Skip to main content

तुकाराम... हे राम !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/06/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता. सुट्टी चालू आहे तर लहान मुले हट्ट धरायला हवीत म्हणून बाल हनुमान, बाल गणेश तसा बाल तुकाराम, त्याच्या लीला, गाणी दाखवणे, बायकांच्या आडियन्सला रडवायला मेलोड्रामा, गेला बाजार गावाकडचे पब्लिक आकर्षीत करायला दुष्काळ, विवक्षित पब्लिकला खेचायला नाकात बोलणार्‍या बामणांचे प्रताप हे सगळे सगळे सोपस्कार पार पाडताना कुलकर्णी आणि कंपनीची जी काय ससेहोलपट (खरेतर हसेहोलपट) झाली आहे, ती बघवत नाही. अक्षरशः २.४५ मिनिटे अत्याचारा वरती अत्याचार सहन करावा लागतो. 'साहस टाळा' असे रविवारचे राशी भविष्य सकाळी सकाळी वाचत असतानाच डाण्रावांचा फोन आला आणि संध्याकाळ म्हणता म्हणता दुपारच्या शो चा प्लॅन पक्का केला आणि तुकाराम चित्रपटाला हजेरी लावली. तुकोबांना विठ्ठलाचा ध्यास लागला होता आणी आम्हाला तुकोबांचा. अन्न पाणी काही ग्रहण करण्याची संधी देखील मिळाली नाही पण आम्हाला त्याचा खेद वाटला नाही. तर आधी आपण पात्रांचा परिचय करून घेऊ. पात्रं म्हणजे एकेक पात्रंच आहेत म्हणा. बोल्होबा अंबीले (तुकारामांचे वडील) = शरद पोंक्षे अर्थात मराठी चित्रपट सृष्टीतील बाबा महाराज सातारकर. हा माणूस कुठलाही संवाद निरूपण केल्याच्या थाटातच बोलतो. बाबा महाराजांसारखीच दर चार मिनिटांनी डोळे मिचकावण्याची देखील सवय. डोक्यात अजूनही नथुराम घुसलेला आहे, त्यामुळे बर्‍याचदा संवादाच्या शेवटी शेवटी आवाज भयानक चिरका होतो. पात्र बरेचशे सुसह्य. कनकाई (तुकारामांची आई) :- प्रतीक्षा लोणकर. दामिनी दामिनी दामिनी.... अभिनय समजून उमजून करण्यात यशस्वी. फारशे भावनिक प्रसंग वाट्याला न आल्याने भूमिका उत्तम वठवली आहे. पात्र सुसह्य. सावजी (तुकारामांचे वडील बंधू) :- वृशसेन दाभोळकर. चित्रपटात मोजून चार ते पाच वाक्ये बोलण्याची गरज पडल्याने माणूस कामगिरी निभावून नेतो. बराचसा अभिनय हा शारीरिक करावा लागला असला तरी त्यात छाप पाडून जातो. संसार सोडून मोक्षप्राप्तीसाठी परागंदा झाल्यावरती आलेले शहाणपण मोजक्या शब्दात पण छान मांडतो. पात्र सुसह्य. मंजुळा (सावजींची पत्नी) :- स्मिता तांबे. संन्यासी वृत्तीचा आणि कधीही पतीधर्म न निभावणारा माणूस आयुष्याच्या दावणीला बांधला गेल्यावरती झालेली घुसमट छान व्यक्त करते. सासू मेल्या नंतरच्या प्रसंगात मात्र तिने केलेला अभिनय (नवर्‍यावरती दाखवलेला त्रागा) अतिशय बालिश आणि नाटकी. खरेतर हा प्रसंगच पूर्णतः अनावश्यक. ह्या प्रसंगात आई गेल्यामुळे कोसळलेला, निराधार झालेला सावजी निव्वळ शारीरिक अभिनयातून आपल्या मनाला त्याची तडफड जाणवून देत असतानाच, ह्या प्रसंगात अचानक येऊन स्मिता तांबेचे किंचाळणे, बोंबलणे आणि पाठोपाठ मख्ख आणि शांत चेहरा करून तुकारामाने बाहेर येऊन "काय झाले वहिनी" विचारणे खरंच संताप आणते. रखमा (तुकारामांची पहिली पत्नी) :- विणा जामकर. आपण विद्या बालन नाही हे ह्या बाईला कळेल तो दिवस तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सुदिन. ह्यासाठी तिने ज्यू. मेहमूदची वाताहात डोळ्यासमोर ठेवली तरी प्रगती निश्चित. आवली (तुकारामांची दुसरी पत्नी) :- राधिका आपटे. 'मात्र रात्र, रक्तचरित्र मधली राधिका ती हिच का' असा प्रश्न पडण्या येवढा भिकार अभिनय. त्याला अभिनय तरी कसे म्हणावे ? फारतर चित्रपटातला वावर असे म्हणू. ही आवली अक्षरशः कॉमीक वाटते हो. अत्यंत नाटकी अभिनय, 'कर्कशा' असे तुकारामबुवांनी आपल्या अभंगात केलेले वर्णन फिक्के पाडणारी प्रत्येक संवाद किंचाळून आणि हेल काढून बोलण्याची लकब ह्यामुळे आवली हे पात्र अक्षरशः डोक्यात जाते. ना धड तिचा त्रागा समोर येतो, ना धड तुकारामांवरचे प्रेम. पुर्णत: फसलेले आणि असह्य पात्र. मठाधिपती (रवींद्र मंकणी ):- फक्त एका दृश्यापुरता वावर. सिंव्हासनावरती बसण्याची ऐट आणी संवादाची फेक अप्रतिम. ह्या माणसाला त्या सिंव्हासनावरती असे झोकात बसलेले पाहिले आणि वाटले असेच उचलून ह्यांना शनिवारवाड्यावरती नेऊन ठेवावे. हे रूप, ही ऐट, हा माणूस बघून तो शनिवार वाडा देखील पुन्हा गर्वाने उभा राहील, ती कारंजी पुन्हा ताल धरतील, ते रेशमी पडदे सळसळतील, आमची मस्तानी नाजूक आदाब करत उभी राहील आणि कुठूनतरी ललकारी उमटेल "बाअदब बामुलाहिजा..." मंबाजी (यतीन कार्येकर) :- संपूर्णतः दिग्दर्शक म्हणेल त्याला मान डोलवून केलेला अभिनय. पात्र पूर्णतः फसलेले. त्याचा तुकारामांवरचा राग, धर्माचा दांभिक अभिमान, स्वतःच्या बुद्धीचा गर्व, ब्राह्मण्याचा माज काही काही म्हणून मनावरती ठसत नाही. दोन लहान मुलांमध्ये चाललेली भांडणे देखील अधिक प्रभावशाली वाटतील. कार्येकरांनी पाटी टाकली आले असे खेदाने म्हणावे लागेल. पात्र मनालाच पटत नसल्याने असह्य. तुकाराम (जितेंद्र जोशी) :- 'कुठे आहेत तुकाराम ?' असे शेवटापर्यंत वाटायला लावणार अभिनय. प्रत्येक दृश्यात प्रत्येक फ्रेम मध्ये हा जितेंद्र जोशी आहे हेच जाणवत राहते. कुठल्याच क्षणी आपण त्या पात्राशी तुकाराम आहेत म्हणून एकरूप होऊ शकत नाही. अतिशय मख्ख चेहर्‍याने वावर. मध्येच बापुडवाणा चेहरा करून इकडे तिकडे बघणे म्हणजे तुकाराम उभा करणे नव्हे. अतिशय संथ संवाद फेक. तुकाराम व्यवहारी, रोमँटीक, समाजसुधारक इ. इ. सर्व काही गुणयुक्त दाखवण्याच्या प्रयत्नात स्वतः दिग्दर्शकच आपटल्याने जोशी साहेब त्याच्या जोडीने पडल्याचे आश्चर्य वाटत नाही. नो सर ! हे तुकाराम आमचे नाहीत, रादर आमच्या ध्यानी मनी देखील असे तुकाराम कधीच नव्हते. बाल तुकाराम (पद्मनाभ गायकवाड) :- विठ्ठलाला एकदा मिठी मारून भक्तीचा पूर आणि विठ्ठलप्रेम दाखवणे ह्यापुरती गरज असताना निव्वळ बालचमूच्या गर्दीसाठी ताण ताण ताणलेले पात्र. ह्याच्या बाललीला तर काय वर्णाव्यात... पात्र मात्र बरेच सुसह्य. भारत गणेशपुरे, प्रशांत तपस्वी आणि हो विक्रम गायकवाड हे देखील चित्रपटात आहेत. हो.. हो.. तेच आपले विक्रम गायकवाड फकिराचा रोल करताना दिसतात. माझी खात्री नाही, पण ह्या चित्रपटात ३ प्रसंगात (एकदा बाल तुकाराम बाललीला दाखवत सवंगड्यांबरोबर गाणे गात खेळत असताना दोन हात आकाशाकडे करत कबीराचा कुठलासा दोहा गात कॅमेर्‍यासमोरून इकडून तिकडे वाटचाल, एकदा तोच दोहा म्हणत तुकारामांच्या वाड्यावरती झोळी पसरत येणे आणि शेवटी दुष्काळात मरून जाणे) जे दिसतात ते गायकवडच असावेत असे वाटते. येवढा हट्टा कट्टा माणूस दुष्काळात मेलेला पाहून हळूच खुदकन हसायला येते हो. तर आता चित्रपटाच्या कहाणीकडे वळू. माफ करा, कहाणी नाही... ऐतिहासिक सत्य. हान तर सुरुवात होते बाललीलांपासून. बाल तुकारामाचे सवंगडी त्याला शोधत आहेत आणि तो सापडत नाहीये. मग त्याला शोधणारा 'तुक्या कधीच सापडत नाही' अशी तक्रार करतो आणि शेवटी मग सगळे सवंगडी त्याला देवळात शोधून काढतात. बाल तुकाराम विठ्ठलाच्या मूर्तीला मिठी मारून ब्रह्मानंदी टाळी लावून रममाण झालेले असतात. ह्या दृश्यावरून आपण सुजाण प्रेक्षकांनी 'तुक्या कधीच सापडत नाही' कारण तो कायम ह्या देवळातच रममाण झालेला असतो, ह्या बालवयात त्याच्या अंतरात्म्यात भक्तीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे येवढे सगळे अर्थ समजून घ्यायचे. ही ज्योत पुढे १४ रिळे कुठे गायब होते हे मात्र विचारायचे नाही. नाहीतर मग आम्ही तुम्हाला नव्या बदलाला नाक मुरडणारे प्रेक्षक म्हणू. कुलकर्णींनी ह्या चित्रपटात प्रेक्षकांच्या डोक्याला खूप खाद्य पुरवले आहे बरे. अनेक दृश्ये तुम्हाला काही सांगून, सुचवून जातात. मात्र ते समजण्याची तुमची पात्रता पाहिजे. आर्ट फिल्म मध्ये बघा, हीरोच्या कायम मळकट रंगाच्या शर्टाच्या जागी गुलाबी, हिरवा शर्ट दिसायला लागला, त्याच्या रेडिओवरती गंधर्वांच्या जागी रफी गायला लागला, कुंडीत गुलाब उगवला की त्या हीरोचे आयुष्य पालटले आहे, तो प्रेमात पडला आहे हे आपण जसे समजून घ्यायचे असते. तसेच इस्त्रीच्या स्वच्छ अंगरख्यामधून तुकाराम चुरगाळलेल्या अंगरख्यात आले, जप्ती - मसाले - मेथीची भाजी हे शब्द सोडून संदीप खरे सारखे एकदम (गाडी सुटली, रुमाल हालले.. च्या थाटात) 'कुठून फुटला हा कोंब, कुठे मिळाले जीवन जगण्याचे बळ त्याला..' असे म्हणायला लागले म्हणजे विरक्त झाले, विठ्ठलाच्या ध्यासाला लागले हे समजून घ्यायचे. किती सोपे आहे का नाही ? तर आपण कुठे होतो ? हान.. तर तुकारामांच्या बाललीला चालू असतानाच एकेक पात्रे आपल्या परिचयाची होत जातात. वडील बंधू सावजी हे देवधर्माच्या नादाने पुर्णतः एकलकोंडे आणि जगाच्या पार पोचलेले असतात. चार गाढवे सांभाळणे आणि मसाला पोचवणे हे कार्य देखील त्यांना जमत नसते. अर्थातच मग लहानग्या तुकोबांची वर्णी वडलांच्या हाताखाली लागते. देवाचा आशीर्वाद घ्यायला वाकलेले बाल तुकाराम एकदम लग्न झालेले तरणेबांड तुकाराम होऊनच उभे राहतात. बाललीला संपल्या म्हणून लगेच निःश्वास टाकायचा नाही. आता एकदम व्यवहारी, मिश्किल, न्याय - अन्यायाची चाड असणारे आणि रॉमेंटीक तुकाराम आपल्या समोर सादर होतात. आपण हे धक्के एका मागोमाग एक पचवत असतानाच एकदम दुष्काळ दाखल होतो. आधी वडील, मग आई असे लोक एका मागोमाग एक गमवायची वेळ तुकारामांवरती येते. दामाजीपंतांची गोष्ट ऐकून तुकाराम आपल्या घराची धान्य कोठारे खुली करतात आणि भणंग होतात. सावजी परागंदा होतात, भुकेपोटी खणून आणलेली कंदमुळे विषारी निघतात आणि लहानग्या सकट अजून काही मृत्यू घरावर हल्ला करतात. हे सर्व बघता बघता आपण पण मरून जाणार असे वाटत असतानाच तुकोबांना भेगाळलेल्या भुईमध्ये एक कोंब उगवलेला दिसतो आणि त्यांना एकदम अभंगाची स्फूर्ती येते. त्यांना इकडे साक्षात्कार होतो आणि तिकडे ताबडतोब पाऊस सुरू होतो. पावसाला जीवनदायी, स्फूर्तीदायी का म्हणतात ते मला तेव्हा कळले, कारण पाऊस चालू झाल्या झाल्या इंटरव्हल झाले. इंटरव्हल नंतर जी-टॉक, फेसबुक ह्यांचा आसरा घेतल्याशिवाय आता टाईमपास करणे अशक्य आहे असे डाण्राव आणि प्रिमोने जाहीर केल्याने आमचा मोर्चा पुढच्या मोकळ्या पडलेल्या खुर्च्यांकडे वळला. आम्ही तिकडे वळलो आणि तुकाराम अध्यात्माकडे वळले. गेले दीड पावणे दोन तास हरवलेली त्यांची विठ्ठलभक्ती अचानक उफाळून आली आणि ते पांडुरंगाला वदले 'लोकं म्हणतात मला तुझं वेड लागलंय'. त्यांचे माहिती नाही, पण येवढ्या वेळात प्रेक्षकांना मात्र नक्की वेड लागलेले असते. आता विठ्ठलमय झालेले तुकाराम सावकारी सोडतात, लोकांचे त्यांच्याकडे गहाण पडलेले सर्व मुक्त करतात आणि अभंग रचनेला सुरुवात करतात. काम धाम सोडून चार चार दिवस डोंगरावरती जाऊन भक्तीत लीन व्हायला लागतात. इकडे मग ते आवली जे काही अभिनयात सूट सूट सुटते, की तुकारामांना 'तुमच्या ऐवजी मी शेतात राबतो पण ह्या बाईला आवरा' असे सांगावेसे वाटायला लागते. काय भिकार अभिनय करते हो ही बया. हिच्या नाटकी आणि कर्कश्य अभिनयापुढे मुनमुनसेनच्या कन्या देखील फिक्या पडतील. मग ह्या आवलीच्या किंचाळण्याने तुकाराम पुन्हा ताळ्यावरती येतात आणि शेती करायला लागतात. पुढच्याच दृश्यात ते एकदम शेत वगैरे पिकवून धान्याची रासच ओतताना दाखवले आहेत. मग एकदा रास ओतली की पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या'. मधल्या काळात त्यांनी आपल्या वडिलोपार्जित विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने त्यांचे अभंग रचणे, कीर्तन करणे आणि विठ्ठलात गुंतणे एकदम जोमाने चालू होते. आता तुकाराम संसारातून पूर्ण अंग काढल्यासारखेच वागायला लागतात. त्यांची संत म्हणून कीर्ती वाढत जाते आणि लगेच गावातला दुसरा सावकार, नाकात बोलणारे ब्राह्मण ह्यांचा पोटशूळ वाढत जातो. ब्राह्मण, मग ते अगदी शिवाजीराजांच्या काळातले असोत किंवा आजच्या पुण्यातले असोत, कायम नाकातच बोलताना का दाखवतात हे मला अजून कळलेले नाही. तर मग हे पोटशूळ वाले मंबाजी गोसावी ह्यांना पाचारण करतात वगैरे वगैरे. नेहमीचे काड्यासारु धंदे चालू करतात. ह्या काळात तुकारामबुवा समाज जागृतीचे आणि सुधारणेचे कार्य करतात असे दिग्दर्शक सुचवू पाहतो. 'लांडग्यांना मारून त्यांचा शेपट्या दाखवल्यास शिवाजी राजे इनाम देतात' हे तरुणांना सांगणे आणि 'पाईक म्हणजे सैनिक. स्वराज्यासाठी लढा' असे सांगून लोकांना राजांच्या सैन्यात भरती होण्यास सांगणे म्हणजे तुकारामांचे समाज जागृतीचे कार्य होय असे जर दिग्दर्शकाला वाटत असेल तर त्याला आमचा मानाचा मुजरा. अहो तुम्हाला तुकारामच कळलेले नाहीत, तर त्यांचे कार्य काय बोडक्याचे कळणार म्हणा. मग आता हे मंबाजी गोसावी ह्यांचे आगमन झाल्यावरती तुकारामांच्या आयुष्यात उलथा पालथा होणारच. ती नक्की काय होते आणि त्यातून ते कसे बाहेर पडतात हे समजून घ्यायचे असेल तर 'तुकाराम' बघणे क्रमप्राप्त. म्हणजे बघाच असे नाही, परीक्षणानंतर हे वाक्य लिहायची सहसा पद्धत आहे म्हणून आपले लिहिले आहे झाले. जाता जाता एका प्रसंगाचा उल्लेख आणि दिग्दर्शकाचे कौतुक मात्र करायलाच हवे. 'बुडालेल्या गाथा आणि त्या वर येणे' हा तुकोबांच्या अद्भुत चरित्रातला प्रसंग कुठलेही वाद विवाद निर्माण न होण्याची काळजी घेत कुलकर्णी साहेबांनी ज्या खुबीने साकारला आहे त्याबद्दल हॅटस ऑफ. ह्या परीक्षणाच्या निमित्ताने हे बोलणे योग्य आहे का नाही माहिती नाही, पण असे वाटते की 'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे. विठ्ठल विठ्ठल...

वाचने 23420
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

चित्रपट पहाताना हसू येईल की नाही माहित नाही - पण हे परिक्षण वाचताना वाक्यावाक्यावर हसलो. कृपया हे परिक्षण लवकरात लवकर खाली घालावे, आणि पराशेठला विनंती की हेच परिक्षण त्यांनी ब्लॉगवर तर बिलकुल टाकू नये - ज्यांना धुतलंय ते लोक अभिनय सोडून देऊन औंढ्या माळावर जाऊन बसण्याची दाट शक्यता आहे. ;-) हे सगळं वाचून पुन्हा एकदा पागनिसांच्या वरीजनल, हंड्रेड पर्सेंट, जुन्या तुकारामांना पाहिलं.

In reply to by प्रचेतस

अरारारारा. चित्रपटाची जाम सालं काढलीत जणू. Smile
:) सहमत टू वल्ली!! :) आम्हाला या परीक्षणात जुणा 'परा' गावला... :) विक्रम गायकवाड म्हणजे आपला उन्च झोक्या'तला "महादेव रानडे"च्च ना!! .. की मेकअप'वाला "विक्रम गैकवाड" ? राधिका आपटे'ने निराशा केल्याचे पाहून वाईट वाटले... वीणा जामकर खरं तर गुणी अभिनेत्री आहे.. पण .... जाऊ देत! आय होप.. स्मिता ताम्बे' नेहमीसारखी जास्त चीप वगैरे वाटली नसावी... :) जितू'चा जो अभिनय ट्रेलरमध्ये पाहिलाय.. त्यावरून आपण लिहिलेल्या परीक्षणात बरेच तथ्य असल्याचे जाणवते... माझ्या माहितीप्रमाणे तुकाराम' हे कधीच आततायी किन्वा अरे ला कारे करणारे नव्हते.. पण जितुला मात्र तसे दाखवले गेलेय..... :| काही महिन्यांनी झी-टॉकीजला किन्वा तत्सम मराठी चैनेल'वरती हाही पिक्चर येइलच ना.. तेव्हा बघेन... :) अवान्तर : नाकात बोलणे' ही हेरिडिटी असते.. की स्टाईल असते... की पिक्चरमधली एखादी फैन्टसी... ? ... की कुणाची मोनोपौली? ;)

In reply to by मृगनयनी

>>>आम्हाला या परीक्षणात जुणा 'परा' गावला.. >>>काही महिन्यांनी झी-टॉकीजला किन्वा तत्सम मराठी चैनेल'वरती हाही पिक्चर येइलच ना.. तेव्हा बघेन.. बरोबर. प्रचंड सहमत. बाकी वेगवेगळ्या चॅनेलवर प्रमोशनसाठी येणारे चं.कु. आणि जि.जो. यांचे ओव्हरअ‍ॅक्टींग बघूनच न पहाण्याचे ठरवले होते. टि.व्ही.वर येइल येइल तेंव्हा किती कमी वेळात उठुन गेलो तरी पैसे बुडाल्याचे दु:ख असणार नाही.

In reply to by प्रचेतस

अहो सालं कसली........ सालं काढून आतलं रक्त पिऊन पुन्हा ओकून टाकले आहे............ :D अशक्य हसलोय......इतके भयंकर समीक्षण तर 'नील और निक्की'चे सुद्धा वाचले नव्हते...........

धन्यवाद... माझा वेळ वाचवलात.... तसाही मी मराठीच काय पण हिंदी सिनेमाच्या वाट्याला जात नाही. आपण बरे आणि आपले हॉलीवूड बरे.

परखड परिक्षणाबद्दल धन्यवाद. आत्ताच आम्ही 'हाफ डे सुट्टी' टाकावी ह्या विचारात होतो. ह्या उरलेल्या हाफ-डे मध्ये एक तर असेच परखड परिक्षण लिहावे ( अर्थात परासारखे जमले नसते हा भाग वेगळा ) की घरी जाऊन शांतपणे झोपावे ह्या २ पर्यायांवर विचार चालु होता. आमची सुट्टी वाचवल्याबद्दल आभार ... इच्छा झाली तर ह्या सिनेमावर अजुन ४ शब्द लिहेन असे वाटते, तूर्तास स्वल्पविराम - छोटा डॉन

बाप्रे!! जगदंब जगदंब :) हे वाचून तर विस्नुपंत पागनीस अजूनच भारी वाटू लागले. साला हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन!! ते आता वैकुंटमदी असेल, सिंगिंग नेक्स्ट टु गॉड

>>> पावसाला जीवनदायी, स्फूर्तीदायी का म्हणतात ते मला तेव्हा कळले, कारण पाऊस चालू झाल्या झाल्या इंटरव्हल झाले. --- अगागागा! भन्नाट परीक्षण. बाकी न बुडणार्‍या गाथेवरून काही जुने धागे आठवले :).

प्रत्येक दृश्यात प्रत्येक फ्रेम मध्ये हा जितेंद्र जोशी आहे हेच जाणवत राहते. त्या जागी एखादा नविन चेहरा घेतला असता तरी चालले असते....

मला लेखनाच्या सुरुवातीवरुन काही वेगळेच वाचायला मिळेल असे वाटले होते - म्हणजे 'अचानक तुकाराम महाराज त्वेषाने ओरडले "हा गेलो आणि हा आलो, तुम्ही कुठेही जाऊ नका, बोला मराठी पाऊल पडते पुढे" ' असे काही चित्रित झाले की काय?

एक शंका.. एका चित्रात तुकाराम महाराज गाथा लिहिताना दाखवले आहेत. हा त्या कुळकर्ण्याचा ब्राह्मणी कावा तर नाहि ना? गेली हजारो वर्षे बहुजनाना विद्येपासुन वंचित ठेवले असे विद्रोहि सांगतात. त्याना खोटे पाडण्या साठी तर हा कावा नसेल ना??

In reply to by अविनाशकुलकर्णी

संत तुकाराम हे जातीने वाणी होते आणि त्यामुळे त्यांना लिखापढीचे शिक्षण पिढीजात मिळालेले होते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा असं म्हणणार्‍या तुकारामांना काय ठरवायचं ते ठरवावं :)

In reply to by ५० फक्त

तुकोबांच्या दिवसा अवतीभवती आणि समोर दिवे लावलेल्या दृश्यातून तुकाराम या बाबाजी चैतन्यांची शिष्‍य असणार्‍या बहुजन व्यक्तीने लिहिलेल्या तुकाराम गाथेतून आत्मजागरणाचे दिवे लागले असे दिग्दर्शकाला दाखवायचे असावे..

In reply to by ५० फक्त

हेच म्हनणार होते.भर दुश्काळात दिवसा दिवे? आज्चि तिकिट काढलियेत.बघु....आधिच परिक्शण वाचायला हव होत!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका मग तुम्ही अन तुमच नशीब. नाही डॉक्याला शॉट लागला पहिल्या १५ मिंटात तर बोला. (चेतावनी देणारी) प्रीमो

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका मग तुम्ही अन तुमच नशीब. नाही डॉक्याला शॉट लागला पहिल्या १५ मिंटात तर बोला. (चेतावनी देणारी) प्रीमो

अर्रे आत्ता नक्की कोणावर विश्वास ठेवावा? तुझ्यावर की त्या आत्म्यावर? पण ठिके असाही तुकाराम बघायचाच असेल तर पागनीसांचा का बघु नये?

नथु मधून वाचले तरी चालेल हे परिक्षण होते कि पोटशुळ? या अगोदरच्या परिक्षणात परिक्षण आवडले असे म्हणले गेले आहे, अर्थात चित्रपट वेगळा आणि परिक्षण भलतेच असे बहुदा होत नसावे, पण्, मुळ परिक्षणाचे श्रेय अव्हेर करण्याचा बालिश प्रयत्न जो दिसून येत आहे तो फारसा जमलेला नाही.
'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे.
हॅ हॅ हॅ ...हे तर फारच अपेक्षित होते, शेवटी प्रत्येक संबंधित गोष्टित या जखमा भळाळणारच म्हणा ! तरी ते पुष्पक विमान राहिलेच.:-) अर्थात परिक्षण(?) फाट्यावर मारल्या गेले आहे. हेवेसान . . . . . . . . (परिक्षणकार श्री. अ. आ.चा भक्त )

संत तुकाराम हे जातीने वाणी होते आणि त्यामुळे त्यांना लिखापढीचे शिक्षण पिढीजात मिळालेले होते. माफ करा ..वाटले ते बहुजनात मोडत होते

In reply to by अविनाशकुलकर्णी

ब्राह्मणेतर या अर्थी पाहिले तर बहुजनांत ते मोडत होतेच. गावच्या कर्मठांनी एका ब्राह्मणेतराने मराठीतून बंडखोर/प्रोग्रेसिव्ह अभंग लिहिले यासाठी गाथा बुडविल्या. यातले सर्वच अधोरेखित शब्द महत्वाचे आहेत. असो.

In reply to by अविनाशकुलकर्णी

ब्राह्मणेतर असले म्हणून लिखापढी येतच नाही असे काही नव्हते जुन्या काळी. प्रमाण जरी कमी असले तरी साधं अक्षरज्ञान होतंच काही जनतेला. तत्कालीन जे सो कॉल्ड 'ज्ञान' बहुजनांना मिळत नव्हते ते बहुतांश तद्दन निरुपयोगी होते.

In reply to by बॅटमॅन

तत्कालीन जे सो कॉल्ड 'ज्ञान' बहुजनांना मिळत नव्हते ते बहुतांश तद्दन निरुपयोगी होते.
The thing called ज्ञान is utterly useless unless it converts the person in आत्मज्ञानी, कारण त्याची उपयुक्तता फक्त आत्मजागरणापुरती आहे - आत्मजागरण झाल्यानंतर इतर लोकांनी स्वत: होऊन अशा व्यक्तीला पोसावं असं वाटत असल्याने हे ज्ञान निरुपयोगी होते असंच वाटणार. असं ज्ञान झालेल्या व्यक्तीला कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीसारखंच राबावं लागतं - तुकारामही राबत होतेच - शिवाय आवडाबाई होत्याच राबवून घ्यायला.

In reply to by यकु

यकुशेठ, मी मेटॅफिजिकल नव्हे तर साध्या सरळ फिजिकल ज्ञानाबद्दल बोलतोय. त्या भौतिक दृष्टीने ते ज्ञान निरुपयोगीच होते. असो.

'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे. अगदी अगदी. नितिन देसाईंच्या प्रचंड गाजलेल्या मालिकेत जाणीवपूर्वक समर्थ रामदासांच्या पात्राला लावलेली कात्री, आणी काही संवादांमध्ये संत ज्ञानेश्वरांचा मुद्दाम टाळलेला उल्लेख पाहून असेच वाटले होते.

लोकांना,'' खरच एवढा बेक्कार आहे हा चित्रपट..? मग बघुच एकदा...!'' असे वाटायला उद्युक्त करणारे परिक्षण लिहिल्या बद्दल धन्य-वाद. :-)

>>रखमा (तुकारामांची पहिली पत्नी) :- विणा जामकर. आपण विद्या बालन नाही हे ह्या बाईला कळेल तो दिवस तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सुदिन. ह्यासाठी तिने ज्यू. मेहमूदची वाताहात डोळ्यासमोर ठेवली तरी प्रगती निश्चित. वीणा जामकरला मेहमूदसारख्या मिश्या आल्या आहेत असे दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले. गाणी ऐकल्यावर पहिला हिरमोड झालाच होता. तेव्हाच ठरवलं होतं की चार जाणत्या लोकांचा रिव्ह्यू कळल्याखेरीज चित्रपट बघणार नाही. आताचा स्कोर बघू नये २- बघावा १ (बेस्ट ऑफ फाइव्ह) जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

>>> चार जाणत्या लोकांचा रिव्ह्यू कळल्याखेरीज चित्रपट बघणार नाही. मिसळपाव वर असे लोक आहेत??? :) की आपणच आपली समजूत करुन घ्यायची आहे? ;) बाकी, प्रोमो पाहून जितेंद्र जोशीला 'तुकाराम महाराज' म्हणून पाहणं अवघडच वाटत आहे.

In reply to by प्यारे१

>>मिसळपाव वर असे लोक आहेत??? Smile की आपणच आपली समजूत करुन घ्यायची आहे? Wink शुक्रवारपर्यंत हा चित्रपट बघायचा की नाही हे ठरेल... त्यावर मग ज्यांची रिव्ह्यू घेतले गेले ते जाणते होते का नव्हते ते ठरवले जाईल. ;). आत्ता तरी ३ नग झालेत. जे पी

परा चश्मा बदल रे . नुसते करायची म्हनुन समिक्षा करुन एखाद्याची पार वाट लाउन टाकने योग्य नव्हे. पराचा कावळा केलास पार तु.

साहस टाळा' असे रविवारचे राशी भविष्य सकाळी सकाळी वाचत असतानाच डाण्रावांचा फोन आला >>. दुर्दैव पाठ सोडत नाही, असे काहीसे ...;) बाकी परिक्षण लिहीताना ' कणखर ' झालास हे उत्तम केलेस ...मुळचा तुकाराम , मग पागनिसांचा तुकाराम यांच्या तुलनेत अतिशय भिकार झाला आहे चित्रपट :)

अगदी पहिल्या फ्रेमपासुन पार अंतापर्यंत ओवर-अ‍ॅक्टींग ने भरलेला, पोरा-बाळांसाठी तुकारामांच्या बाललीला, बाया बापड्यांसाठी मंजुळाबाई आणि रखमाबाईंचे दु:ख, मधेच रॉमँटिक तुकाराम कदाचित किशोरांसाठी, दुष्काळग्रस्त लोक गावाकडल्या प्रेक्षकांसाठी, आणि उरल्या सुरल्यांसाठी महाराजांचे २-३ प्रसंग असल्याने हा चित्रपट अगदी समाजातील सर्व स्तरांसाठी होता असे मी म्हणेन. तुकाराम आक्रस्ताळेपणा करताना पाहुन जे वाटले ते तो पांडुरंग आणि आणि तुकोबाच समजुन घेउ शकतील. डान्बाजी आणि परेश्वर यांना या निमित्ताने एक सवाल कुठे फेडाल ही पापे? अर्धा मोठ्या मुश्किलीने सहन करता आले जितोबांना. मध्यंतरापर्यंत खुर्चीत कसा-बसा तग धरला न नंतर सरळ पुढल्या रांगेत बसुन कमेंटा पास करत पिच्चर पाहिला म्हणुन ठीक. बाकी वळु सारखे चित्रपट देणारे चंद्रकांत कुलकर्णी हेच का हा सवाल मात्र चित्रपटगृहाबाहेर पडताना पडला.

In reply to by प्रीत-मोहर

वळूचा आणि या कुलकर्ण्यांचा सबंध नाही. ते गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी. असो आम्ही रमताराम आणि अतृप्त आत्म्यावर विसम्बायचे ठरवले आहे. हा लेख ठरवून पिसे काढायची म्हणूनच लिहिल्यासारखा वाटतोय. सिनेमा पाहिल्यावर खरे काय ते कळेलच.

In reply to by इष्टुर फाकडा

ओक्केज त्याबद्दल स्वारी. पण चित्रपटाकडुन असलेल्या अपेक्षा पुर्‍या झालेल्या नैत. धन्यवाद.

In reply to by प्रीत-मोहर

>>>वळु सारखे चित्रपट देणारे चंद्रकांत कुलकर्णी हेच का वळू चं कु चा आहे? हा सवाल मात्र चित्रपटगृहाबाहेर पडताना पडला. पडलीसच शेवटी? ;)

In reply to by प्रीत-मोहर

आमच्या आवडत्या जितेंद्र लापहायला गेले होते.
अयायायाईगं! अगं प्री-मो, काय तुझी आवड एवढी घसरलीये? ;)

In reply to by कवितानागेश

स्मिता, माऊ, नका गं तिला अश्या त्रास देऊ! ;) आधीच शिनेमा न आवडल्याने (आणि जितु आवडल्याने) ती वैतागलीये.

हे परस्पर विरोधी परीक्षण वाचून आता नक्की तुकाराम पहावा कि नाही या संभ्रमात पडले आहे, स्वाती

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपावरील कित्येक परीक्षणे वाचून ह्या नावांचे सिनेमे आहेत हे समजते, मग ते डाउनलोड कसे आणि कुठून करायचे ह्याचा शोध घेतला जातो. थेटरात जाऊन पहायचे तर फक्त जर्मन सिनेमे किवा इंग्रजी/ हिंदी सिनेमांचे जर्मन डब्ड अवतार.. मग काय करणार? स्वाती

अ. आ. च्या परीक्षणातले फोटो पाहून ते तुकाराम आणि त्याच्या बायकोचे आहेत की एखाद्या ग्रामीण बाजाच्या मालिकेतले असं वाटलं होतं जितेन्द्र जोशी हा जितेन्द्र जोशीच दिसतो. त्यामुळे सहज बघायला मिळेल तेव्हा सिनेमा बघेन. तोपर्यंत विष्णुपंत पागनीस आणि गौरीचा तुकाराम आहेच! कालच परत एकदा बघितला!

एखाद्याने आधीच एव्हरेस्ट गाठलं असेल तर त्याच्यावर कडी करण्यासाठी अजुन कुठे उंची गाठायची बरं? फार फार तर बरोबरी करता येईल. पण (एकंदर परिक्षण वाचता) ते भाग्य जोश्यांच्या तुकारामाच्या नशिबी नसावेच बहुतेक. बादवे (परिक्षणाच्या दालनात) वेल्क्म ब्यॅक रे परा. ;)

त्या भौतिक दृष्टीने ते ज्ञान निरुपयोगीच होते. असो. ........................................ अश्या निरपोयगी ज्ञान मिळत नाहि म्हणुन कल्ला कशाला???/

आपल्याकडे अनेक महापुरुषांना त्यांचे संधिसाधू आणि भोळे भक्त देवत्व प्राप्त करून देतात. म्हणजे त्यांच्या विचारांना मूळ तत्वांना तिलांजली देऊन त्याच्या प्रतिमेस हार,पुष्प व गुलाल उधळून अनेक स्वार्थी भक्तगण धार्मिक पर्यटन निर्माण करून जनतेची दिशाभूल करतात. मुळात सदेही वैकुठला जाणे. आणि बुडलेली गाथा वर येणे हे चमत्कारी प्रकरण सिनेमात घुसवल्याने तुकोबाचे अभंगातील सार जनसामान्य माणसांच्या हाती लागण्याच्या आधी त्यांना देवत्व प्राप्त झाले असते. . ह्यामुळे मग देऊळ ह्या सिनेमात दाखविल्याप्रमाणे आजच्या काळात तुकाबांचे साई बाबांसारखे मंदिर व आजूबाजूला पर्यटन विकसित झाले असते. त्याने मूळ विचार ,आचार बाजूला राहून चमत्कार ,नवस असे प्रकार सुरु होतील. जुन्या तुकाराम ज्यावेळी प्रदर्शित झाला त्यावेळची सिनेसृष्टी व काळ सर्वस्वी भिन्न होता. आज च्या काळात जसे शिवाजी महाराजांना भवानी मातेने भवानी तलवार दिली अश्या काल्पनिक गोष्टी गाळून त्यांचे आठवावे रूप ,आठवावा प्रताप जसे आपण मानतो. तसे तुकारामाविषयी ह्या चमत्काराच्या कथांची सांगड न घालता तुकारामांच्या अभंगातून मिळणारे रसग्रहण व त्यातून तुकोबाच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेणे अधिक उचित ठरेल.

अतृप्त आत्मारामाचे परिक्षण आधी वाचले, नंतर हे, काही कळेनासं झालय. बरं, परा म्हणतो तसं डॉन आणि प्रिमोही म्हणतायत त्यामुळे आणखीनच कनफूजन. वीणा जामकर स्वत:ला विद्या बालन समजते हे वाचून हसू आले.

तिन्ही परीक्षणे वाचली... एकच कमेंट तिन्ही धाग्यांवर करतोय :) मी नक्की बघणार... तद्दन फालतू हिंदी चित्रपट बघायला आपण थेटरात जातो, मग मायमराठीमध्ये केलेला एक प्रयोग म्हणून, हा चित्रपट नक्की बघणार :) :)