Skip to main content

एक ओपन व्यथा भाग ९ (अंतिम)

लेखक वटवट यांनी मंगळवार, 16/08/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या भागाच्या निमित्ताने..... १. खरं तर अश्या प्रकारची लेखमालिका लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे ह्या मालिकेत नक्कीच काही उणिवा राहिल्या असतील. पुढच्या वेळेस त्या नक्की सुधारेन. २. हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे. मुद्दामच मी कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख टाळला आहे. ३. हे लिखाण कोणाही जातीच्या वा धर्माच्या विरोधात नाही. एक साधारण ओपन व्यक्तीही किती हतबल होऊ शकते ह्याचं उदात्तीकरण मी केलं असं म्हटलं गेलं तरी मला ते मान्य असेल. तरी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी. ४. काही काही प्रसंग खूप भावनिक होते. मला आवरत नव्हतं लिहताना... लिहिताना लिहिले जात नव्हते. सगळे प्लॉट तसे तयार होते पण . . . . . . . . . त्यामुळे पटपट भाग टंकणे शक्य झाले नाही. ५. शेवटचे दोन भाग लिहिताना मी आत्यंतिक अस्वस्थ झालो होतो. प्रचंड निराश झालो होतो. ते कशाप्रकारे उतरवलं गेलंय हे वाचकच ठरवतील. ६. खरं तर चार पाच भागात संपेल असं वाटत असताना ९ भागापर्यंत ही कथा वाढली ... सर्व सहृदय प्रतिसादकांचा मनापासून आभारी आहे... ७. माझे हे लिखाण आवर्जून दखलपात्र विभागात समाविष्ट केल्याबद्दल मिपाच्या संयोजकांचाही मी आभारी आहे ८. हा शेवटचा भाग आपणास भावेल अशी आशा आहे.... -------------------------------------------------------------------- एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148 एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475 एक ओपन व्यथा ५ - http://www.misalpav.com/node/36610 एक ओपन व्यथा ६ - http://www.misalpav.com/node/36653 एक ओपन व्यथा ७ - http://www.misalpav.com/node/36736 एक ओपन व्यथा ८ - http://www.misalpav.com/node/36889 ----------------------------------------------- दळभद्री.... अगदी हाच विचार येत असेल ना हे सारं वाचताना?.... आणि असा विचार येणं मी अजिबात अस्वाभाविक म्हणत नाही. काय कारण? फार काही जगावेगळं आहे? मीच काय असं जगावेगळं भोगलं होतं, कि मी आत्महत्या करावी? किंवा करण्याचा विचार करावा? मला कुठला असा असाध्य आजार बळावला होता कि त्याला कुठलाच उपाय नव्हता? आणि इतक्या कुठल्या वेदना होत होत्या कि त्या वेदनांपायी मी आत्महत्येचा विचार करावा. तसा तर मी सुशिक्षित बेरोजगारही नव्हतो कि गरिबीमुळे मी आत्महत्येचा विचार करावा? एव्हढं शिकलेलं पोरगं इतक्या क्षुल्लक कारणावरून आत्महत्येचा विचार कसा काय बुवा करू शकतं? इतक्या साध्या गोष्टी माझ्या एव्हढ्या बिघडलेल्या मानसिक अवस्थेची कारणं ठरावीत? कोण्याही त्रयस्थ माणसाला हे असं वाटणं मी चुकीचं म्हणणार नाही. कदाचित हे जे कोणी वाचत असेल त्याच्याजागी मी स्वतः जरी असलो असतो तरी मला स्वतःलासुद्धा हेच वाटलं असतं.... कदाचित.... एक साधी शिंक आली कि मरायला काय झालं होतं?.... एखादी ठेच लागून कसाबुवा कोणाचा प्राण जाऊ शकतो?... साधा ताप एकाच्या मरणाचं कारण कसा काय होऊ शकतो? नुसत्या थंडीने किंवा ऊन पडलं कि कसं बुवा कोणाला सहन होत नाही, लगेच प्राणोत्क्रमण? एकेकाचे नखरे असतात... असं... कोणी... जर अगदी नं पटणाऱ्या कारणाने मरण पावलं असेल तर आपण विचार करतो?? नाही ना? बहुतेक नाही करत.... (इथे मी अपवादांचा विचार नाहीये करत) आपण विचार करतो कि असते एकेकाची सहनशक्ती.... आणि विषय सोडून देतो... आज समाजात प्रत्येकजण काही ना काही, कुठे ना कुठे, कसल्या ना कसल्या प्रकारे भोगत आहे. बर्याचदा आपण मला काय त्याचे? म्हणून एकतर त्या गोष्टी टाळतो किंवा टाळल्यासारखं दाखवतो. पण मनातून त्या गोष्टी नाहीत जात. मन शोधात असतं, त्या सगळ्या गोष्टी कुठल्याप्रकारे बाहेर येतील, त्या रस्त्याच्या... बर्याच जणांना तो रस्ता सापडतो. ते निवांत होतात. राहिलेले एक तर शोधत राहतात तो रस्ता आयुष्यभर अथवा परिस्थितीला पूर्णपणे शरण जाऊन त्या रस्त्याचा नाद सोडून देतात. मला ना तो रस्ता सापडला, ना मी परिस्थितीला शरण जायच्या पक्षात होतो, ना गोष्टी मला सहन होत होत्या... माझी सहन शक्ती संपत संपत चालली होती... मला अंदाज आला आणि मी निर्णय घेतला... खरंतर मी असा निर्णय घेण्याचा विचार पहिल्यांदा करत नव्हतो. बर्याचवेळा केला होता. फक्त तो अंमलात आणला गेला नाही. कदाचित पूर्ण सहनशक्तीचा घडा भरायचा असेल. मनात कितीदा तरी विचार यायचा कि मी एकटा नाहीये भोगत हे सारं... मग मी का हे सगळं वैयक्तिक पातळीवर घेत आहे? माझ्यापेक्षा प्रचंड हलाखीत लोकं जगताहेत. त्यात आनंद मानत आहेत... मग मलाच काय असं झालं कि मी एव्हढा टोकाचा विचार करणं मला क्रमप्राप्त झालं?... मी गोष्टी टाळून पुढे जाऊ शकत नव्हतो. माझं स्वतःचं जळणं थांबवूही शकत नव्हतो. माझी सहनशक्ती खूप कमी होती असाही कोणी अर्थ काढला तरी मला चालेल. कदाचित तेच खरं असेल... आत्महत्या करणाऱ्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात "उदात्त आत्महत्या" जी साने गुरुजींनी केली होती, ती होती असं मला वाटतं. "ज्या प्रकारचा समाज मी अनुभवत आहे, उघड्या डोळ्यांनी बघत आहे, तो समाज मला अपेक्षित नाही. मुळात मला अपेक्षित असणारा समाज मला घडवता आला नाही" ह्या निराशेपायी सानेगुरुजींनी स्वतःला संपवलं होतं. त्यामागे त्यांना वाटत असलेलं त्यांचं सामाजिक अपयश होतं. माझी आणि त्यांची तुलना शक्यंच नाही. आणि मुळात मला ती करायचीच नाहीये. मला माझ्यासभोवतालच्या समाजाप्रमाणे स्वतःला घडवता आलं नाही हे माझं वैयक्तिक अपयश आहे. माझ्या मणक्यात हाडं आहेत. तिथे रबरी नळी बसलेली वा बसवलेली नाहीये. कि जी कुठेही आणि कशीही वाकू शकेल. तरी मी खूप वाकलो. आयुष्यभर हे असलं वाकून राहणं आपल्याला शक्य नव्हतं... आणि म्हणूनच मी हा कोणालाही नं पटणारा निर्णय घेतला. ज्या पद्धतीने आज आजूबाजूला गोष्टी घडत आहेत त्याकडे मी त्रयस्थ नजरेने नाही बघू शकत. "लेट इट बी" ही माझी मानसिकता कधीच नव्हती. मी अंतर्बाहय पेटून उठायचो. रात्र रात्र झोप यायची नाही. मध्यंतरी माझ्या पाहण्यात एक पोस्ट आली होती. ज्यात लिहिलं होतं, कि आपल्या देशात तिघांच्याच मरणाची दखल घेतली जाते. एक म्हणजे मुस्लिम, दुसरा म्हणजे दलित आणि तिसरा म्हणजे जनावर.... लाईक्स आणि कमेंट्स चा सिलसिला जोरात सुरु होता त्या पोस्ट वर.... पण आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकतो? एका मुस्लिमाचा खून झाला की सारं राज्य पेटतं... एका दलिताला मारहाण झाली कि ती लगेच राष्ट्रीय समस्या होते... इतरांनी काय घोडं मारलंय? अर्थात कोणावरही गरज नसताना आणि त्याची चूक असताना अन्याय होऊ नयेच. त्याचं समर्थन कधीच होत नाही. कोणीच त्याचं समर्थन करू नये ... पण विशिष्ठ समाजावरच्याच अन्यायाला का इतकं मोठठं कव्हरेज मिळतं? इतरांना मारहाण होत नाही? इतरांचा खून होत नाही? त्यांना जीव नसतो? त्यांच्या जीवाला मोल नसते? मग जर माझ्या जीवाचं मोलंच नसेल तर हा जीव मरेपर्यंत मिटेपर्यंत मी का सांभाळू? इतके दिवस एका समाजाने दुसर्या समाजावर अन्याय केला... काही काळानंतर तो दुसरा समाज त्याचा सूड घेण्यासाठी पहिल्या समाजावर पुन्हा अन्याय करायची भाषा करतो. एका हिंदी चित्रपटात एक डायलॉग आहे, "हर कुत्ते का दिन आता है". प्रत्येकाचे दिवस येतात. मग आपण किती दिवस ही असली कुत्री अनुभवणार आहोत?..... कधी ह्या बाजूची कुत्री तर कधी त्या बाजूची कुत्री... हे सासूसुनेसारखं भांडण किती दिवस सुरु ठेवणार आहोत? ह्यातून हाती काय लागणार आहे?? माझ्या वैयक्तिक पातळीवर ह्या गोष्टी माझ्या आकलनाच्या पलीकडे जात होत्या... वेदनेला जात नसते.... पण प्रत्येक जातीची स्वतःची अशी वेदना असते.... ती दुर्लक्षिली जाऊ नये... कोणाचीच... पण जेंव्हा एकाच जातीच्या वेदनेला अधिकृतता मिळते, दुसर्या जातीला डावलून. तेंव्हा डावलल्या गेलेल्या जातीची वेदना ही हॉरिबल असते, ती शब्दात कितपत मांडता येईल... मला शंका आहे... दुर्दैवाने आज ह्या अशा प्रकारच्या पॉलिसीला तथाकथित निरपेक्षतेचं लेबल लावलं जातंय.... असो.. संदीप खरेची एक कविता आहे त्यात तो म्हणतो... "पैलतीर गाठताना ध्यानी आले गेला धीर.... पार पोचताच झाला पैलतीर ऐलतीर". मला माझी अवस्था अगदी ह्या ओळींसारखी झाल्यासारखी वाटत होती... प्रत्येक पायरीवर वाटायचं कि, हि जी पायरी आहे ना ती एकदा का ओलांडली कि झालं, मग काही अडचण नसेल. गोष्टी सुरळीत पार पडतील. ओलांडली कि त्यापेक्षा मोठठी पायरी माझं स्वागत करायची. परत परत स्वतःला सांगायचो. पण मी त्या दुसर्या बाजूला कधीच पोहोचलो नाही जिथं मला पोहोचायचं होतं. सदैव अलीकडेच .... दर वेळेस वाटायचं आता बास...एकदा का हा काळ गेला कि त्रास कमी होईल... पण तो काळ गेला कि काळ वेगळ्याप्रकारे दत्त म्हणून पुन्हा समोर उभा.... आणि आधीपेक्षा जास्त भीषण रूप घेऊन.. दर वेळेस नव्या उमेदीने प्रवास करण्याचं त्राण माझ्यात नव्हतं... मला एक स्वप्न नेहमी पडायचं म्हणजे पडतं... मी रस्त्याने चालत आहे... रस्त्यानं खूप गर्दी आहे... मी गर्दीच्या अनुषंगाने जात आहे... कळत नाहीये नेमकं कुठे चाललोय? का चाललोय? कोणासोबत चाललोय?... कारण सगळेच अनोळखी.... हळूहळू चालत असताना मला असं लक्षात येतं कि सगळे माझ्याकडे बघत आहेत. मला ते जरा विचित्र वाटू लागतं... मग काही जण माझ्याकडे बोट दाखवून गालातल्या गालात हसू लागतात... मला काही म्हणजे काही कळत नाही.... मी जरा जोरात चालू लागतो, त्यांना टाळण्यासाठी.... मग ते खूप मोठ्याने हसू लागतात... मला पुन्हा काही कळत नाही.... मी भाम्बावून जातो... जोरात पळू लागतो.... गर्दी अजून मोठ्याने हसू लागते... आणि एकदम मला जरा जाणवू लागतं, काहीतरी गडबड आहे... एका मोठ्या दुकानाच्या मोठ्या आरशासमोर मी येऊन थांबतो.... जेंव्हा मी आरशात बघतो तेंव्हा मला भोवळ येते प्रचंड.... माझ्या पायाखालची जमीन सरकते.....कारण.. "माझ्या अंगावर एकही कपडा नसतो". मग मला कळतं गर्दीचं माझ्याकडं बघून हसण्याचं कारण... पण त्याचवेळेस मला समजत नाही, कधी माझ्या अंगावरचे कपडे गायब झाले??. मला दरदरून घाम फुटतो. आणि मी जागा होतो.... स्वतःला चिमटा काढून बघतो... ते स्वप्नंच आहे ह्याची खात्री होते आणि मी सुटकेचा निःश्वास सोडतो.... एक तर अशी स्वप्ने कोणालाच पडू नयेत... आणि पडलीच तर ती आठवू नयेत... मला पडायची पण आणि अगदी ठळक आठवायची पण... अख्खा दिवस त्याच स्वप्नाच्या छायेत जायचा... सवय होउ लागली मला ह्या स्वप्नाची.... नंतर तर स्वप्नातच मी स्वतःला चिमटा काढायचो. स्वप्नात काढलेला चिमटा खरा वाटायचा... स्वप्नातलं स्वप्न खरं वाटायचं..... परिस्थिती अजून बेक्कार व्हायची... साला दिवस पण विचित्र आणि रात्र त्यापेक्षा विचित्र... किती दिवस धीर धरून ठेवणार होतो मी... मला काही समाजामध्ये क्रान्ति आणायची नाहीये.....अर्थात माझी ती पात्रताच नाहीये म्हणा.... किंवा माझं हे असलं भलंमोठं पत्र वाचून काही समाज मंथन वगैरे व्हावं ही माझी काही अपेक्षा नाही... मुळात हे पत्र तरी कोणी वाचेल का ह्याबाबतसुद्धा मला खूप शंका आहे... मग मी एव्हढं का लिहतोय? त्यामागे हेतू कुठला? ह्या सर्व पत्रप्रपंचामागे कोणताही सामाजिक हेतू नाही.... ह्या सर्वामागे फक्त एक हेतू आहे तोही वैयक्तिक... अज्ञात आडनावेला मोकळं व्हायचं होतं.... ज्या गोष्टी कधीच कोणाशी बोलल्या नाहीत. त्याला त्या कोणाशी तरी बोलायच्या होत्या... आयुष्यभर जे काही कोंडून ठेवलं होतं...ते बाहेर काढायचं होतं... ओकायचं होतं... अज्ञात आडनावे हा इसम आयुष्यभर गुदमरून राहिला होता... त्याला काही मोकळे श्वास घ्यायचे होते... तेही कोणाकडून वेडा म्हणवून नं घेता... कधी कधी हे अश्या प्रकारे व्यक्त होणं फायदेशीर असतं... कारण बर्याचदा जेव्हा आपण एका व्यक्तीसमोर मोकळं होत असतो ना... तेंव्हा एक तर पुढच्या व्यक्तीला त्यात कितपत रस असेल ह्याबद्दल शंका असते. आणि रस असला तरीही तुम्हाला कितपत व्यक्त होता येईल ह्यात पण शंकाच आहे. कारण अश्यावेळेस पुढच्या व्यक्तीला श्रोत्यापेक्षा उपदेशक होण्यात जास्त रस असतो. आणि मला उपदेश नको होता, कारण उपदेशक हा जास्तकरून काठावरच उभा असतो. बुडणाऱ्याला काठावर असणाऱ्याकडून वाचवण्याची अपेक्षा असते, मार्गदर्शनाची नाही.... आता खरंच मला खूप मोकळं मोकळं वाटतंय.... गच्चं भरलेलं आभाळ मोकळं झालंय... आता मी जरा हलका झालोय... मला माहितीये ही अवस्था क्षणिक आहे पण तरीही छान वाटतंय... पण आता माघार घेणार नाही.... जेंव्हा मी ठरवलं, आपण आपल्याला संपवायचं... मी आंतरजालावर (इंटरनेटवर) हुडकू लागलो... कुठल्या प्रकार आपल्याला पटेल... (सोबतच्या कागदपत्रांमध्ये इंटरनेटच्या हिस्ट्रीच्या प्रिंट आउट्स जोडल्या आहेत). मला एकही मार्ग पटला नाही... प्रत्येक मार्गात काही ना काही दोष होता.. मला असं मरण हवं होतं कि ज्याचा संबंध सरळ सरळ मी ज्यापद्धतीने जगलोय त्याच्याशी असावा... शेवटी मीच माझा मार्ग ठरवला.... आयुष्य पळण्यात गेलं होतं, कोणालाना ना कोणाला घाबरण्यांत गेलं होतं. शेवटी मला पळायचं नव्हतं. ठरलं... पाय गच्चं बांधायचे. स्वयंपाकघरातला टेबल बराच जाडजूड होता. तो मी माझ्या खोलीत आणला. खुर्चीचे पाय टेबलाच्या पायाला बांधले. नंतर माझे पाय त्या खुर्चीच्या पायाला करकचून बांधले... इच्छा जरी असली तरी पळणं आता शक्य नाही. हातानेच पोट पण बांधलंय खुर्चीला. आणि मी लिहीत आहे. आपल्या हाताने फार काही काम केलंच नाहीये.... कधी कोणावर ही अन्यायाच्या विरोधात उगारले गेले नाही. सतत आपलेच तोंड लपवायचे काम ह्या हातांनी केलेलं आहे. माझ्या बुळचट वृत्तीचे प्रतीक म्हणून मी माझ्या हाताकडे बघतो. कालच मला भंगाराच्या दुकानात गंजलेली हातकडी मिळाली. माझं लिहून झाल्यावर मीच माझ्या हाताला हातकडीने बांधणार आहे. कोणी सांगावं, माझेच हे बुळचट हात मला वाचवण्यात यशस्वी झाले तर?? नाही... मला ती शक्यतासुद्धा ठेवायची नाही. उजव्या हाताने डाव्या हातात हातकडी अडकवीन आणि तोंडात चावी ठेवून उजवा हात अडकवेन आणि तोंडानेच चावी नंतर दूर फेकून देईन. माझं तोंड..... कधीच कोणालाच काही बोललो नाहीये मी आत्तापर्यंत... कुठलाच ब्र काढला नाहीये. कधी कोणाला उलटं बोललोही, ओरडलोही नव्हतो. गरज असो वा नसो.... मला शेवटीहि ओरडायचं नव्हतं... रोगर खूप घाण लागतं म्हणे, खूप जळतं म्हणे आत.... आतडं, जठर का काय म्हणतात ते पेटून उठतं असं म्हणतात. माणूस गुरासारखा ओरडतो असं ऐकलंय... हात हातकडीने बांधून झाल्यावर रोगर घटाघट पिईन... आणि लगेच तोंडात कापडाचा बोळा कोंबेन..आधीही माझा आवाज कोणाला ऐकू गेला नाही. आत्ताही कोणालाच ऐकू जाऊ द्यायचा नाहीये... मला वाचायची एकही शक्यता मागे ठेवायची नाहीये... एव्हढा मला माझ्या ह्या असल्या जाण्याचा वीट आलाय.... बास. पण... आत्ता... ह्या... नेमक्या क्षणी... एक... सांगू?? .....खरं सांगू?.. मला खूप राहून राहून आई आणि बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतोय... जरा कालवाकालव होतेय आत... खूप उशिरा झालोय ओ मी त्यांना... त्यात एकुलता एक... ज्या हाताने मला चालायला शिकवलं, ते बाबांचे हात कसे काय माझ्या मृतदेहाला स्पर्श करू शकणार आहेत?... आई नेहमी माझ्यासमोर येऊन म्हणायची 'बोल रे राजा बोल... काहीतरी बोल'. मला तिच्याशी कधीच बोलू वाटलं नाही. बोलून तसाही काही फायदा झाला नसताच... वस्तुस्थिती थोडीच बदलणार होती. मी फक्त तिच्याकडे बघायचो, निर्विकार नजरेने. तिच्या काळजाला कित्ती घरं पडली असतील. अजूनही पडत असतील. मी असा निपचित बघून काय होईल तिचं?? काय धक्का बसेल तिला?... ज्वालामुखी जेंव्हा फुटतो तेंव्हा आधी जमीन हादरते आणि मग फुटते... इथं माझ्या मनात खूप काही खूप वेळ खदखदत होतं पण त्याचे धक्के मी कधीच कोणाला जाणवू देणार नव्हतो. आणि जाणवू दिले नाहीतच... मग एकदम हा जो काही स्फोट होणारे, त्याचे परिणाम किती गंभीर होणारेत?? पूर्णपणे कल्पना आहे मला त्याची... कालच माझा वाढदिवस साजरा केला दोघांनी. माझ्या लग्नाचं बोलत होते. 'फारसं काम होत नाही... शरीर साथ देत नाही... हातपाय चालतात नीट तोवर तुझ्या दोनाचे चार झालेले पाहायचेत' असं म्हणत होते... लहान असताना आई मला विचारायची, 'कधी मोठा होणारेस रे तू?' मी लगेच एकाही क्षणाचा विलंब नं लावता म्हणायचो, 'उद्या...' आई खूप प्रेमाने जवळ घ्यायची आणि जड, भरलेल्या आवाजात म्हणायची, 'लवकर मोठा हो'. मला त्याचा अर्थ कळायचा नाही. मी तसाच आईच्या कुशीत पडून राहायचो. कालपण आईने मला तोच प्रश्न विचारला, 'कधी मोठा होणार रे तू? मी काहीच नाही म्हणालो. दीर्घ 'ह्म्म्म.....' म्हणून वेळ मारून नेली. कारण काल माझ्याकडे 'उद्या' हे उत्तर नव्हतं... कोणत्या तोंडानें मी ते देणार होतो? ................ पोरगं मोठं झालं कि बापाच्या अंगावर रोज मूठ मूठ भर मांस वाढतं म्हणे. इवलं इवलं बाळ डोळ्यासमोर वाढत असताना त्याला कोण आनंद होतो, हे वाचलंय पण बर्याचदा. आपल्या पोरात बाप स्वतःचंच रूप बघत असतो असं म्हणतात. कोणी आपलं रूप म्हणून मृत्यू बघू शकेल?... कोणीच नाही ना? बाबांना ते बघावं लागणार आहे... कुठल्याच गोष्टीला बाबांनी मला नाही नाही म्हटलं, अर्थात मी कधी कुठला हट्ट केला नाही म्हणा... तरी जे काही मागितलं ते त्यांनी देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. बाबा जास्त बोलत नाहीत. त्यांची नजर जास्त बोलते. कशी असेल त्यांची नजर जेंव्हा अकस्मात त्यांना मी असा दिसेन?..... आईबाबांचा विचार करत असताना मला ह्या निर्णयाचा फेरविचार करावा का काय असं जरा जरा वाटू लागलंय खरं.... पण.... नाही... मला कोणी कितीही आत्मकेंद्री म्हटलं तरी चालेल पण निदान आतातरी मी मागे हटणार नाही... आयुष्याने मला माझ्या पद्धतीने जगू दिलं नाही. त्याला मी माझ्या पद्धतीनेच संपवणार... हे रोज रोजचं मरण, मला, खरंच सहन होण्यापलीकडचं आहे. सहन नं होणारी आणि बरी पण नं होणारी जखम वागवण्यापेक्षा जखम होण्याची शक्यता संपवून टाकणंच योग्य... ही आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना मी करत आहे. ज्या ज्या गोष्टींचा संदर्भ मी ह्या पत्रात दिला आहे त्याचे सर्व पुरावे मी सोबत जोडले आहेत. मुद्दामच मी कोणाचाही नामोल्लेख हेतुपुरस्सर टाळला आहे. कोणीही ह्याला जबाबदार नाही.आणि जबाबदार मानायचं असेल तर माझ्या जातीला जबाबदार मानण्यात यावं. पण जातीला शिक्षा करणार कशी? खरंतर हे असलं पत्र ज्याला सुसाईड नोट म्हणतात ती एव्हढी मोठी नसते, बहुतेक. पण मला मोकळं व्हायचं असल्याकारणाने ही नोट, हे पत्र खूपच लांबलं, ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी इथेच थांबतो... एक दुर्दैवी, असमर्थ आणि नालायक असा ओपन नागरिक अज्ञात आडनावे... ------------------------------------ पत्र संपूर्ण वाचून झाल्यावर पाटील बराच वेळ सून्न होऊन बसले होते... दुसर्या दिवशी सकाळी पाटील पोलीस स्टेशनमध्ये गेले. कांबळेंना बोलावलं. काही टिपणे काढली होती, त्याचा तपास करायला सांगितला. कांबळे बरं म्हणून कामाला लागले. दुसर्या दिवशी कांबळेंनी त्याचा रिपोर्ट पाटलांना सादर केला. पाटलांनी तो रिपोर्ट अज्ञात आडनावेच्या फाईलीला लावला. आणि "केस क्लोज्ड" चा शेरा मारून ती फाईल पुढची अनेक वर्षे धूळ खायला कपाटात ठेवून दिली. त्यांच्या पत्रकाराला बातमीसाठी फोन केला. तो फोन ठेवून पाटील बराच वेळ त्या बंद कपाटाकडे बघत बसले होते... . . . . दुसऱ्या दिवशीच्या पेपर मध्ये सहाव्या पानावर अगदी खालच्या कोपर्यात दोन ओळीची बातमी छापून आली... "मानसिक वैफल्य आणि वैयक्तिक अपयशामुळे युवकाची आत्महत्या"... त्याचवेळेस, त्याचपेपरच्या, त्याच पानावरच्या अग्रलेखाचे शीर्षक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं... . . . . . "दलित युवकांची आत्महत्या... गरज सामाजिक आत्मचिंतनाची"
लेखनविषय:

वाचने 16759
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे.
हे वाचल्यावर कथा आवडली असे म्हणता येणार नाही. पण ही वास्तवाची एक मिती आहे. जात समाजातून कधीच पुसली जाणार नाही, गेलीच तर तिच्यासारखं ईतर काहीतरी शोधतील लोकं. मिडिया आणी तथाकथित एनजीओ तसेच ईतर तत्सम संघटनांनी समंजस व्हायला हवे. सध्याची परिस्थिती पाहिली की केवळ भावना भ्डकवण्याचाच हेतु दिसतो सर्वांचा. असेलही कदाचित. प्रत्येक जातीधर्मीयांच्या लोकांना त्यांना धोका आहे अशी मनात भिती आणी ईतर जातीधर्माविरुद्ध घृणा/चीड निर्माण करून समाजात किती सहजपणे अराजकता पसरवता येईल हे दिसतेच आहे. डिव्हाईड अ‍ॅंड रूल हा फोर्म्युला भारतात ईतक्या वर्षांपासून पर्फेक्ट फिट आहे हे पाहून नवल वाटते. उदाहरण म्हणून कोणत्याही न्युज चॅनेलचे ऑनलाईन पेजेस किंवा फेसबुक पेजेस आणी त्यावर आलेल्या कमेंट्स पहा. कोणत्याही बातमीवर जनावरांप्रमाणे लोक एकमेकाच्या जातीधर्माचा उद्धार करताना दिसतात. विशेष म्हणजे यात तरुणवर्गाची संख्या लक्षणीय आहे. असो, चांगले लिखाण केलेत परंतु, आधीच्या प्रतिक्रियांचा फार मोठा प्रभाव शेवटच्या भागावर झाला की काय आणी त्यामुळे तो तितका यशस्वी झाला नाही असे वाटून गेले. पुलेशु. धन्यवाद.

जीव कोणत्या काठचा, कुण्या नाहीशा गावंचा..

या समाजात जगायला लायक नव्हताच तो. स्वतःचा मार्ग स्वतः बनवण्याची धमक नव्हती. ईतरांनी बनवलेल्या मार्गावर त्यांच्या नियमानुसारही चालायची तयारी नव्हती. मेल्यावरही त्याच्या जगण्याला साजेशीच दखल घेतली गेली यातच सर्व आले. उगीच सानेगुरुजीं सारख्या महात्म्याशी तुलना करण्यात अर्थ नाही.

In reply to by नेत्रेश

सहमत. आधी कथानायकाबद्दल सहानुभूती वाटत होती. पण स्वतःच्या अपयशाचं खापर त्याने भलत्याच गोष्टींवर फोडायला सुरुवात केल्यावर ते हास्यास्पद वाटू लागलं.

तुम्ही समारोपात म्हणालाच आहात की यातले कित्येक तुमचे स्वतःचे अनुभव आहेत कितीतरी बघितले आहेत, वाचले आहेत. या घटनांचा मनावरती खोल परिणाम होतोच. विशेषतः लहानपणापासून आत्मविश्वासाला तडा गेला की तो सांधून यायला अतिशय अवघड जाते. एका व्यक्तीबरोबरच समाजाच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे हे लिखाण आहे. जातीव्यवस्था हा भारतीय समाजाला लागलेला शाप आहे. हे सत्य बर्‍याच प्रमाणात वेगवेगळ्या स्वरुपात वैश्विक आहे. अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन्स आहेत, दक्षिण आफ्रिकेत हेच प्रकार आहेत अजूनही इतर ठिकाणी असतीलच. परंतु आपल्याकडे जातीव्यवस्थेचे अतिशय टोकदार कंगोरे जास्ती बघायला मिळतात कारण प्रचंड लोकसंख्या, जातीव्यवस्थेचा पूर्वापार चालत आलेला पगडा, न्याय मिळणार नसल्याची जवळपास खात्री, राजकीय पक्षांची सगळ्या गोष्टींवरती पोळी भाजायची असलेली तयारी, सामान्य लोकांमध्ये आलेली उदासीनता, गुंडगिरी अशी अनेक कारणे आहेत. दलितांवरच्या अत्याचारांना मोठ्या प्रमाणावरती तोंड फोडण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अशिक्षितपणा आणि सामाजिक उतरंड ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होती की कित्येक शतके हा अन्याय आहे हेच समजायला समाजमन तयार नव्हते! त्यामुळे ते दूर वगैरे करायची बातच नव्हती. सावली पडली तरी आंघोळ करा, स्पर्ष झाला तर काही विचारुच नका! जन्मापासून, मृत्यूपर्यंत अनेक पिढ्या केवळ उपेक्षा. बरं शिक्षण नाही त्यामुळे अन्याय झालाय हे समजलं तरी कुठे बोलणार, कुठे लिहिणार आणि कोण वाचणार? सगळाच मु़क्याचा मार! त्यावेळचे अनुभव मी वाचलेले आहेत आंगावर काटा येतो इतकी हीन वागणूक माणूस माणसाला कशी देऊ शकतो? (आमच्या घरी बाबांचे मित्र येत. त्यांच्या बोलण्यात देखील कधी त्यांच्या अनुभवांबाबतची पुसट व्यथा डोकावे..त्यावेळी सगळं समजत नसे परंतु जरा मोठं झाल्यावर समजायला लागलं, भयंकर आहे सगळं!) हे बाबासाहेबांनी ओळखलं आणि ठरवलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जे शिक्षणाचं पाणी अडवून बुद्धीची जमीन नापीक ठेवली आहे ते जातीचे बंधारे फोडल्याशिवाय गत्यंतर नाही. ते स्वतः अपरंपार कष्टातून शिकले, मोठे झाले, स्वतः बदलले आणि मग त्या उदाहरणातून लोकांसमोर उभे ठाकले! सर्वसाधारणपणे ज्या बाजूवरती पुष्कळ काळ अन्याय झालेला असतो त्या बाजूला काही न्याय मिळण्याची व्यवस्था दिसायला लागली की त्याचे फायदे ताबडतोब हवे असतात. हा मनुष्यस्वभाव आहे त्यात अनैसर्गिक असे काही नाही. कित्येक दशकांची व्यवस्था रातोरात बदलावी अशी सामान्य जनाची अपेक्षा असते. परंतु वास्तव तितके सरळ नसते. आपल्या हितसंबंधांना धक्का लागतोय म्हंटल्यावरती प्रत्येक प्रस्थापित व्यवस्था ही चवताळून उठते आणि साम, दाम, भेद, दंड या मार्गाने तिची वाटचाल असते. यामुळे अर्थातच अन्यायग्रस्त समाज अधिकच चिरडीला येतो. भारतात आरक्षणाची व्यवस्था आणण्यामागे निश्चित विचार आहे. प्रश्न आहे तो अंमल्बजावणीचा, त्यासाठी घेतलेल्या निकषांचा आणि कालानुरुप ते निकष कसकसे बदलता येतील याच्या व्यवस्थेचा. (अमेरिकेतही अ‍ॅफर्मिटिव अ‍ॅक्शन असा प्रोग्रॅम आहे ते आरक्षण नव्हे परंतु निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या मागास आणि अल्पसंख्य घटकांना त्यांचं त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं असा प्रयत्न.) परंतु लोकं तेवढी थांबायला तयार नसतात. "आमच्यावर" शतकानुशतके अन्याय झालाय असे कालचं शेंबडं पोरसुद्धा म्हणायला लागतं हा खरा प्रश्न आहे. नेमका अन्याय काय झाला? त्यातून वर यायला आपण दुसर्‍या समाजघटकावर अन्याय करुनच वर येऊ शकतो का? हे आणि असे प्रश्न धूळ खात पडतात आणि नाही त्या उपर्‍या व्यवस्थांची भलामण सुरु होते. प्रश्न अधिकच चिघळतात. आणि त्यातून नव्या अन्यायाची मुहूर्तमेढ रोवली जाते! "करुदेत त्यांनाही सहन. आमच्या दहा पिढ्या नाहीका जळाल्या?" या उद्वेगामागची भावना खरी असली तरी व्यवहारात त्याने प्रश्न सुटत नाहीत. हळूहळू कुठेतरी सामंजस्याच्या पातळीवरती दोन्ही बाजूंना यायलाच लागतं नाहीतर रथाचं एक चाक मागे आणि दुसरं पुढे फिरून व्यवस्था जागच्याजागीच भोवर्‍यासारखी फिरत राहते. दोन्ही बाजूंना वाटतं "हम्म्म, कसला वेग घेतलाय आपल्या प्रयत्नांमुळे" आणि प्रत्यक्षात रथ तसूभरही पुढे सरकत नसतो! :( आता व्यवस्था आपल्याबाजूने आहे ना मग झोडा त्या ओपन लोकांना, करा काशी त्यांची. इथे राजकारणी लोकांचा, समाजातल्या जबाबदार घटकांचा फार मोठा सहभाग असायला हवा की असे व्हायला नको. त्याने अंतिमतः सगळ्यांचेच नुकसान आहे. परंतु तसे होताना अपल्याला दिसत नाही आणि मग नवीन कायद्यांचे आणि आरक्षणाचे टेकू घेऊन नवी व्यवस्था निर्माण होते आणि "अव्यक्त आडनावे" सारखे लोक बळी जातात! लंबक दुसर्‍याबाजूला हेलकावत गेल्याचे हे लक्षण आहे. तो पुन्हा मध्यावरती यायला लागला की पुन्हा चित्र बदलेल. समाजाचं यश यातच आहे की कमितकमी झोक्यात, हेलकाव्यात तो स्थिरतेकडे कसा आणता येईल. अन्यथा "आय फॉर अ‍ॅन आय मेक्स दि होल वर्ल्ड ब्लाईंड!" हे आपल्या समाजाच्या बाबतीत खरं व्हायला फार काळ लागणार नाही. तेव्हा, तुम्ही लिहिलेलं अगदी खरं आहे परंतु "अव्यक्त आडनावे" ची आत्महत्त्या ही अशी समाजव्यवस्थेचा लंबक दुसर्‍याबाजूला गेल्याची परिणती आहे. (थोड्याफार फरकाने यालाच समांतर उदाहरण म्हणजे मुले आणि मुली यांच्या लग्नांबाबत देता येईल. पूर्वी बायकांची बर्‍याचशा बाबतीत सर्रास गळचेपी होत असे (अगदी शब्दशः देखील!) सासुरवास असे, नोकरी करायला "परवानगी" नसे! परंतु काळ बदलतो तसे हे बदलत जाते. त्यात सुरवातीच्या काही मुलींची प्रतिक्रिया अतितीव्र असली तर नवर्‍यामुलाकडच्या बाजूला अन्याय झाल्याचे फीलिंग येऊ शकतं. उठसूठ माझे हक्क, तुझे हक्क असं बोलणं ऐकून चक्रावून जायला होतं परंतु हा आधी कित्येक वर्षे झालेल्या अन्यायाचा पडसाद असतो, तो अन्याय थेट त्या मुलीवरच झालेला असायला हवा असे नसते तिने जे पाहिलेले, ऐकलेले वाचलेले आहे, आई, आत्या, मामी मावशी, आज्जी अशा नात्यात अनुभवलेले आहे त्याचे ते पडसाद असतात, लंबक दुसर्‍या बाजूला जात असल्याची खूण असते. आपण प्रयत्नांनीच तो लवकरात लवकर मधे आणायचा उद्देश ठेवायचा असतो. याशिवाय याला काही दुसरे उत्तर नाही. मी तुमच्या लिखाणाला कोठे कमी लेखत नाहीये. तसा सूर कोठे जाणवला असल्यास क्षमस्व, ती माझ्या मत मांडण्याच्या क्षमतेची मर्यादा असेल. परंतु समजा आधीच्या/किंवा अगदी आत्ताच्या पिढीतल्या कोणा दलितानेही त्याचे अनुभव असेच लिहिले असते तर आपली काय प्रतिक्रिया असती? तेव्हा प्रत्येकाच्या जागी त्याचे जळणे हे खरेच असते ते आपण नाकारु शकत नाही इतकेच! बाकी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही खूपच सशक्त लिखाण करता. अजून वेगवेगळ्या अनुभवांवरती वाचायला आवडेल! शुभेच्छा! -रंगा

In reply to by चतुरंग

रंगाकाकानी एकदम परफेक्ट प्रतिसाद दिलाय त्यामुळे काही लिहायचं शिल्लकच नाहीये. ते पर्सनल दु:ख वैश्विक बनते वगैरे बाजुला ठेवले तरी आपण ह्या जगात जगण्यास पात्र नाही आहोत किवा हे जग आपल्या इच्छे/अपेक्षेप्रमाणे नाहिये ह्याचा मनस्ताप करुन आत्महत्येचे पाउल उचलणे मला तरी अवास्तव वाटते. आरक्षण हाच मुद्दा सर्व परिस्थितीला कारणीभूत नसतो. त्या एका मुद्द्याने जिंदगी कधीच अडून राहत नाही. किंबहुना ह्याला अडथळा मानूच नये असे माझे मत आहे. आयुष्यातील असे तथाकथित अडथळे असताना सुध्दा यशस्वी होणारे कित्येक जण आहेत. शिक्षणात अथवा नोकरीत आरक्षण मिळाले नाही म्हणून कुठे अडले नाही त्यांचे. हे सारे लोक फार असामान्य आहेत अशातलाही भाग नाही. आपल्यासारखेच आहेत हे. जात टाळता येत नाही, लपवता येत नाही, अप्रिहार्य असते हे गृहित धरुनही शहरात आणि गावातही फार अन्याय होतात हेच मुळी मान्य नाही. ह्या जगातील जगण्याचा, करीअरचा, राहण्याचा बराचसा भाग जात हा विषय टाळूनही साध्य करता येतो. एकदा हे जमले की स्वतःला संपवण्याएवजी काही नवनिर्मीतीची भाषा तोंडी खेळू लागते. पाहा जरा विचार करुन. बाकी लेखन अप्रतिम. आपल्या अनुभवांच्या सच्चेपणाबद्दल कुठेही शंका नाही. विचार करायला तरी भाग पाडले ह्या अनुभवांनी हेच मोठे यश आहे. एका सुंदर लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by अभ्या..

अभ्याजी..आजूबाजूला अगदी फालतू कारणाने आयुष्य संपवलेली उदाहरणे आपण बघतोच कि... तशीच ही एक आत्महत्या... मुळात मी सुद्धा आत्महत्येच्या विरोधातच आहे... पण खरंच सांगतो. ज्यापद्धतीने रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं स्तोम माजवलं गेलं.. त्याच्याच तिरीमिरीतून आलेलं हे लिखाण आहे. हे लिखाण म्हणजे आत्महत्येच्या प्लॉट वर आलेली नवनिर्मितीच आहे असं मी मानतो... अगदी सातत्याने प्रतिसाद दिलात मनापासून आभारी आहे..

In reply to by वटवट

ज्यापद्धतीने रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं स्तोम माजवलं गेलं.. त्याच्याच तिरीमिरीतून आलेलं हे लिखाण आहे.
म्हणजेच प्रतिक्रियावादी लिखाण. अशा लिखाणात सौंदर्य भरपूर असले तरी मूल्य शून्य असते. तुमचं लिखाण, त्यामागचे कारण आणि तुम्ही प्रतिसादांमधुन आता मांडत असलेली 'सावध' भूमिका ह्या परस्पर विसंगत आहेत. आत्महत्येला जात नसते असं म्हणतांना 'जातीमुळे' आत्महत्या झाली असे लेखन करत आहात. परत वेमुलाशी हे जोडत आहात. वेमुला प्रकरण पूर्णपणे राजकिय होतं, त्याची आत्महत्या करण्यामागे जातीय दबाव होता की नव्हता हे अजून स्पष्ट नाही. ते स्तोम माजवणारे राजकिय नेते आणि पोटभरु मिडिया, असंतोष खदखदत ठेवला तरच त्यांची पोटं भरतात. तुमच्या कथेतला नायक स्वतःच्या नालायकपणाचे खापर समाजावर फोडतोय. सर्वच उच्चनिच जातीतले असंख्य असे अपमान झेलून प्रकाशाने उजळलेले अनेक लोक आहेत भारतात. त्यांच्या कथा असुंदेत पुढे. तुमचे लिखाण फ्याण्ड्री चित्रपटात मांडलेल्या कथेचे उलटे स्वरुप वाटते. इथल्या काही दवणीय प्रतिक्रिया बघून मन प्रसन्न झाले... आधीच हरलेल्या, कमअस्सल लोकांच्या पराभूत मानसिकतेवर हळहळ व्यक्त करणे फालतूपणा आहे. वेमुला असो की अज्ञात आडनावे. पराभूतांची जात एकच असते > "शेपुटघाले"

In reply to by तर्राट जोकर

हा मुद्दा पटला नाही कि प्रतिक्रियावादी लिखाणात मूल्ये नसतात मुळात सगळे लिखाण हे कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून व्यक्त होणेच असते ना?

In reply to by सामान्य वाचक

लोण्याचे तापून तूप होणे आणि दुधात मीठ पडल्यावर त्याचे फाटणे ह्या दोन्ही गोष्टी प्रतिक्रियावादी आहेत, दोन्हीपैकी कशात मूल्य आहे?

In reply to by उडन खटोला

अगदी अगदी. येइच सा वा यांना सांगायचे आहे. दॄष्टिकोनातला फरकच मूल्ये आहेत की नाहीत ते ठरवतो. म्हणजे मूल्य असेलच असे नाही. मोदींनी काहीही म्हटले की त्याविरुद्ध शिमगा करणार्‍यांच्या अरण्यरुदनात मूल्य असते असे मानावे काय?

In reply to by तर्राट जोकर

लिखाण क्रिया वादि आहे का प्रतिक्रिया वादी आहे यावर अवलंबून नसते असे माझे म्हणणे आहे लिखाणात 'जीव' किती आहे यावर अवलंबून आहे आणि तो प्रतिक्रियवादी मध्ये पण असू शकतो

In reply to by सामान्य वाचक

झाले तर मग... मी ही वाचक आणि तुम्हीही वाचक. मला काय वाटते ते मी लिहले. ते तुम्हाला पटत नसेल तरी पटवूनच द्यावे अशी जबरदस्ती का? मी माझी मते तुमच्यावर लादत नाही.

In reply to by चतुरंग

इतक्या विस्तृत प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे... तुमची मते अगदी पटली... त्यात नं पटण्यासारखं काहीच नाहीये... आणि हो... मी आधीच म्हटलंय कि वेदनेला जात नसते... पण प्रत्येक जातीची अशी वेदना असतेच... कोणीही त्यांचे अनुभव लिहावेत आपण सर्वजण त्याचे स्वागतंच करू.. हो ना? करूच...

वेदनेला जात नसते..._/\_

सगळे भाग वाचले. एका दुर्दैवी समस्येवर तुम्ही म्हणताय ते कितीही खरं असलं तरी, अश्याच परीस्थीतीतुन जाऊन संघर्ष करून, झगडून चांगलं आयुष्य जगणारे कितीतरी जास्त लोक भारतात आहेत.

सुन्न करणारे लिखाण. इतक्या ताकदीच्या लिखाणावर इतर काही राजकारणी प्रतिक्रिया येऊ नयेत ही इच्छा आहे.

_/\__/\__/\_ मिपावर अजुन उत्तमोत्तम कथा लिहित रहा.

_/\_

एक लाइव्ह सामाजीक समस्या मानसीक रोगाला कारणीभूत होते व माणासाचा घास घेते. असे किती जीव जळत असतील, मरत असतील, मेल्यासारखं जगत असतील :(

लिखाण इंटेन्स आहे, कथा म्हणून मांडणी हि चान्गली जमून आलीये. चतुरंग आणि अभ्या यांचे प्रतिसाद आवडले.

लिखाण म्हणून १००/१०० पण विचार म्हणून ०/१००. तरीहि विचार म्हणून ० हे तुझ्या लेखनाचेच श्रेय आहे.

___/\____

जोवर नैसर्गिक न्याय दडपून ठरावावर आधारित जीवन जगतोय तोवर भेदभावपूर्ण अनुभव येणारंच. कारण मानवी मन हे रोज कुठल्या ना कुठल्या अनुभवाने समृद्ध होत असते, पण जर रोज तोच एक अनुभव येत राहिला तर मानसिकता तशी बनते व पुढे ठरावात निव्वळ पक्षपाती निर्णय होतात जे मानव जाति ला रसातळाला घेऊन चाललेत, मग ते सामाजिक, न्यायिक, वैज्ञानिक, पर्यावरणिय इ काही असोत. नैतिक भलामण करण्याच्या नादात अन्याय घडतोच. वास्तविक कथा स्वरूप पाहता आपण शिक्षित वर्ग व संधी यातून वैयक्तिक यशापयशाचे ठोकताळे जोडलेले दाखवलेत जो कथानायक विसरु शकलेला नाहीं. कमी अधिक प्रमाणात हे सर्व"ओपन" जातींचे विद्यार्थी अनुभवत आहेत. म्हणून मला वाटते की मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यानंतरच जात ग्राह्य धरावी, तोवर नाहीं. तसेच आर्थिक निकषावर आरक्षण असावे अन्यथा रद्द /रहीत व्हावे. किंवा फक्त सरकारी शाळेत शिकलेलेच आरक्षणास पात्र ठरावेत अशी काही बदल अट करता आली तर अचानक क्रांति घडू शकेल? वैरागचा शेजारी

In reply to by नमकिन

नैसर्गिक न्याय दडपून ठरावावर आधारित जीवन जगतोय तोवर भेदभावपूर्ण अनुभव येणारंच.
भारतात सद्यप्रचलित अरेंज म्यारेज प्रकाराबद्दल माझेही असेच निरिक्षण आहे. त्याबद्दल क्रांती कधी घडणार?

हिंदू वर्ण व्यवस्थेत जे कुठेच नव्हते त्या मुसलमान ख्रिस्चनानी देशावर राज्य केले , त्यांचे आचरण करावे व सुखी व्हावे.

In reply to by चंपाबाई

मुस्लीम आणि ख्रिस्ती देशांवर आक्रमण करण्यासाठी चंपाबाईंच्या अध्यक्षतेखाली एक फौज नेमावी.

In reply to by अर्धवटराव

बाबर ५०००० सैन्य गोळा करुन भारत खाउन बसला. ५०००० ची नाव नोंदणी झाली की आमच्या मोहिमेला सुरुवात होइल.

In reply to by चंपाबाई

त्याच बाबराच्या वंशातले श्रीमान औरंगजेब लाखाची फौज आणि संपूर्ण मुघल सल्तनतीची इज्जत महाराष्ट्रात घालवुन बसले. असो. शुभेच्छा.

In reply to by अर्धवटराव

मनुष्य म्हणजे कधीतरी दमणार आणि कधीतरी हरणार .. त्यात काय नवल? ८८ वर्षाचा म्हातारा , म्हातारा होऊन मेला, एखाद्या भागातली एक लढाई जिंकू शकला नाही, हे म्हणजे हरणे का? छान! अनेक शूर तडफदार लोक त्यांच्या तरुणपणी म्हातार्‍या औरंगजेबाच्या अंगणात रांगेत उभे रहात होते. आणि आमचा औरंगजेब, ८८ व्या वर्षी म्हातारपणाने मेला, तर हरला? आँ !

In reply to by चंपाबाई

आणि आमचा औरंगजेब, ८८ व्या वर्षी म्हातारपणाने मेला, तर हरला? आँ ! फक्त तेंव्हाच नाही हो. त्याची पिलावळ नंतर त्या शूर, तडफदार माणसाच्या वंशजांच्या दारात शेकडो वर्षे पाणी भरत राहिली म्हणून तो हरला असे म्हणले आहे.

In reply to by चंपाबाई

मोघलांची तुलना फार तर मराठा प्रधानमंत्र्यांशी व्हावी. बाकि मोघलांनी आपल्या पालनकर्त्याविषयी काहि आत्मियता, आदर वगैरे दाखवावा अशी अपेक्षा पण गैर आहे म्हणा.

In reply to by चंपाबाई

शेवटचा मुघल तर अजूनही आहेच की तुमच्या रुपात. पण मी साम्राज्य कर्त्यांबद्दल बोलत आहे. शिपायांबद्दल नाही. बाकी तो बहादूरशहा जफर नक्की कोणाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होता हे ठाऊक असेलच तुमास. आणि त्या शेवटच्या मुघलाबरोबर लढला तो मराठी नानासाहेब आणि ती मनकर्णिका तांबे विसरलात काय ?

In reply to by चंपाबाई

बरोबर आहे. छान डोक्यावर सावली झाली ते बघायचं सोडुन बुडातुन झाड उगवल्याची फिकर कशाला करायची, नाहि का. शिवाय मुलाबाळांसकट आपल्या राज्याचा सत्यानाश करणं म्हणजे केव्हढं मोठं हौतात्म्य. आणि हो... 'आमचा' औरंगजेब हरला असं कुणी म्हणु नये. तो सहज गंमत म्हणुन सहलीला आला होता महाराष्ट्रात. इथलं वातावरण आवडल्यामुळे चार दिवस जास्त राहिला. शेवटी सारीपटाचा डाव जिंकुन स्वर्गस्थ झाला. त्याला मरणे, हरणे वगैरे क्षुद्र दुषणे देणं म्हणजे पापच. त्याचं एकच चुकलं... एरंडेल नित्यनियमाने घ्यायचं आपल्या अनुयायांना सांगायला तो विसरला.

मला ही कन्सेप्ट किंवा लेखमाला आवडली नाही अजिबात, आम्ही बघा किती बिचारे किती सहनशील असा सूर लावणारे सवर्ण ते दलित कोणीही भेटले तर कानफाटायची अनावर इच्छा होते, वरती पैसा ताई राजकारण व्हायला नको अशी भीती व्यक्त करती झाली आहे म्हणून कसेबसे स्वतःला आवरतोय इतके आवर्जून नोंदवतो. लेखकाने "ओपन" ही फक्त नथ घातली आहे अन त्या आडून ब्राह्मण समाजाचे दैन्य विकायचा प्रयत्न केलाय, असे आमचे स्पष्ट मत होते आहे, व्यथेच्या सुरुवातीपासून बोलायचे झाले तर खंडन करणारा एक गिगाबायटी लेख पडेल. लेको त्या आमच्या अभ्याकडून शिका! पोरगं "आदर्श ब्राह्मण स्वप्न" उर्फ मल्टीनॅशनल कॉर्पोरेट त्यातही आयटी मधली नोकरी परत वाचा नोकरी सोडून धंदा करतंय राव! काय बोलणार, सालं अनावर राग येतो ह्या पुचाटपंपु वृत्तीचा पण उपयोग काय! भोxxचं प्रत्येकाला फक्त स्वतःच दैन्य विकायचंय! मरु देत, आम्ही आयुष्यभर असेच चरफडत राहणार, पुचाट लोकांत राहून लढाऊ विचार करायची शिक्षा आहे ती! :(

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अगदी मनातलं बोललात. बालपणापासून आतापर्यंत सवर्ण ते दलित जातितले अनेक मित्र-मैत्रिणी भेटले. त्यातले सर्वच्या सर्व आपापल्या योग्यतेनुसार कुठे ना कुठे नोकरी/धंदा करत आहेत. एकाही सवर्ण (किंवा दलित) मित्राला अशी वागणूक मिळाल्याचे बघण्यात/ऐकिवात नाही. काही सवर्णांना मनासारखे कॉलेज मिळाले नाहे हे खरं असलं तरी त्यामुळे त्यांचं काही अडलं नाही. अनेकांना महिला आरक्षणामुळेही हव्या तिथे जागा मिळाल्या नाहीत. एकंदरीत कथानायक जरी त्याचा प्रश्न प्रातिनिधिक असल्याचं भासवत असला तरी दुर्दैवाने तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असेच वेळोवेळी वाटत आलेय.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी लेखकाची शैली आवडली, म्हणून इतर अवांतर इथे नको म्हटलं. पण कोणीतरी या मालिकेच्या निमित्ताने या आरक्षण इत्यादी बद्दल जरूर धागे काढावेत आणि तिथे त्याबद्दल निकोप चर्चा व्हावी.

In reply to by पैसा

जाऊ दे ना ताय, मागच्यावेळी फक्त मी माझे निरक्षीर जागेवर ठेऊन बघितले-बोललो होतो, उपेग नाही होत. असो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हि कथा म्हणजे मनाच्या एका विशिष्ट ट्रॅपमधे अडकलेल्या दुर्दैवी जीवाचा अंत. यात सगळ्यात ठळक फॅल्युअर कोणाचं जाणवतं तर ते पालकांचं. आपलं पोरगं शारीरीक आणि मानसीक रित्या असं दुर्बल होत असलेलं बघुन त्याच्या बापाने काहिच केलं नाहि. दणकुन जोरबैठका काढायला लावल्या असत्या पोट्ट्याला तर असले दिवस दिसले नसते. असो.

In reply to by अर्धवटराव

अरे मनासारखे कॉलेज मिळाले नाही किंवा आवडत्या पोरीच्या पाई मार खावा लागला म्हणून येडं जीव देतंय!! ह्यांना बॉक्सर मुहम्मद अलीची गोष्ट सांगायला हवी, चार ओळीत ह्या व्यथेचे पोस्ट मॉर्टेम करेल ती कथा, अली उर्फ पूर्वाश्रमीचा कॅसिअस क्ले ह्याला एकदा कोणीतरी विचारले, तुझे पंचेस इतके ताकदवान कसे असतात ? त्याने सांगितलेली स्टोरीच इथे सांगावी वाटते, झोपडपट्टी मध्ये वाढणाऱ्या कॅसिअसला त्याच्या वडिलांनी एक जुनी सेकंडहँड टोबो सायकल आणून दिली होती, ती त्याहून वयाने मोठ्या अश्या वस्तीतल्या टग्या पोराने अन त्याच्या गॅंग ने कॅसिअसला काळेंनीळे होऊस्तोवर थोतरून पळवली, रडत आलेल्या कॅसिअस ने वडीलांना हे सांगताच त्यांनी त्याला शांतपणे सांगितले, बाबा रे असे व्हायला नको असेल तर तू तुझ्यात जास्त शक्ती असेल असे पहा! अन त्यातूनच जन्म झाला "फ्लाय लाइक अ बटरफ्लाय अँड स्टिंग लाइक अ वास्पचा" बघा काय पचतंय का ते!

In reply to by अर्धवटराव

दणकुन जोरबैठका काढायला लावल्या असत्या पोट्ट्याला तर असले दिवस दिसले नसते. - सहमत +1000000

पहिले 2-3 भाग आवडले. पण नंतर नंतर उगाच रडगाणे गात आहे असे वाटले. रंगा शेठ ह्यांच्या प्रतिक्रियेशी सहमत.

सर्व पोटतिडकीने दिलेल्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभारी आहे.... 1.कानेटकरांनी हिटलर रंगवला ह्याचा अर्थ ते हिटलरसारखे होते असा अर्थ निघू शकतो का? किंवा ना.सं ईनामदार हे मुघलांच्या बाजूने होते कारण त्यांनी सर्वोत्क्रुष्ट औरंगजेब रंगवलाय हे बरोबरे?... प्रस्तुत लेखकांना ते विषय क्लिक झाले म्हणून त्यांनी लिहीलं..... वैयक्तिक मला हा विषय क्लिकला मी लिहीला.... 2. मानसशास्त्र हे रसायनशास्त्रासारखं नसतं... दोन व्यक्ती समान वातावरणात अगदी टोकाचं वागू शकतात. 3. ओपन लोकांची दुखणी मांडायचा प्रकार मी फारसा पाहिला नाही.. म्हणून मी हे लिहायचं ठरवलं. 4. मी आत्महत्येचं समर्थन करत नाही. 4. ज्या ज्या व्यक्तींनी खूप हालाखितून भव्यदिव्य कमावलंय, मला नितांत आदर आहे. त्यांचं कर्त्रुत्व असं ना तसं बाहेर पडतंच. मी सर्वसाधारण माणसाबद्दल लिहीलं... आणि त्यासाठी मुद्दाम रोहित वेमुलाचा प्लॉट निवडला... कारण कसंय अडचणी मांडायचे मक्ता कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही... 5. ज्यांना जसे अनुभव आले त्यांनी तसे लिहावे... मला जसे आले तसे मी लिहीले... काहीजण ऊगाच वैयक्तिक होताहेत... आणि एक अजून... मी फक्त रडकंच नाहीये लिहीलेलं... ईच्छा असल्यास माझं इतरही वाचावं... 6. माझ्या लिखाणात नक्कीच काही कच्चे दुवे असतिल... ते येत्या काळात कमी करण्याचा मी प्रयत्न करेन...

In reply to by वटवट

तसेही दु:ख विकायची ती दलित वर्गानेच, बाकीच्यांनी सोसायचं नाहीं तर संपायचं. इथे लगेच वैयक्तिक स्तर परीक्षण होते, फार मनावर घेऊ नका. शुभेच्छा!

In reply to by नमकिन

तसेही दु:ख विकायची ती दलित वर्गानेच, बाकीच्यांनी सोसायचं नाहीं तर संपायचं.
नमकिन साहेब, दलित वर्गावर हिणकस टिप्पणी करण्याची गरज नव्हती. सोसायच्या गप्पा तर मारुच नयेत उच्चवर्णियांनी.

In reply to by तर्राट जोकर

जाऊद्या हो! ते कायद्याच्या बडग्याला सोसणे, संपणे वगैरे चांदीचा वर्ख लावून समाधान करीत असावेत स्वतःचे! "द शेड्यूलकास्ट अँड शेड्यूलट्राईब्स (प्रेव्हेंशन ऑफ ऍट्रॉसिटीज) ऍक्ट,१९८९" जर अस्तित्वात नसती तर हे सोसणे वगैरे कधीच आले नसते इतके निश्चित आहे, शिवाय फक्त महाराष्ट्राचा विचार करून भागत नाही गुजरात ते अरुणाचल अन काश्मीर ते कन्याकुमारी विचार करायला लागतो जेव्हा प्रश्न राष्ट्रीय असतो, हे पुन्हा एकदा सांगायला कंटाळा येतोय आता, तसेही इथे पुन्हा एकदा "इतर"च्या बुरक्याखाली ब्राह्मण किती सहनशील अन संपत आलेले आहेत हाच करुण रस परत एकदा विकल्या गेलाय हे मात्र खरे!

In reply to by वटवट

दलितांनी?? गुड जोक! सत्य समोर ठेवणे हे विकणे नसते साहेब! पडा जरा महाराष्ट्राच्या हद्दी बाहेर, आता कृपया मला लोकांशी काय घेणे मी अत्याचार केले नव्हते वगैरे ज्ञानामृत देऊ नका म्हणजे मिळवले. आरक्षण ही पॉलिसी मायक्रो नाही तर मॅक्रो लेव्हलवरच पहावी लागते, कितीतरी उदाहरणे सापडतात, दुर्दैवाने मी अशी उदाहरणे (अजूनही दलितांवर भयाण अत्याचार होत असलेली) विलक्षण सातत्याने मागची 4 वर्षे पाहतोय, त्यामुळे हो ते लोक समोर मांडतात ती सत्य परिस्थिती अन घटनाक्रम असतो, विक्री नसते, विक्री तुम्ही करताय असे मी स्पष्ट म्हणतो आहे.अन तुम्ही जर "ओपन ची व्यथा" मांडताय तर जरा भारताचाच उत्तर दक्षिण पूर्वेला अन पश्चिमेला आजमितीलाही दलितांवर अत्याचार करणाऱ्या आपल्या ओपन ज्ञातीबांधवांस सांगून पहा जरा की बाबांनो तुम्ही माणसाला माणसा सारखे वागवले तर आमचे मराठी ज्ञातीबांधवांचे हाल (?) जरा कमी होतील, बघा ऐकतायत का तुमचेच "सहनशील अन संपू लागलेले" इतर भारतीय ज्ञातीबांधव, मग बोलता येईल नीट जरा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तसेही इथे पुन्हा एकदा "इतर"च्या बुरक्याखाली ब्राह्मण किती सहनशील अन संपत आलेले आहेत हाच करुण रस परत एकदा विकल्या गेलाय हे मात्र खरे!>>>> हे तुमचे वाक्य... त्यावर मी म्हणालो कि आधी कधी विकलं गेलं? त्यावर तुम्ही म्हणता दलितांनी?? काय बोलताय?? मला कळत नाही हे लिखाण एव्हढं का झोम्बतंय?? हे झोम्बणं स्वाभाविकच आहे... नं पटणंही स्वाभाविक आहे... नं आवडणंही मी मान्य करतो... त्यानंतरची तुमची शिवराळ भाषा (तसं आपल्यात काहीच नसतानाही आलेली) त्यावरही मी काही नाही बोललो..... मी म्हटलं जाऊ दे..... संपूर्ण लेखात मी एकदाही ब्राह्मणाचा ब्र ही काढलेला नाहीये... हा ब्राह्मण दलित वाद कशाला काढलाय? मी कधी म्हणालो कि दलित भोगत नाहीत किंवा दलितांवर अन्याय होत नाहीत म्हणून? उलट मी तर म्हणालो कि त्यांनी पण त्यांचे अनुभव लिहावेत आपण त्याचेही स्वागत करू... वरील माझे प्रतिसाद वाचा सोन्याबापूजी (इच्छा असेल तर).... आता मला जे काही अनुभव आले, मी पहिले, मी वाचले मी लिहिलं... तर तुम्हीच त्याला विक्री म्हणताय... काय राव... कोणीही त्यांचे अनुभव लिहू शकतो ना??? कि कोणाची परवानगी लागते? जर कोणी लिहिले तर का त्याला विक्रीचं स्वरूप देताय? भारतात दुसरीकडे जर माझ्याच समाजातले (तुमच्या भाषेत जातीतले) कोणावर अन्याय करत असतील तर माझ्यावरचा अन्याय कसा समर्थनीय होऊ शकतो??? मी खरंच सांगतो मला हा वाद वाढवायचा नाहीये (मुळात हा वाद मीही काढलेला नाहीये)... मुळात माझीच इच्छा कधीच नसते अश्या वादात पडायची, कारण हा वाद कधीच शमणारा नाहीये.. फक्त गरज नसताना आणि काही वाक्ये गाळून मनाला हवा तसा अर्थ काढून हा धागा पेटवण्याचा प्रकार आहे हा .... असो... तुलनेने मिपा वर मी नवा आहे.... सवय होईल ह्याचीपण लवकरच...

In reply to by वटवट

तसेही दु:ख विकायची ती दलित वर्गानेच, बाकीच्यांनी सोसायचं नाहीं तर संपायचं. इथे लगेच वैयक्तिक स्तर परीक्षण होते, फार मनावर घेऊ नका. शुभेच्छा! हे मूळ आहे! तुम्ही धाग्यात जसे ब्राह्मण "उघड" मेन्शन केलेले नाहीत तसेच दलित सुद्धा मेन्शन केले नाहीत बरोबर का??, मी ब्राह्मण हे नाव घेतल्यावर तुम्हांस इतके वाईट वाटले तसे वरची शेलकी कॉमेंट करणाऱ्यांनी (तुम्ही स्पष्ट उल्लेख केलेला नसतानाही) दलितांचे नाव घेतल्यावर तुम्हाला त्यांना नाही सांगावे वाटले? आरक्षित मध्ये ओबीसी पण येतात, एनटी पण येतात, एसटी पण येतात, मग संबंधित कॉमेंटकरत्यांनी नेमके फक्त "दुःखे विकायची फक्त दलितांनी" म्हणायचे अन तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे हे बऱ्यापैकी सूचक नाही का?? असो, आता ही कॉमेंट करणाऱ्या व्यक्तीने काय बोलावे हा त्याचा प्रश्न आहे तुमचा नाही हे मी मान्य करतो अन अन मी त्या शेलक्या कॉमेंट खाली जे काही लिहिलंय ते त्याच संबंधात आहे असे स्पष्ट करतो, प्रश्न डबल स्टॅण्डर्डसचा होता/आहे, तुम्ही माझ्या भाषेला शिवराळ म्हणायचे कारण अन प्रयोजन कळले नाही, एकतर मी ग्रामीण पार्श्वभूमीचा आहे, त्यात जे आहे ते स्पष्ट तोंडावर बोलतो, त्यात "शिवराळ" असे काहीच मला तरी वाटले नाही, तुम्हाला वाटले असल्या माफ कराल ही विनंती. आता थोडे कथेबद्दल मला "कथेशी" प्रॉब्लेम नाही, मांडणीशी नक्कीच आहे, तुम्ही हे सगळे वैयक्तिक अनुभव म्हणून मांडता आहात, तेव्हा त्यात जर कोणाला काही आपत्ती असली तर ती झेलायची जबाबदारी पण तुमचीच असते, ह्याने एक अतिशय निराशावादी पायंडा पडतोय असे माझे वैयक्तिक मत आहे अन त्यावर टीका करायचा हक्क मी नक्कीच राखतो, ओपन फोरम वर 2 देणे दोन घेणे (विचार!) हे असलेच पाहिजे, मारहाण करताना जातीचा उल्लेख केला गेला म्हणून ते पुढे नोकरी लागत नाही म्हणुन नायक चक्क आत्महत्या करतोय तुमचा, मला हे कायम चूकच वाटत राहणार अन असल्या पळपुट्या वृत्तीचा मी कडक विरोधी राहणारच राहणार, त्यात माझी थेट भाषा शिवराळ वाटल्यास माझा नाईलाज असेल! धन्यवाद. जाता जाता - एक असे वाक्य जे मला दरवेळी जात/आरक्षण इत्यादी धाग्यांवर फेकावेच लागते, ते म्हणजे "मी सुद्धा ओपनच (ब्राह्मण) बरंका" तरीही मला कुठलीही व्यथा नाही, मला आलेले कडू अनुभव कवटाळून बसायला आवडत नाही, आलेल्या 2-4 अनुभवांमुळे मी मित्र अन मैत्री तोडत नाही, तोंडही लपवत नाही, मला माझ्या ओपन असल्याची लाजही नाही अन माजही नाही. आता असोच! नमस्कार

ते irony की काय म्हणतात ते हेच असावं बहुदा, कथेमध्ये जे bullying अज्ञातचं झालं होतं, तेच इथेही दिसून येतंय. आणि याच धाग्यावर नाही, मिपावर बऱ्याचदा ते दिसून येतं, वरील कथा एक कथा म्हणून वाचून सोडून द्यावी, नाही पटली तर तसं लिहावं, इतकं पोस्टमॉर्टेम कशासाठी, बरंचसं पटण्यासारखं नाही त्यात, पण तसं प्रत्यक्षात असूही शकतं नसूही शकतं, एखाद्याबद्दल काहीही माहिती नसतांना जजमेंटल, वैयक्तिक होण्याची गरज असतेच का सगळीकडे, आणि हो, कथानायक ब्राह्मण असल्याचा कुठे उल्लेखही नाहीय.

In reply to by नीलमोहर

एखाद्याबद्दल काहीही माहिती नसतांना जजमेंटल, वैयक्तिक होण्याची गरज असतेच का सगळीकडे,
२. हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे. मुद्दामच मी कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख टाळला आहे.
लेखकाने, कुठेही ही काल्पनिक असल्याचे सांगितले नाहीये, उलट दुसराच disclaimer दिला आहे वरील प्रमाणे (ठळक केलेला) , थोडक्यात लेखकाने स्वतःच स्वतःची माहिती दिली आहे असे म्हणल्यास गैर असेल का?? जर स्वतः स्वतःची माहिती कोणी देतंय तर त्या संबंधी जजमेंटल होणे बुलिंग कसे होईल?? उद्या मी लिहिले की हे काल्पनिक नाही पण मी काळाकुलकुळीत आहे अन मला त्याची लाज वाटते, त्यावर कोणी जर फेअर अँड लव्हली लावा म्हणले, दुसऱ्याने काळेपणाला तुच्छ समजतोय म्हणून मला झापले, तर झापणाऱ्याला आपण बुली समजाल काय?? मी स्वतः एक वैयक्तिक माहिती देतोय, ती काल्पनिक नाही असे डिस्क्लेमर टाकतोय, मग त्या माहिती संबंधी जजमेंट कोणी दिल्यास त्याला त्याज्य अन बुली मानायचे प्रयोजन नाही, असे वाटते. बाकी, आणि हो, कथानायक ब्राह्मण असल्याचा कुठे उल्लेखही नाहीय. असोच =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बुलिंग इथे मिपावर या अर्थाने म्हटलं की, एखाद्याचे लिखाण आपल्याला पटले नाही तर तसे लिखाणाबद्दल बोलावेच, मत व्यक्त करायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच, पण लिहीणार्‍याला जज करायचा अधिकार कोणालाही कसा काय असू शकतो, एका व्यक्तिने दुसर्‍याला कशाहीसाठी जज करावे यासाठी तो स्वतः तितका पर्फेक्ट असतो का, हे असे झालेले मुविंच्या, मुटे साहेबांच्या, लेटेस्ट डॉ. खरेंच्या धाग्यावर पाहिले म्हणून तसे लिहीले. जो तो माणूस आपल्या जागी आपण बरोबर असेच समजतो, पण नक्की चूक बरोबर काय हे कोण ठरवणार, नाहीतर ती म्हण आहे तसं, माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, मात्र दुसर्‍यांच्या चुकांसाठी तो सरळ न्यायाधीश बनतो. कथेच्या बाबतीत, आत्महत्या हा कुठल्याही समस्येवर उपाय नाही, तो मार्ग अवलंबणारे दुबळ्या मनाचे आणि निराशावादी असतात हे शंभर टक्के सत्य. एखाद्या गोष्टीसाठी, माणसासाठी सहज देऊन टाकावा एवढा जीव स्वस्त नाहीच. मात्र जगात सर्व प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. एखादा लहानपणापासून फक्त सहन करत असेल, पलटवार करायची, परिस्थितीशी झुंजायची त्याच्यात हिंमत नसेल तर ते चूक आहेच, पण अशी नकारात्मक मानसिकताही तयार होऊ शकते, किंवा झुंज देऊनही ती सतत अपयशी ठरत असेल असेही होऊ शकते. असे हताश, निराश, सायकॉलॉजिकल समस्या असलेले कितीतरी लोक समाजात असतात, म्हणून तर मानसोपचार तज्ञांची गरज पडते, मनोरूग्णालये भरून वाहत असतात. मला जेवढी कथा समजली त्याप्रमाणे, कथानायक फक्त नौकरी मिळत नसल्याने निराश नव्हता, एकूणच समाजावरून, लोकांवरून त्याचा विश्वास उडाला होता. सिस्टीम मध्ये राहताही येत नाही, सिस्टीमच्या विरोधात जाताही येत नाही अशा काहीशा चक्रव्यूहात तो अडकला होता. त्यातून खूप जास्त उद्विग्नता त्याच्यात आली होती. त्यामुळेच इतका टोकाचा निर्णय त्याने घेतला असावा. अशा परिस्थितीचा सामना करायचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. मैं आझाद हूं, अ वेनस्डे, डोंबिवली फास्ट, इतर अनेक चित्रपटांत एकच माणूस, निरनिराळ्या प्रकारे सिस्टीम विरोधात लढालेला दाखवला आहे. तिथेही काय चूक काय बरोबर कोण ठरवणार. ही उद्विग्नता आजची नाही, वर्षानुवर्षे चालत आलेलीय. म्हणून तर साहिरने १९५७ मध्ये लिहीलेल्या या ओळी आजही तितक्याच समर्पक आहेत, ये महलों, ये तखतों, ये ताजों की दुनिया, ये इंसान के दुश्मन समाजों की दुनिया, ये दौलत के भूखे रवाजोंकी दुनिया, ये दुनिया अगर मिल जाए तो क्या है..

In reply to by नीलमोहर

तुम्ही आता विषय बदलत आहात, "ओपन ची व्यथा" असं धडधडीत शीर्षक असलेल्या, लेखकाचे स्वतःचे खरे अनुभव असलेल्या, केवळ जातीयवादामुळे निराश झालेल्या नायकाचे कथानक असलेल्या गोष्टीला भलतंच वळण देण्याचं काय कारण? ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणूनही समस्या असतात, त्या मंडल्यानें काही बिघडत नाहीये, पण तुम्ही 'ब्राह्मण असा उल्लेख नाही' म्हणून का झाकू पाहताय ते कळले नाही, बुलिंग नैसर्गिक सत्य आहे, ते स्वीकारावेच लागते, अन्यथा मुळू मुळू रडण्याशिवाय काही होत नाही, ते रडणे ज्याला पसंत नाही ते कथेच्या विरुद्ध प्रतिसाद देत आहेत असे वाटते,

In reply to by नीलमोहर

तुम्ही आता विषय बदलत आहात, "ओपन ची व्यथा" असं धडधडीत शीर्षक असलेल्या, लेखकाचे स्वतःचे खरे अनुभव असलेल्या, केवळ जातीयवादामुळे निराश झालेल्या नायकाचे कथानक असलेल्या गोष्टीला भलतंच वळण देण्याचं काय कारण? ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणूनही समस्या असतात, त्या मंडल्यानें काही बिघडत नाहीये, पण तुम्ही 'ब्राह्मण असा उल्लेख नाही' म्हणून का झाकू पाहताय ते कळले नाही, बुलिंग नैसर्गिक सत्य आहे, ते स्वीकारावेच लागते, अन्यथा मुळू मुळू रडण्याशिवाय काही होत नाही, ते रडणे ज्याला पसंत नाही ते कथेच्या विरुद्ध प्रतिसाद देत आहेत असे वाटते,

In reply to by नीलमोहर

तुम्ही आता विषय बदलत आहात, "ओपन ची व्यथा" असं धडधडीत शीर्षक असलेल्या, लेखकाचे स्वतःचे खरे अनुभव असलेल्या, केवळ जातीयवादामुळे निराश झालेल्या नायकाचे कथानक असलेल्या गोष्टीला भलतंच वळण देण्याचं काय कारण? ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणूनही समस्या असतात, त्या मंडल्यानें काही बिघडत नाहीये, पण तुम्ही 'ब्राह्मण असा उल्लेख नाही' म्हणून का झाकू पाहताय ते कळले नाही, बुलिंग नैसर्गिक सत्य आहे, ते स्वीकारावेच लागते, अन्यथा मुळू मुळू रडण्याशिवाय काही होत नाही, ते रडणे ज्याला पसंत नाही ते कथेच्या विरुद्ध प्रतिसाद देत आहेत असे वाटते,

In reply to by संदीप डांगे

जे कथेत वाचलंय त्याबद्दलच लिहिलेय. बुलिंगला मुळू मुळू रडणे हा एकमेव पर्याय नसतो, प्रतिकाराचे इतरही मार्ग असतातच, बुलिंग तर राहणारच, शेवटी काही लोकांसाठी स्वतःचा superiority complex जपणे आणि मिरवणे महत्वाचे. काही लोक इतरांना मदत करण्यात आनंद मानतात, काही दुसऱ्यांना टोचून छळून आनंद मिळवतात, जैसी जिसकी सोच वगैरे वगैरे. ती अकुंची कविता आलीय न आजच, कावळे, कावळेही नाही, डोमकावळे...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमच्याबद्दल वाईट विचार कधीच येणार नाहीत बापू :) जनरल क्रॉउड मेंटॅलिटी असते त्याबद्दल लिहिलेय

In reply to by नीलमोहर

ओके, तुम्हीही गैरसमज करून घेऊ नका पण बुलिंग > दवणीय आडनावे > माझे तिखट शब्द > कावळे उल्लेख वाचून माझा तसा ग्रह झाला, अन आमचे धोरण आहे ते तिथल्या तिथे आहे, म्हणून स्पष्ट विचारले हो, परत एकदा गैरसमज नसावा ही विनंती

In reply to by नीलमोहर

निमो तुम्ही गोंधळला आहात काय? बादवे, अकुंची कविता येथे सांगून तुम्हीही टोचण्याचेच काम केले आहे हे लक्षात आले काय?

In reply to by संदीप डांगे

बाकी योगायोगाने आजच ती कविता पाहिली म्हणून संदर्भ दिला, टोचलेले वाईट दुखते माहित असल्यामुळे ते करत नाही :) इति लेखनसीमा

In reply to by संदीप डांगे

अकुंची कविता येथे सांगून तुम्हीही टोचण्याचेच काम केले आहे हे लक्षात आले काय? अहो पण बुलिंग हे नैसर्गिक सत्य आहे असे तुम्हीच लिहिले आहे ना ?

In reply to by नीलमोहर

माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, मात्र दुसर्‍यांच्या चुकांसाठी तो सरळ न्यायाधीश बनतो. हाच नियम अज्ञात आडनावेला सुद्धा लागू असेल का?? असायलाच हवा म्हणा कारण विधान वैश्विक(युनिव्हर्सल) आहे, असे असता आत्महत्येसारखे लांच्छनास्पद पातक करून त्याची वकिली करून वर सिस्टिमलाच पिंजऱ्यात उभा करणाऱ्या कथानायकाला/लेखकाला जर मी माझा तोच युनिव्हर्सल नियम वापरून जज केले तर तो गुन्हा ठरावा काय??

In reply to by नीलमोहर

माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, मात्र दुसर्‍यांच्या चुकांसाठी तो सरळ न्यायाधीश बनतो. हाच नियम अज्ञात आडनावेला सुद्धा लागू असेल का?? असायलाच हवा म्हणा कारण विधान वैश्विक(युनिव्हर्सल) आहे, असे असता आत्महत्येसारखे लांच्छनास्पद पातक करून त्याची वकिली करून वर सिस्टिमलाच पिंजऱ्यात उभा करणाऱ्या कथानायकाला/लेखकाला जर मी माझा तोच युनिव्हर्सल नियम वापरून जज केले तर तो गुन्हा ठरावा काय??

कथा एकसलग वाचली. निःसंशय मनाला भिडली. ही जरी 'ओपन' व्यथा नसली असती तरीही तेवढीच मनाला भिडली असती आणि याचं सगळं श्रेय तुमच्या लेखनशैलीला आहे. खरंतर जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात जिथे माणूस हतबलतेमुळे निराश होऊ शकतो किंवा अचानक एखादा आघात होतो जिथे माणूस/ कुटुंब आयुष्यातून उठतं. अशा प्रसंगांतच तर खरी कसोटी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारणं, तिच्याशी दोन हात करणं आणि प्रतिकूल परिस्थितीत पाय रोवून खंबीरपणे उभं रहाणं शिक्षणामुळे जास्त सोपं व्हायला हवं. तसंच एखादा छन्द, आई-वडील, नातेवाईक, जिवलग मित्र हे सर्व अशावेळी महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदीच नाही जमलं तर परिस्थिती/ नशीब/ सिस्टीम गेली तेल लावत असं म्हणून एखाद्या समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याचा पर्याय आहेच. तसंही बाबा रणछोडदास म्हणून गेले कि 'कामयाबी के लिए नहीं, काबिल होने के लिए पढो; कामयाबी खुद तुम्हारे पीछे आएगी ।'