✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

म
मन१ यांनी
Fri, 08/03/2012 - 21:30  ·  लेख
लेख
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते. काही शे सामंतांचे/knights लोकांचे विखुरलेले प्रदेश अशीच ह्यांची रूपे होती. त्यातल्या त्यात एकसंध होता रशिया(आणि ऑस्ट्रियाही), पण तोही मागच्या पन्नासेक शतकात पीटर द ग्रेटच्या काळातच उभा राहू लागलेला. स्वीडन, तुर्कस्थान ह्यांचे काही भाग मारुन समुद्रापर्यंत प्रथमच त्याने सलग अशी रशियन सत्ता प्रस्थापित केली. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, पोलंड हे ही असे बर्‍यापैकी विखुरलेलेच होते. त्यांचे आकार पाहिले तर आपल्या मैसूर(टिपू सुल्तान), हैद्राबाद(निजाम) आणि पुणे-सातारा(पेशवे-छत्रपती) ह्यांच्या राज्यांपेक्षा काही फार मोठे नव्हते. म्हणे भारत विखुरलेलाच होता, "एकसंध" नव्हता. अहो, प्रशिया हा जर्मनीचा आज एक प्रांत आहे. त्या एका प्रांतातील काही भागावर एका घराण्याची सत्ता होती. एकोणीसाव्या शतकात इतरांवर हल्ले करत , ते जिंकत त्याने आजचा जर्मनी म्हणतात त्या धर्तीवरचा सलग देश उभा केला. तीच कथा इटालीची. गॅरिबाल्डी, मॅझिनी ह्यांच्या सशस्त्र क्रांतीमुळे इटाली नावाचे काहीएक एकसंध अस्तित्वात आले. संपूर्ण जग तेव्हा nation , country(राष्ट्र, देश) ह्या शब्दांतील फरक शोधत होतं. nation हे एखाद्या जातीचं, जमातीचं, मोठं रूप(extension) मानलं जात होतं.race आणि nation (वंश/कबिला/टोळी आणि राष्ट्र)ह्या कल्पना एकमेकांना स्पर्श करत होत्या. त्यांच्या सीमा धूसर होत्या. जवळच्या नात्यातील लोक एकत्र आले की कुटुंब बनते. समानता असणारी काही कुटुंबे एकत्र आली की एक वंश, एक राष्ट्र , एक टोळी बलागते.त्यामुळेच कधीकधी भारतातली हरेक जात एक अशीच स्वतंत्र राष्ट्र वाटू लागते. नकाशावरच्या भूभागाला "देश " म्हणतात. देश = जमीन = भूमी बस्स. इतकच. कुटुंब हे चार भिंतीमध्ये/फ्लॅटमध्ये "वसते " तसेच राष्ट्र हे देशात "वसते". राष्ट्र हा चालक असून देश हे चाल्य(गाडी/वाहन) आहे. दोन देश exclusively वेगळ्या भागातच असतात. पण एकाच देशात्/एकाच भूभाग काही वेगवेगळे समाज, वेगवेगळी राष्ट्रे नांदू शकतात. हंगेरी ह्या देशात बराच काळ रोमन आणि हूण ही दोन राष्ट्रे मध्ययुगाच्या प्रारंभी वसत होती; तसेच. घरातून कुटुंब जागा सोडून जाते. तसेच एखाद्या राष्ट्राला एखाद्या देशातून घालवून देता येते. एखादे राष्ट्र एखाद्या देशाचा ताबा घेउन त्याला आत्मसात करते. ग्रीको-रोमन राष्ट्राला तुर्क राष्ट्राने बायझेंटाइन्/तुर्कस्थान "देशातून" काढले तसेच. किंवा "स्पेन्/अल अंदालूस" देशातून अरब राष्ट्र बाहेर फेकले गेले तेराव्या शतकापर्यंत तसेच काहीसे. देश शब्दाची आजची "व्यवस्था"/system ह्याजवळ जाणारी व्याख्या अजून बनायची होती. आज melting pot भासणारी अमेरिका अजून नीट बनलीही नव्हता. जी बनली होती, ती फक्त काही फुटीर सैन्याच्या लोकांची इवल्याशा प्रांतातली सत्ता ह्यापुरतीच मर्यादित होती.(आज जी अमेरिका दिसते त्यात पन्नास राज्ये, तेव्हा ह्यापैकी फक्त पंधरा एक राज्ये अमेरिकेत होती. अमेरिकेच्या पश्चिमेला जमीन होती, समुद्र नाही. ती जिंकून त्यांनी सीमा वाढवत वाढवत समुद्राला नेउन भिडवली.) आज काही प्रमाणात एक संस्कृती एक देश असेही पहायला मिळते, पण "व्यवस्था", "करार" वाल्यांची संख्या सध्या जास्त दिसते. असो. तर अठरावे शतक. तेव्हा खुद्द इंग्लंड -स्कॉटलंड ह्यांच्यात कमी का असेना पण धुसफुशी सुरुच होत्या. आयर्लंडने तर ब्रिटिश सत्ता झुगारुन देत लढा उभा केलेला. अगदि त्याच वेळेला त्याच धर्तीवर पश्चिम्-उत्तर (वायव्य शब्द मुद्दाम टाळतोय) भारतात एक अशीच सत्ता उदयास येउ लागली.शीखांचे राणा रणजितसिंग ह्याच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली एक नवीन सत्ता उदयास आली, प्रस्थापित झाली. ती ह्या राज्यांपेक्षा लहान वगैरे मुळीच नव्हती. आम्ही फुटलेलो होतो, विखुरलेलो होतो वगैरे म्हणतो , ते काही प्रमाणात खरेच आहे. पण फक्त आपणच तसे होतो असे नाही. सर्वत्रच राष्ट्र-राज्ये ही कल्पना अजून अस्तित्वात यायची होती. उगीचच आम्ही फारच मागे पडलो बुवा असे म्हणत ऊठसूट स्वतःला थोबाडित मारुन घ्यायची गरज नाही. ह्याबद्दल जे आणि जसे सुचत जाइल ते प्रतिसादातूंन टंकत राहणार आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
देशांतर
इतिहास
समाज
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
4534 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

विस्कळित विचार आवडले. माझी पण

नितिन थत्ते
Fri, 08/03/2012 - 22:18 नवीन
विस्कळित विचार आवडले. माझी पण विस्कळित भर. राष्ट्र = देश ही स्थिती आलेली नव्हती याच्याशी सहमत. त्यामुळे एतद्देशीयांना एकमेकाच्या विरोधात परक्यांचे साहाय्य घ्यायला अडचण वाटली नसावी. पॉवर पॉलिटिक्समधील आपल्यासारखेच एक खेळाडू असे एतद्देशीय ब्रिटिशांना किंवा फ्रेंचांना समजत असावेत. खरे मागासलेपण हे वसाहत बनल्यावरची धोरणे ब्रिटनच्या आर्थिक हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आखली गेल्यामुळे आले. महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे प्लासीची लढाई १७५७ मध्ये झाली आणि इंग्लंडमधील औद्यिगिक क्रांती त्यानंतर झाली. औद्योगिक क्रांती वसाहतीमधल्या संपत्तीतून फायनान्स झाली होती. वसाहत झाली नसती तर भारतात रेनेसां किंवा औद्योगिक क्रांती आली असती की नाही हे सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर ! खुप छान विवेचन

अशोक पतिल
Fri, 08/03/2012 - 23:35 नवीन
अगदी बरोबर ! खुप छान विवेचन . राष्ट्र हि संक्ल्पना खरी तर १७ / १८ शतकातील . त्यावेळी इंग्लंड, जर्मनी, रशिया,स्पेन इ . राजघराण्यातील विवाह हे आपआपसात होत . एक वंश, हे एक राष्ट्र पेक्षा कदाचीत वरचढ असावे .
  • Log in or register to post comments

आर्थिक, व्यापारी, सामरिक,

अपूर्व कात्रे
Fri, 08/03/2012 - 23:41 नवीन
आर्थिक, व्यापारी, सामरिक, राजनैतिक, आणि वैज्ञानिक क्षेत्रात ब्रिटीश तत्कालीन भारतीयांपेक्षा पुढारलेले असल्याने व त्यांनी वसाहतवादाच्या दृष्टीकोनातून भारताचे महत्व जाणलेले असल्याने त्यांची भारतावर सत्ता आली. त्यावेळी फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी युरोपियनसुद्धा भारतात वसाहती करण्याच्या प्रयत्नांत होते. मात्र युरोपातील राजकीय परिस्थितीमुळे दोघांनाही ब्रिटीशांच्या विरोधात जाऊन भारतातील वसाहती वाढवणे जमले नाही. डच लोक तसेही भारतात वसाहतीसाठी उत्सुक नव्हते. नितीन थत्ते यांच्या वरील प्रतिसादाशी सहमत आहे. मात्र, ब्रिटीशांनी भारतात वसाहत केली नसती तर इथे औद्योगिक क्रांती झालीच नसती असे नाही. कदाचित वेळ लागला असता. कदाचित आत्ता आहे त्यापेक्षा regional imbalance जास्त असता. मात्र कधी ना कधी औद्योगिक क्रांती भारतातही झालीच असती.
  • Log in or register to post comments

मात्र कधी ना कधी औद्योगिक

आत्मशून्य
Sat, 08/04/2012 - 02:04 नवीन
मात्र कधी ना कधी औद्योगिक क्रांती भारतातही झालीच असती.
जशी प्रगती ऐटीत १९९५ नंतर झालीय अगदी तशीच औद्योगिक क्रांती भारतातही झालीच असती :)
उगीचच आम्ही फारच मागे पडलो बुवा असे म्हणत ऊठसूट स्वतःला थोबाडित मारुन घ्यायची गरज नाही.
हा लेख वाचुन थोबाडित मारुन घ्यायची जास्तच गरज वाटतेय.. म्हंजे त्ये बी जवल्पास आमच्यावानीच फुटलेले इखुरलेले असुनही, फक्त आम्हीच गुलाम राय्लो ? आमच्याच परीसरातला सोन्याचा धुर आटला ? अनं पुना आमाला या शांततेचा अभिमानही आहे की बॉम्बस्फोट अतिशय कमी तिव्रतेचा होता नी मनुश्यानीही झाली नाही ? - Game of Thrones चा निस्सीम चाहता.
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

रामपुरी
Sat, 08/04/2012 - 03:08 नवीन
जर राष्ट्र हि संकल्पना १७ / १८ शतकातील आणि "एक वंश" हे "एक राष्ट्र"पेक्षा वरचढ असेल तर चंद्रगुप्त मौर्याने जे साम्राज्य उभारले आणि त्याच्या नातवापर्यंत (सम्राट अशोक) जे टिकून होते त्याला काय म्हणता येईल? कि हे एकत्रीकरण - विभाजनाचे एक अव्याहत चालणारे चक्र असावे? उदा. युरोप विभाजित होता मग आर्थिक एकत्रीकरण झाले आणि आता परत एकदा विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे :) :) आपल्या देशाचे परत विभाजन होऊ नये एवढीच इच्छा! आमेन
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सहज
Sat, 08/04/2012 - 11:14 नवीन
अफ्रीका, आशीया, मधे आज आपण ओळखतो तसे अनेक देश दुसर्‍या महायुद्धानंतर अस्तिवात आले. पश्चीम युरोप (इंग्लड, फ्रान्स, जर्मनी)मधे व भारतामधे औद्योगीक क्रांती अगोदर (साथीचे रोग, जिवितहानी, सामाजीक/आर्थीक विषमता, आरोग्य,) फार काहीसा फरक नव्हता.
  • Log in or register to post comments

निरागस प्रश्न..

स्पा
Sat, 08/04/2012 - 11:24 नवीन
माझा एक निरागस प्रश्न.. खंडांच्या ,देशांच्या , राजांच्या, जिल्ह्याच्या, तालुकाच्या , गावाच्या अधिकृत सीमारेषा कशा काय आणि कधी ठरवण्यात आल्या ?
  • Log in or register to post comments

