मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुकडा तुकडा चंद्र...

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
"संग्राम, अरे आवरले का नाही?" आईचा नुसता धोशा चालु होता कधीपासून. आमच्या मतोश्रींच्या आनंदाला आज काही पारावारच उरला नव्हता! आज कुलकर्ण्यांकडची मंडळी येणार होती. बरोब्बर ! अहो कांदापोहे कार्यक्रम... दुसरं काय? एका लग्नाळू, उत्तम स्थितीतल्या मुलाच्या आईच्या उत्साहाला उधाण येईल असं दुसरं काय कारण असू शकतं? मला स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालु करुन आता जवळजवळ २ वर्षे होत आली होती, जमही व्यवस्थीत बसला होता. सगळे व्यवस्थीत असुनही मी तसा लग्नाला थोडीशी टाळाटाळच करत होतो. पहिल्यापासूनच आपण बरे आणि आपला अभ्यास बरा हेच माझे ध्येय असायचे. इंजिनीअरींगला आल्यावरच थोडीफार काय मस्ती केली असेल तेवढीच. पण तेंव्हाही आमची स्वारी मुलींपासून फटकूनच असायची. पण ३ महिन्यांपुर्वी बाबांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि माझी जबाबदारी एकदम वाढल्यासारखी मला वाटायला लागली. जे काय थोडेफार बालीशपण अंगात उरले होते ते संपुन गेले. ह्याच जबाबदारीची पहिली पायरी म्हणजे आता घरात आईच्या जोडीला बायकोला घेउन येणे. आई बहुतेक माझ्या होकाराचीच वाट पहात असावी. आणि ४ दिवसाच्या आतच एका रविवारी, माझ्या समोर दहा-पंधरा मुलींचे फोटो हजर करण्यात आले. आसावरीचा फोटो बघताच मला ती एकदम पसंत पडून गेली. "अगर कोई है तो वो यही है... यही है" अशी काय ती अवस्था झाली. माझ्या रुकारानंतर मग आसावरीच्या स्थळाबद्दल अधिक माहिती काढुन आई बाबांनी हि आजची बैठक ठरवली होती. साधारण ४-३० च्या सुमारास कुलकर्णी कुटुंबीयांचे आगमन झाले. पहिली ५/१० मिनीटे एकमेकांची ओळख आणि दोघांना जोडणारी कॉमन ओळख ह्यांच्या माहितीची देवाण घेवाण झाली. आसावरी आर्टस पुर्ण करुन सध्या फॅशन डिझायनींग पुर्ण करत होती, तिची लहान बहिण सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकत होती. वडील नुकतेच किर्लोस्कर मधुन चांगल्या पदावरुन निवृत्त झाले होते तर आई गृहीणी होती. एकुण पहिल्या भेटीत तरी आसावरीत नाकारण्यासारखे काहीच वाटत नव्हते. आसावरी थोडीशी अबोल वाटली, बहुतेक तीचा हा माझ्यासारखाच पहिला कार्यक्रम असावा. एकमेकांची चौकशी झाली. आमच्या दोघांच्या आवडी निवडी बर्‍याचशा जुळणार्‍याच निघाल्या. आसावरीचे आई वडिल देखील एकुणात खुषच दिसत होते. आमचे माता पिता तर अमुल्य ठेवा गवसल्या सारखेच वागत होते. काही वेळातच आम्हाला दोघांना सोडून सर्व मंडळी बाग बघायला म्हणुन बाहेर गेली. दोन-पाच मिनिटांनी धिर करुन मी बोलायला सुरुवात केली. आसावरी "हो - नाही" एवढे मोजकेच बोलत होती. मोरपंखी साडीत ती खरच खुप सुंदर दिसत होती. येवढी सुंदर मुलगी 'अ‍ॅरेंज्ड मॅरेजच्या' स्टेजपर्यंत पोचलीच कशी ह्याचेच आश्चर्य वाटले मला. तीने स्वतःहुन काहीच विचारले नाही, फक्त "कायमचे ह्याच देशात राहणार का परदेशी जायचा विचार आहे?" एवढा एकच प्रश्न तीने मला विचारला. कुलकर्ण्यांची मंडळी गेल्यानंतर आमची घरगुती बैठक बसली. आम्हा सर्वांनाच आसावरी खुप आवडून गेली होती. सर्वांची पसंती जुळल्यावर साधारण एक तासाने बाबांनी फोन करुन आसावरी पसंत पडल्याचे कळवुन टाकले. गंमत म्हणजे लगोलग कुलकर्ण्यांनी