✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक वाचनानुभव

य
यकु यांनी
Sun, 05/13/2012 - 16:55  ·  लेख
लेख
दि. 6 मे 2012 काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती. त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो. तर कुठेतरी उचकपाचक करताना गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' ची लिंक सापडली. पण ती करप्ट लिंक होती. आता उत्सुकता चाळवली गेली होतीच, म्हणून 'माझा प्रवास' साठी सर्च मारला, लगेच मिळून गेले. मग अकरापासून साडेतीन चार पर्यंत ती 196 पाने वाचण्‍यात गेली. 1857 च्या बंडाच्या सुमारास प्रवासाला निघालेल्या गोडसे भटजींचा मुक्काम महूला पडला होता. आमच्या कॉलनीच्या रेल्वे स्टेशनमधून महूला रोज रेल्वे जाते. मला वाटले गोडसे भटजी महूहून पुढे इंदूरला येणार आणि 1857 मधल्या इंदूरच्या हकीगती वाचायला मिळणार; पण तसं काही झालं नाही. गोडसे भटजी हे 1857 च्या बंडाच्या काळचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांच्या प्रवासाच्या हकीगतीमध्‍ये बंडामुळे त्या काळातील लोकांच्या जीवनाची झालेली फरफट, नष्‍टचर्य नि:संशय प्रतिबिंबीत झाले आहे पण त्यांची हकीगत ऐतिहासिक दस्तऐवज मानता येईल की नाही हे इतिहास तज्ञांनाच सांगता येईल - कारण प्रत्येक ठिकाणी गोडसे भटजी प्रत्यक्ष हजर असतीलच, आणि बंडादरम्यान उठलेल्या अफवा, बाजारगप्पा किंवा जनमानसात झालेल्या खळबळीमुळे ऐकीव बातम्यांचा सुळसुळाट यांचा त्यांच्या कथनावर प्रभाव पडलाच नसेल असे म्हणवत नाही. पण एवढ्यावरच हे पुस्तक निकालात काढता येत नाही. गोडसे भटजी झाशीच्या राणीला प्रत्यक्ष भेटले आहेत. त्यांनी झाशीच्या राणीची स्वभाव वैशिष्‍ट्ये, कारभाराची रीत, त्यांची दिनचर्या, अगदी झाशीची राणी बालपणी कशी होती, त्यांच्या मातोश्री गेल्यानंतर झाशीच्या राणीचे वडील मोरोपंत तांबे यांनी तिचे पालनपोषण कसे केले होते, तिचा राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत विवाह कसा जुळून आला होता हा सर्व इतिहास गोडसे भटजींना माहित असण्‍यासह ते पुढे ती राणी झाल्यानंतर झाशीच्या राणीच्या आश्रयाला राहिले आहेत. अगदी झाशीच्या किल्ल्यावर तोफगोळे पडत असताना गोडसे भटजींनी झाशीच्या किल्ल्यामध्‍ये निवास केला आहे. झाशीचा पाडाव होऊन झाशीची राणी तेथून निघून गेल्यानंतर इंग्रजी कत्तलीपासून वाचण्‍यासाठी ते लादणीत लपून बसले आहेत - गोडसे भटजी नि:संशय 1857 च्या बंडामध्‍ये होरपळलेल्या लोकांपैकी एक, पण मराठी साहित्यात ज्यांचे लिखाण उपलब्ध आहे असे एकमेव आहेत. गोडसे भटजींची अत्यंत प्रांजळ निवेदनशैली असलेल्या त्या कथनात मी पूर्णपणे रंगून गेलो. यज्ञ होऊन दक्षिणा पदरी पडेल या आशेने उत्तरेत गेलेले गोडसे भटजी दुसर्‍याच कुठल्यातरी राजाकडून दक्षिणा पदरी पडूनही चोरट्यांकडून लुटले जातात. बंडामुळे उत्तरेत अनागोंदी माजलेली असल्याने दिसेल त्या प्रवाशाला पकडणे, आणि बंडात सामील असेल तर सरळ फाशी देणे असे आदेश तत्कालीन गर्व्हर्नरने काढलेले असतात. गोडसे भटजींनाही संशयीत म्हणून इंग्रजी सैन्याच्या तुकडीकडून पकडले जाते, पण हे खरोखर भिक्षुक आहेत हे स्पष्‍ट झाल्याने फाशीबिशी न होता त्यांची सुटका होते. अशा परिस्थितीत भिक्षुकीसाठी त्या प्रांतात देशाटन करण्‍याऐवजी गोडसे भटजी, पैसे गेले तर गेले काही तीर्थाटन करावे, पुण्‍य पदरी पाडावे, महाराष्‍ट्रात असलेल्या आईवडीलांचे इहलौकीक कर्ज प्राप्त परिस्थितीत पैसा मिळत नसल्याने दूर होत नसेल तर नसो - पण गंगेच्या पाण्‍याने आईवडीलांना स्नान घालून पारलौकीक पुण्‍य तरी कमवावे म्हणून गंगेच्या पाण्‍याची कावड खांद्यावर घेऊन ते पेण तालुक्यातील वरसई पर्यंतचा प्रवास पायी करतात. मुळात तत्कालिन पुणे-मुंबई प्रांतात रहाणारे गोडसे भटजी झाशी-काल्पी-ग्वाल्हेर-काशी-लखनौ-अयोध्‍या एवढा दूरचा प्रवास करतातच का? कारण गोडसे भटजींच्या कथनातच स्पष्‍ट दिसत होते. पुणे-मुंबई प्रांतातले भिक्षुक, तत्कालिन विद्वज्जनांची संभावना होणारे सत्ता आणि संपत्ती केंद्रच इंग्रजी राजवट आल्याने भारतामध्‍ये उत्तरेत स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे हे लोक उत्तरेत येणार हे आजही स्थलांतराची जी मूळ प्रेरणा दिसते त्याप्रमाणे उघड आहे. आणि ही तत्कालिन सत्ताकेंद्रे, सत्ताधिश कशा परिस्थितीत होती आणि काय करीत होती? तर इंग्रजांसारख्या प्रबळ शत्रूने सत्ता हिसकाऊन घेतली म्हणून ब्राह्मणांना मंदीर, राजवाड्‍यांमध्‍ये अनुष्‍ठाणाला बसवून 1857 च्या बंडाच्या रुपात यथाशक्ती लढा देत होती. ब्राह्मणांच्या अनुष्‍ठाणात अनाठाई द्रव्यापव्यव करण्‍यापेक्षा इंग्रजांपेक्षा वरचढ शस्‍त्रे, होतील तिथून पैदा करुन सत्ता हिसकाऊन घेणार्‍या इंग्रजांचे नामोनिशाण मिटवूनच टाकण्‍याचा विचार त्यांच्या मनात का आला नाही? तर त्या काळात स्वप्रयत्न नव्हते असे नव्हे, तर त्यापेक्षाही धर्म, धर्माचरण, पाप-पुण्‍य, भोग-दैव, पूर्वसुकृत, कर्मकांड, आचार यांचा पगडा होता - नव्हे या काळातली बहुतांश हिंदू माणसे ही याच श्रद्धा आणि धारणांचे मूर्तीमंत रुप होती. त्यामुळे विजयश्री संपादित करण्यात स्वपराक्रम, प्रयत्न यांच्यापेक्षाही धर्मसंयुक्त कृत्यांना प्राधान्य होते. राज्ये, संस्‍थानांमध्‍ये देश विभागला गेला, एकरुपता - एक विचार नव्हता होता हेही आहेच. झाशीचा पडाव व नृशंस लुटीनंतरच्या दिवसांचे व तो का झाला याचे वर्णन करणारा गोडसे भटजींचा खालील उतारा पहा -
