रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव
(ते तेव्हांही खटकलेलं थोडं)
एका अधमु-या नात्याची एकमेव खूण..
का कोण जाणे पण आज अचानक वाटलं,
हर रिश्ते की एक उमर होती है तशी,
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?