मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिशिंग इन ट्रबलड वॉटर

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
फिशिंग इन ट्रबलड वॉटर हि एका निधड्या छातीच्या आणि शूर अशा निवृत्त नौदल अधिकाऱ्याची सत्य कथा आहे. लॉक डाऊन च्या कालावधीत योगायोगाने हि कथा माझ्यापर्यंत एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याने पोचवली होती. हि मूळ इंग्रजीमध्ये असलेल्या दीर्घ कहाणीचे मराठी भाषांतर मी केले आहे. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत त्या आपण गोड मानून घ्या. कमांडर विनायक आगाशे हे निवृत्त होऊन आता नाशिक येथे स्थायीक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून या कहाणीच्या सत्यतेबद्दल आणि त्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा याबद्दल चर्चा करूनच हि कहाणी येथे लिहीत आहे.एक पाणबुडीतील अधिकाऱ्याची (सबमरिनरची) कथा मी कमांडर विनायक एस आगाशे आहे,.आता मी माझ्या कर्त्या काळापासून लांब आलेला, थकलेला आणि सेवानिवृत्त झालेला आहे. माझी नातवंडे मला बहुधा निरुपयोगी आजोबा म्हणून पाहतात. कारण मी पाणबुडी शाखे मध्ये जे काही केले त्याबद्दल मी बोलू शकत नाही किंवा करू शकत नाही. तथापि काही काळापूर्वी मी भारतीय नौदलाच्या पाणबुडी शाखेमध्ये मी तरुणपणाच्या मस्तीमध्ये, फिरणारा उत्साहाने भरलेला एक अधिकारी होतो. याचा माझ्याकडे आता फक्त एकच पुरावा आहे, माझ्या बेडरूममधील एका पेटीमध्ये ठेवलेले एक माझ्या "पाणबुडीतील गतकाळा" इतकेच दुर्लक्षित असलेले एक नाणे आकाराचे ‘विशिष्ठ सेवा पदक’. जगातील नौदलात पाणबुडीला साधारणपणे ‘सायलेंट सर्व्हिस’ म्हणून संबोधले जाते कारण सामान्य माणसाला ते क्वचितच पाहायला मिळते आणि ज्या गोष्टी पाणबुडी शाखेतील अधिकारी करतात त्या गोष्टी सहसा महाभयंकर (ड्रेकोनीयन)अशा ("ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट") "अधिकृत गुप्तता कायद्या" अंतर्गत वर्गीकृत केल्या असल्यामुळे सामान्य माणसांच्या नजरेपासून लांबच ठेवल्या जातात. हे तसे बरोबरच आहे कारण पाणबुडी एक प्राणघातक, शांत, सामरिक शस्त्र प्रणाली आहे ज्यामुळे स्वत: च्याच एका मित्र राष्ट्रा बरोबर युद्ध सुरू होऊ शकते किंवा एखाद्याच्या सर्वात वाईट शत्रूबरोबर चालू असलेले युद्ध थांबवू शकते. म्हणूनच शांततेत किंवा युद्धामध्ये पाणबुडी "आपल्या" सागरी हद्दीत "दृष्टीस पडल्याबरोबर" किंवा तिच्या आपल्या राष्ट्राच्या तळापासून दूर अशा इतर कोणत्याही ठिकाणी आढळल्यास, सामान्यतः पहिल्या फटक्यात नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण बहुतेक वेळेस ती शत्रूच्या सागरी हद्दीत काहीतरी चिथावणी खोर कृत्ये करत असतात. पाणबुडी सहसा कुप्रसिद्ध ‘पीपिंग टॉम’(दुसऱ्याच्या घरावर नजर ठेवणारा) म्हणून ओळखली जाते. पाणबुडी हि नेहमी युध्द करण्यासाठी रणनीति किंवा डावपेचात्मक अस्त्र म्हणून (TACTICAL OR STRATEGIC WEAPON) वापरले जाते आणि म्हणूनच त्याबद्दल नेहमी द्वेषच बाळगला जातो आणि जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा पाणबुडीला नष्ट करण्याचीच वृत्ती दिसून येते. इलेक्ट्रिक / डिझेलवर चाललेल्या पाणबुडय़ांत काम करणाऱ्यांचे आयुष्य हे महासागराच्या गूढ आणि काळोख्या "खोली" मध्ये लपलेल्या खतरनाक मगरीच्या पोटात राहण्यासारखे असते. बहुतांश वेळेस पाणबुडी सागराच्या पोटात अंधारात दडून असते आणि क्वचितच "काळोख्या रात्री" बॅटरी चार्ज करण्यासाठी पेरिस्कोपच्या खोलीपर्यंत वर येते. तसेच फारच क्वचित ताजे रेशन्स (शिधा) घेण्यास, मुख्यालयातून आदेश अन संपर्क यासाठी, आवश्यक असल्यास यंत्रसामग्रीसाठी अतिरिक्त वस्तू किंवा आजारी कर्मचार्यांना बाहेर काढण्यासाठी एखादे वेळेस पुरवठा जहाजाच्या संपर्कात येते. पाणबुडीत बाहेरून कोणतीही मदत न घेता 100 दिवसांपर्यंत गस्तीवर राहण्यासाठी इंधन, वंगण तेल आणि कोरडे राशन असते. शक्य तेथे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक शांतता असते ; व्हीएलएफ (VERY LOW FREQUENCY) वर कोडित संदेश पाण्याखालूनच पाठवले किंवा प्राप्त केले जातात. बंदरात असताना पाणबुड्यांकडे पुरवठा, टॉरपेडो, अवजड यंत्रसामग्री आणि त्यासारख्या वस्तू लोड करण्यासाठी वरच्या बाजूला हॅच असला तरी, पाणबुडीमध्ये कर्मचाऱ्यांचा नियमित प्रवेश सामान्यतः कोनिंग टॉवरमध्ये सरळ खाली जाणाऱ्या शिडीनेच असतो. आत गेल्यावर एका उंच माणसासाठी जेमतेम सरळ उभे राहण्याइतकीच जागा असते. बोटीच्या ‘कॅप्टन’ शिवाय कोणालाही स्वत: चा बिछाना वेगळा नसतो. उर्वरित भाग स्लीपिंग क्वार्टरमध्ये आठ तास पाळीपाळीने जेथे जागा मिळेल तेथे झोपा. जागृत अवस्थेत एक जण नेहमी कर्तव्यावर(DUTY) असत, जे OFF DUTY सैनिक झोपलेले नसतात त्यांना काहीतरी दुसरे काम दिलेले असते. उदा. टेहळणी करणे, त्याची नोंद ठेवणे, देशाच्या छुप्या सेवेत लागणारी आपली शस्त्रे, अस्त्रे घासून पुसून सतत सज्ज ठेवणे सारखी सतत कामे चालू असतात. पाणबुडीमध्ये कोणतीही गोपनीयता किंवा खाजगी जागा नसते, कारण जागेअभावी पाणबुडीच्या जटिल प्रणालीचा एखादा नियंत्रक, वाल्व इ. शौचालयातही वर, खाली, बाजूला कुठे तरी असतात. शौचालयात बसून राजा सॉलोमन यांच्यासारख्या सखोल चिंतनात असतांना, कुणीतरी सैनीक EXCUSE MOIS S'IL VOUS PLAIT 'एक्सक्यूज मॉइस , सिल वोस' प्लेट ' सारखे क्षमा वगैरे न मागता सरळ आत एखादा वाल्व्ह आणि स्विच चालू किंवा बंद करण्यासाठी येत असत. गोड्या पाण्याची कायमची कमतरता असे आणि म्हणूनच शौचालयात आचवण्यासाठी समुद्राचे पाणीच वापरावे लागते. या समुद्राच्या पाण्याने व त्यातील मिठाच्या स्फटिकांनी पार्श्वभागास आणि पृष्ठभागास पाणबुडीत राहणाऱ्या सैनिकांना कायमस्वरुपी ‘धोबीची खाज’ (Dhobi itch) असते त्यातल्या त्यात समाधान एवढंच असतं की एखाद्यास दात घासण्याची गरज नव्हती किंवा केस कापण्याची आणि म्हणूनच सर्व पाणबुडी सैनिक समुद्रात असताना कॅरिबियन बेटा मधील समुद्री चाचा ‘डेव्ही जोन्स’ सारखेच दिसतात . पाणबुडीमध्ये सर्वात जास्त भयंकर बाब काय असेल तर ती म्हणजे पाणबुडीत आग लागणे. आगीमुळे मृत्यू, आगीच्या किंवा बॅटरीच्या धुरामुळे दम कोंडून मृत्यू येणे. तेथे पळून जायला कुठेही जागा नाही आणि एकदा पाण्याखाली गेल्यानंतर पाण्यात उडी मारून पळून जाणे शक्य नाही. पाणबुडीला पृष्ठभागावर येणे बहुतेक वेळेस अशक्य असते. कारण तुम्ही नेहमीच चुकीच्या जागी( शत्रूच्या गोटात) असता आणि जर त्यांनी(शत्रूने) ते पाहिले किंवा तुम्हाला पकडले तर एक आंतरराष्ट्रीय राजकीय पेच निर्माण होउ शकतो. पाणबुडीला लागलेल्या आगीमुळे बहुधा भीषण परिणाम घडतात म्हणूनच सर्वजण म्हणाले, सबमरीनर्स सहसा एक "भीषण सुंदर" असे कामिकाजे’ प्रकारचा जीवन जगतात, ‘QUE SERRA SERRA , जे होईल ते होईल किंवा जो होगा देखा जायेगा, "बाकी देवाक काळजी". ऑफिशियल सिक्रेट अॅक्टमध्ये आपण जवळपास 25 वर्ष बांधलेले असता आणि आता निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली आहेत म्हणूनच मी कदाचित सरकारी/ गुप्तहेर खात्याच्या च्या क्रोधाची वक्रदृष्टी न पडता एक जुनी गोष्ट सांगू शकतो आहे.केवळ हि पाण्याखालील गूढ पण मूक सेवा नियमितपणे काय करते याची कल्पना देण्यासाठी. सप्टेंबर / ऑक्टोबर १९८६ दरम्यान मी आयएनएस एम वागली या , आताच्या आधुनिक अणु पाणबुडीच्या तुलनेत पुरातन कालीन बोटचा, डिझेल इलेक्ट्रिक ‘फॉक्सट्रॉट’ वर्ग पाणबुडीचा, कॅप्टन (Commanding Officer) होतो. विशाखापट्टणममधील कमांड मेसच्या लॉनवर एक प्रकारची ‘कमांड रिसेप्शन’ अशी मोठी पार्टी होती आणि प्रत्येकजण त्यांच्या ड्रिंकचा आनंद घेत होता. कोणीतरी मला सांगितले की कॅप्टन सुरेश, कॅप्टन (पाणबुडी शाखा) माझा शोध करीत आहेत. मी कॅप्टन सुरेशला भेटताच त्याने मला तातडीने सी-इन-सी ( कमांडर इन चीफ) च्या कार्यालयात यायला सांगितले. सी-इन-सी च्या कार्यालयात. तेथे ध्वज अधिकारी (FLAG OFFICER) सबमरीन्स आणि चीफ ऑफ स्टाफ होते. सी-इन-सी, व्हाईस ऍडमिरल चोप्रा यांनी मला विचारले की मी तातडीने कामगिरीवर (Operational Mission) जायला तयार आहे का? अर्थात हि "सूचना कम हुकूमच" असतो आणि त्याला तितके प्रचंड सबळ कारण असल्याशिवाय "नाही" म्हणायचे नसतेच. मला चीफ ऑफ स्टाफकडून बाकी माहिती देण्यात आली आणि मी ताबडतोब पार्टी सोडली आणि "वागली" पाणबुडी वर गेलो. पुढच्या ३ तासात सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कामगिरीसाठी "परत" बोलावण्यात आले. १६ क्लिअरन्स डायव्हर्सच्या तुकडीसह ४ जेमिनी (इंफ्लॅटेबल रबर बोट्स) सह ताजा शिधा, अन्नधान्य, भाज्या इ पाणबुडीत साठवल्या केल्या, टॉर्पेडो डागण्यासाठी तयार करण्यात आले. "वागली" समुद्रासाठी तयार झाली आणि आम्ही चुपचापपणे बंदर सोडले. इतक्या गुपचूप पणे कि बाजूच्या जहाजाला आम्ही केंव्हा गेलो ते सुद्धा कळले नाही. माझे प्रवासाचा आदेश (sailing order) एका वरवर साधारण दिसणाऱ्या (operational patrol) 'सर्वसाधारण गस्त' साठी होता तरी विविध प्रकारच्या तांत्रिक, छुप्या माहितीचे संकलन, समुद्रशास्त्रातील नैसर्गिक बदलांची माहिती करून घेणे, बंदरांमध्ये छुप्या तर्हेने प्रवेश कसा करता येईल, प्रत्येक प्रकारच्या जहाजांच्या ध्वनी व चुंबकीय(acoustic and magnetic signature) स्वाक्षर्या चे निरीक्षण करणे, रेडिओ आणि रडार इंटरसेप्ट्स, सागरी धमकीच्या परिस्थितीचे मूल्यांकन, घुसखोरी किंवा गुप्तचर यंत्रणेची हद्द पार करून आत मध्ये हेरगिरी आणि असेच अनेक मुलत: हेरगिरी हे विशिष्ट ध्येय समोर ठेवूनच होता. हि कामगिरी सुमारे ३० दिवसांपर्यंत हेरगिरी करण्याची होती. आम्हाला पाण्याच्या पृष्ठभागाखालूनच श्रीलंकेच्या किनारपट्टीत लपून जाणे आणि तीव्र जोखीम व सावधगिरीने कार्य करणे हा आदेश होता. श्रीलंकेत शांती सेना पाठवण्यापूर्वी तेथील गुप्त माहिती काढणे हा हेतू होता.त्यावेळी तो देश (श्रीलंका) आपल्या बरोबर युद्ध करत नव्हता किंवा त्यांच्या बरोबर आपले कोणतेही शत्रुत्व नव्हते. परंतु हेरगिरीच्या अस्थिर अंडरवर्ल्डमध्ये, आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो आणि म्हणूनच शत्रूंबरोबर मित्रांचा पण मागोवा ठेवणे हे आमचे कार्य होते. जर पकडले गेलो असतो तर आत्मसमर्पण करणे किंवा आम्ही भारताचे लोक आहोत म्हणून पांढरा झेंडा दाखवणे हा आम्हाला पर्यायच दिलेला नव्हता हे आम्ही जाणून होतो. आम्ही जर त्यांच्या दृष्टीक्षेपात आलो तर ते आम्हाला नष्ट करतील आणि पीपिंग टॉम्सवर दया दाखविली जाणार नाही. सैन्याच्या गोरखा रेजिमेंट, ‘काफर भांडा मर्नू रामरो’ किंवा ‘भ्याडपणासारखे शरण जाणे आणि बडबड करण्यापेक्षा मरणे बरे’ या घोषणेने आमच्यात बरेच साम्य आहे. समुद्रात 100 मीटर खोलीवर बॅटिकलॉआ या श्रीलंकेच्या पूर्व राजधानी आणि पूर्व किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर याच्या आसपासच्या पाण्यात आमची कर्मभूमी होती. विविध विभागीय प्रमुख, लेफ्टनंट कमांडर रॉबिन परेरा (Ex O- Executive Officer -अधिशासी अधिकारी ), पीसी अग्रवाल -अॅगी (इंजिनीयरिंग -ऑफिसर ) आणि लेफ्टनंट श्रीकांत (इलेक्ट्रिकल-ऑफिसर) यांची मी बैठक बोलावली. त्यांना आपल्या कामगिरीचे उद्दीष्ट, आपल्याला काय लपाछपीचा खेळ खेळायचा आहे ते समजावून सांगावे, माझ्या मनात काय आहे ते सांगायचे होते आणि त्यांचा त्याबद्दल सल्ला काय आहे हा त्या बैठकीचा उद्देश होता. सबमरीनवर आम्ही एकसंघच काम केले आणि त्या सर्वानी असंख्य कामांमध्ये आपले असलेलं कौशल्य, ज्ञान उत्साहाने पणाला लावून संपूर्ण सहकार्य दिले. त्यांचे नेमून दिलेले काम करण्यासाठी त्यांना कधीही, कोणतीही आठवण करून द्यावी लागत नसे. चर्चा आणि विचारविनिमयानंतर असे ठरवले गेले की आम्ही सूर्यास्तापूर्वी त्यांच्या प्रादेशिक जलक्षेत्राच्या सीमेवर जाण्यासाठी १०० मीटर खोलीवर शांत गतीने पुढे जाऊ. (१०० मीटर / ३२८ फूट खोली म्हणजे साधारण ३०-३२ मजली इमारत). त्यानंतर सूर्यास्तापूर्वी श्रीलंकेच्या सागरी सीमेच्या किनाऱ्यावर आपल्या विहित जागी जाऊन स्थानापन्न होऊ. त्यानंतर सूर्यास्तानंतर पाण्यात १०० मीटर वरून 50 मीटर खोलीपर्यंतवर येऊ आणि श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करून टेहळणी करू. कॉन्टिनेन्टल शेल्फ खूपच उताराचा असल्यामुळे ( किनाऱ्यापासून पाण्याची खोली झपाट्याने वाढत जात असल्यामुळे) आमच्या लक्ष्य क्षेत्राच्या नेव्हिगेशन चार्टवर पाण्याची खोली ‘बॉटमलेस’( तळ सापडत नाही इतकी) किंवा १००० मीटरपेक्षा जास्त म्हणून दर्शविली गेली. पाणबुडी साध्या ‘आर्किमिडीज’ तत्त्वावर चालते; एकदा पाण्याखाली गेले तर ते शून्य ट्रिम (म्हणजेच पाण्याच्या पातळीला समांतर शुन्य अंशाच्या कोनात) किंवा क्षैतिज/ आडवी स्थिती( horizontal) पाणबुडीच्या पुढे आणि मागे असलेल्या टाक्यांत पाणी भरून जड होऊन किंवा कॉम्प्रेस्ड हवेने पाणी टाक्यातून बाहेर टाकून हलके होऊन राखली जाते. सूर्यास्त झाल्यावर आम्ही १०० मीटर खोलीवर, शून्य ट्रिमच्या स्थितीत होतो. अगदी किमान यंत्रणा चालू होत्या जेणेकरून पाणबुडी चा आवाज अजिबात येणार नाही. पाण्यातून तयार होणारा कोणताही आवाज हा पाणबुडीचा वाईट शत्रू आहे कारण ध्वनी पाण्याखाली वेगाने आणि सर्वदूर पर्यंत प्रवास करतो आणि त्याने आपल्या शत्रूच्या जहाजांना किंवा पाणबुड्याना इशारा मिळू शकतो. "सोनार’ वापरुन प्राप्त झालेल्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या चित्रामध्ये 4 ट्रोलर्स, 3 व्यापारी जहाजे आणि 2 विरोधी युद्धनौका - बहुधा फ्रिगेट्स दिसत होत्या. आम्ही पाण्यात मूक आणि शांतपणे विहरणाऱ्या शार्कप्रमाणे, किनाऱ्याच्या जास्तीत जास्त जवळून आणि जवळ असलेल्या शत्रूच्या(?) जहाजांना टाळत आत गेलो आणि ठरल्यानुसार 50 मीटर खोलीपर्यंत वर आलो. माझे नौसैनिक शांतपणे त्यांची पाळत ठेवत रणनीति किंवा डावपेचात्मक (TACTICAL OR STRATEJIC INFORMATION )माहिती गोळा करत होते. घड्याळाची टिकटिक सुद्धा मोठा आवाज वाटेल इतकी शांतता राखलेली होती आणि त्यात काळ वेगाने पुढे सरकत होता. मी पाणबुडीचे केंद्र असलेले कंट्रोल रूम (कॉन/CON) ‘ड्यूटी ऑफिसर (डीओ) ऑन वॉच’ कडे सुपूर्द केले आणि एक छोटीशी डुलकी काढण्यासाठी कॉन (कंट्रोल टॉवर) पासून काही यार्डच अंतरावर असलेल्या माझ्या केबिनवर परतलो. पहाटे दोनच्या सुमारास, मला अंतःप्रेरणेने (INSTINCTIVELY) ट्रिममध्ये किंचित बदल झाल्याचे जाणवले (पाणबुडीचे नाक वर येत होते). बदललेल्या स्थितीची मला कल्पना देण्यासाठी (Officer of the Watch) OOW ने इंटरकॉम वर मला सूचना करण्या आधीच मी माझ्या बंकवरून उठलो आणि ताबडतोब कंट्रोल रूमकडे गेलो. तेथे असलेल्या उपकरणांच्या तबकड्यांकडे पाहताना मला लक्षात आले की काही विचित्र कारणास्तव आपोआप आपली खोली कमी होत आहे आणि हळूहळू पृष्ठभागावर येत आहोत. “स्लो अहेड, पोर्ट आणि स्टारबोर्ड मोटर्स, बोथ प्लेन्स टू डाइव्ह ” मी परत खाली जाण्यासाठी आज्ञा दिली. Officer of the Watch ने माझी आज्ञा प्रोपल्शन कंट्रोलरकडे पुन्हा संक्रमित केली. नियंत्रण प्लेन्स (विमानात लिफ्ट प्रमाणेच) प्रोपेलर्सच्या अगदी थोड्या अंतरावर आहेत आणि म्हणूनच प्रोपेलर्सच्या प्रवाहा मुळे प्लेन्स अधिक प्रभावी ठरतात. प्रोपेलर्सचा जोर वाढल्याने मला कंपने जाणवू लागली पण तरीही पाणबुडी" खोली" गमावत राहिली- हळूहळू आपोआप वर येत राहिली. मी आज्ञा केली ‘फ्लड कॉम्प -२ ( There are two Compensating Tanks for adjusting trim)२ क्रमांकाच्या कप्प्यात/ टाकीत अर्धा टन पाणी भरा. २ क्रमांकाच्या टाकीमध्ये पाणी भरण्यास जबाबदार असलेले वरिष्ठ नाविक पॅनेल चीफला OOW ने पुन्हा सांगितले. “फ्लड कॉम्प -२ अर्धा टन” मी आदेशाची पुनरावृत्ती केली, तेंव्हा तेथे असलेल्या पॅनेलवरील ट्रिम इंडिकेटरचा संदर्भ घेऊन पाणबुडी क्षैतिज स्थितीत (शून्य ट्रिम/ आडवी) परत येण्यासाठी प्लेन-नियंत्रण करणारा नौसैनिक आधीच प्लेन्स च्या नियंत्रणासाठी झगडत असल्याचे मला दिसले. पाणबुडी ट्रिम हे विमानाच्या जॉय स्टिकप्रमाणे पुल पुश कंट्रोलचा वापर करून फॉरवर्ड आणि आफ्ट प्लेनद्वारे नियंत्रित केले जाते. हायड्रो-डायनेमिक्स आणि सबमरीन कंट्रोल सिस्टम व्यवस्थित काम करत असल्याचे दिसत नव्हते आणि वागली नियंत्रणाला विचित्र आणि हळू हळू प्रतिसाद देत होती. जर हे असेच चालू राहिले जर आम्ही पृष्ठभागावर आलो असतो तर त्याचे परिणाम गंभीर आणि अकल्पनीय झाले असते. या धोकादायक परिस्थितीत जाण्याच्या कल्पनेने मला वातानुकूलन असूनही घाम फुटू लागला. ‘ सर्व कंपार्टमेंट्स ची तपासणी करा" असा आदेश मी दिला . माझा आवाज तणावग्रस्त आणि कंट्रोल रूमच्या आवाजाच्या मर्यादेपेक्षा खूपच जास्त होता. माझ्या आज्ञेची दक्षता दलाच्या अधिकाऱ्याने (OOW) इंटरकॉमवर पुनरावृत्ती केली. मला जहाजावरील प्रत्येक माणूस पाणबुडीच्या प्रत्येक भागास वरपासून खालपर्यंत आणि डावी उजवीकडे असे चतु:सीमा कसून पाहणाऱ्या पहारेकऱ्यांप्रमाणे फिरत असल्याची कल्पना आली. एक-एक करून त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्थानकांमधून ‘ऑल करेक्ट’ नोंदवण्यासाठी कॉल केला. शेवटच्या माणसाने कॉल करेपर्यंत ओ ओ डब्ल्यू ने चेक सूचीमधील प्रत्येक नोंद तपासली. “सर्व कंपार्टमेन्ट्स बरोबर चेक केले”(ऑल करेक्ट), अशी माहिती त्यांनी मला दिली. मी OOWकडून कॉन ताब्यात घेतल्यापासून काही मिनिटे उलटून गेली होती. आजूबाजूच्या लोकांना थंडी वाजत असताना मला माझ्या केसांवर घाम जाणवू लागला. मी ऑर्डर केली, “फ्लड कॉम्प -२, एक टन”( २ क्रमांकाच्या टाकीत १ टन पाणी भरा) कॅप्टनच्या आपत्कालीन परिस्थितीत डोके बर्फासारखे थंड ठेवण्याची अपेक्षा होती आणि इथे मला एकदम घाम फुटला होता. मी स्वत: चा नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या मुठी आवळल्या . “फ्लड कॉम्प -२ एक टन”, मी परत गरजलो हि पाणी आत घेण्याची प्रक्रिया बराच काळ चालू होती परंतु वागली हळूहळू वरच येत होती. शेवटी ‘वागली, प्रिये, माझे ऐक’, मी पाणबुडीशी हळूच "निःशब्दपणे" बोललो आणि माझ्या "आंतरिक इच्छे"ची सूचना पाणबुडीला देऊन तिला स्वत: वर जाण्यापासून रोखण्यासाठी विनवणी केली. असे वाटले की प्रिय "वागली"ने खरंच माझे म्हणणे ऐकले. खूप हळू हळू तिने वर जाणे बंद केले आणि ती खाली येऊ लागली. ‘50 मीटर खोलीवर परत जा’, मी आदेश दिला. एक्स -ओने माझी मागणी पुन्हा केली. माझ्या तणावात रॉबिन आलेला मला जाणवला हि नाही. त्याने शांतपणे येऊन OOW कडून पदभार स्वीकारला होता हे माझ्या लक्षात आले नाही. मी आतापर्यंत रोखून ठेवलेला श्वास हळू हळू सोडला, रॉबिनचे माझ्याशेजारी साथीला नुसते असणे हे सुद्धा खूप धीर देणारे होते. परत ५० मीटर खोलीवर स्थानापन्न होण्यासाठी आमच्या पूर्वीच्या शांत गतीने गस्त घालण्यास सुमारे तीस मिनिटे लागली. आम्ही समुद्रात 25 टन अतिरिक्त पाणी बोर्डात घेतले होते. मला त्यामागचे कारण समजू शकले नाही. मला असे आढळले की अॅगी आणि श्रीकांतसुद्धा शांतपणे कॉनमध्ये आले होते आणि मागे अजिबात आवाज न करता शांतपणे उभे होते. ‘ओओडब्ल्यू टेक द कॉन’, रॉबिनला मी "नियंत्रण घे" असा आदेश दिला. मी दोन ग्लास थंड पाणी प्यायलो. पाणी पिई पर्यंत माझी विचारधारा पुढे चालत होती. मी वॉर्ड रूममध्ये माझ्या मागून येण्यासाठी माझ्या टीमच्या प्रमुखाना आदेश दिले व होकार दिला. माझ्या टीमच्या कर्णधारांच्या चेहऱ्यावर , "काय झाले?" असे प्रश्न चिन्ह मला दिसत होते. मी हसलो.तेही माझ्याबरोबर हसले. कदाचित तणाव शिथिल झाला म्हणून असेल.‘होतं असं कधीकधी ’, मी काहीशा बेफिकिरीने खांदे उडवत टिप्पणी केली. LET US WAIT AND WATCH ‘आपण थांबू, प्रतीक्षा करू आणि पाहू या’ असे दर्शवित मी माझ्या स्वतःच्या बंकवर परत गेलो. अगदी तब्बल एक तासानंतर, या वेळी उलट दिशेने वागलीने पुन्हा गैरवर्तन करण्यास सुरवात केली. तिचे नाक खाली जायला लागले आणि तिने खोल जाण्यास सुरवात केली. ती हळू हळू जास्तच खोल जाऊ लागली. मी माझ्या केबिनमध्ये असलो तरी हे मला लगेच जाणवले आणि मी ताबडतोब कंट्रोल रूममध्ये आलो. OOW ने ताबडतोब ‘अॅक्शन स्टेशन’ साठी क्लेक्सन( बिगुल) वाजविला. सर्व क्रू मेंबर्स, अगदी झोपी गेलेले सुद्धा, आपापल्या कामाच्या ठिकाणाकडे धावले. एक्सो. रॉबिन अगदी माझ्या मागे कंट्रोल रूममध्ये आला होता. माझ्या डोळ्याच्या कोपऱ्या तून मला दिसले की अॅगी आणि श्रीकांतसुद्धा कोपऱ्यात उभे राहून मूकपणे पाहत होते. मी प्रभारी माणूस (IN CHARGE) होता आणि प्रत्येकाचे लक्ष माझ्यावर होते आणि त्यांची अपेक्षा होती की मी वागलीवर नियंत्रण ठेवून आपले काम करून घ्यावे. पण वागली मात्र गैरवर्तन करीत होती. त्वरित आम्ही एका उलट्या प्रक्रियेत गेलो, एका तासापूर्वी केलेल्या सर्व कामांच्या बरोबर उलट. सर्व पंप कॉम्पॅक्ट -२ मधून पाणी बाहेर टाकण्यास सुरवात करण्यात आले. वागलीला हलके बनविण्यासाठी, कॉम्प्रेस्ड हवेने टाक्या भरण्यास सुरुवात केली. परंतु हे सर्व चालू असूनही वागली हळू हळू अधिक अधिक खाली जात राहिली. जरी पंप त्यांच्या रेट केलेल्या क्षमतेवर कार्य करीत असले तरीही हि प्रक्रिया इतकी हळू चालत होती कि प्रत्येक मिनिट 10 मिनिटांसारखे असल्यासारखे भासत होते. डेप्थ गेजवरील सुई लाल निशाणाच्या दिशेने सतत जात होती. रेड मार्कने जास्तीत जास्त परवानगी योग्य, डायव्हिंग खोली, क्रशिंग खोली ""यापुढे मृत्यू " दर्शविणारी खोली अशा एक एक टप्प्यात जायला सुरुवात केली. कॉन मधील प्रत्येक दृष्टी खोली दर्शवणाऱ्या सुईकडेच पापणी सुद्धा न फडकवता पाहत होती. सुई हळू हळू खाली खाली जात राहिली आणि आता आणखी ५० मीटर आणि वाग्ली तिच्या (क्रशिंग डेप्थ) चिरडून जाण्याच्या खोलीवर पोहोचेल. म्हणजे वागली वरील सभोवतालच्या पाण्याच्या दाब तिच्या प्रेशर हल वर इतका दबाव येईल कि ती एखादे अंडे चिरडून गेल्यासारखी चिरडली जाऊन तिला समुद्राच्या तळाशी "त्वरित निर्वाण" मिळेल. परिस्थिती इतकी ताणली गेली होती की, माझ्या तोंडचे कोणतेही शब्द हे तेथील नौसैनिकांनी त्रिकाल अबाधित सत्य म्हणून स्वीकारले असते. मी दिलेला प्रत्येक आदेश सर्वजण विचार, सूचना किंवा मतभेद न करता जसाच्या तसा ताबड्तोबी अमलात आणतील अशी स्थिती