मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृतघ्न -5

बाप्पू · · जनातलं, मनातलं
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 आता पुढे माऊली विचारात पडला कि या बाबतीत स्वतः हस्तक्षेप करावा कि नाही, रामदास ला तुकाराम च्या भरोश्यावर सोडून द्यावे कि आपण मदत करावी. मुलांच्या आणि बायकोच्या कानावर हि गोष्ट कळली तेव्हा त्यांनी या भानगडीत न पडण्याचा सल्ला दिला. त्यांचं तरी काय चुकीचं होत?? ज्यावेळी संधी होती तेव्हा रामदास ने सर्व विसरून चुकीच्या माणसांना निवडले आणि आता वाईट वेळेत आता आपण कश्याला मदत करावी? माऊली मोठ्या पेचात सापडला होता, एक मन म्हणत होते कि कसाही असला तरी त्या माणसाने आपल्या घरी काबाडकष्ट केलेत, सुखाच्या आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणात तो आपल्या सोबत होता त्या माणसाला असं वाऱ्यावर कस सोडायचं? स्वतः चा सक्खा भाऊ इतका बदलला म्हणून मी हि बदलून जायचे.? रामदास ने आपल्या शेतात घाम गाळला आहे, त्याच्यामुळेच इतके वर्ष आपली शेती होऊ शकली मग आता तो थकला म्हणून त्याला वाऱ्यावर सोडून द्यायचे? आणि मग आपण देखील असं वागलो तर आपल्यात आणि स्वार्थी जगात काय फरक? आपल्या तत्वांना आता मुरड घालायची कि ती जपायची? आजवर तत्व पाळून तरी काय भेटले? सरतेशेवटी प्रत्येकाने आपापला स्वार्थच जपला अगदी सक्ख्या भावाने पण. मग आता आपण बदलत्या काळानुसार आपणही बदलायचे कि आपली तत्व जपायची? जाऊदे निदान त्याला बघून तरी येऊ. त्याची भेट घेऊन येऊ असे ठरवून माऊली उठला आणि त्याने लगेचच गावी धाव घेतली. दुसरा दिवस उजाडला, इकडे तुकाराम आणि त्याच्या साथीदारांची लगबग सुरु होती, रामदास ला आज ससून मध्ये ऍडमिट करण्याची तयारी चालली होती. गावच्या रस्त्यावर हा माणूस बेवारस सापडला असं सांगून त्याला तिथं एकदा भारती केले कि 3-4 दिवसाचे पैसे भरून तिथून पोबारा करायचा असं ठरलं होत. सकाळचे 9:30 वाजले असतील, माऊली हॉस्पिटल मध्ये आला. माउलीला पाहून तुकाराम जरावेळ अवघडला, याला हि बातमी कुठून समजली?? माउलीने काहीही न विचारता सरळ रामदास कडे धाव घेतली. माउलीने रामदास कडे पाहिल, रामदास खिन्न नजरेने शून्यात पाहत होता. डोळ्यातून पाणी आले होते पण ते पुसण्यासाठी सुद्धा तो असमर्थ होता. शरीराच्या सर्व संवेदना निघून गेल्या होत्या. डोळयांतून आलेल पाणी सुकून मानेपर्यंत एक पंढरी रेघ उमटली होती. काय झालं मामा, ?? आवाज ऐकून रामदास भानावर आला त्याने माऊली कडे पाहिले, आणि त्याच्या डोळ्यातुन अश्रूच्या धारा लागल्या. काय बोलाव ते समजत नव्हते, तोंडातून आवाज फुटला पण त्या आवाजाला काहीच अर्थ नव्हता, रामदास ला स्वतः लाच समजत नव्हते कि काय बोलावे आणि कुठल्या तोंडाने बोलावे? ज्यावेळी बोलायला पाहिजे होत तेव्हा शांत बसलो आणि आता काय बोलाव? फक्त हूं हूं इतकाच आवाज त्याच्या कंठातून येत होता. माझ्या हातून चूक झाली, मी देवाला सोडून राक्षसाच्या बाजूने झालो. मला माफ करा पण या संकटकाळी मदत करा हेच कदाचित बोलायचे होते पण शब्द फुटत नव्हते. माऊली तिथून बाजूला झाला आणि डॉक्टरांना रामदास च्या केस बाबत विचारले. डॉक्टरांनी सर्व घटनाक्रम सांगितला तसेच त्याला शहरात नेउन आणखी तपासण्या आणि उपचार करावे लागतील हे देखील सांगितले. माउलीने शांत सगळे ऐकून घेतले, तुकाराम तिथेच बाजूला उभा होता. बाजूला ते दोन जण होते ज्यांनी घर फोडण्यात मोलाचा वाटा उचलला होता. माउलीची तुकाराम सोबत बोलण्याची इच्छा नव्हती. आपण कितीही चांगले बोलले तरी समोरून उर्मट आणि आणि माणुसकीहीन प्रतिसाद मिळणार होता हे माहिती होत. तरीही त्याने विचारले कि बापू काय करायचे ठरवलेय आता तू? शहरात न्यायचं असेल तर Dr. जोशी च्या दवाखान्यात नेऊ. बघू तिथले डॉक्टर काय म्हणतायत.! निदान त्याला काय झालंय ते तरी बघू. "अर पण तू कशाला मधी पडतोय, मपल मी बघल कि काय करायच ते. नेईन ससून ला. एकतत्रात असताना तुझ्यागत पैशाच गठुडं नाय बांधून ठुल मी तिकडं जोश्यावर उधळायला. मायाकडं जेवढा पैका हाये त्यात बघलं म्या काय करायचं ती. आणि तुला तरीबी तुला लय चेव आला असलं ना तर ने त्याला दुनियाभर आणि दाखव कुढल्या दवाखान्यात दाखवायचं तिथं." हातातील औषधं आणि बिल त्याने जमिनीवर फेकून दिले. मोठ्या आवाजामुळे आसपास च्या नर्सेस ने तुकाराम ला हटकले. इकडं तिकडं बघून तुकाराम ने आपले बोलणं आवरत घेतलं. माऊली क्षणभर संतापला पण स्वतः च्या रागावर ताबा ठेवून त्याने तुकाराम कडे पाहिले. अरे बापू ज्या माणसाने आपल्या घरी 30 वर्ष कष्ट केल त्या माणसाला असं वाऱ्यावर सोडू नको. मी बघतो काय करायचे ते. तुकाराम पुढं काही प्रत्युत्तर देणार तेवढ्यात त्याच्या जोडीदाराने त्याला न बोलण्याबद्दल खुणावले. पुढे काय होणार हे त्यांना समजले होते. आपल्या डोक्यावरच हे रामदास च ओझं आणि जबाबदारी आपोआप दूर होणार होती अशी चिन्ह दिसत होती, त्यामुळे तुकाराम पण गप्प बसला. माऊली ने रामदास ला शहराकडे न्यायची तयारी सुरु केली, जाऊन हॉस्पिटल चे बिल भरले. बिल भरत असताना तुकाराम बाजूलाच उभा होता पण एक पैसा त्याने दिला नाही. माउलीला हे सर्व अपेक्षित होते पण ते सर्व बोलायची ती वेळ नव्हती. माउलीने निर्णय घेतला होता. रामदास ने जरी चूक केली असली तरी आपल्या घरावरचे त्याचे उपकार आपण विसरून कस चालेल? त्याची काळजी घेणं हि आपलीच जबाबदारी आहे आणि त्यापासून आपण कस काय पळू शकतो? शहराकडे रामदास ला घेऊन जाऊ, आपण बघू तरी कि काय झालेय. जर आपल्या काही प्रयत्नाने त्याचा जीव वाचणार असेल तर आपण तेवढं तरी केले पाहिजे. किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. आजच्या या जगात जिथं पोटाची पोरं आईवडिलांना वार्धक्यात वाऱ्यावर सोडून देतात, आपणही तसेच वागलो तर मग आपल्यात आणि भवनाहीन, माणुसकीहीन स्वार्थी जगात आणि आपल्यात फरक तो काय. विचाराच्या चक्रात तो हरवून गेला होता. माऊलीने रामदास ला गाडीत बसवले. रामदास ला समजत नव्हते कि बाहेर काय चाललेय. पण आता माऊली आपल्यासोबत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी योग्य निर्णय घेतला असणार हे त्याला माहिती होते. तुकाराम गाडी शेजारी उभा होता. आपल्या डोक्यावर अचानक पडलेले हे ओझं आपोआप दूर होणार म्हणल्यावर तो काहीच बोलत नव्हता. कालपर्यंत रामदास त्याला त्याच्या बाजूला हवा होता पण आता तो त्याच्यासाठी अडचण ठरला होता. या कलयुगात कोणावर कोणती वेळ कधी येईल हे सांगता येणे कठीण आणि बदललेली वेळ पाहून कोण कसा आपला रंग बदलेल हे सांगणे महाकठीण. गाडी सुरु झाली रामदास आणि माउलीने तुकाराम चा निरोप घेतला. क्रमश :

वाचने 10890 वाचनखूण प्रतिक्रिया 15

योगी९०० 22/03/2020 - 15:38
हा भाग थोडा उशिरा आला पण छान लिहीलाय. गोष्ट चांगली आहे.

ज्ञानोबाचे पैजार 23/03/2020 - 14:08
पुभालटा पैजारबुवा,
पाचही भाग एकत्र वाचल्यानंतरचा प्रतिसाद. अतिशय ओघवतं आणि उत्कंठा वर्धक लेखन. प्रतिसादांवर अवलंबून राहू नका.... त्या वर लेखनाचा दर्जा ठरत नाही . जे लिहिताय, जसं लिहिताय तसंच लिहित रहा. .....राच्याकने आपला कळप मोठा करून प्रतिसाद वाढवता येतात... काही जणांना.

अभ्या.. 26/03/2020 - 14:41
छान लिहिलीय कथा. सर्वे भाग वाचले. खिळवून ठेवतायसा.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. !!! योगी900, सध्या कोरोना मुळे आमच्या इथे कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे मिपा वर फारसे येणे होत नाही.. पुढचा भाग या शनिवारपर्यंत लिहून होईल.. !