या वर्षीच्या बुद्धिबळ स्पर्धेत काहीही करून त्याला हरवायचंच असं सर्वांनी ठरवलं. बुद्धिबळ त्याच्यासाठी फक्त तर्काचा खेळ होता, इज्जतीचा नाही. प्रतिस्पर्ध्याच्या सुरेख चालीला सुद्धा तो दाद द्यायचा. त्याच्या चाली निर्विवाद होत कारण फोकस कायम प्रश्नावर असे, स्वतःवर नाही.
सामन्यात दहाव्या चालीनंतर प्रतिस्पर्धी एक मोहरा गमावून बसला आणि सतराव्या चालीनंतर इतकी कोंडी झाली की डाव हरण्याकडे झुकू लागला. अचानक चेसक्लॉक बंद पडलं ! पंचांनी सामना रद्द केला.
निर्वाणीच्या क्षणी करायची ही खेळी पूर्वनियोजित होती, हे फक्त त्याच्या लक्षात आलं.
तीन वर्षांनी पुन्हा स्पर्धा ठरली.
तो आला, त्यानं चेसक्लॉककडे पाहिलं.