मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भोग

मृत्युन्जय · · जनातलं, मनातलं
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही. या आपत्तींसाठी इतरही काही असामी जबाबदार आहेत. माझी ही आतडी पिळवटुन टाकणारी, हृदयाचा थरकाप उडवणारी दर्दभारी कहाणी नक्की कशाशी निगडीत आहे असा (तुम्ही अजुन वाचत असाल तर) प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी सस्पेंस अजुन लांबवत नाही. मी माझ्या हिंदी चित्रपट बघण्याच्या दैदीप्यमान कारकीर्दीबद्दल बोलतो आहे. मी पोटात असताना आई बाबा पिक्चर पहायला गेले होते. त्याकाळी जोडप्या जोडप्याने चित्रपट पहायची पद्धत फारशी प्रचलित नसल्याने बरोबर आज्जी देखील होती. चित्रपट होता अब्दुल्ला. राज कपूर्, संजय खान, संजीव कपूर, झीनत अमान, परवीन बाबी, डॅनी, मेहमूद अशी भलीमोठी स्टारकास्ट होती त्याची. पण चित्रपट तद्दन राडा असणार कारण मध्यंतरात आज्जीने आईला अश्या वेळेस असले पिक्चर बघु नयेत, याला (म्हणजे पिताश्रींना) बसु देत बसायचे असेल तर असे सांगुन बाहेर काढले. आईने तो चित्रपट अर्धवट सोडला आणि बहुधा त्याची भरपाई मी अजुनही तसलेच किंवा त्यापेक्षाही रद्दड चित्रपट बघुन करतो आहे. मी थेटरात जाउन, दिडक्या मोजुन मनस्ताप विकत घेतल्याची बरीच उदाहरणे आहेत. प्लॅटफॉर्म (अजय देवगण फेम), मृत्युदाता (अमिताभ बच्चन, करिष्मा कपूर), गायब (तुषार कपूर - अंतरा माळी), जानी दुष्मन (सोनु निगमचे "जावेद भाई सो रह्यले है" हे अतिशय श्रवणीय गीत असलेला चित्रपट), हाउसफुल्ल (अक्षय कुमार), अ‍ॅक्शन रिप्ले (परत अक्षय कुमार), तेहेलका (शक्तिमान, धरमपाजी, नसरुद्दीन शाह आणि पल्लवी जोशी फेम), एकलव्य (हा ऑस्करला गेला?), हम तुम्हारे है सनम (रुकरुक खान), होगी प्यार की जीत (अजय देवगण, अर्शद वारसी आणि बहुधा नेहा आणि मयुरी कांगो), इतिहास (अचको मचको का असेच काहीतरी गाणे होते या चित्रपटात. अभिनित (????) ट्विंकल खन्ना आणि अजय देवगण (आत्ता कळाले ना प्रश्नचिन्ह का होते ते), शपथ (जॅकी, मिथुन), सौगंध, घर घर की कहानी . यादी संपता संपत नाही. यातले काही चित्रपट तर मला खात्री आहे की त्या चित्रपटात काम करणार्‍या सो कॉल्ड अभिनेत्यांनी देखील् बघितले नसतील. प्लॅटफॉर्म तर मी ऐकुन आहे की थेटरात जाउन संपुर्ण बघुन आजघडीला जिवंत असणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. यातले दोन अभागी महाभाग मला माहिती आहेत. एक मी आणि दुसरा माझ्याबरोबर् चित्रपट बघणारा माझा चुलत भाऊ. प्लॅटफॉर्म मला २०.५० रुपयांचा मनस्ताप देउन गेला (यात पिक्चर संपल्यानंतर खाल्लेल्या २ क्रोसिनच्या गोळ्यांचा हिशोब देखील धरला आहे). मृत्युदाता बघणारे देखील असे फार कमी लोक सापडतील. अमिताभ ला खात्री होती की किमान घरचे लोक तरी बघतील. त्यातला अभिषेक करिष्मा कपूरशी ताजे ताजे फाटलेले असल्यामुळे कटाप झाला. मी तो माझ्या मामेभावाच्या मामाबरोबर त्याच्या पैशाने बघितला (एकुण या पिक्चरने असाही बर्‍याच लोकांचा मामा केला आहे). गायब डोक्यात तिडीक जाण्याइतपत बोर होता. पण तिकिटं मी काढली होती आणि शेवटपर्यंत जर बसलो नाही तर मित्र त्यानंतर कधीही त्या तिकिटांचे पैसे देणार नाहीत हे माहिती असल्यामुळे मी मुकाट बसलो. मी आधी निघुन गेलो तर बरेच आहे पैसे वाचतील असा सुज्ञ विचार करुन मित्र सुद्धा बसुन राहिले. हाउसफुल्ल मी शेवटपर्यंत बघितला कारण शेवट होइपर्यंत हसता येइल असा एकतरी जेन्युइन विनोद असेल अशी मला वेडी आशा होती. नाही म्हणायला चित्रपटात दीपिका, जिया खान आणि लारा दत्ता यांनी दृष्ट लागेल असा परफॉर्मन्स दिला आहे. (म्हणजे काय हे डिटेलात विचारु नका. समझने वाले को इशारा काफी है). जानी दुष्मन डझनावारी हिरो नक्क्की काय करणार आहेत असा विचार करत करत पाहिला. हम तुम्हारे है सनम "गले मै लाल टाई" नावाचे अति भारी गाणे ऐकुन आणि बघुन देखील पुर्ण बघितला. शपथ मध्ये त्यातल्या २ हिरोईनी दर तिसर्‍या मिनिटाला कपडे काढत असुनही बघितला (म्हणुनच बघितलास असा टोमणा काही लोक मारतात त्यांना मी योग्य जागी मारतो). अ‍ॅक्शन रिप्ले ३७ व्या वर्षीदेखीले अ‍ॅश किती सुंदर दिसते हा विचार करता करता संपला. या लिस्टमधले होगी प्यार की जीत, इतिहास, सौगंध, प्यार का मंदीर, घर घर की कहानी आणि तेहेलका हे सगळे पिक्चर थेटरात बघणारा या पृथ्वीतलावरचा मी एकमेव प्राणी आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण ........ पण... मी हे सगळे चित्रपट पुर्ण बघितले. स्टार्ट टु एंड. दुनिया मै आये हे तो जीनाही पडेगाच्या धर्तीवर पैसे देके ति़कीट खरीद्या है तो पाहनाही पडेगा असा सुज्ञ विचार करुन असेल कदाचित. मात्र एक चित्रपट असा आहे की जो मी महत्प्रयासानेदेखील पुर्ण बघु शकलो नाही. चित्रपटाचे नाव आहे सावरिया. रणबीर कपूर, सोनम कपूर, सलमान खान, रानी मुखर्जी असली तगडी स्टारकास्ट असुनदेखील, बॉलीवॉडच्या स्वयंघोषित स्टीवन स्पीलबर्ग संजय भन्साळी ने दिग्दर्शित केलेला असुनदेखील आणि पडेल चित्रपट सोशिकपणे आणि निमुटपणे पुर्ण बघण्याचा दैदीप्यमान इतिहास माझ्या पाठीशी असुनदेखील मी हा चित्रपट थेटरात पुर्णपणे बघितलेला नाही आहे. वास्तविक आम्ही जयपुरला होतो. तिथले राजमंदिर हे भारतातले सगळ्यात उत्तम चित्रपटगृह आहे. मोठा पडदा, उंची गालिचे, आरामदायक खुर्च्या असे सगळे असुनसुद्धा मी सावरिया अर्धा सोडुन परतलो. सुरुवातीपासुनच सावरिया मध्ये अंधार अंधार असतो. रणबीर कपूर अचानकपणे एका गावात टपकतो. पुलावर (पुलाखाली नाही) सोनमला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. मग पाठलाग करणे वगैरे ओघाने आलेच. हा सगळा वेळ निळा आणि काळा रंग अगदी डोक्यात जातो. दुसरा रंगच नाही. गाव तर असले भारी असते की तिथे सोनम होडीतुन ये जा करत असते (भारतातले कुठले गाव म्हणे हे). आजुबाजुला मोट्ठाले मुखवटे लावलेले असतात. १९५६ सालच्या चित्रपटांप्रमाणे सेट लावले आहेत हे जाणवुन येत असते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रणबीर, सोनम आणि राणि आलटुन पालटुन अगम्य भाषेत बडबड करत असतात. रणबीर अधुन मधुन चेहेर्‍यावर कमालीचे मंद भाव आणुन चेहेरा हलवत असतो. त्याच्या मनासारखे घडल्याचे ते द्योतक असते (हे आपण समजुन घ्यायचे). दुर्दैवाने आपल्या मनासारखे काहीच घडत नसते. मी बराच वेळा सोसले. रणबीर कपूर कधीतरी मध्येच टॉवेल गुंडाळुन नाचतो आणि तो टॉवेल खेळवत काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ते मात्र मला असह्य झाले. अर्रे आम्ही काय तुला कपडे काढलेले पहायला आलोय का? तु म्हणजे काय जॉन अब्राहम आहेस का? म्हणजे जॉन अब्राहमने कपडे काढले तर मी बघायला जाइन असे नाही. पण त्याच्याकडे किमान बॉडी शॉडी आहे. याच्याकडे काय आहे . पिचपिचीत दंड? आणि काहीही कसेही असेल तरी