साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.
त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.