Skip to main content

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 231127
प्रतिक्रिया 589

प्रतिक्रिया

टिटाघर वॅगन्स भारतात बनविलेल्या मालवाहू वाघिणी आणि अन्य प्रकारचे रेल्वेडबे जगभरात निर्यात करणार. अभिनंदन !

भारतातील वेगवान ट्रेन्ससाठी नव्याने RRTS या पद्धतीचे डबे बनवण्यात आले आहेत. असे पहिले डबे आता दिल्ली ते मीरत या मार्गावर लवकरच धावतील. या डब्यांमध्ये असलेल्या अत्याधुनिक सुखसोयी इथे वाचता येतील.

In reply to by हेमंतकुमार

RRTS हा डब्यांचा प्रकार नसुन एक मेट्रो सारखा प्रकल्प आहे. यात एक नवीन रेल्वे मार्ग दिल्ली ते मीरत दरम्यान बनवला जात आहे. गाड्या, सिग्नल यंत्रणा वगैरे सर्व नवीन आधुनिक असेल. दिल्ली- अल्वर, दिल्ली- पानिपत असे इतरही नवे मार्ग बनवणार आहेत. मुंबैत कारशेड बनत नाही अजुन.

In reply to by बोका

धन्यवाद !

लोकप्रिय होतं. पण आता हव्यासापायी डिवलपरने वाट लावली आहे. दोन वर्षे गरजच नव्हती. आता पाहिले तर जाहिराती किती आणि गंडलेलं.

आईबरोबर प्रवास करणाऱ्या छोट्या मुलांसाठी रेल्वेने बेबी बर्थ योजना नुकतीच सुरू केली आहे. या विशिष्ट प्रकारच्या बर्थची संरचना नंदुरबारच्या नितीन देवडे यांनी केलेली आहे. कोविड काळात त्यांनी हे महत्त्वाचे काम केले. आता प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही सोय केलेली आहे. परंतु, या प्रकारात बाळाला बाहेरच्या बाजूस झोपायचे असल्याने काही लोकांनी शंका उपस्थित केली आहे. बाळ आपल्या बाजूला ठेवता येईल अशी काहीतरी रचना करता येईल का, यावर विचार व्हायला हवा.

दिल्ली अंबाला या मार्गावरील एका स्थानकात रेल्वेची सामान्य तिकीट विक्री व्यवस्थाच थांबल्याने इथून बसणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने विनातिकीट प्रवास करावा लागत आहे ! मात्र पुढच्या काही स्थानकांवर उतरल्यानंतर विनातिकीटचा दंड वसूल केला जातो….

काहीही चांगले निर्माण केलं की काही दिवसातच आपण त्यासाठी आपली लायकी नाही हे सिद्ध करतो..... दगडफेकीमुळे ‘एसी’ लोकलचे वारंवार नुकसान ; तीन-चार महिन्यांत २३ घटना https://www.loksatta.com/mumbai/stone-pelting-shatters-23-ac-local-wind…

दोन दिवसांपूर्वी मी सह्याद्री वाहिनीवर ‘दास्तान-ए- बडी बांका’ या नावाचा मुंबई विषयक सुरेख मराठी कार्यक्रम पाहिला. हा द्विपात्री प्रयोग आहे- एक पुरुष तर एक स्त्री निवेदक. गेल्या पन्नास वर्षातील मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचा सुरेख धांडोळा त्यात घेतला आहे. काही वाक्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात. या कार्यक्रमात मुंबईतील लोकल्समधल्या जीवनाचा सुंदर आढावा घेतला आहे. लोकलमध्ये एका स्त्रीने चालवलेले सौंदर्यवर्धनगृह, तृतीयपंथी व्यक्तींना छानपैकी साडी नेसून देण्याचे कृत्य इत्यादी गोष्टी रोचक वाटल्या.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील पन्नास वर्षातील रेल्वे कशी प्रगत होईल याचा सुरेख आढावा घेणारा एक लेख इथे. काही रोचक मुद्दे : १. ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी चालकरहित ट्रेन चीनने विकसित केली आहे. जपानही या क्षेत्रात प्रगती करीत आहे. सुरुवातीस ही सेवा बंदिस्त मार्गावर मालगाड्यांसाठी वापरतात. प्रवासी वाहतूक करण्यापूर्वी सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करावा लागेल. २. पायाभूत सुविधांच्या दैनंदिन देखभालीसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर ३. सन 2050 पर्यंत डिझेल इंजिनचा पूर्णपणे त्याग करण्याचा निर्धार. सध्या फक्त स्वित्झलँड मध्ये रेल्वेमार्गांचे जवळजवळ 100 टक्के विद्युतीकरण झालेले आहे. ४. काही भागांमध्ये पूर्ण विद्युतीकरण करणे शक्य नसल्यास battery तंत्रज्ञानाचा वापर ५. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरातून ‘प्रवासाचे तिकीट काढणे’ आणि अनुषंगिक गोष्टी पूर्णपणे रद्द करणे. प्रवास केला की आपल्या खात्यातून परस्पर पैसे वजा होतील !

In reply to by हेमंतकुमार

सन 2050 पर्यंत डिझेल इंजिनचा पूर्णपणे त्याग करण्याचा निर्धार. भारताला १०० % विद्युतीकरण शक्य आहे आणि त्या दिशेने जोरात वाटचाल चालू आहे. सध्या ८० % रेल मार्ग विद्युतीकरण पूर्ण झालेले आहेत. परंतु भारताच्या दोन सीमांवर कायम कटकटी करणारे शत्रू असल्यामुळे भारताला डिझेलचा त्याग करणे नजीकच्या भविष्यात शक्य नाही. कारण एक तर विजेचे कर्षण ( TRACTION) स्टेशन वर हल्ला झाला तर ते बंद पडू शकते. याने तेवढी रेल्वे लाईन बंद पडेल याशिवाय विजेच्या ग्रीडवर सायबर हल्ला झाल्यास संपूर्ण ग्रीड कोसळू शकते. https://www.hindustantimes.com/india-news/chinese-hackers-targeted-7-in… अशा आणीबाणीच्या स्थितीत लष्करी सामग्री पोचवण्याचा दृष्टीने भारत १०० % विद्युतीकरण झाले तरी नजीकच्या काळात डिझेल इंजिनांचा त्याग करेल अशी सुतराम शक्यता नाही.

ok बातमी एखाद्याला पटकन वाटेल की या गृहस्थाला रेल्वेकडून दंड अधिक व्याज मिळून एवढी मोठी रक्कम मिळणार आहे ! तसे अजिबात नाही. २.९८ लाख लोकांना मिळून होणारी ती भरपाई आहे.

* कर्जत ते पनवेल हा नवा 30 किलोमीटर लांबीचा उपनगरी लोहमार्ग तयार करण्याचे काम चालू. हा पूर्ण झाल्यानंतर मुंबई कर्जत प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल. * पुणे स्थानकावरील सर्व सहा फलाटांना जोडणारा सर्वात जुना पूल (1925 चा) आता जमीनदोस्त करण्याचे ठरले आहे. आता या पुलाचे आयुष्य संपल्याचे लेखापरीक्षणात आढळले आहे. बातमी

In reply to by हेमंतकुमार

तो वाढवणार. मालगाड्या घाटमार्गाने जाण्यासाठी क्यूमध्ये टाकून ठेवायची सोय वांगणी येथे केली आहेच. पळसधरीलाही करतील.

In reply to by कंजूस

एकेरी मार्ग हा अत्यंत दळभद्री प्रकार आहे. नवा मार्ग टाकतांनाच दुहेरी टाकायचा असतो. काहीतरी खुसपट काढून एकेरीच टाकतात ही अतिशय भिकारडी वृत्ती आहे. कोकण रेलवेतही तेच. म्हणे पैसे नाहीत. तिच्यायला कोकण रेलवे तर कर्जरोखे काढून बांधली होती. मग पैशाची अडचण यायला नको. पण एकदा वृत्तीच भिकारडी म्हंटली की दळभद्रीपणासाठी सबबी हजार मिळतात. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एकेरी लाईन टाकली ती टाकली, किमान मोठे बोगदे व पुल तरी दुहेरी मार्गासाठी बनवायचे होते. आज त्या मार्गावर संपूर्ण नविन बोगदे व पुल बांधायला परत किती खर्च करावा लागेल.

In reply to by प्रसाद_१९८२

खर्च व्हावा हिच इच्छा असेल तर! सोलापुरातले एक उदाहरण देतो. सोलापूरात कंबर तलावाजवळ रेल्वे फाटक आहे. रेल्वे येण्याजाण्याच्या वेळी ही तोबा गर्दी व्हायची. मग उड्डाण पूल बनवला. काही महिन्यांनी उड्डाणपूलचे रूंदीकरण केले गेले. पुन्हा काही महिन्यांनी रेल्वेची दुहेरी लाईन येणार होती म्हणुन तो पूल पुन्हा पाडुन रेल्वेच्या दुपदरीकरणानुसार त्याचा विस्तार केला. हे सगळे इन मीन २ ते ३ वर्षात झाले. आणि त्या मार्गावरुन जाणार्य येणार्या सर्व रहिवाश्यांना ह्यात प्रचंड पैसा खाल्ला गेला आहे हे उघड गुपित माहिती होते.

In reply to by गामा पैलवान

को.रे ही बोगदे काढून सुरू करणे यालाच प्राधान्य होते ते मालवाहतुकीसाठी. त्यामार्गे प्रवासीही नेता येतात हे दुय्यम होते आणि आजही आहे. मालगाडीस वेळ लागला तरी चालतो. त्या मालगाड्यांमुळेच प्रवासी गाड्यांना उशीर होतो. मुंबई गोवा मार्ग १९८५ सालीच ३+३ झाला असता तर बसेस कशाला घाटावरून गेल्या असत्या?

कर्जत ते पनवेल हा नवा 30 किलोमीटर लांबीचा उपनगरी लोहमार्ग तयार करण्याचे काम चालू. हा पूर्ण झाल्यानंतर मुंबई कर्जत प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल.
म्हणजे आता हार्बर लाईन वर तुफान भाऊगर्दी होणार, सीएसएमटी वरून सुटणाऱ्या कर्जत गाड्यांत चढण्याची सोय नसेलच जसे वेस्टर्नला विरार फास्टला अंधेरी पब्लिक चढू शकत नाही तसेच

इतका खर्च करून शिवडी न्हावाशेवा (चिर्ले) ब्रिज बांधला जातोय तर तो फक्त व्हेईकल ब्रिज का ? चिरल्या पासून सुरू होणार पूल शिवडीत प्रॉपर स्टेशनजवळ उतरतो आहे की, एखाद लाईन लोकल (अप आणि डाऊन) टाकली असती सोबत रेल ब्रिज टाकून तर मजा आली असती (वाशी पुल अन वाशी रेल्वे पूल जसे समांतर आहेत तसे)

In reply to by जेम्स वांड

बंदरं ही मोठी वाहतुक करण्यासाठी असली तरी जोडरस्ते लागतातच. कंटेनर पद्धतीने बंदरामध्ये बोट उभी करून मालाची चढउतार करण्याचा वेळ खूप कमी झाला. पण पुढे काय? ती गती वाढत नाही.

कुर्ला ईस्टला कैक वर्षांपासून कसल्यातरी अजस्त्र फ्लायओव्हर टाईपचं बांधकाम सुरू आहे, वाशीकडून वडाळ्याला जाताना डावीकडे दिसते हे बांधकाम, वडाळा किंग्ज सर्कल मध्ये जसा रेल्वे उड्डाणपूल आहे तसे काहीतरी वाटते पण प्रचंड अवाढव्य, ते नेमके कश्याला बांधतायत ते काही कळायला मार्ग नाही तिच्यायला !

In reply to by जेम्स वांड

निवासी मुंबईकरांच्या अनुभवातूनच आम्हाला समजतील. धन्यवाद!