तिसरे दिवशी शहरात पलटणी लोक शिरलें, त्यांनी धान्य लुटण्‍यास प्रारंभ केला. त्याणीं बरोबर मोठमोठे बैल आणिले होते. बैल दरवाज्यापाशी उभा करुन लोकांचे घरी जोंधळे, बाजरी, तांदूळ, डाळी वगैरे जी धान्ये सापडतील तीं भरुन नेली. धान्यादिकांनी भरलेली मडकी ओतून घेऊन तेथेंच फोडून टाकीत असत. चवथे दिवशी सर्व प्रकारची लूट करण्‍यास आरंभ केला. ज्यास जें नेण्‍यासारखे वाटे, ते तो घेऊन जाई. लोकांचे घरी उपयोगी वस्तू एकही ठेविली नाही; विहिरीचे राहाटही काढून नेले. राहाटाचे दोरखंडही नेले. दारची केळीची केळवंडे, आंब्यावरचे आंबे, झाडावरचे फळ, लाकडी खुर्च्या वगैरे सामान याप्रमाणे सर्व जिनसांची लूट मांडली. ते दिवशी आम्हापाशी काहीएक खाण्‍यास नव्हते. जुजबी धान्य होते ते सरून गेले होते. बाजारात कोठे विकत घेऊ म्हटले तर कोठेच मिळण्‍यासारखे नव्हते. सायंकाळपर्यंत उपोषण पडल्यामुळे व वैशाखमास असल्यामुळे जीव अगदी हल्लक होऊन गेला. सायंकाळानंतर थंड पाण्‍यानी स्नान करुन अतिशय भूक व तहान लागल्यामुळे निरुपायास्तव थंडा फराळ केला ! हरहर! काय हा दु:खाचा प्रसंग ! सर्व शहरात हजारो लोक उपाशी होते. लाखो मेले होते. शहर जळत होते. लोक तर अगदी नागवून गेले होते. कोणाचे घरात भांडे अगर मडके अगर धान्य अगर वस्‍त्र कांही उरले नव्हते. परमेश्वराच्या घरचा न्याय मोठा चमत्कारिक आहे. ज्या गरिब लोकांनी इंग्रज सरकारचा कोणत्याही प्रकारें अपराध केला नव्हता त्यांस निरर्थक किती भयंकर शिक्षा ही ! परंतू इंग्रज सरकारास अगर परमेश्वरास तरी बोल काय म्हणून लावावा? शुक्रनितीमध्‍ये शत्रूचे पारिपत्य असेच करावे म्हणून सांगितले आहे. परमेश्वराने तरी काय अन्याय केला आहे? झांशीच्या लोकांचे पदरी पूर्व दुष्‍कृतच फार मोठे असले पाहिजे. बुंदेलखंडात व्याभिचाराचे पातक पूर्वीपासूनच सांचत आले होते. भंगिणीचा इतिहास मागचे भागात वर्णन केलाच आहे. या पातकपर्वताबद्दल लक्ष्मीबाईचे निमित्ताने ईश्वराने ही भूमि शुद्ध केली असे आम्हांस वाटू लागले.
म्हणजे एवढ्या प्राणांतिक यातना, लूट, नष्‍टचर्य, मानहानी, वित्तहानी होऊनही त्या काळची माणसे स्वत:च्या आयुष्‍यातील घटनांबद्दल स्वत:च्या कर्मांना दोषी धरायला तयार नाहीत. ती पाप मानतात, ईश्वर पापकृत्यांबद्दल दंड देऊन शुद्धी करतो असे मानतात. आपल्या धारणाही थेट अशाच नसतील, पण यापेक्षा फार वेगळ्या नसतील, हे नक्की. म्हणूनच हा वाचनानुभव नुसते वाचन न रहाता ते प्रॅक्टीकली लागू होऊ शकतं. खुद्द झाशीची राणी लक्ष्मीबाईच तिने केलेला प्रतिकार मोडून पडल्याचा अंदाज आल्यानंतर काय म्हणते ते पहा - काल्पीचा रस्ता धरल्यानंतर जातां जातां एके दिवशी सायंकाळी एका खेडेवस्तीस येऊन पोंचलो. तेथून काल्पि सुमारे सहा कोश राहिली होती. गांवाबाहेर चिंचेची झाडी आहे. तेथे स्वयंपाक तयार करुन भोजनें झाल्यावर स्वस्थ निद्रा केली. पाहाटेच्या प्रहर रात्रीच्या सुमारास, एकाएकी मोठा गलका झाला. त्यासरसे उठून पहातो तों शेकडो स्वार रस्त्याने उधळत चालले आहेत असे दृष्‍टीस पडले. हें काय अरिष्‍ट आले आहे याची कल्पना होईना. आम्हीही घाईघाईने आपले सामान गुंडाळून, काखोटीस मारुन, शिपाई लोकांच्या बरोबर पळ काढू लागलो. काही वेळाने असे समजले की, पेशव्यांची व इंग्रजांची चरखारीवर लढाई होऊन त्यात पेशव्यांचा मोड झाला. त्यात झाशीवाली राणीही होती. ती फौज परत काल्पीवर चालली आहे. मग आम्ही किंचीत स्वस्‍थ होऊन झुंजूमुंजूचे सुमारास एका विहिरीवर पाणी काढून शौच मुखमार्जन करण्‍यास बसलों. तों पांच-चार स्वार विहिरीवरुन जात होते. त्यांत झाशीवाली दृष्‍टीस पडली. तिने सर्व पठाणी पोषाख केला होता, व सर्व अंग धुळीने भरले होते, व तोंड किंचीत आरक्त असून म्लान व उदास दिसत होते. तिला तृषा फार लागली असल्यामुळे तिने घोड्यावरुनच आम्हांस तुम्हीं कोण आहां असा प्रश्न केला. तेव्हा आम्ही पुढे होऊन हात जोडून विनंती केली की, आम्ही ब्राह्मण आहो, आपल्यास तृषा लागली असल्यास पाणी काढून देतो. बाईसाहेबांस ओळख पटली व खाली उतरल्या. मी रसी मडके घेऊन लागलीच विहिरीत सोडणार, तो बाईसाहेब म्हणाल्या की, तुम्ही विद्वान ब्राह्मण, तुम्ही मजकरिता पाणी काढू नका. मीच काढून घेते. हे तिचे उदासपणाचे शब्द ऐकून मला फार वाईट वाटले. परंतु निरुपायास्तव मडके खाली ठेवले. बाईसाहेबांनी पाणी काढून, त्या मृण्‍मय पात्रातून ओंजळीने पाणी पिऊन, तृषा हरण केली. दैवगति मोठी विचित्र आहे. नंतर मोठ्या निराश मुद्रेने बोलल्या की,
मी अर्धा शेर तांदुळाची धणीन, मजला रांडमुंडेस विधवा धर्म सोडून, हा उद्योग करण्‍याची काहीच जरुर नव्हती. परंतू हिंदूधर्माचा अभिमान धरुन या कर्मास प्रवृत्त झाले, व याज‍करिता वित्ताची, जीविताची, सर्वांची आशा सोडिली. आमच्या पदरी पातकच फार म्हणून आम्हास ईश्वर यश देत नाही. चरखारीवर मोठी लढाई झाली. परंतू आम्हांस यश आले नाही. काल्पीवरही इंग्रज चालून येत आहे.
माधवराव व नारायणराव पेशवे बंडात सामील नसूनही, इंग्रजांबद्दल त्यांच्या मनात कुठलाही वाईट विचार नसताना ते इंग्रजांचे कैदी बनण्‍याचा प्रसंग पहा -
*श्रीमंत नारायणराव व माधवराव पेशवे हे इंग्रजांशी बिघडले नव्हते; परंतू त्यांचा दिवाण राधाकिसन म्हणून परदेशी होता तो बिघडला होता. प्रथम जेव्हा इंग्रज सरकारवर गहजब गुदरला तेव्हा तेथील कलेक्‍टर वगैरे साहेबलोकांनी चित्रकुटाखालचा 25 लक्षांचा मुलूख व डंघाईचा मुलूख श्रीमंत नारायणराव पेशवे यांचे स्वाधीन करुन दप्तर स्वाधीन केले, व आपण जीवभयास्तव पळून गेले. मुलूख स्वाधीन झाल्यावर दिवाणजीने बंदोबस्ताकरिता म्हणून नवीन शिपाई ठेविले. बिघडलेल्या पलटणांस आश्रय दिला व दारुगोळा, तोफा वगैरे सामान तयार करण्‍याचा कारखाना सुरु केला. परंतु नारायणाराव पेशवे यांचे मनात कोणत्याही प्रकारचा किंतू आला नव्हता. इत्यादि हकीगती आम्हांस चित्रकूटास आल्यावर समजल्या होत्या. आम्ही अनुष्‍ठाणाचे आमंत्रण घरी घेऊन आलो तो अशी बातमी समजली की कपतानसाहेब बरोबर दोन पलटणी घेऊन पयोष्‍णी गंगेपलिकडे दोन कोशावर येऊन उतरला आहे. साहेबाने स्वाराबरोबर पत्र पाठवून श्रीमंतास कळविले की, आम्हास तुमचे भेटीचे प्रयोजन असल्यामुळे तुम्ही उदईक सायंकाळपर्यंत उभयंता बंधू दिवाणजींस बरोबर घेऊन आमचे गोटांत येऊन भेटावे. बरोबर हत्यार किंवा शिपाई आणू नये. श्रीमंताचे मनात स्वताविषयी कोणत्याही प्रकारचा संशय नसल्यामुळे आपण निर्दोषी आहो असे पूर्ण जाणून व इंग्रजांचे न्यायावर पूर्ण भरवंसा ठेऊन श्रीमंतानीही लागलीच त्याच पत्रावर उदईक येऊन भेटतो असा शेरा लिहून पत्र परत पाठवून दिले. तत्रापि, या भेटीपासून काय होते याची काळजी लागल्यामुळे उभयतां बंधूस सर्व रात्र झोप आली नाही. ही बातमी शहरात पसरताच शहरचे लोक अगदी तजा-वजा होऊन गेले. जिकडे तिकडे याच गोष्‍टी चालू होऊन हालचाल होऊन राहिली. कैक लोकांचे अभिप्रायांत श्रीमंतांनी जाऊ नयें, गेल्यास व्यर्थ कैदेत पडून कदाचित प्राणासही मुकतील व सर्व शहर लुटले जाईल असें होते. कित्येक श्रीमंत निर्दोषी आहेत व खरे रितीने वागल्यास त्यांस भय नाही असेही म्हणत होते. रात्रौ बारा घटकाचे सुमारास परदेशी दिवाणजी श्रीमंतांस न जाण्‍याबद्दल उपदेश करु लागला. ''उदईक तुम्ही जाऊं नयें हेच फार चांगले आहे. गेल्यास मूठभर दारु खर्च न होता