Skip to main content

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

वाचने 275694
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

व्यनित जूसर कोणता वापरता, अशी पृच्छा झाली आहे, आम्ही खालील जूसर वापरत आहोतः अमेरिकेत BREVILLE juicer . पॅरिस मधे: BRAUN juicer . भारतातः OSTER juicer . परंतु यापैकी भारतातील आता जुना झाल्याने नवीन घेणे आहे. जूसर घेताना तो ७००-८०० वॉट चा असावा. फिलिप्स बजाज वगैरेंचे चांगले नाहीत. दिल्लीत सरसकट सर्व जूस विकणारे 'सुजाता' चा वापरतात. त्यांचा जूसर दिवसभर चालत असतो. त्यामुळे हा ८१० वॉटचा घेण्याचा विचार आहे: . Model Sujata Powermatic Juicer Mixer Grinder -Motor Heavy duty, universal type 810 watts अगदी नाइलाज असेल तेंव्हा सोडून दिवसातून एकदा तरी जूस पीणे हे रोजच्या दिनक्रमाचे आवश्यक अंग होऊ शकले तर उत्तम.

In reply to by चित्रगुप्त

ओके मी विचार करत होतोच की कोणता जुसर घ्यावा . आता सुजाताची चौकशी करतो . ( फ्लिपकारटं लय अव्वाच्या सव्वा रेट सांगतय . लोकल स्तोअर ला जाऊन विचारेन म्हणतो )

मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन. एक प्रश्न माझ्याकडून. इथे अमेरिकेत नेकेड जूस मिळतात जे पूर्णपणे नैसर्गिक असतात असा त्या कंपनीचा दावा असतो. घरी जूस बनवण्याला हे जूस पर्याय बनू शकतात का?

In reply to by श्रीरंग_जोशी

'नेकेड ज्युस'मध्ये तब्बल ३० ते ४० ग्रॅम प्रतिपोर्शन साखर असते. शीतपेयांइतकी किंवा अधिकच. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच उत्तम.

In reply to by नंदन

पूर्वी अधून मधून प्यायचो. या वर्षी एक दोनदाच पिले असेल. त्याचा कॅलरी काउंटही हाय असतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

हल्ली अमेरिकेत ऑर्गॅनिक, ऑल नॅचरल, ग्रास फेड, ग्लूटेन फ्री, यूएसडीए सर्टीफाईड, बायो, वगैरे शब्द वापरून नवनवीन महाग उत्पादने विकण्याची चलती आहे. नेटफ्लिक्स वर यांची बिंगे उघड करणारे सिनेमेही आहेत. मोठमोठ्या कंपन्या सिनेटर्सना कटात सामील करून घेऊन कायदे सुद्धा बदलायला कसे लावतात, वगैरे बरेच काही आहे. यावर दीपक चोप्रांनी सोपा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे कोणतेही 'पॅकेज्ड फूड' घेऊ नका. 'ऑनेस्ट वेट' मधे ज्वार-बाजरीच्या पीठापासून मध, विविध बिया, तेले आणी शेकडो प्रकारचे पदार्थ ताजे, सुट्टे मिळतात. ते घेणे बरे. जूस घरी केलेला ताजाच घ्यावा. फारतर काचेच्या बंद बाटलीत वरपर्यंत गच्च भरून फ्रीजमधे एकाद दिवस ठेऊन संपवावा.

In reply to by चित्रगुप्त

या माहितीकरता धन्यवाद. वरवर अंदाज होताच पण इतके नेमकेपणाने वाचले नव्हते यापूर्वी.

general motors co. ने त्यांच्या staff करिता सात दिवसांचा diet plan असाच केला होता,त्यात फळे, भाज्या इ सात दिवस ओळीने खायच्या आहेत , त्यात सुधा वजन चांगले कमी होते.

लग्नासाठी वजन कमी करायचे म्हणून. तिला तरी खूपच फायदा झाला. पहिले काही दिवस तिला थोडा डोकेदुखीचा त्रास झाला पण नंतर अतिशय energetic वाटत होते. मी कधीपासून करेन करेन म्हणत आहे पण अजून तरी केले नाहीये.

In reply to by लंबूटांग

जीएम डाएट मी पूर्वी दोनदा केले होते, तेवढ्यापुरते वजन कमी झाले होते, पुन्हा जैसे थे. फिस्टुला वर मात्र काहीही परिणाम झाला नव्हता.

असा आहार असताना दूध कितपत चालते हे कुणाला माहीत आहे का? माझ्या अंदाजानी कफ वाढेल रसाहारात दूध घेतले तर. अशाच प्रकारची शरीरशुद्धी , पोट साफ़ होणे हे कोरफडीच्या रसानी झालेले एकाकडून ऐकले आहे. त्याला ४ दिवस सकाळी १ लीटर रस पयाला लावला होता. बाकी दिवसभर हलका आहार, म्हणजे मऊ भात फ़क्त.

In reply to by कवितानागेश

कोरफडीचा रस अतिशय कडू असणार, त्यामुळे तो 'प्यायला लावला' हे योग्यच. भाज्या-फळांचा रस अतिशय छान लागतो, मुख्य म्हणजे त्यात 'आपल्याला' हवी असणारी पोषकद्रव्ये भरपूर असतात, पण 'परजीवी कृमी' ची उपासमार होते. रंगिबेरंगी भाज्या-फळे आणणे, स्वच्छ करणे, जूस काढणे आणि पीणे हा सर्व एक आनंददायक सोहळा असतो. वेळात वेळ काढून लावून घ्यावा असा हा उपयोगी छंद आहे.

रच्याकने. रक्तशुद्धी आणि टवटवीत त्वचेसाठी कडुनिंबाचा रस कसा काम करतो? त्याचे दुसरे परिणाम होत असल्याने कधीतरी ४ महिन्यातुन एकदा घेतो. -_-

आपल्याला आलेला अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणारा आपला लेख अतिशय प्रेरणादायी आहे. आपण वेळोवेळी सर्वांना आवश्यक ते मार्गदर्शनहि केले आहे. तरीहि माझी एक विचारणा... १) भाज्या २) फळं ३) गाजर, काकडी, बीट ह्यासारख्या कोशिंबीर वर्गातील भाज्या..... ह्या सर्वांचा वेगवेगळा रस घ्यायचा , म्ह॑णजे फक्त भाज्यांचा, फक्त फळांचा ह्याप्रमाणे रस घ्यायचा की काहीहि एकत्र करून, वरून त्यात दही घालून वगैरे... असा रस घ्यायचा?

In reply to by अनिता ठाकूर

@अनिता ठाकूरः जो क्रॉस यांचा मुख्य भर हिरवा रस घेण्यावर आहे. सुमारे २/३ भाज्या आणि १/३ फळे घ्यावीत, असे त्यांचे म्हणणे. जर दिवसभर रस घ्यायचा असेल, तर वेगवेगळी मिश्रणे करू शकतो. एकदाच घ्यायचा असेल, तेव्हा सर्व एकत्र करू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यात 'कोशिंबीर वर्ग' वगैरे काही नाही (बाकी आणखी कोणकोणते 'वर्ग' आहेत ? हे वर्गीकरण कोणत्या आधारावर केलेले आहे ?) खालील दुव्यावर विविध जूसांच्या कृती मिळतीलः http://www.rebootwithjoe.com/category/juice/ दही मिसळून करण्यासाठी मी जूसरमधून निघणारा वाटीभर चोथा काढून ठेवतो. त्यात केळे, एकादे फळ, वगैर घालून पातळ लस्सी/स्मूदी करतो.

जबरी आहे हा अनुभव. करुन पाहिला पाहिजे एकदा

कालसर्प वियोग हा शब्दप्रयोग आवडला. अविश्वसनीय वाटावा असा आपला प्रेरणादायी स्वानुभव असल्याने विशेष वाटले.पोटाचे आरोग्य व तुमचा उत्साह याचा अतूट संबंध आहे. म्हणूनच आहार विहाराच गणित ज्याला जमत तो उत्साही व आरोग्यदायी असतो.

छान लेख. वाॅटर थेरपी सुद्धा चांगली असते.

In reply to by चित्रगुप्त

वॉटर थेरेपी मी केली आहे. हायपर अ‍ॅसिडिटी आणि अल्सर ह्या दोन्ही विकारांनी त्रस्त असताना, एका गुजराथी पेपरात वाचल्यानुसार, वॉटर थेरेपी केली होती. सकाळी चार मोठे ग्लास (स्टीलचे उंच पेले) साधारण सव्वा ते दिड लिटर पाणी दात घासायच्या आधी प्यायचे. नंतर दात घासायचे पण दोन तास कांही खायचं प्यायचं नाही. अगदी चहाही नाही. चार-पाच वेळा लघुशंकेसाठी जावे लागते. दोन तासांनतंर तुम्ही चहा नाश्ता करू शकता. तीन आठवड्यात अ‍ॅसिडिटीही गेली आणि अल्सरही गेला. आजतागायत काही त्रास नाही. पथ्यही फारसे कांही नाही. लागोपाठ जागरणं आणि मद्यपान टाळतो. नंतर सहा वर्षांनी सिगरेट सोडली.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाकी सर्व ठीक आहे पण दात न घासण्याचे शास्त्रीय कारण सापडत नाही. रात्रभर तोंडात लाळ तयार होत नसल्याने तोंड साफ होत नाही तेथे जीवाणूंची वाढ होत राहते. (रुग्णालयातील रुग्णाच्या तोंडाला येणारा विशिष्ट वास हा अशा जीवाणुंच्या वाढीने येतो) तोंड स्वच्छ न करता पाणी पिणे म्हणजे तोंडातील घाण परत पोटात ढकलणे आहे. मी माझ्या रुग्णांना स्वच्छ दात घासून पाणी प्या असा सल्ला देतो. फक्त त्यात १ लिम्बाचा रस आणि मधुमेह नसेल तर एक चमचा मध घालून थोड्याशा कोमट पाण्यातून प्यायला सांगतो. याचा पोटाचा विकार असणार्या बहुसंख्य लोकांना थोडा तरी फायदा होतोच. ज्याला हृदयाचा कोणताही आजार असेल त्याने मात्र आपल्या हृदयरोगतज्ञाला विचारूनच हा उपाय करावा. सव्वा ते दीड लिटर कोमट पाणी ( लिंबू आणि मध घालून) प्यायल्यामुळे आतड्याला चालना मिळते. याचा बद्धकोष्ठ असलेल्या लोकांना फायदा होतो. रात्रभरात मूत्रपिंडे लघवी घट्ट(concentrate)/ संतृप्त करतात त्याचा निचरा भरपूर पाण्याने होतो. वरील उपायाने माझ्या आजोबाना असलेली गंधर्व हरीतकी सारख्या रेचकाची जुनी आणि हट्टी सवय(२० वर्षाची) पूर्ण गेली.

