मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

हेमंतकुमार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************

वाचने 230947 वाचनखूण प्रतिक्रिया 589

हेमंतकुमार Sun, 03/20/2022 - 17:38
डोंबिवलीच्या सुभाष राव यांचा रेल्वे इंजिनांच्या प्रतिकृती बनविण्याचा छंद आहे. त्यांनी ही कला उत्तम प्रकारे विकसित केली आहे. नुकतेच त्यांना राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाकडून त्यांच्या कलाप्रदर्शनातकरिता आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बनविलेली कुठलीही प्रतिकृती पाचशे रुपयांपेक्षा कमी खर्चात झालेली आहे. मात्र ती तयार करण्यामागे त्यांचे अविरत कष्ट आहेत. मुलाखत इथे : https://www.freepressjournal.in/amp/mumbai/how-dombivli-resident-subhash-rao-turned-his-hobby-of-making-miniatures-of-railway-engines-train-coaches-into-creative-passion

हेमंतकुमार Wed, 03/23/2022 - 16:43
जयपूर मध्ये फक्त सहा तरुणांनी स्वतःसाठी संपूर्ण मेट्रो ट्रेन आरक्षित केली होती. त्यांना रात्री दहाची वेळ देण्यात आली होती. संबंधित चित्रफित येथे आहे बातमीची सत्यासत्यता माहित नाही.

हेमंतकुमार Wed, 03/23/2022 - 19:06
भारतीय रेल्वेची एक वैशिष्ट्यपूर्ण ट्रेन वर्षातून फक्त 23 मार्चला चालवली जाते : फिरोजपुर ते हुसैनीवाला इथपर्यंत. आजच्या शहीद दिनी हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी या ट्रेनचे प्रयोजन आहे. ok

हेमंतकुमार Sat, 03/26/2022 - 19:27
मुंबई सीएसएमटी स्थानकावर 'जादूचा आरसा' प्रकल्प बसवणार !गाडीची वाट पाहेपर्यंत धमाल गम्मत जम्मत… https://www.mid-day.com/amp/mumbai/mumbai-news/article/mumbai-waiting-for-a-train-at-csmt-have-some-fun-till-it-comes-23220001

हेमंतकुमार गुरुवार, 03/31/2022 - 11:58
न्यूझीलंडमध्ये दळणवळणासाठी प्रामुख्याने विमानांचा वापर जास्तच आहे. त्यातून कर्ब उत्सर्जन समस्या वाढत आहे. त्यांच्याकडे देशाच्या दोन टोकांना जोडणारी लांब पल्ल्याची रेल्वेसेवा नाही. अस्तित्वात असलेल्या काही रेल्वे बंद केल्या गेल्य नंतर तिथे रेल्वे बचाव सारख्या मागण्या होत असतात. रेल्वेचे जाळे वाढवण्यास संबंधी प्रदूषण समितीने काही सूचना केलेल्या आहेत.

हेमंतकुमार Sun, 04/03/2022 - 16:39
रेल्वेसेवा आता ब्रॉडगेज मार्गावर नव्याने सुरू झाली आहे. 2014 पर्यंत ही सेवा नॅरोगेज वर चालत असल्याने त्यासाठी कोळसा अधिक लागत होता. त्यामुळे ती बंद करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपये खर्च आला आहे

निनाद Sun, 04/17/2022 - 16:08
पठाणकोट-जोगिंदर नगर, हिमाचल प्रदेश, कांगडा व्हॅली रेल्वे या नॅरोगेज सेक्शन या १६४ किलोमीटर अंतरावरील हेरिटेज ट्रेनमध्ये अत्याधुनिक एसी व्हिस्टाडोम कोच लाँच करण्यात आला आहे. ४० आसनी असलेली ही ट्रेन पठाणकोट येथून सकाळी ८:४५ वाजता सुरू होते आणि दुपारी १४.०० वाजता बैजनाथमधील पाप्रोला येथे संपते.

हेमंतकुमार Mon, 04/18/2022 - 09:37
छान. ….. वातानुकूलित डब्यांमधून पांघरुणे मिळणार अशी घोषणा होऊन महिना झाला आहे. पण सर्व गाड्यांमध्ये ती सोय झालेली नाही. परवा रात्री मी प्रवास केला तेव्हा एक तास आधी मला रेल्वेकडून संदेश आला, की ज्या गाड्यांमध्ये ती सोय झालेली आहे त्याचा तक्ता अमुक अमुक ठिकाणी बघावा. तिथे पाहिले असता काही मोजक्याच गाड्यांना ती सोय झाली असल्याचे दिसले. गाडीत चौकशी केली असता असे समजले की हळूहळू त्या कामाचे कंत्राटदार नेमणे चालू आहे.

हेमंतकुमार Sun, 04/24/2022 - 20:55
ईशान्य भारतातील Dooars हा एक सुंदर भाग आहे. तो रेल्वेतून छानपैकी पाहता यावा यासाठी एक विस्टाडोम गाडी अलीकडे सुरू झाली आहे. ती जलपाईगुडी ते अलीपूरदूर या स्थानकांदरम्यान शनिवार-रविवारी धावते.

हेमंतकुमार गुरुवार, 04/28/2022 - 12:04
डोंगराळ भागात narrow गेजवर धावणाऱ्या एकूण पाच ट्रेन्स भारतात आतापर्यंत आहेत : 1. शिमला कालका 2. दार्जीलिंग 3. माथेरान 4. निलगिरी 5. कांगडा दरी आता त्यांच्यात अजून तीन नव्या ट्रेनची भर पडणार आहे. या तिन्ही शिमला कालका मार्गावर धावतील. या गाड्या १२ महिने चालू नसतात. पावसाळ्यात दरडींचा धोका असला की त्या बंद करतात. माथेरानच्या ट्रेनचा मी दोनदा अनुभव घेतला आहे. शिमल्यात मात्र मी गेलो तेव्हा ती बंद होती.

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड गुरुवार, 04/28/2022 - 20:18
माथेरानची हल्लीच चौकशी केली तेव्हा कळले की तिची तिकिटे ऑनलाइन मिळत नाही, गाडी सुटायच्या पंचेचाळीस मिनिटे अगोदर काउंटरवरूनच मिळतात, असे का करत असतील देवजाणे, सांगणारा म्हणाला की नाही मिळाले तिकीट तर टॅक्सीन जाता येते, मनात म्हणले तिच्यासाठी तर जायचं माथेरानला, सोबतची बच्चेकंपनी अन त्याहून जास्त त्यांच्या बापाचा किती हिरमोड होईल रेलफॅन असल्यामुळे ते सांगणाऱ्याला माहिती नव्हते राव

In reply to by जेम्स वांड

हेमंतकुमार गुरुवार, 04/28/2022 - 20:47
खरं आहे. ते म्हणतात ना कोणाला कशाची चव काय ? असला हा प्रकार झाला. छोट्या ट्रेनचा प्रवास म्हणजे अक्षरशा झुक झुक गाडी असते. वाटेत आपल्याला वाटलं तर खाली उतरायचं, काही पावलं तिच्याबरोबर चालायचं अन परत आत जायचं... अशी गंमत जंमत मुलांना नक्कीच आवडेल.

In reply to by जेम्स वांड

कंजूस गुरुवार, 04/28/2022 - 22:21
आणि unreserved train झाल्याने रेल्वेचे NTES ,IRCTC apps नी टाइमटेबल दाखवणे बंद केले. Taxiवाल्यांनी राडा करून बंद पाडले.

हेमंतकुमार Fri, 04/29/2022 - 10:13
श्री. एन के सिन्हा हे मुंबईच्या रे रोड रेल्वे स्थानकाचे प्रमुख आहेत स्थानकाच्या स्वच्छता आणि अतिरिक्त सौंदर्यवर्धन यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात त्यांची मुलाखत इथे वाचता येईल .

निनाद Tue, 05/03/2022 - 09:02
मोदी सरकारने वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर मालवाहतूक गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे मालवाहतूक गाड्यांना भारताच्या लॉजिस्टिक प्रवासात त्यांचा बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी अधिक मार्ग मिळण्यास मदत होईल हाय-स्पीड वंदे भारत पॅसेंजर ट्रेन्सच्या फास्ट ट्रॅकिंगनंतर, भारतीय रेल्वे हाय-स्पीड मालवाहू गाड्या सुरू करण्यासाठी त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योजना बनवते आहे. ही योजना प्रामुख्याने ई-कॉमर्स कंपन्यांचे पार्सल वाहून नेण्यासाठी असणार आहे. या गाड्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत आणि यांचे लक्ष्य Amazon आणि Flipkart सारख्या कंपन्यांचे पार्सल वाहून नेण्याचे असेल. ही रेल्वे रस्ते वाहतुकीपेक्षा पेक्षा सुमारे अडीच पट वेगवान असेल. आणि काही सेक्टरमध्ये एअर कार्गो वाहकांशी देखील स्पर्धा अरेल असे दिसते आहे. सध्या भारतात धावणाऱ्या मालवाहू गाड्यांचा वेग सरासरी ७५ किमी प्रतितास आहे. तथापि, सादर करण्यात येणार्‍या नवीन गाड्या ताशी १६०किमी वेगाने धावतील. या गाड्यांचे प्रोटोटाइप यावर्षी डिसेंबरपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, सरकार त्यांना टप्प्याटप्प्याने दर महिन्याला एक अशा 'फ्रेट मेट्रो' द्वारे तैनात करेल. रेल्वेला देशातील मालवाहतूकीमध्ये एकूण बाजारपेठेच्या किमान ४० टक्के वाटा हवा आहे. त्यासाठी हा एक प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

फारएन्ड Tue, 05/03/2022 - 21:48
हा सगळा मालवाहतुकीबद्दलचा प्रोजेक्ट मीडिया मधे अंडररेटेड आहे. फारशी प्रसिद्धी नाही (अ-राजकीय व सरकारसमर्थक मिडियात सुद्धा). मी इथेच वरती "डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर" बद्दल लिहीले आहे. यू ट्युबवरही एक दोन जबरदस्त क्लिप्स आहेत. मालवाहतुकीत वेग व माल कोठे कधी पोहोचेल याबद्दल स्पष्टता दोन्ही यामुळे येइल. कमर्शियल शिपिंग मधे ते प्रचंड महत्त्वाचे असते व सध्याची मालवाहतूक ते देउ शकत नाही. या सुधारणांमुळे रेल्वेने केली जाणारी मालवाहतूक प्रचंड वाढेल, व यावर विसंबून राहू शकणार्‍या कंपन्यांची गुंतवणूकही भारतात होईल.

In reply to by फारएन्ड

निनाद Wed, 05/04/2022 - 09:20
हा सगळा मालवाहतुकीबद्दलचा प्रोजेक्ट मीडिया मधे अंडररेटेड आहे. फारशी प्रसिद्धी नाही असे का हे मला ही कळले नाही. कारण हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

In reply to by निनाद

लोकांना जे आवडतं तेच मीडिया दाखवते का मीडिया जे दाखवते तेच लोकांना बघावं लागतंय हे समजत नाही. परंतु भारतीय मीडिया बद्दल बहुतेक लोकांचं मत हे नकारात्मकच आहे. दुसरा पर्याय नाही म्हणूण मीडिया जे दाखवते तेच गोड म्हणुन बघावं लागतंय. सध्यातरी असल्या बातम्या मिडियावर जास्त येत नाहीत आणि आल्या तरी त्यात बातमी कमी आणि मसाला जास्त असतो.

हेमंतकुमार Wed, 05/04/2022 - 10:39
नांगल ते भाकरा धावणाऱ्या ट्रेनच्या प्रवासाला कुठलेही तिकीट नाही. चक्क फुकट प्रवास !! ही गाडी चालवण्याचा हेतू भाकरा नांगल धरणाविषयी सर्वांना माहिती व्हावी हा आहे. 73 वर्षे हा मोफत उपक्रम चालू आहे ok

हेमंतकुमार गुरुवार, 05/05/2022 - 14:44
आपल्या प्रवासाची रेल्वे विजेवर चालली आहे की डिझेल व त्यानुसार आता प्रवासी भाड्यात भेदभाव केला जाणार आहे ! लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या निम्म्याहून अधिक अंतरासाठी डिझेल वापरतात त्यांच्यावर आता अतिरिक्त कर लावला जाणार आहे - पन्नास रुपये वातानुकुलित वर्ग; पंचवीस रुपये स्लीपर.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे Fri, 05/06/2022 - 11:55
या निर्णयाला कोणताही तर्कपूर्ण आधार नाही. कुणातरी रेम्याडोक्याच्या डोक्यात आलेली आचरट कल्पना आहे. तुमच्या गावाला डिझेलवर चालणारी गाडी येते कि विजेवर याचा ग्राहकाशी काय संबंध? विद्युतीकरण हे रेल्वेने इतकी वर्षे केले नाही याचा भुर्दंड तेथल्या ग्राहकांना लावणे हे तर्कशून्य आहे. विद्युतीकरणा साठी अधिभार लावायचा तो सरसकट लावावा. मुम्बैत विद्युतिकरण१९२५ पासून आहे तर मराठवाड्यात अजूनही गाड्या डिझेलवर चालतात यात मुंबईच्या माणसांचे काय कर्तृत्व आहे आणि मराठवाड्यातील माणसांचे काय चूक आहे?

