Skip to main content

पाणीपुरी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 22/09/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत. अरे पाणी पुरी काय खायची गोष्ट आहे? या आता इतर कुणाच्याही आक्षेपाला 'होय, पाणीपुरी खायचीच गोष्ट आहे, या आग्रहापर्यंत अस्मादिकांचा प्रवास झालाय. आता महाराष्ट्रात राहून भय्यांच्या हातची पाणीपुरी खाणार्‍यांना कदाचित माझ्या बोलण्यातलं इंगित कळायचं नाही, त्यासाठी राजे हो, इंदूरलाच यावं लागेल. इकडे पाणीपुरी (इथल्या भाषेत पानी-पतासे) तुम्हाला कुठंही मिळेल. अगदी पाच रूपयात दहा-पंधरा पुर्‍या देणार्‍यापासून ते अगदी पाच रूपयांत पाच पुर्‍यांपर्यंतची रेंज इथे आहे. पण मुळात पाणीपुरी म्हणजे काय ते तुम्हाला आधी कळलं पाहिजे. त्यात पुदिन्याचं पाणी तर हवंच. त्याला मस्तपैकी हिरवा रंगही यायला हवा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याला मस्तपैकी 'चरका' म्हणजे तिखट स्वादही हवा. आता हा तिखट स्वाद म्हणजे लागलीच 'हाशहुश्श' करायला लावणारा नव्हे. आणि हा स्वादही दोन-चार पुर्‍या खाल्ल्यानंतर यायला हवा. तरच पाणीपुरी जमली महाराजा. आणि हो, ते महाराष्ट्रात मिळतं, तसं आंबटगोड पाणीही इथं असतं, पण ते स्पेशल मागणीनुसारच. ज्यांना ज्जहाल पाणीपुरी पचत, परवडत (पोटाच्या दृष्टीने) नाही, त्यांनी बापडं हे पाणी घालून घ्यावं. पण अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा? पाणीपुरी खायची ती तिखट पाण्याचीच. आंबटगोडची बातच नच्छो. पाणीपुरीत बुंदी घालतात महाराष्ट्रात. तशी ती इथेही असते, पण त्यात बटाट्याचं मस्तपैकी सारणही असतं. पाणीपुरीची चव अप्रतिम करण्यात यांचाही वाटा नक्कीच मोठाय. पण या सगळ्या घटकाचं गणित तेवढं त्या पाणीपुरीवाल्याला जमलं पाहिजे. नाही तर काही तरी 'बाकी' राहून चव मात्र शून्य होते. आणि हो, पाणीपुरी खायचंही टेक्निक आहे, बरं का महाराजा. भय्यानं पाणी भरून पुरी देणं आणि ती 'गिळंकृत' करणं यात एकतानता निर्माण व्हायला हवी नि ती पाच-सहा पुर्‍यांनी होत नाही. त्यासाठी एकामागोमाग एक पुर्‍यांची अशी लड लागली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या पुर्‍यांची बरोबरी इथल्या पुर्‍यांशी करू नका. तिथल्या भय्यांसारखी पोटं खपाटीला गेलेली पुरी इथे मिळत नाही. इथल्या लोकांसारखीच नि त्यांच्या प्रेमासारखीच गोलगरगरीत पुरी इथं असते. त्यातलं पाणी ओरपल्याशिवाय पुरी खाल्ल्याचं समाधान नाही, मिळणार महाराजा. महत्त्वाचं म्हणजे, पाणीपुरी कुठे खायची हेच कळलं नाही तर मग तुमची इंदूरवारी व्यर्थ. म्हणूनच इंदूरला आलात तर सराफ्यात जालच. तिथे गेल्यानंतर सराफा पोलिस चौकीच्या कॉर्नरला दोन पाणीपुरीवाले बसतात. पण अहं, त्यातल्या पोलिस चौकीच्या बाजूने बसतो, त्याची खाऊ नका. तशी तीही चांगलीच असते. पण अलीकडच्याची खाल्लीत ना तर 'दिल बाग बाग हो गया' की कायसं हिंदीत म्हणतात ना तसं होतं. नाही तर मग सिख मोहल्ल्यात या. इथे लोक फक्त पाणीपुरी खायला येतात. ( याच गल्लीत गानसम्राज्ञ लता मंगेशकरांचा जन्म झालाय. या 'मधुर' स्वराच्या गायिकेची ही गल्ली त्याच्या 'तिखट' स्वादासाठी प्रसिद्ध आहे!) तिथेही नाही जमलं तर मग छावणीत जाऊन मथुरावाल्याची पाणीपुरी खायला विसरू नका. छप्पनलाही पाणीपुरी मिळते चांगली, पण त्याहीपेक्षा मथुरावाल्याची चव काही औरच. त्याची पाणीपुरीही अप्रतिम. तिथली पाणीपुरी खाता खाता मरण आलं तरी बेहत्तर. त्यानंतर मग तिकडे बंगाली चौराह्याला जातानाही एक पाणीपुरीवाला आहे. तिथेही पाणीपुरी छान मिळते. बाकी इंदुरात कुठेही गेलात तरी पाणीपुरी किमान एका 'एव्हरेज' दर्जाची तरी मिळतेच. पण वरच्या ठिकाणी ती खाल्लीत तर मग तुम्ही स्वर्गसुख अनुभवून आलात, असं म्हणायला काहीच हरकत नाही, काय? ता. क. आणि हो, इंदूरच्या पाणीपुरीशी महाराष्ट्रातल्या पाणीपुरीशी तुलना करू जाल, तर जरा थांबा. कारण इथली पाणीपुरी ही साक्षात अनुभवायचीच गोष्ट आहे, महाराजा. अक्षरांमध्ये तिची चव मावत नाही, त्यामुळे तुलनेची बातच नच्छो काय?

वाचने 16324
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

सेना भवन वरुन राजा राणी सीग्नल ला जाताना राईट्ला आदर्श हॉटेल्च्या गल्लित पन १ पाणीपुरीवाला आहे. सुरेख मिळ्ते पाणिपुरी ;;) चुचु

सेना भवन वरुन राजा राणी सीग्नल ला जाताना राईट्ला आदर्श हॉटेल्च्या गल्लित पन १ पाणीपुरीवाला आहे. सुरेख मिळ्ते पाणिपुरी ;;) चुचु

आहाहा ... तोंडाला पाणी सुटलं, आता पुरीचा उतारा पाहीजेच! अदिती

पाणी सुटलं ना राव.

या पुण्याला अस्सल पाणी पुरी खाउ घालतो..असो.. ईंदुरात किंवा पुर्ण एम.पी.त कचोरी हा प्रकार जास्त फेमस आहे...सकाळी-सकाळी मिळणार कढईत(वोक-पॅन) मध्ये तापविलेल दुध तर झकासच..बाकी ..महु - ईदोंर रोडवर एक झुणका भाकर टाईप काहीतरी खाल्ल होत . नाव आठवत नाही.. बाकी लेखाची थीम छानच.. सू हा स...

मस्त.. येतोच आता पाणीपूरी हादडुन... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

या दोन गोष्टींसाठी तरी इंदूरवारी मष्ट आहे :) सक्काळी सक्काळी चटकदार लेख वाचायला मजा आली !

