✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

म
मृत्युन्जय यांनी
Mon, 04/09/2012 - 17:10  ·  लेख
लेख
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला. गयावया केल्यावर ययातीला उ:शाप मिळाला की तो त्याच्या वार्धक्याची त्याच्या कुठल्याही मुलाच्या तरुणपणाशी अदलाबदल करु इच्छितो. विषयवासनेच्या आहारी गेलेल्या ययातीने १००० वर्षांच्या कालावधीसाठी यदु, तुर्वसु, द्रह्यु, अनु आणि पुरु या आपल्या पाचही पुत्रांकडे तारुण्याची याचना केली. १००० वर्षांत सर्व सुखे उपभोगुन निश्चिंतमनाने निवृत्ती स्वीकारता येइल असे त्या बिचार्‍याने ठरवले होते. पहिल्या चार पुत्रांनी पित्याच्या क्षोभाची तमा न बाळगता या असमान आणि अन्य्याय्य मागणीला चक्क नकार दिला. त्यांनी पदोपदी विषयवासना उपभोगाने शमत नाही तर वाढतच जाते. भोग हे यज्ञात आहुतीत पडलेल्या तूपाचे काम करतात आणि विषयवासनांची वन्ही वाढवतच जातात हे त्या अभाग्याला समजावण्याचे प्रयत्न केले पण सदसद्विवेकबुद्धी गमावलेल्या त्या राजाने उलट त्या चौघांनाच शाप दिले. यदुला शाप मिळाला की त्याचे वंशज कधीही राजे बनु शकणार नाहीत तर तुर्वसुला लवकरच अधोगती होउन निर्वंश होण्याचा शाप मिळाला. द्रह्युला नामधारी राजेपण मिरवण्याचा शाप मिळाला तर अनुकडून आणि त्याच्या वंशजांकडुन यज्ञयाग करण्याचा अधिकार काढुन घेतला गेला. पाचवा पुरु मात्र पहिल्या चार जणांची अवस्था बघुन शहाणा झाला असावा आणि त्याने नम्रपणे पित्याचे वार्धक्य स्वीकारले. त्याला मात्र १००० वर्षांनंतर राज्य मिळाले आणि समृद्ध राज्याचा वारसा देखील. यदुच्या वंशातच पुढे यादव आणि यादव वंशात कृष्ण जन्मला तर द्रह्युच्या वंशात पुढे भोज आणि त्याच्या वंशात पुढे नामधारी राजे जन्मले ज्यांना कधी कंस / जरासंधांनी खुळ्खुळ्यासारखे स्वार्थासाठी वापरले तर कधी त्यांनी राजे असुनही कृष्ण / बलरामाच्या सावलीत नामधारी बनून राहणे पसंत केले. तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन. पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले. ययातीच्या विषयलालसेने यदु आणि पुरु वंशात एक तेढ मात्र निर्माण केली. असंमजस अविवेकी अविचारी पित्याच्या शापाने एकुणच यदुवंशीयांवर जी संक्रांत कोसळली ती नंतर शतकानुशतके तिचा प्रभाव दाखवत राहिली. यादव वंशाशी वैवाहिक संबंध जोडणे एकुणच आर्यवंशात कमीपणाचे मानले जाउ लागले. यादवस्त्रियांचा सूना म्हणुन स्वीकार तर केला गेला पण यादववंशीय पुरुषांना स्त्रिया भार्या म्हणून देणे हे अधोगतीचे लक्षण मानले जाउ लागले. म्लेच्छ आणि यवन तर देशोधडीला लागलेच पण यादव आणी भोज देखील त्यांच्या १६ इतर प्रजातींसमवेत दुर्लक्षिलेले आणि तुच्छ वागणुकीचे जीवन कंठु लागले. आणि अश्यातच त्या यादववंशात देवकी आणी वासुदेवाच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. कुमारवयातच त्याने कंसाची बीमोड केला. विस्कळीत झालेल्या, स्वाभिमान हरपलेल्या भोज, वृष्णी, अंधक इत्यादी १८ यादवजमातींना एकत्र आणुन त्यांची एकत्र मोट बांधुन त्याने एक बलशाली साम्राज्य उभे केले. अर्थात तो या साम्राज्याचा अधिपती नव्हता केवळ एक सूत्रधार होता. पण ययातीच्या शापाला उलथवुन टाकण्याचा त्याने जणू चंग बांधला होता. वासुदेवाचा मुलाने राजेपद नाही घेतले. ययातीच्या शापामुळे तो राजा बनूही शकत नव्हता. असेही भोजराजांना असलेल्या शापामुळे त्यांच्याकडे नामधारी राजेपद होते आणि सुत्रे सगळी कृष्णाकडे. अलौकिक बुद्धिमत्ता घेउन जन्माला आला होता वासुदेवाचा पुत्र. त्याला मोहुन टाकणार्‍या वाणीची जोड लाभली. त्याला मल्लविद्येची साथ मिळाली आणि सुदर्शनाचे वलय. थोड्याच काळात कृष्णाने स्वत:चा दबदबा निर्माण केला. शाल्वाला मारले , जरासंधाला वेळोवेळी पिटाळुन लावले, युक्तीचे मुचकुंदामार्फत अजेय अश्या कालयवनाला सुद्धा परास्त केले आणि तरीसुद्धा सर्वंकष सत्ता मिळवण्यापासुन तो कोसो दूर होता कारन मद्र, मत्स्य, पांचाल आणि हस्तिनापुर अशी बलिष्ठ राज्य अजुन जगावर राज्य करित होती. त्यातील मद्र, मत्स्य आणि पांचाल तरी अजेय नव्हते पण हस्तिनापुरात भीष्मरुपी खंदक रक्षणार्थ होता त्याच्या साह्यार्थ अस्त्रविद्येत निपुण झालेले पाच पांडव आणि १०० कौरव होते. आताशा कर्ण नावाचा एक अजोड धनुर्धरही दुर्योधनाला मिळाला होता. त्यांना शिक्षण साक्षात परशुरामांकडुन अस्त्रविद्या शिकुन आलेल्या द्रोणांकडुन मिळाले होते. त्यांचा मुलगा अश्वत्थामा हा देखील काही कमी सामर्थ्यवान नव्हता. त्यांचा मेव्हणा कृप तर चिरंजीवीच होता. एकुण तिथे खंद्या महावीरांची रांग लागली होती त्या सगळ्यांना भेदून राज्य मिळवणे केवळ अशक्य. तशीही कृष्णालादेखील फार घाई कधीच नव्हती. यथावकाश १०० कौरव आणि ५ पांडवांमध्ये द्वेषाची ठिणगी पडलीच. सत्तासंघर्ष तीव्र झालाच. हीच संधी साधुन क्रुष्णाला त्याच्या कुंतीबरोबरच्या नात्याची आठवण झाली आणि द्रौपदी स्वयंवरात त्याने त्याच्या ५ आत्येभावांना आपले समर्थन दिले. हस्तिनापुरच्या गुप्तहेरांमार्फत ही बातमी यथोचित धृतराष्ट्रापर्यंत पोचली आणि पांडव + पांचाल + यदु या त्रिकुटाशी कलह टाळण्याचा योग्य निर्णय घेत धृतराष्ट्राने हस्तिनापुरचे विभाजन केले. इंद्रप्रस्थ निर्माण झाले. एक नविन सत्तास्थान निर्माण झाले जे त्यापुढे कायमचे यादवांचे ऋणी राहिले आणि खंदे समर्थक देखील. मग याच पांडवांकडुन कृष्णाने राजसूय करवुन घेतला आणि त्यात बरेच राजे जरी जिवंत राहिले तरी कृष्णाच्या सर्वात प्रबल शत्रुचा घास मात्र कृष्णाने भीमाकरवी घेतलाच. जरासंधाच्या जागी कृष्णाच्या आज्ञेतला जरासंधाचा मुलगा सहदेव बसला. त्या राजसूयाच्या सांगता समारंभात कॄष्णाने त्याच्या मार्गातला दुसरा काटा शिशुपाल देखील काढला. उरता उरले हस्तिनापुर जिथे एक नविनच सत्ताकेंद्र उदयास आले होते. दुर्योधन + कर्ण + शकुनी + ९९ इतर कौरव ही काही भीष्मासारखी सहिष्णु नव्हती. आपल्या राज्याची सीमांचे रक्षण करणे एवढेच काही त्यांचे उद्देश नव्हते. त्यांना देखील राज्यविस्तार करायचा होता आणि आज ना उद्या तो यादवांना तापदायक ठरणार होता. कौरवांनी पहिला घास त्यांच्या चुलत्यांच्या राज्याचा इंद्रप्रस्थाचाच घेतला आणि कृष्णाकडे कपाळावर हात मारुन घेण्याव्यतिरिक्त दूसरा काही उपायदेखील नव्हता. पांडव वनवासात गेले पण त्यापुर्वीच कृष्णाने सुभद्रेमार्फत पांडवांशी आपले नातेसंबंध प्रस्थापित करुन घेतले होते. कौरवांपेक्षा नात्यातले आणि आज्ञेतले पांडव त्याला जास्त जवळचे होते. सत्तासंघर्षाचे राजकारण न कळणारे बलरामादि यादव अजुनही पौरव घराण्याच्या प्रतिष्ठेने दिपुन जात होते. हस्तिनापुरच्या राज्याची वैभवशाली परंपरा त्यांना खुणावत होती. पण कृष्णाला हे पक्के कळुन चुकले होते की सर्वंकष अधिकार गाजवायचा असेल तर सत्ता पांडवांकडे केंद्रित होणे गरजेचे आहे , कौरवांकडे नाही. आपली सर्व शक्ती त्याने पांडवांकडे वळवली पण बलरामादि प्रभावशाली यादवांचे मन त्याला वळवता आले नाही. अखेर जेव्हा समरप्रसंग उद्भवला तेव्हा आपल्या चतुरंगी सेनेचे उदक त्याला कौरवांच्या पारड्यातच टाकावे लागले. तो स्वत: मात्र पांडवांकडे गेला. सात्यकी त्याच्या सेनेसह त्याला जाउन मिळाला. त्यानंतर झालेले अद्भूत समर सर्वांना ज्ञातच आहे. पांडव विजयी ठरले. पण त्या १८ दिवसात म्त्स्य आणि पांचालांचा पुर्ण निर्वंश झाला. भीष्मादि सर्व कुरुवंशीय मृत्यु पावले. हस्तिनापुर होत्याचे नव्हते झाले. त्यांचा शेवटचा राजा धृतराष्ट्र वानप्रस्थात निघुन गेला आणि राज्य पांडवांकडे आले. तो जिवंत राहिला असता तरी नामधारीच असला असता कारण त्याची सामरिक ताकद पुर्णपणे संपुष्टात आली होती. त्याचा शेवटचा आणि एकमेव जिवंत यौद्धा अनंत कालासाठी वणवण भटकण्यासाठी निघुन गेला होता. एकमेव जिवित अनौरस मुलगा असुन नसल्यासारखा होता. विजयी पांडव जिंकुनही पुर्णपणे परावलंबी झाले होते. त्यांचाही निर्वंश झाला. या सर्व समरातुन एकच पांडववंशीय कूळ पुढे चालवण्यासाठी जिवंत राहिला तो अर्जुनाचा नातू परीक्षित होता आणि तो कृष्णाच्या भाच्याचा मुलगा होता. अर्धा पुरु आणि अर्धा यदु वंशीय. युद्धानंतर ३६ वर्षे पांडवांनी आणि त्यांच्या मार्फत कृष्णाने निरंकुश सत्ता उपभोगली. या काळात द्वारका हे तत्कालीन समाजातले सर्वात प्रगत आणि संपन्न राष्ट्र बनले. जगातली सर्व राज्ये लयास गेली मात्र त्याची थोडीशी झळही यादवांना बसली नाही. यादवांचे ३ अक्षौहिणी सैन्य कामी आले मात्र ज्या रणांगणावर जमा झालेले झाडुन सगळे अतिरथी महारथी शहीद झाले त्या रणभूमीवर लढलेल्यांपैकी पाच पांडव वगळता जिवंत राहणार्‍या ४ वीरांपैकी २ यादव होते. कृतवर्मा आणि सात्यकी दोघेही जिवंत राहिले. युद्धानंतर स्वतः कृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध, गद, सारण, सात्यकी, कृतवर्मा, सांब अश्या महारथी / अतिरथींनी सजलेले यादव सर्वात सामर्थ्यशाली ठरले. ३६ वर्षांनंतर यादवीत तेही संपुष्टात आले. पांडवही स्वर्गारोही झाले पण निर्नायकी झालेल्या धरेवर राज्य करण्यासाठी एक परीक्षित उरला ज्याने हस्तिनापुरावर राज्य केले आणि त्याच्या जोडीला पांडवांनी व्रजनाथाला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले. व्रजनाथ क्रुष्णाचा पणतू होता. अर्धे राज्य यदुवंशाकडे आले तर उरलेल्या अर्ध्या राज्यावर राज्य करणार्‍या राजाच्या अंगात अर्धे रक्त पुरुचे तर अर्धे यदुचे होते. आणि अश्या प्रकारे एक वर्तुळ पुर्ण झाले. पुरुमुळे यदुचे राज्ये गेले आणि त्याच यदुच्या एका वंशजाने पुरुवंशीय सत्ता उलथवुन टाकत सत्ताकेंद्र परत यादवांकडे वळवले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
कथा
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
समीक्षा
लेख
मत
माहिती
संदर्भ
वाद

प्रतिक्रिया द्या
16264 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

... मैं करु तो साला कॅरक्टर

५० फक्त
Mon, 04/09/2012 - 17:20 नवीन
... मैं करु तो साला कॅरक्टर ढिला है.....
  • Log in or register to post comments

वाचावे ते नवलच... मिपाकर

धन्या
Mon, 04/09/2012 - 17:32 नवीन
वाचावे ते नवलच... मिपाकर लेखनविषयाच्या साथीला अलगद बळी पडतात ब्वॉ. कर्ण झाला, कुंती झाली, कृष्णही झाला पण चिंता करण्याचं कारण नाही. अजून महाभारतातील बरीच प्रभावी पात्रे बाकी आहेत. अजून येऊदया ;)
  • Log in or register to post comments

लौकरच आम्हाला दुकान बंद

मृत्युन्जय
Mon, 04/09/2012 - 17:40 नवीन
लौकरच आम्हाला दुकान बंद करायला लागणार असे दिसतय ;) जौद्या आमी नाही लिहिणार जा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नको!!!

मुक्त विहारि
Mon, 04/09/2012 - 18:08 नवीन
दुकान बंद करु नका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

चंमतग केली राव.

धन्या
Mon, 04/09/2012 - 18:17 नवीन
तुम्ही लिहा. श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्यावरही कुणी लिहा की राव. केव्हापासून ते व्याधाचा बाण अंगठयाला लागून निजधामाला जाणं आणि रुक्मिणीच्या पाठी पाठी येऊन दिंडीरवनात येऊन अठ्ठावीस युगे वीटेवर उभे राहणे यातलं कोडं सुटत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नका हो असली कोडी सोडवत बसू.

मृत्युन्जय
Mon, 04/09/2012 - 18:30 नवीन
नका हो असली कोडी सोडवत बसू. कोनीतरी तुम्हाला लगेच भागवतातले दाखले देइल की कृष्ण एकाचवेळेस त्याच्या १६१०८ स्त्रियांबरोबर रत होउ शकत असे आणि त्याचवेळेस तो त्याची राजधर्माची कामेदेखील करत असे. ही सर्व कृष्णाची माया होती वगैरे. कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. त्यातील राजकारणासाठी हा लेख लिहिला आणी ज्या प्रकारचे राजकारण आहे त्यासाठी माणूस असणे आवश्यक आहे. कृष्णाने कसे पद्धतशीरपणे सर्व शत्रुंना संपवले हे दाखवण्यासाठी हा लेख. वर्तुळ पुर्ण झाले वगैरे सगळे अनुषंगिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

उत्तम लेख. पण काहीसा एकांगी

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 17:35 नवीन
उत्तम लेख. पण काहीसा एकांगी वाटला. कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले. पांडवांनी युद्धानंतर पुढे अश्वमेधादीक असे बरेच श्रौतयाग केले. यादवांनी असे केल्याचे दाखले मिळत नाहीत. यदुवंश फक्त वज्राच्या रूपानेच जिवंत राहिला. वज्रानंतर इंद्रपस्थाचे पुढे काय झाले ते माहीत नाही. द्वारका तर लयास गेली. पण परिक्षितानंतर जनमेजय अशी कुरुवंशीयांची साखळी चालूच राहिली (मातुल घराण्याच्या नावाने ते कधीच ओळखले गेले नाहीत)
  • Log in or register to post comments

+१

प्रास
Mon, 04/09/2012 - 17:57 नवीन
वल्लीशेठांशी सहमत आहे. लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच. एकूण लेख चांगलाच झालाय फक्त उपरोल्लेखित बाबी वगळता. आणखी एक सुधारणा सुचवतो.
तुर्वसुचे वंशज नंतर यवन म्हणुन हिणवले गेले तर अनुचे वंशज म्लेंच्छ म्हणुन.
असं नसून अनुचे वंशजच यवन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडून यज्ञाधिकार काढलेला असल्यामुळे त्यांना म्लेंच्छ ही संज्ञा मिळाल्याचे वाचलेले आठवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुर्वसुंलाच निर्वंश होण्याचा

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 20:02 नवीन
तुर्वसुंलाच निर्वंश होण्याचा शाप मिळाला होता. शिवाय त्याला तू म्लेच्छांचा राजा होशील असेही म्हटले होते. म्लेंच्छ हे अरबी लोक. (म्लेंच्छ आणि यवन हे दोन्ही वेगळे) तर अनुचा यज्ञयागाचा अधिकार हिरावला गेला होता. ह्या अनुने पुढे सध्याच्या ग्रीसच्या जागी राज्य स्थापन केले असावे. त्या प्रांताला मौर्यकाळात आयोनिया म्हटले जात असे. आयोनियावरून आलेले ते यवन(ग्रीक) अशी व्युत्पत्ती रूढ झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

>>>लेख काहीसा एकांगी आणि आधीच

प्यारे१
Tue, 04/10/2012 - 11:39 नवीन
>>>लेख काहीसा एकांगी आणि आधीच निश्चित केलेल्या शेवटाकडे जाणारा वाटला. वल्ली म्हणतायत तसं परिक्षित, जनमेजय हे कुरू वंशीय म्हणूनच राहिले, मानले गेले तरी त्यांच्यातलं यादवांचं रक्त काहीसं दुर्लक्षित राहतं हे खरंच आमचे मत अधोरेखित शब्दांना! कृष्णाला पण आज हा लेख वाचून 'मायला, मला असं करायचं होतं काय?' असं वाटेल! त्याचं काय आहे? कोणी काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आम्ही फक्त आमचं मत मांडलं. झैरातः चष्मे घ्या चष्मे! आमचे येथे पांढर्‍याला 'डार्क काळं' (डार्क मधला क पूर्ण) नि काळ्याला 'शुभ्र पांढरं' दाखवणारे चष्मे घाऊक दरात बनवून मिळतील...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

जोरदार आक्षेप !!!

धन्या
Mon, 04/09/2012 - 18:24 नवीन
कृष्णाने युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण दुर्योधनाच्या हटवादीपणापुढे त्यालाही नमते घ्यावे लागले.
या वाक्याला जोरदार आक्षेप. कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार असून "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम" म्हणत भूतलावर अवतरला होता. कौरव पांडव केवळ निमित्तमात्र होते. कर्ता करविता श्रीकृष्ण होता. तोच पृथ्वीवरील दुर्जनांचा भार उतरण्यासाठी या सार्‍या लिला घडवत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कर्ता करविता श्रीकृष्ण

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 19:54 नवीन
कर्ता करविता श्रीकृष्ण होता
नाही हो धनाजीसाहेब. हतोत्साहीत झालेल्या अर्जुनाला प्रोत्साहित करण्यासाठी हा केलेला एक उपदेश होता. उपदेशात समजावण्याच्या दृष्टीने कमीअधिक सांगितले जातेच. ;) बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बाकी व्यासांनी केलेले

धन्या
Mon, 04/09/2012 - 20:11 नवीन
बाकी व्यासांनी केलेले कृष्णाचे चित्रण त्याला माणूस कल्पूनच केले आहे. कृष्णाची जी काही चमत्कारी वर्णने आली आहेत ती जास्त करून प्रक्षिप्त आहेत.
वल्लीशेठ, माझ्या प्रतिक्रियेत उपहास होता हो. :( महाभारत खरंच घडलं होतं की नाही हे तो भगवान श्रीकृष्णच जाणे. पण जर महाभारत हे काव्य मानलं तर "जय" लिहिणार्‍या व्यासांच्या प्रतिभाशक्तीला दाद दयावी तेव्हढी कमीच आहे. मानवी नात्यांमधील गुंतागुंतीचे, माणसांच्या गुणावगुणांचे इतकं सुंदर चित्रण दुसर्‍या कुणीच केलं नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत आहे.

प्रचेतस
Mon, 04/09/2012 - 20:17 नवीन
सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पूर्ण

तिमा
Mon, 04/09/2012 - 19:29 नवीन
वर्तुळ हे 'पू' दीर्घ लिहिल्याशिवाय 'पूर्ण' होऊ शकत नाही. भैरप्पांनी सुद्धा कोणालाही देवत्व न देता 'वस्तुनिष्ठ' दृष्टिकोन ठेवून याविषयांत चांगले लिहिले आहे. तसा प्रयत्न तुम्ही केल्याबद्दल आभार. पण तरीही लेख समतोल वाटला नाही हे नोंदवू इच्छितो. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. अवांतर : सध्ध्याच्या राजकारणातील कोणी 'यादव' पण अशा निरंकुश सत्तेची स्वप्ने पहात असेल का ?
  • Log in or register to post comments

बरीच माहिती

पैसा
Mon, 04/09/2012 - 19:39 नवीन
अनेक ठिकाणी असलेली बरीच माहिती एकत्र करण्याचं काम छान केलं आहे. म्हणजे असं की हे सगळे तुकदे आपल्याला माहिती असतात. पण त्यांचा आपापसात काय संबंध असतो यावर आपण फार विचार करत नाही. लेख उत्तम. वेगळी काही तत्थ्य असतील त्याबद्दल चर्चा व्हायला नक्कीच जागा आहे.
  • Log in or register to post comments

महाभारत युद्धाची कारणे

चित्रगुप्त
Mon, 04/09/2012 - 20:18 नवीन
कौरव - पान्डव शत्रुत्वाखेरीज महाभारतीय युद्धाची कारणे आणखी काय काय असावीत, यावर थोडासा प्रकाश या लेखातून पडतो, परन्तु ज्या विराट प्रमाणावर हे युद्ध झाले, आणि त्यात त्याकाळचे अनेकानेक राजे सहभागी झाले, ते बघता आणखीही व्यापक असे तात्कालीन राजकारण यात असावे, असे वाटते. म्हणजे कौरवांच्या वा पांडवांच्या बाजूने लढण्यात त्या त्या राजांचा काय फायदा होणार होता, वगैरेवर वाचायला मिळाल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments

श्रेष्ठ....

मन१
Mon, 04/09/2012 - 21:16 नवीन
महाभारतावर येणार्‍या लेख्,प्रतिसादांपैकी एक श्रेष्ठ लेख. मलाही काहिसे असेच वाटायचे पण उगा लोकापवदाचा त्रास कशाला ओढून घ्या म्हणून सोडून देत होतो. अर्थात, इतके उत्तम मलाही मांडाता आले नसतेच. बादवे लग्नसंबंध ठेवणारे कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! आज त्याच कुरुंचे वंशज म्हणवणारे आर्यावर्ताच्या भूमीत ऑनर किलिंग का करत सुटले आहेत म्हणे मग? त्यांना द्यायचा का हा दाखला? बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? एक दोन ठिकाणी सामराज्य हा शब्द खटकला. काशी-मथुरा-इंद्रप्रस्थ्-हस्तिनापूर ही थोड्याफार फरकाने सिटी स्टेट्सच* होती. *अथेन्स्,स्पार्टा,ट्रॉय्,मॅसिडोनिया ह्या ग्रीक शहर राज्यांप्रमाणेच
  • Log in or register to post comments

बादवे एक शंका महाभारत काळात

धन्या
Mon, 04/09/2012 - 21:32 नवीन
बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला?
पॉईंट आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

>>>बादवे एक शंका महाभारत

बॅटमॅन
Tue, 04/10/2012 - 01:23 नवीन
>>>बादवे एक शंका महाभारत काळात इतका सगळा धिंगाणा सुरु असताना एकेकाळचे बलाढ्य सूर्यवंशीयांचे कोसल(प्रभू श्रीरामाचे) , बिहार्‍यांचे जनक कुठे होते? त्याचा प्रभाव कधी आणि कसा कमी होत गेला? प्रभाव कसा आणि कधी कमी होत गेला ते नाही माहिती. पण रामपुत्र लवाने लाहोर शहर स्थापिले अशी माहिती वाचलेली आठवते. तसेच रामाचा महाभारतकालीन वंशज म्हणजे अयोध्येचा राजा बृहद्बल , हा युद्धात कौरवांच्या बाजूने लढला. http://en.wikipedia.org/wiki/Ikshvaku_dynasty
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

ब्रुहद्बल कोसलेचा राजा ना?

मृत्युन्जय
Tue, 04/10/2012 - 10:49 नवीन
ब्रुहद्बल कोसलेचा राजा ना? अयोध्येवर बहुधा दिर्गज्ञ राज्य करत होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हो. कोसलराज

प्रचेतस
Tue, 04/10/2012 - 11:20 नवीन
हो. कोसलराज बृहद्बल. दिर्गज्ञाबद्दल वाचलेले नाही पण कोसलराज्यातच अयोध्या असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाही कोसल वेगळे. अयोध्या

मृत्युन्जय
Tue, 04/10/2012 - 13:16 नवीन
नाही कोसल वेगळे. अयोध्या वेगळी. दिर्गज्ञाचा उल्लेख अर्जुनाच्या राजसूयाच्या वेळच्या लढाईत आणि कर्णाच्या दिग्विजयाच्या वेळेस येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

'कोसल' ची राजधानी 'अयोध्या '

sagarpdy
Tue, 04/10/2012 - 15:19 नवीन
बाकी जास्त माहिती नाही, पण ईयत्ता ६ वी च्या ईतिहासाच्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे 'कोसल' ची राजधानी 'अयोध्या ' होय. [कोसल हे प्राचीन भारतातील सर्वात मोठ्या ४ राज्यांपैकी एक]. हि माहिती येथेही सापडेल. नंतर च्या काळात कोसल राज्याचीच 'versions' अस्तीत्त्वात आली. ' दिर्गज्ञ' हा त्यातील मूळ राज्यावर राज्य करीत होता आणि ब्रुहद्बल या दक्षिण कोसालावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कुरु आणि यदु एकाच वंशातले?

मृत्युन्जय
Tue, 04/10/2012 - 10:57 नवीन
कुरु आणि यदु एकाच वंशातले? ययातीच्या? शांतम पापम्...शांतम पापम.... सगोत्री झालं की ते! हॅ हॅ हॅ. याला समगोत्री म्हणताय होय हो? वेद / पुराणकालीन बाकीचे वैवाहिक संबंध ऐकले तर दरदरुन घाम फुटेल त्या खाप पंचायतीला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

@कृष्णदेखील एक माणूसच होता हे

निनाद मुक्काम …
Mon, 04/09/2012 - 21:47 नवीन
@कृष्णदेखील एक माणूसच होता हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणुनच हा लेख. ह्याच दृष्टीकोनातून थोर अर्थतज्ञ गिरीश जकाडिया ह्यांचे मराठीमधील हे अप्रतिम पुस्तक आंतराष्ट्रीय ख्यातीच्या हा मारवाडी मनुष्य महाराष्ट्रात जन्मल्यामुळे स्वतः १०० टक्के महाराष्ट्रीयन समजतो. ह्यांनी बहुतांशी पुस्तके हि मायमराठी मध्ये लिहिली आहे. त्यात एन्रोन कंपनीचा उदयास्त वंश ह्यां कांदबरीत तर स्वतःचे आत्मचरित्र व त्याजोगे मारवाडी समाजाचे जीवन शैली व मानसिकता त्यांनी एका मारवाड्याची गोष्ट मध्ये साकारली आहे. http://www.girishjakhotiya.hdfcbanksmartbuy.com/Products/Jakhotiya-And-Associates-Books-Marathi/Jakhotiya--Associates/Krishna-Niti-%28Marathi%29/pid-471298.aspx कृष्णाने एका मात्तबर महास्त्ते प्रमाणे दुधाचे राजकारणासाठी हे महाभारत घडवून आणले. हे अर्थ शास्त्रीय दृष्ट्या प्रस्तुत पुस्तकातून सांगितले आहे. एका वेगळ्या दृष्टीकोनातून महाभारताकडे पाहणारे डॉ गिरीश किंवा आपले धनंजय ह्यांची मते एखाद्याला पटो अगर ना पटो मात्र एका वेगळ्या चष्म्यातून ह्या विषयाकडे पाहायला ते वाचकांना प्रवृत्त करतात.
  • Log in or register to post comments

पुरु/कुरु

कवितानागेश
Mon, 04/09/2012 - 21:48 नवीन
पुरुच्या वंशात मात्र पौरव (अथवा कौरव ) जन्माला आले आणि त्याचे वंषज कुरु म्हणुन प्रसिद्ध झाले.> ही माहिती कुठुन मिळाली? --चुरुचुरु मुरुमाउ ;)
  • Log in or register to post comments

महाभारतात आहे की सगळा

प्रचेतस
Tue, 04/10/2012 - 08:46 नवीन
महाभारतात आहे की सगळा ययातीवंश. पुरुनंतर कित्येक पिढ्यांनंतर दुष्यंत, भरत झाले, त्यानंतर अजमीढ इ.राजांनंतर काही पिढ्यांनी संवर्तन राजा झाला. ह्या संवर्तनाचा पुत्र कुरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अजून येऊ दे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/09/2012 - 21:49 नवीन
लेख आणि लेखाची मांडणी आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कृष्ण याकडे आपण देव म्हणुन

प्राध्यापक
Mon, 04/09/2012 - 22:47 नवीन
कृष्ण याकडे आपण देव म्हणुन पाहतो,पण त्या काळचा संदर्भ लक्षात घेता,कृष्ण एक उत्तम मुसद्दी राजकारणी होता यात काही संशय नाही.
  • Log in or register to post comments

छान माहिती

निशदे
Tue, 04/10/2012 - 01:39 नवीन
चांगली माहिती. कृष्ण आद्य राजकारणी होता. अतिशय धूर्तपणे सगळे डाव खेळत राहिला........ कौतुक करावे अशी cunning बुद्धिमत्ता.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 04/10/2012 - 09:08 नवीन
सहमत :) . अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे

शंका.. ययाती

सूर्यपुत्र
Tue, 04/10/2012 - 12:00 नवीन
त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.
असे असूनही त्याची शापवाणी खरी ठरण्याची कारणे काय? कारण शापवाणी खरी ठरण्यासाठी ब्रम्हचर्याचे, नैतिकतेचे अधिष्ठान वगैरे लागते असे ऐकीवात होते.... -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

हा नियम बापाने मुलांना

मृत्युन्जय
Tue, 04/10/2012 - 15:08 नवीन
हा नियम बापाने मुलांना द्यायच्या शापांना लागू होत नसावा बहुधा. अन्यथा पित्याच्या विषयसुखासाठी भीष्मप्रतिज्ञा करणार्‍या भीष्माला त्याच्याच पित्याकडुन इच्छामरणाचा आशिर्वाद मिळुनही उपयोग नव्हता :) असो. ययाति राजधर्म विसरला होता हे वि स खांडेकरांच्या ययातिमधुन घेतलेले आहे. मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

>>>मूळ महाभारतानुसार तो

प्यारे१
Tue, 04/10/2012 - 15:14 नवीन
>>>मूळ महाभारतानुसार तो न्यायी राजा होता आणि त्याने प्रजेची काळजी घेत १००० वर्षांपेक्षा आधिक काळ राज्य केले. ___/\___ चालूच द्या आतातर! ह्याला म्हणायचं पराचा कावळा करणं! आधी संदर्भ सोडून/ चुकीचे संदर्भ घेऊन काहीबाही लिहायचं नी नंतर.... आपापली इन्टरप्रिटेशन्स आकारत बसायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर!

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/10/2012 - 14:00 नवीन
लेख अतिशय सुरेख आणि मुद्देसुद आहे. अशा प्रकारे दुसरी बाजू मांडणारे लिखाण देखील येणे आवश्यकच आहे. अर्थात 'एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो' ह्या जालावरच्या सुप्रसिद्ध वाक्याची पुन्हा एकदा काही प्रतिक्रिया वाचून प्रचिती आलीच. महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी.
  • Log in or register to post comments

परिकथेतील राजकुमार साहेब , एकदम सहमत

निश
Tue, 04/10/2012 - 18:42 नवीन
परिकथेतील राजकुमार साहेब , एकदम सहमत ह्या वाक्याशी... महाभारतात सगळी प्यादीच. खेळाडू दोनच : एक श्रीकृष्ण आणि दुसरा शकुनी. खरय हेच दोघे होते जे खर तर डोक्याने लढत होते. दोघांमध्येही कुटनिती पुरे पुर भरली होती. श्रीकृष्ण याने त्याचा वापर योग्य वेळी केला तर शकुनी त्याच बाबतित थोडा कमी पडला. नाहितर द्युताच्या प्रसंगी जरासंधाच्या हाडाचे फासे हे तर शकुनीच्या अस्सल कुटनितीची परिसीमा म्हणता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

माझ्या माहितीनुसार आणि

५० फक्त
Tue, 04/10/2012 - 19:15 नवीन
माझ्या माहितीनुसार आणि अल्पमतीनुसार जरासंध हिंदु असावा, तो मेल्यावर त्याला जाळलं असेल मग त्याची हाडं कुठुन आली फासे करायला,? हां आता जरासंध नावाचा हत्ती होता असं उत्तर आलं की झालं वर्तुळ पुर्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अहो ५०,दुसर्‍या दिवशी

प्रचेतस
Wed, 04/11/2012 - 06:46 नवीन
अहो ५०,दुसर्‍या दिवशी सावडतांना गोळा केली असतील की. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

५० फक्त साहेब, माणुस मेल्यानंतर त्याला जाळतात मग ...

निश
Wed, 04/11/2012 - 11:04 नवीन
५० फक्त साहेब, माणुस मेल्यानंतर त्याला जाळतात मग तो सगळा मेल्यानंतर त्याची राख व हाडे ही असतात उरलेली त्यालाच अस्थि अस म्हणतात आपल्या हिंदुन मध्ये. अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

<<अगदी देव इन्द्राच वज्र

शिल्पा ब
Wed, 04/11/2012 - 11:08 नवीन
<<अगदी देव इन्द्राच वज्र देखील दधिची ह्या मुनींच्या हाडापासुन बनल आहे. हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

दुरुस्तीला टाकलंय, पुण्याच्या

५० फक्त
Wed, 04/11/2012 - 11:21 नवीन
दुरुस्तीला टाकलंय, पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये, जॉईंट रिप्लेसमेंट करायची आहे त्याची. ते झालं की मग मिळेल बघायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

हे अस्त्र कुठे बघायला

मृत्युन्जय
Wed, 04/11/2012 - 11:26 नवीन
हे अस्त्र कुठे बघायला मिळेल? इंद्राकडे जावे लागेल. अर्जुन सदेह जाउन आला. तुम्हाला जमतय का बघा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कुठेही

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/11/2012 - 12:56 नवीन
हे अस्त्र कुठे बघायला मिळेल?
कुठेही दिसते. अहो हेच काय, सुदर्शन चक्र, आमच्या गणपती बाप्पाचा पाश, शंकराचा त्रिशूळ सगळे सगळे दिसते. फक्त माणूस पुण्यवान हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

छान

lgodbole
Sun, 04/03/2016 - 17:52 नवीन
,..
  • Log in or register to post comments

पुन्हा लेख वाचून मस्त वाटले.

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 17:33 नवीन
पुन्हा लेख वाचून मस्त वाटले. ययातीच्या पाचापैकी तिघा पुत्रांची नावे ऋग्वेदात दाशराज्ञ सूक्तात येतात. हे सूक्त महाभारतापेक्षा प्राचीन आहे. त्यात तुर्वसुला इंद्र सिंधू नदी पार करुन देतो तर अनूला रणांगणावर मारतो तर दुह्युला पाण्यात बुडवतो. महाभारतकारांनी हे तीन पुत्र ययाती कथाविस्तार करण्यासाठी महाभारतात घेतले असावेत.
  • Log in or register to post comments

दाशराज्ञ युद्धावर एक लेख लिही

मृत्युन्जय
Wed, 05/04/2016 - 17:59 नवीन
दाशराज्ञ युद्धावर एक लेख लिही की रे. मला थोडीफार माहिती आहे पण फार विस्कळीत. शिवाय ऋग्वेद देखील वाचलेला नाही. वाचला तरी क्॑ळणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रयत्न करतो. दाशराज्ञ

प्रचेतस
Wed, 05/04/2016 - 18:03 नवीन
प्रयत्न करतो. दाशराज्ञ सूक्तात तशी अल्प माहिती आहे. आणि ऋग्वेदाच्या इतरही मंडलात विखुरलेली आहे. अचूक संदर्भ शोधणे तसे जिकिरीचे आहे.
  • Log in or register to post comments

@मृत्युंजयः धाग्याचा दुवा दिल्याबद्दल आभार

चित्रगुप्त
Tue, 09/05/2023 - 18:08 नवीन
या धाग्याचा दुवा अलिकडील माझ्या धाग्यात दिल्याबद्दल अनेक आभार. वाचून सावकाशीने आणखी लिहीन.
  • Log in or register to post comments

छान!

Bhakti
Tue, 09/05/2023 - 19:52 नवीन
ओह ,ययाती यान्चा देखिल यात समावेश आहे तर..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा