पावसाची आवर्तनं चालू असताना प्रत्येक थेंबाला जमिनीवर एक कोंब फुटतो, आणि पाणी वेलीसारखं पसरत जातं. अचानक थबकायला होतं, आणि भीती वाटते की आपल्याला येणारी जगाची अनुभूतीच तर चुकीची नाही ना? मी आणि माझ्या नजरेने ठरवून घेतलेल्या रूपांमध्ये ज्याचं जगणं अल्पायुषी वाटतं, त्या त्या रुपांच्या मर्यादेतून बाहेर काढलं, तर त्या पाण्याला एकच गुणधर्म राहतो-वाहतेपण.
या अचानक झालेल्या जाणीवेने क्षणिक काय, नित्य काय, याच्या सगळ्या संकल्पना वाहत्या होऊन जातात. सरपटत जाणारं पाणी सापडेल तिथल्या भेगेत जुनाट वाड्याच्या भिंतींवरील वेलीप्रमाणेच चोरपावलांनी शिरतं, आणि त्या भेगेइतकंच शहारायला होतं.