पाणीपुरी... छे कालच गावाहुन आलो पण पाणीपुरी नाही खाल्ली!!!! च्यायला मला वाटले मी औरंगाबदला राहयचो... माझ्या कडे पण अशीच पा पु कसे काय मिळते बरे. :? असेच पुदिण्याचे पाणी... बटाट्याचा मसाला निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मस्त पाणी सुटलं तोंडाला...आता मुंबईच्या पाणीपुरीबद्दल लिहिलंच पाहिजे :) हम भी कुछ कम नही :)

असं सगळं लिहून का त्रास देताय? आता आम्ही इंदोरला कधी येणार पाणीपुरी खायला? छे बुवा! आता करावीच लागणार पाणीपुरी! रेवती

In reply to by रेवती

रेवतीताई, आता का? आं? तुम्ही चवदार पाकृ टाकता तेव्हा आम्ही हेच म्हणत असतो. तेव्हा नाही आमचा विचार करत. आता कळलं, दुखलं की कसं दुखतं ते? :) भोचक, आपण मित्र की नाही? इंदूरच्या सगळ्या 'खाऊगल्ल्या' आण इथं. ही माझ्याकडून सुपारी तुला. म्हणजे मी देतोय ती सुपारी खाऊगल्ल्या इथं आणायची. त्या बदल्यात तुला जे हवे ते. वर सुपारी खायला देईन. या सगळ्या सुगरणींना काही तरी दिलं पाहिजे आपण. ते असं देऊया!!! ;)

In reply to by श्रावण मोडक

शेवटी श्रा. मों.नी सूड घेतलाच. हि हा हा हा!;) रेवती

खल्लास्स्स्स्स !!!!!!!!!!!!!!!!!!!!! पाणीपुरी म्हणजे आपल्याला लयं आवडणारा आयटम (तो नव्हे... ;) ) रगडा घालुन केलेली गरम पाणीपुरी,,,आणि थंड केलेल्या तिखट पाण्याने भरलेली आणि खजुराच्या गोड पाण्यात घालुन बुंदीयुक्त असलेली पाणीपुरी खाण्याची संधी जेव्हा मिळते तेव्ह्या.... मी ती संधी सोडत नाही :) इंदुरात इतक्यावेळा जाऊन देखील अजुन तिकडची पाणीपुरी खाल्लेली नाही !!! :( मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हॅहॅहॅ ... आम्ही प्लेट वाईज पाणिपुरी कधीच घेत नाही ... "थांब" म्हणत नाही तोवर "नॉनस्टॉप टाकत रहाणे" असला हुकून सोडायचा ... आणि शेवटी चार पाच मसाला पुरी (काँप्लिमेंट्री) :) -(पाणिपुरी प्रेमी) रग्डोबा पॅटीस

असली छायाचित्रे टाकु नका इकडे :''( :''(

आहाहा, पाणीपुरी असं नुसतं कुणी म्हणालं तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानपणी मोठी माणसं मस्त पुर्‍या मटकवायची. आम्हा मुलांसाठी मात्र भेळेची ऑर्डर. त्यामूळे या अप्राप्य पदार्थाबद्दल प्रचंड कुतुहल आणि आकर्षण. ७वी त पहिल्यांदा बाबांबरोबर पाणीपुरी खाल्ली. मोठं झाल्याच सर्टिफिकेट मिळालं होतं.

सॉल्लिड!!!! पाणीपुरी..... अम्म्म्म!!!!! हा लेख म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे... कुठून आणायची आता भय्याची पाणीपुरी!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

इंदुरात सरवटे बस स्टँडजवळ, (अगदी दवा बाजारच्या पुढे, छोटी ग्वालटोलीत) एका हॉटेलीत मी नेहमी नाश्टा करायचो, संध्याकाळी कचोरी, समोसे, पानीपुरी खायचो. त्याची आठवण झाली. माझ्या ऑफीसातील प्यून व माझी चांगलीच गट्टी जमली होती. तो स्थानीक होता. दरदिवशी आम्ही नव नविन हाटेली भटकायचो. राजवाड्यात तर पडीकच होतो आम्ही. बाकी त्या स्टेडीयम जवळ्च्या चौराह्यावरील साउथईंडीयन हाटेलीचे नाव काय हो? विसरलो बॉ. चेन रेस्टॉरंट आहे ते. भोपाळला पण पाहिले होते ते. समोसे कचोरीला उतारा म्हणून ईडली खायला मस्त आहे ते. हिरवे पडदे बिडदे आहे बघा. काफी एकदम मस्त. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

लोकमत चौक. -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

सावरकर चौक -दिलीप बिरुटे

In reply to by मिसळभोक्ता

नागपूर... लोकमत चौक... पाणीपुरी... मग सगळं काही विसरा!! -अनामिक

उपास सुरू असल्यानं पाणीपुरीवरचा प्रतिसाद राखीव ठेवण्यात येत आहे. :W लेख मात्र मस्तच आहे. पाणीपुरीपेक्षा जास्त खमंग. =D> भोचकभाऊनं भुताटकीतून बाहेर काढलं बॉ! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

बढीया याद दिलाई! :) तात्या.

वाहवा! इंदौरच्या पाणीपुरीची कथा ऐकून तोंडाला पाणी सुटले. पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

काय हो....उपवास चालु आहेत आमचे....आनी तोन्डाला पानी सोडता तुमी... :''( पण एक कळले नाही महाराष्ट्रातले भैय्ये भैय्ये काय लावले आहे. पुण्यात या भरपूर मराठी पाणीपुरीवाले दाखवतो. पुण्याचे पेशवे.....सहमत =D>

In reply to by मसक्कली

राज साहेबांना सांगा की पुण्यात मराठी पाणीपुरीवाले आहेत म्हणून ! नवनिर्माणाची गरजच काय मग ? -- मिसळभोक्ता

In reply to by मिसळभोक्ता

हम्मम्म.. नवनिर्माणाची खरी गरज तर तिकडे आहे. नाही का! पुण्याचे पेशवे

In reply to by मिसळभोक्ता

हॅहॅहॅ ... मनसेची प्रेरणा , महाराष्ट्रात मराठी पाणीपुरी आणने ही होती हे कळून सुखावलो :) (युएस प्रेमी) टार्‍या

इंदोरी पाणीपुरीचे एखादे चविष्ट छायाचित्र हवे होते. तरी पण, लिखाणातही 'तो' चमचमीतपणा आणि झणका आहेच. लवकरच (म्हणजे येत्या दहा वर्षात) इंदोरला भेट दिली पाहिजे. अशी आंबटगोड 'कोकणस्थी' पाणीपुरी खाण्यात ती काय मजा? जातीवाचक उपमा टाळता आली असती तर बरे झाले असते. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

पानिपतला एकाच प्लेट मध्ये सात स्वादाच्या पाणीपुरी मिळतात.. म्हणजे एकात गोड पाणी, एकात आम्बट, एकात दही... असा प्रकार... इन्दूरला असा प्रकार मिळतो का?

बाकी काहीही असो, पाणीपुरी खावी तर कोलकात्याचीच!!!!!! (बंगाली जेवणाला शिव्या घालणारा पण कोलकात्याच्या पाणीपुरीचा जब्ब्ब्बरदस्त फॅन असलेला)

:(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

:(

In reply to by स्वाती दिनेश

:( :( :( :(

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन... भोचक हा आमचा सगळ्यांचा, मिपाचाच, अतिशय छान आणि चांगला मित्र होता. दीडदोन वर्षाखाली असा अचानक एक दिवस आहे, उद्या नाही असं करून निघून गेला. आजही वेदना होतात तो दिवस आठवून.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

यक्कुशेठनी खवतून सांगितलं...भोचक यांचे लेखन खरोखरच बहुत माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक आहे हे निर्विवाद.

In reply to by स्वाती दिनेश

:(

.

बिका, गणपा, स्वातीतै, यकु, भोचकला नाही आवडायचं बहुधा असं हिरमुसलं होणं.... त्याचं लिखाण आहे....तो आहे. नका उदास होऊ मित्रांनो!