आम्हाला काय उपयोग? मी आपली वेडी आशा बाळगुन होतो की रणबीर पासुन सोनम पण काही प्रेरणा घेइल. न पेक्षा किमान राणी मुखर्जी तिच्या भूमिकेला जागुन (चित्रपटात तिने वेश्येची भूमिका केली आहे) एकदा तरी टॉवेल नाचवेल. पण असे काहीही झाले नाही. क्षणाक्षणाला माझ्या संयमाचा बांध सुटत गेला. तो निळा काळा रंगा माझ्या डोळ्यात खुपत राहिला. सोनम आणि रणबीर अशक्य बोर मारत राहिले. त्यात कहर म्हणजे चित्रपटभर निवेदन राणी मुखर्जीचे होते. निवेदन - राणी मुखर्जीच्या आवाजात? अहो तिचा आवाज एरवीदेखील सहन होत नाही हो (तिच सहन होत नाही खरे म्हणजे). राणी मुखर्जी जर निवेदन करु शकत असेल तर कदाचित भन्साळीच्या पुढच्या चित्रपटात मी नायक असु शकतो याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. अखेर एका प्रसंगात रणबीर कपूर सोनमला घेउन सिटी टॉवर मध्ये जातो (दोस्तोव्हस्कीच्या मूळ कादंबरीत सिटी टॉवर आहे म्हणुन इथे पण असतो. कदाचित त्याच्या कादंबरीत नायिका होडी ने ये जा करत असते म्हणुन ती इथे पण करते.). आणि तिथे सोनम दुसर्‍याच कोणाच्या (म्हणजे सलमान खानच्या) प्रेमात पडली आहे आणि त्याचा ती रोज पुलावरं 'इंतजार' करत असते असे सांगुन त्याचा पचका करते (पर्यायाने आपला कारण आपण अंधार, एकांत, २ तरूण जीव या सगळ्याची गोळाबेरीज करुन काहीतरी 'वेगळेच' घडण्याची अपेक्षा करत असतो ना). प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेचा एक ट्रिगर पॉइंट असतो. या विवक्षित क्षणी माझ्या सहनशीलतेच्या सर्व मर्यादा संपल्या. २००७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात एक अघटीत घटना घडली आणि मी आयुष्यात पहिल्यांदा आजुबाजुला न बघता ताडकन उठुन चित्रपटगृहाबाहेर चालता झालो. त्याच्या आधी आणी त्याच्यानंतर अजुनपर्यंत हा योग आलेला नाही. मी जाण्या आधी अर्धे थेटर रिकामे झाले होते. काही महाभाग अजुनही बसले होते त्यांनी चित्रपट पुर्ण बघितला असण्याची काही शक्यता नाही. त्यातले बरेच जण ५० रुपयात (हो हो तिकीट दर खुपच कमी होते) ३ तास एसीत बसण्याच्या अपेक्षाने आले असावेत. त्यांनी निवांत झोप काढली असावी. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार नंतर प्रेक्षकांना असे बरेच बोर करुन झाल्यावर आणि सलमान खानची पुलावर बरेच दिवस वाट बघितल्यावर सोनमला रणबीर कपूरच्यी प्रेमाची साक्ष पटते आणि ती पण त्याच्यावरच्या प्रेमाचा इजहार करते. आणि सरतेशेवटी सलमान पुलावर टपकतो. सोनमची परत एकदा द्विधा मनस्थिती होते पण ती तरीही सलमान बरोबर निघुन जाते आणि आपला टॉवेल हीरो एकटा पडतो. कहानी खतम. मला खात्री आहे दोस्तोव्हस्की ने कथा एवढी खराब लिहिली नसावी. पण भन्साळीने त्याची पार वाट लावली आहे. सर्वाकलीन अंधारमय वातावरण, वास्तवाच्या पल्याडले सेट्स, भयाण प्रकाशयोजना, राणी मुखर्जीचे निवेदन, सलमानचे कधीही केव्हाही प्रकटणे आणि तो सोनमच्या बापाच्या वयाचा वाटत असतानाही तिला तो आवडणे वगैरे सगळ्याचे गोष्टी तिडीक आणतात. चित्रपट बघितल्याव माझी अवस्था 'भय इथले संपत नाही' अशी झाली होती. त्यानंतरही असले भयाण अनुभव माझ्या वाट्याला आलेच. हाउसफुल्ल, अ‍ॅक्शन रिप्ले, सारखे चित्रपट मी नंतरही थेटरात जाउन बघितले. भोग सरता संपत नाही आहेत. मिपावर बरेच नाडीवाले, हस्तसामुद्रिक तज्ञ आहेत. कोणी माझी पत्रिका बघुन हे भोग कधी सरणार हे सांगु शकेल काय?