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार Fri, 05/06/2022 - 12:04
पूर्णपणे सहमत आहे ! त्या बातमीनुसार दोन मुद्दे आहेत १. तेलाच्या वाढलेल्या जागतिक किमती २. नवा जो अधिभार लावत आहेत त्यातील काही वाटा विद्युतीकरण योजनेसाठी वापरणार आहेत म्हणे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार Fri, 05/06/2022 - 12:22
फक्त यातील दिलासादायक गोष्ट अशी दिसते आहे की हे लांब पल्ल्याच्या गाड्यांनाच लागू आहे. म्हणजेच, अविकसित भागातील जो माणूस लघुपल्ल्याचा प्रवास डिझेलवर करेल त्याला तो अधिभार असणार नाही. हे योग्य आहे.

हेमंतकुमार Fri, 05/06/2022 - 11:15
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिले वातानुकूलन 1934 मध्ये फ्रंटियर मेलला देण्यात आले. तेव्हाची तांत्रिक पद्धत मजेदार होती. डब्यांच्या खाली मोठाल्या बर्फांच्या विटा सरकवरण्यात येत : ok

जेम्स वांड Fri, 05/06/2022 - 12:54
चालत्या रेल्वेत सकाळी ०६०० ते रात्री २२०० ह्यावेळेच्या व्यतिरिक्त तिकीट तपासनीस तुमचे तिकीट तपासणे किंवा तुमचे आयडी प्रूफ मागणे इत्यादी (तुम्हाला झोपेतून उठवून) करू शकत नाहीत. मिडल बर्थ वरून होणाऱ्या खडाजंगीत पण निर्णय हा आहे की रात्री २२०० ते सकाळी ०६०० वाजेपर्यंत मिडल बर्थ आरक्षित प्रवाशाला झोपण्यास मनाई केली जाऊ शकत नाही, पण सकाळी ठराविक वेळेनंतर त्या प्रवाशाने मिडल बर्थ बंद करून खालील (लोवर) बर्थ असणाऱ्या मंडळीला बसण्यास सुविधा होईल असे करणे अपेक्षित आहे.

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Sat, 05/07/2022 - 21:15
Ask Disha आहे। पण करून पाहिले नाही. तो कर्मचारी असेल एखाद्या फलाटावर/पुलावर . पण काही स्टेशनात पाच सहावर लांबलचक फलाट असतात. कोच पोझिशन चार्ट तयार झाल्यावर या साईटसवर दिसतो म्हणतात. करून पाहा. 1) https://www.irctchelp.in/train-coach-position/ 2) https://www.trainspnrstatus.com/train-coach-position

हेमंतकुमार गुरुवार, 05/12/2022 - 16:52
भारतातील वेगवान ट्रेन्ससाठी नव्याने RRTS या पद्धतीचे डबे बनवण्यात आले आहेत. असे पहिले डबे आता दिल्ली ते मीरत या मार्गावर लवकरच धावतील. या डब्यांमध्ये असलेल्या अत्याधुनिक सुखसोयी इथे वाचता येतील.

In reply to by हेमंतकुमार

बोका गुरुवार, 05/12/2022 - 22:30
RRTS हा डब्यांचा प्रकार नसुन एक मेट्रो सारखा प्रकल्प आहे. यात एक नवीन रेल्वे मार्ग दिल्ली ते मीरत दरम्यान बनवला जात आहे. गाड्या, सिग्नल यंत्रणा वगैरे सर्व नवीन आधुनिक असेल. दिल्ली- अल्वर, दिल्ली- पानिपत असे इतरही नवे मार्ग बनवणार आहेत. मुंबैत कारशेड बनत नाही अजुन.

हेमंतकुमार Sun, 05/15/2022 - 13:45
आईबरोबर प्रवास करणाऱ्या छोट्या मुलांसाठी रेल्वेने बेबी बर्थ योजना नुकतीच सुरू केली आहे. या विशिष्ट प्रकारच्या बर्थची संरचना नंदुरबारच्या नितीन देवडे यांनी केलेली आहे. कोविड काळात त्यांनी हे महत्त्वाचे काम केले. आता प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही सोय केलेली आहे. परंतु, या प्रकारात बाळाला बाहेरच्या बाजूस झोपायचे असल्याने काही लोकांनी शंका उपस्थित केली आहे. बाळ आपल्या बाजूला ठेवता येईल अशी काहीतरी रचना करता येईल का, यावर विचार व्हायला हवा.

हेमंतकुमार Sun, 05/22/2022 - 05:29
दिल्ली अंबाला या मार्गावरील एका स्थानकात रेल्वेची सामान्य तिकीट विक्री व्यवस्थाच थांबल्याने इथून बसणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने विनातिकीट प्रवास करावा लागत आहे ! मात्र पुढच्या काही स्थानकांवर उतरल्यानंतर विनातिकीटचा दंड वसूल केला जातो….