होती. माझ्या घाईघाईने घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने वागली आणि तिच्यातील नौसैनिक याना कायमची जलसमाधी मिळेल अशी स्थिती निर्माण झाली होती आणि आमचे प्राण एखाद्या अत्यंत नाजूक अशा तंतूवर अवलंबून होते. डेप्थ गेजवरील सुई लाल चिन्हाच्यापासून केवळ 10 मीटर वर होती. ‘सेंटर ग्रुपच्या टाक्यांमध्ये हवा फुंकण्यासाठी तयार रहा’, मी आदेश दिला. सेंटर ग्रूप टाकी ही सर्वात प्रमुख स्थैर्य देणारी टाकी असते ज्यात सर्व पाणी बाहेर टाकून वेगाने हवा भरली तर वागली पाण्यात बुडवलेल्या हवेच्या फुग्यासारखी एकदम वरच्या दिशेने वेगाने उधळली जाईल किंवा पाण्याखालून डागल्या जाणाऱ्या ते पोलारिस या अणु क्षेपणास्त्राप्रमाणे सरळ सोट आकाशाकडे उंचावेल. मी आवाजात जितकी शांतता आणि ठामपणा आणता येईल तेवढा आणून ऑर्डर देत होतो. मी खांद्यावर हात ठेवून पॅनेल चीफला (हाय प्रेशर एअर पॅनेलचा प्रभारी वरिष्ठ नाविक) सांगितले, ‘तयार राहा आणि मी म्हणेन "आत्ता ( DO IT ONLY WHEN I SAY "NOW") त्या क्षणी कृती करा’, माझ्या हातात असलेला हा शेवटचा पर्याय (ट्रम्प कार्ड) होते. उच्च दाबाच्या नळकांड्यात (High Pressure bottles) एका चौरस सेमी ला 200 किलोग्रॅम २०० kg /sq.cm दाब असतो. तुलनेसाठी --आपल्या घरच्या गॅस सिलिंडर मध्ये ५ ते ६ kg /sq.cm इतका दाब असतो कंट्रोल रूमच्या अगदी गच्चडी असलेल्या छोट्या जागेत माझे कुजबुजणे सुद्धा किंचाळल्यासारखे सर्वाना ऐकू येत होते. मी रॉबिनकडे पाहिलं. पण तो शांत आणि धीरोदात्त होता, डोळे चमकदार आणि स्थिर, कोणत्याही भय भीतीचा लवलेशही नाही. ‘मी तुझ्याबरोबर आहे कॅप्टन’ ’असं सांगण्यासाठी त्याने काही मिलिमीटरने डोकं हलवलं. माझ्या पूर्वीच्या नौदलातील अनुभवामुळे आणि शहाणपणाने मला जे काही करायचे आहे ते करण्याची हिम्मत दिली. जर मी मध्यभागी असलेल्या स्थैर्य देणाऱ्या टाक्यात हवा भरली तर, वागली एकदम समुद्राच्या पृष्ठभागावर येईल आणि त्यानंतर शत्रूच्या सीमेच्या आत पृष्ठभागावर आलेली पाणबुडी म्हणजे हातात आलेलं लंगडं सावज असल्यासारखं होईल. आपल्या देशासाठी ती एकाच वेळी प्रलयकारी व लाजीरवाणी परिस्थिती असेल. आता माझ्याजवळ बुडत्याला काडीचा आधार किंवा ‘हॉब्सन्स चॉइस’ म्हणजेच एवढाच शेवटचा पर्याय उरला होता. कंट्रोल रूममधील प्रत्येकाचे डोळे ‘खोलीमापक सुईवर होती. मला कल्पना होती की वागली पाणबुडीवरील कंट्रोल रूमच्या व्यतिरिक्त असलेल्या प्रत्येक क्रू स्टेशनमध्ये प्रचंड दबाव होता. सर्वजण एकांतात (समुद्राच्या देवता) वरुण देवाला साकडे घालत असतील कि हे वरूण देवा आणि कर्णधाराला सदबुद्धी धैर्य आणि आत्मविश्वास दे आणि वागलीला आमच्या प्रार्थने प्रमाणे काम करण्याची प्रेरणा दे. आतापर्यंत वेगाने लाल निशाणाच्या दिशेने जात असलेली खोलीमापक सुई आता अधिक हळूहळू जाऊ लागली होती. वागली अत्यंत ताणलेल्या धातूमधून कसे येतात तसे चित्र विचित्र आवाज काढत होती. सर्व खलाशी ऍक्शन स्टेशनवर होते. माझ्या पोटात मोठा खड्डा पडला होता, आणि तणावामुळे शरीरात वेगाने फिरणारे ऍड्रीनालिन मुळे माझी नाडी घोड्याच्या वेगाने चालत होती. माझ्या हृदयात खोल कुठेतरी मला अतीव एकटेपणा व वेदना जाणवत होती. मी घाबरलो होतो पण तसे दर्शवणे मला शक्य नव्हते कारण मी या संपूर्ण टीमचा धीरोदात्त आणि महासागरासारखा शांत असा प्रमुख असलो पाहिजे( निदान दिसलो तरी पाहिजे).तसे दिसण्यासाठी मी खोल श्वास घेतला छाती फुगवली आणि आपले पोट आत घेतले आणि सर्वाना आश्वासक असे हसलो. खोली मापक सुई ने धोक्याची लाल खूण गाठली (रेड मार्क ‘क्रशिंग डेप्थ’) गाठली. पण माझ्या अंतर्मनातील आवाजाने मला सांगितले ‘फुंकू नका, थांबा’. काही सेकंदच गेलॆ असतील पण ते सेकंद सुद्धा तासांसारखे भासत होते पण वागलीने बहुधा माझा आतला आवाज ऐकला. खोली मापक सुई अचानक लाल निशाण्यावर थांबली आणि ती तशी अर्ध्या एक मिनिटासारखी थांबली. हे अर्धे मिनिट सुद्धा एखाद्या युगासारखे भासत होते.यानंतर हि खोली मापक सुई अचानक उलटी फिरू लागली मी रोखून धरलेला श्वास सोडला आणि परत एक दीर्घ श्वास घेतला. बर्याच काळापासून माझा श्वासोच्छवास बंद असल्याची आणि आता माझा श्वास मोकळा झाल्याची मला संवेदना होऊ लागली. मग वागली वर येऊ लागली. प्रथम अगदी हळू आणि नंतर अधिक वेगानं ती वर येऊ लागली. वागली परत नियंत्रणाखाली येण्यासाठी म्हणजेच फार वेगाने वर पृष्ठभागाकडे जाऊ नये म्हणून कॉम्पॅंकच्या टाक्यांमध्ये पुन्हा पाणी भरण्याचे आदेश देण्यात आले. सर्वच्या सर्व नौसैनिकांनी सुटकेचा श्वास टाकला होता आणि त्यांनी दुप्पट उत्साहाने काम करायला सुरुवात केली 15/20 मिनिटांच्या अशा उत्साहाने केलेल्या कामामुळे आम्ही परत 100 मीटर आणि नंतर 50 मीटर खोलीवर आलो. सर्वांच्या चेहऱ्यावर आता समाधान आणि सुटकेचे स्मितहास्य होते. अशा बिकट परिस्थितीत गर्भगळीत न होता स्थिरबुद्धी ठेवणाऱ्या धैर्यवान नेत्यांच्या परंपरेत जन्माला आलेल्या करड्या लष्करी अधिकाऱ्यांसारखे असणारे रॉबिन, अॅगी आणि श्रीकांत हे धैर्यवान सहकारी असणे हि माझ्यावर देवाची कृपाच होती. जरी वागली नुकतीच अज्ञात आणि कल्पनातीत अशा भयानक आजारातून उठली होती तरी त्यावरचे सर्व लढाऊ आणि धाडसी नौसैनिक आता आपले दिलेले मिशन पूर्ण करण्यास तयार होते. कारण नेमून दिलेले काम अर्धवट सोडून पळून जाणे हे कुणाच्या रक्तात नव्हतेच. प्रत्येकी चार क्लिअरन्स डायव्हर्स असलेल्या चार रबरी बोटी (जेमिनी) भर मध्यरात्री बट्टी कोलोआच्या किनाऱ्याजवळ चार अगोदर ठरलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. पाण्याची खोली, मातीची स्थिती, भरती आहोटीची पातळी, किनाऱ्यावर असलेली वस्ती, (शत्रू ?) श्रीलंकेच्या किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या चौक्या, हल्ला करायचा झाला तर येऊ शकणारे संभाव्य अडथळे अशी सर्व माहिती काढण्यासाठी हे १६ जण पाठवले होते. दोन रात्री ते टेहळणी करण्याचे काम करत होते त्यानंतर भर मध्यरात्री त्यांना परत पाणबुडीवर घेण्यात आले. आम्ही आमचे ध्येय संपूर्ण गुप्तेतेने पूर्ण केले आणि खुल्या समुद्रासाठी प्रयाण केले. काही काळाने आम्ही महासागरात आंतरराष्ट्रीय हद्दीत परत आलो. आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गापासून दूर गेल्यावर मी “अमेथिस्ट” - हा नेमलेले काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठीचा (कोड वर्ड) परवलीचा शब्द "रेडिओ" केला आणि विशाखापटणम कडे कूच केले. ३२ तासानंतर आम्हाला भारतीय नौदलाच्या एस्कॉर्टने संपर्क केला आणि त्यांच्या संरक्षणाखाली आपल्या सागरी हद्दीत प्रवेश करून आम्ही पृष्ठभागावर आलो आणि एस्कॉर्टसह होम पोर्टकडे (विशाखापटणम) परत सुरक्षितपणे प्रस्थान केले. अर्थात नौदलातील अशा आनंदी कथा होम पोर्टमध्ये अचानक संपत नाहीत. तेथे तातडीने (court of inquiry) न्यायालयीन चौकशी होते. सर्वांना कसून प्रश्न विचारले गेले आणि आमच्या कृती, सामर्थ्य, निर्णयक्षमता, कणखरपणा आणि कमकुवतपणाचे पुनरावलोकन करण्यासाठी (आजच्या भाषेत SWOT ANALYISIS सारखे) सर्वांकडून विशेषत: रॉबिन, अॅगी, श्रीकांत आणि माझ्या स्वत:कडून पूर्ण चौकशी होऊन निवेदने घेण्यात आली. वागलीचे संवेदक (सेन्सर) बाहेर काढले गेले आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. सबमरीन शाखेच्या वरपासून खालपर्यंत प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की वारंवार काहीही चुकीचे नसताना वागलीने असे गैरवर्तन(?) का केले. याव्यतिरिक्त आम्ही संकलित केलेल्या डेटासाठी इंटेलिजन्स डिब्रीफ (गुप्त माहितीचे विश्लेषण) ही होती. आम्ही जिथे गेलो होतो त्या ठिकाणी परत गुप्त तपासणी केली गेली. निष्पाप आणि निरागस दिसणाऱ्या मत्स्यहारांच्या होडक्यांत (फिशिंग ट्रॉलर्स मध्ये) जटिल समुद्रशास्त्रीय उपकरणे नेऊन तेथील परिस्थितीचे गपचूप विश्लेषण केले गेले. शेवटी हे उघड झाले की हा प्रदेश समुद्रतळातील ज्वालामुखीय विस्फोट(VOLCANIC ERUPTIONS) होण्याचा धोका असलेला प्रदेश होता. अशा एखाद्या समुद्राच्या तळावरच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने वागली वर उचलली गेली आणि त्याची भरपाई म्हणून आम्ही एक असामान्य असे 25 टन अतिरिक्त समुद्राचे पाणी टाक्यात घेतले. आम्ही पुढे जात असताना ज्वालामुखीच्या क्षेत्राबाहेर पाण्याचे तापमान, क्षारता आणि घनता अचानक बदलली असावी, ज्यामुळे वागली खूपच अनियंत्रित झाली आणि तळाशी जाऊ लागली. ज्या भागात आम्ही गुप्त तपास करायला गेलो त्या भागात खोल समुद्रातील ज्वालामुखीय प्रक्रिया आणि पाणबुडीचे काम धोक्यात आणणारे अनपेक्षित आणि आडाखे चुकवणारी असंख्य समुद्रशास्त्रीय वैशिष्ट्ये अस्तित्वात आहे आणि यामुळे आपल्या जहाजात अनाकलनीय परिणाम होऊ शकतात हा सर्वांना धडा मिळाला. पुढे बर्याच (१८) वर्षांनंतर २००४ मध्ये अशीच खोल समुद्र ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळे विनाशकारी त्सुनामी आली होती. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की त्सुनामी येण्याच्या वेळेस कोणतीही आपली पाणबुडी आणि त्यात असणारे शूर नौसैनिक त्या भागात भटकत/ गस्त घालत नव्हते. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असले तरी, नौदलाकडून फॉक्सट्रॉट वर्ग पाणबुडीतील शेवटच्या आयएनएस वागलीच्या सेवानिवृत्तीच्या(DECOMMISSIONING) कार्यक्रमास मला बोलावण्यात आले होते. तेथे अनेक तरूण, उत्साही आणि हुशार असे कडक पोशाख घातलेले पाणबुड्यांतील स्मार्ट नौसैनिक यांची परेड होती. वागली पण आता माझ्यासारखी "महासागराच्या खोल अंधाऱ्या कोपऱ्यात गस्त घालण्यासाठी आणि तेथून आम्हाला झगमगाटाचा जगात परत आणण्यासाठी" खूप जुनी पुराणी झाली होती. माझ्या जुन्या जहाजाच्या काही सोबतींसोबत आम्ही वागली च्या प्रांगणात गेलो, तिला प्रेमाने स्पर्श करत तिच्या आसपास जात जुने दिवस आठवत होतो, माझ्या आयुष्याच्या उर्जित आणि तारुण्याच्या काळातील एकत्रित आनंदी, समृद्ध आणि अभिमानाच्या आठवणींनी माझे मन भरुन गेले. आमच्या वेळचे सर्व धाडसी पुरुष आता निवृत्त झाले आहेत आणि आता जगभरात विखुरले आहेत, त्यांच्यातील काही आता जिवंतही राहिले नाहीत. पण बाकी माझ्यासारख्या सर्व लोकांना या गूढ जगाची सुंदर अशी आठवण परमेश्वर चरणी विलीन होई पर्यंत राहीलच. नंतर मी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले पण सबमरीन सर्व्हिसमध्ये असलेला परस्परांमधील जिव्हाळ्याचा , स्पिरिट डी कॉर्प्सचा, रोमँटिक साहसातील अनुभवाचा आनंद मला कुठेही मिळाला नाही. आम्ही क्षुद्र हेवे दावे मत्सर यापासून दूर होतो. मला आठवते की एक रात्री आवाजरहित स्थितीत हळू मार्गक्रमण करणाऱ्या दुसर्याे एका पाणबुडीवर मी शांत समुद्रात चमकणाऱ्या चंद्रकिरणांचे प्रतिबिंब पाहत उभा होतो तेव्हा मला एक अनोखी आणि विलक्षण जाणीव झाली की “खाली पाणबुडीत असलेला प्रत्येक माणूस माझा भाऊ होता”. आजही मी जेंव्हा पाणबुडीचा बॅज परिधान केलेला नौसैनिक पाहतो तेंव्हा त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास विसरत नाहीच.

वाचने 22381 वाचनखूण प्रतिक्रिया 43

चौकस२१२ Wed, 04/15/2020 - 10:27
डॉक्टर साहेब हा लेख / अनुभव वाचून मला आठवले नात्यातील एका मुळे पूर्वी मला २ भारतीय पाणबुड्यांना भेट देता आली होती, नाव आठवत नाहीत पण एकीचे काहीतरी संस्कृतच होते.. खडग किंवा अश्या कुठल्या तरी शस्त्राचे ... एक होती थोडी जुनी अन मोठी रशियन बनावटीची आणि नंतर एक छोटी जर्मन बनावटीची ... दोन्ही डिझेल वरील .. त्यातून प्रश्न आला कि १) डिझेल इंजिन धुराचे काय करतात? दाबून ( कॉम्प्रेस ) करतात का? २) मदर शिप अशी काही व्यवस्था असते का? ३) शत्रूच्या सागरी हद्दीत म्हणजे किनाऱ्यापासून १२ किं. च्या आत कि अजून मोठी लक्ष्मण रेषा?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Wed, 04/15/2020 - 12:53
१) डिझेल इंजिन धुराचे काय करतात? दाबून ( कॉम्प्रेस ) करतात का? पाणबुडी पूर्ण पाण्याखाली असते तेंव्हा बॅटरीवरच सगळे काम चालते. पण काही काळानंतर या बॅटरी चार्ज करण्यासाठी डिझेल चे जनरेटर चालवावे लागतात. त्यासाठी लागणारी ताजी हवा हि बाहेरून घ्यावी लागते आणि त्यात निर्माण झालेला धूर हा बाहेर सोडावा लागतो त्यासाठी पाणबुडीला पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ यावे लागते. पाणबुडी अंधाऱ्या रात्री पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली २०-३० फूट राहून दोन नळकांडी(स्नॉर्केल) बाहेर काढतात. एकातून ताजी हवा आत घेतली जाते आणि दुसऱ्यातून डिझेलचा धूर बाहेर सोडला जातो. दुर्दैवाने दोन्ही नळकांडी जवळ असल्याने पाणबुडीतील हवेत डिझेलच्या धुराचा वास हा कायमचा तुमच्या पाचवीला पुजलेला राहतो. २) मदर शिप अशी काही व्यवस्था असते का? भारताकडे पूर्वी अम्बा नावाचे सबमरीन मदर शिप म्हणजे पाणबुडीला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणारे जहाज होते. २००६ साली ते मोडीत काढल्यावर असे विविक्षित(DEDICATED) जहाज आपण घेतल्याचे ऐकिवात नाही. सध्या भारतीय नौवहन निगम (SHIPPING CORPORATION OF INDIA) चे साबरमती हे जहाज यासाठी वापरले जाते.त्यात खोल पाण्यातून पाणबुडी सैनिकांना बाहेर काढण्यासाठी असलेले वाहन ठेवलेले आहे. https://economictimes.indiatimes.com/news/defence/navy-inducts-deep-submergence-rescue-vehicle/articleshow/67056580.cms?from=mdr ३) शत्रूच्या सागरी हद्दीत म्हणजे किनाऱ्यापासून १२ किं. च्या आत कि अजून मोठी लक्ष्मण रेषा? होय, किनाऱ्यापासून १२ किलो मीटर पर्यंत

तेजस आठवले Wed, 04/15/2020 - 14:35
पाणबुडी जेव्हा सगळ्या यंत्रणा बंद करून 'शांतपणे' बसलेली असते, तेच तिचे भारतीय नौदलाबरोबर संदेश देवाणघेवाण कार्य कसे होते? समजा पाण्याखालून संदेशवहन केले जात असेल तर ते नौदल यंत्रणा/रडार पाण्याखालीच पकडतात की कसे? शत्रूच्या हाती असे सिग्नल्स लागू शकतात का? जेव्हा पाणबुडीला वर यायचे असते तेव्हा तिच्या टॅन्कमध्ये हवा भरून वर आणले जाते. मग पाणबुडी खाली असताना ही हवा सिलेंडर मध्ये वगैरे साठवून ठेवतात का?

गामा पैलवान Wed, 04/15/2020 - 19:57
खरे डॉक्टर, काय भयंकर कथा आहे. कॅप्टन आगाशे व त्यांच्या चमूच्या धैर्यास कड्डक अभिवादन! वागली अशी का वागली यावर थोडा विचार केला. जर पाण्याखालच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर पाणी गरम होऊन हलकं म्हणजे कमी घन व्हायला पाहिजे. अशा वेळेस वागली जड होऊन तळाच्या दिशेने जावयास हवी. मात्र या प्रसंगी नेमकं उलट होऊन ती वर जाऊ लागलीये. याचा अर्थ उद्रेकामुळे किंवा काही अन्य कारणामुळे पाणी अधिक घट्ट झालं. हे का झालं असावं हे कोडंच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे गुरुवार, 04/16/2020 - 12:15
गा पै साहेब ज्वालामुखीपासून जर आपली पाणबुडी १-२ किमी दूर असेल तर ज्वालामुखी जवळील गरम पाणी पाणबुडी असलेल्या क्षेत्रात जाई पर्यंत वेळ लागेल परंतु ज्वालामुखीतून तयार होणाऱ्या दाबाच्या लाटा फार लवकर पोहोचतील. त्या लाटांमुळे पाणबुडी वर उचलली जाणे हे सहज शक्य आहे. अर्थात हा सर्व तर्क आहे आणि पश्चातबुद्धीने सर्वच लोक बरोबर असतात.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान गुरुवार, 04/16/2020 - 13:45
खरे डॉक्टर, अधिक दाबाच्या लाटांनी वागलीस वर ढकललं असू शकतं, हे मलाही पटतं. मात्र यातनं दुसरा प्रश्न उद्भवतो. प्रस्तुत ठिकाणी काँटिनेण्टल शेल्फचा उतार तीव्र आहे. म्हणजेच उद्रेकजन्य लाटा बऱ्याच खोलवरून येताहेत. तरीही त्यांच्यात बराच जोर दिसतो आहे. अन्यथा त्या विरून गेल्या असत्या. इतका जोर असेल तर त्या लाटांचे पाण्याच्या पृष्ठभागावर बाह्य परिणाम दिसायला हवेत. परंतु ते ही दिसंत नाहीत. काय गौडबंगाल आहे? टोटल लागंत नाही. पश्चातबुद्धीने सगळेच बरोबर असतात, ते तुमचं निरीक्षण अत्यंत समर्पक आहे. मात्र त्यासाठी योग्य प्रश्न विचारावे लागतात. तर प्रस्तुत प्रसंगी योग्य प्रश्न काय असावा, इतकाच माझा मुद्दा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुबोध खरे गुरुवार, 04/16/2020 - 19:30
गा पै साहेब मी माझ्या पश्चातबुद्धी (RETROSPECTIVELY) बद्दल बोलत होतो. आपल्या नव्हे. गैरसमज नसावा__/\__. जेवढी माहिती मी लिहिली आहे तेवढेच ज्ञान मला आहे. त्यातून जल भौतिकशास्त्र (PHYSICS) आणि जलगतीकी(HYDRODYNAMICS) बद्दल आपल्याला माझ्यापेक्षा नक्कीच जास्त ज्ञान असेल( अभियंते असल्यामुळे). त्यामुळे जसे लिहिले आहे त्यापेक्षा मी अधिक काही लिहू शकणार नाही.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान Fri, 04/17/2020 - 02:20
खरे डॉक्टर, गैरसमज होऊ न दिल्याबद्दल आभारी आहे. या घटनेविषयी थोडा विचार करून माझं आकलन वेगळ्या संदेशात मांडेन. माझाही द्रायूशास्त्राचा अभ्यास फारसा नाही. केवळ पुस्तकी मर्यादेपर्यंतच आहे. प्रत्यक्ष कामाचा अनुभव नाही. पुनश्च धन्यवाद. आ.न., -गा.पै.

विजुभाऊ गुरुवार, 04/16/2020 - 12:43
पाणबुडीतल्या सैनीकांना प्रदीर्घ काळ कृत्रीम प्रकाशात राहिल्यामुळे आणि केवळ जवळचेच पहायला लागल्यामुळे तेथून बाहेर पडल्या नंतर दिसण्याचे किंवा चालताना अंतराचा अंदाज न येणे असे काही आजार होतात असे वाचले आहे. या बद्दल अधीक माहिती घ्यायला आवडेल. तसेच सर्व साधारण लश्करी लोकांचे होते तसे पाणबुडीतील सैनीकांना निवृत्ती नंतर बाहेरच्या सामाजीक जीवनात मिसळायला अडचणी येतात का? प्रदीर्घ काळ एकटे राहिल्यामुळे एकलकोंडेपणा किंवा तत्सम काही मानसीक अवस्थांचा सामना करावा लागतो का?

सस्नेह गुरुवार, 04/16/2020 - 19:49
श्वास रोखून धरणारी रोमांचकारी सत्यकथा ! नोदल आणि एकूणच सर्व भारतीय सैन्याला सलाम !!