वाचने 12164 वाचनखूण प्रतिक्रिया 41

In reply to by नि३

रमताराम Sun, 03/20/2011 - 23:43
हर्ष, खेद, संताप, स्नेह, प्रेम, विषाद वगैरे सग्गळे सग्गळे तो त्याच्या सामवेदी (म्हणजे फक्त तीन स्वरांच्या) स्केलवर दाखवू पाहतो तेव्हा खरंच कीव येते. काय साली स्पीच थेरपी म्हणतात ती द्या राव याला नि नरडं मोकळं करा एकदाच याचं. पुन्हा स्वयंघोषित नि मीडियापुरस्कृत 'परफेक्शनिस्ट' म्हणे हे. एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात पण मीडिया मात्र परफेक्शनिस्ट म्हणते, कदाचित प्रत्येक चित्रपट परफेक्ट भिकार बनवतो म्हणून असेल, हल्ली काय निकष लावतील ते शोभा डेला सुद्धा ठाऊक नसते म्हणे, म्हणजे बघा आता.

In reply to by रमताराम

>> एकामागून एक रद्दड, पडेल नि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे (ते ही कुठून कुठून ढापून आणलेल्या कथेवर, तिची यशाशक्ती ऐशीतैशी करून) चित्रपट काढतात हे कुणाला उचकवण्यासाठी मुद्दाम लिहिले असेल तर ठीक आहे. नाहीतरी तुम्ही अमीर खान चे खूप कमी चित्रपट पहिले आहेत असे म्हणावे लागेल. कुठलाही चित्रपट तुम्हाला रद्दड वाटू शकतो, तो वैयक्तिक मुद्दा आहे. पण पडेल ?? अमीर खान ने तद्दन फ्लॉप चित्रपट देऊन साधारण १०+ वर्षे झाली आहेत. आणि हिंसाचाराचे दर्शन घडवणारे वगैरे अशी टीका तर एकदम हाय क्लास हां. एक गजनी सोडता कशात झाले हे दर्शन तुम्हाला??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय Mon, 03/21/2011 - 14:20
गेल्या १० वर्षातला विचार करता केवळ मंगल पांडे आणि गजनी रद्दड होते असे म्हणता येइल. खास करुन गजनी. पण तो सुपर्डुप्पर हिट्ट झाला. अमिरचा करिष्मा नाकी काही नाही. बहुधा रामांना याच गोष्टीची चीड येत असावी.

नितिन थत्ते Sat, 03/19/2011 - 15:14
हा हा हा. आजवर फक्त दोन चित्रपट अर्धवट पाहिले आहेत. १. चटक चांदणी (जयश्री टी नायिका होती या पिक्चरमध्ये) २. नाव आठवत नाही (रामू वर्माच्या भूतचा मराठी रीमेक) . . . . (एकेकाळी येणारा प्रत्येक पिक्चर पाहणे आपले कर्तव्य समजणारा)

स्वानन्द Sat, 03/19/2011 - 17:36
हा हा!! भोग आहेत ते भोगूनच संपवले पाहिजे. साधना ( चित्रपटातली नव्हे, चित्रपट पाहण्याची ) अखंड चालत राहू दे. सत्गुरू पोचलेले असले की ते तुमची नैय्या सुद्धा पार करतील. वर नि३ रावांनी सांगितलेले महाराज फार ताकतीचे मानले जातात. श्रद्धा बळकट असू दे. ;) --आनंदी आनंद

नगरीनिरंजन Sat, 03/19/2011 - 21:11
लेख मनाला भिडला! सावरियाबद्दल लिहीलेले अतिशय खरे आहे. हा चित्रपट मी टीव्हीवरही अर्ध्या तासापेक्षा जास्त पाहू शकलो नाही. थिएटरमध्ये जाऊन पाहणे दूरच.

त्यापेक्षा इमरान हश्मीचे चे सिनेमे पाहत चला .( तो कधीही आपल्या चाहत्याचा अपेक्षा भंग करत नाही .) महेश भट्ट व त्यांचा केंप ( अन्याय /सामाजिक विषमता ( ह्याबाबत यांचे खास मत व दृष्टीकोन / पण आजच्या काळात समजतील व उमजतील अशी श्रवणीय गाणी ) जि सम हा सिनेमा गाण्यांसाठी मी पुन्हा पुन्हा पहिला . शोलीड अनिवासी अमराठी भाषिकांसाठी ( जोहर ह्यांचा निसर्ग सौंदर्याने नटलेला भावनिक अत्याचार ) आयुष्यात आपल्या हातून गुन्हे घडले तर अजून कोणी नाही तर वरचा देव व आपला अंतरात्मा त्याची दखल घेत आहे .हे जाणून घेऊन पापाची उतराई म्हणून स्वतःला मानसिक यातना द्यायच्या असतील . तर ....... तर उदय चोप्रा ह्यांच्या वडिलांचे त्यांना केंद्रस्थानी ठेवून काढलेले सिनेमे उदा लव इम्पोसिबल/ सलमानच्या धाकट्या भावाचे नायक म्हणून सिनेमे / दाढी न ठेवता गुळगुळीत चेहऱ्याच्या अभिषेकेचे सिनेमे / दिग्दर्शक व निर्मात्यांचे त्यांच्यावर झालेल्या उपकाराची परतफेड म्हणून दिया मिर्झा / समीर रेड्डी / लारा दत्ता /अमृता ( अरोरा /राव ) ह्यांचे नायिका म्हणून सिनेमे पाहणे .

पैसा Sat, 03/19/2011 - 22:42
पिक्चर अर्धाच टाकून पळाल्याबद्दल शिक्षा: रोबोट पिक्चर ३ वेळ बघा!

In reply to by पैसा

रमताराम Sun, 03/20/2011 - 23:48
कमल हसन चा 'दशावतारम' बघा, शैव-वैष्णवांच्या झगड्यापासून जैविक अस्त्रांपर्यंत सगळे येते यात, काय सॉल्लिड स्केल आहे नाही.

In reply to by रमताराम

+१ ररांशी सहमत आहे. जोडीला कमल हसनाच अभय देखील पहा ;) गेला बाजार कभी अलविदा ना केहना, हम तुम्हारे है सनम, राम गोपाल वर्मा की आग, सपने, प्रियांका अशी एक न संपणारी यादी आहेच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय Mon, 03/21/2011 - 16:56
अभय , कभि अलविदा ना कहना बघितलेत. पण ते घरी टीव्हीवर निवांत पाय पसरुन, अधुअमधुन चॅनेल बदलुन. सपने बघितला पण तो एवढा डोक्यात नाही गेला. हम तुम्हारे है सनम तर थेटरात जाउन बघितला. त्यातले "गले मै एक लाल टाइ.... एकच रजै, चादर" असले काहीतरी गाणे होते. ते तर मला भयानकच आवडले होते. माधुरी पण आता इतरांसारखी खाट, रजाई, चादर वगैरे वर आली आहे अशी एका मित्राने मोठी मार्मिक टिप्पणी केली होती. चित्रपट भयाण होता हे तर नक्कीच.

In reply to by रमताराम

''दशावतारम ला काय बोलायचे नाही ''. आता त्यांचा पार्ट २ लवकरच येणार आहे . १)जपान मध्ये सुनामी लाटा आल्या . २) जपानमध्ये बौध्द धर्माचा असणारा प्रभाव ३) विष्णूचा एक अवतार म्हणून बुद्ध मानले जातात .तेव्हा ह्यातून एक पौराणिक गोळाबेरीज असलेले कथानक ह्या पार्ट २ मध्ये असणार आहे . ह्यात शेरावतचा पत्ता कटाप ती जुनी झाली आता तिने हिस केले तरी दर्शक फिस करत नाहीत . त्यामुळे नवीन वर्णी म्हणून आमची अप्सरा ( भाग्याची लक्ष्मी ) हिची वर्णी बहुदा लागेन तिने आधी दक्षिणात्य सिनेमात काम केले आहे .

किशोरअहिरे Sun, 03/20/2011 - 12:46
प्लॅटफॉर्म तर मी ऐकुन आहे की थेटरात जाउन संपुर्ण बघुन आजघडीला जिवंत असणारी लोकं हाताच्या बोटांवर मोजता येतील. >> त्यातला मी पण एक आहे बरका :)

In reply to by किशोरअहिरे

आत्मशून्य Sun, 03/20/2011 - 15:25
"मंतरलेल्या दीवसातील" (शाळा बूडवायची सवय लागलेल्या) तो एक अवीस्मरणीय चीत्रपट आहे, एकदा काय २-३ वेळा पाहीलाय थेटरामधीक........

sagarparadkar Sun, 03/20/2011 - 12:55
लेख उत्तम. त्यातील सर्व भावना ह्रुदयापर्यंत जाऊन भिडल्या, श्री. शिरिष कणेकर ह्यांचा 'माझी फिल्लमबाजी' चा पुढील भागच वाचतोय कि काय असा भास होत होता :) पण मृत्यंजय, तुम्ही स्वतःच जर एवढे लिव्हले आहे, तर तुम्ही देवविलेली शपथ मोडून चारचौघात जाहीर करतो कि ह्या महामानवाने 'चरणोंकी सौगंध', 'पाप को जलाकर राख कर दूंगा', 'करण ही है असली अर्जुन' हे चित्रपट देखील आवर्जून पाहिले आहेत .... :) :)

सूर्यपुत्र Sun, 03/20/2011 - 19:53
असे अति-भंकस पिक्चर थेटरात बघण्यात माझा पण नंबर. मी जॉन अब्राहम आणि आयेशा टाकिया यांचा जबरदस्त परफॉर्मन्स असेल या अपेक्षेने "नो स्मोकिंग" हा पिक्चर बघितला (त्यात परेश रावल पण आहे). पुण्यात मंगला थेटरात हा पिक्चर बघायला माझ्याबरोबर इतर तीन अभागी जीव होते, पण शेवटी एकदाचा पिक्चर संपल्यानंतर थेटरातून फक्त दोघंच बाहेर पडलो. ऐन उन्हात ए.सी.त बसायला मिळतंय या एवढ्या भाडवलावर हा पिक्चर एकट्याने बघितला. नंतर स्वःताच एव्हढा खजिल झालो होतो, की कुणाला सांगितले पण नाही की तीन तास कुठे होतो म्हणून..... असेच अजून थर्डक्लास पिक्चर म्हणजे "स्पायडरमॅन-३", किंवा आत्ता एव्हड्यात आलेला निकोलस केजचा "ड्राईव्ह अँग्री" -सूर्यपुत्र.

हा हा हा ... एकेकाळी जेव्हा उर्मिला मातोंडकर पिक्चरमधे काम करायची तेव्हाची गोष्ट. आमची परीक्षा संपायची तेव्हाच नेमका तिचा पिच्चर रिलीज व्हायचा आणि "हा तरी पिच्चर बरा असेल" या आशेवर आम्ही पिक्चर बघायचो. 'जानम समझा करो', 'मस्त' वगैरे पिक्चर बघितले होते त्याची आठवण झाली. या सगळ्याचा निषेध म्हणून टी.वाय.ची परीक्षा संपल्यानंतर तब्बल दोन आठवडे पिक्चर बघितला नाही.

रेवती Mon, 03/21/2011 - 03:07
चित्रपटांची नावेच भयानक आहेत. पहायचे धाडस कोण करणार? त्या टॉवेलातल्या माणसाचा सिनेमा मी टॉवेलगीत येण्याच्या आतच बंद केला. बराचवेळ त्या निळ्या काळ्या रंगामुळे आमच्या टिव्ही स्क्रीनला काही झाले आहे कि शिणेमाच तसा आहे हे समजेना! नंतर कोणाच्यातरी बोलण्यात त्या गाण्याचा उल्लेख आल्यावर तूनळीवर तेवढे गाणे पाहिले तर याचे लज्जारक्षण करणारे वस्त्र आत्ता पडते कि मग पडते अशी अवस्था होती. खुर्चीवरून जमिनीवर दणकन आपटूनही हा आनंदानं गाणं म्हणतच राहतो हे पटलं नाही. तेवढ्यात माझा मुलगा "आई काय बघतिये" हे बघायला आल्यावर त्याला विनोदी गाणे म्हणून ते दाखवले. "हा बिगबॉय असूनही असे का करतोय?" हा प्रश्न विचारून तो निघून गेला. बर्‍याच लहान मुलांना असे वाटले असल्यास नवल नाही. दिग्दर्शकांनी बच्चे कंपनीकडूनही शिकण्यासारखे बरेच आहे असे वाटले.;)

प्रमोद्_पुणे Mon, 03/21/2011 - 11:11
लिवलय रे.. आता असा एखादा चित्रपट झालाच पाहिजे. मधे "आई मला माफ कर" नावाचा एक मराठी चित्रपट पाहिला..काय अफलातून होता राव..

सुहास.. Mon, 03/21/2011 - 11:18
याक नम्बर चिरफाड . भन्साली जरा बरे पिच्चर बनवितो असा समज या चित्रपटाने गळुन पडला होतो ..असो ... चित्रपटाती ल एखाद-दुसर (बहुधा शानच्या आवाजातले) गाणे सोडुन चित्रपट अजिबात आवडला नाही.

चिगो Mon, 03/21/2011 - 16:27
(पर्यायाने आपला कारण आपण अंधार, एकांत, २ तरूण जीव या सगळ्याची गोळाबेरीज करुन काहीतरी 'वेगळेच' घडण्याची अपेक्षा करत असतो ना). "सावरीया" हा त्यातील निळ्या रंगामुळे "निळी फीत" असेल असं (गैर) समजून बर्‍याच जणांनी पाहीला, असा प्रवाद आहे.. बाकी मीपण बरंच काही भोगलंय ह्या बाबतीत.. मी "हॅलो ब्रदर" हा पिक्चर मित्रापायी ब्लॅकमधे टिकीट काढून पाहीला. सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय. "गैर" नावच्या अजय देवगणच्या (त्यात अजिंक्य देव विलेन होता) एका चित्रपटाला बघतांना मात्र मी सभात्याग केला होता.. बाकी आमिरप्रेमापोटी मी "मेला" नामक अत्याचार थेटरात खुशीने सहन केलाय..

In reply to by चिगो

वपाडाव Mon, 03/21/2011 - 18:46
सैफ, माधुरी आणि अक्षयकुमारच्या एका पिक्चरसाठी विंडोवर धक्काबुक्की केलीय.
आरजु होतं त्याचं नाव..... अहो चिगो... तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला किंवा त्यासाठी दोन हात खिडकीतुन टाकुन ८ तिकिटे घेतली नसावीत, अन त्यावरही गर्दीत स्टुलावर (२ खिळे सुद्धा होते त्याला) बसुन बिना पंख्याचा घामाघूम होत तर नक्कीच नसेल पाहिला. मेलामध्ये "रूपा"च्या स्वगतांनी झीट आणले होते. असो...

In reply to by वपाडाव

तुम्ही 'भांडारकरांचा' 'आन्-मेन अ‍ॅट वर्क' नसेल पाहिला
बॉस आन एनीटैम टैमपासे बरं ! पेश्शली शत्रुघ्न सिन्हा आणि परेश रावल आणि इरफान खान :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

धमाल मुलगा Mon, 03/21/2011 - 19:49
इरफानसाठी आपण आख्खा शिनेमा पाह्यला भौ! पोलिस पठाणवाडीत घुसून इरफानला अटक करायला जातात तेव्हा हा डॉन कोणत्याशा पोराला झोपाळ्यात जोजवत असतो आणि पोलिसांशी बोलतानाच कुणालातरी सांगतो, "मुन्नेके लिए दूध लाने को कहों" (शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा इरफानचा थंड 'परफॉर्मन्स' लै भारी! किंवा पोलिसांनी एन्काउंटरची आर्डर काढल्यावर राहूल देवला लपवून ठेवलं असताना, त्याला 'बाई'ला भेटायची इच्छा झाल्यावरचा इरफानचं वाक्य "तू चौदा साल का था, तब मैनेही तो तुझे पहली बार दुल्हा बनाया था| सुन मेरी बात, थोडा रुक जा|" ( पुन्हा: शब्द कदाचित जसेच्या तसे नसतील..उगा वस्सकन अंगावर येऊ नये. ह्या डायलॉगसाठी विकीवर शोधाशोध केलेली नाही. धन्यवाद.) त्यावेळचा डॉन असलेला एक थोरला भाऊ काय भारी दाखवलाय इरफाननं.

In reply to by धमाल मुलगा

रेवती Mon, 03/21/2011 - 19:53
राहूल देवचं नाव वाचून राहून रॉय कि कोणीतरी होता ते आठव्ल. तो माणूस गेलाच नै एकदम! पुन्हा बघितला नाही. आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी!

In reply to by रेवती

धमाल मुलगा Mon, 03/21/2011 - 20:01
"चेहर्‍यावर भाव दाखवले तर तिकीटाचे पैसे परत" अशी त्याची जाहिरात व्हायची म्हणे. ;) (राहुल रॉयचा 'जुनून' नावाचा सिनेमाही आमच्या पापाच्या यादीत आहे. :( ) >>आणि ती कशाचं सोयर सुतक नसल्यासारखा चेहेरा असलेली अनु कि कोणीतरी! =)) =)) =)) अग्गायायाया....त्या अनु अगरवालला उभ्या आयुष्यात इतकी ड्येंजरफुल पावती मिळाली नसेल. _/\_ अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत.

