Skip to main content

शब्द झाले मोती...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही.. आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले... एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल

वाचने 93746
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

हा तर खजिनाच सापडला. एक नुकतीच केलेली आणि धागा काढू काढू म्हणत राहून गेलेली कविता आता इथेच लिहतो. तशीही तिला कविता म्हणावी का नाही हा प्रश्न आहे. तुझ्या कवितेला माझी ओळख देऊ म्हणतेस? देऊया की.. पण आधी समजू तर दे थोडीशी... तुझी कविता म्हणजे शब्द तोलूनमापून मी म्हणजे शब्दांचा पसारा या पसार्यात कुठे तरी हरवेल तुझी कविता हरवू दे म्हणतेस? पण आधी सापडू तर दे थोडीशी... तुझी कविता म्हणजे लय, सूर तालाच भान मी म्हणजे मैफीलीतला चुकलेला ठेका त्यानं विस्कळीत होईल तुझी रचना होऊ दे म्हणतेस? पण आधी तुझी लय भिनू तर दे थोडीशी... तुझी कविता म्हणजे खोल खोल घाव सहन करण मी म्हणजे शब्दांच्या बुड्बुड्यात वेदनेच बीज पेरत राहणं कधी न कधी फुटून ते तुझी जखम उघडी पाड तील पाडू दे म्हणतेस? पण आधी तिला जरा खपली तर धरू दे ग... तुझी कविताही तुझ्याचसारखी गूढ न अलिप्त मी म्हणजे सगळ्यात गुंतून जाणारा तुझ्या सुटसुटीत कविताही गुंतून जातील माझ्याजवळ गुंतू दे म्हणतेस? पण आधी तुझं रहस्य कळू तर दे जरा..

घरी बरीच झाडे लावली आहेत मी आताशा.. त्यात फुलांचीच जास्त.. हो पांढर्‍या फुलांचीच जास्त.. मला आवडतात पांढरी फुले.. मनाला प्रसन्न करणारी, पारिजात..काकडा..रातराणी..अनंत.. कुंदा...चाफा.. कितीतरी. तुला पांढरी फुले आवडत नसत.. तुला लाल गुलाब आवडायचा.. त्यामुळे लाल गुलाबाची पण एक दोन झाडे लावली आहेत.. परवा त्या गुलाबाला छोटीशी कळी आली होती.. हलकेच हिरव्या आवरणाला बाजुला सारुन बाहेर डोकावण्याची पाकळ्यांची घाई चालली होती.. तो अस्पष्टसा लालसर रंग मोहवुन टाकत होता .. तुला आठवते का जया मी तुला लाल गुलाब पहिल्यांदा भीत भीत दिला होता ते.. तू घेतलेलास पण. आणि त्या नंतर गुलाबी दिवस सुरु झाले .. ते मंतरलेले दिवस .. तासन तास गप्पा .. ते भटाचे कँटीन .. कॉलेज च्या प्रॅक्टीकल साठी असलेला आपला दोघांचा एक काँप्युटर... बरेच काही पण काळ कधीच थांबत नाही.. आपल्या साठी पण तो नाहीच थांबला .. कधी कधी वाटत होते काळाच्या काट्याला घट्ट पकडुन ठेवावे, त्याला पुढे जावुच देवु नये.. आपल्या जगात.. इवल्याशा.. मस्त जगत रहावे .. आनंदात .. कैफात .. पण तो दिवस आलाच, तू दूर जाई पर्यंत मी तुझ्याकडे पहात होतो. अश्रूंनी डोळ्याचा बांध कधीच ओलांडला होता.. बोलायचे बरेच काही होते पण शब्द ओढांआड अडकुन पडले होते..हलकेच वळुन पाहताना रिकामे हात तेव्हडे हालत होते.. गुलाब आता पुर्ण फुलला होता.. मस्तच दिसत होता.. मोहवुन टाकत होता .. आणि तुझ्या डायरीतील त्या शेवटच्या पानावर मी लिहिलेल्या ओळी मला पुन्हा आठवल्या .. "तू अशीच हसत रहा.. सर्वांचे मन मोहत रहा.. माझी नसताना पुन्हा .. माझीच होत रहा ..."

आज संध्याकाळी खिडकीतुन दिसणार्या माझ्या ईवल्याशा आभाळात ढग दाटुन आलेत, लवकर अंधार दाटल्याने आज पक्षी लवकरच घराकडे वळलेले दिसत आहेत.. आज पाउस पडेल असेच वाटत आहे. आभाळ असे भरुन आले आणि पाउस आला की मात्र माझे मन इथे रहात नाही, ते फिरुन येते माझ्या माहेराला..आणि मग आठवणींच्या सरी बरसतच राहतात .. माझ्या माहेराचे ते कौलारु घर..पावसात त्याचा तो लक्ख केसरी रंग दुरुनही अगदी आमच्या शेताच्या हिरव्या बांधावरुन ही उठुन दिसत असे.. त्यासमोर असलेली ती ओलेती पायवाट आणि तीच्यावरती ठिकठिकाणी साठलेले पावसाचे पाणी.. चालताना हळुच पाय दिला तरी मातीचा लाल रंग त्या पाण्यात मिसळत असे.. समोरील अंब्याच्या झाडाचे पाड लागलेले आंबे ही आता पर्यंत उतरवुन झालेले असत.. तरीही कुठल्यातरी पाणांच्या झुबक्यातुन एक- दोन आंब्यांचे दर्शन व्हायचेच.. अन मग ते नक्की कोणाच्या वाट्याला येतील या साठी चढाओढ लागायची. पावसाळा आला की तो शाळा सुरु होण्याची वार्ता घेवून यायचा.. त्यावेळेस अगदी नक्को वाटायचे शाळेत जायला पण आता कळते कीती सुंदर दिवस होते ते. शाळा तशी मोठी नव्हतीच .. दगडी बांधकाम असलेली ६-७ वर्ग असलेलीच शाळा वस्ती वरती होती .. शाळेच्या बाजुला निलगीरीची.. कडूलिंबाची खुप झाडे होती.. सुविचारासाठी मध्येच एक फळा होता .. माझ्या मैत्रीणेचे..माधवी चे अक्षर खुप सुंदर असल्याने गुरुजींनी सुविचार लिहिण्याचे काम तिच्याकडे दिलेले होते . शेताच्या बांधा बांधा वरुन चालत शाळेत जावे लागे.. भाताच्या रोपांची लावणी चाललेली असायची शेतामध्ये.. ती हिरविगार रोपटी .. शेतात घुडग्यापर्यंत रुतलेले ते सर्वांचे पाय .. ते घडूळ पाणी .. बाजुलाच खळखळ वाहणारा झरा .. आणि त्या मैत्रीनीं सोबतच्या गप्पा.. आणि जोराचा पाउस खिडकीतुन आत यायला लागला आणि खिडकी बंद करावी लागली.. छे .. मन खुपच लहानपणींच्या आठवणीतच आधी का जाते तेच कळत नाही... पुढच्या वेळेस पाऊस आला की मी मनाला सांगणार आहे फिरुन यायचेच असेल तर कॉलेजच्या दिवसात फिरुन ये.. त्या अल्लड .. लाजर्‍या भावनांशी गळाभेट घेवून ये.. थोडेसे आईच्या कुशीत आणि बापाच्या डोळ्यातील स्वप्नांच्या दुनियेत फिरुन ये .. "बरसली सर अशी पानात रंग ओले गंधाळता जराशी गंधही चिंब झाले " ------------- गणेशा, २० एप्रिल २०१६

समोरचे झाड आता पार वाळले आहे.. त्याचे एक एक वाळलेले पान अलगद खाली पडताना ही माझ्या मनाला आताशा काहीच वाटत नाही...सुन्नपणे मी सगळे पहात आहे. उन्हाची रखरख आता वाढतच चालली आहे, छतावर लटकणारा पंखा उगाच कुरकुरत फिरतो आहे.. खिडकीतुनही उष्ण हवा आत येत आहे ... मे महीना खरेच खुप बोअर वाटत आहे... मे महीना एव्हडा बोअर वाटेल असे लहानपणी कोणी सांगितले असते तर खरे वाटले नसते .. महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळुन निघाला आहे... लातुर तर पाण्यावाचुन तडफडत आहे.. १९९३ च्या भुकंपा नंतरचे सर्वात भिषण चित्र लातुरकर सध्या अनुभवत आहेत. चिमण्या कबुतरे पक्षी प्राणी पाण्यावाचुन मरत आहेत.. राजकारणी बांधावर आणि शेतकरी फांदीवर असे चित्र रोज गावोगाव दिसत आहे.. पाण्यासाठी मारामारी चालली आहे. आणि टीव्हीवरील लाईव्ह गदारोळामध्ये, राजकारणी.. मेडीया विचारांचे ग्रिष्मार्पण करताना पाणी पाणी करस्तोपर्यंत उगाचच घसा कोरडा करत आहेत.. आणि मी फक्त सगळे शांतपणे पाहुन पुन्हा आपल्या कामाला लागत आहे.. कदाचीत मी मध्यमवर्गीय .. शहरी.. आत्ममग्न.. माणसिकतेचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्या स्वार्थी पणातच पुन्हा दरवर्षी प्रमाणे माझ्या मनाला पावसाची ओढ लागली आहे.. पाउस वारा .. झिम्मड धारा .. हिरव्या कंच टेकड्या .. पांढरे ओव्हळ.. पाणीमय रस्ते .. मन आता चातक बनले आहे.. पावसाच्या एका थेंबा साठी ते खुप आतुर झाले आहे...

आकाशात मळभ दाटुन येत असताना, मनातही तुझ्या आठवणींचे ढग दाटी करु लागतात... आणि बाहेर वाढत चाललेला अंधार मनात देखील परावर्तित होऊ लागतो! पावसासाठी धरेच्या ठायी असणारी व्याकुळता जणु मलाही व्याकुळ करते, आज तरी पावसाशी गाठ पडणार का ही तीची हुरहुर मलाही जाणवू लागते. ईतक्या लांबुन येणारा हा पाऊस जर तीला भेटलाच नाही तर? या विचाराने तो अंधार अजुनच गडद होऊ लागतो... गम्मतच आहे ना! अंधार परावर्तन! विज्ञानाला नाही जमायचे सिद्ध करायला हे! आणि मग अचानक ते बाहेरचे ढग गडगडाट करतात आणि मग कोसळु लागतात जलधारा... सगळी सृष्टी न्हाऊन निघत असताना मी मात्र कोरडाच राहतो त्या वाढणार्या पावसाकडे पाहात! वाट पाहात मनातल्या ढगांनी बरसण्याची, त्या पावसात भिजण्याची, वाट पाहात तु भेटण्याची...

मैत्रीण ... माझ्या घराच्या खिडकीमध्ये उभे राहुन मी आकाशाचा तो इवलासा तुकडा रोज पहात असतो... प्रत्येक वेळेस पाहिले की त्याचे रंग बदललेले असतात.. कधी केशरी.. कधी शुभ्र मखमली .. कधी लोभस निळा ...कधी गर्द पिवळा .. अश्या असंख्य रंगानी तो तुकडा न्हावुन जात असतो.. जणु माझ्याच मनाचे प्रतिबिंब त्यावर पडले आहे काय असे वाटत असते .. कधी सोनेरी झालर लेवून एखादा मेघ हलकाच स्पर्श करुन जातो.. तर कधी काजळासम मेघांनी इवल्याश्या आकाशाचे सुरमई अस्तित्व भरुन आले आहे असा भास होतो. रोज ते समोरील लोभस आकाश पहाताना का कोणास ठावुक त्या इवल्याशा तुकडयावर जणू माझाच हक्क आहे असे मला वाटत राहते. सखे तू ही अगदी तशीच आहे.. त्या इवल्याशा आकाशाच्या तुकड्या सारखी ... तुझे अस्तित्व ..तुझे आमच्या सोबत असणे ..तुझे हसणे .. तसेच तर आहे .. माझ्या सर्व मैत्रीचा परिघ जणू तु व्यापलेला आहे असेच वाटते. आज १ ऑगस्ट, पावसाची बरसात होत आहे.. तू माझ्या खिडकीतून आज दिसत नाहिये, पण पावसाच्या या असंख्य थेंबाची आरती मी स्तब्ध होउन ऐकत आहे.. आणि तुझे ते शुभ्र रुप पाहण्यासाठी मी पुन्हा तुझीच वाट पाहत आहे.. फक्त तुझ्यासाठी. --------------- ही तार्यांची आरास.. फक्त तुझ्यासाठी किरणांची बरसात.. फक्त तुझ्यासाठी हास्यमण्यांची तव, माळ सुरेख शोभती प्रित चांदण्यांची वाट.. फक्त तुझ्यासाठी || पाणांची अल्लड पालखी..थेंबांची आरती मृद्गंध दरवळलेला.. फक्त तुझ्यासाठी सुरमई नयनांची, नक्षीदार सुरेल बंदिश क्षितिजापल्याडची आस..फक्त तुझ्यासाठी || 'पल्लवी'त वसुंधरा, हिरवळ दाटलेली श्रावणफुलांची सुरुवात.. फक्त तुझ्यासाठी फुलली रातराणी, प्राजक्तसडा अंगणी सुगंधाची उधळण.. फक्त तुझ्यासाठी || ------- गणेशा.

In reply to by गणेशा

मागचा महिना दिड महिना सुर्य दिसलाच नाही. सारख आभाळ आलेल असत आणि पावसाची पिरपिर चालु असते. मुंबई सारखा धडाधडा कोसळत पण नाही. डास वाढले आहेत. फक्त मुलच नाही घरातले सगळेच आजारी पडले आहेत. पाउस नाही असे वाटून बिना छत्रीचे बाहेर पडले की हमखास भिजवून जातो आणि छत्री असेल तर ती मात्र कोरडीच घरी येते. भाज्या महाग फळं महाग त्यात आता दुधाचे भाव देखिल वाढले आहेत. त्यात त्या बाईक वाल्यांपासुन जपूनच चालावे लागते. बाईकच्या मागच्या चाकातून चिखलाचे कारंजे उडवत चालवत असतात. जरा दुर्लक्ष झाल की उठलीच खडीची नक्षी कपड्यांवर. पावसाळा म्हणजे नुसती चिकचिक आणि रबरबाट. पण तरी सुध्दा पाउस पडायला पाहिजे. धरणं भरली पाहिजेत तरच वर्षभराच्या पाण्याची सोय होईल. नाहीतर मग आहेच दिवसाआड पाणी. पैजारबुवा,

माझ्या खांद्यावर माझेच मढे घेउन मी गुमान चाललो होतो, पायाखाली पडलेल्या मढ्यांना मी कधी उद्दाम पणे तुडवत होतो, तर कधि कधि मनातल्या मनात मी त्यांच्या साठी रडत होतो, ते निश्र्चल होते आणि माझा भार मी समर्थ पणे वहात होतो, शंढा सारखे जगणारे शंढासारखेच मरतात, त्यांचा अंत असाच होतो, मी शंढ नाही हे सिध्द करण्या साठी मी मात्र जीव तोडून चालत होतो, माझा खांदा दुखत होता, घसा कोरडा होता आणि पायही थरथर कापायला लागले होते, कोणास ठाउक माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी मला अजून किती चालावे लागणार होते, माझा संयम संपला आणि धिरही सुटतो आहे हे माझ्या मढ्याने अचूक ओळखले होते, म्हणुनच खोटी सहानुभूती दाखवत आता माझे मढे माझ्याशी गप्पा मारु लागले होते, अरे शरण जा तो परम दयाळू आहे, तुला नक्की माफ करेल, माझे मढे मला सांगत होते, ज्याला आयुष्यभर नाकारले त्याच्या कडे मदत मागण्यासाठी माझे मन मात्र कचरत होते, पायाखालची वाट अंतहीन वाटत होती, ताकदही फार थोडी शिल्लक होती, नजरेच्या प्रत्येक टप्यावर जिकडे तिकडे पडलेली मुडद्यांचीच रास होती, पाठीला प्रचंड रग लागली होती , पण तरी सुद्धा मान माझी ताठ होती, जे जन्मभर बोललो, जसा वागलो ते सिध्द करयची हीच ती वेळ होती, माघार घ्यायच्या सर्व जागांवर माझ्या हाताने मीच पाचर मारली होती, पाचर ओढून काढली तर त्या जागेवर माझीच शेपटी घट्ट अडकणार होती, निराशेच्या गर्तेच्या सीमेवर असतानाच माझ्या खांद्यावर एक हात पडला, खांद्यावरचे मढे सारखे करुन त्याने पाण्याचा प्याला माझ्या पुढे धरला, पुढचा रस्ता अजूनच खडतर, खाचखळग्यांचा आहे, तो मला म्हणाला, चल माझ्या मागे मागे ये, असे म्हणुन तो भराभरा पुढे चालू लागला, भला दिसतोय, पण आहे तरी कोण? असा विचार माझ्या मनात आला, माझ्या मनातले समजल्या सारखा मागे वळून तो निर्व्याजपणे हसला, एक क्षण फक्त एक क्षण वाटून गेले.... हा बहुतेक देवच आहे, मग आठवले, देव नाही, हे तर आपणच सिध्द केलेले आहे, तो हसून म्हणाला, सगळे समजेल, धिर सोडू नकोस, थोडेसेच अंतर उरले आहे, थोड्यावेळासाठी तरी तू मला तुझा मित्र समजायला काहीच हरकत नाही आहे, आणि तुला म्हणुन सांगतो, मी पण तुझ्यासारखा एक नास्तिक आहे, तुझ्या सारख्यांच्या बरोबर चार घटका घालवणे हा माझा एकमेव विरंगुळा आहे , पैजारबुवा,

गणेशोत्सव संपल्यावर गणेशा प्रगटला म्हणून त्याच्या स्वागता साठी...

माझी प्रेमकथा... अर्थात एकतर्फी प्रेमाची गोष्ट

तिज कवेत घेण्या साठी, उतावळा मी दिनभर ती कुन्तल झटकून गेली, गुंतवळ उडती गावभर गावात जाहली चर्चा, आमच्या अनामिक नात्याची कोणी लोचट म्हटले मला, सय येई कुणा गाढवाची लग्नात तिच्या मी जेव्हा, वाढत होतो मट्ठा तिने हसून पाहिले मजला, अन केली थोडी थट्टा पण मी धीर सोडला नाही, नाउमेद झालो नाही पहात स्वप्ने तिची, मी इमले बांधत राही एके दिनी मला ती, एकटा घरी ये म्हटली बर्‍याच विरहा नंतर, तुझी फारच आठवण आली मज घरात घेउन तिने, दार लावले सत्वर शर्ट काढ म्हणाली अन, पँट काढ ती लवकर मी फेडताच वसनांते, ती मुलास ओरडून म्हणते, दुध नाही प्यायले तर, बघ कसली काया होते पैजारबुवा,

या धाग्याला जरी सुरुवात मी केली असली तरी यात खरे तर शब्दांचे मोती पेरले ते खास करुन आपल्या पैजारबुवांनी .. आज निवांत पणे पुन्हा सगळे रिप्लाय वाचले.. वा काय मस्त वाटले.. तसेच इतर जनांनी ही यात मजा आनली.. धागा २०१५ चा आहे, पण २०२० मध्ये पुन्हा यात लिहिण्याचा माणस आहे. पाहुया..