इंग्रजांचा मनोदय साध्‍य होऊन तुम्ही कदाचित प्राणास मुकाल; तुमची जिंदगी सर्व लुटली जाईल. याजपेक्षा आपल्यापाशी दारुगोळा आहे, लढवई लोक आहेत, आपण येथेच राहून जंग करु. यांत लौकिक आहे. मनुष्‍यास कधीतरी मरणें आहेच. परंतू रांडमरणाने मरुन जाणे हे तुमच्या शूर कुलास उचित नाही, अशी अनेक प्रकारची शूरत्त्वाची भाषणे करुन पेशव्यांचे मन वळविण्याचा यत्न केला. परंतु त्याजवर त्यांचा काही ठसा पडला नाही. शेवटी राधाकिसन परदेशाने कळविले की, आम्ही तर तुम्हाबरोबर येत नाही. आतांच आम्ही येथून दारुगोळा तोफा फौज वगैरे घेऊन जिकडे वाट फुटेल तिकडे घेऊन जाणार. परंतू तुम्ही आम्हास खर्चाकरिता दोन लक्ष रुपये दिले पाहिजेत. न दिल्यास आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊ. हें ऐकतांच श्रीमंतांनी विचार केला की, हा मनुष्‍य जीवावर उदार झाला आहें, त्यांजला आपण स्वखुशीने रुपये न‍ दिले तर वाड्‍याबाहेर फौज आणिली आहे, ती सर्व लुटून फस्त करुन टाकिल. याजकरिता सामोपचाराने रुपये द्यावे हे बरें. असा विचार करुन रुपये तेव्हांच दिले. ते रुपये घेऊन दिवाण वाड्‍यातून बाहेर पडून सर्व फौज बरोबर घेऊन मध्‍य रात्रीस जंगलात निघून गेला. दाहा बारा कोशावर पहाडी किल्ला बंदोबस्ताचा होता, त्यांचा आश्रय करुन राहिला. इकडे श्रीमंतांनी ज्योतिषीबुवांस बोलावून आणून त्यांस असें विचारलें की, उदईक सायंकाळपर्यंत आम्हांस साहेबाचे भेटीस जाण्याचा मुहूर्त केव्हा आहे तो सांगावा. तेव्हा जोशीबुवांनी मुहूर्त उजाडतां साडेपांच वाजता लग्नशुद्धी बरी आहे, बाकी दिवस उद्याचा चांगला नाही, मर्जीस येईल तसे करावे. असे सांगितल्यावरुन नारायणराव व माधवराव साहेबांनी साडेपांच वाजता जावे असा निश्चय केला. आम्ही हरिपंत भावे यांचे माडीवर निजलो होतो. तेथे पहाटेच्या सुमारास जागे होऊन गोष्‍टी बोलत बसलो आहो, इतक्यात स्वारांच्या घोड्‍यांच्या टापांचा टप-टप आवाज कानीं पडतांच धामधूम काय आहे हे पहाण्‍याकरिता रस्त्याकडील खिडकी उघडून पहातो, तो श्रीमंताची स्वारी साहेबांकडे जाण्‍यास निघाली आहे, असे दृष्‍टीस पडले. बरोबर शिबंदीचे लोक सुमारे दोनशें बिनहत्यार होते. खुद्द श्रीमंत माधवराव व नारायणराव मेण्‍यात बसले असून पुढे भालदार पुकारत होते. उजेडाकरिता शेकडो मशाली पेटविल्या होत्या. या बिनहत्यार स्वारीचा थाट पहातांच आम्हास झाशीवालीबाई किल्ल्याबाहेर पडून शत्रूचा घेर फेडण्‍याकरिता निघाली त्यावेळचे स्मरण होऊन फार वाईट वाटले, व हे लोक केवळ अपमान व दु:ख पदरी घेण्‍याकरिता जात आहेत असें वाटूं लागलें. स्वारी झराझर चालून उजेडताचे सुमारास पयोष्‍णीचे पार गेली. स्वारी साहेबाचे तंबूपाशीं जाऊन पोचलीं तों सहा घटका दिवस आला. पुढे जाणार इतक्यात साहेबांकडील स्वार येऊन असे कळविले की, सर्व लोकांनी येथे राहून फक्त नारायणराव व माधवराव साहेबांनी मेण्‍यांतून उतरून पायीच भेटीस यावे. बरोबर एकही मनुष्‍य घेऊ नये. तें समयीं श्रीमंतास अति दु:ख झाले, परंतू येथवर आल्यावर दुसरे गत्यंतर नाही व आपण निर्दोषी आहोत असे मनात आणून निरुपायास्तव मेण्‍यांतून खाली उतरले. व बरोबर एकही मनुष्‍य न घेता तंबूकडे निघाले. श्रीमंत लोकांबरोबर छत्री धरण्‍याकरिता एक मनुष्‍य असतो, तोही बरोबर घेऊ दिला नाही. दिवस ऐन ग्रीष्‍म ऋतूचे असल्यामुळे सूर्याचा प्रखर ताप सुरु झाला होता. श्रीमंतास उन्हात जाण्‍याचा कधीही प्रसंग नसल्यामुळे व चित्तवृत्तीचा क्षोभ झाला असल्याकारणाने त्यांची मुखकमले आरक्त होऊन गेली, डोळे लाल झाले, श्रीमंत तंबूसमोर येऊन पोचले तो साहेब खाना खात बसला होता. व पुढेही चार घटका श्रीमंताची दाद घेतली नाही. त्याजमुळे भर दोन प्रहरच्या उन्हात तंबूसमोर छत्रीशिवाय श्रीमंतांस उभे रहावे लागले. त्यांस बसावयास खुर्चीही कोणी आ़णून दिली नाही. अशी त्यांची दीनावस्‍था पाहून त्यांचे लोक दूर उभे होते, त्यांस अति त्वेष येऊन त्यांचे डोळ्यांस अश्रू येऊ लागले. परंतू त्यांचा कोणत्याही प्रकारचा इलाज चालेना. या शरीराच्या व अपमानाच्या तापामुळे श्रीमंतांस दे माय धरणी ठाय झालें. जीव कासावीस होऊन सर्वांगास घाम सुटला. अति क्षुधा व तृषा उत्पन्न झाली, परंतू स्वीकारलेला मार्ग सोडणे गैर आहे, असे समजून त्या सत्वशील पुरुषांनी होणारा ताप गट्ट करुन तसेच धीर धरुन उभे राहिले. शेवटी साहेब बाहेर येऊन एकदम तुम्हास सरकारचे हुकुमावरुन कैद केले आहे असे सांगितले व लागलीच गोरें शिपायांस भोंवताली गराडा घालण्‍यास हुकूम केला.
असेच कितीतरी प्रसंग पुस्तकभर.. पुस्तक वाचून संपले पण त्यातून उमटलेली हलती बोलती चित्रे, ते सगळे प्रसंग माझ्या मनात रुंजी घालू लागले. या सगळ्या इतिहासाबद्दल अंतर्मुख वगैरे म्हणतात तसे आपोआप झालो - हे अर्थातच त्या पुस्तकातील निर्मळ, थेट ह्रदयाला जाऊन भिडणार्‍या निवेदनामुळे. नुकताच युजींसोबतचा मृत्यू म्हणजे काय त्याबद्दलचा संवाद अनुवादित केला होता. त्यात एक विचार असा होता -
असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे.
पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? नुसता भल्याबुर्‍या आठवणींचा साठा आहे. हेदेखील आपल्याला शिवलिंगावरील भांड्‍यातून पाण्याची धार जशी बाहेर पडत असते त्याप्रमाणे मनातून बाहेर स्रवणार्‍या 'विचारा'तून आपल्याला जाणवतंय. आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. त्यामध्‍ये मात्र मी अगदी ठरवून खोलात शिरणार नाही, त्याची कारणे वेगळी आहेत - तो सगळा 'मिस्टिकल कंटेंट' आहे आणि त्याचं विश्लेषण केलं नाही तरी चालू शकेल - खरं म्हणजे आता बर्‍याच गोष्‍टी केल्या नाहीत तरी चालू शकेल. कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! ;-) ------------------------------------------------------------- जिज्ञासूंसाठी : * मला वाटतं या घटनेबद्दल स्वा. सावकरांचं वेगळं विश्लेषण आहे, ते सावकरांच्याच आवाजात येथे ऐकायला मिळू शकते. *कुठलीही गोष्‍ट तीव्रतेनं करणं या अर्थाने - त्या पुस्तकात जादू वगैरे आहे असं म्हणायचं नाहीय.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
धर्म
भाषा
वाङ्मय
इतिहास
समाज
जीवनमान
कृष्णमुर्ती
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
माहिती
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13584 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

////पण महाजनहो, मी फक्त एवढंच

जयंत कुलकर्णी
Sun, 05/13/2012 - 17:06 नवीन
////पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does ......//// खरे आहे !
  • Log in or register to post comments

मस्त..

मुक्त विहारि
Sun, 05/13/2012 - 17:24 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

वाचनानुभ

पैसा
Sun, 05/13/2012 - 17:48 नवीन
आवडलाच. म्हणजे सुरुवातीच्या भागात पुस्तक परीक्षण चांगलंच झालंय. पुढचा अर्धा भाग मस्त! स्वतंत्रपणे विचार करून लिहिलयस हे आवडलंच. भंकस म्हणजे काय हे शेवट कळलं तर तुला!
  • Log in or register to post comments

झकास.....

निशदे
Sun, 05/13/2012 - 17:49 नवीन
लेका, संपताना 'क्रमशः' असे वाचायला मिळेल असे वाटत होते.......... :) येऊ दे की अजून....... बाकीकडचे प्रतिसाद जरा कमी कर आणि इथे लिही जरा अजून........;)
  • Log in or register to post comments

तिन्ही भाग आवडले.

कवितानागेश
Sun, 05/13/2012 - 18:33 नवीन
तिन्ही भाग आवडले. :)
  • Log in or register to post comments

पटलें....

मन१
Sun, 05/13/2012 - 18:36 नवीन
फार दिवसाणी तुझे म्हणणे समजले,पटले. बहुतांशी सहमतही आहे. मानवी शरिर हे एक हार्डवेअर असून मानवी मन(की विचार?) हे सॉफ्ट्वेअर सदृश काहीतरी आहे. इकडून तिकडे ते इंड्यूस होत जाते. इन्स्टॉल होत जाते. तुमचे इकडून तिकडे गेलेले विचार हा एकप्रकारे तुमचा दुसरा अवतारच होय. व्यक्ती मरते. व्यक्तिमत्वे कधीही नाहित. ती पुनः पुनः वेगवेगळ्या मानवाच्या/व्यक्तिच्या रुपात उमटत राहतात. त्या अर्थाने विचार एक झाड सोडून दुसरे धरते, माणसास झपाटते, ते एक भूत्/पिशाच्च आहे हेच खरे.
  • Log in or register to post comments

पुण्याचे

अँग्री बर्ड
Sun, 05/13/2012 - 18:38 नवीन
पुण्याचे श्री. नंदू फडके वकिलांनी मला हे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला होता. तुमच्या भाषेत तुम्ही पुस्तकाबद्दल मांडलेले विचार छान आवडले आहेत, एक off bit लिखाण आहे. छान. ती लिंक काही पाठवता येते का बघा , धन्यवाद.
  • Log in or register to post comments

विश्लेषण विशेष भावले व आवडले.

बॅटमॅन
Sun, 05/13/2012 - 18:43 नवीन
विश्लेषण विशेष भावले व आवडले. १८५७ च्या गोडसे भटजींकडून २०१२तील यकुच्या मनापर्यंतचा "सड्डन" प्रवास सर्वांत भारी वाटला :)
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंस रे येशा.

प्रचेतस
Sun, 05/13/2012 - 19:13 नवीन
सुरेख लिहिलंस रे येशा. गोडसे भटजींच्या प्रवासाबद्दलही आणि तुझ्या मनाच्या प्रवासाबद्दलही.
  • Log in or register to post comments

पुस्तकाची पीडीएफ येथे अपलोड

यकु
Sun, 05/13/2012 - 19:24 नवीन
पुस्तकाची पीडीएफ येथे अपलोड केली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यु

परिकथेतील राजकुमार
Sun, 05/13/2012 - 19:49 नवीन
यक्कु शेठ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

धन्स...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/14/2012 - 10:30 नवीन
पुस्तकाची ओळख आवडली. जालावर 'माझा प्रवास' या पुस्तकावर अनेकदा अर्धवट संदर्भाने अर्धवट चर्चा झाल्याचे आठवते. हकीगती किती खर्‍या आहेत वगैरेंवरही संशय व्यक्त केला आहे. ते काही असो, पुस्तक वाचायला मिळत नव्हते. आता पुस्तक वाचायला मिळेल म्हणून पुस्तक उतरवून घेतांना खूपच आनंद झाला. लॉट ऑफ धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

यकुशेठ,

प्रास
Sun, 05/13/2012 - 19:45 नवीन
सांगितल्याप्रमाणे माझा प्रवास बद्दल लेख प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे. मी आपला विचार करत होतो की यक्कुशेठ पुस्तक परिक्षण करतायत की रसग्रहण? पण तुम्ही एक उत्तम विश्लेषक आहात हेच या लिखाणाच्या वाचनानंतर अधोरेखित झालेलं आहे. पहिला भाग ते पुस्तक परिक्षण, मधला ते रसग्रहण आणि शेवटला पुस्तकातल्या विचारांचं आणि पुस्तक वाचून आपल्या मनात आलेल्या विचारांचं विश्लेषण अगदी यक्कु-स्टाईल उतरलेलं आहे. सगळ्या लेखाचा निष्कर्ष -
मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does!
हा खरोखर खास. लेखन आवडलं हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.... नै का? :-)
  • Log in or register to post comments

यक्कूशेठ कमाल आहे - शेवटचे विचार विलसीत जास्त आवडले

कापूसकोन्ड्या
Sun, 05/13/2012 - 21:42 नवीन
उत्तम उत्तम लेखन आहे. पुस्तक न वाचताच त्याचे सार आणि तुमची विचार करण्याची पद्धत एकदम आवडण्यासारखीच आहे. शेवटचे विचार विलसीत फक्कड जमले आहे. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! हा तर कळसाध्याय आहे. धन्यवाद आणि अभिवादन.
  • Log in or register to post comments

गोडसे भटजींच्या

मस्त कलंदर
Mon, 05/14/2012 - 00:54 नवीन
गोडसे भटजींच्या प्रवासवर्णनातला एक उतारा पाठ्यपुस्तकात वाचला होता. तेव्हापासून पूर्ण पुस्तक वाचायचे मनात होतेच. वाचन व त्यावरचे मनन-चिंतन आवडले. खरंतर पुस्तक वाचताना एक समांतर विचारप्रक्रिया चालू असते, तिला कधी शब्दबद्ध करायचा यत्न केला नाही, परंतु असंच काहीसं होत असतं असं वाटतं.
  • Log in or register to post comments

प्रशंसनिय...

प्रभाकर पेठकर
Mon, 05/14/2012 - 08:28 नवीन
लेखन हातोटी विशेष प्रशंसनिय आहे. आवडले. 'माझा प्रवास' पुस्तकाबद्दलची उत्सुकता चाळवली आहेच. आता लवकरच वाचून काढतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वाचताना इतक काही वाटुन गेल की

स्पंदना
Mon, 05/14/2012 - 08:36 नवीन
वाचताना इतक काही वाटुन गेल की ते शब्दात उतरवन अशक्य. उदा. झाशीच्या राणीच्या तोंडच वाक्य, लुटालुटीच वर्णन. अन ते सार अस भिडतय न भिडतय तोवर तुझ स्वतःला कापुस पिंजल्या सारख पिंजुन काढण. यश्वंता आत्मकेंद्री होत चाललाय्स का? स्व्तःच्या भोवर्‍यात अडकत निघालायस का? कृपया हा'आत्मकेंद्री' शब्द योग्य अर्थान घेणे. लिखाण खुपच छान.
  • Log in or register to post comments

शुभमंगल सावधान !!!

अर्धवटराव
Mon, 05/14/2012 - 10:04 नवीन
बाकी काहि कळलं नाहि...पण बोळा निघालाय म्हणता... तर आता दुसरा कुठला बोळा फसण्या अगोदर लग्नाचा बार उडवुन द्या यक्कु... दुसरा कुठलाच बोळा आयुष्यात फसायचा नाहि मग... अगदी हमखास उपाय. तसं आम्हि आहोतच लडकेवाले म्हणुन लग्नात मिरवायला ( लग्नाचा इंदोरी पाहुणाचार म्हटल्यावर नुसत्या कल्पनेनीच तोंडाला पाणि सुटलय ;) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

सर्व दु:खाचं आणि अस्वास्थ्याचं एकमेव कारण तादात्म्य!

संजय क्षीरसागर
Mon, 05/14/2012 - 10:59 नवीन
लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद. _____________________________ तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे. _______________________________ >असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही. >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल. >हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो. >आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे. >कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता >व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण >कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती. प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments

प्र.का.टा.आ.

कवितानागेश
Tue, 05/15/2012 - 14:05 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

क्रुपया लिंक द्यावी

राजघराणं
Mon, 05/14/2012 - 16:35 नवीन
माझा प्रवास ची लिंक द्या
  • Log in or register to post comments

सुरेख !

आबा
Mon, 05/14/2012 - 16:45 नवीन
खरंच जबरदस्त पुस्तक आहे हे.. वाचल्यावर माझीही अशीच अवस्था झालेली आठवतेय. परिचय सुद्धा खुप सुरेख करून दिलाय तुम्ही !
  • Log in or register to post comments

लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे

यकु
Mon, 05/14/2012 - 17:22 नवीन
लेखनशैली आणि मांडणी सुरेख आहे हे प्रथम नमूद करतो आणि त्याबद्दल आलेल्या सर्व प्रतिसादांशी सहमती व्यक्त करतो पण त्या अनुभवाचा आध्यात्माशी जोडलेला संबंध चुकीचा आहे म्हणून हा प्रतिसाद.
आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही. हाय साऊंडिंग, लोडेड आणि माझा काहीच अनुभव नसलेले शब्द मी वापरत नाही. त्याची कारणे आहेत, जी या प्रतिसादामध्‍ये स्‍पष्‍ट होतील. मी माझ्या लेखात आध्यात्म हा शब्द कुठेच वापरलेला नाही. यात आध्यात्म तुम्हाला कुठे दिसले? तरीही तुम्हाला यात आध्‍यात्म दिसू शकतं आणि तुम्ही तुमच्या मनातील आध्‍यात्माची प्रतिमा माझ्यावर थापू शकता याचं कारण मी समजू शकतो - ते म्हणजे कुणीही 'विचार', 'अनुभव' या बिगर आध्‍यात्मिक, सामान्य, बिगर आध्‍यात्मिक माणसांकडून नेहमीच्या सामान्य अथाने वापरण्‍याच्या अर्थाने 'विचार', 'अनुभव' हे शब्द वापरले तरी तथाकथित आध्‍यात्माचे आणि पुढे जाऊन म्हणेन की 'मानसशास्‍त्राचे' मक्तेदार, व्यापार्‍यांना आपल्या 'बपौती' वर अतिक्रमण झाल्यासारखे वाटते. म्हणजे जे आध्‍यात्मिक नाहीत, आणि जे 'मानसशास्‍त्राचे' अभ्यासक नाहीत त्या अधेमध्‍ये अडकलेल्या लोकांनी 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलणं केलं तरी लगेच त्यावर 'आध्‍यात्मिक' असा शिक्का मारुन ते अनुभवाचा आध्‍यात्माशी संबंध लावणं कसं चुकीचं आहे (जो मी लाऊ देखील इच्छित नाही, तुम्हीच तो संबंध लावलाय, कारण तिकडे नुसते मेलेले शब्द खदखदताना दिसतायत) यावर व्याख्‍यान झोडलं जातं हे केवळ दुर्दैवी आहे. जे आध्‍यात्मिक नाहीत, ते लोकदेखील 'विचार' आणि 'अनुभव' याबद्दल बोलू शकतात महाशय. Therefore first clear your own terminology & then give a lecture! ही बपौती आजवरचे जेवढे तथाकथित जागृत, आत्मज्ञानी लोक होऊन गेले तेवढ्या लोकांनी तयार केलेली आहे, I am fortunate, I am not one of them ! बपौती हा ऑफन्सीव्ह शब्द योजण्याचं कारण एवढंच की, my dear friend you are dwelling on such a rotten background created since ages, which is dead! Why you try to force your own meanings on others?
तादात्म्य म्हणजे आरश्याला आपण प्रतिबींब झालोय असा होणारा भास. तादात्म्य म्हणजे काय हे समजणं आणि तो दूर होणं हीच अध्यात्माची सुरुवात आणि फलश्रुती आहे. आपण शरीर "झालेलो" नाही, आपल्याला शरीराची "जाणीव" आहे हे समजणं, हा तुमचा अनुभव होणं, शरीराशी झालेलं तादात्म्य एका क्षणात संपवतं. तुम्ही आता, या क्षणी उठा आणि जिथे असाल तिथे रूमच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दहा फेर्‍या मारा, तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय आणि आपल्याला कळतय. आपण शरीराला अंतर्बाह्य व्यापून आहोत पण शरीर झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. जर आपण शरीर असू तर मग "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" ला काही अर्थ उरणार नाही. आता पुढची पायरी सोपीये, कळतय निश्चित पण नक्की "कुठे कळतय" हे तुम्ही सांगू शकणार नाही कारण ज्याला कळतय तो जाणीव स्वरुप आहे. थोडक्यात, आता हे वाचत असलेले सर्व सभासद आपापल्या रुममधे एकाच वेळी उभे राहिले आणि त्यांनी तिथे फेर्‍या मारल्या तर प्रत्येकाला शरीर चालतय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल. हाच अनुभव हेच लेखन वेगवेगळ्या वेळी वाचणार्‍या आणि फेर्‍या मारणार्‍या प्रत्येक व्यक्तीला येईल. याचं कारण जाणीव निराकार आहे आणि स्थल आणि काल यांनी अनाबाधित आहे. या बोधाला सजगता (अवेअरनेस) म्हटलंय. तुम्ही हा बोध जर अहर्निश ठेवू शकलात तर सरते शेवटी तुम्हाला शरीर झोपलय आणि आपल्याला कळतय हा अनुभव येईल त्याला "या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी" म्हटलय. इतका सघन झालेला बोध तुम्हाला मृत्यू समयी शरीर कालावश होतय आणि आपल्याला कळतय या अंतिम अनुभवापर्यंत नेऊ शकेल आणि "नैनं च्छिंदंति शस्त्राणी" या निश्चिंत अवस्थेत तुम्ही मृत्यू जाणू शकाल, ती अध्यात्माची फलश्रुती असेल. सजगता हरवण्याच एकमेव कारण जाणीवेचं मेंदूत डिकोडींग होताना सक्रिय झालेल्या स्मृतीशी तादात्म्य होणं आहे. समजा फेर्‍या मारताना तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की ऑफिसची वेळ झालीये तर त्या विचारासरशी तुमचं सारं स्वास्थ्य हरवेल, एकदम लगबग सुरु होईल, तुम्ही घाईघाईत आवरायला लागाल आणि धावतपळत वेळ गाठायचा प्रयत्न कराल, कसंबसं आवरून तुम्ही निघाल आणि तुम्हाला वाटेल निघालो आपण ऑफिसला! तुम्ही पुन्हा शरीराशी एकरुप झालेले असाल आणि ऑफिसमधल्या कामाच्या विचारांनी तुमची सर्व जाणीव व्यापून टाकलेली असेल. निराकार जाणीव पुन्हा स्वत:ला प्रसंगात सापडलेली व्यक्ती समजायला लागलेली असेल! याला तादात्म्य म्हटलय आणि ते सर्व दु:ख आणि अस्वास्थ्याचं कारण आहे.
This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can!
>असं म्हणतात की विचार टिकून रहातात. होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. = हे साफ चुकीचय, विचारांची आपल्याला "जाणीव" होतेय, आपण विचार "झालेलो" नाही. जाणीव आरसा आहे आणि विचार त्यात पडलेलं प्रतिबींब आहे, प्रतिबींब आरश्याला स्वत:च विस्मरण घडवेल पण आरश्याचं स्वरुप बदलवू शकणार नाही.
Bullshit! काय नेमकं काय आहे ते मला वाटतं मला आणि इथे वर प्रतिसाद दिलेल्या लोकांना कुठल्याही लोडेड संज्ञा वापरुन समजून घेण्याची गरज नाही. कोणती गोष्‍ट काय आहे ते नेहमीच्या सामान्य अर्थानंही लोकांना जाणवू शकतं आणि वरचे प्रतिसाद त्याची साक्ष देतात, त्यामुळे तुमचे अर्थ दुसर्‍यांवर विनाकारण थापण्‍याचा प्रयत्न करु नका.
>पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = तादात्म्य होणं म्हणजे नक्की काय हे यावरून कळेल.
नक्की असं काहीच नसतं हो, आणि काही कळतही नसतं.
>हे थोडंसं मजेशीर आहे, पण आपली जाणीव वेगळ्या अथाने अत्यंत संसर्गजन्य आहे. कुणीही लिहिलेलं असो की बोललेलं, ऐकलेलं काही क्षणांत ते आपल्याला स्मृतीगत होतं - त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे 1857 ते आत्ता मी इंदुरमध्‍ये रहात असलेल्या 2012 पर्यंतच्या काळातील अंतर माझ्या जाणीवेमध्‍ये क्षणात सांधले गेले - आणि मनात मंतव्यांचा खळबळाट होऊ लागला. ते होत असताना माझा श्वास मला आपोआप जाणवू लागला. हे सर्व होत असताना नेमके कोणकोणते प्रश्न मी स्वत:ला विचारले ते आता आठवत नाही - पण मनात एक बेरीज झाली. च्यायला, आपल्या स्मृतीशिवाय, आपल्या जाणीवेशिवाय आपण अस्तित्त्वात आहोतच कुठे? = तादात्म्य होणं नेहमी "या क्षणात" आहे त्यामुळे महाभारत आज, आता वाचणारा कुणीही अर्जुनाच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या चित्तदशेशी आता, या क्षणी एकरुप होऊ शकतो.
असं म्हणता? मग तुम्हीच लवकर त्या चित्तदशेत जा बरं! आणि इथे बर्‍याच लोकांना महाभारतात अर्जुन, युधिष्‍ठिर, भीम, कर्ण, द्रौपदी वगैरे पात्रांनी नेमका काय गोंधळ घालून ठेवला होता तो पाहून या आणि त्यावर त्याच चित्तदशेत एक फक्कडसं व्याख्यान झोडा. लै प्रतिसाद येतील ;-) But stop this bullshitting.
>आपण फक्त जो मनात विचार असेल त्या रुपामध्‍येच जीवंत आहोत. आणि असे हजारो प्रकारचे विचार स्रवून जातात, तेच आपण बनलेलो असतो. हे झालं आता लिहून दाखवायचं आहे म्हणून घडून गेलेल्या मंतव्यांचं फक्त वर्णन. पण हे ज्यामध्‍ये घडलं तो दुसरा अनिवार्य पैलू 'शरीर' आहे - चार-पाच दिवस प्रचंड त्रास भोगावा लागला. = एकदा विचारांशी तादात्म्य झालं की शरीराशी होणं अपरिहार्य आहे. "ऑफिसची वेळ झाली" या विचाराशी तादात्म्य होण्याची पुढची पायरी शारीरिक लगबग, "आपणच ऑफिसला निघालोत" असं वाटून शरीराशी तादात्म्य आणि मग सर्व शारीरिक तणावांशी तादात्म्य अशी ती लिंक आहे.
Bullshit!
>कारण त्या का घडत आहेत हे केवळ 'विचार' ही वस्तू काय आहे ते लख्‍ख दिसल्याने दिसलंय, दिसतंय. लोकांना वाटतं हॅ! हे पोरगं नेहमीच काहीतरी भंजाळणारं लिहित रहातं - पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं! Each & Everything everyone does! = ही विचारांशी संपूर्ण तादात्म्य झाल्यानं आलेली उद्विग्नता
पहिल्यांदा तर तादात्म्य फिदात्म्य वगैरे आपल्याला माहित नाही. पण लगेच ते तादात्म्यच आहे म्हणून त्यावर 'उद्विग्नता' असा शिक्का मारुन मोकळे ! तुम्हाला काय ## माहितीय मी उद्विग्न आहे की आनंदीत?
>व्यक्त झालेल्या विचाराच्या रुपात मानवी शरीरातला 'मुव्हींग फोर्स' कसाही कुठेही जाऊन आदळलाय, आदळतोय आणि ती आपली कृती बनतेय, ते आपण बनतोय हे सर्वजण पहाताय ना? बस्स! मग तेवढंच. = आपण सदैव अकर्ता आहोत पण शारीरिक तादात्म्यामुळे आपणच कृत्य करतोय असं वाटतं त्याचं हे उदाहरण
Again bullshit.
>कालपर्यंत जे माझे खरोखर प्रश्न होते़ ते फटक्यात संपले - आणि तेही एका बिगर आध्‍यात्मिक पुस्तकाच्या वाचन-मननामुळे ही आश्चर्याची बाब आहे* - हे आपल्यापर्यंत पोहोचवावं वाटलं - थोडक्यात जालीय भाषेत सांगायचं तर माझा बोळा कायमचा निघाला ! = तादात्म्य हाच बोळा आहे हे कळणं म्हणजे मुक्ती.
B U L L S H I T !
प्रतिसादाचा हेतू लेखकाचा किंवा त्याच्या अनुभवाचा अथवा त्याच्या आदरस्थानी असलेल्या व्यक्तींचा अवमान करणं असा कदापिही नाहीये, तसं कुणीही वाटून घेऊ नये. या निमित्तानं चर्चा झालीच तर तादात्म्य या आध्यात्मातल्या केंद्रीय विषयावर निर्वैयक्तिक आणि विधायक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. व्यक्तिगत रोख असणार्‍या प्रतिसादांना उत्तरं दिली जाणार नाहीत.
मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! मी वरच्या प्रतिसादात 'पर्सनल' झालेलो नाहीय, I am just calling a spade, a spade ! May be in very harsh word, but I cannot resist & succumb to such nonsense.
  • Log in or register to post comments

>मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Mon, 05/14/2012 - 17:30 नवीन
काही हरकत नाही
  • Log in or register to post comments

>मला कुणीही आदरस्थानी नाहीय.

यकु
Mon, 05/14/2012 - 18:33 नवीन
>मला कुणीही आदरस्थानी नाहीय. नो चर्चा फिर्चा! खूप खूप धन्यवाद! काही हरकत नाही
पुन्हा एकदा प्रतिसाद देऊन मुद्दाम स्पष्‍ट करतोय, मी चर्चा का नको म्हणतोय ते, आणि कसल्याप्रकारची चर्चा हवी आहे ते. तुम्ही जे पिढ्यान पिढ्‍यांपासून वापरले गेलेले शब्द वापरता आहात, ते शब्द फक्त आणि फक्त 'थेट अनुभव' लांबवण्‍यासाठी आणि in the meantime आध्‍यात्माच्या नावाखाली स्वत: चे पोट जाळण्यासाठी वापरले गेलेले मी पाहिले आहेत, म्हणून मी शक्य तिथे असल्या फालतु बकबकीला होईल तेवढा विरोध करतो, पण यामध्‍ये खरोखर अनुभव असलेल्या माणसावरही माझ्याकडून हल्ला होऊ नये म्हणून या प्रतिसादाचा अतिरिक्त पुढाकार as a precaution not to insult anybody & openness to all things. 'थेट अनुभव' असेल तो जाहिर शेअर करायला काहीच हरकत नाही. माझ्याकडे थेट अनुभव पुरता नसला तरी अंशत: नक्कीच आहे (आणि तो पूर्ण कधी होईल याबद्दल मला किंचीतही घाई नाही, न तो खोटा ठरेल याची भीती नाही, कारण मला येणारे अनुभव पूर्णत: शारीरिक as well as मानसिक आहेत -त्यामुळं मरेपर्यंत माझ्यासोबत रहाणारं शरीर हा सज्जड पुरावा मी मानतो, अस्पष्‍ट अर्थात, जुन्या मनोभूमिकेतून केलेलं सुंदर बोलणं मला आ‍कर्षित करु शकत नाही ) आणि मी तो शेअर करायला तयार आहे. तुम्ही तो कुठलेही हाय साऊंडिंग शब्द न वापरता शेअर करायला तयार आहात काय? थेट अनुभव in the sense पुढे होणार्‍या चर्चेमध्‍ये तुम्ही सर्व गोष्‍टी शरीरशास्‍त्रीय अर्थामध्‍ये सांगितल्या पाहिजेत. यामध्‍ये या गोष्‍टींचा समावेश असेल : - 1. ही सगळी सगळ्या प्रकारची आध्‍यात्मिक ओव्हरटोन्स असलेली बडबड जो पचवतो, त्याच्या शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात? यात प्रत्येक गोष्‍ट शब्दात क्लिअर झाली पाहिजे. तथाकथित आध्‍यात्मिक अनुभवांबद्दल जाहीर चर्चा करु नये असा जो समज आहे तो मी मानत नाही - गोष्‍टी जर बायॉलॉजीकली दिसत असतील तर त्या लपवायच्या का? 2. शारीरिक अनुभव शेअर करण्‍यावर माझा भर एवढ्याचसाठी की कुंडलिनी, ती सगळी शरीरातील चक्रे वगैरेबद्दल कुठंही स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंटेशन उपलब्ध नाही. सो दॅट शूड बी डिस्कस्‍ड प्युअर्ली इन बायॉलॉजीकल सेन्स, विदाऊट एनी मिस्टिकल मिनींग. 3. हा आग्रह तुम्ही खरे की खोटे हे सिद्ध करण्‍यासाठी नाही, तर जागृत झाल्याचा दावा करणारे काही मोजके लोक सोडले कुंडलिनी, ती चक्रे वगैरेबद्दल ना पुरतं आध्‍यात्मिक लोकांनी डॉक्युमेंटेशन ठेवलंय ना विज्ञानाला मानवी शरीरात असलेल्या या गोष्‍टींबद्दल काही विश्लेषण देता आलंय. बघा, तयारी असेल तर सांगा, मी तयार आहे.
  • Log in or register to post comments

-

इनिगोय
Mon, 05/14/2012 - 19:59 नवीन
.(एवढ्या सुंदर लेखानंतर हे असे चर्वितचर्वण) ... का? का? का?
  • Log in or register to post comments

चर्वितचर्वण क्षीरसागरांनी

यकु
Mon, 05/14/2012 - 20:14 नवीन
चर्वितचर्वण
क्षीरसागरांनी सुरु केलंय ;-) मी तर सगळंच करण्‍यासाठी तयार आहे बुवा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 01:40 नवीन
>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

>पण महाजनहो, मी फक्त एवढंच

यकु
Tue, 05/15/2012 - 09:10 नवीन
>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे - म्हणून आता डिट्टेलवार उत्तर. मला वाटतं विचारालाही मानवी मनाच्या कोतेपणातून उद्धभवलेली, आणि क्षणोक्षणी बदलत रहाणारी श्रेष्‍ठ-कनिष्‍ठ ही मूल्ये लागू करायला नकोत. विचाराकडे as an ongoing process म्हणून पहायला हवं ज्या प्रोसेसमधून तथाकथित व्यक्तित्वे, विचारसरणी, तत्त्वज्ञान अगदी भ्रमासहित बर्‍याच गोष्‍टी निर्माण होतात. विचारांबद्दल अभ्यस्त नसताना माणसाचे विचारच तो कसल्या प्रकारचा माणूस बनतो ते ठरवतात; मग विचार हा मुव्हींग फोर्स, क्षणभर मानू आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ आहेच, तर विचार आपल्यापेक्षा श्रेष्‍ठ हे सर्वथा चुकीचं कसं? मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत - अर्थात आता on my own सगळी उत्तरं मिळून गेल्यानं यावर उत्तर अपेक्षित नाहीच. बाकी राहिलं अध्यात्म आणि इतर गोष्‍टी, तर आता माझ्या बाबतीत सगळ्याच गोष्‍टींचा दी एंड झालेला असल्यानं त्याबद्दल बोलत नाही. >आध्यात्म म्हणजे काय ते मला माहित नाही, जाणून घेण्यात इंटरेस्ट नाही >This is Bullshit ! Garbage ! Get rid of it as soon as you can! >Bullshit! >But stop this bullshitting >Bullshit! >Again bullshit. >B U L L S H I T ! हे एवढच तुम्हाला कळतय आणि मी काहीही सांगीतलं तरी तुम्ही फक्त तेवढंच म्हटलं की तुमचं काम झालं! -- हॅहॅहॅ.. मला एवढंच नाही, बरंच कळतंय त्यामुळं तुम्ही काहीच सांगण्याची गरज नव्हती, माझं काम आणखी बरंच बाकी आहे. गरज पडेल त्या ठिकाणी ते होत राहिलच. >त्यामुळे मी तरी या लेवलला येऊन चर्चा करू शकत नाही. -- मी कोणत्याही लेव्हलला जाऊन चर्चा करु शकत होतो कारण मला कुठली लेव्हलच दिसत नव्हती - every word was equally same for me because those were coming from God knows where & I was troubled about whole this thing in futile. >अर्थात माझे विचार व्यक्त करण्याची संधी या लेखामुळे मिळाली त्याबद्दल धन्यवाद. -- सेम हिअर. बाकी ते वर लिहिलेले दोन-तीन मुद्दे तुम्ही टाळलेले असले तरी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यासाठी माझ्याकडून चर्चेकरिता कधीही खुले आहेत.
  • Log in or register to post comments

////>पण महाजनहो, मी फक्त

जयंत कुलकर्णी
Tue, 05/15/2012 - 15:51 नवीन
////>पण महाजनहो, मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की 'विचारच' जीवंत असलेल्या सगळ्यांच्या बोकांडीवर कसाही कुणीकडून चढत रहातो - त्यामुळंच सर्व प्रकारची भंकस चालू आहे - यात सगळं म्हणजे सगळंच आलं = हे तुमच्या लेखाचं कन्क्लूजन आहे आणि याचा अर्थ विचार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा होतो, ते सर्वथा चुकीचय. अध्यात्म तुम्हाला मानसिकता आणि देहभाव यातून कसं बाहेर पडायच हे सांगतं म्हणून प्रतिसाद दिला होता, पणः --- हो, तेच कनक्लूजन होत....../////// यशवंत, मी चुकीचे समजलो. हेच जर कनक्ल्युजन असेल तर मी माझा पहिला प्रतिसाद परत घेत आहे. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

बर.

यकु
Tue, 05/15/2012 - 16:03 नवीन
बर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

विचार

वारा
Tue, 05/15/2012 - 12:52 नवीन
नमस्कार यकु साहेब, मी तुमचे सगळेच लेख वाचतो. प्रत्येक वेळी मला कुठेतरी वेगळ्या जगात जाउन आल्यासारखे वाटत. खरतर मी जास्तीत जास्त वाचन मात्र असतो आणि सहसा प्रतीक्रिया वगैरे देत नाही. कदाचीत तो माझा स्वार्थी स्वभाव असेल किंवा आळशीपणा असेल. पण मी असच करतो, का ते माहीत नाही. इंटरेस्टींग पार्ट असा आहे की तुमचे लेख असा काही विचार डोक्यात घालतात की स्वतः मुर्ख असल्याची कित्येक वेळा जाणिव होते, कारण अशा पद्धतीने कधी विचारच केलेला नसतो, याआधी विचार करताना मी स्वतः कडे कधीही त्रयस्त नजरेने पाहीले नव्हते. आशचर्याचा भाग म्हणजे त्रयस्त नजरेने स्वतःकडे पाहील्यावर अस जाणवत की आपल्याकडुन बर्याच वेळा तीच तीच वाक्य परत परत मनातल्या मनात बडबडली जातात. आणि या वाक्यांचा किंवा या विचारांचा फोर्स आपल्याकडुन कामे करवुन घेतो. आपल्याला ती क्रिया आवडो अथवा न आवडो, त्याचा भलेही आपल्याला शारीरीक सुद्धा त्रास होत असो. आणि हे विचारच आपल्याला भरकटत नेतात. आपण सुरुवात एका विचाराने करतो आणि एकातुन दुसर्यात ,दुसर्यातुन तिसर्या विचारात आपला प्रवास चालु होतो. नेमका आपला अजेंडा काय होता? आपल्याला करायचे काय होते हे पण विसरले जाते. आपण जेव्हा हे सगळ एखद्याला सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा अ‍ॅक्चुली त्यावेळेच्या परीस्थीती नुसार विचारात बदल झालेला असतो, आणि आपल्याला याची जाणीव व्यक्त झाल्यावर होते. आणि ईथच मनातल्या मनात कहीतरी चुकल्याची जाणीव होते. परत विचार आपला ताबा घेतात व चुक सुधारण्यासाठी आटापीटा करायला लावतात. आपणच आपल्याबरोबर भांडायला लागतो. मी हे सगळ का सांगतोय? कारण या अशा डायरेक्शन वर जाउन विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. तरी याबाबत चर्चा करणे नक्कीच आवडेल . एक नवी दिशा दाखवल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments

>> विचारांच्या विळख्यातुन

यकु
Tue, 05/15/2012 - 13:34 नवीन
>> विचारांच्या विळख्यातुन सुटका होईल अस वाटत आहे. --- विचार ही फक्त एक मुव्हमेंट म्हणून पाहिली, आणि त्यातल्या 'कंटेंट'ला फारसं महत्त्व दिलं नाही तर पुढे पुढे फार मजा येईल. आणखी एक, जेव्हा ही मुव्हमेंट प्रचंड बलीष्‍ठ होईल आणि कुठेच जाऊ शकणार नाही तेव्हा प्रचंड तुफानात झाड झोडपले जाते तसे तुम्ही उलटेपालटे व्हाल, तेव्हा घाबरु नका - तुम्ही मोडून पडणार नाही, नवी पालवी फुटेल. :)
  • Log in or register to post comments

ओनरशीप.

वारा
Tue, 05/15/2012 - 15:18 नवीन
बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विचारांची ओनरशीप कोणाकडे असते? क्या बात है!

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 15:46 नवीन
>म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. = याला म्हणतात प्रश्न! आता बघा यकुंच उत्तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

>>>बर अजुन एक प्रश्न डोक्यात

यकु
Tue, 05/15/2012 - 15:47 नवीन
>>>बर अजुन एक प्रश्न डोक्यात येत राहतो. तो म्हणजे या विचारांची ओनरशीप कोणाकडे असते. म्हणजे मला नवीन काहीतरी आयडीया सुचली तर ती माझीच असते का? ---- मला हे कळू शकत नाही. माझ्याकडे कसल्याच गोष्‍टीवर कसलीही ओनरशीप नाही, तुमचं कसं आहे ते तुम्हाला स्वत:ला पहावं लागेल. मुळात मला हा प्रश्नच पडत नाही, आणि मुद्दाम पाडून घेतला तरीही काही उत्तर येत नाहीय. मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. >>>की आपल्याला आलेले अनुभव किंवा मला सांगीतलेल्या गोष्टी यांच्या मार्फत कोणा दुसर्याचाच अजेंडा आपण चालवत असतो, काम करतो आपण पण ती कोणा दुसर्याचीच ईच्छा असते. ---- वरच्या सारखंच. काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा

वारा, कळलं का?

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 16:44 नवीन
म्हणजे पुस्तकातले शब्द पाहिले की असं: >पुस्तक वाचताना मी ते पूर्णपणे जगलो होतो. मीच गोडसे भटजी झालो होतो. काका त्या अरण्‍यात निश्चेष्‍ट होऊन पडलेले असताना मीच मावळत्या सूर्यदेवाला आम्हाला त्या अरण्‍यातून सुखरुप बाहेर काढण्‍यासाठी करुणा भाकली होती. = आणि प्रतिसादातले शब्द पाहिले की असं: >मी फक्त वरच्या शब्दांकडे पहातोय आणि काहीच प्रतिक्रिया उमटत नाहीय. = आणि सरते शेवटी हे असं! : >काहीतरी कशाकडे तरी पहातंय आणि त्यातून काहीही उमटत नाहीय. = वारा, कळलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

?????

यकु
Tue, 05/15/2012 - 16:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शब्द संपले, आता डान्स पाहा!

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 17:22 नवीन
यकु, थँक यू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

???

वारा
Tue, 05/15/2012 - 18:00 नवीन
मला खरतर दोघांच्या बद्द्लही आदर आहे. अस काहीतरी होईल अस वाटल नव्हत. असो तरीही माझे अनुभव खरे आहेत आणि माझा प्रश्नही खराच आहे. कदाचीत यकु सांगतात त्याप्रमाणे मलाच उत्तर शोधावे लागेल. मला अस बर्याच वेळेला वाटल आहे की आपण कुणीतरी सांगीतलेल्या गोष्टी फॉलो करतोय, यामधे स्वतःला काही सुख दु:ख नसत. अगदी टीव्ही वर दीसणार्या अ‍ॅड्स सुद्धा काहीतरी सांगत असतात आणि आपणच काय सगळेच फॉलो करत असतात. त्यांच्या भंपक जाहीरातीना बळी पडुन आपण काहीतरी फॅड बरोबर घेउन जात असतो, बरोबर एखादी वस्तु विकत घेतो. आणि अशा प्रकारे कंपनीचाच फायदा करुन देतो. वस्तु घरी आली की त्याची किंमत झीरो, फक्त त्याचा उपयोग आणि वापर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तो माझा कालपर्यंत अनुभव होता?

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 15:02 नवीन
>हो, तेच कनक्लूजन होतं आणि तो माझा कालपर्यंत अनुभव होता. आज परिस्थिती बदलली आहे. = हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती....नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? >मुळात 'माणूस' आणि त्याचे 'विचार' या अभिन्न गोष्‍टी नाहीत? = ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही
  • Log in or register to post comments

>>हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा

यकु
Tue, 05/15/2012 - 15:34 नवीन
>>हाच सॉमरसॉल्ट तुम्ही केव्हा मारता याची प्रतिक्षा होती.... --- माझी कशाला प्रतिक्षा करता? >>नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड? --- आय डोंट नो. :) >>ज्याला विचार कळतोय तो विचारापेक्षा वेगळा हवाच ! पण हे कळायला कमालीची सजगता हवी आणि तेच मी पहिल्या प्रतिसादात सांगीतलय! -- मला ते कळलं नाही, कळणारही नाही, कळवून घेणारही नाही. >>हे रोजचं सॉमरसॉल्टींग आणि ती भाषा यामुळेच तर चर्चा होऊ शकत नाही --- चर्चा कशावर?
  • Log in or register to post comments

नाऊ व्हॉट योर एनटायर पोस्ट बिकम्स? वॉट इज दॅट वर्ड?

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 15:45 नवीन
>आय डोंट नो. = याला म्हणतात सॉमरसॉल्ट! >चर्चा कशावर? = वॉट अ सॉमरसॉल्ट अगेन!
  • Log in or register to post comments

>याला म्हणतात सॉमरसॉल्ट! -

यकु
Tue, 05/15/2012 - 15:52 नवीन
>याला म्हणतात सॉमरसॉल्ट! - म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाहीय. > वॉट अ सॉमरसॉल्ट अगेन! - :( सॉरी, इकडे काहीच होत नाहीय.
  • Log in or register to post comments

मी सॉमरसॉल्टींग म्हणजे काय ते सांगत होतो

संजय क्षीरसागर
Tue, 05/15/2012 - 17:03 नवीन
>म्हणत असावेत, आत्ता पुन्हा पाहिलं तर तुम्ही सांगूनही मला काहीही समजत नाही? = `स्वतःचे शब्द आठवत नाहीत' असं म्हणणं हा सॉमरसॉल्ट! = आणि >सॉरी, इकडे काहीच होत नाहीय. या `मानसिकतेला' म्हणतात.... आता आठवला शब्द? नाही तर जरा स्क्रोल केलं की दिसेलच. ... आता कळलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

--- I am not going to get

यकु
Tue, 05/15/2012 - 17:15 नवीन
:( --- I am not going to get anything. Please don't explain to me.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

यक्या, तू कसंही लिहीत रहा

प्यारे१
Tue, 05/15/2012 - 17:46 नवीन
यक्या, तू कसंही लिहीत रहा ,आम्ही तसंही वाचत राहू, ज्यांना किसायचं ते किसत राहतील, ज्यांना मिसायचं ते मिसत राहतील वाटू देत कसंही, तू दुर्लक्ष करीत राहा, यक्या तू लिहीत रहा! असेल दुर्बोध, असेल मूर्खपणाही, असेल सरळही , कधी बावळटपणाही, तू लिहील्यावर लागू दे लोकांना थोडं कामाला, वॉलन्टरी नंतरचा वेळ लागू दे डोकं जरासं ताणायला, यक्या तू लिहीत राहा! बुडबुडे शब्दांचे, बुडबुडे कुडमुड्या तोंडांचे, बुडबुडे वाहत्या शाई चे, कधी नसत्या घाईचे, बुडबुडे स्वघरी न विचारल्या जाणार्‍या गैरसोयीचे असेच कधी शष्प न कळणारे गोंधळ घालत जा यक्या तू लिहीत राहा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा