फार जुनी गोष्ट नाही ही, गेल्या १०-१५ वर्षांतलीच आहे. एक छोटंसं, टुमदार नगर होतं. तिथले लोक खाऊन पिऊन सुखी, आनंदी, उत्सवप्रिय होते. हेवेदावे, मतभेद नव्हतेच असं नाही; पण अगदी चवीपुरते होते आणि तेवढेच चघळले जायचे. मुळात सगळे कुठल्या ना कुठल्या सोहळ्यात इतके गुंतलेले असायचे की आपोआपच या नकारात्मक गोष्टी मागे पडायच्या.
जगदीश पांचाळ, लता राऊत आणि सुषमा कुलकर्णी हे तिघे त्या नगरातल्या तरूणाईचे प्रतिनिधी. लताच्या घरचं वातावरण कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि तसं पारंपारिक. सहा भावंडांत लताचा दुसरा नंबर. बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला. काळी-सावळी पण रेखीव. सदैव हसरा तरतरीत चेहरा.