देखील त्यांची पसंती कळवुन टाकली. लवकरात लवकर पुन्हा एकदा भेटुन साखरपुड्याची तारीख काढण्याचे देखील निश्चीत झाले. मला तर स्वर्ग २ बोटे उरला होता. मला माझ्या भाग्याचा हेवाच वाटत होता. काही दिवसांनी दोन्ही घरच्या परवानगीने साखपुड्याची तयारी, एकमेकांचे स्वभाव जाणुन घेणे अशा वेगवेगळ्या कारणांखाली माझे व आसावरीचे एकत्र फिरणे सुरु झाले. आसावरी बरोबर मी २/४ नाटके, सिनेमे पाहिले, एक दोनदा प्रदर्शनांना देखील जाउन आलो. पण खरे सांगायचे तर आसावरी मला एकुणच ह्या ठरलेल्या लग्नाने खुष आहे असे अजिबात जाणवत नव्हते. ती सतत अबोल, स्वतःच्या एका वेगळ्याच कोषात गुरफटलेली असायची. 'हो - नाही' ह्या पलिकडे सहसा तीची उत्तरे जायचीच नाहीत, कुठलाच आनंदत ती मनसोक्त उपभोगताना दिसत न्हवती. तिचे एकुणच वागणे मला खटकत होते. "काही काही मुली थोड्या बुजर्‍याच असतात, होईल सगळे व्यवस्थीत एकदा ती रुळली की" अशा आई बाबांच्या समजुतीने मला समाधान मिळत नव्हते. शेवटी धीर करुन मी एकदा आसावरीच्या घरी फोन करुन काकांना भेट घेण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी माझ्या ऑफिसात येउन मला भेटायचे त्यांनी कबुल केले. साधारण ४ च्या सुमारास काका हजर झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मला खटकत असलेली गोष्ट त्यांच्यापाशी बोलुन मोकळा झालो. काकांच्या चेहर्‍यावर आल्यापासूनच ताण स्पष्ट जाणवत होता. माझ्या प्रश्नानंतर तो एकदम वाढल्यासारखे मला वाटून गेले पण क्षणार्धात पुन्हा त्यांचा चेहरा मावळला. आता काय ऐकायला मिळतय म्हणुन जीवाचे कान करुन बसलो होतो.. "संग्राम राव, खरे सांगायचे तर आसावरीला हे लग्न करायचेच नव्हते. तीला अजुन शिकायचे होते. पण आमच्या हट्टापुढे तीचे काहीच चालले नाही. निदान मुलं बघायला तर सुरुवात करु, लगेच काय कोण तुला माळ घालायला धावत येणार नाहीये ! तोवर शिकत रहा की तु.. असे सांगुन आम्ही तीला तयार केली. पाठची एक बहिण अजुन लग्नाची आहे हो तीच्या. आणि मनासारखा हौशी नवरा मिळाला तर तीचे शिक्षण सासरी जाउन पण सुरु राहिलच की, असे मनात वाटत होते." माझ्या मनावरचा ताण आता एकदम हलका झाला होता, चेहर्‍यावर एक स्मित झळकायला लागले होते. "काय हे काका? अहो मग त्याचे एवढे टेंशन घ्यायला काय झाले तीला? अहो माझ्यापाशी मनमोकळेपणानी का बोलली नाही ती? शिकायची इच्छा आहे तर शिकु दे की हवे तेवढे. आत्ताच माझे वडील मोठ्या आजारातुन उठले आहेत, त्यांची तब्येत जरा बरी होउ दे मग अगदी दिवसभर अभ्यासात बुडून राहिली तरी माझी हरकत नाही." घाई गडबडीत एकदाचा साखरपुड्याचा दिवस येउन ठेपला. गेले १५ दिवस खरेदीसाठी आसावरी, तीची आई आणि आमच्या मातोश्रीच एकत्र फिरत होत्या. त्यामुळे आमचे भेटणे मुश्किलच झाले होते. पण एकुणच दोन्ही घरात पहिलेच कार्य असल्याने उत्साहाला चांगलेच उधाण आलेले होते. उद्या दुपारी ५ वाजता मी आणि आसवरी एका नविन आयुष्याच्या सुरुवातीचे पहिले पाऊल टाकणार होतो. दुसर्‍या दिवशी आईचा उत्साह तर अगदी ओसंडून चालल होता, माझी देखील अवस्था काही वेगळी नव्हतीच. सगळे ह्याच गडबडीत असताना अचानक दुपारी १ च्या सुमाराला आसावरीच्या बाबांचा फोन आला. त्यांनी मला तातडीने त्यांच्या घरी भेटायला बोलावले होते, तेही एकट्याला. काहीबाही कारणे देऊन मी स्वतःची सुटका करुन घेतली आणि आसावरीच्या घरी हजर झालो. हॉल मध्येच काका एका आरामखुर्चीत डोळे मिटुन पडले होते. जणु अचानक २० वर्षांनी त्यांचे वय वाढल्यासारखे ते खचलेले दिसत होते. "काका..." मी अगदी हळूच हाक मारली. काकांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. संपुर्ण विश्वाची अगतिकता त्या डोळ्यात एकटवल्यासारखी मला वाटून गेली. काकांच्या समोरच्या खुर्चीत मी बसलो. "आसावरी कुठे आहे?" ह्या माझ्या प्रश्नावर काकांनी आतल्या खोलीकडे बघुन मान उडवली. "पण तुम्ही तीला आत्ता न भेटलात तरच बरे होईल संग्राम राव!" " काका?" "आमचेच नाणे खोटे, त्याला तुम्ही तरी काय करणार? एवढे समजावले, हाता पाया पडलो पण हिलाच दलदलीतुन पाय बाहेर काढायचा नाही, त्याला कोण काय करणार?" "काका, काय झाले आहे नीट सांगाल क?" "आसावरीने आत्महत्येचा प्रयत्न केला सकाळी!" "क्काय्य्य?" "कुठल्या तोंडानी बोलु संग्राम राव? शिकायच्या वयात प्रेम करायला लागली म्हणे कार्टी. बरं पोरगा बघितला तो ही परजातीतला. ना धड नोकरी ना बापाचा पत्ता! पोराला भेटायला बोलावले तर तो मला न भेटताच परस्पर शहर सोडून पळून गेला. खुप तपास केला पण काही कळू शकले नाही, हिच्या हातापाया पडलो, शेवटी हिच्या आईने जीव द्यायची धमकी दिली तेंव्हा त्या पोराला विसरुन ही मुले बघण्यासाठी तयार झाली. काय करु हो? अजुन एक मुलगी आहे पदरात. तुमचे लग्न ठरले आणि तो मुलगा दत्त म्हणुन दारात हजर! आई वारली म्हणुन वाराणसीला गेला होता." "बरं मग?" "प्रत्यक्षात पोरगा भेटला तेंव्हा त्याच्या सच्चेपणाची जाणिव झाली, आसावरीसाठी म्हणुन आईचा बारावा सोडून धावत आला होता. पण मी बांधलो गेलो होतो. मी त्याच्यापुढे सर्व परिस्थिती स्पष्ट करुन त्याला नकार दिला. तो रडला, पाया पडला पण मी दाद दिली नाही. तर आज पोरीने हे असे...." बोलता बोलता कुलकर्ण्यांना रडू कोसळले. "संग्रामराव, एक अभागी बाप म्हणून मी तुमच्यापुढे हात जोडतो, तुम्ही ह्या लग्नाला नकार द्या! आसावरी त्याच्याशिवाय नाही जगु शकणार. ह्या लग्नाने तुम्ही दोघंही सुखी नाही होउ शकणार, ऐका माझे." "म्हणजे तुमच्या मुलीच्या सुखासाठी मी माझ्या सुखांना आग लावु असेच ना? हा काय तुम्हाला हिंदी सिनेमा वाटला कुलकर्णी? पोरीच्या पवित्र प्रेमाचा साक्षात्कार झाल्याबरोबर तुम्ही तीचा हात माझ्या हातातुन सोडवुन दुसर्‍याच्या हातात द्यायला निघालात? हे लग्न मोडल्याने ती सुखी होईल सुद्धा, पण माझे काय? मी रंगवलेल्या स्वप्नांचे काय? ह्या प्रसंगाला माझे आजारातुन उठलेले वडिल आणि तुमच्या मुलीच्या गृहप्रवेशाकडे डोळे लावुन बसलेली माझी आई कसे सामोरे जाणार कुलकर्णी? काय तोंड दाखवणार ते लोकांना आणि काय उत्तरे देणार चौकशांना?" "संग्राम राव ..." "तुम्ही मला फसवलंत कुलकर्णी ! मी तुम्हाला आसावरीच्या नाराजीचे कारण स्पष्ट विचारले होते, तुम्ही माझ्याशी खोटे बोललात. तुम्ही आणि तुमची मुलगी दोघे माझ्याशी खेळलात! हे लग्न करुन मी सुखी होणार नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच हे लग्न मोडल्याने माझे आयुष्य उध्वस्त होणार आहे, हे देखील खरे आहे. मग काहीही घडले तरी मला शिक्षाच मिळणार असेल, तर ती मी एकट्याने का भोगायची कुलकर्णी? हे लग्न होणार कुलकर्णी, आज संध्याकाळी साखरपुडा आणि त्यानंतर दोन दिवसात हे लग्न लागेल. तयारीला लागा..." (क्रमशः)