पुरवणी/supplements

मन१
Sat, 08/04/2012 - 12:14 नवीन
मूळ विषयाबद्दल जे आणि जसे सुचत जाइल तसे टंकायचे ठरवले आहे. हा पुढील भागः- हे सगळं आत्ताच डोक्यात का आलं? "थुत् तुम्हा भारतीयांच्या .एकसंध म्हणूनही कधी रहायची अक्कल नव्हती. तुम्ही खरोखरीचे कमअस्सल "असं कुणी तरी संभाषणादरम्यान काल म्हणालं. त्यानंतर जी (शाब्दिक) हाणामारी झाली, त्यातला माझा प्रतिक्रियेचा एकूण ढाचा इथे माडलाय. "आम्ही ब्रिटिश्", "आम्ही अमेरिकन" , "आम्ही चायनीज/मँडरिन" अशी स्वत्वाची जाणीव identity इतर ठिकाणी पूर्वीपासूनच होती, तेव्हाही तुम्ही स्वतः कोण आहात ह्याची अक्कल नव्हती असे तो म्हणाला. "तुमच्याकडे जाणीव फक्त् एवढीच की आम्ही अमुक एका जमीनदाराचे , warlord चे चाकर." तो संपला की तुमची ओळखही संपली. तुम्हा भारतीयांची सलग अशी काहीही आयडेंटीटी नव्हती. वगैरे छापाचं एक भारतीयच बोलताना पाहून आम्ही पेटलो. भारत एकसंध होण्यात भाषेची तितकी अडचण वाटत नाही. आपलेपणा जाणवणं हे महत्वाचं. दिल्लीच्या माणसाला चेन्नै किंव बेंगलोरला जाताना "यहीं तो जाना है" किम्वा "उसमे क्या बडी बात है" असे वाटू लागेल तर हे नक्कीच शक्य आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घ्या. नागपूर, पुणे, मुंबै, कोल्हापूर , औरंगाबाद म्हटले तर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण महाराष्ट्राचे सामाजिक अभिसरण उत्तम सुरु आहे. इकडच्या कित्येक लोकांचे नातेवाइक आता तिकडे आहेत. पाकिस्तानच्या बाबत् उलट् होते आहे. काही हजार वर्षे त्यांचे सामाजिक लागेबांधे दक्षिण आशियाशी होते. पण आता (उच्चभ्रूंच्या आणि धार्मिक लोकांच्या) घरोघरी दुबै, इजिप्त असे कुठेही नातेवाइक भरपूर सापडतील. त्यांच्या टीव्हीवर वगैरे तिथल्या घटानांची अधिक दखल घेतलेली आढळेल . लग्नसंबंधाने हे घडते आहे. तिथे सरकार समर्थित प्रोपागेंडा असा आहे की आपण पाकिस्तानी पूर्वीपासूनच अरब नि पर्शियन जगाशी जोडलेलो होतो. आज पाकिस्तान म्हणतात तिथे पूर्वी प्राचीन काळी धड स्थित असे काहीही नव्हते. नागर समाज वगैरे नव्हता. काही फुटाकळ लोकांच्या विरळ वस्त्या होत्या. तो जाहिल, रानटी लोकांचा काळ. "जाहिलियत " त्यास म्हणता यावे. कासिम नामक भला माणूस इथे आला. ह्या बहुतांशाने रिकाम्या प्रदेशात त्याने वस्ती केली. शहरे वसवली. न्यायाचे राज्य, काय्दा सुव्यवस्था प्रस्थापित केली. स्थिर शासन दिले. त्याच्या भल्या आचरणातून इथल्या काही अल्पसंख्य रानटी लोकांनाही सत्याची जाणीव झाली. व ते स्वतःहून कासिमला जॉइन झाले. कसलीही जोरजबरदस्ती झाली नाही. सर्वांना समान वागवणारा असा हा आमचा राष्ट्र पुरुष पाच सात वर्षांच्या सत्तेनंतर जिथून आला होता तिथे परतला.(बहुदा बगदाद) पाकिस्तानचा "राष्ट्र" बनण्याचा प्रयत्न हा असा आहे. भारत वेगळ्या मार्गावरून जातो आहे. आम्ही एकसंध नाहीत. पण आमच्यात एक धागा अशी ही कल्पना आहे. आपण वेगळे असलो तरी तुला मारलं की मला दुखतं अशी काहीशी एक कल्पना आहे. मध्यमवर्गानं ही स्थापित होण्यास नकळातपणे फार मोठा फातभार लावलाय. भारत ही "संकल्पना" जाणवून घ्यायची असेल तर तुम्ही सलग पाच-सात वेळेस मूळ "मिले सूर मेरा तुम्हारा" हा सुंदर मैफिल पाहिली पाहिजे. साध्या साडीतली कुलीन गुजराती स्त्री "बणे सूर जो तारो मारो बणे आपणो सूर निराळो" असं काहीसं म्हणते ; पूर्वेकडच्या राज्यात कुणीतरी " सृष्टी होउ कोइ कोतान्/कोइ कोशू" अशी सुरेल कुणी हाक देतं, मराठीत फिल्मस्टार तनुजा "तुमच्या माझ्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा" म्हणत समेवर येते. अहाहा. सुरेख. सुंदर. त्या गीतातल्या सगळ्याच भाषा समजतात असे नाही, पण खूपच प्रसन्न वाटते. "मला तुमची भाषा येत नाही पण मी तुमच्या भावना समजू शकतो" ह्या अर्थाचे काहीसे हे भारतीय संघराज्य एकत्रित आहे. ह्यात भाषाभिमानी अतिप्राचीन वाङ्मयासोबत तमिळ आहेत, बाबो मोशाय त्याच्या मिठायांसोबत आहे, नेकिचा नोकरदार नि कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी मराठीही आहे. परंपराप्रिय राजपूत्/राज्स्थान हे आहेत नि आमचेच निसर्गाच्या सहवासात राहणारे उडिया लोकंही आहेत. दिल्लीकडच्यांना अकबराबद्दल प्रेम्/आदर आहे ना, असूं देत, त्याचं (मेवाडी)राजपूतांना आदरस्थानी असणार्‍या राणा प्रतापाशी युद्धही झालं होतं ना? असूंदेत. तरीही आम्ही दोन्हीचा सांस्कृतीक वारसा सांगू. कुणीकडून काय मिळालं हे मांडू. "मिले सूर मेरा तुम्हारा " च्याच धर्तीवर, त्या दर्जाची नसली, काहीशी populist वाटली तरी "तारक मेहता का उल्टा चश्मा" मध्ये ही भारताच्या वैविध्याची नि एकतेचीही कहाणी मस्त मांडलिये. म्हणजे, तो कथेचा मूळ गाभा नसेलही, पण प्रत्येकाला त्यात आपलच, किंवा आपल्या जवळच्यांचं representation सापडतं. एका हिंदी सिरियलमध्ये " पापड कसले बनवतेस तू माधवी" म्हणणारा मराठी श्रीयुत भिडे नि कच्छवाले(गुजराती) जैन व्यावसायिक जेठालाल एकमेकांची सुमडी सुमडीत खेचू पाहतात. पण खरच अवघड वेळ आली तर भिडेला जेठालाल ला सोडून जेवणही जात नाही. अर्थात जेठालाल सुटला की ह्यांचे पुन्हा ट ऑम अ‍ॅन्ड जेरी सारखे उद्योग सुरुच. सोसायटीच्या बाहेर व्यवसाय करणारा अब्दुल त्यांच्या परिवाराचाच एक सदस्य आहे. सरदारजी त्यांच्या पारशी बायकोसाबत धमाल आणताहेत. ते मद्राशाला(हौ. सगळे साउथ इंडिअन हे मद्राशीच असतात.) छोले भटुरे आठवणीनं आणून देतात , मद्राशी सगळ्या उत्तर भारताच्या उत्सवात सहभागी होताना दिसतो. "आपण वेगळे आहोत पण आपण शत्रू नाहीत" अशी काहीशी ही भावना आहे. सध्याची भारत ही संकल्पना यशस्वी झाली तर ती जणू एका मोठ्या प्रच्चंड मोठ्या कोलाज च्या रुपातील असेल. मोठा कॅनव्हास, अनेकानेक रंग तरी त्यांची एकमेकांना सोबत. एकजिनसीपणा नाही, पण एकत्रित बांधणी पक्की आहे. एकाच पुस्तकात प्रत्येक पान वेगवेगळ्या रंगाचं असावं तरीही त्याची बायंडिंग घट्ट असावी, तसच काहीसं. कालच एक सिनियर सहकारी, सरदारजी "नामदेव की बाणी कहां से मिली " असं मला मी वाचायच्या प्रयत्नात असताना म्हणाले. म्हटलं नामदेवाचा जन्म आमच्या इथलाच की नर्सी-नामदेव, मराठवाड्यातला. ज्ञानेश्वरांसोबत काही कळ राहून आमचा नामदेव इथे कसा आला? त्याने इथल्या लोकांशी नाळ कशी जोडली हे शोधतोय. मला वाटतं तो एकमेव non-sikh संत कवी आहे, ज्यास गुरुबाणी ह्या शिखांच्या ग्रंथात स्थान आहे. असा pan india प्रवास त्याला का करावासा वाटाला ते शोधायचय. शंकराचार्यांनी केला तसा तो अजून कुणी केला का? अनेकानेक पवित्र क्षेत्रे उत्तरेत आणि दक्षिणेत असल्याने ये-जा होत राहून हे अभिसरण आधीही थोड्याप्रमाणावर का असेना होत होतं का? बरेच प्रश्न होते. "वोह छोड, अभी जल्दी रिपोर्ट बनाके भेज" इतकच म्हणून ते निघून गेले; तो भाग वेगळा :( "एक भारत" म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर रेल्वेने प्रवास करावा. आधी जम्मू ते मदुरै आणि नंतर सुरत ते गुवाहाटी असं जाउन पहा. रेल्वेतच बसले राहिलात तरीखूप काही बघणं होइल. अल्पशा मोबदल्यात आख्खे भारत दर्शन होउन जाइल्.रेल्वेत भेटणारी माणसे, त्यांची आयुष्ये त्यांनी "भारत " कल्पनेबद्द्ल काहीही भाष्य न करताच तुम्हाला खूप काही सांगून जातील. कॅनव्हास मोठा करायला एकदा स्लीपर कोच, नि एकदा तरी ए सी असे जा. खूप काही जाणवेल. सामान्यांसाठी भारताची अजून एक व्याख्या म्हणजे जिथवर बॉलीवूड्प्रेम दिसेल, तो तो भाग भारताचा. दक्षिणेत हिंदि बोलत नाही म्हणतात, पण तिकडेही बॉलीवूड गाणी हिट्ट आहेतच. अजून एक व्यवच्चेदक लक्षण म्हणजे पैसे खायला, कामात कुचराई करायला अचाट मार्ग शोधून काढणारी बुद्धी, नोकरशाही दिसली(आणि त्याबदल्यात शोषितांची तक्रार न दिसता "चलता है" अशी भूमिका दिसली ), तर ते भारतीय रक्तच समजा. ते आपले व्यवच्छेदक लक्षण आहे! मग भारताचे पुढे मागे ७-८ देश झाल्यास काही नवल नाही किंवा तसे वेगळे होण्याची कुण्याची इच्छा झाल्यास त्यास विरोध करायला नको. असेही कुणी म्हणताना दिसते. पण हे होणे सोपे नाही. हे स्थित्यंतर पुन्हा फाळणीच्या काळासारखा प्रपात घडावायची शक्यता अधिक. काही सीमा नेहमीच अशा असतात की त्यावर दोन्ही बाजूंकडून् दावे होउ शकतात. ह्यामुळे होते काय, की आजचे "शेजारी" उद्या "परके" किंवा घुसखोर ठरतात. शिवाय लहान आकार असण्यास समस्या हीच की भारतीय राज्ये लहान बनली की मेली. अर्थ, संरक्षण,परराष्ट्र् नीती ह्यात ती दुबळी आहेत. विज्ञान - तंत्रज्ञानात, रोजगार उभारणी ह्यातही ह्यांची एकेकेट्यांची बोंब आहे. एकूणच आधुनिक बलशाली देश म्हणवून घेण्याइअतपत् ह्यांचे अस्तित्व नाही. मध्यपूर्वेत पन्नासेक देश आहेत. कुणाही पाश्चात्याने यावे नि टपली मारुन् जावे,रशिया चीनने मोहरा बनवावे ही त्यांची अवस्था. ह्यांना आपसात भांडायला बाहेरची फंडिंग, तंत्रज्ञान मिळाली तर कोण आनंद होतो. इराकी सत्ता कुर्द, शिया वगैरेंचे हत्याकांडा घडवते.(सुन्नींचेही घडावले ठाउक आहे.) उग्गीच बुशला लहर आली म्हणून तो बगदाद बेचिराख करायला उठतो.वाटॅल तेव्हा लिबियावर हल्ले होतात. कल्पना करा, ज्या नाटोच्या विमानांनी लिबियावर हल्ले केले, त्यांची तसेच हल्ले दिल्लीवर करायची हिंमत आहे का? नाही. कारण दिल्ली म्हणजे १८५७ च्या काळातली दिल्ली राहिलेली नाही. लाल किल्ला नि त्याच्या आसपासची वस्ती असे त्याचे रूप नाही. आज दिल्लीला बोट लावाल तर आख्खे भारतीय संघराज्याचे लष्कर उभे राहील. गुरखा, शीख, राजपुताना, मराठा, महार ह्या सगळ्याच गाजलेल्या पलटाणी त्यात आहेत. दिल्ली, युपी, बंगाल, केरळ एकेकटे काहीही नाहीत. पण त्यांनी एकत्रित एक फौज उभारली आहे. त्यांच्या सहकार्य निधीतून त्यांनी काही थोडिफार का असेना आधुनिक विमाने घेतलीत, अणुबॉम्ब बनवलाय. त्यामुळेच आज दिल्लीवर हल्ला होउ शकत नाही. पण भारताचे असे तुकडे झाले तर आपलीही मध्यपूर्वच होइल; ही धास्ती आहे. किंवा, मराठा सत्तेच्या शेवटच्या काळात तसे झालेलेच होते. तुम्ही म्हणाल तसेच होइल असे काही नाही, आपला युरोपही होउ शकतो. युरोपातही अनेकानेक् भारतापेक्षा लहान लहान पण प्रबल सत्ता/देश आहेत. यु के, फ्रान्स , जर्मनी हे सगळे प्रत्येकी आठ आठ कोटींहून अधिक नाहीत. हो. हे खरे आहे. की ते प्रबळ आहेत. पण तुम्ही आम्ही तसे आहोत का? ओरिसा फ्रान्सशी स्पर्धा करु शकेल? ब्रिटन जर कावेरी पाणीवाटापातल्या वादात लवाद्/ मांजर म्हणून घुसले तर तामिळ आणि कर्नाटक राष्ट्रे एकेकटी त्याला काय झाट रोखू शकणार आहेत? इटाली जो भारतासमोर भुक्कड् भासतो, तो बंगाल - दार्जिलिंग/गोरखालँड वादात एकट्या बंगालचे कंबरडे कधीही मोडू शकतो. त्याच्या बंगालपेक्षा कैकपट आर्थिक, राजनितीक ताकद व् तंत्रज्ञान आहे. आपल्याला भारतरूपी allied forces चे एकछत्री राज्यच बरे नाही का? एखाद्यावेळेस गुण्यागोविंदाने तुम्ही वेगळे होउही शकाल. पण त्यानंतर एकटे राहण्याइतपत तुम्ही सबळ आहात का? इशान्य राज्ये स्वतंत्र झाली तर चीन नुसत ती घशात घालेल असे नाही तर तिबेट आणि सिक्यांग* प्रांतात त्यांनी जसा वंशविच्छेद केलाय, शतकानुशतकांचा लोकसंख्येचा तोल एका पिढीत पालटावलाय तसे कधीही करु शकेल. तर व्यावहारिक् मुद्दे म्हटाले तर हेच आहेत, बाकी काही नाही. *सिक्यांग मध्ये मूळ चीनी वंशाचे लोक अल्पसंख्य होते.पन्नासवर्षापूर्वीपर्यंत. चीनने नियोजनबद्ध पद्धतीने लष्कराच्या काही लाख लोकांना तिथे कायमचे स्थायिक केले. स्त्रिया उचलून नेल्या. जबरदस्ती करण्यात आली. ह्या प्रकारातून निर्माण झालेली प्रजा आता "चीनी राष्टृ" ही कल्पना गळी उतरवून् घेण्याच्या तयारीत आहे. भारताने असेच काही काश्मीर मध्ये केले, तर तो भारताचा भाग होइल् असे काही कट्टरवाद्यांचे म्हणणे आहे. पण अर्थातच भारत असे काही पोलादी पकडीने करेल हे शक्यच नाही.
  • Log in or register to post comments

