मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो खुला बाजार होता!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

वाचने 4903 वाचनखूण प्रतिक्रिया 16

सत्यजीतजी, कृपया गैरसमज नसावा, पण का कुणास ठावुक, वाचताना उगाचच असे वाटत होते की ही गझल प्रत्येक शेरागणीक उलगडते आहे. आणि मी हे यामुळे अजिबात म्हणत नाहीये की सर्व शेर समान मुडचे आहेत. वास्तविक आपल्याला माहितीच आहे की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविताच असतो, मग ते सारे शेर समान मुडचे असोत वा वेगवेगळ्या मुडचे. उदाहरणार्थ, खालील दोन शेर स्वतंत्रपणे सुटे वाचले असता त्यातुन फारसा अर्थबोध होत नाहीये. चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! त्यामुळे उगाचच असे वाटले की गझलपेक्षा ही गझलच्या फॉरमॅट मधील कविता आहे..... शेवटचा शेर मात्र मनापासुन आवडला. हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! बाकी माझ्या अर्थमंथनात काही कमीअधिक झाले असेल तर माफी असावी. __/\__ एकुण रचना आणि आशय दोन्ही उत्तम!!

सत्यजित... 24/03/2017 - 02:42
आ.शार्दूलजी, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गझल मुसलसल असल्याने ती उलगडत जात असल्याचा अथवा अधिक गहिरी होत असल्याचा अनुभव होणे,तसे फारसे नवीन नाही!(वै.म.) आपण उद्धृत केलेल्या शेरांपैकी पहिला,'चार फांद्या...'च्या बाबतीत,मलाही अापण म्हणता तसा, तो स्वतंत्र वाचल्यास थेट पोहचत नसल्याचे वाटत होते! मुळात ही गझल लिहिताना,किंबहुना असा खयाल मनात आला तेंव्हाच,मनात अनेक विचार,भावना,शब्द,पर्याय ई.ची कल्लोळमय सरमिसळ होत होती! मी येथे नवीनच लिखाण करतो आहे,तेंव्हा एकदा प्रकाशीत केलेली रचना संपादीत कशी करावी याच विचारात होतो! कृपया तो शेर असा वाचावा... 'चार फांद्या वाकलेल्या..दोन खिडक्या झाकताना सांधुनी काही कवडसे..फाकला अंधार होता!' आशा करतो की तो अता नीट पोहचत असावा! दुसऱ्या,'मनचले भुंगे...' च्या बाबतीत मात्र मलातरी तसे वाटत नाही!अर्थातच,मतांतर असले तरी आपल्या मताचा आदर आहेच! गझल म्हणा वा उगाचंच वाटलेली गझल फाॅॅरमॅट कविता म्हणा,मला जे म्हणायचं आहे ते पोहोचलं मात्र पाहिजे,इतकंच! खरेतर सध्या यत्न करुनही मला मनासारखी एखादी कविता लिहून होत नाहीये!तेंव्हा,i will take it as a compliment!स्मित!(कृ.ह.घ्या.) कृपया...कृ.गै.न.,माफी असावी ई.बाबी उद्धृत करण्याची गरज नसावी,किंबहुना स्नेह गृहीत असावा!निर्भेळ चर्चा व्हावी!त्यातही आपला अनुभव मोठा आहे तेंव्हा हक्काने सूचना कराव्यात,मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा बाळगतो! शेवटच्या शेरास मनापासून दाद दिलीत तसेच एकूण रचना नि आशय आपणांस उत्तम वाटला,त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार!

चौकटराजा 26/03/2017 - 15:15
आपल्या मागच्या गजले प्रमाणेच यातही विरोधी मुळांची गुंफण आपण केलीय. कवडसे अन्धार, राख अंगार ! शेवटी "शायरी "हा शब्द काय सांगतो? की तीन अक्षरे हवीत म्हणून शायरीला कामाला लावलेय ? अर्थात शायराचा शब्द " त्याचा" असतो पण अंतरी हा शब्द मला आवडला असता. कारण वरकरणी राखरूपाने का होईना ती हास्याची उधळण करीत आहे पण ती आतून संतापलेली च आहे असा अर्थ लागला असता. असो. बाकी मस्त जमतय राव !

In reply to by चौकटराजा

सत्यजित... 26/03/2017 - 16:43
आ.अरुणजी, सर्वप्रथम,आपण दिलेली दाद आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! शेवटच्या शेरातील 'शायरी' बद्दल...कवीला ती कुठेतरी स्वतःसारखी भासते आहे,स्वतःच्या दुःखालाही रुपेरी कडा देवून प्रदर्शीत करणारा तिचा तो अंदाज,त्याला 'शायराना' वाटतो आहे...आणि म्हणूनच की काय या गझलियतभऱ्या आयुष्यावर असं काहीसं सहज सुचून जातं!