जिंदगी या बायकांची,राळ आहे का?

लेखनविषय:
काव्यरस
वृत्तपत्रातून इतका जाळ आहे..का? बातम्यांचा एवढा दुष्काळ आहे का? शेत आहे काळजाचा एक तुकडा पण कर्ज म्हणजे नांगराचा फाळ आहे का? वास्तवाच्या विस्तवाशी खेळतो आहे तो कुणी त्या अंजनीचा बाळ आहे का? फुंकली जाते तरी गंधाळते रे ती... जिंदगी या बायकांची,राळ आहे का? आजही तो त्या विटेवर थांबला आहे त्या विटेखाली जगाचा गाळ आहे का? —सत्यजित

जगायास कारण ईतकेच आहे...

लेखनविषय:
काव्यरस
नवे रोज धागे नवा पेच आहे जगायास कारण ईतकेच आहे! कुणी एकटा जात नाही प्रवासा कुणी चालताना कुणा ठेच आहे! कुणी आरसा काल देवून गेले मला भेटतो मी नव्यानेच आहे! कुण्या वर्तुळाच्या कडेने फिरावे उभे विश्व सारे फुकाचेच आहे! नको फार त्रागा करु तू उन्हाचा सखी सावली या उन्हानेच आहे! —सत्यजित

या गुलाबाच्या फुलाला...

लेखनविषय:
काव्यरस
पाहिजे तर बाग सारा,आज तू जाळून जा... या गुलाबाच्या फुलाला,आज तू माळून जा! सांगतो वारा खबर..तू यायची अन् जायची... तू मला भेटून जा..वा,तू मला टाळून जा! तू दिलेल्या डायरीचे,काय झाले ऐक ना... एकदा माझ्या मनाचे,पान तर चाळून जा! चांदण्याचा कवडसा मी,मोल माझे काय ते? तू नभीचा चंद्रमा हो..वचन दे..पाळून जा! मेघ राहू दे तुझे तू,दाटलेले अंतरी... वेदनेवर दोन अश्रू,कोरडे ढाळून जा! प्रीत-पत्रे-शेर-कविता..फोल तू ठरवून जा... कैफियत ऐकून माझी,मजवरी भाळून जा! —सत्यजित

कधी किनारा लिहितो,किंवा...

लेखनविषय:
काव्यरस
कधी किनारा लिहितो किंवा,कधी शिकारा लिहितो तुझ्या मनाच्या लहरींना मी उनाड वारा लिहितो! कधी मनाची लाही होते,कधी शहारा होतो कधी सरी बरसाती लिहितो,कधी निखारा लिहितो! तिच्या घरी माझ्या कवितांना,खुशाल वावर आहे तिला वेळ भेटीची कळते,असा इशारा लिहितो! कधी फुले ती वेचत असता,उशीर होतो तेंव्हा तिचा स्पर्श ओझरता माझ्या मनी पिसारा लिहितो! अजूनही घमघमते अत्तर,तुझ्या रुमालावरचे अजून मी माझ्या श्वासांना,तुझा निवारा लिहितो! तुला जमेशी धरले तेंव्हा,सदा हातचे सुटले हिशोब आता जुळतो जेंव्हा,तुझा घसारा लिहितो! तुझी प्रार्थना बहुधा त्याला कोडे घालत असते उगा न माझ्या नावे तोही जन्म दुबारा लिहितो! —सत्यजित

ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...

लेखनविषय:
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा... का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा! मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा! आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा! ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा! काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती? ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा! —सत्यजित

ती एकदाच दिसली...

लेखनविषय:
काव्यरस
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित

हीच तर सुरुवात आहे...

लेखनविषय:
काव्यरस
गुदमरावे प्राण अवघे,श्वास इतका कोंडण्याची... होय!मी केली तयारी,वादळांना फुंकण्याची! काय मी केला गुन्हा की सोडले मी मौन माझे... पेटल्या वणव्यास मागा कारणे मी चेतण्याची! आर्त किंकाळीस जेंव्हा वेदनांची साद येते... शर्थ होते थबकलेल्या जाणिवांना रेटण्याची! बोट का छाटू नये ते,या गुलाबाच्या कळ्यांनी... ज्या नखावर खूण नाही,एक काटा टोचण्याची! लाख सजवा वेस तुमची,लक्तरे टांगून माझी... हीच तर सुरुवात आहे,मी दिशांना लांघण्याची! —सत्यजित

घोर हा घनघोर आहे!

लेखनविषय:
काव्यरस
चोर तर आहेच वर शिरजोर आहे काळजाचा घोर हा घनघोर आहे! जाळतो आहे जिवाला रोज थोडे पावसाचा जोर हा कमजोर आहे! तू नको जावूस माझ्या शांततेवर वेदने,मी वादळाचा पोर आहे! ऐन दुःखाचा पसारा मांडला मी वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे! जिंदगी एकाच दुःखावर उधळली मी हिशोबी,फार काटेकोर आहे! वाचण्याआधीच हे लक्षात घे तू मी कुणी नाही कवी,चितचोर आहे! —सत्यजित

गंधभारल्या रात्री होत्या...

लेखनविषय:
काव्यरस
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित

वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे!

लेखनविषय:
काव्यरस
कितीक वेळा पाठ फिरवली..खेळ-खेळले डाव रडीचे वसूल केले आयुष्याने..कर्ज दिलेले दोन घडीचे! खडू-फळा खुर्चीही नाही,अता न पाढे तसे राहिले धूळ-जमा झाले डस्टर अन् छम-छमणारे बोल छडीचे! मला न शिकता आली तेंव्हा,व्यवहाराची खरी कसोटी नोट बनावट हाती आली,मोल कळाले मग दमडीचे! अनवाणी फिरल्यावर कळली ऊब मातीच्या स्पर्शामधली खुशाल बनवा मी मेल्यावर,पायताण माझ्या चमडीचे! वारे फिरले लाख परंतू,ऋतू बदलणे जमले नाही वसंत केला आयुष्याचा,बहर वेचले पानझडीचे! —सत्यजित
Subscribe to मराठी गझल