गामा पैलवान Wed, 05/06/2020 - 18:57
लोकहो, ही सत्यकथा वाचून मला पडलेले काही प्रश्न लिहितो. १. पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बदललेली पाण्याची घनता : पूर्वी चर्चिलेला प्रश्न नोंदीसाठी परत लिहितो आहे. जर पाण्याखालच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर पाणी गरम होऊन हलकं म्हणजे कमी घन व्हायला पाहिजे. अशा वेळेस वागली जड होऊन तळाच्या दिशेने जावयास हवी. मात्र या प्रसंगी नेमकं उलट होऊन ती वर जाऊ लागलीये. नेमका प्रकार काय आहे? २. पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचा प्रवाह : वरील मुद्दा क्रमांक १ वर खरे डॉक्टरांनी अंदाज बांधला की उद्रेकाच्या लाटांमुळे वागली वर ढकलली गेली. हे खरं धरलं तर आजूनेक शंका उद्भवते. अशा लाटा निर्माण झाल्या असत्या तर पाण्याच्या पृष्ठभागावर हालचाली लगेच दिसून आल्या असत्या. मात्र तशा हालचाली दिसल्याची नोंद नाही. शिवाय हा प्रवाह जोराचा नसून खूप अलगद आहे. ज्वालामुखीचा उद्रेक इतका अलगद नसावा. खंडपदराचा ( = कॉण्टिनेण्टल शेल्फ) उतार तीव्र आहे. म्हणजे ज्वालामुखी बराच खोलवर असला पाहिजे. तर मग इतक्या लांब खोलीवरून इतका सलग व अलगद प्रवाह उत्पन्न करण्यामागे शक्ती कोणती? नेमका प्रकार काय आहे? ३. इतर पर्याय : वरील दोन पर्यायांच्या व्यतिरिक्त काही कारण असेल काय? गौडबंगालाची ( = कॉन्स्पिरसी थियरीची ) मदत घेऊया. समजा गुरुत्वविरोधी शक्तीमुळे हे झालं. तर मग या अँटी ग्रॅव्हिटी चा परिणाम वागलीतल्या वस्तूंवर व माणसांवर व्हायला हवा होता. विशेषत: माणसांवर. कारण ती सुटी होऊन हवेत तरंगू लागली असती. वा तशी काही जाणीव व्हायला हवी होती. कथेतून ती ही झाल्याचं दिसंत नाही. नेमका प्रकार काय आहे? असो. माझा तर्क सांगतो. मला वाटतं की वागली एखाद्या विद्युच्चुंबकीय वादळांत सापडली असावी. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस विवरावर खूपदा विद्यूच्चुंबकीय वादळ होतं. कदाचित उदेक नसतांनाही होत असेल. पृथ्वीवर ज्वालामुखीशिवाय इतर ठिकाणी अशी वादळं सर्रास होतात. अनेकदा विमानं त्यांत सापडल्याची नोंद आहे. पाणबुडी बहुधा पहिल्यांदाच सापडली असावी. अर्थात, वादळ झालेलं असावं माझा हा निव्वळ तर्क आहे. विद्युच्चुंबकीय वादळामुळे पाण्याची घनता कमी/जास्त होण्याचा संभाव आहे. हे जर खरं कारण असेल तर कॅप्टन आगाशेंच्या धैर्यास आजूनेक कडक अभिवादन करायला पाहिजे. कारण की अशा वादळांच्या वेळेस माणसांची मन:स्थिती दोलायमान होऊ शकते. हे विद्युच्चुंबकीय वादळ सौरवातामुळेही सुरू झालेलं असू शकतं. अवांतर गौडबंगाल : व्हियेतनाम युद्धाच्या वेळेस सौरवातामुळे खोल पाण्यातले सुरुंग अचानक फुटले होते ( संदर्भ : https://www.smithsonianmag.com/smart-news/did-huge-solar-storm-detonate-mines-during-vietnam-war-180970771/ ). पाकची गाझी ही पाणबुडी अशाच वादळांत सापडलेली असेल काय? ती नेमकी कशामुळे कशी बुडाली ते आजून स्पष्ट झालेलं नाहीये. असो. ज्या जिज्ञासूस पुढील अन्वेषण करायचं आहे त्याच्यासाठी एक आरंभबिंदू आखून देणे हा या संदेशामागे उद्देश आहे. आ.न., -गा.पै.

डॉ. सुधीर राजाराम देवरे गुरुवार, 06/17/2021 - 11:50
'चार लोकांमध्ये आपली प्रसिद्धी व्हावी हि हाव आपल्याला का आहे?' असं असेल म्हणूनच तुम्ही हे इतकं लिहिलं असं मलाही म्हणता येईल. पण मला असा उथळपणा शोभणार नाही. असो.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

चौकस२१२ Sun, 06/20/2021 - 11:10
डॉ देवरे ... आपली हि टीका अप्रस्तुत वाटते, डॉक्टर खरेंना अश्या कोणत्याही प्रसिद्धीची गरज आहे असे वाटत नाही खरंच तुमची गल्ली चुकली कि काय !

सुबोध खरे गुरुवार, 06/17/2021 - 12:23
हायला जळजळ किती? हा माझा लेख नाहीच. हि एका शूर नौदल अधिकाऱ्याची कहाणी माझ्याकडेव्हॉट्स अँप वर इंग्रजीत आली होती. त्यात असलेला कमांडर आगाशे यांचा भ्रमणध्वनी पाहून मी त्यांच्याशी बोलून या कथेची सत्यता पडताळून घेतली मी तिचे केवळ मराठीत भाषांतर केले आहे आणि केलेले भाषांतर त्यांच्याकडून मंजूर करून घेतले. तुम्ही फार तर असा म्हणू शकता कि भाषांतर भिकार आहे. ते "आपले मत" म्हणून मान्य करता येईल. कारण मी काही मराठी मध्ये पी एच डी केलेला डॉकटर किंवा प्राध्यापक नाही. मी आपला साधा रेडिऑलॉजीत पुणे विद्यापीठात एम डी केलेला डॉक्टर असून काही वर्षे लष्करात नोकरी केलेला अधिकारी आहे. मूळ कथाच भिकार आहे किंवा नौदलाचा तो अधिकारी भेकड आहे असे म्हणालात तर त्याचा माझ्याशी काय संबंध? बाकी आपलं चालू द्या.

डॉ. सुधीर राजाराम देवरे गुरुवार, 06/17/2021 - 12:24
वाचलेलं पुस्तक पुन्हा टाईप करून फालतू प्रसिध्दी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.

सुबोध खरे गुरुवार, 06/17/2021 - 12:31
जळजळ किती? इनो घ्या तात्पुरतं आणि चांगल्या डॉक्टरला दाखवा उगाच फालतू निष्क्रिय सज्जन डॉक्टरला नको

In reply to by डॉ. सुधीर राजा…

गॉडजिला Sun, 06/20/2021 - 13:17
ते म्हणजे अनावश्यक खुस्पट काढणे. त्यापेक्शा एक कचकन शिवी द्या अन मोकळे व्हा... अन दुस्रा लेख लिहा बरे ? तसेही खरे साहेब आपल्या अनुमाने फालतु व निषकीरीयह आहेत... तुमाले कंची भ्या ? की एखाद्या फालतु निषिक्र पण आपल्या नजरेत सपशेल चुक असणार्‍या व्यक्तीला साधी शिवी देण्यापेक्षाही जास्त निष्क्रीय सज्जनता आपल्यामधे आली आहे ? तसे आसेल तर तुम्ही स्वतः तुमच्या विचारांशी अप्रामाणीक ठराल. मग आहात ना तुम्ही तुमच्या विचारांशी क्रुतीतुन प्रामाणिक ? * शीवी साधिच हवी मिपाच्या अथ्वा संविधनाच्या ध्येय धोरणात न बसणारी नको अन्यथा आपण मिपावर बॅन तथा सायबर लॉ नुसार कायदेशीर कारवाइ या दोन्हीस पात्र ठरु शकता, याचे ध्यान ठेवुन स्वजबाबदारीवर माझा सल्ला अनुसरावा. उत्तराधिकारास माझा नकार लागु.

सौन्दर्य Sun, 06/20/2021 - 10:07
डॉक्टर सुबोध खरेंनी सुरवातीलाच म्हंटले आहे की त्यांना प्राप्त झालेली माहिती त्यांनी एका सत्यकथेच्या स्वरूपात मराठीत भाषांतर करून येथे मांडली व तसे करताना देखील शक्य तेव्हढी त्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. असे असताना "चार लोकांमध्ये प्रसिद्धी ..........................." वगैरे म्हणणे अप्रस्तुत आहे असे मला वाटते. उलट पाणबुडीतील आयुष्य, थरारक क्षण आपल्यापुढे आणल्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. बाकी तुमची मर्जी.