Skip to main content

शब्द झाले मोती...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही.. आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले... एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल

वाचने 93746
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

तुमच्या या कवीतेने जखम ओली झाली
त्या उध्वस्थ घरात फिरताना तिच्या कपड्याचा वास घेताना माझे मन अजूनच हळवं होतं तिच्या केसाची पीन टोचल्यावर मात्र अश्रूंचे बांध फुटून गेले. फुटून गेले...........
जयंत काकांच्या कवीतेने मला घूस्मटून टाकले अगदी आरशासमोत उभे केले. माझ्या चार ओळी.. तू हो म्हणलास तरच त्या धाग्यावर टाकेन.उगाच इतरांना शब्दबंबाळ्-भावना प्रधान नको. आधी आठवणींपासून लांब पळायचो लपून बसायचे स्वतःचे कोषात अगदी अंधारात वाटायचे इथे कुठ्यं ती सावली.मला काय माहीत ती बाहेतच उभा आहे माझी वाट पहात. मी उजेडात आलोकी माझी सोबत करते माझी इच्छा असो की नसो. आठवणी या रबरी चेंडू सारख्या असाव्यात बहुदा जितक्या जोरात खाली ढकलाव्या तित्क्याच उसळी मारून वर येतात. चेंडूच बरं आहे तो एकटाच येतो आठवणी आण्खी नवा गुंता आणतात तेव्हा न समजलेला आणि आता समजून्ही उपाय नसलेला. अस्तीत्वाच्या खुणा फक्त बाहेरच नसतात बाहेर असतात त्या फक्त ओऴखी बाकी सारा मनातला मामला. खरच अजून कुणाला मनाचा थांग लागलाय का किमान स्वतःच्या तरी ? नाही का ? का तसा प्रयत्नच करावा वाटला नाही. काहिजण याल मनस्वी-हळवा शामळू म्हणतील म्हणोत बापडे. मुखवट्याच्या जगात आतला चेहरा सगळ्यांना दाखवण्याचे धाडस फक्त ही मनस्वी माणसेच करतात. एखाद्याचे वेड लागल्याशिवाय ओढ नाही आणी ओढ उपजत येत नाही तशीच ठरवून तर नाहीच नाही. शब्द मुके झाले तर खरा संवाद फक्त नजरेचा स्पर्शाचा आणी न बोलता समजण्याचा. जमेल का, जमणार नाही हे माहीत नाही. आपल्याला काय माहीत नाही तेच नेमके माहीत नाही.आपली "ती" आपाल्याला खरेच समजली का हे माहीत नाही पण आपण "ती" ला नक्की समजून घेण्याचा प्रयत्न केला का हे पुन्हा पुन्हा तपासून पाहायला हवे. काकाश्रींचा पंखा नाखुस

@ बाबुदादा... हळव्या या वातावरणाला थोडेशे चेंज करावे म्हणतो .... ---------------- तु आयुष्यात आली.. अन आनंदाचे उधान आयुष्यात आले... लवासाला पहिल्यांदा भेटलो आपण..लग्ना अगोदर .. साखरपुड्यानंतर .. जाताना मुठा नदी किती सुंदर दिसत होतीना तिकडे... तिथेच विसावलो त्या छोट्ट्याशा ब्रिजवर आपण ... पहिल्यांदाच लाजत झालेला तो स्पर्श .. अह्हा हा किती सुंदर.. मोरपिस अंगावरुन फिरुन जावे तसाच... मग आपण पुढे फिरत गेलो.. निसर्ग आपल्या दोघांना आवडतो.. त्या निसर्गात मनमुराद फिरणे पण .... पण माझा एक रुसवा अजुनही आहे, साखरपुडा आणि लग्नात इतके ४-५ महिन्यांचे अंतर असताना ही आपण फक्त एकदाच भेटु शकलो ... तु आता म्हणत असते आपण पुन्हा लवासा ला जावू .. गेल्यावर्षी खुप हट्ट केला.. पण मी न्हेले नव्हते.. या वर्षी पावसात..आपण जाउया नक्की... खरे सांगु मला तुझ्याशिवाय असे फिरायला जायला आवडत नाही शक्यतो ... १० जून माझा वाढदिवस असतो .. दरवर्षी याच्या आसपासच्या सुट्टीमध्ये आपण फिरायला जातो.. या वर्षी पण त्याच्या आसपास आपण जावु फिरायला... काळ किती फास्ट पळतोय ना.. अस वाटत आहे.. हा काळ असाच थांबावा या क्षणांमध्येच... तु मला शर्ट घेतला या वर्षी पण .. तु नेहमीच वाढदिवसा साठी मला शर्ट घेते.. मला आवडते ते खुप.. यावेळेस चा व्हाईट शर्ट .. तो ही कॅज्युअल pepe jeamo चा.. मस्त आहे एकदम... मला खरेच छान वाटले.. पण तुला असे वाटते.. तु काहीच जास्त घेतले नाही.. कारण तुझ्या वाढदिवसाला तुला २ ड्रेस हवे असताना मी तुला ४ गिफ्ट दिले होते... घरी सांगताना पण आपण १च घेतला असे सांगितले होते... किती दिवस झाले ना आपण पिक्चर ला एकत्र गेलो नाही... आता पर्यंत पिक्चर ला जाताना आपले मात्र लक खुप खराब आहे... आपण लग्ना नंतर पाहिलेला पिक्चर होता डर्टी पिक्चर .. काय करणाअर दोनच ऑप्शन होते... एक डर्टी आणि दुसरा विकी डोनर ... मग डर्टी निवडला.. लग्नाच्या गडबडीत नक्की तो कशावर आहे ते ही माहिती नव्हते... नंतर मात्र धमाल आली मराठी किती सुरेख चित्रपट पाहिले आपण ना.. त्यातल्या त्यात शाळा आणि दुनियादारी मस्तच होते... ती पुस्तके मी तुला वाचायला दिली होती.. तुला वाचनाची जास्त आवड नाही.. पण ही आणि या बरोबर अनेक पुस्तके तु, मी म्हणालो म्हणुन वाचली... आता लवकरच आपण नाटकाला ही जात जावु .. मला नाटके आवडतात.. तु अजुन तशी नाटके पाहिली नाहीसच .. तुला बाहेरचे खायला आवडते.. पाणीपुरी वडापाव भेळ आणि मासे... मला तर खायला आवडतेच त्यामुळे फिरणे आण खाणे होत रहातेच.. पण तु मागच्या काही महिन्यांअगोदर ठरवले आहे, बाहेरचा खर्च कमी.. त्यामुळे आता बरीच मुरड बसली आहे या गोष्टींना.. तसे बरे आहे.. पण तुझी पाणीपुरी मात्र मध्ये मध्ये डोके वर काढतेच आहे...

मागिल काही दिवसांअगोदर, जवळच झाडावर चूऊताईचे घेरटे पाहिले.... चिऊ आपल्या इवल्याश्या पिल्लांना खाऊ देत होती.... त्या पिल्लांची तिला पाहण्याची ओढच लागली असेल त्याच्या अगोदर.. बिच्चारी चिऊ ताई पण.. कधी एकदा खाऊ घरात बाळांसाठी न्हेते असे वाटुन पटकन माघारी फिरली असेल.. मागच्या आठवड्यात ती पिल्ले हळुच आपल्या आईकडे बघुन घरट्यातुन टुनकन बाहेर आली होती.. जास्त लांब नाही गेली पण थोडे पंखांना बळ देत असल्यासारखे पाहिले त्यांनी .. मग चिऊताईने पुन्हा त्यांना घरट्यात जाण्यास सांगितले नव्हे घरट्यात लोटलेच जणु ... असेच त्यांची शाळाच जणु अजुन चालली होती.. फांदिच्या टोकावर बसुन ती पिल्ले धडपडत का होईना .. हळु हळु पंखात बळ साठवत होती.. चिऊताई आता मास्तरीन म्हणुन पण एकदम छान दिसत होती.. आज ती पिल्ले थोडे दूर उडुन गेली ... पंखात आकाश सामावण्याचा त्यांच्या इरादा होता हे नक्की... बालगीत झाडावरती घरटे चिऊताईचे ... पानांआड दडलेले.. .... घास भरवती पिल्लांना आपल्याच इवल्या चोचीने पंखाना बळ देती ती छडी हातात घेवुनी ... आकाशा ला मिठीत घेवू ही प्रार्थना तिच्या शाळेची... एक दिवस आला असा .. परिक्षा संपली पटकन चिऊताईची शाळा संपली पिल्ले उडाली भुर्रकन

उपक्रम चांगला आहे. असं लिहून ठेवलेलं चांगलंअसतं. ते परत वाचताना काहीवेळा नवल वाटतं. कधीतरी असही काही आपल्या मनात आलं होतं म्हणून .

In reply to by मनीषा

ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु? ........आणि काय सांगु? नि:शब्द भावना जाणल्या आहेत त्यांनीच घराबाहेरचं मळभ थोपवलं त्यांनी बाहेरच आणि आतल्या प्रकाशावर पडू दिली नाही अंधाराची छाया कधी म्हणूनच तर आहेत त्या माझ्या जीवाच्या जीवलग निश्चिंत आहे मी त्यांच्या सहवासात जगाच्या सा-या तापांपासून दूर कधीतरी वाटतं मलाही पहावं .... काय चाललं आहे बाहेर? मग उघडते मी एक छोटासा झरोका बाहेरचं सारं सारं आत घेण्यापुरता त्यातुनच येतात मग जुन्या नव्या आठवणी काही सुखावणा-या .... तर .. काही रडवणा-या त्यांच्याशी बोलत राहते मी कधी ---कधी त्यांच्याकडे पहात देखील नाही बाहेरचा कोलाहल मला अगदी ----- नवा नवा वाटतो त्यात एखादा ओळखीचा सूरही असतोच त्या कोलाहलाचे अनेक चेहरे असतात ------ मग सगळे चेहरे एकमेकात मिसळतात अन त्यांचा बनतो एकच चेहरा त-हेत-हेच्या भाव-भावनांचे आविष्कार दाखवणारा त्यातून मग अनेक रंग विखूरतात त्यातले काही मला भावतात देखील ... मग मी त्या रंगांना निरखून पाहते त्यांना एक आगळा वेगळा गंध असतो .... तो गंध माझ्या कणाकणात भिनतो मनावर एक अनोखी धुंदी चढते ---- त्या गंधांची ........ त्या रंगांची मग त्या चार भिंतीतलं माझं एकटेपण जणू नाहीसं होतं अनेक भावनांचे रंग... त्यातून तयार होते एक अद्भूत नक्षी कशी माहित नाही ... पण मला ती आवडते त्या नक्षीच्या बिलोरी काचा सा-या घरभर पसरतात त्यावर उन पडून... त्याचे कवडसे बनतात माझं मन मोहून जातं त्या कवडशांना हातात घ्यावं त्यांना जवळून पहावं ... असं वाटतं ...... पण त्यांना हातात घ्यायला मी जाते .... तशी ते माझ्यापासून लांब जातात असा खेळ ---------- कितीतरी वेळ चालतो शेवटी मी थकून जाते एका जागी बसून त्या कवडशांकडे पहात राहते हळूहळू उन, आपली पावलं मागे घ्यायला लागतं तसे सारे कवडसे सुद्धा त्याच्या मागे धावतात मग तिथे काहीच रहात नाही दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो शांत ..... सुस्थीर .... अश्वासक....... मनाला दिलासा देणारा काळोखाला माझ्यापासून दूर ठेवणारा माझं मन शांत होतं पण ते रंगीत ---- नक्षीदार-- कवडसे मात्र हरवूनच जातात माझ्या मनात राहतात मग फक्त त्यांच्या आठवणी त्या आठवणी मी माझ्या मनात जपून ठेवते आता त्या आठवणींना माझ्याकडे यण्यासाठी झरोक्याची आवश्यकता नसते त्या चार भिंतींच्या अवकाशात त्या बिलोरी ... सुंगंधी आठवणी माझ्या, आणि माझ्या एकटेपणाच्या सोबती असतात ..

आठवणींचा बिलोरी आरसा आपल्याकडे असला की कधी पण आपण त्या आरश्यातुन काळाच्या पडद्याला छेद देत त्यावेळेसचे क्षण पुन्हा अनुभवत असतो ... मन आपल्याच भिंतींना झुगारुन कधी मुक्त होऊन जाते ते ही कळत नाही ... आठवणी त्या सुखाच्या बालपणीच्या ... भातुकलीच्या ... बाहुलीच्या केसांसारख्या.. मखमली सोनेरी रंगांच्या... नववारीतील आज्जीच्या गोष्टीतल्या परीसारख्या... अंगणातल्या अबोलीच्या. आठवणी त्या सुखाच्या ... पहिल्या रिकाम्या दप्तराच्या... पाटीवरील पहिल्या अक्षराच्या... आठवणी त्या सुखाच्या.... बालसंवगड्यांशी खेळण्याचा... माळलेल्या गजर्‍याच्या आठवणी त्या सुखाच्या... पाहिलेल्या नजरेच्या... मुक्या स्पर्श भावनांच्या... आठवणी त्या सप्तपदीच्या प्रितीतल्या गोडव्याच्या तुझ्या माझ्या गोड क्षणांच्या आठवणी त्या सुखाच्या ... अवांतर.. ५ मिनिटात काय लिहिले हे पुन्हा न वाचताच देत आहे... लिहायला गेलो गद्य आणि झाले असेच काहितरी पद्य..

उद्या... शिवराज्यभिषेक दिन... सगळे मित्र रायगडाची वाटा चालत आहेत.. मी मात्र आज येथेच ऑफिसात .. आज चतुर्थी पण आहे.. सकाळी पाऊस पडला .. वातावारण खुप मस्त आहे... पण पावसामुळे बाळाला घेवुन या चतुर्थीला मोरया गोसावी मंदिरात सकाळी सकाळी जाता आले नाही... संध्याकाळी जाईन पण .. बाळाला बप्पा खुप आवडतो .... मंदिरात गेल्याने छान वाटतेच.. पण महिन्यातुन एकदा सकाळी एकत्र बाहेर पडायला मिळते ते पण खुप छान ... आजच्या धकाधकीच्या जीवनात, सर्वांसाठी टाईम काढलाच पाहिजे असे वाटते.. मग ते मित्र असुद्या.. फॅमिली असुद्या नाहीतर पर्सनल गोष्ट असुद्या .... मुलांना तर टाईम दिलाच पाहिजे.. प्रत्येक पालकाने हे केलेच पाहिजे.. बाळ मोठे झाल्यावर तर आठवड्यातला एक दिवस मी बाळासाठी रीझर्व ठेवणार आहे.. मग तो शनिवार असेल किंवा रविवार.. पण फक्त बाळाबरोबर.. वाटल्यास बाळाला माझ्यासोबत फिरण्याच्या सवयी लावेल ... बाप झाल्यावर किती गोष्टी बदलतात ना... पहिल्यांदा दुकानात गेलो की मी माझ्या वस्तुंबद्दल विचार करायचो.. मस्त आवडेल ते घ्यायचो .. आजकाल असे होत नाही.. पैसे आले की बाळाला काय घ्यावे असे वाटते.. तीला एखादी फ्रॉक लहान पडत असली की दूसरी आपण बघुन ठेवलेली आता घेवुया असे वाटते... खेळणी.. गाडी..इतकेच काय सायकल ची पण तयारी आताच झाली आहे... खरेच बाप हा मुलगी झाल्यावर पुर्ण बदलतो .. बदलतात त्याचे विचार.. आचार... हे मला आता कळते आहे... जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा माझे वडील तायडी ला बिंधास्त ट्रीप ला जावुन द्यायचे.. तिचे खुप लाड करायचे.. माझ्या पेक्षा.. तेंव्हा मी आईला बोलायचो ते.. आई माझी होती ना.. तायडीचे पप्पा.. पण आज कळते आहे.. हा नैसर्गिक बंध आहे... कदाचीत बाप झाल्यावर आपल्या बापाच्या भावना आपल्याला जास्त कळत असतील .. असेच असेल...

बरोबर आहे तुमचे. आजकाल ऑफिसमधुन घरी जाण्याची एक अनामिक ओढ असते. ते इवलेइवले हात हातात घेऊन एक गालाचा मुका घेतला व बाळाचे आपल्याला बघुन खुश होणे पाहिलं की दिवसभराचा थकवा कुठे निघुन जातो कळतच नाही. जगातल्या कसल्याही दुखा:चा लवलेश नाही.. चिंता नाही. असे आयुष्य परत जगता आले तर किती मजा येईल असे वाटते. ये दौलतभी लेलो ये शोहरतभी लेलो... गझल आपसुकच गुणगुणायला लागतो. मध्ये ही बाळाला घेऊन गावी गेलेली महिनाभर, तर मन कशातही रमायचे नाही. चातकासारखी बाळाची वाट पाहिली. परत आली तेव्हा स्वारी ओळखायला तयार नाही :( पण लगेच एक दिवसात परत माझ्याकडे छकुली येऊ लागली. मी विचार केला, आत्ताच आपले हे हाल.. अजुन काही वर्षांनी मुलगी मोठी होऊन सासरी जाऊ लागली तर आपले काय होणार. तेव्हा एका मुलीच्या बापाचे दु:ख काय असते याची कल्पना येऊ लागली.

साधुची झोळी का पडली? नदि काठच्या एका गर्द झाडी मधे बसून, तो मन एकाग्र करायचा प्रयत्न करत होता, तिकडुन तो कोणाला सहज दिसत नव्हता, पण तो मात्र बरेच काही पाहू शकत होता, नुकताच वयाच्या सोळाव्या वर्षी विरक्त होउन, त्याने संन्यास घेतला होता, आणि भगवंताचा शोध घेत, दिवसरात्र तो रानोमाळ भटकत होता, अचानक कसल्यातरी आवाजाने, त्याची समाधी भंग पावली, एक लावण्यवती, रमत गमत पाण्याला जाताना, त्याला दिसली, हरणाची चपळाई आणि मोराचा डौल होता, तिच्या पावलो पावली जणु केतकीच्या बना मधून, एखादी नागीण सळाळत निघाली, त्या वेळी त्या दोघांशीवाय, तिथे तिसरे कोणीच नव्हते, तो आपल्याला बघतो आहे, याचे तिला जरा देखील भान नव्हते, तिच्या हातात एक आणि एक कमरेवर एक असे दोन घडे होते, आणि मोकळे लांबसडक केस तिच्या कमरेवरती रुळत होते, इकडे साधूबुवांच्या हृदयाची धडधड मात्र, जोरदार वाढली होती, आता त्या जागेवरुन उठायची सुध्दा, त्यांच्या मधे हिम्मत नव्हती डोळ्यांची पापणी मिटावी, असे ठरवून देखील, ती बंद होत नव्हती दूसरीकडे आपल्या चंचल, कमकुवत मनाची, त्यांना लाज वाटत होती इकडे तिकडे सावध नजर टाकत, क्षणार्धात ती निर्वस्त्र झाली, मासोळी सारखी सुळकन, नदिच्या पाण्यात तिने उडी मारली, मनसोक्त डुंबुन झाल्यावर, ती तशीच ओलेती बाहेर निघाली, अनिमिष नेत्रांनी हे बघणार्‍या साधुच्या, जीवाची मात्र काहीली झाली, हे सगळे कमी होते म्हणुन की काय?, ती इकडेच यायला निघाली, साधुबुवांच्याच समोरच्या झुडपा मागे उभी राहून, अंग कोरडे करु लागली, तिची सूर्यासारखी तेजस्वी नितळ काया, साधुबुवांना अगदी जवळून दिसली, आणि तिच्या अंगप्रत्यांगाच्या गोलाई मधे, बुवांची नजर अडकून बसली, स्वतःच्याच धुंदीत असलेल्या तिला मात्र, कशाचेही भान नव्हते, तिचे ओलसर मोकळे केस, सुर्यकिरण पडून चमचम चमकत होते, तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवातुन, यौवन ओसांडून वहात होते, ते पहाताना साधुमहाराज मात्र, हाताच्या मुठी घट्ट आवळत होते, बर्‍याच वेळा नंतर अखेर, त्यांना मोकळा श्र्वास घेता आला, कारण त्यांच्या समोरचा मोहमायेचा खेळ, होता आता संपला, घागरींमधे पाणी भरुन घेउन, तिने आपल्या गावाचा रस्ता धरला, बुवांनी इतकावेळ नकळत घट्ट आवळलेल्या मांड्या, थोड्या मोकळ्या केल्या, साधुबुवांना आपल्या या निर्लज्ज कृतीची फारच शरम वाटली, तो एक अपघात होता, असे म्हणुन, त्यांनी स्वतःची समजुत घातली, चित्त थार्‍यावर यावे म्हणुन, झोळी मधली पोथी त्यांनी काढली, परमेश्र्वराच्या शोधा कडे, त्यांनी पावले पुन्हा एकदा वळवली, पोटात कावळे कोकलायला लागले, म्हणुन ते गावा कडे गेले, "ओम भवती भिक्षांदेही", असे एका घरा समोर जाउन म्हणाले, याचकाची नजर नेहमी जमिनी कडे हवी, हा नियम ते विसरले, आणि भिक्षा घेउन येणारी स्त्री पाहुन, त्यांचे देहभान हरपले, ती तिच होती, जिला त्यांनी नुकतेच नदिवर पाहिले होते, आता तिने कपाळावर कुंकु गळ्यात मंगळसुत्र घातले होते, सुरेखसा गजरा माळत, केसही तिने निटनेटके बांधले होते, जणू बुवांच्या समोर साक्षात सरस्वतीचेच प्रतिरुप उभे होते, "महाराज भिक्षा घ्यावी", नमस्कार करत ती म्हणाली, बुवांच्या छाती मधली धडधड, पुन्हा एकदा वाढली, पायातली शक्ती गेली, हातातली झोळी खाली पडली, तिच्याकडे न पहाता, बुवांनी तिकडून जोरात धुम ठोकली, एका खोल कड्याच्या टोकावर, स्तब्ध पणे साधुबुवा बसले होते, हे असे का झाले?, याचा विचार करताना, स्वतःलाच हसत होते, कारण विचार करता करता, त्यांच्या हेच लक्षात आले होते, "देव आहे चराचरी" हे तत्व, त्यांना नीटसे समजलेलेच नव्हते, "पुनश्र्च हरी ओम" असे म्हणत, त्यांनी ध्यानासाठी डोळे मिटले, त्यांच्या डोळ्यासमोर, पुन्हा एकदा तेच नदिवरचे दृष्य उभे ठाकले, पण यावेळी, त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मित, जराही नाही ढळले, एका तटस्थवृत्तीने, ते आपल्या मनाच्या या खेळाकडे पाहु लागले. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अप्रतिम ! अशी तटस्थं वृत्ती प्राप्तं झाली- म्हणजेच त्या साधुबाबांची साधना सफल झाली.

@ पैजारबुवा ... समरसता ही मनाची एक कला आहे.. या कलेचा आनंद जोपर्यंत माणसाला घेता येत नाही.. तो पर्यंत त्याला जीवन जगणे म्हणजे काय हे कळालेच नाही असे वाटते...

In reply to by गणेशा

आधीं दृश्या सोडिलें । मग सुन्यत्व वोलांडिलें । मूळमायेपरतें देखिलें । परब्रह्म ॥ - रामदास स्वामी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वाः बुवा वाः लिहिणारे समर्थ तर ग्रेटच पण हा इतका दुर्मिळ आणि अर्थपूर्ण श्लोक लक्षात ठेवणारे तुम्ही पण ग्रेट!!! हा श्लोक पाठ करत आहे.

देवावरती विश्वास ठेवावा की न ठेवावा ... हा मुद्दा वेगळा.. पण माणसांच्यात..मुलांच्यात ..कामात.. मित्रांच्यात सदभावनेने जो वेळ घालवाला जाईल तोच देवपुजेचा अर्थ असावा असे माझे मत आहे.. देवपुजेच महत्व त्यामुळे नक्कीच कमी होत नाही.. स्वता लहानमुलासारखे जगणे थोडे मुस्किलच आहे, या जीवनात फक्त साथ देवुन नाही तर त्याबरोबर योग्य गरज निभावने पण तितकेच मोलाचे ....आणि गरजेला पैश्याची निकड लागतेच.. मग व्यवहारी जगणे आले.. आणि मग पुन्हा कायम, आपल्या मुलांच्यात ही लहान होउन जगता न आल्याचे शल्य पण .. त्यामुळे मुलांशी मैत्रीपुर्ण वागताना लहान व्हायचे.. आनंद साजरा करायचा अगदी त्यांच्याच पद्धतीने.. पण नंतर पुन्हा व्यवहारी बनायचे.. बहुतेक हे असेच करावे लागत असेल जगताना... कदाचीत त्यामुळे निदान अपेक्षांचे शल्य तरी नाही बोचणार .... अपेक्षांचे ओझे आपणच आपल्यावर टाकत जातो .. बहुतेक आपण विचार जास्त करतो .. त्याचेच हे ओझे.. मग आपण जर विचार जास्त करतो तर आपण लहान कसे होऊ .. मग विचार करने सोडुन ही देता येत नाही... हे असेच असते.. अनेक प्रश्नांचे उत्तर आपण एकच करुन ठेवलेले असु शकते.. त्यामुळे उत्तरे बदलायला .. निटसे पुन्हा उत्तरे सुधारायला लागलेच पाहिजे ....

आत्ताच.. पाउस, ती आणि मी चा भाग १ वाचला आणि थोडे मनाशीच बोलावेसे वाटले.... च्यायला, या असल्या कथा वाचल्या की आमचे काय होते काय माहित .. सगळ्या कॉलेज च्या आठवणी सरसर डोळ्यापुढे येतात. तिच्या डायरीतल्या शेवटच्या पानावरील या ओळी मात्र लगेच आठवतात "तू अशीच हसत रहा... सर्वांचे मन मोहत रहा... माझी नसताना पुन्हा... माझीच होत रहा... " तिने मला डेडिकेट केलेले हे गाणे मात्र माझे ही आवडते गाणे झाले आनि कायम ऐकतो ... " --- --- आते जाते.. ह्सते गाते..सोचा था मैने मन मे कई बार.. ओठो की कली, कुछ और खिली...ये दिल पे हुआ है किसका इफ्तियार तुम कोन हो.. बतलातो दो.. क्यो करने लगी मै तुमपे एतबार खामोश रहु .. या मै कह दू .. या कर लु मै चुपकेसे ये स्विकार यही सच है शायद मैने प्यार किया हा हा तुमसे मैने प्यार किया ... " आठवणी या अश्याच असतात.. प्रेम प्रत्येक वेळेस सफल होईल असे नाही.. पण माणसाने आपल्या नजरेत कधी पडु नये असे मला वाटते.. कोण कधी कोठे असेल .. आणि आयुष्यात फिरुन कधी भेटेल हे सुद्धा सांगता येत नाही .. माणसाने माणुसकीने जगले पाहिजे.. भले एकत्र असु नाही तर नसु.. स्वाभिमान मात्र माणसाने कधीच गहान टाकु नये.. आजकालच्या प्रेमात पडलेल्या पोरांकडे बघुन एक खिन्न भाव समोर येतो .. काय ते लागट ..लाचार.. मागे मागे फिरणे.. प्रेम हे असे नसते.. तुम्ही कसे ही असा.. मनातुन कसा आहे हे महत्वाचे..... स्वाभिमानाने प्रेमात जगलेले दिवस आठवले की अजुनही छान वाटते..... त्यानंतर सर्वांचे ब्रदर टाईप मटेरीअल असा आलेला उल्लेख ही आवडला.. कारण नंतर मी कधी मुलींवर प्रेम केलेच नव्हते.. आमची ही आयुष्यात येई पर्यंत.... आणि अचानक ब्रदर टाईप मटेरीअल चे .. हीच्या साठी हजबंड टाईप मटेरीअल मध्ये रुपांतर झाले हे कळलेच नाही...

आज १० जून. १० -१२ दिवस ह्या थ्रेड वर पहिले लिहायचे असे ठरवले होते... मस्त झाला हा थ्रेड .. विशेषकरुन पैजारबुवांचे रिप्लाय जास्त भावले... नविनच काही सदस्य येथे लिहिलेले पाहिलेले.. खुप छान लिहिले त्यांनी एकदम आवडले... विशेषकरुन बाबुदादा आणि भाग्यश्री यांचे लिखान मस्त झाले.. इतर ही सर्वांनी खुप छान लिहिले आहे... सर्वांचे आभार या धाग्यावर आनखिन लिहावे असे वाटत आहे.. परंतु कदाचीत थांबावे लागेल.. बघु.. आज तर लिहिल मात्र..

मी सुख आणि समाधान वेगळे माणतो ... सुख हे स्वःमर्यादीत असते... समाधान मात्र सार्वभौम असते... सुख म्हणजे माणासाने स्वतासाठी... स्वताच्या आनंदासाठी केलेल्या गोष्टी... समाधान म्हणजे फक्त स्वताचेच नाही तर इतरांचा ही आनंद जाणुन त्या दृष्टीने केलेला प्रवास असतो ... माणुस समाधानी असेल तर तो सुखी असतोच .. परंतु तो सुखी असेल तर तो समाधानी असेलच असे नाही... संत महात्मे हे समाधानी होते... अनेक राजे सुखी होते.... रानात दिवसभर राबणारा..हिरवं जीवन फुलवणारा... दिवसात भाकरी-तुकडा जो मिळेल त्यात पोट भर खाणारा शेतकरी सुखी नसला तरी समाधानी असु शकतो ... आणि एसी मध्ये गलेलट्ठ पगार घेणारा माणुस.. चारचाकी.. ऐशोआरामात आयुष्य काढणारा माणुस सुखी असेल पण समाधानी असेलच का हे सांगता येत नाही... सुख हे कधीच संपत नाही.. प्रत्येक सुखाच्या शेवटी दूसर्या सुखाचा माग दडलेला असतो ... आणि मग माणुस आपसुकच त्यावरुन चालत राहतो.. कदाचीत त्याचे ध्येयच त्या मार्गावरुन मार्गक्रमण करत असते... समाधान तसे मनाला संतुष्ट करुन जाते... ते मनाला कधीच सुखाच्या मागावर धाडत नाही.. शेवटी माणासाने सुखी आणि समाधानी हे दोन्ही व्हायचे ठरवले तर त्याने समाधानी आधी व्हावे... नाही तर सुखाचे अनेक प्रवास करुन ही त्याला समाधाचा अर्थ काही सापडत नाही असे वाटते.

In reply to by गणेशा

पूर्ततेचे निकष अपेक्षा म्हणजे समाधान म्हणजे लाहान मुलानी बर्फाचा गोळा मागीतला किंवा फुगा मागीतला आणि त्याला तो मिळताच रडणे बंद झाले तर आपण उस्फुर्तपणे म्हणतो "झाले ना समाधान" म्हणून सूख हे सापेक्ष आहे. परीस्थीती,मनुष्यस्वभाव्,सामाजीक्,आर्थीक स्थिती.म्हणजे ज्याला दोन वेळेच्या खाण्याची मारामार त्याला निवासी वॉचमनची नोकरी मिळाली अगदी खाऊन्-पिऊन तर तो समाधानी असेल पण सुखी असेलच असे नाही कारण पुर्वीची रिकाम्टेकडी उनाडकी आता करता येत नसेल. अश्या वेळेला वाटणारी खंत्/असमाधान हे आधिच्या परिस्थीतीशी तुलना केल्याने आलेली असते. ज्यानी वारंवार नोकरी बदलली त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल. समाधानी असलेच पाहिजे पण समाधानी वृत्तीचा अतिरेकापोटी आणि "ठैविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान" याचा चुकीचा (सोयीस्कर) अर्थ लावून आळशीपणा+आपले सामर्थ्य न तपासण्याचा धोका वाढतो. समाधान हे कशाशी तुलना करणारे नसेल तर ते जास्त उपकारक निर्भेळ अस्ते. आनंदाचा पाया समाधान असेल तर त्याच्याप्रती तटस्थता येणे हे सुखाच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे. हा सर्वात निसरडा आहे. कारण यातच सुख मिळते असा भ्रम झाला की मन पुनःपुन्हा तेच मागते. अगदी आवडीचे जेवण-सिनेमा आपण सतत दोन्-तीन दिवस खाऊ-बघू शकत नाही म्हणजेच समाधान्+आनंद हा त्या क्षणापुरता असतो त्या सुखद क्षणांची उजळणी आठवण येणे म्हणजे तो क्षण जगणे. गणेशा जेव्हा कॅमेर्याचा शोध लागला नव्हता किंवा तो जास्तच महागडा होता तेव्हा आपण लग्न्+सहल्+वाढदिवस साजरे करीत नव्हतो का ?करीत होतो पण ते क्षण टिपण्याच्या नादात समारंभाला आलेल्या लोकांशी धड नीट बोलता येत नसेल तर नक्की सोय की गैरसोय हे ठरविण्याची वेळ आली आहे. म्हणून सुख-समाधान आणि आनंद याबाब्त कुणाचेही लगेचच एक्मत होणार नाही.

आज १० जून, आयुष्याची नविन सुरुवात ... आज ३३ पुर्ण झाले... विश्वास बसत नाहिये ... दिवस किती फास्ट चालले आहेत ना.. आयुष्यात काही भरीव करुन मागे आपले नाव ठेवुन जावे असे काही मनात नाहिये... पण सहज मिळुन गेलेले आयुष्य सुखा समाधाना ने जगुन जेव्हडे क्षण मिळाले ते निट उपभोक्ता/जगता आले पाहिजे असे सामान्य माणसा प्रमाणे मला वाटते... पण हा वेळ असाच इतका पटकन निघुन गेला तर आयुष्य जगायचेच राहिले अशी बोच आयुष्याच्या शेवटी वाटत राहिल काय असे सहज वाटुन ही वाईट वाटले... आयुष्यात माणसाने आपल्याला सर्वात जे आवडते ते तरी मनसोक्त करावे असे वाटते... मला फिरायला आवडते.. निदान निटसे .. निरोगी आयुष्य आहे तोपर्यंत मनसोक्त फिरुन घ्यायचे ठरवत आहे..... काय माहीत उद्या चाळीसी नंतरच उडेल बल्प झालो तर .... ? असो... आज आनंदाचा दिवस आहे.. चांगलेच विचार करु या... पुढच्या वर्षी लेह - लडाख ट्रीप मनाशीच फिक्स करतोय .. निसर्ग माणसाने निसर्गात जावून अनुभवावा असे मला नेहमीच वाटते... निसर्ग कागदावर--शब्दातुन कधीच अनुभवता येत नाही... माणुस फक्त वाचुन --चित्रात पाहुन फक्त मनाची कल्पना करुन घेतो की आपण तो अनुभवला ..आणि आनंदी होतो.. निसर्ग जोपर्यंत डोळ्यातुन आत उतरत नाही तोपर्यंत त्याची नशा कळत नाही असे वाटते... आज बुधवार , सुट्टी नाहीच... त्यामुळे शनिवार/रविवारी बायको बरोबर लवासाला जावूया म्हणतोय .... नोव्हें-डिसेंबर मधील ट्रीप सुद्धा राजस्थान/सिंधुदुर्ग हे फायनल केले पाहिजे... बहुतेक कोकणच करावे.. म्हणजे लेह साठी पैसे पुरतील .... असो.. प्रत्येक १० जून ला असेच अनेक प्लॅन फायनल होत राहतात.. काही पुर्ण होतात.. काही तसेच मनात घर राहुन राहतात...

@ नाद .. कॅमेर्‍याचा शोध.. मोबाईलचा शोध ही क्रांती आहे.. पण त्याचा अतिरेक वाईट ... जुन्या स्मृती जपुन ठेवाव्यात म्हणुन कॅमेराचा उपयोग योग्यच.. पण माणुस आजकाल हे विसरत चालला आहे हे मान्य...अतिरेक वाईटच.. समारंभ माणसे महत्वाची.. त्यांच्याशी बोलणे महत्वाचे की वेगवेगळ्या अ‍ॅंगल ने फोटो काढत बसुन वेळ घालविने महत्वाचे हे ज्याने त्याने ठरविले पाहिजे... पण याचा अर्थ कॅमेरा - मोबाईल वाईट नाही तर तो हाताळण्याची आपली पद्धत चुकीची आहे हे मान्य करावे लागेल... " ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान..." याचा चुकीचा अर्थ लावुच नये.. मुळात आळशी रहा असे हे वाक्य सांगत नाहिये ... ते सांगते आहे.. जसे आहे तसे आनंदी रहा.. सुखाच्या मागे न लागता निरपेक्ष आयुष्य जगताना समाधानी रहा... सापेक्ष आवडीनिवडी म्हणजे सुख ही नाही.. समाधान ही नाही... आनंदाचा पाया समाधान असावा.. हे अगदी योग्य.. असे असेल तरच तो माणुस समाधानी होतो .. कुठल्याही व्यक्तीसापेक्ष आवडीनिवडीतुन समाधान मिळत नसते.. कदाचीत ते सुख असु शकेल पण ते क्षणिक असते.. लहानपणी.. अगदी पिवळ्या धम्मक गवतातुन फुलपाखरांचा वेध घेणे पण मनाला समाधान देत असे.. तेंव्हा आनंद -समाधान या गोष्टी म्हणजे नक्की काय हे माहित ही नसत .. पण मनाचा एक निर्लोभ पणा.. इनोसंट पणा तेंव्हा होता.. तश्याच निर्लोप पणाने गोष्टींचा आनंद मिळवत गेले की समाधान मिळते.. त्या निर्लोभ मनाला लोभाचा .. अट्टाहासाचा... अहंकाराचा स्पर्श झाला की त्या मिळणार्या आनंदाला ही अर्थ रहात नाही.. आणि समाधान हे लोभाच्या कक्षेत कधीच येत नाही.... आनंद कदाचीत क्षणिक त्या घटकेपुरताच मर्यादित असु शकतो ... पण त्यातुन मिळणारे समाधान हे चिरतरुन असु शकते... कोणाच्या आयुष्यात उपयोगी पडण्याचा आनंद त्या क्षणांमध्ये मिळत असेल.. पण त्या आनंदी क्षणांमुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात आनंद दिला हे समाधान चिरतरुण असेल.... शेवटी आनंद-सुख - समाधान-- ह्या बाबत प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असेल नाही असे नाही.. पण आयुष्यात माणुसकीने जगणे तर आपल्या हातात आहे.. त्यातुन काही नाही निदान थोडेसे समाधान मिळतेच

अतिशय सुरेख आहे हा धागा! पैजारबुवा, मिका, गणेशा, रातराणी, जकुसर सगळ्यांचे प्रतिसाद सुंदर आहेत फार..

खिडकित उभा राहीलोय । बाहेर मस्त ओलसर मातीचा अन त्यावरून येणार्या अलगद वारयाच्या झुळुकेचा आस्वाद घेत । निव्वळ रातकिड्याञ्च्या आवाज सोडले तर बाकी काही नाही । बस फ़क्त आपण 'एक' आहोत ही एक जाणीव । बस :)

@ प्रगो.... आपण 'एक' आहोत ही जाणीवच खुप आनंददायक असते ना.. मग भले आपण हे निसर्गा ला उद्देशुन म्हंटलो असेल... मित्रांना उद्देशुन म्हंटले असेल किंवा लाडक्या प्रेमिकेला म्हंटले असेल... ही जाणीव जीवनाला एक पुर्णत्व प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करते... कधी कधी मात्र एकांतात ... रात्री रातकिड्यांच्या अवाजात.. अंधारात .. मन त्या अनामिक पोकळीला... त्या अल्हाददायक पण एकट्या असणार्‍या वातावरणाला उगाच छेद देत जाते... आणि मग ती अल्हाददायक पोकळी, मनाची जागा कधी व्यापते कळतच नाही .... मग आपल्याला विसर पडतो .. बाजुच्या जगाचा.. आणि एक गुढता निर्माण होते मनामध्ये.. आपण त्या मध्ये कधी खेचले जातो कळतच नाही....

पाउसाची रिमझिम मध्ये मध्ये चालू झाली आहे, मान्सुन उशीरा येणार असे पेपर मध्ये आले असले तरी ७ जून ला नेहमी प्रमाणे पावसाने हजेरी लावली होती... आराध्या झाल्यापासुन चा हा दूसरा पावसाळा... गेल्या पावसाळ्यात मात्र बाहेर फिरता आले नव्हते... यावेळेस ती कसर भरुन काढायची आहे... ६ जूनलाच तीला लोहगड ला घेवून गेलो होतो..दुडूदुडू पळत होती खुप... पवना डॅमला जायला ७ वाजले होते पण ...धावती भेट दिली होती... पवना डॅम च्या पाण्यात पाय बुडवून खेळण्यात आराध्याला मजा वाटली होती... ती अलगद पोहत आलेली बदके पण मस्त वाटली... आज १२ जून आणि पुन्हा शुक्रवार आहे, उद्या पुन्हा मावळात फिरायलो जातो आहे.. बहुतेक 'लवासा' ला पण जाईल... लवासाला जातानाचा रोड मला खुप आवडतो.. जाताना खाली आलेले ढग.. .. बाजुला वाहणारी मुठा... शेतात काम करत असणारे शेतकरी.. मस्त वाटते खुप... लवासाला ४ वर्षापुर्वी गेलो होतो ... त्या नंतर ही पहिलीच वेळ ... मन निसर्गाशी एकरुप झाले की मस्त वाटते... तो हिरवाजर्द थंड आल्हाद स्पर्श मनाला मोहहुन टाकतो .. एक नविन टवटवी घेवुन मन पुन्हा आनंदाने बागडू लागते...

In reply to by गणेशा

साताठ वर्षांपूर्वीची गोष्ट, ग्रीष्मातले दिवस, ताम्हिणी घाटात गेलो होतो. निव्यापासून पुढे लोणावळा मार्गावर वळलो. कुठलासा आश्रम पार करताच आपला प्रवेश घनगर्द झाडीतल्या रस्त्यावर होतो. नितांतसुंदर रस्ता. झाडांच्या कमानीतून बाहेर येताच सर्वबाजूंनी भले उच्च पहाड सामोरे येतात. डावीकडे कुंडलिका दरी. दरीच्या पलीकडे नाव सार्थ करणारं अंधारबनचं घनदाट जंगल. कुंडलिका नदीचा उगम ह्या दरीतून. ही दरी सांधली गेलीय ती ह्या नदीच्या उगमाशी. सिनेर खिंडीत. ह्या दरीलाच लागून एक लहानसा तलाव. पिंपरी तलाव. पावसाळ्यात तर हा परिसर अक्षरशः स्वर्गच असतो. अनाघ्रात सौंदर्य. तलावापाशी थोडा वेळ थांबून पुढे निघालो. भोवताली भले उंच कडे, उजवीकडे अधूनमधून चमकणारं मुळशीचं पाणी, उंच सखल, सतत चढउतार असणारा अतिशय खराब रस्ता. उन्ह अगदी रणरणत होतं. वाटेत करवदांची जाळी. करवंद खात खात जीवाभावाच्या मित्रांशी गप्पा मारत बसलो होतो. . उकाडा मात्र अगदी प्रचंड होता. अचानक मळभ दाटून यायला लागलं. सोसाट्याचा वारा सुटायला लागला. सभोवतलाच्या डोंगररांगांना ढगांची सावली अगदी वेगाने पुढे पुढे सरकून व्यापून टाकू लागली. पावसाची लक्षणं दिसायला लागली. ह्यावर्षीचा पहिलाच वळीव. भांबर्ड्याचे सुळके ओलांडून ढगांच्या लाटा वेगाने गिरिशिखरे आक्रमू लागल्या. आभाळ गर्जू लागलं, विजा कडाडू लागल्या. पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. ओल्या मातीचा वास घमघमू लागला, पक्ष्यांची पळापळ होऊ लागली, गुरं हंबरू लागली. थोड्याच वेळात थेंबांचं रूपांतर कोसळत्या जलधारांत झालं. अशा पावसात झाडाखाली उभं राहणं फार धोक्याचं. ते टाळून आम्ही पावसात भिजू लागलो. ह्या वर्षीचा चिंब करणारा पहिलाच वळीव. पाऊस नुसता धुव्वाधार कोसळतोय. आजूबाजूच्या डोंगरांतून पाण्याचे ओघळ वाहू लागलेत. गाराही टपटपू लागल्यात. वास्तविक गारपीट तशी ऐन सह्याद्रीत दुर्मिळ. ती शक्यतो मोकळवणात होते. पण ते आज इकडील दर्‍याखोर्‍यांतही अनुभवायला मिळतंय. आता तापलेली धरती थंड होतेय. सुखद वारा वाहू लागलाय. वातावरणात मस्तसा गारवा पसरलाय. धूळभरलं वातावरण स्वच्छ होतंय. सालतर ओल्यांडल्यावर दिसणारा कोरीगड नुकत्याच पडलेल्या पावसामुळे चमकून उठलाय. ग्रीष्म संपत आलाय. लवकरच आता मृग सुरु होईल. वळवाचे दिवस जाऊन खर्‍या अर्थाने पावसाला सुरुवात होईल. चोहोंकडे हिरवं हिरवं होईल... a

In reply to by प्रचेतस

कातरवेळी किनार्‍यावर फिकट वाळू अन स्तब्ध माड उभे स्तब्ध गढूळ सागर अन आभाळही भरलेले पाखरे घरट्यात परतलेली आणि थांबलेला वारा अवघे अस्तित्व जणू वाट पहाणारे अधीर, अपेक्षेत कसल्या अन अचानक अवघे चैतन्य सळसळून येते झावळ्यांतून कुंद आभाळातून मेघांना दूर सारीत येते एक लवलवती वीज वार्‍याला सापडतो त्याचा वेग आणि थेंब येतात नाचत वार्‍याचे बोट धरून तापलेली वाळू थंडावते मायेने स्वागत करते त्या पहिल्या वहिल्या थेंबांचे

In reply to by प्रचेतस

कीती सुरेख वल्ली... मला माहीती होते तु खुप सुंदर लिहिशील... शब्दन शब्द चित्र डोळ्यासमोर उभा करतोय.. (एकोळी रिप्लाय देणार नव्हतो पण रहावले नाही... तरी ही प्रेरणा घेवून परवा फिरुन आलो त्याबद्दल थोडेशे लिहितो... )

.. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर.. ** आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडे जीवा प्राणांतिक भूल ** नात उमलाव अस, घेऊन समर्पणाची जोड, मनी रुजावी कृष्णाच्याही, सखी राधेची ओढ

१३ जून, मान्सुन पुण्यात दाखल झाला... आणि आम्ही त्याला घ्यायलाच जणू मावळात वेशीवर गेलो होतो .... जातानाच पावसाच्या प्रतिक्षेत असलेला मोर दिसला आणि मन आनंदून गेले... ढग रस्त्यावर आले होते.... सगळीकडे पांढर्‍या धुसर रंगाची पाखरण होती... मध्येच हलकेशी हवेची सुखद गार मिठी बसत आणि अंग रोमांचित होत होते.. सगळा निसर्गच जणू त्याच्या प्रतिक्षेत दंग झाला होता.. आणि आम्हा दोन मित्रांच्या लेकी त्या सुंदर वातावरणात काय निरागस पणे बोलत होत्या माहित नाही... निसर्ग माणसाला निरागसपणाचे ही लेण देत असावा असे वाटते... आणि थोड्या वेळाने आम्ही लवासा ला गेलो ... पोहचताच पाऊस ओ देवून धावून आला... मी आणि आराध्या येथ्थेच पावसात भिजलो... आराध्या बरोबर पावसात भिजण्याची ही पहिलीच वेळ.. पहिलाच पावसाळा... खरेच मन खुप प्रसन्न झाले... माणसाने निसर्गाचे स्वामित्व पत्करावे आणि त्याच्या सावलीत खुशाल वेळ घालवावा.. कसलीही चिंता न करता.. मित्रांना नर्गिस-राजकपुर सारखा फोटो हवा होता.. तो काढुन दिला... आम्ही मग ठिक आहे.. काढ बाबा आमचाही फोटो असे म्हंटले... खरे तर निसर्ग अनुभवताना फोटोचे ते असे काय अप्रुप.. पण बाळाबरोबरचे आठवण .... परत येताना वाटेतील स्थानिक लोकांशी बोलत होतो.. काय तो गोडवा भाषेचा... एका आज्जींकडील सगळे गोड आंबे त्यामुळे विकत घेतले... काय अविट गोडी आंब्यांना पण आणि त्या बोलण्याला... निसर्गात मानुस ही असाच त्याच्या सारखा निर्लेप .. निकोप असतो असे माझे म्हणणे झाले आहे, निसर्गात कुठे ही जा.. ही गोडी.. ही माणुसकी अनुभवण्यास मिळतेच... सईशा - आराध्या.. एक निरागस ठेवा 1

प्रत्येक वीकएंड ला फिरायला जायचेच असे बर्याच मान्सुन मध्ये ठरवत असतो... पण बर्‍याच वेळा ते शक्य झाले नाही.. या वेळेस मात्र पुन्हा तसा प्रयत्न करत आहे.. बघु कितपत यश येईल... प्रोजेक्ट चे टेंशन वेगळे आहे ते आहेच... कधी कधी वाटते... आपल्याकडे भरपूर पैसा असता तर ही नोकरी केलीच नसती.. मस्त मनमुरादपणे आयुष्य जगण्यात पण वेगळीच मजा असेल नाही ? पण मग दूसरे मन विचार करते, मग आपल्याला संघर्षाची जाणिव राहिली असती का ? असो .. काहीही असो.. याक्षणी तरी मला भरपुर फिरायला मिळत जावो बाकीचे काहीच नको अशीच भावना आहे... बाहेर डोंगराने हिरवी वस्त्रे परिधान करायला सुरुवात केली आहे... सूर्याचा मेघांबरोबर लपंडाव खेळण्याची सुरुवात झालेली आहे... शाळेला रेनकोटमध्ये जाणारे ती इवलीशी पोरे आता पुन्हा रस्त्यावरती दिसत आहेत.. पाऊस कीती छान असतो ना सुंदर सुंदर आठवणी घेवून येणारा.. सुंदर आठवणी मागे ठेवून जाणारा...

आज कशातच मन नव्हते.. सगळ्या चिंता आ वासुन पुढे उभ्या राहिल्या होत्या.. होम लोन सोडुन बाकी सर्व देणे.. EMI.. बंद करण्याच्या खटपटीत ही खुप हाल झाले... नव्हे अजुन चालु आहेत.. कधी एकदा सुटतोय असे झाले.. प्रोजेक्ट सोडलाय पण पुण्यातली ट्रान्सफर कुठे रखडली आहे काहीच कळेना... कधी कधी असे होते... पहिल्यांदा वाटत होते.. लोन घेतल्याशिवाय .. थोडी रीस्क घेतल्याशिवाय आयुष्यात पुढे कसे जाता येइल... थोडी रीस्क तो लेना पडेगा... आणि हळु हळु त्या पाशामध्ये कधी अडकलो ते कळलेच नाही.. ते पाश सोडवताना नाकीनऊ येत आहेत.. पण नक्कीच यातुन बाहेर पडेल... मध्यमवर्गीय माणसाचे असेच असते... थोडेसे ठीक झाले की त्याला पुढच्याची हाव सुटु लागते.. आता विचार पक्का केलाय बस्स.. काही ही घेतले तरी नो EMI. अगदी 0 % व्याजावर पण कर्ज नकोच... गाडी घ्यायचे चालले होते.. डायरेक्ट २ वर्षे पुढे ढकलले आहे, जेंव्हा सगळी कॅश असेल हातात तेंव्हाच गाडी.. सुखी राहण्याचा आताशा हा एकमेव मार्ग वाटत आहे.. नाहीतर पगार हातात पडला ना पडला की लगेच कुठल्या EMI चे कीती पैसे हा हिशोब सुरु होतोय...आता या हिशिबाचाच हिशोब करुन टाकणार आहे एकदाचा.. खुप झाले... घराची खालची रुम पण भाड्याने दिली... मित्रच आहे.. घरघुती डबा पण चालु केला.. तितकेच महिन्याला ६००० मिळतात... आता जमेचाच व्यवहार करायचा.. बस्स.. आणि जे असेल त्यात जगायचे.. कर्जावर तोरा मिरवण्यात काहीच अर्थ नाही... घर ही आतुन कर्जावर भरायचे नाही... तुर्तास कोणाचे तरी एक वाक्य मला खुप आवडले होते तेच आता खरे वाटत आहे... " beauty lies in the emptiness"

हल्ली मला काही सुचतच नाही, किती वेळ पाहत राहते मी कोर्या वहीकडे, समासाची लाल रेष काही केल्या ओलांडता येत नाही, म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही! मला असते गुंफायची सुंदर आठवणींची शृंखला, कितीदा ठरवते नाही पाशात अडकू द्यायचे मन वेडे, पण धागा तुटू न देता हा गुंता काही सुटत नाही, म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही! उधाणलेला समुद्र मी लपवते माझ्याच आत, किती टाळणार हा अपूर्णतेचा प्रवास पूर्णत्वाकडे? किनार्यावर सापडलेला शिंपला मला टाकताही येत नाही, म्हणून मला हल्ली काही सुचतच नाही!

कोरी वही पण आज काल अशीच बाजुला पडलेली पाहिली की मन विषिन्न होते नाही... नाही मनात खुप असते.. लिहावे.. वाचावे.. पण आजकाल वहीवरती स्वता काही मराठीत लिहिलेल्याही किती काळ लोटला आहे नाही... दुरेघी वरुन एकेरीत आलो... नंतर हाफ स्केप वरुन फुल स्केप वरती आलो... त्या नोट्स.. त्या रेफरंन्स बुक मधुन काढलेले संदर्भ... त्यांची देवानघेवान ... आणि त्या देवानघेवानीत लपलेला एक लाजरा कटाक्ष... आज अशी वही पाहिली की कॉलेजमधील तेसुंडर क्षण मनात तरळून जातात.. मन हळुच कोठे तरी हरवले जाते.. आणि सेजारील वही मात्र अजुन ही तशीच प्रतिक्षेत राहते.. आज काल हे असेच होते...

तेच घड्याळ आणि तीच लगबग तेच शेजारी आणि तीच बकबक तोच युनिफॉर्म आणि तेच बुट तेच प्रश्र्ण आणि तोच काथ्याकुट तीच बाईक आणि तीच गर्दी तोच धुर आणि तीच सर्दी, तीच शटल आणि तेच टेबल तेच सहकारी आणि तेच लेबल तीच बाटली आणि तेच पाणी तोच हेडफोन आणि तीच गाणी तेच डेबीट आणि तेच क्रेडीट तेच साहेब आणि तीच किटकीट तोच संगणक आणि तीच इमेल तेच रिप्लाय आणि तेच एक्सेल तोच फोन आणि तोच मोबाईल तोच पेन आणि त्याच फाईल तेच डबे आणि तेच जेवण तेच गॉसीप आणि तेच भांडण तेच व्हिजिटर आणि तेच ऑडीटर तीच सिक्युरीटी आणि तेच कॉंट्रॅक्टर त्याच नोटीस आणि त्यांची तीच उत्तरे तेच (कळकट) सरकारी ऑफिस आणि)तीच (त्यांची कळकट) दप्तरे त्याच मागण्या आणि तोच रुबाब तीच दारु आणि तेच तंगडी कबाब तीच लसलस आणि तीच बकबक तीच पाकीटे आणि तीच वखवख तोच टिव्ही आणि त्याच मालिका त्याच बातम्या आणि (बातम्या देणार्‍या) त्याच बालिका तेच अंथरुण आणि तेच पांघरुण तीच उशी आणि तेच ढेकुण रोज रोज दिवस रात्र सारेच कसे तेच ते आणि तेच ते काही बदल करावासा वाटला तरी मन प्रचंड घाबरते त्या पेक्षा जे चालु आहे ते ठीक आहे असे मन ठरवते आणि मग पुन्हा सुरु होते तेच ते आणि तेच ते पैजारबुवा,

आमचे नशिब साला साथ देत नाही असेच म्हणावे लागेल.. ट्रान्सफर रीक्वेस्ट अजुन पेंडिंग दाखवत आहे... २६ ला प्रोजेक्ट संपेन.. मग ट्रान्स्फर बोंबलीच .... पुन्हा मुंबापुरी.. ऑन बेंच.... पुण्यासाठी प्रोजेक्ट सोडला.. पण पुन्हा मुंबईचा चांगला प्रोजेक्ट मिळायचा योग आला तर मॅनेजर चे पुन्हा मुंबई हवी होती तर आपल्याच प्रोजेक्ट्ला ये.,.. पण बदल झाला पाहिजे असे वाटते.. त्या साठी रीस्क घेत आहे.. आठ वर्षे झाली तेच ते काम करुन अगदी वीट आलाय.. मागुन शिकुन पुढे गेलेले पोट्टे पाहिले की वाटते.. आपले चुक्याच ... सगळे येत असताना, फक्त आराम आणि तेच ते करत बसल्याने आज आपण अजुनही येथेच आहे.. मनात मात्र थोडी ( जास्तच) भीती आहे, नाहीच मिळाला प्रोजेक्ट तर करायचे काय ? असो तुर्तास तरी बदल हवाय याच गोष्टीवर ठाम आहे.. बघु आयुष्य कुठल्या वळणावर घेवून जाते ते... बाकी आयुष्य तेच आहे...

समुद्राच्या वाळूमधे फतकल मारुन बसलो होतो एकटाच, दूरच्या, सतत रंग बदलणाऱ्या क्षितीजाकडे बघत, कधी आशळभूत पणे, तर कडी दिनवाणे पणाने मी त्या क्षितिजापर्यंत कधी पोचेन याचा विचार करत, त्या क्षितिजाच्या मागे धावता धावता मी इथे पोचलो होतो, पण या समुद्राने माझी वाट अडवून धरली होती, माझ्या आणि माझ्या क्षितिजाच्या मध्ये उभा असलेला तो, मला एखाद्या सैतानासारखा कृर आणि दुष्ट वाटत होता, आपल्या मार्गातल्या या समुद्राचा अडथळा कसा दूर करावा? पोहत पोहत क्षितीज गाठावे? कि एखादे होडके बांधावे ? या विचारात मी गढ्लेलो असताना ,माझ्या पायाशी काहीतरी हुळहुळले मी पाय जोरात झटकला, आणि खालच्या वाळूत बघितले, माझ्या धक्याने एका शिंपला मोडून पडला होता, आणि त्यातून एक मोती घरंगळाला होता, मी तो मोती हातात घेउन निरखून पाहिला, आणि आनंदाने बेभान होउन नाचू लागलो. ज्या समुद्राला मी आतापर्यंत सैतान समजत होतो त्यानेच माझे क्षितीज माझ्या मुठीत आणून ठेवले होते त्या मोत्या मध्ये मला माझ्या क्षितिजाचे सर्व रंग दिसत होते, आणि ते क्षितीज माझ्या खिशात सहज पणे मावत होते चारचार वेळा समुद्राचे मनापासून आभार मानत, मी समुद्राकडे पाठ फिरवून परत चाललो होतो, मोठ्या निगूतिने आपले क्षितीज सांभाळत, ते हरवले तर पुन्हा मिळणारा नाही याचे भान ठेवत, चालता चालता मी सहजच समुद्राकडे म्हणून मागे वळून पाहिले, पहातो तर काय? ज्या क्षितीजाचा पाठलाग करत मी इतकावेळ वाया घालवला होता ते क्षितीजच आता माझ्या मागे मागे येत होते पैजारबुवा,

अगदी खरंय. कधी कधी आपण एखाद्या स्वप्नाच्या मागे धाव धाव धावतो. ते पूर्ण का होत नाहीये म्हणून जगावर चिडतो, दैवाला बोल लावतो. तेव्हा हे लक्षात येतं का की आपलं हे स्वप्न पूर्ण होणारच नाहीये....कारण त्याहूनही कितीतरी सुंदर, काहीतरी खास आपली वाट बघतय. म्हणतात ना की sometimes god's greatest gifts are unanswered prayers.

In reply to by पद्मावति

दुनिया जिसे केहते है जादू का खिलोना है मिल जाये तो मिट्टी है खो जाये तो सोना है... :)

पैजार बुवा ग्र८.. तुमच्या या लिखानामुळॅ पुन्हा लिहावेशे वाटत आहे... तुमचे विचार खुप छान असतात.. I like it

आपल्या नशिबाला नावे ठेवण्यात अर्थ नाही... सर्व काही मिळते आहे.. फक्त जिद्ध हवी... मध्यंतरी पुन्हा पहिल्या सारखे निर्मळ पाहिजेल तसे आयुष्य जगावे म्हंटले आणि तसा पर्यत्न केला.. पाहिजेल तशे फिरलो... न कशाची चिंता.. बॅचलर लाईफ जनु काही.. गावाला भेट दिली.. लहानपणीच्या मित्रांनाही.. त्या गल्ल्या.. त्या पेठा अजुनही ओळखीच्या खाना खुना जपुन आहेत... मैत्रीचा तो ओलावा.. तो गंध अजुनही तिथेच आहे... मग बदलले काय आहे... बहुतेक बदललोय आपण... आपण पळतोय कशाच्या तरी पाठीमागे.. आणि हे असेच चालत राहिले तर काय माहीत माझा देश पण कधी तरी मला असाच अनोळखी झाल्यासारखा वाटेल अगदी माझ्या गावासारखा... काही तरी केले पाहिजे हे नक्की आणि एक ग्रेट न्युज ... रीस्क घेतल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही असे ऐकले होते.. आज तो आनंद होत आहे... बदल हवा म्हणुन प्रोजेक्ट सोडला.. मुंबई सोडुन पुणे हवे पण मिळत नव्हते... आयुष्य आपल्याला कुठे न्हेत राहिल असे वाटत होते... पण सर्व ठिक झाले... आणि पुण्यात प्रोजेक्ट मिळाला.. आता बाळाबरोबर मनसोक्त दिवस घालवता येतील

काहीकाही खुप छान आहे पण अता दवणीय वाटायला लागलं आहे . ह्या भावना बिवनांन्ना काही अर्थ नाही ... निव्वळ निरथक अत्मरंजन आहे ...पण मजा येते काही काही वेळेला पण एरव्ही ... व्यर्थ हे सारेच टाहो | एक हे ध्यानात राहो | मुठ पौलादी जयांची | ही धरा दासी तयांची !!

In reply to by प्रसाद गोडबोले

मुठ पौलादी जयांची | ही धरा दासी तयांची !! असेलही पण मुठ म्हणजे मनगट आणि त्यात मन आहे तस्मात जोपर्येंत मन आहे तोपर्येंत हे सारे मनोव्यापार आहेत.सगळेच विरक्त होऊ शकत नाहीत आणि जे झालेले त्यांना कशाचीही तमा-खंत-खेद-लोभ-आनंद नस्ते!!! बोला सच्चीदानंद विरक्तीप्रभू प्रगो महाराज की जय!

In reply to by नाखु

सगळेच विरक्त होऊ शकत नाहीत
काहीही अवघड नसते त्यात ओ नाखुकाका ! इच्छा असेल तर सगळे जमते , लोकं फक्त मानसिक दृष्ट्या त्या अवस्थे करिता तयार नसतात इतकेच !! Its a choice everyone has to make for himself ... This is your last chance. After this, there is no turning back. You take the blue pill—the story ends, you wake up in your bed and believe whatever you want to believe. You take the red pill—you stay in Wonderland, and I show you how deep the rabbit hole goes. Remember: all I'm offering is the truth. Nothing more. choice कधी तरी निवांत बोलु ह्या विषयावर

हे वाचल आन गावची याद आली. आमच्या गावातबी नागोबुढा व्हता पण त्याले सारे नागोबाजीच म्हणे त्याचा नागोबुढा नंतर झाला. त्याच्या आंगात देवी ये म्हणे. उदबत्त्या फुके, अंगारा दे. म्या कदी तेथे गेलो नाही. आजीन जाउच देल नाही. तसा आमच्या गावात जागो बुढा बी व्हता. त्याले बंदा गाव जागो बुढा म्हणे आजीच एकली जागोबाजी म्हणे. तो टाक्यात पाणी भरे, ढोर बांधून दे. त्याची बुढी साळूबुढी आजी तिले साळूबाई म्हणे. साळूबाइ आजीची समदी काम करे. आजीले कणचबी काम अडल का आजी साळूबाइकडच जाय मंग काम घरातल राहू दे नायतर वावरातल. पाव्हणे आले भांडे घासाले साळूबाइ, पऱ्हाटी टोबाले साळूबाइ, जात्यावर दळाच साळूबाइ, निंदनाले बाया पायजे साळूबाइ, कापूस येचाचा हाय साळूबाइ. जागोबुढा त आता कवाच मेला, आम्ही गाव सोडायच्या आधीच तो मेला. मांग मी आजीले घेउन गावात गेलतो तवा साळूबाइची भेट झाली. तशीच व्हती, लुगड्यात, तिच्या आंगावर झांपर कधी नव्हतच. तिच्या डोयान आता कायीबी दिसत नाही. आमी गेलो तवा तुराटीच कड विणत बसली व्हती. डोये गेले तरी हात थांबत नाही बुढीचा. आजीचा आवाजच वळखला तिन "कोन बाइ व्हय का जी. किती दिसान आल्या बाप्पा" मंग मायाकडे पाहून म्हणली "मोठ्या बापूच पोरग व्हय का?" गाव तर कवाच सोडला. आता त आजी बी नाय रायली, मांगच्या मयन्यात साळूबाइ बी गेली. आमाले तसबी पऱ्हाटी आन तुरीतल काय समजत नाय मंग माया गाव म्हणत जायच तर कोठ आन कशापायी?

निळी गोळी का लाल गोळी? माझ्या पुढे प्रश्र्ण् आहे लाल गोळी घेतल्यावर म्हणे मला सत्य दिसणार आहे माझे शरीर, माझी माणसे, माझे जग, हे काही सत्य नाही हा तर केवळ भास आहे, बुध्दी आणि विचार सुध्दा माझे नाही, मला जे दिसते, समजते, वाटते त्याही पलिकडे एक जग आहे, जे जाणीवा नेणीवा, मन आणि काळ, यांच्याही कक्षे बाहेरचे आहे, एकदा वाटले कशाला पहायचे असले जग, मी इकडेच सुखी आहे भासमान असली तरी या दुनियेत, मी सुरक्षीत पणे जगत आहे उगाच जोखिम उचलून, भलते काही झाले तर? पण गोळी घेण्याआधी, मिळणार नव्हते याचे उत्तर एकदा वाटल की लाल गोळी घ्यावी आणि निळी खिशात ठेवावी पण निळी गोळी खरीच असेल, याची तरी खात्री कशी वाटावी? कितिही नाही म्हटले तरी, मन याच विचारात गुरफटून् बसते कधि लाल, तर कधी निळी गोळी घेउन टाकाविशी वाटते आता ठरवलय् डोळे बंदकरुन, कोणतीही एक गोळी घेउन, एकदाचा, या व्दिधा स्थितीचा अंत करावा पण त्याआधि “तुम्हाला संधी दिली तर कोणती गोळी घ्याल? हा प्रश्र्ण तुम्हालाही विचारुन बघावा बघा जमल तर उत्तर द्या…. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

लाल गोळी तरी काय करते.. ती पुसुन टाकते..'मी' पणाला .. पुसते आवर्तने विचारांची .. भावनांची. जाणिवांच्या सांधलेल्या पुलाला ती उडवुन लावते... आणि अस्तित्वाच्या गहन समुद्रात लोटुन देते आपल्याला. पण खरेच जाणिवांचे बंध इतक्या लेगच झुगारुन द्यायचे का हा प्रश्न उरतोच .. खरे तर जाणिवांच्या पलिकडील अस्तित्व जाणुन ही जगण्याचा अर्थ सापडेल असे नाही. 'मी'..'माझा'.. हा भावच परकेपणाची बीजे आपल्या मनात खोल रुतवुन ठेवत असतो.. आणि त्यामुळे आपल्याला दिसणारे जग हे आपल्या भावनांच्या .. विचारांच्या गर्तेत आपल्या भोवती वक्राकार फिरते आहे असे वाटत राहते. मी पणाला पुसुन .. मना मनांचे बांध सांधणे ह्या जगण्याला ही अर्थ आहेच .. भले संधर्भ नसतील पण म्हणुन हा अर्थ खरा नाहीच हा विचारच लाल गोळी घेण्याचा उद्गम बनतो. पण ही विचारांची स्थित्यंतरे लाल गोळी घेताच लोप पावतील.. आणि सुरु होयील प्रवास सत्याचा .. म्हणुन मला वाटते .. घ्यावी निळी गोळी आणि जगावे जगणे मुक्त .. स्वैर.. स्वछंद..

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी होऊन मेघ काळा शापीत चाललो मी बेभान स्वैर वारा पाचोळा सैरा वैरा पानास आठवांच्या तोडीत चाललो मी निस्तेज देह माझा भावनांचा पसारा दाहक आसवांच्या आगीत पोळलो मी ओल्या अधीर राती झाकोळला आसमंत नागव्या स्वप्नांना जाळीत चाललो मी (नोट : मतला माझ्याच जून्या कवितेतुन सहज आठवला म्हणुन लिहावे का वाटले)

आज पुन्हा सर्व घागा वाचला... छान वाटले. खरे तर आजकाल वेळ मिळत नाही म्हणुन खंत आहेच.. त्यात ८० % मी रिप्लाय द्यायचो आनि १०-२० % लिखान असे माझे मिपावरील धोरण होते.. त्यामुळे खुप छान वाटत होते.. पन आज काल वेळ कमी आहे.. त्यामुळे रिप्लाय तर कोठे नाही पण येथे लिहिणे योग्य वाटत नाही. कधी एकदा वेळ मिळेल आणि सगळ्यांचे लिखान वाचेल असे वाटते.. तरी तोपर्यंत फक्त येथेच मध्ये आधे लिहिल असे वाटते त्याबद्दल दिल्गीरी आहेच

सहज संध्याकाळी तळ्याच्या काठावर बसलो होतो.. पुढे हिरवी झाडे मिरवीत टेकडी उभी होती. सूर्य, प्रकाशाचे दोर समेटुन घेत होता, वारा लाडीक स्वताशीच गात होता.. अंधाराची चाहुल लागुन पाखरे घरट्यात परतत होती.. आणि मला तुझी आठवण आली आई.. आता कीती बदललेत संधर्भ.. अर्थांसहित.. तु तिकडे दूर.. अन मी ? मी गुरफटलोय ह्या जगात, पुर्णता:. अजुनही श्वासांच्या फडफडीमध्ये जगतो आहे संकोचुन. तरीही प्रत्येक गोष्टीमध्ये अजुनही मी माझाच विचार करतोय का ? काय माहीत. पण आई तु तुझ्याशिवाय माझा विचार करत असेच आयुष्य घालवले .. मला का कळाले नाही.. आज तू दूर, तुझी आठवण येते , माझ्याशिवाय तुला कधी सनाला पोळीचा एक घास गोड लागत नव्हता.. माझ्या फोनवरील २ शब्दांसाठी तुझे कान आतुरलेले असायचे.. आणी मी ? मी काय विचार करायचो... शेजारील झाडाच्या उंच फांदीवर .. घरट्यात.. चिमनी तिच्या पाखरांना बिलगत असल्याचे दिसले.. आतुर पिल्ले बेंबीच्या देठापासुन जनु किलकिल करत होती .. माझे ही तसेच झाले आहे .. विचारांच्या गर्तेत मी ओढला जातोय .. सूर्य आता क्षितिजापाशी शेवटच्या घटका मोजत आहे, रंगांची उधळण करुन जाता जाता काळोखाशी आज होळी खेळण्याचा तर त्याचा माणस नसेल ना ? पण काय उपयोग काळोखाच्या खोल गर्भात हे रंग स्वताचे अस्तित्वच विसरुन जातील. अन क्षितिज साम्राज्यावर रातीच्या काळोखाचा झेंडा फडकेल. पण असा विचार माझ्या मनात आज आता का येतो आहे.. ? निसर्गाच्या कुशीत रमनारा मी.. त्याच्या प्रत्येक कलाकृतीवर जीव ओवाळुन टाकणारा मी .. पण.. मी तुझी कुस ही नाही विसरलो आई.. हा, वाटा अस्पष्टश्या झाल्यात पण त्या वाटेवरुन मी पुन्हा तुझ्याकडे येतो आहे.. तुझ्याकडे.. आनंदाचे कारंजे मनात थुई थुई नाचत आहे.. बगळ्यांची अर्धगोलाकार रांग क्षितिजालाही छेद देवून दूर चालली आहे.. समोरील टेकडी शांत आहे. झाडावरील चिमणीच्या पिल्लांची पण किलबील थांबली आहे. आणि त्या निरव शांततेत माझ्या पावलांचाच तो काय फक्त आवाज आहे

सुरेख धागा आहे, पुन:पुन्हा आवर्तून परत वर येतो आहे, आणि प्रत्येक वेळी संपूर्ण वाचावासा वाटतो आहे. सर्वांचे प्रतिसाद वाचनीय आहेत, विशेषतः पैजारबुवांच्या अनेक प्रतिसादांनी बहार आणलीय, हा एक वानगीदाखल... (प्रतिसादांना वाचनखूण देता येईल तो सुदिन!)

खरतर हे कविता मी गणेशाच्या आई या कवितेला प्रतिसाद म्हणुन बर्याचा दिवसांपूर्वी लिहिले होते आणि गणेशाला व्यनी वरुन पाठवले होते . तेच इकडे तुम्हा सर्वांबरोबर शेअर करायचा मोह आवरता येत नाहीये.... आई... आई... आई... आई तु फक्त माझीच आई आहेस ना? आई तो पिंट्या मला वेडा म्हणतो आई आज मला आइस्क्रीम हवेच मी आज आइस्क्रीम खाणारच किती दिवसात तु मला आइस्क्रीम दिलेच नाहीस माझे सगळे मित्र रोज खातात. आई आजचा दिवस मी तुझ्या जवळ झोपु? एकट्याला फार भीती वाटते ग. आई मला खुप भुक लागली आहे काहीतरी खायला दे पटकन आई हे गणित कसे सोडवायचे गं सांगना घरचा अभ्यास केला नाही तर दहा पट्ट्या मिळतात हातावर आई एअहा पैसे दे ना, सगळे जण मधल्या सुट्टीत पेरु खातात आई प्रगतीपुस्तकावर बाबांची सही घेउन दे ना बाईंनी त्यांचीच सही आणायला सांगीतले आहे, तुझी चालणार नाही असं म्हणाल्या. आई रोज रोज पोळी भाजी काय देतेसगं डब्यात, सगळ्या मुलांच्या आया बघ कसे वेगळे वेगळे पदार्थ देतात आई राजुने मला बॅट मारली म्हणुन मी स्टंप त्याच्या डोक्यात मारला, त्याने आधि खोडी काढली होती माझी. आई आज शिरा करशील? किती दिवसात केल नाहीस. आई सायकल मधे हवा भरायची आहे पैसे दे ना आई शाळेतन येताना पडलो, रक्त थांबत नाहीये, खुप दुखतय ग आई आई परिक्षेचे वेळापत्रक आले आहे, अभ्यास पुर्ण होईल ना माझा? आई लवकर जेवायला वाढ उद्या इंग्रजीचा पेपर आहे माझे काहीच वाचुन झाले नाही. आई कोणत्या कॉलेज मधे जाउगं मी काही समजतच नाही. आई कॅन्टीन मधेच खाईन काहीतरी, उगाच सकाळी धडपडत उठुन डबा करु नकोस. आई बाहेरुनच जेउन आलो आहे आज. अग मित्रांनी सोडलच नाही. आई मला ८५% मार्क मिळाले. बाबांना सांग ना पेमेंट सीटची फी भरायला नाहीतर लांबच्या कॉलेज मधे हॉस्टेल मधे रहायला लागेल. आई मला कॉलेजला जायला बाईक हवी. बाकी सगळ्या मित्रांकडे आहे. रोज त्यांच्या कडे लिप्ट मागायची लाज वाटते. आई आज पार्टीला जणार आहे रात्री दार उघडेच ठेव ना. बेल वाजवली की बाबा लगेच उठुन बाहेर येतात. आई कँपस इंटरव्ह्यु मधे माझे सिलेक्षन झाले आहे आता रिझल्ट चांगला लागला पाहिजे. आई कशाला रोज पहाटे ५ वाजता उठुन चहा करतेस. मला झोप नाही येत अभ्यास करताना. आणि झोप आली तर माझा मी करुन घेत जाईन. आई माझा रिझल्ट लागला. मार्क चांगले आहेत. मला लगेचच जॉइन करावे लागेल. आई मी पार्ट टाईम एम. बी. ए. करणार आहे. रोज संध्याकाळी ऑफिस सुटले की लेक्चर असतात. जरा जास्त डबा देत जा. आई ही मुलगी बरी वाटतेय ना? स्वभाव चांगला वाटला मला, चांगली शिकलेली तर आहेच आणि नोकरी पण करते. पण तुला पसंत असेल तरच मी हो म्हणेन. आई तुला आवडेल ती साडी घे, किम्मत बघु नकोस आणि बाबांना सुध्दा सुट शिवायला सांगना. लग्न काय रोज होते का? आई हिच्या आईचा फोन आला होता, आज त्यांच्याच घरी जेवणार आहे, तिची आई मासे फार मस्त करते. आई आम्ही दोघे आज पिक्चरला जाणार आहोत आणि नंतर सिनेमाला. सिनेमा सुटल्यावर तिला तिच्या घरी सोडून मग मी येईन रात्री उशीर होईल यायला. आई तिच्या बाबांनी मॉरीशसची तिकीटे काढली आहेत आमच्या साठी. तिकडून आलो की जाउयाना मग सगळे जण मिळून देवीला. आई आज ती ऑफिस मधुन पसस्पर तिकडे गेली आहे. तिच्या भावाला मुलगी बघायला जाणार आहेत ते सगळे जण. आई आपल्या कडे गुडन्युज आहे. तु आजी होणार आहेस. आई तिच्या बरोबर दवाखान्यात जा ना मला ऑफिस मधून यायला उशीर होणार आहे नेमका आज. आई मला फार आनंद झाला आपल्या बाळाला पाहिल्यांदा कुशीत घेतल्यावर. कसल गोड दिसतो तो इवलासा जीव. आई डॉक्टरांनी सांगीतलय बाळाच्या डोळ्यात काजळ घालायचे नाही, आणि बाळगुटी सुध्दा नको त्यांनी टॉनीक लिहुन दिलय तेच देत जा. आई बाबा गेले तरी आम्ही आहोत ना तुला, अजून तुला तुझ्या नातवाचे लग्न बघायचे आहे. आई बाळ अता मोठा झालाय त्याला उगाच भरवत जाउ नकोस हाताने जेवु दे त्याला. आई आज घरी पार्टी आहे, बरेच लोक येणार आहेत, तु उगाच बोअर होशील, त्या पेक्षा तु तुझ्या कुठल्या तरी मैत्रीणी कडे जाउन बस ना थोडा वेळ आई तुला किती वेळा सांगीतल दादा ला फोन करु नकोस म्हणुन. साधी माणुसकी नाही त्याच्यात. आईवडिलांचे करायला नको म्हणुन तिकडे अमेरीकेत जाउन बसला आहे. महिन्यातुन एक फोन केला की झाली यांची कर्तव्यपूर्ती. इकडे आम्ही मात्र अडकलो आहोत आणि ते तिकडे मजा करत आहेत. उगाच त्याचे कौतुक मला सांगत जाउ नकोस. आई तुला होत नसेल तर नकोना काम करत जाउस त्या बाई ठेवल्या आहेत ना त्यांना सांगत जा. आई मला माहित आहे चार दिवस झालेत तुझा चश्मा फुटलाय तो, मला वेळ झाला की टाकीन दुरुस्त करायला, पण त्या शिवाय तुझे काय अडले आहे? आई एवढा भारीतला टचस्क्रीन मोबाईल घेउन दिला आहेना तुला, हेडफोन लावुन गाणी ऐकत जा ना, तरी तो भिकार ट्रांझीस्टर एवढ्या मोठ्यांदा कशाला लाउन बसतेस, आम्हाला बाहेर टिव्ही सुध्दा निट ऐकु येत नाही. आई किती वेळा सांगीतल तुला आपल्या कडे कोणी आल की लगेच बाहेर येत जाउ नकोस, उगाच आलेल्या पाहुण्यांना बोअर करतेस, ज्यांना तुला भेटायच असेल ते तुझ्या खोलीत येउन तुला भेटत जातील. आई त्या बाईंना सांगत जा ना तुला बेड पॅन द्यायला, डॉ़क्टरांनी काय सांगीतले आहे बेडवरुन खाली उतरायचे सुद्धा नाही. आई मी तुला जरी बघायला तुझ्या खोलीत आलो नाही तरी तुझे सगळे अपडेट्स माझ्या कडे असतात. दर एक दिवसा आड मी डॉक्टरांशी बोलतो. आई समजावुन घे ना, घरात कोणालाच इतका वेळ नाही तुझ्या बरोबर चोवीस तास बसुन रहायला, त्या साठीच बाई ठेवली आहे ना आपण. सारखे त्या बाई बरोबर भांडत नको जाउस. एकही बाई टिकत नाहि तुझ्या ह्या हट्टी स्वभावामुळे. आई तुझ्या वर्ष श्राध्दाच्या दिवशी मोठी देणगी दिली आहे मी अनाथ आश्रमाला आणि तुझ्या नावाने एक स्कॉलरशीप सुध्दा सुरु करणार आहे. आई मी आज निवृत्त झालो. आता मी मस्त मजा करणार आहे. आई आजच चारधाम यात्रा करुन आलो. तिकडुन आणलेला चंदनाचा हारच तुझ्या फोटोला घातला आहे. आई आजकाल मी एकटाच असतो ग एवढ्या मोठ्या घरात. ही पण आता नाहीये आणि बाळ परदेशात नोकरी करतोय. तुझी खुप आठवण येते ग आई. आई बर झाल मी तुझा फोटो जपुन ठेवला ते. निदान गप्पा मारायच्या म्हटले तर फोटों बरोबर तरी बोलता तरी येते. नाहीतर नुसत्या भिंती बघत बसायचा कंटाळा येतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बोअरींग लिखाण. अगदी हळू हळू जमीनीच्या पोटात शिरुन दगड फोडनार्‍या बोअरिंग ड्रीलसारखं. शेवटाला भडभड पाणी येतं, आतून. दंडवत __/\__