In reply to by सुबोध खरे

ह्या थेरपीत 'दात न घासता' ची अट का आहे हे मलाही माहीत नाही. पण आहे एव्हढेमात्र खरे. मी केले मला कांही त्रास झाला नाही. पाण्यात कांहीही न मिसळता घ्यायचे आहे. (लिंबू-मध- मीठ काही नाही) पाण्याला फुड व्हॅल्यू कांही नसल्याकारणाने पोटात जे अतिरिक्त आम्ल उतरते ते हळू हळू कमी होते. आणि अ‍ॅसिडिटी जाते. थोडक्यात पोटाला कमी अ‍ॅसिड्स रिलिज करण्याची सवय लागते. असे त्या लेखात म्हंटले होते. पाण्याने इतरही अनेक फायदे होतात. जसे शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊन हातापायाची, डोळ्यांची जळजळ थांबते, मलावरोध कमी होतो, मुत्रपिंडेही स्वच्छ राहतात. मुतखड्याचा त्रास होत नाही. वगैरे वगैरे अनेक फायदे, कांही विश्वसनिय कांही अविश्वसनिय, त्यात सांगितले होते. मला अ‍ॅसिडिटीवर हिस्टॅक गोळ्या डॉक्टरांनी सुरु केल्या होत्या. 'जर खाण्यापिण्याच्या सवयी नाही बद्दलल्या तर ह्या गोळ्या जन्मभर घ्याव्या लागतील' अशी भितीही घातली होती. पण वरिल वॉटर थेरपीने सर्व व्याधी दूर होऊन सवयी कांही बदलाव्या लागल्या नाहीत. ही ९६ची कथा आहे. पुढे वयोपरत्वे सिगरेट सुटली, मद्यपानही आटोक्यात आहे, जागरणंही कमी झाली. तिखट खाण्याची आवड अजूनही आहे. व्हेज-नॉन व्हेज दोन्ही चालू आहे. हिस्टॅक घरात असतात पण कधी घ्याव्या लागत नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी पाणी प्यायचे एवढेच आहे? मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे. जरा जास्त माहिती देता का?

In reply to by चित्रगुप्त

माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी केली होती. त्यात पेठकरांनी सांगितल्याप्रमाणेच सकाळी दात न घासता साधे (थंड नाही) पाणी पिणे होते. त्यासोबत दोन्ही वेळ जेवणाआधी अर्धातास एक पेला व जेवण झाल्यावर अर्धा तासांनी एक पेला पाणी प्यायचे होते. हे त्यांचे वय ४० असतांना केले होते. पंधरा दिवसात त्यांच्या शरिरात उत्साह, उर्जा, शक्ती वाढली होती. चालण्याचा मोठा पल्ला मारतांना आधी दम लागून यायचा. तो बंद झाला. नंतर त्यांनी सातत्य ठेवले नाही. पण थेरपी म्हणून एवढेच केल्याचे आठवते, बाकी काही पथ्य नव्हते. वडीलांना इतर व्यसने, किंवा अनियमित जीवनशैली असे काही नव्हते. त्यामुळे व्यसने व जीवनशैलीच्या पथ्याबाबत सांगू शकत नाही. तोंडातले जीवजंतू पोटात जाणे वाईट असते हे डॉक्टरांनी सांगितले. मुखारोग्याबद्दल वैद्यकिय अधिकारातल्या लोकांच्या ज्ञानाचा अधिकार मान्य असल्यामुळे त्याला फाटे फोडायची गरज वाटत नाही. पण लाळेसोबत २४ तास ते जीवजंतू पोटात जातच असतात. त्याबद्दल अधिक माहिती वा खुलासा मिळाला तर शंकानिरसन होईल.

In reply to by तर्राट जोकर

लाळ हि जागतेपणी तयार होत असते आणी ती सतत गिळली जात असते त्यामुळे तोंडात असलेल्या जंतूना वाढ होण्याचा वेळच मिळत नाही. दर काही मिनिटांनी ते पोटात ढकलले( गिळले) जातात आणी पोटातील आम्लाने त्यांचा खात्मा होतो. रात्री झोपता तेंव्हा लाळ घशात जाऊ नये म्हणून तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे सकाळ पर्यंत तोंडात वाढलेल्या जंतूंचे प्रमाण बरेच जास्त असते. म्हणून सकाळ झाल्यावर सर्वप्रथम तोंड धुणे हे आवश्यक आहे. इंग्रजी प्रकार बेड टी सारखा अनारोग्यकारक प्रकार दुसरा नसेल.

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद! बेड-टी हा प्रकार चित्रपटात बघितल्यापासूनच विचित्र वाटत आलाय. त्यांच्या हवामानाआधारित सवयींमुळे त्यांना ते योग्यही वाटत असेल.

In reply to by सुबोध खरे

सहमत आहे.दात न घासता पाणी पिणे म्हणजे रात्रभर पोसलेल्या जंतूंना पोटात ढकलणे होईल.या जंतूंची एक पातळ फिल्म रात्रभरात दात जीभ यांवर तयार होते.तिला प्लाक म्हणतात.त्यामुळेच सकाळी उठल्यावर तोंडात अस्वच्छ वाटत असते.आणि दात घासल्यावर फ्रेश वाटते.त्यामुळे कोणत्याही कारणाने दात न घासता उठल्या उठल्या पाणी पिऊ नयेच.

In reply to by अजया

यावरून एक म्हटली तर सवांतर, म्हटली तर अवांतर शंका: गेली हजारो वर्षे लोक दात न घासताही निवांत राहिले कारण तेव्हा ते जे अन्न खायचे तेच जणू फिल्टरसारखे काम करायचे, शिवाय त्यात साखर वगैरे घटक नव्हते त्यामुळे चालून गेले वगैरे वगैरे.... सो ही जंतूंची पातळ फिल्म त्यांना त्रासदायक होत नव्हती का?

In reply to by बॅटमॅन

गेल्या २५ लाख वर्षांतले आदीमानवाचे व मानवाचे आयुर्मान (लाईफ एक्पेक्टन्सी) २० ते फारतर ४० वर्षे इतकेच राहिले आहे. आधुनिक मानवाच्या झपाट्याने होणार्‍या इतर विकासाबरोबरही ते फारसे वाढलेले दिसत नाही. मात्र, गेल्या शंभर एक वर्षांत त्यात खूप मोठी (५० टक्क्यांपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. त्याचे मुख्य श्रेय आधुनिक शरीरशास्त्रामधील संशोधन आणि पर्यायाने आरोग्यदायक सवयींसंबंधी वाढलेल्या आकलनाला जाते. या आयुर्मानवाढीत जंतूशास्त्र आणि त्याअनुषंगाने विकसित झालेल्या औषधशास्त्राचा सिंहाचा वाटा आहे. खालील टेबल पाहून ही कालरेखा अजून नीट ध्यानात येईल...  संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Life_expectancy (जालावरून साभार)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यावरुन आठवलं. रात्री दात घासून झोपणार्‍या लोकांना हृदयविकाराचा त्रास देखील कमी होतो/असतो असं वाचलं आहे. खरं आहे ना?

In reply to by प्यारे१

होय. तोंडातील (घसा, दात आणि हिरड्या) जंतूंपासून होणार्‍या हृदयविकारांमध्ये "हृमॅटिक हार्ट डिसिज" हा एक महत्वाचा गट आहे. तुलनेने तरुण वयात होणार्‍या या आजारात, हृदयाच्या झडपांना इजा होऊन त्या कायमच्या निकामी होऊ शकतात. सुधारलेल्या सर्वसाधारण दंताआरोग्यामुळे आणि दंतकर्माच्या (डेंटल प्रोसिजर्स) अगोदर दिल्या जाणार्‍या अँटिबायोटिक्समुळे या आजाराचे प्रमाण खूप कमी होत आले आहे.

In reply to by अजया

हे खरच आहे का, अजया? कारण मी वाचलेलं की हा तोंडातला फ्लोरा खरं म्हणजे पोटासाठी चांगला असतो... नक्की काय आहे?

In reply to by स्वप्नांची राणी

तो अातड्यातला फ्लोरा.तोंडातला नाही.किंबहुना तोंडातला बॅक्टेरियाचा फ्लोरा अपायकारकच असतो.यातल्या काही प्रकारच्या जंतूंनी वर सांगितल्याप्रमाणे हार्ट डिसिज तसंच लेटेस्ट संशोधनाप्रमाणे काही किडनी विकार तसेच वारंवार गर्भपात होणे हे आजारही उद्भवू शकतात. @बॅट्या,मानवाच्या खाण्याच्या पध्दतीत शिजवणे आल्यानंतर बदल होत आलेले आहेत.मऊ अन्न दातात तोंडात शिल्लक राहाते.जे या जंतूंचे खाद्य असते.त्यामुळे दंतविकार आत्ता जास्त दिसतात.फायब्रस खाणे निदान ही फिल्म हटवते. परंतु रात्री लाळग्रंथी कमी लाळ उत्पन्न करतात हे तेव्हाही होत असणार.कमी लाळ म्हणजे अन्न ढकलले जाणेही कमी.जंतू जास्त.तेव्हा या मानवांनाही प्लाक तोंडात होतच असणार.सकाळची मुखदुर्गंधी असतेच असे धरुन चालत असतील कदाचित!

In reply to by अजया

मुखदुर्गंधी ही न पचलेल्या - पोटात सडत राहणाऱ्या अन्नाची पण असते हा स्वानुभव. माझ्या रसाहाराच्या काळात अजिबात वास येत नाही तोंडातून वा श्वासातून.

In reply to by चित्रगुप्त

पोटात अन्न सडत नाही... किंबहुना खुपसे जंतू जठरातल्या हायड्रॉक्लोरीक अ‍ॅसीडमध्ये जिवंत राहू शकत नाहीत... ही शरीराची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. रात्री तोंडाची हालचाल कमी असल्याने लाळ कमी प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे तोंडातले जंतू पोटात न जाता तोडातच राहतात. एका जागी राहण्याने (स्टॅसिस) जंतूंची वाढ जास्त जोमाने होते, ही शास्रिय वास्तव आहे. बोलताना तोंडाला येणारी दुर्गंधी ही दात आणि हिरड्यांच्या अनारोग्यामुळे तेथे वाढलेल्या जंतूंमुळे असते. पोटातून बाहेर येणार्‍या वायूला (ढेकर) दुर्गंधी असू शकते. पण ती जठरात पचताना काही प्रकारच्या अन्नांतून बाहेर पडणार्‍या वायुंमुळे असते, सडण्याच्या क्रियेमुळे नाही. केवळ गाळलेल्या रसाच्या आहारावर असताना तोंडात अडकून सडणारे घन पदार्थ नगण्य असल्याने सडण्याची क्रिया सर्वसामान्य घन आहारापेक्षा कमी होणारच. पूर्ण रसाहाराच्या काळात (पूर्वीचे दात/हिरड्यांचे आजार नसल्यास) झोपताना ब्रश करणे (रसाहारात असल्यावर अगदी फक्त खळखळून चूळ भरणे) तोंड आरोग्यपूर्ण व गंधविरहित राखण्यास पुरेसे आहे. अर्थातच, मी कोणत्याही प्रकारच्या आहारावर असताना झोपण्यापूर्वी "फ्लॉसिंग + ब्रशिंग" करणे जास्त योग्य सवय समजेन. ======= काही सावधगिरीच्या सूचना: १. दीर्घकालासाठी रसाहार सुरू करण्याअगोदर आपल्या पसंतीच्या मान्यताप्राप्त वैद्यकिय व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा. कारण, दीर्घकालीन आहार बदलाने शरिरावर अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात... विशेषत: जर आपल्याला काही आजार असला तर असा सला घेणे अनिवार्य समजावे. कारण, रसाहारात काही उत्तम आहारतत्वे असतात, पण तो पूर्ण आहार नाही. दीर्घकालासाठी एकाच प्रकारची आहारतत्वे खाणे व इतर आहारतत्वे टाळणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच्या शरिराला सोसेल असे नाही. २. रसाहारात कोणतेही कृमीविरोधी तत्व नसते. त्यामुळे केवळ रसाहाराने कृमी/जंतांपासून मुक्ती मिळणार नाही. तसेच अनेक कृमी/जंत आतड्याच्या भिंतींमध्ये हुक/सक्शन कपसारख्या अवयवांनी घट्ट चिकटून बसलेले असतात. ते केवळ औषधाने मृत झाल्यावरच विष्ठेतून बाहेर पडतात. शिवाय अनेक प्रकारचे कृमी/जंत व त्यांची अंडी डोळ्यांना दिसू शकत नाहीत.

In reply to by स्वप्नांची राणी

मलाही तसेच वाटले होते. दातामधले जंतु दातात अडकलेल्या अन्नकणांवर प्रक्रिया करतात,जर ते जंतु पोटात गेले तर पोटात साचलेल्या अन्नावर प्रक्रिया करतील. डॉ. सुहास म्हात्रेंने नुकत्याच लिहिलेल्या लेखाप्रमाणे (आरोग्यशास्त्रातील युध्द्शास्त्र) हा प्रकार ही काट्याने काटा काढावा असा असू शकतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

काट्याने काटा काढावा आरोग्यशास्त्रात हे वैश्विक सत्य नाही तर काही ठराविक परिस्थितींत काळजीपूर्वक व सखोल संशोधनानंतर निवडलेली सावध उपायोजना असते. कृपया, सर्वच परिस्थितीत विषाचा उपाय विषाने करण्याचा प्रयत्न/विचार करू नये. ते धोकादायक ठरू शकेल :)

In reply to by तर्राट जोकर

मला वाटते ८ तास तोड बन्द असल्याने जे विष लळेत जमा होते, ते अपलेच असल्याने आपल्या शरिरास घातक नसते ते सकाळी पण्याद्वारे शरीरात पसरते आणि toxins व अनावश्यक पदार्थ बाहेर फेकायला मदत करते,

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त साहेब, >>>>मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे. जो लेख मी वाचला त्यात खाण्यापिण्यावर कांही बंधन/उल्लेख नव्हता. आता 'वाटेल तितके'ची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकेल. पोटास तड लागेल असा आहार नसावा. माझे मी सांगतो, मला भूक अपरिमीत लागते आणि सहन होत नाही. ९६ च्या काळात जेंव्हा मी ही थेरपी केली तेंव्हा खाण्यापिण्यावर कांही ताळतंत्र नव्हतेच. पाकिस्तानी उपहारगृहात तेलाची तर्रीवाले नॉनव्हेज (जास्त करून मटण), कबाब, तिखटजाळ पदार्थ, बर्गर्स वगैरे वगैरे पदार्थांची माझ्या आहारात रेलचेल असायची. पण त्या सवयी न बदलताही वॉटर थेरपीचा परिणाम होऊन आरोग्य लाभले. पुढे ८-१० वर्षांनी (मधूमेहामुळे असेल) त्या आहार पद्धती बद्दलचे माझे प्रेम कमी झाले आणि आता बर्‍यापैकी सात्विक आहार असतो. (आठवड्यातून एखाद दिवस तामसी आहार असतो). हिरव्या मिरच्या, काळीमिरी, चाट मसाला, गरम मसाला वगैरे पदार्थ अ‍ॅसिडिटीला भडकवतात. लाल मिरच्या चालतात. मध्यपान, धुम्रपान, जागरणं, चिंता १०० टक्के टाळाव्यात. ज्या मी प्रयत्नपूर्वक टाळल्या आहेत. अ‍ॅसिडिटी, अल्सरचा अजिबात त्रास नाहीए.

स्पष्ट आणी परखड विवेचन -- आतापर्यंत धाग्यावर वाचलेल्या प्रतिक्रियांकडे पाहून माझे असे मत झाले आहे कि हे सर्व करणाऱ्या व्यक्तींपैकी फारतर १० % व्यक्तींचे वजन थोडे फार कमी होईल. बाकीच्यांना फारसा फायदा होणार नाही. याची कारणे-- १) बहुसंख्य व्यक्तींना रोज एक किवा दोन ग्लास ज्यूस पिऊन वजन कमी करायचे आहे. (बाकी दिनचर्या बदल न करता) २) काही व्यक्तींना सलग आठ ते दहा दिवस ज्यूस पिऊन वजन कमी होईल असे वाटत आहे ३) इतर काहीना सलग एक महिना असे केले तर वजन होईल असे वाटत आहे. बहुसंख्य व्यक्तीनची या सोबत व्यायाम करायची मानसिक तयारीच नाही. शिवाय आता वजन कमी झाले तरी परत ते वाढणार नाही यासाठी जी मानसिक तयारी हवी ती बहुसंख्य व्यक्तींमध्ये नाही. चित्रगुप्त साहेबांनी लिहिलेल्या काही वाक्यांकडे फारसे कोणी लक्ष देताना आढळत नाही "अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो" वजनाचे मूळ शास्त्र-- उर्जा किंवा वस्तुमान नष्ट होत नाही किंवा तयार करता येत नाही या प्रमाणे जोवर आपल्या खात्यातून पैसे काढत नाही आणी त्यात भर टाकत राहता खात्यातील पैसे कमी होणार नाहीत. १ ग्राम चरबी म्हणजे ९ (किलो) कॅलरी. रोजचा आहार २००० कॅलरी असेल आणी तुम्ही पूर्ण उपास( पाणी सोडून कोणतेही ज्यूस किंवा द्रव पदार्थात सुद्धा थोड्या तरी कॅलरी असतात) केला तर २२० ग्राम वजन कमी होईल. शंभर दिवस पूर्ण उपास केला तर २२ किलो वजन कमी होईल. या हिशेबाने आपण किती जेवतो आणी आपल्याला किती वजन कमी करायचे आहे याचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. एक महिन्यात १० किलो वजन कमी होईल अशी गाजरे कुणीही खाऊ नये. कारण चरबी बरोबर बर्यापैकी पाणी पण साठवले जाते जेंव्हा तुम्ही उपास करता आणी चरबी वापरली जाते तेंव्हा त्याबरोबरचे पाणी उत्सर्जन केले जाते. परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते. यास्तव VLCC किंवा तत्सम ठिकाणी जाऊन ५ - ६ किलो वजन एक महिन्यात कमी करून आलेली शेकडो माणसे तुम्हाला दिसतात पण हा बदल तात्पुरता असतो ९९.९ % लोक आपले वजन परत "मिळवतात". दुर्दैवाने यात मला वजन केंव्हाही कमी करता येईल हा खोटा आत्मविश्वास त्यांना येतो आणी नंतर परत कधीही वजन कमी होत नाही. अशीच परिस्थिती सिगारेट सोडणार्याची असते. एक आठवडा सिगारेट सोडतात आणी आयुष्यभर मी सिगारेट केंव्हाही सोडू शकतो हा खोटा आत्मविश्वास बाळगून जगतात. रस आहाराचा फायदा आपण व्यायाम आणी मिताहार घेऊन वजन कमी करत असलात तर निर्जलीकरण होऊ नये म्हणून होतो (DEHYDRATION) शिवाय रस प्राशन जेवणाच्या "अगोदर किंवा नंतर" न करता ते जेवणा "ऐवजी" केले तर फायदा होईल. वजन कमी झाल्यावर ते टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागेल याचा कोणीच विचार केलेला नाही. बहुसंख्य लोकांना आपले बूड न हलवता गोळी घेऊन किंवा योग विपश्यना ई गोष्टी करून वजन कमी करायचे आहे ते होणारे नाही. परखड शब्दांबद्दल क्षमस्व.

In reply to by सुबोध खरे

" मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो" हम्म.. हे सध्या शक्य नाही. त्यामुले आता डायट थांबवतो. काल पासुन विवीध जुसवरच व दही खाउनच आहे. आता पटकन एखादी कचोरी गिळावीसी वाटत आहे. परखड शब्दांबद्दल धन्यवाद डोक्ट्र. चित्रगुप्त साहेबांचा डायेट व्यायामाशिवाय फार उपयोगी नसल्याने सध्यातरी माझा पास पास करतो. बाकी विपश्यना मी केली आहे तीथे अतिशय सकस व सात्वीक अन्न मिळते. १० दिवसाचा विपश्यना कोर्सकरायला ते अतिशय योग्य आहे. विपश्यनेमधे मन लागले नाही तरी संतुलीत आहार त्यांचा नक्किच आरोग्यदायी आहे. मला फायदा झाला वजन कमी झाली नसले तरी विपश्यने नंतर फ्रेश फ्रेश वाटतेच.

In reply to by सुबोध खरे

माझे वजन ८९-९० किलो होते. परिक्रमेला जाऊन आल्यावर ७० किलो झाले. रोज २५,३० ते ३५ किमी चालत होतो. जे मिळेल ते भरपेट खाऊनही वजन कमी झाले. अर्थात परिक्रमेला या उद्देशाने गेलो नव्हतो. परत आल्यावर आधीचाच आहार चालु आहे तरीही वजन ७३-७४ ला स्थिर आहे. मी कोणताही व्यायाम करत नाही.

In reply to by विलासराव

विलासराव मी CNBC च्या शो ला गेलो होतो तेथील एक पत्रकार ११० किलो होता. मुंबई मारेथोन धावून त्याने वजन ६५ किलो वर आणले होते आणी आता तो नियमितपणे म्यारेथोन धावतो आणी त्याने आपले वजन ६५ वर टिकवून ठेवले आहे. असा व्यायाम केल्यास नक्की वजन कमी होईल. मी गेली कित्येक वर्षे (२५ वर्षे ) आपले वजन टिकवून आहे. थोडा व्यायाम आणी मिताहार याने.

In reply to by सुबोध खरे

खरेजी, या प्रतिसादाबद्दल शतश: धन्यवाद! सोनाराने कान टोचणे आवश्यक असतेच. काही लोकांच्या प्रतिक्रियांवरुन आपण योग्य तोच अंदाज लावला आहे. यामागची मानसिकता विषद करण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा होते असे की वजन "काहीही न करता" वाढले ना मग ते तसेच "काहीही न करता" कमी व्हावे असे जनसामान्यांत भावना असते. आपल्या आप वजन वाढले, त्यात आपण स्वतः इन्टेन्शली काही केले नाही. आपली काही चूक झालीच नाही तर पनीशमेंट (व्यायाम, पथ्य, रुटीन-चेंज) का भोगा? अशी एक मानसिकता असते. बहुतेक लोकांना शरीरस्वास्थ्य राखायला काहीतरी करावेच लागते हे मनोमन पटत नाही. आजुबाजूला तशी उदाहरणेही असतात. कित्येक लोक दीवसभर अंगमेहनतीची कामे करतात पण पोट सुटलेली दिसतात. काही लोक काडी इकडची तिकडे करत नाहीत पण चांगली सडसडीत असतात. अनेक लोक कधी व्यायाम केलेलाच नसल्याने (आपली दिव्य अभ्यास-एके-अभ्यास संस्कृती) व्यायामाने शरिरात होणारे बदल रोकडा व्यवहार असतो हे जाणवलेलेच नसते. दुसर्‍यांचे अनुभव ट्राय करून बघता येत नाहीत. एखाद्याने फेरारी घेतली तर एक टेस्ट ड्राइव करता येईल. पण शरीर कमावले तर त्याचा टेस्ट ड्राईव करता येत नाही. त्यामुळे फेरारी विकत घ्यायची इच्छा बळकट करणारे टेस्ट ड्राईव शरिराच्या बाबतीत होत नाही. लोक पहिली स्टेप व त्यानंतरच्या असंख्य स्टेप्स उचलतच नाहीत. आहेत तिथेच राहतात. पण समाजातून, वावरातून एक मानसिक दबाव येत असतो, की बाबारे वजन वाढलंय, उतरायला पाहिजे. तेव्हा झट्पट उपचार, तोशीस न लागता, रुटीन न बदलता, सोपे वाटणारे(इज ऑफ युज) गोळ्या-पावडरी वापरण्याकडे कल वाढतो. कारण तिथे वजन कमी करणे हे एक आणि एकमेव ध्येय असतं. वजन कमी झाल्यावर कसं वाटेल याचा आंतरिक परिणाम माहित नसल्याने, फक्त बाह्य (विज्युअल) परिणामांवर लक्ष केंद्रित केल्याने कोणत्याही उपचारांचा परिणाम होत नाही. झालेला टिकत नाही. कारण स्वस्थ शरिर हे काय असतं हेच कधी अनुभवलेलं नसतं मग बेन्चमार्क काय असावा हे कसे कळेल? झटक्यात वजन कमी झाले तर इतर त्रास असतातच. पण व्यायाम व आहार-विहारातून योग्य प्लानिंगने आरोग्यपूर्ण शरिर जेव्हा मिळतं तेव्हा वजन कमी झाले हा बाय-प्रॉडक्ट असतो. तेजःपुंज, जोमदार, उत्साही शरीर-मन हे खरं ध्येय असलं पाहिजे. विपश्यना करतांनाही लोक चिंता कमी होतील काय, मानसिक आजार कमी होतील काय? वैगेरे काहीबाही विचार करतात. विपश्यना त्यापलिकडे आहे. शांत मन हे त्याचं बाय-प्रॉडक्ट आहे, शरिरातले बदल हे बाय-प्रॉडक्ट आहे. बाय-प्रॉडक्ट वर लक्ष केंद्रेत केलं तर मेन-प्रॉडक्ट तर मिळत नाहीच, बाय-प्रॉडक्टही मिळत नाही. आणि भलतेच विकार जडून बसतात. मी हे मार्क केलंय की जेव्हा लोकांना रूटीन बदलण्यास सांगितले जाते, जसे विपश्यनेत दहा दिवस मौन असेल इत्यादी, तेव्हा लोक त्या कल्पनेनेच बेचैन होतात. डिंगा मारायला लागतात की आम्ही तिथे जाऊन गोंधळ माजवू, आम्हाला काय कोण रोखू शकणार नाही, आम्हाला हाकलून लावतील इतपर्यंत आम्ही तिथे दंगा करू, किंवा आपल्याला जमणारच नाही, शक्यच नाही असे बोलायला लागतात. लोकांना रुटीन बदलणे हे दुसर्‍यांनी आपल्यावर सत्ता गाजवल्यासारखे, जबरदस्ती, हुकुमशाही केल्यासारखे, जेलमधे टाकल्यासारखे वाटते, म्हणुन ते पळवाटा शोधतात. ध्येयाकडे लक्ष देण्याऐवजी भलत्याच गोष्टी करतात. म्हणजे मला एका ठिकाणी जायचे आहे आणि कोणी सांगितले की पायीच जावे लागेल. तर बाकीचे सगळे सोडून मी त्या "पायी" वर फोकस करतो. त्याला कसे ब्रेक करता येईल, किंवा टाळता येईल याचा विचार करतो. पण आपल्याला काय 'अचिव' करायचे आहे हे विसरून जातो. तिसरी गोष्ट, पैसे टाकून सगळं मिळतं, झटपट, सुविधाजनक होतं याची अंगवळणी पडलेली सवय. तसे बघितले तर इथे ज्युस प्या, तरूण व्हा असा एकोळी मंत्र प्रथमदर्शनी दिसतो. पण त्यात किती कष्ट आहेत हे फक्त चित्रगुप्त यांनाच माहिती. पिराताईंनी त्या गोष्टीला आपल्या प्रतिसादात अचूक पकडले आहे. वर जे मी पंधरा दिवसाचे कोष्टक टाकले आहे. ते वाचूनच मला घाम फुटला. बाप रे बाप किती काम आहे हे? पण ते काम केले तरच सपाट पोट आणि तंदुरूस्त शरीर मिळेल ना..? नुसतं ज्युस पिणे नाहीये ते. तर शरीराची गरज ज्युसद्वारे भागवून व्यायाम, चालणे, पोहणे इत्यादीद्वारे चरबी घटवणे, त्यात सातत्य ठेवणे असे इतरही बरेच उद्योग आहेत. ज्युसचा ग्लास प्रथमदर्शनी दिसतो पण त्यामागे किमान दहा कामे आहेत जी केली तरच ते ध्येय साध्य होईल. काही लोक तयार ज्युस विकत घेण्याचा विचार करतील. तिथे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जाईल आणी हे एक फॅड-डायट होऊन बसेल. या ज्युस-डायटमधे अवैज्ञानिक, अंधश्रद्धा असे काही नाही. पण जो करतोय त्याने तशी भावना ठेवली तर परिणाम मिळणार नाहीत.

In reply to by सुबोध खरे

परखड शब्दांबद्दल क्षमस्व..... क्षमस्व कसलं डॉक्टर, अभिनंदन तुमचं!!! मला स्वता:लाच या धाग्यावर परखड लिहावं असं वाटत होतं. ..(कर्टसी घरातलीच रजीस्टर्ड न्युट्रीशनिस्ट डायटेशीयन!!) पण मग ईथले काही संभावीत वार आठवले आणि विचार केला की ज्याचं त्याचं आरोग्य आणी ज्याचं त्याचं नशिब!! चित्रगुप्त काका आता पासष्टीला पोचलेत...पण ईथले बरेचसे वीर जे अजून त्यांच्या चाळीशीत आहेत, त्यांच्यासाठी हे डाएट म्हणजे डीझॅस्टर ठरेल. या ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!) सतत ज्यूस घेतल्याने पॉटेशीयम ची लेव्हल वाढते, मिनरल्स ची लेव्हल वाढते. परीणामी किडनीवर अतिरीक्त ताण येऊन कीडनी फेल्युअर होऊ शकते. दिर्घ काळ ज्यूस थेरपी घेत असल्यास शरीरातील एलेक्ट्रोलाईट्स चा इइंबॅलॅन्स होतो आणी स्नायु मधले फॅट शरीराला जगवण्ञासाठी वापरले जाते. या सगळ्या ऊटपटांग डायेट्स चा शरीरावर फार फार वाईट परीणाम होतो. आपल्याला जगण्यासाठी अन्न हवं असतं. तेच मिळालं नाही तर शरीर वेगवेगळे उपाय करतं. उदा...मॅटॅबॉलीस्म रेट कमी होणे. आणि सततच्या फॅड डायेट्सनी कमी झालेला मॅटॅबॉलीक रेट मग कायम कमीच राहतो...परीणामी डायेट सुटले की माणूस हाहा म्हणता फुगत जातो. प्लीज प्लीज प्लीज.... a BIG NO NO to fad diets...!! हे ऊंटावरून शेळ्या हाकणे नाहीये. मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??) पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.

In reply to by स्वप्नांची राणी

पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.
हे एकदम पटलं. वायाम तं पायजेच. बाकी ते हे
मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??)
काय म्हणे नक्की? आयमीन व्हाऊचर बद्दल?

In reply to by स्वप्नांची राणी

खी खी खी. अता कोण कुणाचा कसा अन किती लाडका असेल हे अम्ही कय संगावे? पण अंमळ रोचक वतला तपशिल म्हणुन विच्यारले. =))