हेमंतकुमार Fri, 05/27/2022 - 08:31
काहीही चांगले निर्माण केलं की काही दिवसातच आपण त्यासाठी आपली लायकी नाही हे सिद्ध करतो..... दगडफेकीमुळे ‘एसी’ लोकलचे वारंवार नुकसान ; तीन-चार महिन्यांत २३ घटना https://www.loksatta.com/mumbai/stone-pelting-shatters-23-ac-local-windows-in-last-4-month-zws-70-2945703/

हेमंतकुमार Sun, 05/29/2022 - 17:33
दोन दिवसांपूर्वी मी सह्याद्री वाहिनीवर ‘दास्तान-ए- बडी बांका’ या नावाचा मुंबई विषयक सुरेख मराठी कार्यक्रम पाहिला. हा द्विपात्री प्रयोग आहे- एक पुरुष तर एक स्त्री निवेदक. गेल्या पन्नास वर्षातील मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीचा सुरेख धांडोळा त्यात घेतला आहे. काही वाक्ये डोळ्यांच्या कडा ओलावतात. या कार्यक्रमात मुंबईतील लोकल्समधल्या जीवनाचा सुंदर आढावा घेतला आहे. लोकलमध्ये एका स्त्रीने चालवलेले सौंदर्यवर्धनगृह, तृतीयपंथी व्यक्तींना छानपैकी साडी नेसून देण्याचे कृत्य इत्यादी गोष्टी रोचक वाटल्या.

हेमंतकुमार Tue, 05/31/2022 - 08:58
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढील पन्नास वर्षातील रेल्वे कशी प्रगत होईल याचा सुरेख आढावा घेणारा एक लेख इथे. काही रोचक मुद्दे : १. ३०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी चालकरहित ट्रेन चीनने विकसित केली आहे. जपानही या क्षेत्रात प्रगती करीत आहे. सुरुवातीस ही सेवा बंदिस्त मार्गावर मालगाड्यांसाठी वापरतात. प्रवासी वाहतूक करण्यापूर्वी सुरक्षिततेचा गांभीर्याने विचार करावा लागेल. २. पायाभूत सुविधांच्या दैनंदिन देखभालीसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर ३. सन 2050 पर्यंत डिझेल इंजिनचा पूर्णपणे त्याग करण्याचा निर्धार. सध्या फक्त स्वित्झलँड मध्ये रेल्वेमार्गांचे जवळजवळ 100 टक्के विद्युतीकरण झालेले आहे. ४. काही भागांमध्ये पूर्ण विद्युतीकरण करणे शक्य नसल्यास battery तंत्रज्ञानाचा वापर ५. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरातून ‘प्रवासाचे तिकीट काढणे’ आणि अनुषंगिक गोष्टी पूर्णपणे रद्द करणे. प्रवास केला की आपल्या खात्यातून परस्पर पैसे वजा होतील !

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे Tue, 05/31/2022 - 20:25
सन 2050 पर्यंत डिझेल इंजिनचा पूर्णपणे त्याग करण्याचा निर्धार. भारताला १०० % विद्युतीकरण शक्य आहे आणि त्या दिशेने जोरात वाटचाल चालू आहे. सध्या ८० % रेल मार्ग विद्युतीकरण पूर्ण झालेले आहेत. परंतु भारताच्या दोन सीमांवर कायम कटकटी करणारे शत्रू असल्यामुळे भारताला डिझेलचा त्याग करणे नजीकच्या भविष्यात शक्य नाही. कारण एक तर विजेचे कर्षण ( TRACTION) स्टेशन वर हल्ला झाला तर ते बंद पडू शकते. याने तेवढी रेल्वे लाईन बंद पडेल याशिवाय विजेच्या ग्रीडवर सायबर हल्ला झाल्यास संपूर्ण ग्रीड कोसळू शकते. https://www.hindustantimes.com/india-news/chinese-hackers-targeted-7-indian-power-hubs-govt-says-ops-failed-101649356540330.html अशा आणीबाणीच्या स्थितीत लष्करी सामग्री पोचवण्याचा दृष्टीने भारत १०० % विद्युतीकरण झाले तरी नजीकच्या काळात डिझेल इंजिनांचा त्याग करेल अशी सुतराम शक्यता नाही.

हेमंतकुमार Wed, 06/01/2022 - 17:38
ok बातमी एखाद्याला पटकन वाटेल की या गृहस्थाला रेल्वेकडून दंड अधिक व्याज मिळून एवढी मोठी रक्कम मिळणार आहे ! तसे अजिबात नाही. २.९८ लाख लोकांना मिळून होणारी ती भरपाई आहे.

हेमंतकुमार Fri, 06/10/2022 - 19:03
* कर्जत ते पनवेल हा नवा 30 किलोमीटर लांबीचा उपनगरी लोहमार्ग तयार करण्याचे काम चालू. हा पूर्ण झाल्यानंतर मुंबई कर्जत प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल. * पुणे स्थानकावरील सर्व सहा फलाटांना जोडणारा सर्वात जुना पूल (1925 चा) आता जमीनदोस्त करण्याचे ठरले आहे. आता या पुलाचे आयुष्य संपल्याचे लेखापरीक्षणात आढळले आहे. बातमी

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Fri, 06/17/2022 - 09:31
तो वाढवणार. मालगाड्या घाटमार्गाने जाण्यासाठी क्यूमध्ये टाकून ठेवायची सोय वांगणी येथे केली आहेच. पळसधरीलाही करतील.

In reply to by कंजूस

गामा पैलवान Fri, 06/17/2022 - 14:42
एकेरी मार्ग हा अत्यंत दळभद्री प्रकार आहे. नवा मार्ग टाकतांनाच दुहेरी टाकायचा असतो. काहीतरी खुसपट काढून एकेरीच टाकतात ही अतिशय भिकारडी वृत्ती आहे. कोकण रेलवेतही तेच. म्हणे पैसे नाहीत. तिच्यायला कोकण रेलवे तर कर्जरोखे काढून बांधली होती. मग पैशाची अडचण यायला नको. पण एकदा वृत्तीच भिकारडी म्हंटली की दळभद्रीपणासाठी सबबी हजार मिळतात. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रसाद_१९८२ Fri, 06/17/2022 - 15:12
एकेरी लाईन टाकली ती टाकली, किमान मोठे बोगदे व पुल तरी दुहेरी मार्गासाठी बनवायचे होते. आज त्या मार्गावर संपूर्ण नविन बोगदे व पुल बांधायला परत किती खर्च करावा लागेल.

In reply to by प्रसाद_१९८२

कानडाऊ योगेशु Sun, 07/03/2022 - 14:33
खर्च व्हावा हिच इच्छा असेल तर! सोलापुरातले एक उदाहरण देतो. सोलापूरात कंबर तलावाजवळ रेल्वे फाटक आहे. रेल्वे येण्याजाण्याच्या वेळी ही तोबा गर्दी व्हायची. मग उड्डाण पूल बनवला. काही महिन्यांनी उड्डाणपूलचे रूंदीकरण केले गेले. पुन्हा काही महिन्यांनी रेल्वेची दुहेरी लाईन येणार होती म्हणुन तो पूल पुन्हा पाडुन रेल्वेच्या दुपदरीकरणानुसार त्याचा विस्तार केला. हे सगळे इन मीन २ ते ३ वर्षात झाले. आणि त्या मार्गावरुन जाणार्य येणार्या सर्व रहिवाश्यांना ह्यात प्रचंड पैसा खाल्ला गेला आहे हे उघड गुपित माहिती होते.

In reply to by गामा पैलवान

कंजूस Fri, 06/17/2022 - 16:50
को.रे ही बोगदे काढून सुरू करणे यालाच प्राधान्य होते ते मालवाहतुकीसाठी. त्यामार्गे प्रवासीही नेता येतात हे दुय्यम होते आणि आजही आहे. मालगाडीस वेळ लागला तरी चालतो. त्या मालगाड्यांमुळेच प्रवासी गाड्यांना उशीर होतो. मुंबई गोवा मार्ग १९८५ सालीच ३+३ झाला असता तर बसेस कशाला घाटावरून गेल्या असत्या?

हेमंतकुमार Fri, 06/17/2022 - 07:41
आता चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीट होणार confirm. https://www.tarunbharat.net/Encyc/2022/6/16/railway-ticket-confirmed.htmlhttps://www.tarunbharat.net/Encyc/2022/6/16/railway-ticket-confirmed.html ... याची अंमलबजावणी व्हावी ही इच्छा.

जेम्स वांड Fri, 06/17/2022 - 07:52
कर्जत ते पनवेल हा नवा 30 किलोमीटर लांबीचा उपनगरी लोहमार्ग तयार करण्याचे काम चालू. हा पूर्ण झाल्यानंतर मुंबई कर्जत प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल.
म्हणजे आता हार्बर लाईन वर तुफान भाऊगर्दी होणार, सीएसएमटी वरून सुटणाऱ्या कर्जत गाड्यांत चढण्याची सोय नसेलच जसे वेस्टर्नला विरार फास्टला अंधेरी पब्लिक चढू शकत नाही तसेच

जेम्स वांड Fri, 06/17/2022 - 07:56
इतका खर्च करून शिवडी न्हावाशेवा (चिर्ले) ब्रिज बांधला जातोय तर तो फक्त व्हेईकल ब्रिज का ? चिरल्या पासून सुरू होणार पूल शिवडीत प्रॉपर स्टेशनजवळ उतरतो आहे की, एखाद लाईन लोकल (अप आणि डाऊन) टाकली असती सोबत रेल ब्रिज टाकून तर मजा आली असती (वाशी पुल अन वाशी रेल्वे पूल जसे समांतर आहेत तसे)

In reply to by जेम्स वांड

कंजूस Fri, 06/17/2022 - 09:38
बंदरं ही मोठी वाहतुक करण्यासाठी असली तरी जोडरस्ते लागतातच. कंटेनर पद्धतीने बंदरामध्ये बोट उभी करून मालाची चढउतार करण्याचा वेळ खूप कमी झाला. पण पुढे काय? ती गती वाढत नाही.

जेम्स वांड Fri, 06/17/2022 - 08:15
कुर्ला ईस्टला कैक वर्षांपासून कसल्यातरी अजस्त्र फ्लायओव्हर टाईपचं बांधकाम सुरू आहे, वाशीकडून वडाळ्याला जाताना डावीकडे दिसते हे बांधकाम, वडाळा किंग्ज सर्कल मध्ये जसा रेल्वे उड्डाणपूल आहे तसे काहीतरी वाटते पण प्रचंड अवाढव्य, ते नेमके कश्याला बांधतायत ते काही कळायला मार्ग नाही तिच्यायला !

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Fri, 06/17/2022 - 09:45
कर्जत - पनवेल - दिवा - कल्याण गेल्याने गाडीचे एंजिन पुढेच ठेवता येते. आणि मालगाड्या वाढल्या आहेत.

हेमंतकुमार Sat, 06/18/2022 - 18:19
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ट्रेनमध्ये अन्नपदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी आत्ताच आकाशवाणीवर ऐकली. आता ट्रेन मध्ये दिले जाणारे खाद्यपदार्थ संबंधित स्थानकांवर तयार होतील. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय झालेला आहे

हेमंतकुमार Wed, 06/29/2022 - 14:36
काल अमेरिकेतील मिसुरीमध्ये एका ट्रेनने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला आहे त्या क्रॉसिंगवर रेल्वे फाटक तर नाहीच पण सावध करणारे दिवे सुद्धा नाहीत हे वाचून आश्चर्य वाटले.

हेमंतकुमार Fri, 07/01/2022 - 17:39
ट्रेनच्या प्रवासी डब्यांना दिलेले वैयक्तिक क्रमांक हा कुतूहलाचा विषय बरेच दिवस मनात होता. जरा वाचन केले असता खालील माहिती मिळाली: अलीकडे नवे डबे आल्यापासून त्या सर्वांना सहा अंकी क्रमांक दिला जातो (पूर्वी तो चार किंवा पाच अंकी असायचा). या सहा अंकीचा अर्थ असा असतो : 201150 • पहिले २ अंक : डबा उत्पादनाचे वर्ष २ अंकात. 20 = 2020 • तिसरा अंक : रेल्वे विभाग 1 ( मध्य, इ.) • शेवटचे ३ अंक : डब्याची विशिष्ट श्रेणी (उदा. १५० = 3AC) • अंकांच्या पुढे / या नंतर अक्षर असल्यास : अन्य तांत्रिक माहिती उदा. 201150/C

हेमंतकुमार Sun, 07/03/2022 - 11:51
चहाचा कप ७० रुपये ! शताब्दी किंवा राजधानीने प्रवास करायचा असेल तर तिकिटांचे आरक्षण करतानाच खाण्यापिण्याच्या सर्व पदार्थांचे आरक्षण करणे आवश्यक आहे. तसे न करता प्रवासात निव्वळ चहा जरी मागवला तर ..... कपभर चहा 20 रुपये + जीएसटी 50 रुपये = 70 रुपये द्यावे लागतात….. (२०१८ मधील परिपत्रक) https://kalingatv.com/offbeat/passengers-pays-rs-70-for-tea-in-during-journey-train-indian-railway-has-the-perfect-explanation/

