Skip to main content

गुप्तकाशीतील योगी ३

लेखक यकु यांनी शनिवार, 11/08/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांच्या खंडानंतर हा भाग लिहायला घेतला आहे. महेश्वर येथे नाथसिद्ध नवरत्न नाथ यांच्याकडून अनपेक्षितपणे दीक्षा मिळाल्यानंतर मला अनेक स्तरांवरील अनेक स्थित्यंतरांतून जायला लागलं. जनार्दन स्वामींचे पट्टशिष्य असणारे संन्यासी व अत्यंत खडतर उपासनेच्या बळावर 'नाथ सिद्ध' झालेल्या नवरत्न नाथांकडून अनपेक्षितपणे माझ्यासारख्या उटपटांग मार्गांने ध्यानाच्या वाटेला गेलेल्या सर्वसामान्य माणसाला मिळालेली दीक्षा आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतरे. 'एव्हरीथिंग मस्ट बी व्हेरी व्हेरी क्लिअर', 'आय वील डिस्कस इट ओपन्ली' ही युजींची वचने अतिप्रिय असलेल्या माझ्या स्वत:साठी ही स्थित्यंतरे शब्दरुप देऊन ठेवण्याचा विषय आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, आज 21 व्या शतकातही नाथ परंपरा ही तेवढीच सशक्त, संपन्न असल्याचा मी जीवंत पुरावा आहे. ही माझ्या जीवनभरासाठी कृतकृत्यतेची बाब आहे. कारण महेश्वर येथे मिळालेली दीक्षा ही केवळ कुठल्या गुरुने शिष्‍याला त्याच्या पुढील साधनेसाठी दाखवलेला मार्ग नसून एका नाथ सिद्धाने स्वत:च्या तपोबळावर शिष्याच्याच देहात केलेलं स्वत:चं जीव संक्रमण आहे. वाटेल तशी उटपटांग, गुरुच्या थेट समोरासमोरील मार्गदर्शनाशिवाय ध्यानधारणा करणार्‍या सामान्य माणसाला भगवान शंकर, दत्तात्रेयांपासून ते गोरक्ष, मच्छींदर नाथांसह चौर्‍याऐंशी सिद्धांची अनादी परंपरा आजही तेवढीच संपन्न, सशक्त आणि समृद्ध आहेच हे अनुभवायला मिळावं यात गुरुहीन तसेच श्रद्धेसाठी लायक अनेक गुरुंच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय साधना करणारे लोकही जागृतीपर्यंत पोहोचू शकतात याचा खणखणीत पुरावा आहे. हे पुराव्याचं पुन्हा पुन्हा मुद्दाम लिहितोय कारण मी मला हवं तसं, सुरुवातीला रजनीश, रजनीशांसारखा तांत्रिक, पण जगभरातील गुरुंना स्वत:च्या आचरणातून नसो, पण वाणीच्या बळावर पुनरुज्जीवीत करणारा आध्यात्मिक व्यापारी आणि त्याच्या त्या व्यापाराचे छक्केपंजे लक्षात आल्यानंतर तो फेकून देऊन नंतर कधीतरी एकहार्ट टुली वगैरे बरेच लोक आणि युजींसारख्या ध्यानाचे वाभाडे काढणार्‍या अॅण्‍टीगुरुचं वाचत असतानाही ध्यान करताना 'गुरुहीन साधना ही निष्फळ असते, गुरु केल्याशिवाय गत्यंतर नाही - तु चूक करतो आहेस' हे मला माझ्या जवळच्या लोकांकडूनच ऐकावं लागलेलं आहे. असो. कमिंग बॅक टू जीव संक्रमण - म्हणजे माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला एकच जीव असतो, पण जीवाचे निवासस्‍थान असणार्‍या एकाच शरीर रचनेत मात्र simultaneously दोन जीवांचा निवास करण्याची क्षमता असते. मानवी शरीर रचनेत ह्रदय, पोटाची आतडी, लिंग आणि मलद्वार वगळता, जवळपास प्रत्येक इंद्रिये दोन आहेत. वी हॅव टू मेन पार्टस ऑफ ब्रेन - लेफ्ट अॅण्‍ड राइट. डोळे दोन, नाकापासून सुरु होणारे श्वसनमार्ग दोन, हात दोन, पाय दोन. दोन मेंदूंचा आधारस्तंभ आणि षडचक्र धारण केलेला मेरुदंड मात्र एकच. हे सांगतोय कारण एकाच शरीरात दोन जीवांना सामावण्याची, विज्ञानालाही बापजन्मी शक्य न होणारी किमया केवळ नाथ परंपरेने 'टॅप' केली आहे. अर्थात कुठल्याही शस्‍त्रक्रियेचा किंवा शस्त्राचा वापर न करता मंत्र आणि तपोबळावर झालेली ही जीव संक्रमणाची किमया तेवढी सोपी नव्हती. विलासरावांच्या परिक्रमेदरम्यान नवरत्न नाथांची भेट होण्यापूर्वी भांग खात, युजी वाचत, जागृत झालेली कुंडलिनी आज्ञाचक्रावर अडल्याने मी लिमाऊजेटकडून 'डिस्टंट हिलींग' घेत होतो. युजींच्या 'बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट' मधील युजी व त्यांच्या मित्रांच्या संवादांना माझ्यावर लागू करीत असतानाच आत्मशून्यासोबत टपरीवर गेलो असताना भांग हाती पडली होती. भांगेसारखा मादक पदार्थ ध्यानीमनी नसताना मला विचित्रप्रकारे बौद्धीक तीक्ष्‍णता देतो आहेच, पण तो जाणीव सहस्त्र पटींनी उद्दीपीत करतोय हे सगळे होत होते. कुंडलिनी सहस्रारापर्यंत जाण्याचा मार्ग आज्ञाचक्रावर अवरुद्ध असल्याने ध्यान करुन झोपायला गेल्यानंतर कुंडलिनीचे विद्युत फटके वाट्टेल तसे कुठेही बसत होते. छातीवर हात ठेवला तर मूलाधारातून सहस्राराच्या दिशेने प्रवास अपेक्षित असलेल्या कुंडलिनीचा हाताद्वारे परत छातीतच प्रवेश होताच वीजेचा झटका बसल्याप्रमाणे हात बाजूला फेकला जात होता. कुंडलिनी आज्ञाचक्र भेदत नसल्याने डोके बर्‍याच दिवसांपासून प्रचंड दुखत होते. माऊने दोन चार वेळा डिस्टंट हिलींग (म्हणजे माऊ मुंबईत आणि मी इंदूरमध्ये ध्यानाला बसायचो आणि ऊर्जा रुपाने माऊ माझ्या शरीरात येऊन मदत करायची, शी मॅनेज्ड इट - हाऊ यू डीड दॅट माऊ ;-) ऑन ए सिरीयस नोट, इट वॉज ए टाइप ऑफ रेकी) दिल्यानंतर, माऊने सांगितलेले काही उपाय केल्यानंतर बराच आराम पडला होता. महेश्वरला निघण्यापूर्वीच्या दिवशीच्या अगोदरच्या रात्री मी संपूर्ण जागृतीपासून अगदी काही पावलेच दूर होतो. संपूर्ण जागृती असं मुद्दाम म्हणतो कारण बुद्धीच्या माध्यमाने स्वत:चा, स्वत:च्या अस्तित्वाचा वेध घेत असताना युजींच्या म्हणण्याप्रमाणे विचारांची साखळी तुटली पाहिजे, म्हणजे तुमचा स्फोट होईल वगैरे सूत्रावर बुद्धीच्याच माध्यमाने ध्यान करीत असताना विचारांची साखळी नक्कीच तुटत आली होती. त्या दरम्यानच झालेल्या 'काकध्वनी' या कवितेमध्ये त्या दिवशीच्या अचूक स्थितीचं प्रतिबिंब पहायला मिळेल. नेहमीप्रमाणे झोप अर्थात होत नव्हतीच. तसंच विलासरावांना भेटायला धामणोदला गेलो आणि पुढेही पुरेशी झोप न होता महेश्वरच्या आश्रमात पोचून रात्री तिथेही झोप येत नसल्याने रात्री दीड वाजता शांत वाहणार्‍या नर्मदेच्या कुशीत घाटावर ध्यानाला बसलो. तेव्हा समाधीत असताना नर्मदा माझ्या आत वहातेय हे जाणवलं वगैरे वृत्तांत मागील भागात आला आहे. त्यामुळे ते परत रिपीट करीत नाही. मेन थिंग इज नाथांचं माझ्यात झालेलं जीव संक्रमण आणि त्यात आलेल्या अडचणी, मला झालेला त्रास. नवरत्न नाथ हे अतिशय गुप्त, अत्यंत खडतर साधना करणार्‍या शक्ती पंथाचे उपासक आहेत. शाबर विद्येतील ते नाथ सिद्ध आहेत. मी जागृतीच्या उंबरठ्यावर पोचलो असलो तरी माझा ना कुठला मंत्र होता, त्यामुळं तो सिद्ध होण्याचा प्रश्नच नव्हता. पण मी ब्राह्मण कुळात जन्म झालेला. कोणत्याही जागृत पुरुषांमध्ये अंतरीचा कुठलाही भेद नसला तरी माझ्या बाबतीत मात्र नाथांचं जीव संक्रमण होताना मला ब्राह्मणांना अनिवार्य असलेलं संध्या आणि गायत्री मंत्राचं पठण करावं लागलं. माझी मुंज झाली होती, पण मी यज्ञोपवित घालत नव्हतो. गायत्री मंत्राचा जप तर दूरच. जीव संक्रमणाची क्रिया ही शाबर सिद्धींद्वारे झाली होती आणि माझ्यामध्ये नाथांचा प्रवेश ‍अनिवार्यपणे शाबर विधीद्वारे झाला होता. माझा अर्धा मेंदू (हे जे नाव यशवंत आणि दत्त उपासना असलेल्या ब्राह्मण कुळात जन्माला आलेलं शरीर असं म्हणणं जास्त संयुक्तिक) नाथ सिद्ध तर युजींच्या दाव्याप्रमाणे विचारांची साखळी तुटल्यानंतर स्फोट होऊन स्वत:ला जाणून घेण्याच्या उंबरठ्यावर असलेला, पण विचारांची साखळी न तुटलेला उर्वरित अर्धा मेंदू हा प्रकार नाथांनी जीव संक्रमण केल्यानंतरही कायम होता. त्यामुळे विचार कायम असलेला चौकस मेंदू सतत झालेला प्रकार नेमका कसा, का झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. यामध्‍ये झालं असं की माझी 'मेधा' किंवा बुद्धी अत्यंत अस्थिर झाली. हजारो उत्तरे मिळाली पण माझे तेच तेच प्रश्न रिपीट होत राहिले. मी खरोखर सर्व बाबतीत भाग्यवान आहे, कारण मला प्रॅक्टीकली मदत करणारे लिमाऊजेट, बिपीन कार्यकर्ते आणि योगप्रभू यांच्यासारखे मित्र लाभले. इंदूरचा जॉब सोडलेला असताना, आणि माझ्यात नाथांच्या जीव संक्रमणानंतर बुद्धी अस्थिर झालेली असताना माझ्या बाबतीत काय घडलंय, आणि झालेल्या घटनेचं फलित काय हे माझ्यासह इतर कुणालाच नीटसं कळलेलं नसताना बिकांनी मला स्वयंप्रेरणेने 'तुझ्यावर प्रयोग झालाय, आता बिलकुल हिंडत बसू नकोस - तुझ्या गावी जा, आईवडीलांची भेट घे - तुझ्या गुरुघरी जाऊन शिव झालेल्या महाराजांच्या समाधीसमोर बसून त्यांना सगळं सांग, नाम स्मरण कर' हे बजावलं. मला त्यावेळी पैसे हवे होते तेही दिले. माझा तेवढ्यातच गावी जाण्याचा विचार नव्हता. पण बिकांना शब्द दिल्याने मी पुण्याहून थेट गावी गेलो. पुण्यात मला त्रास होत असताना मी नाथांनाच माझ्या बाबतीत नेमकं काय घडलंय ते विचारत होतो. पुण्याच्या स्टेशनवर माझ्या हाती शाबरी मंत्रांची पुस्तके पडली. ते माझ्या उजव्या मेंदूच्या स्थिरतेसाठी ध्यानाद्वारेही हवी तेव्हा मदत करीत होते, पण तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होते आणि मी आणखीच अस्थिर होत होतो. अर्थात मी वेडाबिडा झालो नव्हतो हे त्यादरम्यान पुण्यात शाजीज् आणि गणराज मध्‍ये झालेल्या कट्ट्याला उपस्थित असलेले कट्टेकरी सांगू शकतील. तर मी गावाकडे गेलो आणि दीक्षेबद्दल, मला होत असलेल्या त्रासाबद्दल घरातील वडीलधार्‍यांना सांगितले. आमच्या घराण्यात दत्त उपासना चालते. आमच्या गंगामसला या गावापासून जवळच असलेल्या प्रति गाणगापूर गुंज, ता. पाथरी, जि. परभणी या तीर्थस्थानास नावारुपास आणणारे परम पूज्य समर्थ सद्गुरु चिंतामणी महाराज हे केव्हाच शिव झाले होते. दत्त मंदीरात प्रवेश करुन, उपासनेची पदं म्हणत असतानाही नाथांचं अस्तित्व मला माझ्यात जाणवत होतं, दत्तमूर्ती समोर होती, तरीही मला होत असलेला त्रास मात्र कायम होता. हे कोडं मला उलगडत नव्हतं. चिंतामणी महाराज हेदेखील मंत्रविद्येचे ज्ञाते होते. आणि मी गावी गेल्याच्या दरम्यानच पुढील दिवशी त्यांचा जन्मोत्सव होता. गाव जवळच असल्याने मी गावी परत आलो. मला पडलेलं कोडं सुटत नाहीय, घरचे लोक तर मंत्राचा जप कर जे सांगितलंय ते आम्ही करतो - तु सुद्धा तुला जे सांगतोय ते कर, वरुन पुन्हा मलाच समजाऊन सांगणारी असंबद्ध लेक्चर्स - अर्थात ती असंबद्ध असली तरी मी संध्या, सूर्याला अर्घ्यदान आणि गायत्री मंत्राचा जप करायला लागून मला होत असलेला त्रास दूर व्हावा यासाठीच, केवळ प्रेमापोटी होती हे वेगळे सांगायला नको. गुरुहीन साधनेने का होईना जागृत झालो आहे, या मेंदूच्या त्रासाने आता मेलो तरी हरकत नाही पण कधीच न केलेली संध्या वगैरे कर्मे भीतीपोटी करुन मीच माझ्या अनुभवावर संशय निर्माण करणार नाही , मेलो तरी बेहतर. मला संध्या करुन नेमकं काय होतं त्याचं विश्लेषण कुणीतरी करुन हवं होतं, ते मला संध्या केल्यानंतर मिळणार होतं, आणि मी संध्या करायला राजी नव्हतो. सूर्याची ज्योत त्रिनेत्रात प्रवेशून दीक्षा मिळालीय तर मी सूर्यावरच त्राटक सुरु केलं. खूप त्रास होऊ लागला आणि डावा मेंदू पोकळ भासून आत घणाच्या बलाने घाव बसू लागले. मग मात्र मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अजपा-जप करु लागलो. मी कितीही वाद घालत असलो तरी मला आवश्यक असणारी मदत नाथ आणि वंश परंपरागत गुरुघर या दोन्हींकडून मिळत होती. चिंतामणी महाराज शिव झालेले असले तरी त्यांचे शिष्य असणारे कालिदास महाराज उपलब्ध होते. कालिदास महाराज हे त्यांच्या युवावस्थेत आई-वडीलांशी सतत वाद आणि भांडणे होत असल्याने चिंतामणी महाराजांनी त्यांना गुंज येथेच ठेऊन घेतले होते. महाराजांनी त्यांना कुणाशीही बोलायचं नाही असा नियम दिला होता - ते फक्त चिंतामणी महाराजांशी बोलत. आजही ते कुणाशी बोलत नाहीत, जे काय असेल ते लिहून सांगतात. तर चिंतामणी महाराजांच्या पश्चात कालिदास महाराज हेही नावारुपास आले आहेत आणि त्यांचा अधिकारही मोठा आहे. नाम स्मरण आणि ध्यान हे दोन वेगवेगळे मार्ग असले तरी त्याचं साध्य एक असतं हे कालिदास महाराजांसमोर डोळे बंद करुन दिगंबरा दिगंबरा हा जप करीत बसल्यानंतर माझ्या त्रिनेत्रातुन आत येणार्‍या तप्त ऊर्जेने मला पटवून दिलं - त्यांच्या समोर होतो तोपर्यंत मेंदूचा त्रास बिलकुल जाणवला नाही. त्यांनी रंगावधूत महाराजकृत श्री गुरुमूर्तीचरित्र , श्रीगुरुचरित्र आणि संध्येसह रोज १०८ गायत्री मंत्राचा जप सांगितला. भांग, गांजा वगैरे सेवन करुन सूर्य ज्योतीकडून दीक्षा मिळाली वगैरे गोष्टी असल्या तरी तुझी मेधा अस्थिर झालीय - ती स्थिर करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप अत्यावश्यक आहे हे निदान मूळ कालिदास महाराजांचंच. मला ते पटलं. जन्मोत्सवाला मी परत गुंजाला जाणार होतो, त्याप्रमाणे गेलो. त्यादिवशीही मंदीरात त्रास कायम होता. अनंत प्रश्न पडत होतेच. मंत्रशक्तीचे ज्ञाते असलेल्या चिंतामणी महाराजांचा जन्मोत्सव होता. मखमली गादी, व्याघ्रजीन, हार फुलांनी सजवलेल्या पालखीत पादुका ठेवलेल्या होत्या. समोर छातीएवढ्या मोठ्या समया लावलेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, जन्मोत्सवामुळे मंदीराच्या मंडपात अबालवृद्धांची दाटी झाली होती. वीज असूनही महाराजांच्या पादुकांसमोरच्या समया विझू नयेत म्हणून चोहोबाजूंना असलेले फॅन बंद ठेवण्यात आले होते. मी फॅनच्या स्वीचबोर्डच्या दिशेने गर्दीत शिरलो आणि बटणं दाबली. तेवढ्यात कुणीतरी ओरडले फॅन लाऊ नका, मुद्दाम बंद ठेवलेत. मी म्हटलं वीज तर आहे, मग फॅन बंद कशाला ठेवताय. ते पालखीत ठेवलेल्या पादुकांकडे बोट दाखवून म्हणे वीज आहे, पण मेन स्वीच तिथे आहे, त्याच्या समोर समया लावल्या आहेत. मी काय समजायचं ते समजलो आणि गर्दीतच पालखीसमोर जाऊन पादुकांना उद्देशून म्हणालो - हा, हा बोगसपणा म्हणजे भोग ! इथं जीवंत माणसं घामानं थबथबून निघाली आहेत आणि पादुकांसमोरच्या समया विझू नयेत म्हणून फॅन बंद ठेवणार. आणि तुम्हीच वरुन कर्म वगैरे गोष्‍टी शिकवणार आणि उपासना सांगणार. हा आध्यात्माचा, उपासनेचा प्रकारही अगदी खंडणी वसूल केल्यासारखाच आहे. पार दत्तगुरुपासून तुम्ही सगळेच्या सगळे खंडणीखोर आहात. वरुन शाबरी विद्येचे उद्गाते, नाथपंथाचे आदीकारणही दत्तगुरुच ! सगळेच्या सगळे खंडणीबहाद्दर ! छळवादी ! लुटारु! तोवर आरती सुरु झाली. सगळेजण उठून उभे राहिले. मी चिडलो होतोच, पण आरतीसाठी टाळ्या वाजवू लागलो. चिंतामणी महाराजांच्या जन्माचा 'तुला पंचप्राण देऊन टाकतो' अशा काहीशा आशयाचा पाळणा म्हणणे सुरु झाले आणि एकदम माझ्या तृतीय नेत्रात ऊर्जेचा धोदाट प्रवाह शिरतोय आणि दुसर्‍या बाजूला मला प्रचंड रडू फुटले. छातीतून गरम वाफा निघायला लागल्या आणि घाम वाहू लागला. अंगातला टीशर्ट काढून टाकला आणि दत्त मंदीराच्या गाभार्‍यामागे जाऊन आणखी जोराने रडायला लागलो. खूप वेळ रडत राहिलो. आजोबांनी दुसर्‍या दिवशी स्टेप बाय स्टेप संध्या सांगून माझ्याकडून ती करुन घेतली. माझ्या बाबतीत थोडा उलटा प्रकार झाल्याचं ते म्हणाले तेव्हा मात्र आजोबा ते सांगत नसून शिव झालेले चिंतामणी महाराजच आजोबांच्या माध्यमातून ती सांगत आहेत हे जाणवलं. माझ्यासाठी प्रचंड आश्चर्याची बाब म्हणजे संध्या झाल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आतच माझा त्रास शून्यवत झाला. चिंतामणी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त रात्री पंचपदी होती. हा परम सनातन विश्वभरुनी उरला, गुरु दत्तराज ऋषिकुळात अवतरला किंवा माझी मिपावरील जुनी स्वाक्षरी असलेल्या ओळी करी स्वजन उपाधी भस्मलेप अंगा झोळीत भरीत तज्जन्मरण पिंगा हे माझं अत्यंत आवडतं पद ऐकण्यासाठी मला गुंजाला पंचपदीसाठी जावं वाटत होतं. पण सकाळी गुंजाला जाताना मित्राने गाडीवर नेलं होतं, मला रात्रीही गाडीच हवी असं वाटत होतं - रात्रीचं पायी चालत जाऊ नका असं घरचे लोक म्हणत होते. गाडीसाठी फोन केले. पण मिळाली नाही. मग नाथांना छळायला सुरुवात केली - की काय उपयोगाच्या तुमच्या सिद्धी, गाडी मिळू शकत नाहीय जायला - असं म्हणून मागे ओट्यावर रेललो तेवढ्यात उजव्या खांद्यावर विंचवाने दण्णकन डंख मारला. नेमकं काय चावलंय हे पहायला आतून बॅटरी मागवली तो सोयरा नांगी वर करुन अजुन तिथेच होता. खांदा झणझणायला सुरुवात झाली. म्हटलं विंचवाला मारु नका - तो त्याच्या रस्त्याने निघून जाईल. पण अंगणात लोक आराम करीत पडले असल्याने मारायला लगेच चपला, फडे आले. मग मी ओरडून सांगितल्यानंतर विंचवाला फड्याने दूर लोटून देण्यात आलं. वडील विंचू उतरवणार्‍या कल्याण बापूंना बोलावणे पाठवू लागले. दिगंबरा दिगंबरा जप आपोआप सुरु झाला, गुंजाला निघावं लागणार होतं. माझी चप्पल काही सापडेना - जप करीत तसाच गंगेच्या पात्राकडे निघालो. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या साधनाकाळात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप करताना रात्री झोप लागते म्हणून डबीत विंचू ठेवला होता. डुलकी आली की डंख मारुन घ्यायचा - जप सुरु.. विंचवाचे डंख खाऊन खाऊन मूर्च्छित झाल्यानंतर त्यांना श्री. प. प.स.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दर्शन दिले होते. गंगेच्या पात्रात पोहोचेपर्यंत वडील आणि लहान भाऊ मागे पळत आले. इथेच उतरवू, रात्रीचा जाऊ नकोस म्हणे. मी ऐकेना तेव्हा झटापटी सुरु झाल्या. शेवटी ओरडून हात सोडवत त्यांच्या हातातील बॅटरी हिसकाऊन घेतली आणि वाळू तुडवत निघालो. खांद्यावर तळव्या एवढ्या भागात झणझणाट पसरलाय आणि खूपच मंद गतीने वाढतोय असं जाणवलं. नाथ सिद्ध मेंदूत होते, पण विंचू उतरत नव्हता - नाथांनी विंचू उतरवण्याचा विचार मनात आला की डाव्या हातातील बॅटरी गुंजाच्या दिशेने लांबवर झोत टाकायची.
(क्रमश:)

वाचने 26288
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

चायला यकू... असो आपण बोलूच १४ ला माऊ कधी भेटतेस? we need to talk

. अर्धवटराव

अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! अर्थात भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे आणि त्याला दुजोरा देणारे तितकेच निर्बुद्ध लोक आहेत म्हणून त्यांच फावतय हे पुन्हा अधोरेखित झालं!

In reply to by संजय क्षीरसागर

>>>भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.

In reply to by मोदक

अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल
ए खरंच यार! काय तो सोक्षमोक्ष लावून टाकाच एकदा. निदान त्यावर आधारीत रट्टाळ धागे तरी कमी होतील ही अपेक्षा.

In reply to by मोदक

देवा माझ्या.... अरे तुझी हौस फिटली नाही का रायगडावर ? एकदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे :) नसल्यास विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता अवांतर : कदा व्यष्टीपासून समष्टीपर्यंत प्रवास करून ये, मग अध्यात्माच्या टर्म्स कळतील नको ब्वा आपल एसटी च बरी :D

In reply to by स्पा

सदर प्रतिसाद मोदकाला उद्देशून असल्यास फाट्यावर मारणे
कुणाला? प्रतिसादाला, मोदकाला की तुला ?
विमेकाका बुद्धी लैच क्षीण झालीये वाटत तूमची "अनन्य" दातार जी साहेब रायगडावर आले नव्हते श्री रा रा रा मोदक उर्फ मोदू उर्फ मादक , स्वत : तुम्ही (खर्रे .. ? ) वर्सेस प्यारे काका असा सामना रंगला होता
मी प्रतिसाद मोदकाला दिला आहे म्हणजे त्यालाच उद्देशून असणार ना रे ? बाकी तो सामना अनिर्णीत होता. मोदकाला निकाल लावायचा आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

तो सामना होता???????? मला तर ब्वा सामान्य चर्चा वाटलेली.... असो. अजून सामनेच रंगवताय? रंगवा! अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी. असं काही आहे का की ज्यामुळं सगळं करुनही न मिळणारं समाधान मिळू शकेल ? एकदा ते मिळालं की पुन्हा पुन्हा शोधाशोध करणं थांबेल, हे नि असे प्रश्न पडल्यावर त्यांचं उत्तर जिथे मिळू शकेल त्या सगळ्यासाठी एक शब्द म्हणजे अध्यात्मशास्त्र. पुन्हा असो.

In reply to by प्यारे१

अध्यात्म म्हणजे स्वतःविषयीचं, शरीराविषयीचे, मन, बुद्धी, चित्त, आपण का आलो, जीवनाचा 'खरा' उद्देश काय इ.इ. सगळे प्रश्न.... त्यातूनच माझा नि जगाचा काय संबंध इ.इ. सगळ्या गोष्टी.
पण मी काय म्हणतो, असे प्रश्न पडावेचं का? जीवनाचा 'खरा' उद्देश कुणाला कळालाय का? आणि जरी कळाला तरी पुढे..? ऐवी तेवी आलोचं आहोत तर आता का आलो?कुठून आलो ? कशाला आलो? या गोष्टींबद्दल चर्चा करत बसण्यात अन वाद घालण्यात काय हशील? बरं, समजा या प्रश्नांची उत्तरे मिळाली तरी असा काय फरक पडणार आहे? अवांतर : हे अध्यात्म नेहमी जड शब्दांत मांडावे लागते की ते जडचं असते?

सगळं सावकाश, अगदि हळुहळू , नीट लक्ष देउन संपूर्ण वाचलं. पण...

तुम्ही "यकुटेच" नाहीत तर.....................हुश्श्श्श्श्श्श्श..........

पण अनुभव खरे वाटत नाहीत. अर्थात माझी स्वतःची उपस्थीती या घटनाक्रमात नगण्य असल्याने खरं काय खोटं काय थापा कीती वास्तव कीती हे जाणन मला शक्यच नाही. किम्बहुना या क्षणी माझा अध्यात्मावरच विश्वास उरला नाही, असो यावर चर्चा गरजेनुसार करु. माझ्या स्मृती नुसार रात्री तुला तंबाखु/सिगारेट मारायची होती म्हणुन आपण जेवण झाल्यावर पानाच्या टपरीवर चक्कर टाकायला गेलो तिथेच पुडीमधे गोळा कसला आहे याची विचारणा मी कुतुहलाने केली व तो भांगेचा छोटासा गोळा चक्क कायदेशीर मान्यतेने विकायला ठेवला आहे या माहीतीचे आपल्याला अप्रूप वाटले व त्या परीस्थीतीत विशेषतः १ रुपयाची भांग ती अशी काय चढणार, गुटखापण यापेक्षा तिव्र असेल म्हणुन आपण प्रथमच (माझ्या आयुष्यात तरी मी प्रथमच) केवळ त्याच दिवशी अतिशय कुतुहलाने १ रुपयाची भांग विकत घेतली. त्यानंतर मात्र काही दिवस रात्री तु भांग सेवन करत ध्यानात बसायचे प्रयोग करत होतास व मलाही एक दोन वेळा भांग खाण्याचा आग्रह केलास जो मी न जुमानता तुला जर अंगात खरच विजेचे झटके बसतात (अध्यात्मीक अनुभव म्हणुन) तर मला स्पर्श करुन त्याचा अनुभव दे असे म्हटलो. तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे. त्यामुळे मला स्वतःला तरी ही गोश्ट कितपत सत्य आहे याची शेवटपर्यंत शंकाच वाटत राहीली. असो आधी म्हटल्या प्रमाणे इतर घटनाक्रमात मी उपस्थीत नसल्याने आपल्या बाकीच्या अनुभवाबद्दल विषेश विचार मनात येत नाही. पण एक वैयक्तीक अनुभव म्हणुन हा धागा अतिशय माहीतीपुर्ण आहे यात शंकाच नाही.

In reply to by आत्मशून्य

reporting शैली आवडली. विशेष काहीही जोरदार प्रतिक्रिया वगैरे न देता "झाले ते असे झाले" असं वृत्तनिवेदकासारखं, शांत, काहीसं त्रयस्थ शैलीनं लिहिलेला प्रतिसाद. वाचणार्‍यांनाही त्यानिमित्तानं घटनेबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळेल इतकच.

In reply to by आत्मशून्य

तु आव्हान स्विकारुन ध्यानाला बसलास व विशीष्ठ वेळेनंतर मला तुझ्या अंगाला स्पर्श मधुन मधुन स्पर्श करायला सांगीतलेस परंतु मला एकदाही कसलाही धक्का/उर्जा वगैरे वगैरे अनुभवाला आली नाही. हे बघुन तु अजुन काहीवेळ प्रयत्न केलास पण शेवटी तु मान्य केलेस की मला तु जे म्हणतोस त्याचा तु अनुभव देउ शकत नाहीस, तुला स्पर्श करुन इतरांना विद्युत धक्का बसु शकत नाही, व ही जाणीव फक्त तुझ्यापुरतीच मर्यादीत आहे.
मी तर सुरुवातीलाच म्हटलय : अत्यंत चुकीच्या अध्यात्मिक साधनेमुळे झालेल्या पराकोटीच्या भ्रमिष्ट मनःस्थितीचं यथार्थ वर्णन! सिद्धसमाधी योगाचे सर्वेसर्वा ऋषी प्रभाकर यांच्याशी एकदा संवाद घडला होता, त्यांनी एक अफलातून गोष्ट सांगितली होती, म्हणाले " आय टेल यू , एक वेळ शारीरिक निर्वस्त्रता साधणं (ज्यात दिगंबर पंथीयांचा उभा जन्म जातो ) शक्य आहे पण मानसिक निर्वस्त्रता अत्यंत कठीण!" आत्मशून्यच्या प्रतिसादामुळे लेखक तर पूर्ण अनावृत्त झालाय, आता त्या विधानाचा प्रत्येक प्रतिसादातून कसा अनुभव येतो ते पहायला मजा येणाराये; म्हणजे प्रतिसाद द्यावा तर उघडे पडणार आणि नाय द्यावा तर सहन होत नाही. कशाला घातली `(गुप्त)काशी' ही उक्ती अशी सार्थ होईल वाटलं नव्हतं !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर साहेब, आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो. आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे. स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंतजी, प्रतिसादातील भावनेशी सहमत! - (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

- (काशी गुप्त असेल तर तिथे कसे जायचे ह्या विचारात असलेला) सोकाजी मागील भागात गुप्तकाशीत जायचे स्पष्ट डिटेल्स दिलेले आहेत. ते ठिकाणाचे नाव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

हे अरुंधती प्रकरणातले ऋषी प्रभाकरच ना? त्यांच्या शारीरिक निर्वस्त्रतेच्या हातोटीबद्दल मध्यंतरी मीडियात बरीच चर्चा होती :)

माणसाने वेळेवर लग्न करावे, :) त्रास कमी होत नाही पण बदलतो.. म्हणजे इतरांना जो होतो तोच आपल्यालाही होत असल्याने उपाय करणे सोपे जाते.. बाकी लेख वाचुन डोक्याची मंडई झाली.

या धाग्यात व्यक्त केलेले अनुभव लेखकाचे स्वतःचे आहेत. इतरांनी त्याबद्दल आपली मते कृपया गांभीर्यपूर्वक व्यक्त करावीत. अनुभव पटले नाहीत तर तसे मत व्यक्त करावे, पण चेष्टा, थट्टामस्करी कृपया टाळावी. तसेच कोणतीही वैयक्तिक शेरेबाजी टीका-टिप्पणी करू नये.

In reply to by संपादक मंडळ

हे धोरण केवळ या धाग्यापुरतंच लागू आहे की इतर धाग्यांनाही? सगळ्याच धाग्यांवर फक्त गांभीर्यपूर्ण मतं व्यक्त करायची झाली तर मिपाचा आत्माच हरवून जाईल अशी भीती वाटते, म्हणून विचारलं.

In reply to by राजेश घासकडवी

बा डी स.. मीही इथे दिलेली प्रतिक्रिय, निव्वळ गम्मत म्हणुन दिली आहे.. बाकी प्रत्येकाच्या श्रद्धा व अनुभवांबद्द्ल आदर आहेच..

रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हि नम्र विनंती.

+१००० टु पेठकर काका, फक्त एका बदलासहित, रसिकांसाठी कवितांचे 'विडंबन' केले जाते त्या धर्तीवर चांगल्या परंतु अगम्य भाषेतील लेखांचे सर्वसामान्यांना कळेल अशा सुलभ भाषेत कोणीतरी 'भाषांतर' करावे, हे अतिशय विनम्र आवाहन .

थोडं कलालं, थोडं नाय.

भारतात चमत्कारिक लोकांनीच अध्यात्माची वाट लावली आहे संजयजी... एक प्रश्न अध्यात्म म्हणजे नक्की काय? आणि माझा अध्यात्मावर विश्वास आहे म्हणजे नक्की कशावर विश्वास आहे? एखादी बाह्य अज्ञात शक्ती आहे... आपल्यातच लपलेली सुप्त शक्ती आहे की आणखी काय? अवांतर - प्रश्न खरच माहिती मिळवण्याच्या उद्देशाने विचारलेला आहे. मला क्लिष्ट भाषा कळणार नाही असे गृहीत धरून सोप्या शब्दात उत्तर दिले तर आनंद होईल.
सर्व अध्यात्म केवळ तीन शब्दात संपन्न होईल `आपण सत्य आहोत'! आता प्रश्न येतो की 'सत्य म्हणजे काय?' याचं सरळ उत्तर दिलं तर ते असं होईल `आपण निराकार जाणीव आहोत' पण मग तुम्ही म्हणाल `काही समजलं नाही!' यावर नेगटीव उत्तर द्यावं लागतं `आपण व्यक्ती आहोत हा भ्रम दूर होणं म्हणजे सत्य गवसणं आहे' ("आपण गोल्डफिश आहोत" ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.) मग तुम्ही विचारता `हा भ्रम कसा दूर होईल?' तर यावर तीन मार्ग आहेत (आणि ते सर्वस्वी भिन्न आहेत) : सांख्य, भक्ती आणि तंत्र. बहुतेक लोक भक्तीमार्गी आहेत आणि तो भावनिक विषय आहे तस्मात इथे काही लिहित नाही. तंत्रमार्ग म्हणजे लेखात वर्णन केलेला मार्ग, यात सिद्धींना (पदार्थविज्ञान, शरीरविज्ञान किंवा तत्सम वैज्ञानिक नियमांविरुद्ध काही घडवू शकणं) महत्त्व आहे, ती कसोटी समजली जाते आणि त्याला चमत्कार म्हटलय. भारतीय मानसिकता चमत्कार आणि सत्याचा उलगडा या दुहीत सापडलीये. उदाहरणार्थ : निराकारला वजन नाही त्यामुळे सिद्धपुरुष पाण्यावरनं चालू शकेल असा युगानुयुगं भ्रम आहे पण निराकाराला वजन नसलं तरी शरीराला आहे त्यामुळे ते बापाजन्मात शक्य नाही. मग होतं काय पाश्चिमात्य लोक टेक्निकचा अभ्यास करुन स्विमींगची सर्व मेडल्स मिळवतात आणि आपण खुळ्यासारखे `एक दिवस मी पाण्यावरनं चालत जाईन तेव्हा कळेल!' या भ्रमात धड पोहणं ही नाही आणि सत्यही नाही अशा भंपक मानसिकतेत जगतो. तिच गोष्ट `कर्णपिशाच्च्याची' , जाणीव एक आहे आणि सर्वत्र आहे त्यामुळे मला इथे बसून अमेरिकेतल्या माणसाशी विनासाधन संभाषण करता येईल या भ्रमात आपण राहतो आणि ते सेल फोन्स, इंटरनेट आणि कायकाय संशोधन करुन कल्पना प्रत्यक्षात उतरवतात, आपलं मात्र हसं होतं! सगळे पदार्थ कोणत्याना कोणत्या पदार्थाचं रुपांतरण आहेत मग मी `रसायन सिद्धीप्राप्त करुन' एक दिवस `मातीचं सोनं करीन' या उदंड इच्छेपायी माझ्या एका जवळच्या वकील मित्रानं सोन्यासारख्या आयुष्याची माती करुन घेतली आहे आणि तो अजून मागे हटायला तयार नाही. सगळी निर्मिती निराकारातून आहे मग `हवेतून नोटा काढता येतील' या अदम्य विश्वासातून माझ्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाची सांपत्तिक दुर्दशा होऊन आता संपूर्ण हवा टाईट झाली आहे. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील, पण असो, सांख्यमार्ग एकदम सही आहे त्याचं म्हणणय `आपण सत्य आहोत म्हणूनच आपल्याला सत्य समजेल!' तो फक्त उलगडा आहे, गैरसमज दूर होणं आहे, कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. एकदा उलगडा झाला की मग आपण आपलं काम चोख करु शकू, आपलीही सृजनात्मकता आपल्याला साथ देईल, भ्रमातून मोकळे झाल्यानं आपणही शोध लावू शकू, आपण स्वाभिमानी झालो तर सर्वत्र पसरलेला भ्रष्टाचार दूर होईल, आपण संपन्न झालो तर जातीयवाद संपेल कारण संधीच्या समान वाटपाला आपला विरोध राहणार नाही, लोकसंख्येसारख्या मूलभूत प्रश्नाची सोडवणूक होईल. भारतीय मानसिकता या `चमत्कारातून' मुक्त व्हावी अशा अत्यंत प्रामाणिक अपेक्षनं उत्तर दिलयं, बघा झेपतय का!

In reply to by संजय क्षीरसागर

भक्तीमार्गः मिळे सागरा अखंड-धारा जशी जान्हवी जगतीं तसा भक्त तो मला भेटतो अनन्य-भावें अंतीं मिळता अनलीं इंधन जैसे अग्नि-रूप ते होतें साक्षात्कारी तेवि संपते देव-भक्त हे नातें मजसी मिळतां नुरे तत्वता 'मी-तो' ऐसे द्वैत म्हणुनि राहे मी चि होउनी मज माजी चि निवांत योगमार्गः असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी तिथे रंगते सु-स्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी आत्मानुभवी तयासि लावी नित्य-सुखाचा छंद सुस्थिर मग ते राहील तिथे विसरूनी विषयानंद प्रबळ इंद्रिये मनी मिसळती मन एकवटे पवनी पवन हि गगनी मिळे गगन ते आटे चि महा-शून्यी असा तयाचा नेणो कैसा सहज होय अभ्यास जाण निश्चये स्वये समाधी शोधित येई त्यास ज्ञानमार्गः जे नाही ते असेल कुठुनी अभाव अस्तित्वाचा? तत्वज्ञांनी निर्णय केला ह्या दोन्हीचा साचा (साचा - नेमका) जसे वेगळे करी मिसळले राजहंस पय-पाणी तद्वत् विश्वी गुप्त सार ते शोधी तत्व-ज्ञानी सुवर्ण आणिक हीण निवडिती बुद्धिमंत तावून उपाधीतुनी तेवि काढिती संत सार शोधून की पाखडूनी भूस टाकूनी केवळ दाणा घेती तैसे ज्ञानी माया त्यजुनी ब्रह्म-पदी स्थिर होती संदर्भ: स्वामी स्वरूपानंद (पावस) विरचित - 'श्रीमत् भावार्थ गीता' (पुस्तकाचे मूल्य - १५ रूपये) - 'श्री गीता-तत्व-सार' (पुस्तकाचे मूल्य - ५ रूपये)

दिडकीची भांग घेतली की हजारो कल्पना सुचता असे लो. टिळकांनी म्हणुन ठेवले आहे, त्याची प्रचिती येते आहे.

आपण जे लिहिता आणि ज्या तत्वाचे प्रबोधन करता त्याच्या विरूद्ध आपले लिहिणे असते (वागणेही कदाचित असू शकेल). आपण किती खाली उतरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
= तुम्ही माझ्या लेखावर आलेले प्रतिसाद बहुदा वाचले नसावेत (ते आता काढलेत) मग तुम्हाला परिस्थितीची कल्पना आली असती. माझा इथला एक प्रतिसाद काढला गेलाय पण ते रेसिप्रोकेशन आहे आणि मला (त्याविषयी काही अधिकार नसला तरी) सर्वस्वी मंजूर आहे . त्याबद्दल तुम्ही म्हणत असाल तर दुसर्‍याला उत्तर देणं (आणि ते ही डेकोरम पाळून ) यात मला वैषम्य नाही, ते स्वाभिमान आणि पुळचटपणा यातल्या फरका इतकं स्पष्ट आहे.
वारीतील दोन दिंड्या जेव्हा मी पुढे का तू यावरून भांडतात तेव्हाही मला असाच विस्मय वाटतो.
अजिबात नाही, लेखनाचा विषय अध्यात्मिक असला तरी मी सांख्यमार्गी आहे आणि लेख तंत्रमार्गावर आहे, ते दोन सर्वस्वी भिन्न मार्ग आहेत.
आपण अर्थातच म्हणू शकाल की यकूने तो काय लिहितो हे आपण वाचले आहे का ? याला उत्तर माझे पहिले वाक्य आहे. आणि मला तरी वाटते तो दुसर्‍याला उपदेश करत नाही. आपण करता व स्वतः शुल्लक गोष्टींच्या पार गेलेला नाहीत याचा खेद आहे.
कृपया असा गैरसमज करुन घेऊ नका , मी माझं आकलन शेअर करतो उपदेश करत नाही.
स्पष्ट लिहिले पण आपल्याकडून असल्या फालतू प्रतिक्रियांची अपेक्षा नसल्यामुळे लिहिले. शेवटी आपली मर्जी !...
= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे, आपल्या माझ्याकडून अपेक्षा आहेत हे वाचून आनंद झाला पण मी कधीही कुणाविरुद्ध लिहित नाही हे जितकं खरंय तितकंच सर्वस्वी एकटा कोणत्याही प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो ही देखील वस्तुस्थिती आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

@ संजय प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार ! माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे. ///= तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे//// अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे. असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते. शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines... असो. हा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद ...........

In reply to by जयंत कुलकर्णी

सहज, सुंदर आणि निरामय तर जगतोय!
प्रतिसाद, दिलेला प्रतिसाद, काढलेला प्रतिसाद तो सुद्धा आभासी जगातला, माझा अनूभव, मी, प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकतो, मी....मी.....मी...... आपले सगळे लेखन मी वाचत असतो मला वाटते त्यात एका विशिष्ठ विचारधारणेचा प्रचार/प्रबोधन असते ते शेअर करणे या प्रकाराने केले असते. मी विचारतोय, आपण सगळे सहज सुंदर निरामय आनंदी आयुष्य केव्हा जगायला शिकणार !
= हा `मी' वैयक्तिक नाही, सार्वजनिक आहे, तुमचा आणि माझा `मी' एक आहे या अनुरोधानं पाहा मग तसं वाटणार नाही
माझ्या लक्षात हेही आले आहे की आपण उदाहरण हे उदाहरण म्हणून घेत नाही ..लगेच मी सांख्यवादी आहे......चालू. मला काय म्हणायचे होते हे आपल्या लक्षात आले असावे.
= तुम्ही दोन दिंड्या म्हणालात याला ते उत्तर आहे
तुमचा माझ्याशी या संकेतस्थळावरचा हा पहिला संवाद आहे. अरे बापरे ! हेही वाक्य असे लिहिले आहे की मी घाबरलेलो आहे.
= यात घाबरण्यासारखं काय आहे?
असो...मला वाटते कदाचित माझा हा सगळा गैरसमज (असला तर) प्रत्यक्ष भेटल्यावर (कधी भेटलो तर) दूर होईल. आपल्या लिखाणाच्या पद्धतीवरून आपल्या विषयी आपण लोकांना उपदेश करता असेच वाटते. शेअरींग वाटत नाही. कदाचित लिखाणाची स्टाईल बदलल्यास उपयोग होईल असे वाटते.
= येस! पण आता हे वाक्य `मी' न घालता कसं लिहिणार?
शेवटी एखाद्यास मदतीची आवश्यकता आहे हे पटल्यावर जमेल तेवढी मदत करावी. माझे ऐकले तर मदत....इत्यादी... असे असू नये...Please read between the lines...
= अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आहे.

//अध्यात्मात `दिक्षा' म्हणून एक विधी आहे, त्यानं साधक गुरुप्रती रिसेपटीव होतो, तो शांतपणे ऐकून घेतो, एकदा दिक्षा घेतली की गुरु विरुद्ध त्याला काही बोलता येत नाही. आज संकेतस्थळावर लिहिताना ते शक्य नाही आणि लेखन कुणीही समोर नसताना केलं जातं त्यामुळे ज्यांचाशी संवाद साधला जाऊ शकतो त्यांना उत्तरं देता येतात, जे निव्वळ उपहास करतात त्यांना कळण्याची शक्यता नसते असा त्या विधानाचा अर्थ आह///// दुसरे काही करता येण्यासारखे नसल्यामुळे... :-)

मुंबईत कधी येताय? तुमच्यासंगतीत दक्षिण मुंबईत खादाडी कट्टा करावा म्हणतोय.... :-)

In reply to by विलासराव

मलापण मलापण... :) ( मला 'डिस्टंट कट्टा' जमणार नाही, आधीच क्लीयर करुन ठेवते.) @ यकु : तुला धपाटे द्यावे लागतील असे दिसतय.... कधी येतोस?

In reply to by कवितानागेश

मला कट्ट्याचा लाईव्ह वृत्तांत टेलिपथी ने कळव गं ;) अर्धवटराव

इंदूरचा जॉब सोडलेला असताना, आणि माझ्यात नाथांच्या जीव संक्रमणानंतर बुद्धी अस्थिर झालेली असताना माझ्या बाबतीत काय घडलंय, आणि झालेल्या घटनेचं फलित काय हे माझ्यासह इतर कुणालाच नीटसं कळलेलं नसताना बिकांनी मला स्वयंप्रेरणेने 'तुझ्यावर प्रयोग झालाय, आता बिलकुल हिंडत बसू नकोस - तुझ्या गावी जा, आईवडीलांची भेट घे - तुझ्या गुरुघरी जाऊन शिव झालेल्या महाराजांच्या समाधीसमोर बसून त्यांना सगळं सांग, नाम स्मरण कर' हे बजावलं. >>> यकु याचा अर्थ काय रे ? जरा डिटेल मधे सांग ना !

यशवंता, आधिचे दोन भाग वाचुन तुझ्या बद्दल काळजी वाटत होती. हा भाग वाचल्यावर ती वाढली आहे. हे सगळे जर खरे असेल तर वेळीच स्वतःला सावर आणि जर काल्पनीक असेल (ते तसेच असावे अशी आशा आहे) तर वेळीच तसा खुलासा कर. पैजारबुवा,

इथे विषय निघालाय आणि काहीजणांनी विचारले, म्हणून रेकीबद्दल मला असलेली माहिती थोडक्यात शेअर करतेय. रेकी म्हणजे प्राणशक्ती. ही सगळीकडे आहे. आपल्या संकल्पानी तिला दिशा देता येते. अशी रेकी थेरेपीमागची थिअरी आहे. प्राण : काही प्राणायमाच्या प्रकारात या प्राणवायूहून वेगळ्या अशा सूक्ष्म 'प्राणा'ची जाणीव सहज होउ शकेल. त्याचबरोबर आपल्या शरीरासोबत असलेल्या प्राणमय कोषाची ( energy body) देखिल जाणीव सहज होउ शकते. हा प्राण संक्रमित करता येतो. (याबद्दल मनोगतावर मागे 'निरुपमा ' यांनी काही लेख लिहिले होते.) ही प्राणशक्तीची जाणीव केवळ आपल्या concentration level वर अवलंबून आहे. त्यासाठी कुठलीही वेगळी साधना वगरै करायची गरज नाही. कारण प्राण प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक ' होमो सेपिअन' हे करु शकेल. (इतर प्राण्यांबद्दल मला माहित नाही.) सगळ्यात महत्त्वाची आपली सद्भावना व त्यायोगे होणारी प्रार्थना.

यकु शेठ, तुमचे अनुभव हे तुमचे आहेत. ते नक्किच तुम्हाला आले असतील. परत लिहिते झालात ह्याबद्दल धन्यवाद. लक्षात ठेवा परमेश्वर म्हंजे परम + ईश्वर. माझ्या तुमच्यात असलेला तो देव. म्हणुन देहातल्या देवाला ओळखा व देव बाहेर शोधत असताना फसगत होणार नाही ह्याची काळजी घ्या.

लेखनाचा उद्देश केवळ माझ्या बाबतीत झालेल्या घटनांची नोंद रहावी हा आहे. वर लिहीलेलं काही मित्रांना नीट कळलं नाही, काल्पनिक वाटलं वगैरेबद्दल मला काही करता येऊ शकणारं नाही, काळजी व्यक्त करणार्‍या व सगळ्याच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

In reply to by प्रास

गळ्यातील नाग कंदीलाच्या रुपात नांदत आहे.... ज्याच्या नावाने कंदील लागतो त्याला जाउन स्वप्नात नाग चावतो.... त्यामुळे माणूस मनातल्या मनात मरतो... आणि "बॉडी कॅनॉट लिव्ह विदाऊट माईंड" (अधिक माहिती साठी पहा मॅट्रिक्स-१)... असो.