In reply to by हेमंतकुमार

कर्जत - पनवेल - दिवा - कल्याण गेल्याने गाडीचे एंजिन पुढेच ठेवता येते. आणि मालगाड्या वाढल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ट्रेनमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी आत्ताच आकाशवाणीवर ऐकली. आता ट्रेन मध्ये दिले जाणारे खाद्यपदार्थ संबंधित स्थानकांवर तयार होतील. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय झालेला आहे

काल अमेरिकेतील मिसुरीमध्ये एका ट्रेनने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला आहे त्या क्रॉसिंगवर रेल्वे फाटक तर नाहीच पण सावध करणारे दिवे सुद्धा नाहीत हे वाचून आश्चर्य वाटले.

ट्रेनच्या प्रवासी डब्यांना दिलेले वैयक्तिक क्रमांक हा कुतूहलाचा विषय बरेच दिवस मनात होता. जरा वाचन केले असता खालील माहिती मिळाली: अलीकडे नवे डबे आल्यापासून त्या सर्वांना सहा अंकी क्रमांक दिला जातो (पूर्वी तो चार किंवा पाच अंकी असायचा). या सहा अंकीचा अर्थ असा असतो : 201150 • पहिले २ अंक : डबा उत्पादनाचे वर्ष २ अंकात. 20 = 2020 • तिसरा अंक : रेल्वे विभाग 1 ( मध्य, इ.) • शेवटचे ३ अंक : डब्याची विशिष्ट श्रेणी (उदा. १५० = 3AC) • अंकांच्या पुढे / या नंतर अक्षर असल्यास : अन्य तांत्रिक माहिती उदा. 201150/C

चहाचा कप ७० रुपये ! शताब्दी किंवा राजधानीने प्रवास करायचा असेल तर तिकिटांचे आरक्षण करतानाच खाण्यापिण्याच्या सर्व पदार्थांचे आरक्षण करणे आवश्यक आहे. तसे न करता प्रवासात निव्वळ चहा जरी मागवला तर ..... कपभर चहा 20 रुपये + जीएसटी 50 रुपये = 70 रुपये द्यावे लागतात….. (२०१८ मधील परिपत्रक) https://kalingatv.com/offbeat/passengers-pays-rs-70-for-tea-in-during-j…

In reply to by हेमंतकुमार

काही लोक प्रवासात फक्त बिस्किटे आणि केळी खातात. म्हणून त्यांनी खाद्यपदार्थ विरहीत तिकिटांची मागणी केली होती राजधानी, शताब्दीसाठी. पुणे - दिल्ली दर्शना एक्सप्रेस 12493साडे एकोणीस तासांत ( १५५५ रुपयात ३एसी)नेते म्हणजे इतर गाड्यांना जेवण नाश्ताचे आणखी १५०० रु घेतात.

In reply to by कंजूस

मी एकदा पुणे सिकंदराबाद शताब्दीच्या बेक्कार जेवणाचा अनुभव घेतला होता. त्यानंतर काही दिवसातच जेवणविरहित तिकीट काढायची सोय झाल्याने मला फार छान वाटले होते.

In reply to by हेमंतकुमार

गाडीची सुटण्याची वेळ कशी आहे हे पाहून नंतर दोन तीन तासांनी जेवण हवे असेल तर अगोदरच स्टेशनाबाहेरच्या बऱ्या हॉटेलातून एक पार्सल बांधून घेतो. म्हणजे एका जेवणाचा प्रश्न सुटतो. फलाटांवर मिळणारी केळी बरी नसतात. ती घेऊन ठेवतो. एक मोठा ब्रेड घेतोच. जाम असतो. बटरचा भरोसा नसतो, वितळते . दक्षिणेकडच्या गाड्यांत मात्र कॉफी, नाश्ता चांगला मिळतो.

In reply to by कंजूस

मी देखील. वरील शताब्दीच्या बाबतीत सकाळी मिळणारा अल्पोपहार चांगला असायचा (काहीसा ब्रिटिश पद्धतीचा). परतीच्या प्रवासात संध्याकाळचे जेवण मात्र बरोबर नसायचे

In reply to by हेमंतकुमार

लोकांच्या नाराजीनंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने अन्यायकारक नियम रद्द केला आहे (G S T). आता सर्वांना चहा कॉफी त्यांच्या मूळ किमतीतच घेता येतील.

जगातील सर्वात लांबीची मालगाडी : Australian BHP Iron Ore : 7.353 km ok

In reply to by गामा पैलवान

कॉमन डिझाईन असू शकते, आपल्याकडे डब्ल्यु डी जी 6ए ही सहा हजार अश्वशक्ती वर आधारित मालगाडी ओढण्याची इंजिने तसली आहेत ह्यात केबिन साईडला शॉर्ट हूड फॉरवर्ड अन एक्झॉस्ट साईडला लॉंग हूड फॉरवर्ड कॉन्फिग्यूरेशन म्हणले जाते. ही इंजिने मुळात अमेरिकन जनरल इलेक्ट्रिक कंपनीने विकासित केलेली असून तिचे सुरुवातीचे दोन नमुने भारतीय रेल्वेजनं अमेरिकेतून आयात करून उरलेले इंजिन्स भारतात तयार करायचा तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला होता जनरल इलेक्ट्रिक सोबत. सध्या उत्तर रेल्वेच्या रोझा लोकोशेड मध्ये अशी २५ आणि पश्चिम रेल्वेच्या गांधीधाम लोकोशेड मध्ये ३७ इंजिने कार्यरत आहेत व उरलेली इंजिने मनोरवा, बिहार इथे उत्पादित केली जात आहेत .

In reply to by कंजूस

यात नवप्रज्ञेच्या तंत्राचा वापर करून आभासी अद्भुत जागतिक सफर घडवली जाते असे साधारण वाटते.

In reply to by हेमंतकुमार

कमाल आहे. हे जर अहमद्नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर गावातले रेल्वे स्थानक असेल तर मग कमाल आहे. गाव श्रीरामपुर असले तरी रेल्वे स्टेशन मात्र बेलापुर म्हणुन ओळखले जाते. मात्र प. बंगाल मधे हावडा जवळ (हावडा - वर्धमान) एक श्रीरामपुर नावाचे रेल्वे स्टेशन आहे. ती पहीली पाटी पण बंगाली भाषेत आहे. तेव्हा हा मला एक स्पूफ वाटतो आहे. केवळ नाम साधर्म्य साधुन केलेला विनोद!!

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, तसं बघायला गेलं तर गाव आणि स्थानक खूपदा वेगळ्या ठिकाणी असतात. कोलाड हे कोकण रेलवे वरचं पाहिलं स्थानक वरसगावात आहे. पुढील स्थानक इंदापूर हे तळाशेत येथे आहे. त्यापुढील स्थानक माणगाव हे माणगावाच्या बरंच बाहेर आहे. आ.न., -गा.पै.

स्पष्टीकरणाबद्दल. मलाही ते पटत नव्हते, परंतु बरेच ठिकाणी तसे संदर्भ मिळाले.

या पुस्तकाचे शीर्षक रोचक वाटले. ok navvy = बांधकाम-मजूर.

अखेर पुणे सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट इंद्रायणी चालू होणार 18 जुलैपासून… https://www.punekarnews.in/pune-solapur-pune-train-services-to-be-resum… एकदाची खरोखर रुळांवरून जाऊ लागली म्हणजेच विश्वास बसेल :) इतके ताणले होते..... सिकंदराबाद शताब्दी १० ऑगस्टपासून चालू व्हायची बातमी काल आली आहे

In reply to by हेमंतकुमार

पुणे सोलापूर इंटरसिटी सुपरफास्ट या गाडीने आज प्रवास करतोय. CC ला शताब्दी चे डबे लावलेत. स्वच्छ व मोठ्या काचा. छान सुधारणा

In reply to by हेमंतकुमार

या नव्या चेअरकारची क्षमता 78 आहे. पूर्वीपेक्षा पाच ने वाढली आहे. दोन्हींचे गणित गमतीदार आहे १. पूर्वीच्या डब्यांमध्ये तीन बाय दोन पद्धतीच्या पंधरा रांगा असायच्या परंतु 3 व 73 क्रमांकच नसायचे कारण दोन्ही दाराजवळील मधले आसन काढून टाकले जायचे. २.आताच्या डब्यात कुठलाही आसन क्रमांक गाळलेला नाही परंतु फक्त दोन्ही दारांजवळ दोन बाय दोन रचना आहे 16 रांगा >>> 78 आसने

In reply to by कंजूस

ॲप्सचा माझा अनुभव कधीच चांगला नाही. त्यापेक्षा वेबसाईट बरी

In reply to by हेमंतकुमार

वारंवार फोन नं, इमेल अपडेट नाही असं येत राहतं. मग ते करायचं. Ntes site https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या मध्येही खूप गोंधळ आणि चुका आहेत. Twitter वर कळवलं पण सुधारणा नाही.

त्यापैकी एक म्हणजे "ब्रॅडशॉज रेल्वे गाईड" ऑक्टोबर १८३९ ते मे १९६१ अशी ही गाईड पब्लिश झाली. ब्रॅडशॉज गाईड ह्या कॉंटिनेंटल (युरोप), ईजिप्त, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया ह्या देशांतील तसेच इंग्लंड स्कॉटलंड अँड वेल्स मिळून असलेल्या "ग्रेट ब्रिटन" मधील रेल्वे टाईमटेबल्स, फिरण्याच्या जागा, कनेक्टिंग ट्रेन्स इत्यादी प्रकाशित करत असत. तत्कालीन भारतासाठी ब्रॅडशॉज गाईड प्रकाशित करणाऱ्या डब्ल्यु जे ऍडम्स अँड कंपनीने खालील "गाईड बुक्स" काढल्या होत्या. १. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बंगाल प्रेसिडेन्सी अँड वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४) २. ब्रॅडशॉज हँडबुक टू द बॉम्बे प्रेसिडेन्सी अँड नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (इसवीसन १८६४) आणि ३. ब्रॅडशॉज इलस्ट्रटेड हँडबुक टू द मद्रास प्रेसिडेन्सी अँड द सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया (१८६४) ह्या गाईडबुक्स प्रकाशित केल्या होत्या. मध्यंतरी टीपीकल ब्रिटिश गब्दूल गोट्या शोभणारा एक ट्रॅव्हलर ती गाईड बुक अन त्यातील वर्णन केलेल्या जागा व स्टेशने धुंडाळत भारत अन बांग्लादेशात फिरल्याची एक डॉक्युमेंट्री पण बीबीसी अर्थ वर आली होती (नाव विसरलो आता) ब्रॅडशॉज गाईड अन टाईमटेबल्स जवळपास खालील प्रमाणे बांधणीचीच असत :- . .

In reply to by जेम्स वांड

मी ते घेणार होतो एक आठवण म्हणून (१५०रु) पण तो विक्रेताच म्हणाला "अंकल मत लो, ये सब जानेवाला है। " मग त्याचा सल्ला धुडकावून खरेदी केले नाही.

ब्रिटनमध्ये उष्णतेच्या लाटेने झालेली अवस्था ब्रिटनमध्ये टेम्प्रेचर्स इतकी वाढली आहेत की तिथल्या रेल ट्रॅकची प्री स्ट्रेस्ड टेम्प्रेचर रेझिस्टन्स लेव्हल पण क्रॉस झाली आहे, इंग्लंडमध्ये रेल्स (रूळ) लो टेम्प्रेचर्ससाठी प्री स्ट्रेस्ड असतात हायसाठी नाही त्यामुळे उष्मालाटेमुळे आता युके मध्ये रेल्वे स्पीड्स पण कमी केले गेले आहेत, नुसत्या रेल्स व्हलनरेब्ल होण्याची शक्यता नाही तर ओएचई केबल्स पण लोंबण्याच्या लेव्हल पर्यंत एक्सपांड होऊ शकतात म्हणे.

In reply to by हेमंतकुमार

ते जागतिक तापमान वाढ वगैरे सगळ्या डाव्या विचारसरणीच्या अंधश्रद्धा अन थोतांडे असतात

In reply to by जेम्स वांड

जेम्स वांड, हो, खरं आहे. रेलवेच्या रुळांप्रमाणे डांबरावरही अनिष्ट परिणाम होतात. प्रसंगी मऊही पडतं. ते टाळण्यासाठी गेले काही दिवस रेती टाकताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

उन्हाळ्यात तर आपल्याकडेही विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणाच्या काही भागात हायवेवर डांबर वितळून त्यात ट्रकच्या चाकोऱ्या छापलेल्या बघायला मिळतात.