रेकिंग काहीच नाही, सरकारने स्वतःच वंदे भारत ट्रेन १८ ह्या मध्यम पल्ल्याच्या शताब्दी ट्रेन्सला रिप्लेसमेंट म्हणून काढल्याचे सांगितले आहेच, लांबच्या रूट्स करिता त्याच ट्रेनचे स्लीपर कॉम्बो सध्या विकासाधिन आहे ते पुढेमागे येईलच रुळावर.

In reply to by कंजूस

जेम्स वांड Fri, 02/11/2022 - 11:04
लांब रुट्स करता विकसित करतायत तिला ट्रेन १८च्या धर्तीवर ट्रेन २१ नाव दिले आहे, थोडी लेट आहे शेड्युलवर, पण ट्रेन सेट १८ मधेच मॉडीफिकेशन्स करून तिला स्लीपर बनवणार आहेत बर्थ टाकून

कंजूस Fri, 02/11/2022 - 10:29
भारतीय रेल्वेची दोन apps आहेत. NTES (INFO) IRCTC ( INFO आणि BOOKING) दोन्हीही पसेंजर ट्रेनसचे टाइम टेबल देत नाहीत. NTES पूर्वी देत असे. (Neral /Aman lodge To matheran शोधून पाहा.) एखाद्या स्टेशनला जाणाऱ्या/येणाऱ्या/सुटणाऱ्या गाड्या शोधण्यासाठी रेल्वे apps उपयोगाची नाहीत. तिकडे फॉर्मवर कुठून आणि कुठे दोन्ही द्यावे लागते. फक्त एक साईट आहे totaltraininfo.com ती फक्त एक स्टेशन नाव टाकूनही देते. ( उदाहरणार्थ khajuraho किंवा Chitrakootkarvi dham किंवा Matheran शोधून पाहा.)

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 10:44
totaltraininfo.com >>>छान पण सध्या सर्व पॅसेंजर गाड्या चालू झाल्या आहेत की नाही, हे ऑनलाईन कुठे समजेल ? कारण दिवसा धावणाऱ्या अनारक्षित असतात.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 11:13
अनारक्षितची माहिती ऑनलाइन कळत नाही हीच समस्या आहे !

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Fri, 02/11/2022 - 11:24
पण ते बरेचदा रिफ्रेश होतच नाही आणि समाधानकारक उत्तर मिळत नाही . तसेच कोविड काळात बंद असलेल्या गाड्या आता नक्की चालू आहेत का नाही हे धड समजत नाही

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Fri, 02/11/2022 - 15:16
उदाहरणार्थ १) totaltraininfo.com उघडून kharbav ( आमच्या इथे पनवेल/दिवा / कोपर-वसई वरून जाणाऱ्या या सर्व unreserved गाड्या आहेत. त्या मार्गावरचे खारबाव हे छोटे स्टेशन आहे. ) http://www.totaltraininfo.com/station/khbv/ तर इथल्या वेळापत्रकात दाखवलेल्या गाड्या आता आहेत का ही खात्री करायची आहे रेल्वेच्याच वेबसाईटवर. २) NTES app उघडले. Go to "Live station" पहिले नाव kharbav टाकून ड्रापडाऊन मेनूमधून kharbav/KHBV SELECTED. दुसऱ्या ओळीत कोणत्या बाजूला जाणाऱ्या स्टेशनचे नाव टाकायचे आहे. ते Vasai road टाकले. खाली 2 hours /4/8 hours पैकी next 2 hours घेतल्यावर तीन ट्रेनस आल्या. त्या आज धावणारहे नक्की झाले!!! ------------ B ) उदाहरण दुसरे. Matheran to Aman lodge trains site वर मिळाल्या. पण NTES App वर live station "Matheran" केल्यास गाड्या दाखवत नाही. बहुतेक narrow gauge मुळे दाखवत नसेल. ------- तुमची गाडी शोधून पाहा. २/४/८ तास अगोदर खात्री करता येईल. रेल्वेच्या NTES App ने दाखवली की नक्की खात्री होईल.

हेमंतकुमार Sat, 02/12/2022 - 14:20
NTES वर लाइव्ह स्टेशन प्रकाराने करून बघितलं तेव्हा संबंधित पॅसेंजर गाडी काही दिसली नाही. म्हणजे ती चालू झालेली नाही

हेमंतकुमार Sat, 02/12/2022 - 14:20
NTES वर लाइव्ह स्टेशन प्रकाराने करून बघितलं तेव्हा संबंधित पॅसेंजर गाडी काही दिसली नाही. म्हणजे ती चालू झालेली नाही

हेमंतकुमार Sat, 02/12/2022 - 14:20
NTES वर लाइव्ह स्टेशन प्रकाराने करून बघितलं तेव्हा संबंधित पॅसेंजर गाडी काही दिसली नाही. म्हणजे ती चालू झालेली नाही

हेमंतकुमार Fri, 02/18/2022 - 14:21
आणि नेहमीच्या गर्दीसोबत चक्क रेल्वेमंत्रीही लोकलमध्ये चढले! ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का! https://www.loksatta.com/thane/thane-diva-sixth-lane-local-train-track-inauguration-ashvini-vaishnav-video-narendra-modi-pmw-88-2810468/ दोन्ही मंत्र्यांनी उभ्याने प्रवास केला हे छान.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा Fri, 02/18/2022 - 17:17
नाटकं असतात असल्या सेलीब्रेटी लोकांची ! पुढेमागे ४ जणांचा लवाजमा असतो. एरवी पांढर्‍या पॉश एसयूव्ही मधून फिरत असतात !

कंजूस Fri, 02/18/2022 - 16:13
आपल्याच प्यांटच्या खिशातला आपलाच मोबाईल काढता येत नाही. वरच्या शर्टच्या खिशात ठेवावा लागतो। चढताउतरता तो हातात घट्ट धरावा लागतो जिवाच्या आकांताने. मंत्र्यांना ती काळजी नसावी.

फारएन्ड Sat, 02/19/2022 - 03:06
काल ठाणे-दिवा दरम्यान अजून दोन लाइन्स सुरू झाल्या असे वाचले. या मुंब्रा व कळवा मार्गे जाणार्‍या रूट वर वाढवल्या आहेत, आणि आता यापुढे फास्ट लोकल्सही तेथून जातील असे वाचले. पारसिक च्या बोगद्यातून फक्त थ्रू ट्रेन्स जाणार असे दिसते. याचे बरेच फायदे आहेत पण फास्ट लोकल्स ने कामावर जाणार्‍यांना वेळ थोडासा जास्त लागेल का ते माहीत नाही. कारण तो स्लो गाड्यांचा मार्ग वळसा घालून जातो.

In reply to by फारएन्ड

कंजूस Sat, 02/19/2022 - 07:11
नियोजित वेळेला जातील. कारण सकाळी मुंबईत पोहोचणाऱ्या बाहेरगावच्या गाड्यांना पुढे काढण्यासाठी फास्ट लोकल्सना थांबवावे लागत असे. मोठ्या मुंब्रा बोगद्यातून पुणेमार्गे जाणाऱ्या बाहेरगावच्या गाड्या आणि अंबरनाथ/बदलापूर/कर्जत गाड्या नेतील बहुतेक. कसारा/नाशिककडे जाणाऱ्या लोकल्स आणि बाहेरगावच्या गाड्या मुंब्रा डोंगराला वळसा घालून नेतील बहुतेक. असे केल्याने कल्याण जंक्शनमध्ये जाणारा वेळ कमी होईल. बरेच वर्ष कोलकाता जाणारी गीतांजली एक्सप्रेस कल्याणला एक/दोन नंबरला आणतात.

कंजूस Sun, 02/20/2022 - 14:40
कोरोनाचा भर ओसरू लागला आणि रेल्वे गाड्या पूर्वत होऊ लागल्या म्हणून रेल्वेचे NTES app मागे टाकलेले ते धूळ झटकून अद्ययावत केले. काही पसेंजर गाड्यांना काहीही बदल न करता एक्सप्रेस बिल्ला बाधला आहे. म्हणजे डबल भाडे लागू. - दिवा सावंतवाडी पसेंजर. काही गाड्या खरोखरच एक्सप्रेस केल्या आहेत. मुंबई - पंढरपूर खूप जलद केली. मुंबई - शिरडी ( दौंड मार्गे) मुंबई/पुणे ते विजापुरा ( बिजापूर)-बदामी - गदग. 11139 उलट 11140 Daily या गाड्या मुंबई/पुणे ते बदामी -ऐहोळे -हंपी - लखुंडी सहल करणाऱ्यांसाठी फारच कामाच्या ठरतील. इंदोर ते खजुराहो ( सकाळी 07:00) जाणारी गाडी काढली/वाढवली/ वेळ बदलली फार चूक झाली.

कंजूस Tue, 03/01/2022 - 19:22
सांगणारी खात्रीशीर रेल्वेचीच साईट https://www.irctchelp.in/train-coach-position/ चालत नाही. ती चालली तर स्टेशनला पाहण्याचा खटाटोप वाचेल _______________________________ काही मोठ्या / महत्त्वाच्या स्टेशनचा फलाट map उदाहरणार्थ पुणे :इथे https://amp.erail.in/info/station-maps-pune/1714 गाडी पकडायला स्टेशनला गेल्यावरच तिकडे गाडी येण्याच्या अगोदर रिझव / जेनरल डब्यांची स्थिती समजते. ------इतर खासगी apps चुकीची पोझिशन देतात. ____________________________

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Tue, 03/01/2022 - 19:35
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास.... यासंबंधीची व्यवस्थित माहिती देणारे इ -फलक मुंबईमध्ये सर्वोत्तम असतात. अन्य 1-2 महानगरात ठीक. इतरत्र अनुभव चांगला नाही. गाडी कुठल्या क्रमांकाच्या फलाटाला येणार आहे हे पंधरा मिनिटे आधी सांगायची आपली पद्धत आहे. पण त्यातही बरेचदा गोंधळ झालेला जाणवतो. येऊन जाऊन मुंबईच काय ती या मुद्द्यांच्या बाबतीत प्रगत वाटते

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Wed, 03/02/2022 - 04:33
पण . . . Charting झाल्यावर मोबाईलला मेसेज येतो की अमुक डब्यात अमुक आसने आहेत ( waiting listमधून confirm झाले आहे का, किंवा upgrade होऊन नवीन स्थिती कोणती. ) मग यातच पुढे coach position दिल्यास काम सोपे होईल ना. हा मुद्दा आहे.

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार Wed, 03/02/2022 - 11:28
पण... पुणे- सोलापूर इंद्रायणी इंटरसिटी आणि पुणे - सिकंदराबाद शताब्दी या अजून किती काळ दाबून ठेवणार आहेत कोण जाणे !

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Wed, 03/02/2022 - 12:17
बसून जाण्याचे असलेली पुणे- सोलापूर इंद्रायणी इंटरसिटी ही एकमेव गाडी काढलीच. इतर गाड्या स्लीपरवाल्या आहेत.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Wed, 03/02/2022 - 12:29
हुतात्मा एक्सप्रेस ही देखील बसून जायचीच गाडी आहे पण ती केव्हाच चालू केली. शताब्दी तर पूर्ण आरक्षित गाडी असते. तरी ती का चालू करत नाहीत काय माहिती ?

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड Wed, 03/02/2022 - 12:34
अगोदर सिटिंग अरेंजमेंट मध्ये असलेले २ * २ किंवा ३ * ३ पुश बॅक कॉम्बो सोशल डिस्टन्सला मारक असावेत, ते पाळून बुकिंग घेता गाडी चालवणे तोट्यात जात असेल रेल्वेला

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Wed, 03/02/2022 - 14:57
पूर्वी इंद्रायणी ने पुण्याला जाऊन तीच गाडी नंबर बदलून सोलापूरला जात असे. परतीला तीच गाडी पुण्याला येऊन नंतर इंद्रायणी नावाने मुंबईत जायची. म्हणजे सोलापूर मुंबई एक सुपरफास्टचे कार्ड तिकिट काढून मुंबईला जाता येत असे बसून. ही गाडी अशावेळी पोहोचते पुण्याला/ पुण्याहून सुटते की मुंबई / येणारी गाडी मिळू नये. रेल्वेत मराठी अधिकारी नाहीत फारसे याचा प्रताप आहे.

कंजूस Wed, 03/02/2022 - 12:31
तुतारी एक्सप्रेस - रात्री साडेबाराला ठाणे. सकाळची दिवा सावंतवाडी बसून जायची पसेंजर आता एक्सप्रेस नावाखाली डबल पैसे, पेण गाळले फक्त. दादर रत्नागिरी दिव्याला कापली. बाकी गाड्या गोवा,कर्नाटक, केरळच्या. त्यात जा.

हेमंतकुमार Wed, 03/02/2022 - 19:55
मुंबई स्थानकावर कॅप्सूल पद्धतीची अशी निवासस्थाने उभी करणार आहेत. ok ज्यांना स्वस्तात थोडा काळा स्थानकावर राहण्याची सोय हवी आहे त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरतील.

In reply to by कंजूस

सुबोध खरे Fri, 03/04/2022 - 19:19
या गाडीचे रेक शेअरिंग आहे.( तीच अख्खी गाडी पांडियन एक्स्प्रेस आणि रॉक फोर्ट एक्सप्रेस म्हणून धावते)

In reply to by सुबोध खरे

कंजूस Fri, 03/04/2022 - 20:49
तिकडे तमिळनाडूत फिरण्याची चाचपणी चालू आहे. म्हणून गाड्या पाहात आहे. रेल्वेच सोयीची वाटते. पण मदुराई फार दूर आहे. ब्रेक जर्नीसाठी कांचिपूरम/चेंगलपट्टू बरं वाटतंय. विमान प्रवास परवडत नाही.

In reply to by सुबोध खरे

कंजूस Fri, 03/04/2022 - 20:49
तिकडे तमिळनाडूत फिरण्याची चाचपणी चालू आहे. म्हणून गाड्या पाहात आहे. रेल्वेच सोयीची वाटते. पण मदुराई फार दूर आहे. ब्रेक जर्नीसाठी कांचिपूरम/चेंगलपट्टू बरं वाटतंय. विमान प्रवास परवडत नाही.

In reply to by हेमंतकुमार

बोका Fri, 03/04/2022 - 20:36
मंत्री साहेब म्हणतात की Rear-end collision testing is successful. लोकसत्ता उगाच भरधाव, समोरासमोर वगैरे सनसनाटी विधाने करते.

हेमंतकुमार Wed, 03/09/2022 - 10:00
बद्दलची तांत्रिक माहिती: https://www.civilsdaily.com/news/kavach-the-indian-technology-that-can-prevent-collision-of-trains/

हेमंतकुमार Fri, 03/11/2022 - 18:15
आत्ताच बातमी वाचली की रेल्वेखाते आता वातानुकुलित डब्यांमधून अंथरूण-पांघरूण देणे पुन्हा सुरू करीत आहे... तसेच पडदे ही लावले जातील.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार Sun, 03/20/2022 - 09:39
बातमी आणि वास्तव सदर बातमी येऊन आठ दिवस होऊन गेलेत. काल मी ट्रेनने प्रवास केला तेव्हा पांघरूणे दिलेली नव्हती. चौकशी करता असे समजले : या निर्णयाची अंमलबजावणी उत्तर भारताकडून सुरू झालेली आहे. दक्षिण भारतात ती पूर्ण व्हायला १ एप्रिल उजाडेल. पडदे लावून झालेले आहेत.

हेमंतकुमार Mon, 03/14/2022 - 08:43
रेल्वेच्या तिजोरीत चित्रपट चित्रीकरणातून पावणेतीन कोटी ; १० चित्रपटांचे चित्रीकरण https://www.loksatta.com/nagpur/central-railway-earns-over-rs-2-50-crore-from-film-shoots-zws-70-2840081/ …. माझा असा समज होता की चित्रपटातील रेल्वे संबंधीची बहुतेक दृश्य रामोजी किंवा अन्य फिल्मसिटी सारख्या प्रकल्पांमध्ये चित्रित करतात.

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड Tue, 03/15/2022 - 08:25
स्टेशनवर करत असावेत, जब वी मेट बहुतेक खुद्द रतलाम स्टेशनवर शूट केला होता स्पेसिफिक सीन. कधीकधी रेल्वे शूटच्या नादात दिग्गज पण घोडचूका करतात. श्याम बेनेगल दिगदर्शित "बोस द फॉरगोटन हिरो" सिनेमात अशीच एक चूक भातातील खड्याप्रमाणे कचकन दाताखाली आली होती. प्रसंग हा की नेताजी घरातून नजरकैद चुकवून ब्रिटिशांना गुंगारा देऊन महंमद झियाउद्दीन म्हणून गोमोह स्टेशन (तत्कालीन बंगाल सुभा, हल्ली झारखंड) इथून फ्रंटीयर मेलने सुरू करतात (इथे बरोबर जुने लाल डबे, ओढणारे वाफेचे इंजिन दाखवले आहे), पुढे ट्रेन ने ते पेशावरला पोचतात तेव्हा मिया अकबर शहा त्यांना घ्यायला पोचतात स्टेशनवर तिथं मात्र मॉडर्न निळ्या लिव्हरी मधले डबे दाखवले गेले होते. निळे डबे नव्वदीच्या दशकात जुन्या ब्रिक रेड लिव्हरीला चेंज करून लागू केले गेले होते, त्या इंटेन्स नाटकीय ऐतिहासिक क्षणात एकदम ते बघून कसेसे झाले होते.

In reply to by जेम्स वांड

गामा पैलवान गुरुवार, 03/17/2022 - 00:09
जेम्स वांड, अगदी समर्पक उदाहरण आहे. त्यातलं नाटकीय हे विशेषणही तुम्ही वर्णिलेल्या खड्यासारखंच दाताखाली आलं. तुम्हाला नाट्यमय म्हणायचं होतं बहुतेक. आ.न., -गा.पै.

In reply to by जेम्स वांड

फारएन्ड Fri, 03/18/2022 - 05:48
रतलाम जंक्शन बरेच मोठे आहे. इथे थोडे पाहायला मिळेल. पिक्चर मधे दाखवलेले स्टेशन बहुधा महाराष्ट्रातील एखादे लहान स्टेशन होते. रतलाम ला राजधानी थांबते. बाकी पिक्चर मधे दाखवलेली पंजाब मेल मुळातच रतलामहून जात नाही. बाकी याबद्दल इथे वाचा :) https://www.misalpav.com/node/41372

In reply to by फारएन्ड

कंजूस Fri, 03/18/2022 - 08:29
रेल्वे विडिओसाठी मी Extreme roads channel - vaishali seta पाहतो. हिंदी सिनेमे भावनिक पायावर उभे असतात. त्यामुळे ब्लूपर साइडिंगला. तो लेखही वाचला. प्रतिसादांतले फक्त तीनचार आईडीच उरले आहेत मिपावर.

In reply to by कंजूस

फारएन्ड Fri, 03/18/2022 - 21:11
कंजूस - धन्यवाद. मी ही मोकळा वेळ असला की ट्रेन्सच्या क्लिप्स पाहतो. या तुम्ही दिलेल्या चेक करतो आता. काही लोक प्रवास करताना व्हिडीओ ब्लॉग तयार करतात - अनेकजण केवळ ते करण्याकरताही प्रवास करतात. असे अनेक पाहिले आहेत. पण हे स्पेसिफिकली पाहिल्याचे आठवत नाही.

In reply to by फारएन्ड

कंजूस Fri, 03/18/2022 - 22:31
सर्वच प्रवास आपण करणार धसतो पण त्यात काय गंमत आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रेन प्रवासाचे विडिओ पाहावे लागतात. बऱ्याच जणांचे पाहिले पण वैशाली चांगले करते. एकदा गाडीत बसून त्यातली रचना दाखवल्यावर पुढचे आठ ते दहा तास विडिओ ढकलणे कठीण आहे. ते तिला जमतं.

हेमंतकुमार Fri, 03/18/2022 - 15:45
रेल्वे हे केंद्र सरकारचे एकमेव 'प्राप्ती' करून देणारे मंत्रालय असून त्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार त्या उत्पन्नातून निघतात. काही काळापूर्वी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन सुद्धा त्या उत्पन्नात बसत होते. परंतु आता त्या विभागात तूट आलेली आहे. https://www.thehindu.com/opinion/lead/transmogrifying-a-behemoth-the-railways/article65234722.ece/amp/

In reply to by हेमंतकुमार

निनाद Sat, 03/19/2022 - 07:35
बातमी द हिंदू नावाच्या वर्तमान पत्रातली आहे. हा चीन अजेंडा चालवणारा भारत विरोधी पेपर आहे. यातल्या बातम्यांवर विश्वास ठेवणे जड जाते. सध्या पायाभूत सुविधा वाढवण्याचे कार्य वेगाने चालले आहे. अशा काळात भांडवली खर्च मोठा होतो आहे. रेल्वे विद्युतीकरण, शेती समर्पित रेल्वे, समर्पित मालवाहू मार्ग या देशभर विणल्या जात आहेत. हे घडण्यासाठी धोरण म्हणजे पॉलिसी आवश्यक असतेच. नाहीतर हे कसे आखून पुर्ण केले असते? आणि लेखातले शब्द पहा also accompanied by a deafening silence on crucial policy issues. म्हणजे याच काळात रेल्वेकडे पैसे नाहीत - अशी हाकाटी पिटण्याची टिपिकल डावी प्रपोगंडा पद्धती आहे बाकी काही नाही.

In reply to by निनाद

कंजूस Sat, 03/19/2022 - 09:56
१) हा चीन अजेंडा चालवणारा भारत विरोधी पेपर आहे. चीन काय करते हे लोकांना माहिती आहे का? किंवा असली तर २००० पूर्वीची असेल. आता चीन बदलला आहे. २)It can be translated as: ‘Will bureaucrats do everything? Just because they’ve become IAS, does it mean they will run fertilizer factories, chemical industries,... if one becomes IAS will he even fly aircraft? What is this humongous force that we’ve created?’ का नाही? एंजिनिअरला एखादा तांत्रिक प्रश्न दिला तर तो सोडवणार हे नक्की. पण त्याला कोणता प्रश्न सोडवायला द्यायचा हे अधिक महत्त्वाचे असते. एक उदाहरण म्हणजे '७० च्या दशकात मुंबई युनिवर्सिटीच्या परीक्षा आणि निकाल याचा गोंधळ असे. सरकारने लक्ष घालून एक आइएस अधिकारी आणून बसवला यासाठी. त्याने झटक्यात प्रश्न सोडवला. कसा? तर त्याने परीक्षा नियोजन, पेपर तपासणी आणि निकाल याचे निरीक्षण केले. त्याने टाइमटेबल आखले. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोफेसर लोकांचा इगो गेला. काम चोख झाले. आता रेल्वेकडे जागा,स्टेशने, स्टाफ आहे. त्यातून अधिकाधिक रिटन मिळवण्यासाठी डोकेबाज माणूसच हवा. लोकांना ( प्रवाशांना )काय हवे हे ओळखून पर्यटनावर भर दिला. उदाहरणार्थ रामायण एक्सप्रेस टुरिस्ट ट्रेन ( लक्शरी रु ८४हजार, तर साधी सोळा हजार. दोन्हींसाठी प्रवासी आहेत. श्रीमंय आणि सामान्य असे दोन्ही भाविक खुश. 200 journeys channel पाहा.) गाड्या चालवल्या आणि यातूनच आवक वाढली. रेल्वे स्टेशनांत अद्ययावत सोयी आणत आहेत. स्वच्छता वाढवली आहे. एके काळी लालूच्या वेळी रेल्वेने आठ हजार कोटी नफा दाखवला होता. तो आता नाही याचे कारण काय? तर हा वरील खर्च सुरू झाल्यावर नफा गेला. पण कुठे? तर तो परत प्रवाशांना मिळाला सुंदर स्वच्छ स्टेशन आणि गाडी रूपात.