वाचने 12891 वाचनखूण प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

स्पंदना 29/04/2010 - 16:09
एकदम रसरशित ताजे लिखाण!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मेघवेडा 29/04/2010 - 17:31
मस्त!! पुढं काय मालक?? -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मस्त कलंदर 29/04/2010 - 18:24
पुढे रे??? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
साधारणतः अशाच असतात. त्या क्षेत्रात तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

श्रावण मोडक 29/04/2010 - 23:19
घातलंत विरजण? हाहाहाहा... इतक्या वर्षांच्या संस्थळीय वावरानंतर मराठी (खरं तर हिंदी तरी काय वेगळ्या असतात का?) सिरीयल्स वगैरेची आठवण? :) तुमच्या या प्रतिक्रियेच्या विपरित, समाधानकारक ('वयात आलेले' म्हणावे का?) लेखन असणारे एखादे मराठी संस्थळ सांगा आम्हालाही. :)

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग 30/04/2010 - 00:04
पण मग त्याचं नाव 'सिरियलकथेतील किलरकुमार' असे ठेवावे लागेल! ;) चतुरंग

In reply to by मिसळभोक्ता

मराठी सीरियल्स साधारणतः अशाच असतात. त्या क्षेत्रात तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे.
कथेच्या तीन चतुर्थांश भागात काहीच सनसनाटी घडत नाही. आणि बटबटीत भाषा कुठे दिसते? फक्त 'हे लग्न होणार!' च्या पुढे ब्वु हु हा हा हा हा हा हा... असं गर्भित विकट हास्य आहे त्यात मराठी सीरियल्सप्रमाणे चेहेऱ्यावर सहा सात वेळा वेगवेगळ्या अॅंगलमधून झूम इन करून मागे दीड सेकंदाचा म्यूझिक रीपीट करता येण्याची सोय आहे. पण त्याआधी कुठे काय? कोण मराठी सीरियल निर्माता त्याला दहा फुटी बांबू लावणार? (मूळ इंग्लिश म्हणीचं जमेल तसं भाषांतर केलं आहे....) उगाच आशा पल्लवित का कराव्या, म्हणतो मी? हे म्हणजे विरजण घालून झाल्यावर लगेच 'झालं बरं का श्रीखंड तयार' म्हणण्याइतकं क्रूर वाटलं... राजेश

शुचि 30/04/2010 - 04:52
मस्त. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

मीनल 30/04/2010 - 05:23
उत्कंठा वाढवणारी गोष्ट आहे . `आसावरी` ला वाचून असे वाटले .--- चंद्र. दूरून छान दिसणारा. पण प्रत्यक्षात मात्र खाच खळगे असणारा. तशी आसावरी. `तुकडा तुकडा` काय असांव बरं?- काळीज तीळ तीळ तोडणारा, तुकडे करणारा असा चंद्र म्हणजे `आसावरी` . असे तर नसेल ????? :? . मीनल. http://myurmee.blogspot.com/
तुझ्या कथा नेहमी उत्कंठापूर्ण असतात. त्यामुळे वाचतोय रे मित्रा. (अवांतर - कथेचे शीर्षक वाचून पहिल्यांदा वाटलं की सुहास शिरवळकरांच्या कादंबरीबद्दल लेख आहे.) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
कथा सही रंगवली आहे..मला ही उगाचंच सुरूवातीला पराचीच कथा वाटली होती.. बाकी मिभो, श्रा.मो आणि रंगाशेठच्या प्रतिक्रिया वाचल्या की मिपावर आल्याचं सार्थक वाटतं ;)

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

II विकास II 30/04/2010 - 09:52
>>बाकी मिभो, श्रा.मो आणि रंगाशेठच्या प्रतिक्रिया वाचल्या की मिपावर आल्याचं सार्थक वाटतं अगदी अगदी. सगळी जण अगदी एकमेकांचे पाणी जोखुन आहेत. प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

परा, मस्त सुरुवात..पण ह्यावेळी दोन क्रमशः मध्ये फार अंतर ठेवून अंत पाहू नकोस.:) स्वाती

टुकुल 30/04/2010 - 18:58
लै भारी सुरुवात रे परा.. पुढे काय? उत्सुकता ताणली गेली आहे. --टुकुल

II विकास II 02/05/2010 - 18:32
तुम्ही मला फसवलंत कुलकर्णी ! मी तुम्हाला आसावरीच्या नाराजीचे कारण स्पष्ट विचारले होते, तुम्ही माझ्याशी खोटे बोललात. == याचा अर्थ दोष हा मुलीच्या वडीलाचा आहे. त्यांनी सगळी माहीती ही मुलाला दिली नाही. तुम्ही आणि तुमची मुलगी दोघे माझ्याशी खेळलात! हे लग्न करुन मी सुखी होणार नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच हे लग्न मोडल्याने माझे आयुष्य उध्वस्त होणार आहे, हे देखील खरे आहे. मग काहीही घडले तरी मला शिक्षाच मिळणार असेल, तर ती मी एकट्याने का भोगायची कुलकर्णी? हे लग्न होणार कुलकर्णी, आज संध्याकाळी साखरपुडा आणि त्यानंतर दोन दिवसात हे लग्न लागेल. तयारीला लागा.. == हा मुलाचा निर्णय पुन्हा चुकीचा वाटतो. जर मुलीने लग्नानंतर आत्महत्या केली, सासरच्याबद्दल खोटी तक्रार केली, घरातील मौल्यवान सामान घेउन पळुन गेली तर सासरच्यांना अधिक त्रास नाही का होणार? आणि मुलाला आपल्या घरच्यांना समजावणे तितके अवघड नसावे, जर त्याने योग्य प्रकारे समजावले तर. जर मुलीच्या घरच्यांना शिक्षा द्यायचीच आहे तर खुप मोठी रक्कम घेउन चांगली अद्दल घडवावी, म्हणजे पुन्हा ते तसे कोणा मुलाबरोबर करणार नाहीत. असो. दुसर्‍याला खड्यात घालण्यासाठी आपण खड्यात जाउ नये, हे साधे व्यवहारज्ञानाचे सुत्र आहे. मुलगा सप्तपदी करणार कि नाही हे पुढील भागात स्पष्ट होईल. ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

In reply to by II विकास II

मस्त कलंदर 02/05/2010 - 21:19
>>>मुलगा सप्तपदी करणार कि नाही हे पुढील भागात स्पष्ट होईल. यावरून बरेच काही आठवले.... :D [चालक,मालक,संस्थापकः क्लीनिंग, कूकींग विथ सप्तपदीलेस मॅरेज प्रोग्राम]मकुत्सु.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

राघव 02/05/2010 - 20:10
वाचतांय हा मी वाचतांय.. ४ दिवस उलटलेत तरी माणूस पुढं लिवायला तयार नाय.. X( हे बराबर नाय पराशेठ.. राघव

यशोधरा 02/05/2010 - 21:23
परा, तुझे लिखाण वाचणे बंद करुन टाकायला पाहिजे! चिडकायली कसा टाकायचा?

satish kulkarni 04/05/2010 - 09:28
पुढचा भाग कधी टाकणार?? - आपलाच (न फसवणारा) कुलकर्णी

ऋषिकेश 04/05/2010 - 09:43
परा, लै भारी सुरवात.. नेहमीपरमानं पुढची परतिक्रीया सगळे भाग झाल्यावर :) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.