Skip to main content

आपले दुरावलेले बांधव - रोमा

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 05/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा. मध्यपूर्वेतून सततच्या होणार्‍या पाशवी इस्लामी आक्रमणांमुळे तत्कालीन भारतीय सीमांवरील खूप लोकांनी भारताच्या आतमध्ये येऊन स्वतःला वाचवले. मागच्या हजार वर्षात आजच्या सिंध, पाकिस्तानी पंजाब, बलुचिस्तान, या भागातून प्रचंड प्रमाणात लोक भारतात इतरत्र स्थलांतरीत होत गेले. मात्र काही लोक पूर्वे ऐवजी पश्चिमेकडे सरकले. तेच हे रोमा. तिथे त्यांना आश्रय मिळाला नाही म्हणून पुन्हा थोडे पुढे असे करत करत आता हे लोक पूर्व युरोपातल्या अनेक भागात अजूनही भटक्यांचे जीवन जगत आहेत. काही वर्षांपूर्वी रोमांच्या काही प्रतिनिधिंनी भारताशी संपर्क करुन मदत मागितल्याचे ऐकले होते. त्यांनी आजही त्यांच्या भाषा (संस्कृत व सिंधी सारख्या), धर्म (पालखी, मूर्तीपूजा, उपवास, वगैरे), सणवार (कृष्णजन्म), चालिरिती (मेल्यावर जाळणे, कुंकू लावणे, मंगळसुत्र, इ) या भारताशी किती साधर्म्य राखतात याचे अनेक पुरावे दिले. पण भारताकडून त्यांना उत्साही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना भारतीय उपखंडातून जाऊन आता जवळपास हजार वर्षे झालीत. त्यानंतर इथे प्रचंड उलथापालथ झाली. संस्कृतीने नवीन वळणे घेतली. बराच भाग परसंस्कृतीच्या विळख्यात गेला. त्यांच्या नंतर इंग्रजांनी गुलाम म्हणून नेलेल्या लाखो भारतीयांचे विस्थापण तसे नवीनच असूनही आम्ही त्यांना वार्‍यावर सोडून दिले आहे तर या हजारो वर्षांपूर्वी दुरावलेल्या बांधवांचे काय घेऊन बसलात? त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या बातम्या ऐकल्या की वाटते की आपले पूर्वज भारतात त्या मानाने सुरक्षित राहिले हे आपले भाग्य. त्यांचे ते भाग्य नव्हते. पण म्हणून त्यांना असे वार्‍यावर सोडावे काय?

वाचने 2574
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

या क्षणी मी Camarón de la Islaच्या गाण्यांची तबकडी ऐकत होतो. इथे एक उदाहरण :
Get this widget | Track details | eSnips Social DNA
स्पेनमध्ये मात्र रोमा स्थायिक झालेत. युरोपाच्या बाकी भागांत मात्र कथा वेगळी आहे. गेला शंभर-दीडशे वर्षांत देशांच्या सरहद्दी कडक झाल्यात आणि पारपत्रे आवश्यक होऊ लागली, तोवर रोमा लोक एका देशातून दुसर्‍या देशात ये-जा करत. पूर्वीच्या काळापासून त्यांच्यावर "चोरीवर जगणारी जमात" आणि "पोरे पळवणारी जमात" म्हणून आळ घेतला जाई; आणि त्यांचा फार छळ झाला. नात्झी काळात त्यांचा वंशनाश करण्याचा प्रयत्न झाला. (जमात म्हणून रोमा अनेक कुळाचार हिंदूंप्रमाणे पाळत असले, तरी बहुतेक रोमा लोक आपला धर्म ख्रिस्ती म्हणूनच सांगतात.) आपल्या खास संगीताने (मला हे ठाऊक, कितीतरी आणखी योगदान असेल) जगाला समृद्ध केलेल्या या भटक्या जुलूम झालेल्या जमातीची माहिती दिल्याबद्दल भास्कर केन्डे यांचे आभार.

In reply to by धनंजय

लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. गाण्यातले गिटार (किवा इतर कुठलेतरी तंतू वाद्य) ऐकून मला मार्को सॅल्यु आणि सुलतानखाँ यांच्या ऍस्ट्रल फिजनची आठवण झाली. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

>लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले. जिप्सी. बीबीसीचा दुवा वाचताना रोमा व पारधी समाजाच्या सामाजीक प्रश्नांशी अतिशय साम्य जाणवले. केंडेसाहेब, रोमा लोकांच्याबद्दल कृपया अजुन माहीती लिहा ना.

पारधी किंवा कारवान लोक.. यांच्या सारखीच वाटली ही रोमा. गोव्यामध्ये जे जिप्सी किंवा हिप्पी दिसतात ते हेच का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

हे युरोपियन वंशाचे लोक. समजाचे जुलुमी नियम तोडायचे, वगैरे विचारसरणी असलेले. गोव्यातल्या जिप्सींबद्दल फार ठाऊक नाही.