In reply to by हेमंतकुमार

कंजूस Sun, 07/03/2022 - 12:26
काही लोक प्रवासात फक्त बिस्किटे आणि केळी खातात. म्हणून त्यांनी खाद्यपदार्थ विरहीत तिकिटांची मागणी केली होती राजधानी, शताब्दीसाठी. पुणे - दिल्ली दर्शना एक्सप्रेस 12493साडे एकोणीस तासांत ( १५५५ रुपयात ३एसी)नेते म्हणजे इतर गाड्यांना जेवण नाश्ताचे आणखी १५०० रु घेतात.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Sun, 07/03/2022 - 12:48
मी एकदा पुणे सिकंदराबाद शताब्दीच्या बेक्कार जेवणाचा अनुभव घेतला होता. त्यानंतर काही दिवसातच जेवणविरहित तिकीट काढायची सोय झाल्याने मला फार छान वाटले होते.

In reply to by हेमंतकुमार

कंजूस गुरुवार, 07/07/2022 - 13:31
गाडीची सुटण्याची वेळ कशी आहे हे पाहून नंतर दोन तीन तासांनी जेवण हवे असेल तर अगोदरच स्टेशनाबाहेरच्या बऱ्या हॉटेलातून एक पार्सल बांधून घेतो. म्हणजे एका जेवणाचा प्रश्न सुटतो. फलाटांवर मिळणारी केळी बरी नसतात. ती घेऊन ठेवतो. एक मोठा ब्रेड घेतोच. जाम असतो. बटरचा भरोसा नसतो, वितळते . दक्षिणेकडच्या गाड्यांत मात्र कॉफी, नाश्ता चांगला मिळतो.

In reply to by कंजूस

हेमंतकुमार गुरुवार, 07/07/2022 - 14:08
मी देखील. वरील शताब्दीच्या बाबतीत सकाळी मिळणारा अल्पोपहार चांगला असायचा (काहीसा ब्रिटिश पद्धतीचा). परतीच्या प्रवासात संध्याकाळचे जेवण मात्र बरोबर नसायचे

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार Wed, 07/20/2022 - 12:13
लोकांच्या नाराजीनंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने अन्यायकारक नियम रद्द केला आहे (G S T). आता सर्वांना चहा कॉफी त्यांच्या मूळ किमतीतच घेता येतील.

In reply to by गामा पैलवान

जेम्स वांड गुरुवार, 07/21/2022 - 12:54
कॉमन डिझाईन असू शकते, आपल्याकडे डब्ल्यु डी जी 6ए ही सहा हजार अश्वशक्ती वर आधारित मालगाडी ओढण्याची इंजिने तसली आहेत ह्यात केबिन साईडला शॉर्ट हूड फॉरवर्ड अन एक्झॉस्ट साईडला लॉंग हूड फॉरवर्ड कॉन्फिग्यूरेशन म्हणले जाते. ही इंजिने मुळात अमेरिकन जनरल इलेक्ट्रिक कंपनीने विकासित केलेली असून तिचे सुरुवातीचे दोन नमुने भारतीय रेल्वेजनं अमेरिकेतून आयात करून उरलेले इंजिन्स भारतात तयार करायचा तंत्रज्ञान हस्तांतरण करार केला होता जनरल इलेक्ट्रिक सोबत. सध्या उत्तर रेल्वेच्या रोझा लोकोशेड मध्ये अशी २५ आणि पश्चिम रेल्वेच्या गांधीधाम लोकोशेड मध्ये ३७ इंजिने कार्यरत आहेत व उरलेली इंजिने मनोरवा, बिहार इथे उत्पादित केली जात आहेत .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार Fri, 07/08/2022 - 10:04
यात नवप्रज्ञेच्या तंत्राचा वापर करून आभासी अद्भुत जागतिक सफर घडवली जाते असे साधारण वाटते.

In reply to by हेमंतकुमार

सुक्या Mon, 07/11/2022 - 09:41
कमाल आहे. हे जर अहमद्नगर जिल्ह्यातील श्रीरामपुर गावातले रेल्वे स्थानक असेल तर मग कमाल आहे. गाव श्रीरामपुर असले तरी रेल्वे स्टेशन मात्र बेलापुर म्हणुन ओळखले जाते. मात्र प. बंगाल मधे हावडा जवळ (हावडा - वर्धमान) एक श्रीरामपुर नावाचे रेल्वे स्टेशन आहे. ती पहीली पाटी पण बंगाली भाषेत आहे. तेव्हा हा मला एक स्पूफ वाटतो आहे. केवळ नाम साधर्म्य साधुन केलेला विनोद!!