In reply to by धमाल मुलगा

मृत्युन्जय Mon, 03/21/2011 - 20:12
अवांतरः खलनायिकाचे काही सीन्स पाहिल्यामुळे अनु अगरवालबद्दल आमची मतं अंमळ मवाळ आहेत धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

वपाडाव Tue, 03/22/2011 - 12:29
तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
मतं अन भावना दोन्हीही... आणखी काय हवे असल्यास एकदा फर्मान काढा... तात्काळ हजर करु...

In reply to by मृत्युन्जय

धत लेका. तुझी तिच्याबद्दलची मतं मी बरीच मवाळ बनवु शकतो.
क्लाऊड डोअर का ? आ आ आ ? ;)

In reply to by रेवती

मृत्युन्जय Mon, 03/21/2011 - 20:11
राहुल रॉय - आशिकी, फिर तेरी कहानी याद आयी (पूजा बेदी), जुनून (बहुधा पूजा भट्ट) आणि सपने साजन के (बहुधा जॅकी, डिंपल आणि करिष्मा कपूर). हा भारत भूषण चा आधुनिक अवतार. विस्मरणात गेला होता. वरीलपैकी एकही चित्रपट मी घरी बसुन देखील पुर्णा बघु शकलो नव्हतो. अनु अगरवाला - आशिकी, खलनायिका (हा कुठल्यातरे विंग्रजी चित्रपटावरुन ढापला होता. बहुधा जयाप्रदा, जितेंद्र, पुनीत इस्सार आणि वर्षा उसगावकर होते त्यात) आणि किंग अंकल (शाहरुख, जॅकी आणि बहुधा नगमा. "इस जहा की नही है तुम्हारी आखें" हे बहुधा यातलेच गाणे.). ही मात्र मला चांगली लक्षात आहे. खलनायिका आणि किंग अंकल पुर्ण बघितले देखील. अर्थात घरात बसुन. सगळे चित्रपट भयाण होते

In reply to by रेवती

राहुल रॉय ह्याने माझ्या मते मी पाहिलेल्या सर्वोत्तम मोडेल राज लक्ष्मी खानविलकर ह्या मराठमोळ्या मुलीशी लगीन केले . २००२ मध्ये आमच्या हॉटेलात हे जोडपे यायचे .हा आपला शांतपणे समुद्राच्या लाटा पाहत बहुदा आशीकीच्या आठवणीत मग्न असे . मागच्या भारत भेटीत जेव्हा जुन्या मित्र मंडळीना भेटलो तेव्हा भेटलो .तेव्हा एक खबर मिळाली . हा त्या बिग बॉस चा विजेता झाला .आणी एकदम ह्यांचा उच्चभ्रू बायकांमध्ये भाव वधारला . थोडक्यात भवानीच्या डायरीतील शाहीद
( उतारवयात तेवढ्याच दिडक्या दिमतीला ) जाताजाता त्या काळात आमचा येथील एक वयस्क कर्मचारी'' क्या बावा '' असे त्याला येऊन म्हणत असे व हा त्याला ५०० ची नोट देत असे . ह्यांचे जुने ऋणानुबंध होते

धमाल मुलगा Mon, 03/21/2011 - 17:14
हाय कंबख्त.. तुने 'नाकाबंदी' देख्या ही नय. :D झालंच तर, द ग्रेट मिथूनदा ह्यांचे 'चीता' आणि तत्सम सिनेमे.. महासुंदर होते ते. मिष्टर मृत्युंजय, तुमच्या आयडीतूनच तुमचा ह्या झुंझार स्वभावाची कल्पना येते आहे. परमेश्वर आपल्याला अशीच उदंड सहनशक्ती देवो, आणि आम्हाला असे चुरचुरीत लेख वाचायला मिळो अशी प्रार्थना. ;)

मृत्युन्जय Mon, 03/21/2011 - 19:01
या लिष्टेत एक नाव राहुन गेले. हुतुतु. नाना पाटेकर, सुनील शेट्टी, तब्बु, सुहासिनी मुळे, मोहन आगाशे. मी हा डेक्कन टॉकिजला पाहिला. झुरळ, उंदीर आणि ढेकणांच्या सोबतीने. चित्रपटात फ्लॅशबॅक कधी सुरु होतो आणि कधी संपतो तेच कळत नाही. बर एकाच वेळेस २-३ फ्लॅशबेक असु शकतात हे तेव्हा पहिल्यांदा कळाले.