✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 10/19/2015 - 08:26  ·  लेख
लेख
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
विज्ञान
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
274213 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

general motors co. ने

palambar
Tue, 10/20/2015 - 00:45 नवीन
general motors co. ने त्यांच्या staff करिता सात दिवसांचा diet plan असाच केला होता,त्यात फळे, भाज्या इ सात दिवस ओळीने खायच्या आहेत , त्यात सुधा वजन चांगले कमी होते.
  • Log in or register to post comments

माझ्या बायकोने केले होते

लंबूटांग
Tue, 10/20/2015 - 02:20 नवीन
लग्नासाठी वजन कमी करायचे म्हणून. तिला तरी खूपच फायदा झाला. पहिले काही दिवस तिला थोडा डोकेदुखीचा त्रास झाला पण नंतर अतिशय energetic वाटत होते. मी कधीपासून करेन करेन म्हणत आहे पण अजून तरी केले नाहीये.
  • Log in or register to post comments

जीएम डाएट

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 06:28 नवीन
जीएम डाएट मी पूर्वी दोनदा केले होते, तेवढ्यापुरते वजन कमी झाले होते, पुन्हा जैसे थे. फिस्टुला वर मात्र काहीही परिणाम झाला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

असा आहार असताना दूध कितपत

कवितानागेश
Tue, 10/20/2015 - 06:19 नवीन
असा आहार असताना दूध कितपत चालते हे कुणाला माहीत आहे का? माझ्या अंदाजानी कफ वाढेल रसाहारात दूध घेतले तर. अशाच प्रकारची शरीरशुद्धी , पोट साफ़ होणे हे कोरफडीच्या रसानी झालेले एकाकडून ऐकले आहे. त्याला ४ दिवस सकाळी १ लीटर रस पयाला लावला होता. बाकी दिवसभर हलका आहार, म्हणजे मऊ भात फ़क्त.
  • Log in or register to post comments

उपयोगी छंद

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 06:35 नवीन
कोरफडीचा रस अतिशय कडू असणार, त्यामुळे तो 'प्यायला लावला' हे योग्यच. भाज्या-फळांचा रस अतिशय छान लागतो, मुख्य म्हणजे त्यात 'आपल्याला' हवी असणारी पोषकद्रव्ये भरपूर असतात, पण 'परजीवी कृमी' ची उपासमार होते. रंगिबेरंगी भाज्या-फळे आणणे, स्वच्छ करणे, जूस काढणे आणि पीणे हा सर्व एक आनंददायक सोहळा असतो. वेळात वेळ काढून लावून घ्यावा असा हा उपयोगी छंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

रसाहाराचे दरम्यान

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 12:33 नवीन
रसाहाराचे दरम्यान दूध घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

रच्याकने. रक्तशुद्धी आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/20/2015 - 09:08 नवीन
रच्याकने. रक्तशुद्धी आणि टवटवीत त्वचेसाठी कडुनिंबाचा रस कसा काम करतो? त्याचे दुसरे परिणाम होत असल्याने कधीतरी ४ महिन्यातुन एकदा घेतो. -_-
  • Log in or register to post comments

लेख आवडला......

प्रदीप@१२३
Tue, 10/20/2015 - 10:27 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments

आपल्याला आलेला अनुभव

अनिता ठाकूर
Tue, 10/20/2015 - 10:53 नवीन
आपल्याला आलेला अनुभव सर्वांपर्यंत पोहोचविणारा आपला लेख अतिशय प्रेरणादायी आहे. आपण वेळोवेळी सर्वांना आवश्यक ते मार्गदर्शनहि केले आहे. तरीहि माझी एक विचारणा... १) भाज्या २) फळं ३) गाजर, काकडी, बीट ह्यासारख्या कोशिंबीर वर्गातील भाज्या..... ह्या सर्वांचा वेगवेगळा रस घ्यायचा , म्ह॑णजे फक्त भाज्यांचा, फक्त फळांचा ह्याप्रमाणे रस घ्यायचा की काहीहि एकत्र करून, वरून त्यात दही घालून वगैरे... असा रस घ्यायचा?
  • Log in or register to post comments

वर्गीकरण

चित्रगुप्त
Tue, 10/20/2015 - 12:16 नवीन
@अनिता ठाकूरः जो क्रॉस यांचा मुख्य भर हिरवा रस घेण्यावर आहे. सुमारे २/३ भाज्या आणि १/३ फळे घ्यावीत, असे त्यांचे म्हणणे. जर दिवसभर रस घ्यायचा असेल, तर वेगवेगळी मिश्रणे करू शकतो. एकदाच घ्यायचा असेल, तेव्हा सर्व एकत्र करू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यात 'कोशिंबीर वर्ग' वगैरे काही नाही (बाकी आणखी कोणकोणते 'वर्ग' आहेत ? हे वर्गीकरण कोणत्या आधारावर केलेले आहे ?) खालील दुव्यावर विविध जूसांच्या कृती मिळतीलः http://www.rebootwithjoe.com/category/juice/ दही मिसळून करण्यासाठी मी जूसरमधून निघणारा वाटीभर चोथा काढून ठेवतो. त्यात केळे, एकादे फळ, वगैर घालून पातळ लस्सी/स्मूदी करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

जबरी आहे

निनाद
Tue, 10/20/2015 - 10:54 नवीन
जबरी आहे हा अनुभव. करुन पाहिला पाहिजे एकदा
  • Log in or register to post comments

कालसर्प वियोग हा शब्दप्रयोग

प्रकाश घाटपांडे
Tue, 10/20/2015 - 11:24 नवीन
कालसर्प वियोग हा शब्दप्रयोग आवडला. अविश्वसनीय वाटावा असा आपला प्रेरणादायी स्वानुभव असल्याने विशेष वाटले.पोटाचे आरोग्य व तुमचा उत्साह याचा अतूट संबंध आहे. म्हणूनच आहार विहाराच गणित ज्याला जमत तो उत्साही व आरोग्यदायी असतो.
  • Log in or register to post comments

@ चित्रगुप्त..उत्तराबद्दल

अनिता ठाकूर
Tue, 10/20/2015 - 12:58 नवीन
@ चित्रगुप्त..उत्तराबद्दल धन्यवाद! दुवा पाहिला.
  • Log in or register to post comments

छान लेख.

हेमंत लाटकर
Tue, 10/20/2015 - 23:16 नवीन
छान लेख. वाॅटर थेरपी सुद्धा चांगली असते.
  • Log in or register to post comments

वॉटर थेरॅपी बद्दल माहिती दिली

चित्रगुप्त
Wed, 10/21/2015 - 00:44 नवीन
वॉटर थेरॅपी बद्दल माहिती दिली तर उत्तम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मी केली आहे.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/21/2015 - 01:24 नवीन
वॉटर थेरेपी मी केली आहे. हायपर अ‍ॅसिडिटी आणि अल्सर ह्या दोन्ही विकारांनी त्रस्त असताना, एका गुजराथी पेपरात वाचल्यानुसार, वॉटर थेरेपी केली होती. सकाळी चार मोठे ग्लास (स्टीलचे उंच पेले) साधारण सव्वा ते दिड लिटर पाणी दात घासायच्या आधी प्यायचे. नंतर दात घासायचे पण दोन तास कांही खायचं प्यायचं नाही. अगदी चहाही नाही. चार-पाच वेळा लघुशंकेसाठी जावे लागते. दोन तासांनतंर तुम्ही चहा नाश्ता करू शकता. तीन आठवड्यात अ‍ॅसिडिटीही गेली आणि अल्सरही गेला. आजतागायत काही त्रास नाही. पथ्यही फारसे कांही नाही. लागोपाठ जागरणं आणि मद्यपान टाळतो. नंतर सहा वर्षांनी सिगरेट सोडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बाकी सर्व ठीक आहे पण दात न

सुबोध खरे
Wed, 10/21/2015 - 11:49 नवीन
बाकी सर्व ठीक आहे पण दात न घासण्याचे शास्त्रीय कारण सापडत नाही. रात्रभर तोंडात लाळ तयार होत नसल्याने तोंड साफ होत नाही तेथे जीवाणूंची वाढ होत राहते. (रुग्णालयातील रुग्णाच्या तोंडाला येणारा विशिष्ट वास हा अशा जीवाणुंच्या वाढीने येतो) तोंड स्वच्छ न करता पाणी पिणे म्हणजे तोंडातील घाण परत पोटात ढकलणे आहे. मी माझ्या रुग्णांना स्वच्छ दात घासून पाणी प्या असा सल्ला देतो. फक्त त्यात १ लिम्बाचा रस आणि मधुमेह नसेल तर एक चमचा मध घालून थोड्याशा कोमट पाण्यातून प्यायला सांगतो. याचा पोटाचा विकार असणार्या बहुसंख्य लोकांना थोडा तरी फायदा होतोच. ज्याला हृदयाचा कोणताही आजार असेल त्याने मात्र आपल्या हृदयरोगतज्ञाला विचारूनच हा उपाय करावा. सव्वा ते दीड लिटर कोमट पाणी ( लिंबू आणि मध घालून) प्यायल्यामुळे आतड्याला चालना मिळते. याचा बद्धकोष्ठ असलेल्या लोकांना फायदा होतो. रात्रभरात मूत्रपिंडे लघवी घट्ट(concentrate)/ संतृप्त करतात त्याचा निचरा भरपूर पाण्याने होतो. वरील उपायाने माझ्या आजोबाना असलेली गंधर्व हरीतकी सारख्या रेचकाची जुनी आणि हट्टी सवय(२० वर्षाची) पूर्ण गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ह्या थेरपीत 'दात न घासता' ची

प्रभाकर पेठकर
Wed, 10/21/2015 - 14:22 नवीन
ह्या थेरपीत 'दात न घासता' ची अट का आहे हे मलाही माहीत नाही. पण आहे एव्हढेमात्र खरे. मी केले मला कांही त्रास झाला नाही. पाण्यात कांहीही न मिसळता घ्यायचे आहे. (लिंबू-मध- मीठ काही नाही) पाण्याला फुड व्हॅल्यू कांही नसल्याकारणाने पोटात जे अतिरिक्त आम्ल उतरते ते हळू हळू कमी होते. आणि अ‍ॅसिडिटी जाते. थोडक्यात पोटाला कमी अ‍ॅसिड्स रिलिज करण्याची सवय लागते. असे त्या लेखात म्हंटले होते. पाण्याने इतरही अनेक फायदे होतात. जसे शरीरातील पाण्याचा समतोल राखला जाऊन हातापायाची, डोळ्यांची जळजळ थांबते, मलावरोध कमी होतो, मुत्रपिंडेही स्वच्छ राहतात. मुतखड्याचा त्रास होत नाही. वगैरे वगैरे अनेक फायदे, कांही विश्वसनिय कांही अविश्वसनिय, त्यात सांगितले होते. मला अ‍ॅसिडिटीवर हिस्टॅक गोळ्या डॉक्टरांनी सुरु केल्या होत्या. 'जर खाण्यापिण्याच्या सवयी नाही बद्दलल्या तर ह्या गोळ्या जन्मभर घ्याव्या लागतील' अशी भितीही घातली होती. पण वरिल वॉटर थेरपीने सर्व व्याधी दूर होऊन सवयी कांही बदलाव्या लागल्या नाहीत. ही ९६ची कथा आहे. पुढे वयोपरत्वे सिगरेट सुटली, मद्यपानही आटोक्यात आहे, जागरणंही कमी झाली. तिखट खाण्याची आवड अजूनही आहे. व्हेज-नॉन व्हेज दोन्ही चालू आहे. हिस्टॅक घरात असतात पण कधी घ्याव्या लागत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पेठकर साहेब, वॉटर थेरपीविषयी

मांत्रिक
Wed, 10/21/2015 - 15:11 नवीन
पेठकर साहेब, वॉटर थेरपीविषयी अतिशय उत्तम अनुभवी माहिती दिलीत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकर तुम्ही वाॅटर थेरपी

हेमंत लाटकर
Wed, 10/21/2015 - 08:40 नवीन
पेठकर तुम्ही वाॅटर थेरपी विषयी सांगितलेली माहिती बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त काका आणि तजो

बोका-ए-आझम
Wed, 10/21/2015 - 09:12 नवीन
यांचे मन:पूर्वक आभार. पेठकरकाका, वाॅटर थेरपीबद्दल जरा सविस्तर सांगा ना!
  • Log in or register to post comments

वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी

चित्रगुप्त
Wed, 10/21/2015 - 12:16 नवीन
वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी पाणी प्यायचे एवढेच आहे? मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे. जरा जास्त माहिती देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 13:04 नवीन
माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी केली होती. त्यात पेठकरांनी सांगितल्याप्रमाणेच सकाळी दात न घासता साधे (थंड नाही) पाणी पिणे होते. त्यासोबत दोन्ही वेळ जेवणाआधी अर्धातास एक पेला व जेवण झाल्यावर अर्धा तासांनी एक पेला पाणी प्यायचे होते. हे त्यांचे वय ४० असतांना केले होते. पंधरा दिवसात त्यांच्या शरिरात उत्साह, उर्जा, शक्ती वाढली होती. चालण्याचा मोठा पल्ला मारतांना आधी दम लागून यायचा. तो बंद झाला. नंतर त्यांनी सातत्य ठेवले नाही. पण थेरपी म्हणून एवढेच केल्याचे आठवते, बाकी काही पथ्य नव्हते. वडीलांना इतर व्यसने, किंवा अनियमित जीवनशैली असे काही नव्हते. त्यामुळे व्यसने व जीवनशैलीच्या पथ्याबाबत सांगू शकत नाही. तोंडातले जीवजंतू पोटात जाणे वाईट असते हे डॉक्टरांनी सांगितले. मुखारोग्याबद्दल वैद्यकिय अधिकारातल्या लोकांच्या ज्ञानाचा अधिकार मान्य असल्यामुळे त्याला फाटे फोडायची गरज वाटत नाही. पण लाळेसोबत २४ तास ते जीवजंतू पोटात जातच असतात. त्याबद्दल अधिक माहिती वा खुलासा मिळाला तर शंकानिरसन होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लाळ हि जागतेपणी तयार होत असते

सुबोध खरे
Wed, 10/21/2015 - 13:18 नवीन
लाळ हि जागतेपणी तयार होत असते आणी ती सतत गिळली जात असते त्यामुळे तोंडात असलेल्या जंतूना वाढ होण्याचा वेळच मिळत नाही. दर काही मिनिटांनी ते पोटात ढकलले( गिळले) जातात आणी पोटातील आम्लाने त्यांचा खात्मा होतो. रात्री झोपता तेंव्हा लाळ घशात जाऊ नये म्हणून तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे सकाळ पर्यंत तोंडात वाढलेल्या जंतूंचे प्रमाण बरेच जास्त असते. म्हणून सकाळ झाल्यावर सर्वप्रथम तोंड धुणे हे आवश्यक आहे. इंग्रजी प्रकार बेड टी सारखा अनारोग्यकारक प्रकार दुसरा नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

धन्यवाद!

तर्राट जोकर
Wed, 10/21/2015 - 14:34 नवीन
धन्यवाद! बेड-टी हा प्रकार चित्रपटात बघितल्यापासूनच विचित्र वाटत आलाय. त्यांच्या हवामानाआधारित सवयींमुळे त्यांना ते योग्यही वाटत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत आहे.दात न घासता पाणी

अजया
Wed, 10/21/2015 - 17:07 नवीन
सहमत आहे.दात न घासता पाणी पिणे म्हणजे रात्रभर पोसलेल्या जंतूंना पोटात ढकलणे होईल.या जंतूंची एक पातळ फिल्म रात्रभरात दात जीभ यांवर तयार होते.तिला प्लाक म्हणतात.त्यामुळेच सकाळी उठल्यावर तोंडात अस्वच्छ वाटत असते.आणि दात घासल्यावर फ्रेश वाटते.त्यामुळे कोणत्याही कारणाने दात न घासता उठल्या उठल्या पाणी पिऊ नयेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

यावरून एक म्हटली तर सवांतर,

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 17:15 नवीन
यावरून एक म्हटली तर सवांतर, म्हटली तर अवांतर शंका: गेली हजारो वर्षे लोक दात न घासताही निवांत राहिले कारण तेव्हा ते जे अन्न खायचे तेच जणू फिल्टरसारखे काम करायचे, शिवाय त्यात साखर वगैरे घटक नव्हते त्यामुळे चालून गेले वगैरे वगैरे.... सो ही जंतूंची पातळ फिल्म त्यांना त्रासदायक होत नव्हती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

गेल्या २५ लाख वर्षांतले

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/21/2015 - 17:59 नवीन
गेल्या २५ लाख वर्षांतले आदीमानवाचे व मानवाचे आयुर्मान (लाईफ एक्पेक्टन्सी) २० ते फारतर ४० वर्षे इतकेच राहिले आहे. आधुनिक मानवाच्या झपाट्याने होणार्‍या इतर विकासाबरोबरही ते फारसे वाढलेले दिसत नाही. मात्र, गेल्या शंभर एक वर्षांत त्यात खूप मोठी (५० टक्क्यांपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. त्याचे मुख्य श्रेय आधुनिक शरीरशास्त्रामधील संशोधन आणि पर्यायाने आरोग्यदायक सवयींसंबंधी वाढलेल्या आकलनाला जाते. या आयुर्मानवाढीत जंतूशास्त्र आणि त्याअनुषंगाने विकसित झालेल्या औषधशास्त्राचा सिंहाचा वाटा आहे. खालील टेबल पाहून ही कालरेखा अजून नीट ध्यानात येईल... Image removed. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Life_expectancy (जालावरून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यावरुन आठवलं.

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 18:03 नवीन
यावरुन आठवलं. रात्री दात घासून झोपणार्‍या लोकांना हृदयविकाराचा त्रास देखील कमी होतो/असतो असं वाचलं आहे. खरं आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

होय.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/21/2015 - 18:51 नवीन
होय. तोंडातील (घसा, दात आणि हिरड्या) जंतूंपासून होणार्‍या हृदयविकारांमध्ये "हृमॅटिक हार्ट डिसिज" हा एक महत्वाचा गट आहे. तुलनेने तरुण वयात होणार्‍या या आजारात, हृदयाच्या झडपांना इजा होऊन त्या कायमच्या निकामी होऊ शकतात. सुधारलेल्या सर्वसाधारण दंताआरोग्यामुळे आणि दंतकर्माच्या (डेंटल प्रोसिजर्स) अगोदर दिल्या जाणार्‍या अँटिबायोटिक्समुळे या आजाराचे प्रमाण खूप कमी होत आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

रात्री झोपण्याआधी दात घासणे व

टवाळ कार्टा
Fri, 10/23/2015 - 15:48 नवीन
रात्री झोपण्याआधी दात घासणे व आंघोळ करणे या गोष्टी कराव्याच...ब्रेच फायदे आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

रोख.... _/\_ ;-)

तर्राट जोकर
Fri, 10/23/2015 - 16:59 नवीन
रोख.... _/\_ ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फक्त रात्री च का? प्रत्येक

प्रसाद१९७१
Fri, 10/23/2015 - 17:13 नवीन
फक्त रात्री च का? प्रत्येक वेळेस "झोपताना" च या गोष्टी कराव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

झोपुन झाल्यावरही कराव्यात

द-बाहुबली
Fri, 10/23/2015 - 17:28 नवीन
झोपुन झाल्यावरही कराव्यात झोपेचा अजुन फायदा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

धन्यवाद!!

बॅटमॅन
Fri, 10/23/2015 - 12:09 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे खरच आहे का, अजया? कारण मी

स्वप्नांची राणी
Wed, 10/21/2015 - 17:18 नवीन
हे खरच आहे का, अजया? कारण मी वाचलेलं की हा तोंडातला फ्लोरा खरं म्हणजे पोटासाठी चांगला असतो... नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तो पोटातला फ्लोरा.तोंडातला

अजया
Wed, 10/21/2015 - 19:18 नवीन
तो अातड्यातला फ्लोरा.तोंडातला नाही.किंबहुना तोंडातला बॅक्टेरियाचा फ्लोरा अपायकारकच असतो.यातल्या काही प्रकारच्या जंतूंनी वर सांगितल्याप्रमाणे हार्ट डिसिज तसंच लेटेस्ट संशोधनाप्रमाणे काही किडनी विकार तसेच वारंवार गर्भपात होणे हे आजारही उद्भवू शकतात. @बॅट्या,मानवाच्या खाण्याच्या पध्दतीत शिजवणे आल्यानंतर बदल होत आलेले आहेत.मऊ अन्न दातात तोंडात शिल्लक राहाते.जे या जंतूंचे खाद्य असते.त्यामुळे दंतविकार आत्ता जास्त दिसतात.फायब्रस खाणे निदान ही फिल्म हटवते. परंतु रात्री लाळग्रंथी कमी लाळ उत्पन्न करतात हे तेव्हाही होत असणार.कमी लाळ म्हणजे अन्न ढकलले जाणेही कमी.जंतू जास्त.तेव्हा या मानवांनाही प्लाक तोंडात होतच असणार.सकाळची मुखदुर्गंधी असतेच असे धरुन चालत असतील कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

माहितीकरिता

बॅटमॅन
Fri, 10/23/2015 - 12:09 नवीन
अनेक धन्यवाद अजया!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मुखदुर्गंधी ही न पचलेल्या -

चित्रगुप्त
Wed, 10/28/2015 - 14:34 नवीन
मुखदुर्गंधी ही न पचलेल्या - पोटात सडत राहणाऱ्या अन्नाची पण असते हा स्वानुभव. माझ्या रसाहाराच्या काळात अजिबात वास येत नाही तोंडातून वा श्वासातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

पोटात अन्न सडत नाही...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/29/2015 - 00:03 नवीन
पोटात अन्न सडत नाही... किंबहुना खुपसे जंतू जठरातल्या हायड्रॉक्लोरीक अ‍ॅसीडमध्ये जिवंत राहू शकत नाहीत... ही शरीराची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. रात्री तोंडाची हालचाल कमी असल्याने लाळ कमी प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे तोंडातले जंतू पोटात न जाता तोडातच राहतात. एका जागी राहण्याने (स्टॅसिस) जंतूंची वाढ जास्त जोमाने होते, ही शास्रिय वास्तव आहे. बोलताना तोंडाला येणारी दुर्गंधी ही दात आणि हिरड्यांच्या अनारोग्यामुळे तेथे वाढलेल्या जंतूंमुळे असते. पोटातून बाहेर येणार्‍या वायूला (ढेकर) दुर्गंधी असू शकते. पण ती जठरात पचताना काही प्रकारच्या अन्नांतून बाहेर पडणार्‍या वायुंमुळे असते, सडण्याच्या क्रियेमुळे नाही. केवळ गाळलेल्या रसाच्या आहारावर असताना तोंडात अडकून सडणारे घन पदार्थ नगण्य असल्याने सडण्याची क्रिया सर्वसामान्य घन आहारापेक्षा कमी होणारच. पूर्ण रसाहाराच्या काळात (पूर्वीचे दात/हिरड्यांचे आजार नसल्यास) झोपताना ब्रश करणे (रसाहारात असल्यावर अगदी फक्त खळखळून चूळ भरणे) तोंड आरोग्यपूर्ण व गंधविरहित राखण्यास पुरेसे आहे. अर्थातच, मी कोणत्याही प्रकारच्या आहारावर असताना झोपण्यापूर्वी "फ्लॉसिंग + ब्रशिंग" करणे जास्त योग्य सवय समजेन. ======= काही सावधगिरीच्या सूचना: १. दीर्घकालासाठी रसाहार सुरू करण्याअगोदर आपल्या पसंतीच्या मान्यताप्राप्त वैद्यकिय व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा. कारण, दीर्घकालीन आहार बदलाने शरिरावर अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात... विशेषत: जर आपल्याला काही आजार असला तर असा सला घेणे अनिवार्य समजावे. कारण, रसाहारात काही उत्तम आहारतत्वे असतात, पण तो पूर्ण आहार नाही. दीर्घकालासाठी एकाच प्रकारची आहारतत्वे खाणे व इतर आहारतत्वे टाळणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच्या शरिराला सोसेल असे नाही. २. रसाहारात कोणतेही कृमीविरोधी तत्व नसते. त्यामुळे केवळ रसाहाराने कृमी/जंतांपासून मुक्ती मिळणार नाही. तसेच अनेक कृमी/जंत आतड्याच्या भिंतींमध्ये हुक/सक्शन कपसारख्या अवयवांनी घट्ट चिकटून बसलेले असतात. ते केवळ औषधाने मृत झाल्यावरच विष्ठेतून बाहेर पडतात. शिवाय अनेक प्रकारचे कृमी/जंत व त्यांची अंडी डोळ्यांना दिसू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मलाही तसेच वाटले होते.

कानडाऊ योगेशु
Fri, 10/23/2015 - 16:54 नवीन
मलाही तसेच वाटले होते. दातामधले जंतु दातात अडकलेल्या अन्नकणांवर प्रक्रिया करतात,जर ते जंतु पोटात गेले तर पोटात साचलेल्या अन्नावर प्रक्रिया करतील. डॉ. सुहास म्हात्रेंने नुकत्याच लिहिलेल्या लेखाप्रमाणे (आरोग्यशास्त्रातील युध्द्शास्त्र) हा प्रकार ही काट्याने काटा काढावा असा असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

काट्याने काटा काढावा

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/29/2015 - 00:08 नवीन
काट्याने काटा काढावा आरोग्यशास्त्रात हे वैश्विक सत्य नाही तर काही ठराविक परिस्थितींत काळजीपूर्वक व सखोल संशोधनानंतर निवडलेली सावध उपायोजना असते. कृपया, सर्वच परिस्थितीत विषाचा उपाय विषाने करण्याचा प्रयत्न/विचार करू नये. ते धोकादायक ठरू शकेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

प्लाक

चित्रगुप्त
Wed, 10/28/2015 - 14:23 नवीन
या प्लाकचे रासायनिक पृथक्करण केले गेले असेल ना ? त्यात हानीकारक नेमके काय असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मला वाटते..

दीपक११७७
गुरुवार, 11/03/2016 - 12:55 नवीन
मला वाटते ८ तास तोड बन्द असल्याने जे विष लळेत जमा होते, ते अपलेच असल्याने आपल्या शरिरास घातक नसते ते सकाळी पण्याद्वारे शरीरात पसरते आणि toxins व अनावश्यक पदार्थ बाहेर फेकायला मदत करते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अ‍ॅसिडिटी आणि वॉटर थेरपी.

प्रभाकर पेठकर
Wed, 10/21/2015 - 14:38 नवीन
चित्रगुप्त साहेब, >>>>मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे. जो लेख मी वाचला त्यात खाण्यापिण्यावर कांही बंधन/उल्लेख नव्हता. आता 'वाटेल तितके'ची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकेल. पोटास तड लागेल असा आहार नसावा. माझे मी सांगतो, मला भूक अपरिमीत लागते आणि सहन होत नाही. ९६ च्या काळात जेंव्हा मी ही थेरपी केली तेंव्हा खाण्यापिण्यावर कांही ताळतंत्र नव्हतेच. पाकिस्तानी उपहारगृहात तेलाची तर्रीवाले नॉनव्हेज (जास्त करून मटण), कबाब, तिखटजाळ पदार्थ, बर्गर्स वगैरे वगैरे पदार्थांची माझ्या आहारात रेलचेल असायची. पण त्या सवयी न बदलताही वॉटर थेरपीचा परिणाम होऊन आरोग्य लाभले. पुढे ८-१० वर्षांनी (मधूमेहामुळे असेल) त्या आहार पद्धती बद्दलचे माझे प्रेम कमी झाले आणि आता बर्‍यापैकी सात्विक आहार असतो. (आठवड्यातून एखाद दिवस तामसी आहार असतो). हिरव्या मिरच्या, काळीमिरी, चाट मसाला, गरम मसाला वगैरे पदार्थ अ‍ॅसिडिटीला भडकवतात. लाल मिरच्या चालतात. मध्यपान, धुम्रपान, जागरणं, चिंता १०० टक्के टाळाव्यात. ज्या मी प्रयत्नपूर्वक टाळल्या आहेत. अ‍ॅसिडिटी, अल्सरचा अजिबात त्रास नाहीए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

स्पष्ट आणी परखड विवेचन --

सुबोध खरे
Wed, 10/21/2015 - 13:10 नवीन
स्पष्ट आणी परखड विवेचन -- आतापर्यंत धाग्यावर वाचलेल्या प्रतिक्रियांकडे पाहून माझे असे मत झाले आहे कि हे सर्व करणाऱ्या व्यक्तींपैकी फारतर १० % व्यक्तींचे वजन थोडे फार कमी होईल. बाकीच्यांना फारसा फायदा होणार नाही. याची कारणे-- १) बहुसंख्य व्यक्तींना रोज एक किवा दोन ग्लास ज्यूस पिऊन वजन कमी करायचे आहे. (बाकी दिनचर्या बदल न करता) २) काही व्यक्तींना सलग आठ ते दहा दिवस ज्यूस पिऊन वजन कमी होईल असे वाटत आहे ३) इतर काहीना सलग एक महिना असे केले तर वजन होईल असे वाटत आहे. बहुसंख्य व्यक्तीनची या सोबत व्यायाम करायची मानसिक तयारीच नाही. शिवाय आता वजन कमी झाले तरी परत ते वाढणार नाही यासाठी जी मानसिक तयारी हवी ती बहुसंख्य व्यक्तींमध्ये नाही. चित्रगुप्त साहेबांनी लिहिलेल्या काही वाक्यांकडे फारसे कोणी लक्ष देताना आढळत नाही "अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो" वजनाचे मूळ शास्त्र-- उर्जा किंवा वस्तुमान नष्ट होत नाही किंवा तयार करता येत नाही या प्रमाणे जोवर आपल्या खात्यातून पैसे काढत नाही आणी त्यात भर टाकत राहता खात्यातील पैसे कमी होणार नाहीत. १ ग्राम चरबी म्हणजे ९ (किलो) कॅलरी. रोजचा आहार २००० कॅलरी असेल आणी तुम्ही पूर्ण उपास( पाणी सोडून कोणतेही ज्यूस किंवा द्रव पदार्थात सुद्धा थोड्या तरी कॅलरी असतात) केला तर २२० ग्राम वजन कमी होईल. शंभर दिवस पूर्ण उपास केला तर २२ किलो वजन कमी होईल. या हिशेबाने आपण किती जेवतो आणी आपल्याला किती वजन कमी करायचे आहे याचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. एक महिन्यात १० किलो वजन कमी होईल अशी गाजरे कुणीही खाऊ नये. कारण चरबी बरोबर बर्यापैकी पाणी पण साठवले जाते जेंव्हा तुम्ही उपास करता आणी चरबी वापरली जाते तेंव्हा त्याबरोबरचे पाणी उत्सर्जन केले जाते. परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते. यास्तव VLCC किंवा तत्सम ठिकाणी जाऊन ५ - ६ किलो वजन एक महिन्यात कमी करून आलेली शेकडो माणसे तुम्हाला दिसतात पण हा बदल तात्पुरता असतो ९९.९ % लोक आपले वजन परत "मिळवतात". दुर्दैवाने यात मला वजन केंव्हाही कमी करता येईल हा खोटा आत्मविश्वास त्यांना येतो आणी नंतर परत कधीही वजन कमी होत नाही. अशीच परिस्थिती सिगारेट सोडणार्याची असते. एक आठवडा सिगारेट सोडतात आणी आयुष्यभर मी सिगारेट केंव्हाही सोडू शकतो हा खोटा आत्मविश्वास बाळगून जगतात. रस आहाराचा फायदा आपण व्यायाम आणी मिताहार घेऊन वजन कमी करत असलात तर निर्जलीकरण होऊ नये म्हणून होतो (DEHYDRATION) शिवाय रस प्राशन जेवणाच्या "अगोदर किंवा नंतर" न करता ते जेवणा "ऐवजी" केले तर फायदा होईल. वजन कमी झाल्यावर ते टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागेल याचा कोणीच विचार केलेला नाही. बहुसंख्य लोकांना आपले बूड न हलवता गोळी घेऊन किंवा योग विपश्यना ई गोष्टी करून वजन कमी करायचे आहे ते होणारे नाही. परखड शब्दांबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

" मी जोमाने सायकलिंग, पोहणे,

द-बाहुबली
Wed, 10/21/2015 - 13:25 नवीन
" मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो" हम्म.. हे सध्या शक्य नाही. त्यामुले आता डायट थांबवतो. काल पासुन विवीध जुसवरच व दही खाउनच आहे. आता पटकन एखादी कचोरी गिळावीसी वाटत आहे. परखड शब्दांबद्दल धन्यवाद डोक्ट्र. चित्रगुप्त साहेबांचा डायेट व्यायामाशिवाय फार उपयोगी नसल्याने सध्यातरी माझा पास पास करतो. बाकी विपश्यना मी केली आहे तीथे अतिशय सकस व सात्वीक अन्न मिळते. १० दिवसाचा विपश्यना कोर्सकरायला ते अतिशय योग्य आहे. विपश्यनेमधे मन लागले नाही तरी संतुलीत आहार त्यांचा नक्किच आरोग्यदायी आहे. मला फायदा झाला वजन कमी झाली नसले तरी विपश्यने नंतर फ्रेश फ्रेश वाटतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझे वजन ८९-९० किलो होते.

विलासराव
Wed, 10/21/2015 - 13:26 नवीन
माझे वजन ८९-९० किलो होते. परिक्रमेला जाऊन आल्यावर ७० किलो झाले. रोज २५,३० ते ३५ किमी चालत होतो. जे मिळेल ते भरपेट खाऊनही वजन कमी झाले. अर्थात परिक्रमेला या उद्देशाने गेलो नव्हतो. परत आल्यावर आधीचाच आहार चालु आहे तरीही वजन ७३-७४ ला स्थिर आहे. मी कोणताही व्यायाम करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

विलासराव

सुबोध खरे
Wed, 10/21/2015 - 13:33 नवीन
विलासराव मी CNBC च्या शो ला गेलो होतो तेथील एक पत्रकार ११० किलो होता. मुंबई मारेथोन धावून त्याने वजन ६५ किलो वर आणले होते आणी आता तो नियमितपणे म्यारेथोन धावतो आणी त्याने आपले वजन ६५ वर टिकवून ठेवले आहे. असा व्यायाम केल्यास नक्की वजन कमी होईल. मी गेली कित्येक वर्षे (२५ वर्षे ) आपले वजन टिकवून आहे. थोडा व्यायाम आणी मिताहार याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

हे सगळे १०० टक्के पटले.

बिन्नी
Wed, 10/21/2015 - 13:29 नवीन
हे सगळे १०० टक्के पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा