त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही.