गावाबाहेरच्या एका गचाळ भागात एक तितकीच गचाळ वस्ती होती, अगदी रेल्वे लाईनच्या बाजूलाच. रेल्वेमधून लोकांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कागद वस्तीच्या सभोवताली पसरलेले असत. या सगळ्या मधूनच नेहमी तुंबल्यानं पूर आल्यासारखं एक गटार पण वाहायचं. त्याचशेजारी वस्तीतली काही मुलं उकीडवी बसलेली असत तर बाकीची आजूबाजूच्या उकिरड्यात खेळत बसलेली असत. ह्या घाणेरड्या खोपटांच्या गर्दीतच अगदी शेवटी बाबू आणि लक्ष्मीचं एक खोपटं होतं.
बाबू आणि लक्ष्मीचं लग्न होऊन जवळपास १० वर्ष झाली होती. लग्नानंतर पहिल्या वर्षाच्या आतच सुमनचा जन्म झाला.