अजून काही...भाग २...

मन१
Sat, 08/04/2012 - 12:35 नवीन
१८व्या १९व्या शतकात उर्वरित जग असंख्य राजेरजवाडे असलेल्या भारताचा विचार एकसंधपणे (हिंदुस्थान, इंड्या वगैरे वगैरे) असा करीत असत का? "हिंद मध्ये असे होते. हिंद मध्ये सुबत्ता आहे. हिंदमधील कापड,हस्तीदंत चांगले आहे." असा हिंद नावाचा उल्लेख मनुची वगैरे सारखे औरंगजेबाच्या काळात भारतात दिल्ली,लाहोरपासून ते गोव्यापर्यंत प्रदीर्घ राहिलेले लोक करताना दिसतात. मनुची हा इटालियन डॉक्टर/वैद्य/हकिम होता. नेपोलिअनने हिंदमधील ब्रिटिशांच्या भरभराटीस आलेल्या व्यापारास अटाकाव करायला, नाकाबंदी करायला काय करावे? त्याने सरळ आख्खे इजिप्त फक्त लष्करी बळावर घशात घालायचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच्या आसपासची जल वाहतूक सहजच खंडित करता येइल. आपल्या साम्राज्यातील किंवा साम्राजाच्या प्रभावाखालील देशांना (खरे तर राज्यांना ) इंग्लंडशी भूमार्गातून व्यापारास प्रतिबंध केला. त्यातही हिंद असा उल्लेख आहे म्हणे. इथल्या स्थानिक सत्तांशी हातमिळवणी करुन(टिपू वगैरेने केला तोच प्रयत्न) ब्रिटिशांना शह द्यायचा त्याचा प्लॅन होता. असो. तर त्या उल्लेखातही इथल्या राजे रजवाड्यांचा एकत्रित,सरसकट उल्लेख आढळतो. मला आजच्या भारताला बर्‍याचदा India mainland म्हणावेसे वाटते. नेपाळ, श्रीलंका हे Indian periphery वर येतात. भारताने ह्यांच्यात सामील होउन जावे असे मला वाटते. किंवा भूतानसारखी( भूतानला quasi indenpendent म्हणता येइल) ह्यांच्याशी मैत्री ठेवावी. युरोपात राष्ट्रे भाषिक, (काहीशी)वांशिक आधारावर बनली. हिटलरने भाषिक आधारावरच ऑस्ट्रिया - जर्मनीचे एकीकरण केले. "आपणही जर्मन आहोत" ही भावना ऑस्ट्रियन जनतेत असावी का? कारण हिटलरला तिथे प्रतिबंध असा फारसा झालाच नाही. लोण्याच्या गोळ्यातून सुरी फिरावी तसे त्याचे सैन्य घुसले म्हणतात. फाळणीदरम्यानचा भारतः- जमाते इस्लामीची अधिकृत भूमिका काहीशी अशी होती :- "संस्कृती हा एका देशाचा पाया हवा, धर्म हा नाही." पण खरेतर त्यांना कट्टर हिंदुत्ववाद्यांसारखाच अखंड हिंदुस्थान हा प्रांत हवा होता. एकाला भगवा हवा होता, एकाला हिरवा हवा होता. संपूर्ण देशावर आज ना उद्या आमचाच झेंडा फडाकावा अशी काहीशी ती भूमिका होती.(कोण चूक कोण बरोबर हे सोडून द्या.) नुसता तुकडा मागण्याऐवजी अखंड मुस्लिम/शरिया भारत घडवा अशी भूमिका घेणार्‍या देवबंदी लोकांना त्यांनी केलेल्या पाकिस्तान विरोधामुळे देशप्रेमी वगैरे समजणारेही बक्कळ आहेत. पाकीस्तानात फजलूर रेहमान ह्यांचे प्राबल्य वाढते आहेमसे दिसताच इथल्या भारत-पाक मैत्री प्रेमींना आणी शांतीवाद्यांना लागलिच ते देवबंदी चळवळीचे समर्थक आहेत वगैरे म्हणून धन्य धन्य वाटू लागले होते. --मनोबा
  • Log in or register to post comments

हिंद अथवा हिंदुस्थान हे

प्रचेतस
Sat, 08/04/2012 - 12:51 नवीन
हिंद अथवा हिंदुस्थान हे प्रामुख्याने उत्तर भारताला म्हटले जायचे. शिवकालीन, पेशवेकालीन दस्तांत सरसकटपणे उत्तर भारताचा 'हिंदुस्थान' असाच उल्लेख आढळतो. तर दक्षिणेचा उल्लेख दख्खन असाच होई. पेशव्यांच्या उत्तरेकडच्या स्वार्‍यांना हिंदुस्थानवर स्वारी असेच बरेच ठिकाणी म्हटले गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आवडले.

इरसाल
Sat, 08/04/2012 - 12:47 नवीन
माहितीत भर पडत आहे. वाचत आहे. एक शंका गविंची टंचनिका चोरीस गेली असा माझा सौशय आहे. (मनोबाकडे गेलीय म्हणे)
  • Log in or register to post comments

पुढचे भागही आवडले. एकच

नितिन थत्ते
Sat, 08/04/2012 - 13:01 नवीन
पुढचे भागही आवडले. एकच असहमती.... बाहेरचे लोक सिंधूपलिकडच्यांना हिंदू आणि प्रदेशाला हिंद म्हणत असले तरी त्याचा अर्थ एतद्देशीय स्वतःला एक मानत नव्हते. याचे समांतर उदाहरण म्हणजे आपण दक्षिणेतल्या लोकांना सरसकट मद्रासी म्हणतो. पण ते काही स्वतःला एकच समजत नाहीत. आज आपल्याला राष्ट्रीयत्वाचे जे दृष्य दिसते ते आपल्या राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांनी (काँग्रेसच्याच असे नाही) घडवलेले आहे.
  • Log in or register to post comments

आमचे ही थोडे गुर्‍हाळ ...

चौकटराजा
Sat, 08/04/2012 - 13:16 नवीन
देश, नकाशा, भूप्रदेश, राष्ट्र, संस्कृति , भाषा, ज्ञान, राज्यपद्धति या सर्वच गोष्टी बदलणार्‍या असतात. सबब बदलणार्‍या गोष्टीत त्रिकालाला प्रुरून उरेल असे काही नसते. उदा. मला मराठीचा अचाट अभिमान आहे असे मी म्हणतो त्यावेळी त्यात, अरबी, फारसी, पोर्तुगीज, गुजराती, कन्नड , ई भाषांमधील शब्द आहेत हे आपण विसरतो. वरील पैकी प्रत्येक गोष्टीतील संकल्पना स्वीकारण्यामागे आपला त्या त्या वेळचा स्वार्थ असतो दुसरे काही नाही.
  • Log in or register to post comments

विस्कळित विचार आवडले तरी

अभिज्ञ
Sat, 08/04/2012 - 13:41 नवीन
विस्कळित विचार आवडले तरी बराचसा असहमत. बरीचशी राष्ट्रे-देश हि एकसंध नव्हते हा युक्तीवाद पटत असला तरी भारतीयांना किंवा त्याकाळच्या विस्कळित भारतीय राज्यकर्त्यांना इतर देशात वसाहती करण्यास कोणी आडवले होते? ऑद्योगिक क्रांती सारखा एखादाही प्रकार ह्या भारतीय धरतीवर त्याकाळी किंवा सद्य काळात देखील का घडला नाही? भारत हा ब्रिटिशांची वसाहत नसता तर भारताने आज एवढी प्रगती खरच कधी केली असती का? उदा-भारतीय रेल्वे, सैन्यदले... आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा बराच प्रभाव दिसून येतो. परंतु तिथले एकतरी राष्ट्र भारताचे अंकित होते का? ह्या अशा अनेक कारणांमुळे स्वतःला ब-याच थोबाडित मारता येतील. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

मागे एकदा ह्या विषयावर

रणजित चितळे
Sat, 08/04/2012 - 14:36 नवीन
आपला देश एकसंध नव्हते, ब-याच चुका केल्या, आपण गलिच्छ आहोत, विज्ञाननीष्ठ नाही, अल्पसंतूष्ट आहोत, जाती चक्रात गुंतलो आहोत, अंधश्रद्धी आहोत इत्यादी सर्व असून सुद्धा आपल्यात मोठे राष्ट्र होण्याची कुवत आहे का ते बघायचे. मला वाटते, आहे. व हेच पोटेंशीयल आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते http://www.rashtravrat.blogspot.in/2010/09/making-peace-with-history.html Even if our country was not united at that point of time, the various regions in this peninsula were bound by a common thread of ‘Hindu’ way of life. There were many attempts to unite the regions by various satraps at that time. The most successful being Chandragupta Maurya engineered by Chanakya. They were successful in cementing these vast regions of Bharatwarsh. The period was such that none of the great countries were united as they are now. Each country had its own period of clashes, wars and battles. Although historical boundaries were established, political boundaries of many countries were not established. India or Bharatwarsh had its historical boundaries established beyond doubt. Political boundaries were yet to get crystallized. The Bharatwarsh was manifested by the people leading similar way of life. व हे http://www.misalpav.com/node/14780
  • Log in or register to post comments

आभार....

मन१
Sun, 08/05/2012 - 15:12 नवीन
सर्व वाचकांचे आभार. @अशोक पतिल :- आभार. @अपूर्व कात्रे :- त्यावेळी फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी युरोपियनसुद्धा भारतात वसाहती करण्याच्या प्रयत्नांत होते. खरे तर भारताच्या मार्केटमध्ये ह्या सर्व देशांपेक्षा उशीराने प्रवेश केला तो ब्रिटिशांनी. अकबराच्या दरबारात एकही ब्रिटिश अ‍ॅम्बेसेडर नव्हता. तेव्हा अक्बराचा व्यापार पश्चिमेशी चाले तो पोर्तुगिजांमार्फतच. गुजरात ते दक्षिण भारतात कालिकत इथपर्यंत बर्‍याच ठिकाणी त्यांची ठाण्यांची/किल्ल्यांची साखळी होती, प्रभाव होता. जहांगिराच्या काळातही हेच होते. डचांनी थोडाफार शिरकाव केला, पण भारतात सर्वाधिक अस्तित्व हे पोर्चुगिजांचेच होते. जहांगिरच्या कारकिर्दिच्या शेवटच्या वर्षात मात्र परिस्थिती पालटली. इंग्लंडने मुघलांकडे आपला वकील नजराणे देउन पाठवला. दरबारात ओळख वाढवत ठेवली. व लगोलग सागरी युद्धात एकाएकी अफाट ताकदीने पोर्तुगिजांचा सडकून पराभव केला. सूरत बंदराजवळील आख्ख्या समुद्रावर वर्चस्व स्थापित केले. सागरी बाबतीत दुर्बल, निर्बल असलेल्या भारतीय सत्तांना त्यांच्याशी व्यापार मान्य करण्यावाचून गत्यंतर उरले नाही. पोर्तुगीज केवळ कोकण(वसईपासून खाली) ते गोवा किनारपट्टीवर कसेबसे टिकून राहिले, पण ते स्थानिक सत्ता म्हणूनच राहिले. आख्ख्या भारतातला व्यापार त्यांच्या हातून निसटला होता. नंतर चिमाजी अप्पा आणि पहिला बाजीरव ह्यांच्या कोकणातील तूफानी मोहिमांमुळे पोर्तुगीज्,सिद्दी ह्यांचे वर्चस्व संपूर्ण नष्ट झाले.(फक्त गोवा इथे पोर्तुगीज आणि जंजिर्‍याच्या असपास थोडाफार सिद्दी तेवढा उरले.) डच लोक तसेही भारतात वसाहतीसाठी उत्सुक नव्हते. डचांचाही इतरांनी असाच बाजर उठवला. ते नंतर कधीतरी. कदाचित आत्ता आहे त्यापेक्षा regional imbalance जास्त असता. मात्र कधी ना कधी औद्योगिक क्रांती भारतातही झालीच असती. शक्य आहे. @आत्मशून्य :- ...म्हंजे त्ये बी जवल्पास आमच्यावानीच फुटलेले इखुरलेले असुनही, फक्त आम्हीच गुलाम राय्लो ? आमच्याच परीसरातला सोन्याचा धुर आटला ? हौ ना राव. काय करावं कि त्याला. @रामपुरी :- चंद्रगुप्त.... मौर्य... राज्यच नव्हे साम्राज्य. empire, not a mere kingdom. It was age of empires. @सहजः- आफ्रिका, आशिया वसाहतींतून सुटका झालेल्या जनरेट्याने बनले हे खरे. मध्यपूर्व ही मुद्दाम पाश्चात्यांच्या सोयीने तुर्की वगैरे साम्राज्ये तोडून्-फोडून forge करण्यात आली. @ स्पा :- खंडांच्या सीमा कशा बनल्या ही मलाही शंका आहेच. फक्त अंदाजाने सांगू शकतो. हे सीमा म्हणून जे काही आहे ते पारंपारिक समजुतींचा आणि ज्ञानाचा blend आहे. पूर्वी इसवी सनपूर्व शे-पाचशे वर्षे ग्रीस,ग्रीक अंकित तुर्कस्थान आणि इराण साम्राज्यात सीमावर्ती भागातून सतत चकमकी होत. त्यांच्या वारसदर सत्ताही अशीच भांडणे लढत. हे सगळे भू मध्य समुद्राच्या तीन बाजूंनी होइ. भूमध्य समुद्र हा त्रिकोण समजा. त्याच्या एकाबाजूला गौर वर्णीय वंश होता. एका बाजूला सावळे इराणी होते. तिसर्‍या बाजूला आफ्रिकन वंशाच्या हन्नीबलचे कर्थेजचे राज्य होते. बहुतेक युरोपिअनांनी स्वतःला गौर वर्ण जिथवर आहे त्यास युरोप, सावळे राहतात त्या जागेला आशिया आणि आफ्रिकन वंशाचे राहतात त्यास आफ्राका असे नाव दिले. नंतर कार्थेजचा पूर्ण खलचा भागच आफ्रिका मानला जाउ लागला. पर्शिअन राज्यापासून पूर्णच पूर्वेला आशिया म्हटले जाउ लागले. हा माझा तर्क. सध्याच्य देशांच्या सीमा ह्या सरळ्सरळ जिथवर तिथल्या राअजधानीची सत्ता चालते तो तो भाग अशी आहे. बांग्लादेश पार कोपर्‍यात होता तरी तो १९७१पर्यंत पाकिस्तानचा भाग होता. सहसा नदी, नाले ,ओढे, अभेद्य पर्वत ह्या नैसर्गिक सीमा मानवी वस्तीच्याही सीएमा ठरात, त्यातूनच त्या देशांच्या खंडांच्याही सीमा बनतात. जिल्हेही तसेच असतत. पण कधी कधे प्रशासकीय सोयीसाठी सपाट जमिनीचेही विभाग करुन त्याला जिल्हे म्हणतात. तीच गोष्ट तालुक्याची. सध्याच्या बहुतांश सीमा ब्रिटिशांनीए निश्चित केल्या आहेत. पाक- भारत , पाक- अफगाण(ड्युरंड लाइन वरून) व भारत्-चीन(मॅक मोहन लाइन वरून) भांडणे हे त्या भारताच्या आंतरराष्तृय सेमा शेजार्‍यांना मान्य नाहित म्हणूनच आहेत. भारताबाबत हे ब्रिटिश काळात घडले. वेगवेगळ्या देशांच्या सीमा आज इसतात तशा साधदरण तः मागच्या पन्नस वर्‍हापासून बर्‍यापैकी स्थिर आहेत. त्या मागच्या दोनेकशे वर्षांतल्या विजय्-पराजयांच्या कहाण्या आहेत. इस्राइलची निर्मिती हा अरबांच्या पराभवाची कहाणी आहे. आफ्रिकेत काही ठिकाणी जिथे जो वंश तिथे त्याची सत्ता अशी काहीशी टोळीआधारित रचना आजही दिसते. चीनच्या सीमा म्हणजे चीनी सम्राटांनी वेगवेगळ्या काळी जो जोभाग जिंकायचा प्रयत्न केला तो तो एकत्रित करुन एक बृहत्-चीन बनवण्यात आलाय. इतका मोठा तो आजवर कधीही नव्हाता. अमेरिका म्हणजे सरळ सरळ ह्या किनार्‍यापासून त्या किनार्‍यापर्यंत (east coast to west coast )पसरलेले पूर्वीचे ब्रिटिशवंशीय आहेत. पुधे जागा मिळाली नाही म्हणून नहीतर पसरटवादी तिकडेही पसरले असते. . . @वल्ल्ली:- उत्तर बहरत = हिंदुस्थान. मान्य. तु म्हणतोस ते उल्लेखही पाहिलेत. पण "हिंद" मध्ये जाण्यासाठी निघालेला वास्को द गामा दक्षिणेच्या कालिकत बंदरात उतरून "यस्स. पोचलो एकदाचा." असे का म्हणाला? . . @इरसाल :- :) . @चौरा काका :- वरील पैकी प्रत्येक गोष्टीतील संकल्पना स्वीकारण्यामागे आपला त्या त्या वेळचा स्वार्थ असतो दुसरे काही नाही. "स्वार्थ " हा negative connotation मध्ला शब्द, नकारात्मक शब्द झाला. मी त्याला "त्या त्या वेळेला आपल्या भल्याचे किंवा आपल्याला हितावह असणे" असे सकारात्मक भाषेत rephrase करेन. पण आशय समजला. . @अभिज्ञः- तुझा धाग्यावर स्वतंत्र प्रतिक्रिया ह्याबद्दल दिलेली आहे. . @ रणजित :- ब्ळॉग उघडता आला की पूर्णच वाचेन.
  • Log in or register to post comments

अर्थच्छटा... वतन ---कौम ---मुल्क आणि संघराज्य संकल्पना

मन१
Wed, 08/15/2012 - 08:18 नवीन
उर्दु भाषेतलं उदाहरण त्यातल्या त्यात परिचित असल्यामुळं घ्यायचं म्हटलं तर काय दिसतं? "ऐ वतन ऐ वतन तेरी राहों में हम जां तक लुटा जाएंगे" असं कुणी म्हणतं. "गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे" हे त्याचं मराठी रूप. भूमी- जमीन- वतन ह्यांच्याशीही बांधिलकी मानलेलीच दिसते. इथे जमीन- वतन हे शब्द निष्प्राण, निर्जीव नाहीत, आपले, आपल्या लोकांचे तिथे पूर्वापार वास्तव्य आहे ही भावन त्या जमिनीच्या तुकड्याला मोल प्राप्त करुन देते. एरव्ही "जमीनीचा तुकडा" ह्या अर्थाने हेच शब्द जमीन्-दार, वतन-दार असे दिसतात. . सध्या बोली उर्दु मध्ये मुल्क हा शब्द सर्रास आढळतो. मराठीत आपण "देश" म्हणतो; बोलीभाषेतही "देश" वापरतो अगदि त्याच अर्थाचा आणि वापराचा हा शब्द. ह्यात मला तितकासा जिवंतपणा जानवत नाही. कलरलेस, ओडरलेस, निरुपद्रवी असा हा शब्द. . "राष्ट्र " ह्या कल्पनेशी "बृहद कुटुंब" किंवा "टोळी" किंवा "वंश" ह्याच्या जवळ जाणारा उर्दु शब्द म्हणजे "कौम" "कदम कदम बढाये जा खुशी के गीत गाये जा यह जिंदगी है तू कौम पे लुटाये जा" असं आझाद हिंद सेनेचं विजय गीत होतं. भारत ही एक "कौम" मानण्यात आली होती. एक बृहत कुटुंबच. पण अर्थातच ह्या शब्दाचं मूळ तितकं उदात्त नाही. आज आफ्रिकन एकाच आफ्रिकन "देशा"त अनेक "कौम " पहायला मिलतात. एक "कौम" दुसर्‍या "कौम" ला हाकलायला पाहते ; उर्दु च्यानेल पाहिल्यावर "कौम" ह्या शब्दाचा हा अर्थही जाणवेल. वतन, मुल्क, कौम हे मराठीत अनुक्रमे वतन/भूमी/जमीन,देश, राष्ट्र बनून येताना दिसतात. . एक रिकामी जागा आहे, तो "देश" असू शकतो का? टेक्निकली , हो. पण ते राश्ट्र असू शकत नाही असे मी वर लेखात म्हटले आहे. देश- राष्ट्र ही तुलना सर्वात अचूक करता येइल ती संस्था/संघटना -- संस्थेचे कार्यालय ह्या जोडिशी. एखाद्या संस्थेला एखाद्या कार्यालयातून, बिल्डिंगमधून घालवून देता येते. पण म्हणून त्यांची संघटना संपत नाही, तिचे फक्त कार्यालय जाते, तसेच काहीसे. संघटना असणे, संघटनेचे सभासद असणे हे एका नात्याने, धाग्याने बांधले जाणयसारखे आहे . "राष्ट्र‍ " ह्या कल्पनेत असे बांधले जाणे अपेक्षित आहे. एकमेकांशी नाते अपेक्षित आहे. त्यामुळेच "राष्ट्र" हा एक जिवंत शब्द आहे. "देश" हा एक निव्वळ कार्यालय असावे तसा शब्द आहे; मूळचा बराचसा निर्जीव. **************************************************************************************************************************** भारत अमेरिका दोन्हीही ढोबळ मानानं संघराज्य म्हटली जातात. दोन्हीत लोकशाही आहे, वैविध्य आहे, प्रचंड मोठा भूभाग,लोकसंख्या आणि प्रचंड मोठा भूगोल ह्यांना लाभलाय; हे खरं. पण त्यांच्या रुपात मूलभूत फरक आहे. संकल्पनेतच फरक आहे. America is destructible unit of indestructible states. India is indestructible unit of destructible states. तिथली राज्ये (कागदोपत्री तरी) स्वेच्छेने एकत्र आहेत.(अपवाद अमेरिकन यादवी/गृह युद्ध). भारताच्या सीमांना कुठलेच भारतीय राज्य च्यालेंज करु शकत नाही. भारतीय त्यातून फुटून निघण्याची मागणी करणं हेच मुळात घटनाबाह्य, असंवैधानिक ठरवण्यात आलय.(कश्मीर स्वतंत्र करा म्हणणार्‍यांना अरुंधती रॉय वगैरेंना हे कलम लावलं जाउ शकतं.) दुसर्‍या एखाद्या शेजारी सत्तेस आम्हास जोडून घ्यायची इच्छा असेल तर मात्र भारत सर्कार त्यावर विचार करु शकते. ठिक वाटल्यास जोडून घेउही शकते.(सिक्कीम १९७३ पर्यंत भूतान सारखाच स्वतंत्र देश होता तसेच काहीसे.) एकूणच इतिहासातून आपल्या घटनाकारांनी हा बोध घेतलेला दिसतो.(प्रबळ केंद्र सरकार असण्यासाठी नेहरु/काँग्रेस ह्यांनी हटून बसणे हे फाळणी होण्याच्या कारणांपैकी एक आहे असे म्हणतात. मुस्लिम राज्ये करा, त्या राज्यांना विशेषाधिकार इथपर्य्म्त जिन्ना ऐकायला तयार होते, फाळणी टाळायला म्हणे.) भारतीय राज्ये तोडून त्यातून नवी राज्ये तयार करण्याचे सर्वाधिकार केंद्राकडे आहेत. अमेरिकेचे उलट. तिथे राज्ये फोडली जाणे अपेक्षित नाही. शिवाय हवे तर राज्यांना स्वतंत्र होण्याचा (कागदोपत्री तरी) अधिकार आहे म्हणतात. ऋषिकेश च्या "एक ऐतिहासिक घटना" नावाच्या एका माहितीपूर्ण मालिकेत ह्याचा उल्लेख पाहिल्याचं आठवतय.
  • Log in or register to post comments

एका राष्ट्राच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पैसा
Wed, 08/15/2012 - 09:35 नवीन
विस्कळीत विचार आवडले. त्यात अनेकजण आणखी भर घालू शकतील हे नक्कीच! पण आज तरी एका राष्ट्राच्या वाढदिवसाच्या सर्वच नागरिकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा