मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

खेडूत · · जनातलं, मनातलं
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार. ते खराब आहेत का चांगले, हे घरी गेल्याशिवाय नाही कळणार! घेणारे भाविक म्हणण्यापेक्षा - भावुक अधिक आहेत, तिथे फक्त विकण्याला महत्व. तसं आहे हे. घेणाऱ्यांनी विचार नाही केला तर देणाऱ्यांना काय पडलेय? खालील चित्रात २००६-१३ या काळात वाढलेली कॉलेजेस पाहिली की हे कळेल. सध्या सतरा लाख प्रवेश देशात होतात. त्यापैकी एक लाखाहून अधिक महाराष्ट्रात होतात. अनेक मोठ्या व्यक्तिंनी वेळोवेळी या वाढीवर जाहीर टीका केलीच आहे. 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांनी तर थेट ही असली वाढ देशाला लाजिरवाणी असल्याचं म्हटलंय ! अभियांत्रिकीची संपूर्ण भारतात वाढलेली प्रवेश क्षमता : गेल्या सात वर्षात जवळ-जवळ चौपट! e मार्च २०१० मधे एक आशादायक बातमी वाचली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाने परदेशी विद्यापीठांना काही अटींवर भारतात खासगी विद्यापीठे सुरु करायला परवानगी द्यायचं ठरवलं. (त्यावेळची वॉल स्ट्रीट जर्नल मधली ही बातमी) याला आधार असा होता की कुठल्याश्या पहाणीनुसार अजूनही तांत्रिक शिक्षण घेतलेले लोक जागतिक पातळीवर कमी पडणार आहेत. पण आपले शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाही. त्यामुळे इथल्या युवकांना ही संधी मिळणार नाही . त्यापेक्षा परदेशी विद्यापीठांनी इथे यावे तसेच भारतीय उद्योगांनी पण आपली विद्यापीठे काढावीत. शिवाय हे दोन्ही घटक भागीदारीत सुद्धा हे करू शकणार होते. सरकार डाव्या पक्षांवर अवलंबून नसल्याने हे शक्य आहे असा कयास होता. सरकारला हे माहीत होते की दर्जेदार शिक्षणाला प्रचंड खर्च आहे. तो करणे आपल्याला शक्य नाही. त्यापेक्षा हे सरळ सोपे आहे ते करून मोकळे व्हावे. असा निर्णय होण्यामागे पाश्चात्य देशांचा इंटरेस्ट असणारच. दरवर्षी लाखो मंडळी शिकायला तिकडे जातात आणि स्थायिक होतात. पण जे पैशाच्या थोडक्या कमतरतेमुळे जाऊ शकत नाहीत त्यातले काही इथेच मिळाले निम्म्या शुल्कात तर काय वाईट आहे? टाटा, विप्रो आणि काही आयटी कंपन्यांना अश्या विद्यापीठांमध्ये रस होता कारण सध्या दरवर्षी पास होणाऱ्या सतरा लाखातले एक लाख इंजिनियर पण थेट त्यांच्या कामाचे नसतात. त्यापेक्षा आपापले हवे तसे मनुष्यबळ तयार केलेले बरेच. पण असं काही पुढे झालंच नाही. कुठे माशी शिंकली? सरकारमध्ये सामील महान मंडळी आडवी आली. या विद्यापीठांनी '' Non-profit organization'' असण्याची मुख्य अट आणि वर त्यांनी या संस्थांतही घटनेनुसार ५०% आरक्षणाची अट पुढे केली. या कल्पनेचे उद्धिष्ट वेगळे आहे, १००% भांडवल खासगी आहे याचा सोयीस्कर विसर पडला, अश्या अटी मान्य करणे त्या विद्यापीठांना शक्य नव्हते आणि सरकारला पण ती फी भरणे शक्य नव्हते. एकूण योजना बारगळलीच. आता पुन्हा बोलावले तरी ही विद्यापीठे येतील असं वाटत नाही. त्यातली मेख अशी होती की अश्या फक्त दहा विद्यापीठांनी सध्याच्या १५००० खासगी संस्थांचे पितळ उघड केले असते. दर्जा म्हणजे काय ते लोकांना पहायला मिळाले असते. संशोधनाची संस्कृती आली असती - किंवा सुरु तरी झाली असती. सध्याच्या संस्थांची क्याम्पस प्लेसमेन्ट बंद झाली असती. आपल्या मुळाशी येणारी अशी काही सुधारणा त्यांना नको होती. एकूण काय, इच्छाशक्तीअभावी ही हाताशी आलेली मोठी संधी गेली. तरीही प्रत्येक सरकार काहीतरी वेगळं करू पाहातंच. पण चुकीचे निर्णय झाले की अनेक पिढ्या परिणाम भोगत बसतात. आता पुन्हा सरकार बदलले असल्याने कांही नवे निर्णय येणे साहजिकच आहे. त्यानुसार कर्नाटकच्या धर्तीवर सर्व महाराष्ट्रात एकच तंत्रविद्यापीठ असणार आहे असं समजतंय . याच्या चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. चांगली बाजू अशी की सध्या मुलांमधे विभागीय कॉम्प्लेक्स खूप जास्त आहे. अन्य ठिकाणी BE झालेल्यांना पुण्यामुंबईत काहीसं कमी लेखलं जातं, ते होणार नाही. सर्वांनी एकसारखीच परीक्षा दिलेली असल्याने भेदभाव होणार नाही. अन्य कांही राज्यांत याचा फायदा झाला आहे. सध्या परीक्षा व्यवस्थेवर ताण आहे तो परीक्षक कमी संख्येने आहेत म्हणून. विभागीय असमतोल असूनही अन्य विभागात पेपर तपासणीला पाठवता येतील. निकाल वेळेवर लागतील . मर्यादा अशी आहे की या सर्व शिक्षकांना एका पातळीवर प्रशिक्षित करणे कठीण काम आहे. '' चलता है '' मनोवृत्ती ग्रामीण संस्थांत कमालीची दिसून येते. मी काही ठिकाणी परीक्षक म्हणून जात असे तेव्हां ही मंडळी कधी भिकाऱ्यागत 'मार्क्स चांगले द्या ' म्हणून गयावया करत. त्यांना नि:पक्षपाती परीक्षेचे महत्व, त्याचा मुलांना होणारा फायदा , हुशार मुलांवर होणारा अन्याय , हे काही सांगून समजत नसे. शेवटी ते असेही सांगत की, '' आमच्या नोकरीचा प्रश्न आहे … '' संस्थाचालक मुलांच्या पासिंगवरून त्यांची नोकरी चालू ठेवायची का हे ठरवतात! मग अशा वेळी मुद्देच संपतात. असले प्रकार आता शहरातही होऊ लागलेत. एकाच विद्यापीठ आल्यावर अश्या ठिकाणांना आणि चांगल्या संस्थांना वेगळे करणे कठीण होणार. म्हणजेच ' सब घोडे बारा टक्के' ची शक्यता आहे . जर काही गैरव्यवहार झाले तर संपूर्ण विद्यापीठ बदनाम होऊ शकते. याचा भारताबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसू शकेल. पण हे सगळे झाले जर-तर . आता यावर्षीचे अभियांत्रिकी प्रवेशाचे महाराष्ट्रापुरते आकडे पाहू : महाराष्ट्रातल्या एकूण मंजूर जागा: १,६५,००० आलेले अर्ज: १,१०,००० रिक्त जागा : ५५,००० अंतिम किमान रिक्त जागांचा अंदाज : ७०,००० (४२%) अचूक अंतिम चित्र सप्टेंबरमध्ये स्पष्ट होईल लवकरच हा रिक्त जागांचा आकडा ५०% पेक्षा वाढेल. कारण यावर्षीसुद्धा नव्या संस्था आणि तुकड्या आल्याच आहेत ! आजची अवस्था हे बाळसे नसून सूज आहे, हे कळत असूनही वळत नाही अशी सगळ्यांची अवस्था आहे . ''अति तिथं माती '' ची ही केस. आमच्या कंपनीतल्या क्याम्पसला जाणाऱ्या लोकांच्या अंदाजाने खरी गरज याच्या निम्मी पण नाहीय. महाराष्ट्रासाठी त्यांनी फक्त सोळा कॉलेजेसची यादी केलीय त्याबाहेरील कॉलेजच्या लोकांना ते फ्रेशर म्हणून घेतच नाहीत. अन्यत्र पास झालेल्यांना दोन वर्षे अनुभव असल्यास परीक्षा घेऊन- अनुभवाचा खरेपणा तपासून मग घेतात. विशेष म्हणजे तीन सर्वोत्तम कॉलेजेसमधूनही घेत नाहीत कारण तिथली मुले अमेरिकेला किंवा व्यवस्थापनाकडे नक्कीच जातात. ट्रेनिंग पूर्ण होता होता कंपनी सोडतात ! सामाजिक परिणाम: माझ्याकडे गावाकडचे दोन जुळे बंधू जॉबसाठी मदत करा म्हणून भेटायला येतात. हे खरं जुळ्याचं दुखणं . एकाला इंजिनियर केलं म्हणून दुसऱ्यालाही केलं. पदवीप्रमाणे ज्ञान दोघांनाही नाही. घरची गरिबी असूनही ते दोघे लहान खेड्यात BE झाले. त्यात नऊ लाख खर्च झालाय आणि पुण्यात काटकसरीने राहून सात महिने नोकरी शोधतायत. घरून खर्चासाठी दोघात पाचसात हजार महिना मिळतात. आता पालकांची सहनशक्ती संपत आलीय. अत्यंत निराशेत असणारे पण हिम्मतीने घरची शेती करायला नको म्हणणारे हे दोघेजण केवळ प्रातिनिधिक आहेत. अशी किती मुले- मुली नोकरी शोधत फिरत असतील? शिक्षणाची गंगा (?) गावात पोहोचवण्याचा दावा करणाऱ्यांनी नक्की विचार करावा . अर्थव्यवस्थेत वाटा: २००७ च्या अधिकृत आकडेवारीनुसार राज्यस्तरावर सोळाशे कोटी रुपये शुल्क घेतले गेले. अनधिकृत आकडा देवाला ठाऊक . आज त्यावेळेपेक्षा दुप्पट मुले इंजिनियरिंग करतात आणि वाढीव फीनुसार वर्षाला किमान तीन हजार कोटी गोळा होत असू शकतील. एव्हढा खर्च करून हा आउटकम समर्थनीय नाहीच. या उत्पन्नावर या संस्था कर भरतात का? तसेच या मुलांनी बँकेतून कर्ज काढलेले असेल तर ते नोकरी न मिळाल्याने फेडू शकतील् का? नसल्यास बँकेचे - पर्यायाने मोठे राष्ट्रीय नुकसान होणार आहे . किंवा काही पालक शेत विकून किंवा गहाण ठेवून पैसे घेतात. अधिकांश मुले नोकरीत जाण्यायोग्य नाहीत , हे माहित असूनही प्रशिक्षणावर मेहेनत घेतली जात नाही. काहीवेळा तर इंग्रजी न येणे किंवा आत्मविश्वास नसल्याने चांगली मुले मागे पडतात. पासिंगची टक्केवारी एकूणच ही समस्या दीर्घकालीन प्रश्न निर्माण करेल असे वाटते. गेली तीस वर्षे या सगळ्याचा तटस्थ साक्षीदार म्हणून पहाताना मला चित्र फारसे आशादायक वाटत नाही. त्या क्षेत्रातल्या आणि उद्योगातल्या लोकांनाही त्यांच्या कडून फार अपेक्षा नाहीत. संस्थाचालकांना हे ठाऊक आहे पण चालतेय तितके दिवस ते कमावून घेणारच. इंडस्ट्रीला लागेल तसे इंजिनियर्स ते घेणार- शिकवणार, वापरणार - नको तेव्हा काढून टाकणार. मग कळत कुणाला नाहीय? तर आपल्याला - म्हणजे पालकांना. पूर्वी मी शिक्षणक्षेत्रात काम केले असल्याने अनेकजण एकमेकांच्या ओळखीने सल्ला घेण्यासाठी संपर्क साधतात. परवा एका पालकाला थम्ब रूल सांगितला. मेरीट लिस्ट लागलीय- कित्येक लाख मुलं पात्र ठरली आहेत . तुमच्या पाल्याचा क्रमांक पहिल्या दहा हजारात असेल तरच अभियांत्रिकीचा विचार करा अन्यथा दुसरं काहीतरी करा . त्यांना पटलं नसेलच. पण नंतर निराश होण्यापेक्षा आधीच काहीतरी भरीव करायला घेतलेलं बरं. सरकार नियंत्रण करीत नसेल तर आपण आपल्यापुरते नक्कीच करू शकतो . सरकारने हस्तक्षेप करून कडक निकष लावून देशभरातला इनटेक सतरा लाखवरून सात लाख इतका तरी कमी केला आणि दर्जा वाढवला तर काही बरे होऊ शकते. या वळणावर कठोर निर्णय लागणार! शैक्षणिक संस्था स्वतःहून काहीही करणार नाहीत. पुढे काय? (हा अनाहूत सल्ला मिपाकरांना नसून (मिपाकर लै पोचलेले आहेत!) घरट्यातून डोके काढून डोळे किलकिले करून वास्तव जगाकडे पहाणाऱ्या नवोदित अभियंत्यांना आहे.सुदैवाने अनेक मुलांना वास्तवाची जाणीव झाली आहे.) बाबांनो आणि बबड्यानो ! आयटीत जाण्याने ऐटीत रहाण्याची वेळ आतां राहिली नाहीय. या क्षेत्रातली वाढ ३०% प्रतिवर्ष वरून १०.२% वर आली आहे म्हणे. दिवसेंदिवस त्याना मिळणारा प्रतितास दरही कमी होत गेल्याने जास्त पगार ते देऊ शकत नाहीत. जुनी खोडं स्वतः टिकून रहातात. त्याबदल्यात दहावीस माणसं सहज कमी करून कंपनीला फायदा दाखवतात आणि त्यामुळे काम करणाऱ्या मोजक्या लोकांवर ताण पडतो. सध्या निवृत्तीचं प्रमाण कमी आहे पण पाच वर्षात ते वाढेल अकाली निवृत्ती आणि सक्तीची निवृती सुरु होईल, आणि काहीशी संधी सुरु होईल - पण जे आधीच तिथे असतील त्याना. त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला सर्व क्षेत्रांत नेहमीच मागणी राहील. किंवा त्याऐवजी स्टार्टअप्स बद्दल माहिती घेऊन त्यात काम करावं. किंवा विक्रीची कला असेल तर सेल्स मध्ये करियर करावं. ती कला नसल्यास अवगत करावी . बी पी ओ किंवा तश्या प्रकारच्या कामापासून खूप दूर राहावं आणि भरपूर कष्टाची सवय लावून घ्यावी. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नोकरी सुरु केल्यास एक वेगळाच अनुभव मिळतो. मेरीट लिस्ट मध्ये अगदी तळाशी असलेल्या एक लाख मुलांनी तर स्किल इंडिया सारख्या योजनेत सहभागी व्हावे. मिसळपाव वर 'क्लोंडाईक गोल्ड रश' वाचताना मला या सगळ्या प्रकाराची राहून राहून आठवण येत होती. थेट तुलना होऊ शकत नसली तरी 'कमालीची लालसा' हे साम्य आहेच - आपल्या समाजाला ते कुठे नेणार हे समजण्यापलीकडचे आहे. ( समाप्त ) संदर्भ, आकडे आणि चित्रे: पहिल्या भागात दुवे दिलेली AICTE आणि DTE यांची अधिकृत संस्थळे.

वाचने 47191 वाचनखूण प्रतिक्रिया 91

टवाळ कार्टा गुरुवार, 07/16/2015 - 17:14
माझ्या कंपनीत इंजिनीअरचे फ्रेशर घेणे बंद केले आहे...फक्त बीएस्सी आयटी फ्रेशर घेणार...कारण इंजिनीअरचे फ्रेशर १-३ वर्षांत सोडून जातात

सदस्यनाम गुरुवार, 07/16/2015 - 17:44
खेडूतराव अत्यंत माहीतीपुर्ण अन डोळे उघडणारी मालिका. शतशः धन्यवाद. सुरुवातीच्या दोन भागातली परिस्थिती बर्‍यच अंशी पाहण्यात होती पण या भागाने दिलेले धक्के भयानक आहेत. सुदैवाने ह्या क्शेत्रात शिक्षण झालेले नस्ल्याने नशीबवान समजतो स्वतः ला. (जाता जाता: ईंजिनिरींग कॉलेजेसची मुले त्यांच्या त्यांच्या फेस्टीव्हलचे टीशर्टवर "वी मेक द वर्ल्ड", वी बिल्ड द वर्ल्ड" टाईप्चे लोगो मिरवायची. त्यावेळी पण आम्ही त्यांना हसत असू. आता तर कीवच येईल. ऑल ईंजीज टेक लाईट हं ;) )

मधुरा देशपांडे गुरुवार, 07/16/2015 - 17:47
खूप आवडली लेखमाला. एकाच गावातली ३ अशी कॉलेजेस बघितली आहेत जिथे अनेक जागा रिकाम्या आहेत. ही सगळी राजकारणी लोकांची, दोन चकाचक इमारती उभारायच्या, नावाला वृक्षारोपन वगैरे करायचे, तिथे आत काही नसले तरी चालेल. माझी एक वहिनी जेव्हा तिथे शिकवत होती, तेव्हा कित्त्येक वेळा आता या लोकांना कसे शिकवावे, काय करावे जेणेकरुन यांना समजेल, हे अभ्यास करतील आणि पास होतील याने तिलाच त्रास व्हायचा. पण मुलांना कशात रसच नसेल, तर करणार काय. लहान गावात जेव्हा अभियांत्रिकी कॉलेजेस चालु झाली, तेव्हा प्रत्येक घरातुन आता काहीही झाले, कितिही कमी मार्क्स मिळाले तरी पोरगा/पोरगी होइलच इंजिनिअर ही मानसिकता खूप जणांची पाहिली आहे. यात अजुन एक मुद्दा असाही असतो की 'डोळ्यासमोर असलेला बरा, उगाच शहरात जाऊन बिघडायचा, त्यापेक्षा इथे बरे वगैरे'. पण अट्टाहास इंजिनिअरच करायचा. आज यातले बहुतेक जण नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत किंवा कसेबसे भागवताहेत. घराबाहेरही पडावंच लागलं. पण अजुनही आपले मार्क्स, गुणवत्ता बघुन शिक्षणाचा पर्याय निवडण्याची मानसिकता कमीच आहे. मागच्या भागात दोन शिफ्ट्स मध्ये कॉलेज चालवुन विद्यार्थी क्षमता वाढवण्याबद्दल आले होते. जेव्हा आमच्याच कॉलेजमध्ये हे सुरु झाल्याचे ऐकले, तेव्हा आम्हाला हाच प्रश्न पडला होता की जिथे ६० लोकांसाठी लॅबमधली उपकरणे, संगणक पुरेसे नव्हते तर आता १२० लोकांचे काय होणार. अगदी आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःचे लॅपटॉप्स असतात, नेटची उपलब्धता असते तरीही. आणि हे एका चांगल्या समजल्या जाणार्‍या नामांकित कॉलेजात. बाकी ठिकाणी काय बोलणार?

In reply to by मधुरा देशपांडे

आनन्दा गुरुवार, 07/16/2015 - 22:16
बरोबर आहे, तरी पण कॉलेजेस बंद होण्याची शक्यता कमी. कारण हा बराचसा "ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट" चा गेम आहे.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/16/2015 - 18:16
फारच सुंदर, समतोल आणि जमिनीवर उभी असलेली लेखमालिका ! या व्यवसाय क्षेत्राचा विचार करणार्‍या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर वाचावी अशी आहे. या क्षेत्रात अजून पुरेसे न मुरलेल्या (किंबहुना मुरलेल्यांनाही) या लेखांतील वस्तूस्थितीच्या विश्लेषणाचा उपयोग नक्की होईल. जाता जाता : लेखमालिकेत चर्चिलेल्या अर्थ-राज-कारणामुळे वैद्यकिय क्षेत्राचेही पुरेसे "कल्याण' केले गेलेले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आनन्दा गुरुवार, 07/16/2015 - 22:17
परवाच दहावी पास झालेल्या एका मुलाला सांगितले, बाबारे तू कायपण कर, पण विंजिनेर बनू नको.

ओहो गुरुवार, 07/16/2015 - 18:19
लहान गावांमधल्या महाविद्यालयांत काय होते हे सगळ्यांनीच येथे सांगितले पण पुण्या मुंबईत तरी काय वेगळे चित्र आहे होम युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी कमी आणि अदर देन युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी जास्त कारण काय तर या विद्यार्थ्यांकडे जरा जास्त पैसा आहे…. एकाच इमारतीत चालवले जाणारे अनेक अभ्यासक्रम, येउन जाउन असणारे प्राध्यापक आणि डझन भर events आणि आदल्या दिवशी फुटणारे पेपर. छानच आहे सर्व. नारायण मूर्ती नि आताच म्हंटल कि गेल्या ६० वर्षात जगाणे नोंद घ्यावी असे संशोधन झाले नाही भारतात. आय आय टी नको आय टी आय हवीत असे पंतप्रधान म्हणत आहे. म्हणजे त्यानाही हे वाटते कि भारतातील युवा वर्गाने रोजानेच काम करवे. (सुट -बूट युवा वर्गाने घालू नये) त्यांनी approns घालवित. या वर्षीच्या बजेट मध्ये शिक्षणावरचा खर्च कमी करून त्यांनी पहिली भेट दिली होतीच त्यात हि कमी लेखत राहा स्वतःला ची भर ! उच्च शिक्षणातला GRE (Gross enrollment ratio ) अजूनही १३-१५ % आहे त्याचे काय? प्राथमिक / माध्यमिक निकालात झालेला फुगवटा हा एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे खेडूत राव, आपली लेखमाला कितीही चांगली असली तरी अजून किती तरी प्रश्न अनुतारीतच आहेत .

चैतन्य ईन्या गुरुवार, 07/16/2015 - 18:21
सुंदर पण व्यथित करणारे. माझ्या घरात पार आजोबांपासून शिक्षकी परंपरा होती. माझे आजोबा, काका, वडील आणि मामा शिक्षक होते. २००० साला पर्यंत काहीतरी दर्जा होता. आता बघवत नाही. सर्वच ठिकाणी सरकार स्वतः हात काढून घेतय आणि त्याचे दुष्परिणाम पुढील १०-२० वर्षात जोमाने दिसतील. आत्ता आयटीमधली सुबत्ता हि आधीच्या ४०-५० वर्षात लोकांनी घेतलेल्या कष्टाची होती हे अजून आपल्याला समजलेले नाहीये. नवीन आलेले शिक्षक फक्त आपली नोकरी कशी राहील ह्याच विवंचनेत आहेत. ना धड पगार मिळतो ना धड सन्मान मिळतो आणि मुळात स्वतःला पुस्तकी द्यानाशिवाय काहीच माहिती नाही अशी अवस्था आहे. दुर्दैवाने हे पार पहिली पासून होतंय. इतकी क्लास संस्कृति फैलावली आहे कि मला प्रश्न पडलाय शाळा आणि कोलेजस हवीतच कशाला? नुसतेच क्लासला जावे आणि बाहेर परीक्षा द्यावी. ना कुठे खेळायला मोकळे मैदान आहे ना कुठे तुमच्या लायकी प्रमाणे तुम्हाला काही मिळते. त्यातून प्रचंड लोकसंख्या आणि अतिशय कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी चांगली शाळा/कॉलेजेसची संख्या. हे कसे काय जमायचे. राजकीय इच्छाशक्ती कमी आहे आणि पालक लोक घाबरतात. तुम्ही जास्त आरडा ओरडा केला तर तुम्हाला त्रास होतो पण बाकीचे मदतीला येत नाहीत असे चित्र आहे. चिंताजनक अवस्था आहे. त्यातून नवीन सरकार केंद्रात काय राज्यात काय चांगल्या लोकांना बसवते आहे असे दिसत नाही.

सुबोध खरे गुरुवार, 07/16/2015 - 18:37
खेडूत साहेब अतिशय परखडपणे केलेले वास्तव निवेदन आहे परंतु किती लोकांच्या पचनी पडेल ते माहित नाही. दोन दोन वर्षे नोकरी शोधात असलेले आणी भ्रमनिरास झालेले इंजिनियर किंवा नोकरी मिळत नसल्याने पुढचे शिक्षण रस नसताना चालू ठेवणारे अनेक इंजिनियर आजूबाजूला दिसतात. तुम्ही सल्ला द्यायला गेलात तर तुमचे सर्व व्यवस्थित झाले आहे आणी आता तुम्हाला स्पर्धा नको म्हणून असे सल्ले देता असा प्रतिवाद करणारे पण अनेक दिसतात. लष्करात (किंवा निम लष्करी दलात नोकरी साठी) प्रयत्न करत असणार्या बहुसंख्य इंजीनियरना चार वाक्ये शुद्ध इंग्रजीची बोलता येत नाहीत किंवा त्यांची हे हि भयाण वास्तव डोळ्यांनी पाहिलेले आहे. असे असताना आपला कळकळीचा सल्ला किती लोक मानतील हि शंकाच वाटते. असो लेखमाला अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपण दिलेला कळकळीचा सल्ला

एस गुरुवार, 07/16/2015 - 18:39
बर्‍याच दिवसांनी इतके सखोल आणि तटस्थ विवेचन मिपावर वाचायला मिळाले. तूर्तास इतकेच म्हणेन की वाचनखूण साठवली आहे.

आदूबाळ गुरुवार, 07/16/2015 - 18:40
अप्रतिम लेखमाला. अभियांत्रिकी शिक्षण पुरवणारे (विक्रेते/संस्थाचालक) आणि घेणारे (ग्राहक/विद्यार्थी) या दोन्ही बाजूंकडून होणार्‍या अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा हा प्रकार दिसतोय.

उगा काहितरीच गुरुवार, 07/16/2015 - 19:26
त्यामुळे नुसत्या आयटीचा विचार सोडून द्यावा. मिळत असेल तर नक्की जावे, पण आपल्या कोअर ब्रांचचा अभ्यास चालूच ठेवावा.
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ?

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे गुरुवार, 07/16/2015 - 20:23
तुम्ही स्वतः डेवलपमेंट करणारे असाल आणि प्रोजेक्ट कंसेप्ट पाहिजे असेल तर सांगा.

In reply to by संदीप डांगे

उगा काहितरीच गुरुवार, 07/16/2015 - 22:15
प्रोजेक्ट एकट्याला नाही करता येणार (तितका अनुभव नाहीए) सध्या बेरोजगार बसण्यापेक्षा व्हॉइस प्रोसेस जॉइन केली.

In reply to by उगा काहितरीच

अप्पा जोगळेकर Fri, 07/17/2015 - 09:06
आमच्या सारख्या कोअर आयटी वाल्याने काय करावे मग ? सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे. मिळेल तो जॉब स्वीकारावा आणि येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल.) लेख अप्रतिम आहेच. पण सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

खेडूत Fri, 07/17/2015 - 09:34
सहमत! आयटीवाल्यांची कोअर ब्रांच कंप्युटर सायन्स. ते अपडेट करत राहणे आवश्यक. सुपर स्पेशलायझेशन थोड्या लोकांना फायदेशीर . बाकीच्यांचे नुकसान करू शकते. जसे इलेक्ट्रोनिकस वाल्या मंडळीनी २००० मध्ये व्हीएलेसआय शिकून घेतले, त्याकाळी चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पण २००७ नंतर गरजेपेक्षा कित्येक पट व्हीएलेसआय इंजिनियर्स झाले. पुण्यातच ते शिकवणाऱ्या चौदा संस्था झाल्या. मोबाईल ओएस वाले पण नोकियाबरोबर गंडले. अश्या बदलत्या परिस्थितीत मूळ विषयाचं ज्ञान तारून नेतं.

In reply to by खेडूत

उगा काहितरीच, प्रश्न कठीण आहे. कारण उद्या काय हा प्रश्न मलापण आजही पडत असतो. आपल्या क्षेत्रात सतत अपडेट रहाव लागेल हे बी. ई. च्या पहिल्या दिवशी सांगितलेलं वाक्य आठवतो आणि सतत काही न काही शिकायचं प्रयत्न करत असतो. आपले बेसिक्स मजबूत करून ठेवा आणि सतत स्वतःला इम्प्रोव्हाइज करत रहा. आपल्या क्षेत्राततरी 'थांबला तो संपला' हे सत्य आहे. खेडूतराव, आपण अगदी बरोबर विश्लेषण केलेय! सगळे मुद्दे अनुभवतच मोठे झालो असल्याने पूर्णपणे सहमत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट अजून झाली की मुलांचा नवीन काहीतरी शिकण्याचा, काही नवीन करून दाखवण्याचा उत्साह संपूनच गेलाय. वर जस आपण बर्नआउट बाबत म्हटलंय तसच काहीस आजकाल कंपनीत दाखल होणाऱ्या उमेदवारांबाबत जाणवत. एकदा सिलेक्ट झालो की बस्स! जमेल तसं काम करत रहायचं आणि पगार घेत राहायचा अशी काहीशी वृत्ती सार्वत्रिक होत चालली आहे. काम जमलं नाहीतर लीडला सांगून करवून घ्यायचं … आणि लीड त्यातल्या त्यात कसंबसं करून देणार … संपलं. अरे खुद्से क्यू पढनेका कंपनी को जरुरत होगी तो देगी ट्रेनिंग और पढायेगी असे उद्गार सर्रास ऐकू येतात. ४ ५ वर्ष काम झालेले सरळ अब किताब लेके पढना नही होता म्हणून मोकळे होतात! आम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करत राहतो … एकंदरीत कठीण होणारे असं वाटत चाललंय.

In reply to by अप्पा जोगळेकर

उगा काहितरीच Fri, 07/17/2015 - 22:33
सर्व प्रथम फेसबुक, मिसळपाव सारख्या सायटींवर उगाच वेळ घालवणे बंद करावे.
फेसबुक जवळजवळ बंदच आहे, मिपा बऱ्याच बाबतीत अपडेट ठेवतं त्यामुळे मिपा चालू आहे.
मिळेल तो जॉब स्वीकारावा
स्वीकारला ... आजच!
येणार्‍या पैशांतून उत्तमोत्तम कोर्सेस करावेत. (आजघडीला अत्युत्तम रिअल टाईम ऑनलाईन कोर्सेसची उपलब्धता खूप आहे. पूर्वी म्हणजे अगदी सात-आठ वर्षांपूर्वी हे नव्हते. किचकट पुस्तके वाचून जे ६ महिन्यात कळत नाही ते चांगला ट्रेनर १० दिवसात शिकवेल
प्रयत्न करतो.
सगळेच काही संपले असे मानण्याचे कारण नाही.
छे कधीच हार मानणार नाही. शैक्षणिक प्रवास खडतरच होता पण हार मानली नाही. एक ना एक दिवस यश मिळणारच !

In reply to by उगा काहितरीच

श्रीरंग_जोशी Fri, 07/17/2015 - 22:37
एक ना एक दिवस यश मिळणारच !
हे खूप महत्वाचे. एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा!!

In reply to by श्रीरंग_जोशी

प्यारे१ Fri, 07/17/2015 - 22:56
>>> एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते. हे वाक्य दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होते. असं हवं कारण आपण लिहीलेल्या वाक्यात दत्ताजी शिंदेंचं एम सी ए सुरु होतं असं प्रतीत होत आहे. याबाबत व्याकरणाच्या लिंका 'आपल्याआपणशोधा.कॉम' वर सापडतील. -प्यारेंग_ जोशी हलकं घ्या ओ जोशीपंत ;)

In reply to by प्यारे१

श्रीरंग_जोशी Fri, 07/17/2015 - 23:02
=)) कृपया वरच्या प्रतिसादातील हे वाक्य
एमसीए करताना दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हेच आमचे ब्रीदवाक्य होते.
कृपया खालीलप्रमाणे वाचावे...
दत्ताजी शिंदेंनी इतिहासात अजरामर केलेले 'बचेंगे तो और भी लढेंगे' हे वाक्य आमचं एमसीए करतानाचं ब्रीदवाक्य होतं.
स्वगतः प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी वाक्यरचना एकदा तपासून घ्यायला हवी.

खेडूत गुरुवार, 07/16/2015 - 20:46
सर्व वाचक, प्रतिसादक यांचे खूप आभार… ! गजोधर , अस्वस्थामा , ओहो:- वाचून विचार करता करता शंका येतीलच. चर्चा करूच. जे मला माहीत नाही ते माहीत असणारे इथे बरेच सदस्य आहेत. पालकांनी मुलांचे करियर निवडताना जागरूक व्हावे हाच इथे लिहीण्याचा उद्देश !

संदीप डांगे गुरुवार, 07/16/2015 - 20:54
खूप सुंदर मालिका. मौल्यवान माहिती. 'पुढे काय?' बद्दल अजून सविस्तर वाचायला आवडेल. अभियांत्रिकीकडे जाण्याची इच्छा असणार्‍यांनी अ‍ॅप्टीट्यूड कसं ओळखायचं हाही एक प्रश्न आहे. नुसतं डीग्रीची भेंडोळी (तेही इंजी.च्या) घेऊन चपला झिजवणे म्हणजे ७० चा काळ (बी.ए. किया है, एम. ए. किया) परत आल्यासारखं वाटतंय.

अजया गुरुवार, 07/16/2015 - 21:11
लेखमाला वाचुन काॅम्प्युटर इंजिनिअरिंगची पॅशन असणार्या माझ्या अकरावीतल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी,दया वाटायला लागलीये.

In reply to by अजया

श्रीरंग_जोशी गुरुवार, 07/16/2015 - 21:18
जर कॉलेजातील शिक्षकांवर अवलंबून न राहता झोकून देऊन अभ्यास करणार असेल तर या क्षेत्रात अजुनही भरपूर वाव असणार आहेच. समस्या फक्त वरवरचे ज्ञान असणार्‍यांसाठीच आहे. लेख व संपूर्ण लेखमालिका खूप भावली. मी भारतात राहत असताना दोन कॉलेजेसमध्ये गेस्ट लेक्चर्स दिली आहेत. भविष्यात मोठी सुटी असल्यास भारतवारीदरम्यान धागाकर्त्याशी संपर्क साधून गेस्ट लेक्चर देता येईल का ते बघीन.

In reply to by अजया

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/16/2015 - 23:54
आवडीने आणि सचोटीने काम करणार्‍या उत्तम प्रतीच्या कर्मचार्‍यांची आणि अधिकार्‍यांची चणचण हे सार्वकालीक (आणि आजचेही) जागतीक सत्य आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. फक्त मुलाला लक्ष विचलित न करता वर सांगितलेले गुण आत्मसात करायला सांगा.

अर्धवटराव Fri, 07/17/2015 - 06:44
अंजन. 'आधि वाढ मग विकास' हे आपलं राष्ट्रीय चरित्र या सर्व प्रकरणाच्या मुळाशी आहे. त्याचं मूळ आहे १८५७ नंतर भारताचं इंग्रजीकरण होण्यात (हि एक फार चांगली गोष्ट झाली असं आमचं मत). पहिले कॉपी करायची. मग हळुहळु, अर्ध कच्चं का होईना, मूळ रूप येतच हा आपला सिद्धांत आहे. लोकशही असो, मुक्त अर्थव्यवस्था असो, खासगीकरण असो कि अजुन काहि. आपण हाच पॅटर्न वापरतो. संधी हुडकायची, योग्य नियमन व्यवस्था उभारायची , श्रम घ्यायचे आणि फळ चाखायचे हि विकसीत देशांची मानसीकता. नसलेली संधी हुडकायची किंवा कुणीतरी ते सांगयचं, त्याच्या फायद्याकरता जाळं टाकायचं, काहिंना त्याचा त्याचा लाभ होईल-कुणाचं वाटोळं होईल त्याचं सांख्यीकी बघुन नवीन जाळं टाकायचं हि आपली पद्धत. जय हो !!

In reply to by अर्धवटराव

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 10:00
हजारटक्के सहमत. अगदी हेच टंकणार होतो. मूर्तींच्या कालच्या विधानामागे हेच कारण आहे. आपले लोक नवीन काही करायला घाबरतात, वाट पाहतात दुसर्‍याने करायची. त्याचे यशस्वी झाले की मग कॉपी करतात. अशाने आपण काळाच्या खूप मागे राहतो हे कळत नाही. सेफगेम खेळायची जन्मजात वृत्ती आहे पण सेफगेमला लागणारी अभ्यासू वृत्तीही नाही. आपल्याकडे शिक्षणाकडे बघण्याची गरज फक्त नोकरी मिळवण्यापुरती आहे. म्हणजे पैसा आणि मान देणारी नोकरी आणि आपण यामधे शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही. त्यामुळे अडथळा पार करायला साम-दाम-दंड-भेद वापरायला काही चुकीचं वाटत नाही लोकांना. कॉप्या करत पास होणे का होत असावं याचं हे साधं कारण आहे. शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. त्याला बायपास करण्याचे हरप्रकारे प्रयत्न केल्या जातात. आडातच मिष्टेक असल्याने पोहर्‍यात काय अपेक्षा करावी. नवीन काही करणार्‍याला आपलं वातावरण सपोर्ट करत नाही. त्यामुळे नवीन करू पाहणार्‍यांचा उत्साह टिकत नाही. एकिकडे आपल्याकडे 'हे नाही ते नाही' असं तोंडदेखलं बोलायचं आणि जेव्हा खरोखर सपोर्ट द्यायची वेळ येते तेव्हा नेहमीच्याच वृत्तीने वागायचं असंच चाल्लंय. आजवर जे मिळाले नाही ते मिळवण्यासाठी आजवर जे केले नाही ते करायला लागतं. पण आपण भारतीय लोक इतके झटके बसूनही शिकत नाहीत हे खरं दुर्दैव.

In reply to by संदीप डांगे

श्रीरंग_जोशी Fri, 07/17/2015 - 10:21
अर्धवटराव व तुमच्या प्रतिसादांच्या आशयाशी पूर्णपणे सहमत. प्रतिसाद ज्या प्रकारे लिहिले आहे त्यामुळे तर ते अधिकच भावले.

In reply to by संदीप डांगे

अर्धवटराव Fri, 07/17/2015 - 11:02
शिक्षण (डीग्रीचा कागुद) हा अडथळा म्हणून बघितल्या जातं, संधी म्हणून नाही.
आमची हिच गत होती सुरुवातीला. लेकीन भला हो उस मानवका...आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले. त्यावेळी आमच्या टाळक्यात जे काहि थोडंफार घुसलं त्याच्याभरोशावर आमचा गाडा आजवर चाललाय. असलं कोणि त्या अगोदर का भेटलं नाहि हि खंत आहे म्हणा... पर देर आए दुरुस्त आए. या असल्या लेखमालांबद्दल म्हणुनच आपुलकी वाटते. हे सगळं केवळ लेक्चरबाजी नसुन अगदी १००% व्यवहार्य आहे हे मी स्वतः अनुभवलय.

In reply to by अर्धवटराव

खेडूत Fri, 07/17/2015 - 11:14
आमचा एक मास्तुरे एक दोन लेक्चरमधे असे काहि लक्ख बोलला कि आमचे डोळे खाडकन उघडले. बरं त्याने केवळ लेक्चरबाजी केली नाहि तर चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन प्रॅक्टीकली व्यवसाय यशस्वी करुन दाखवले.
आमच्यासारखेच दिसतात तुमचे मास्तुरे! आम्ही बारा वर्षांपूर्वी चांगली प्राध्यापकी नोकरी सोडुन दिली म्हणून आज आनंदात आहोत. पण सोडण्याचं मुख्य कारण असंच झालं - की, '' मुलांना विषयासोबत अवांतर तांत्रिक माहिती का देता? तुमचा विषय शिकवा आणि गप रहा '' अशी विचारणा-कम दटावणी वारंवार होऊ लागली. आमचं म्हणणं असं होतं की इथं सर्वाधिक हुशार मुलं प्रवेश घेतात. त्याना सांगू नायतर काय बापूसाहेब मुंगळे इन्सटिटयुट मध्ये जाउन सांगणार का? नाय पटलं दिलं सोडून! सरकारी नोकरी सोडली म्हणून लोकांनी लै उपदेशाचे डोस दिलेले - आता ते आठवून गंमत वाटते.

सुबोध खरे Fri, 07/17/2015 - 10:27
शिक्षण हे स्वत:ला पात्र बनवण्यासाठी आहे असं लोकांना वाटतंच नाही. शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे.डाव्यांबद्दल तर बोलूच नये( सीताराम येचुरी सारखे लोक तर रोजगार निर्माण करणे हे सरकारचे काम आहे मग त्या आस्थापनात उत्पादन होवो कि न होवो असे बोलतात) एकदा नोकरीत चिकटला कि ब्रम्हदेवसुद्धा त्याला हाकलू शकत नाही बर्याच वेळेस अपात्र उमेदवाराला न्यायालये सुद्धा "मानवातापूर्ण" नजरेने पाहतात. अशा स्थिती मुळे काहीही करून पदवी मिळवा आणि त्या जोरावर नोकरी मिळवा. म्हणून अशी कुत्र्याच्या छत्र्यांसारखी इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आहेत. एकदा शिक्का बसला आणि सरकारी नोकरी मिळाली कि राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला काढू शकत नाही. मग ज्ञान आहे कि नाही. त्यातून विविध वेतन आयोगांनी सरकारी नोकरीत बढती हि कालानुरूप असल्याचे नक्की केलेले आहे त्यामुळे तुम्ही कितीही नालायक असा एका विशिष्ट पातळी पर्यंत बढती मिळणारच. (आणि राखीव असलात तर अत्त्युच्च पातळी नक्की). (व्यापमचा महाघोटाळा याच मनोवृत्तीमुळे झाला आहे. कशीही पदवी मिळावा आणि तशाच तर्हेने सरकारी नोकरी मिळवा आयुष्याचे कल्याण होणारच). ज्ञान, पात्रता, संशोधन याचा काय संबंध?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 10:35
शिक्षण हे पात्रतेसाठी नसून पदवीसाठी आहे याचे मूळ आपल्या समाजवादी मनोवृत्तीत आहे. अगदी नेमकं पकडलं आहे खरेसाहेब, आजच्या भारताला अमेरिकेसारख्या प्रखर भांडवलवादाची गरज आहे. आजच्या ग्लोबलायझेशच्या जगात आणि इतक्या संधी उपलब्ध असतांना गरिब आणि मागासलेले राहू तर तो आपलाच दोष आहे हे तरुणांच्या मनावर बिंबवले जाणे खरोखर आवश्यक आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 11:44
आलेली परिस्थितीच बांधेन बहुतेक. जेव्हा दुसरा काही पर्याय राहणार नाही बदलण्याशिवाय तेव्हा बदलावेच लागेल. सगळ्यात आधी तर जनतेने राजकारण्यांना दोष देणे बंद केले पाहिजे. स्वतःकडे जबाबदारी घेऊन बदल घडवायला सुरुवात करावी लागेल. नाही शिक्षणव्यवस्था बदलत तर समांतर शिक्षणव्यवस्था उभी राहिली पाहिजे. जशी आज कोचिंग क्लासेसची उभी राहिली आहे. शिकणार्‍यांना कळकळ असेल तरच हे शक्य आहे म्हणा. काही उद्योगांनी स्वतःला लागणारे मनुष्यबळ घडवायला सुरुवात केली आहेच. अजूनही बरंच काही करता येईल. मला तरी सतत असंच वाटतं की भारत अशा वळणावर आजही उभा आहे जिथून हजारो यशाच्या वाटा फुटतात. पण जणू कडेलोटावरच उभे आहोत हे चित्र रंगवणे बंद केले पाहिजे. कारण हे चित्र तरूणांना सर्वायवल स्टँड घ्यायला भाग पाडतं जेव्हा खरंतर किलर स्टँड घ्यायची गरज आहे.

In reply to by संदीप डांगे

विजुभाऊ Fri, 07/17/2015 - 13:43
" संधींची समानता " म्हणजे परफेक्ट उदाहरण घ्यायचे असेल तर राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)

In reply to by विजुभाऊ

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 14:20
विजुभाऊ, ते सर्व ठिक आहे. पण माझे नाव टाइप करतांना पूर्ण टाईप करावे, कुठल्याही प्रकारे शॉर्टकट मारू नये. कष्ट पडत असल्यास नाव टाइपच करू नये. संदेश व भावना पोचतात बरोबर. धन्यवाद! संपादकांना सांगून प्रतिसाद संपादून घेणे ही नम्र विनंती. चुकीचा पायंडा पडु नये म्हणून...

In reply to by विजुभाऊ

अस्वस्थामा Fri, 07/17/2015 - 14:56
राहूल महाजन आणि राहूल गांधी या दोन्ही राहुलाना समान संधींची उपलब्धता होती. ( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
यावर असहमत. समजा एक कपडा व्यापारी आहे आणि त्याचे दुकान आहे. म्हणून त्याच्या पोराला तिथे तसाच व्यापारी दुकानदार बनण्याची संधी आहे असे म्हणणे आणि ती घालवली असे इतरांनी म्हणणे हे पटत नाही.त्यांना काय करायचेय ते त्यांना ठरवू द्या ना. नसेल बनायचं एखाद्यास दुकानदार तर काय "संधी घालवली" म्हणायचं काय ?
( त्याचे त्यानी काय केले हा वेगळा विषय आहे.....)
त्या राहूल गांधी बद्दल असे म्हणता येईल एकवेळ कारण तो झेपत नसताना देखील राजकारणीपणा करत बसलाय. त्याला उपरती होईल तो सुदीन असेच म्हणावे लागते त्याच्यासाठी. पण त्या राहुल महाजन बद्दल कसलाही आदर नसतानापण असे म्हणावे वाटते की त्याला नव्हते राजकारणात यायचे त्याने त्याचे इतर उद्योग केले, त्याची मर्जी. "संधीची उपलब्धता आणि त्याने त्याचे काय केले" हे प्रश्न त्याच्या अथवा रितेश देशमुखच्या(जर आलाच नै राजकारणात तो तर) बाबतीत गैरलागू ठरतात असे वातते.

In reply to by संदीप डांगे

एस Fri, 07/17/2015 - 15:44
हा प्रतिसाद तुम्ही मनापासून लिहिलाय की नाही हे माहीत नाही. माझी बर्‍याच विषयांवर बरीच मते आहेत. ती इथे मांडावीत असे इथले वातावरण मात्र नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. असो. चालू द्या.

In reply to by एस

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 15:56
मी तो मनापासुनच लिहलंय.. कारण एकोळी प्रतिसादातून प्रतिसादकर्त्याला नक्की काय म्हणायचंय ते कळत नाही कधी कधी. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय हे समजल्याशिवाय मी पुढचा प्रतिसाद कसा लिहिणार? म्हणजे तुम्ही वेगळंच काही म्हणताय आणि मी मनात वेगळाच अर्थ घेऊन लिहिलं तर सगळं मुसळ केरात. नै का? तुमच्या एका शब्दातून तुम्हाला हवा असलेला नेमका व पुस्तकभर अर्थ शोधायला मी काही प्रकांडपंडीत किंवा अंतर्यामी तर नाही बुवा. प्रत्येकाची मतं असतातच बर्‍याच विषयांवर, त्यांनी ती मांडावी की नको हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण एखाद्या प्रतिसादावर खिल्लीसदृश्य एकोळ टाकली तर वाचकाने नेमकं समजायचं तरी काय? भले माझं ज्ञान तुमच्यापेक्षा फारच कमी असेल. पण ते कुठं चुकतंय ते समजलं तर पाहिजे की नाही? (मी तरी मिपावर तेवढ्यासाठी येतो) की फक्त तुमचं ज्ञान कमी आहे अशा अर्थाची नुसती टिप्पणी टाकून निघून जायचं व मत विचारलं की वातावरण खराब आहे असं म्हणायचं? असो. बाकी तुमची मर्जी...

In reply to by संदीप डांगे

एस Fri, 07/17/2015 - 19:01
१. किमान शब्दांत म्हणणे मांडायची सवय असल्याने मेगाबायटी प्रतिसाद मी देत बसत नाही. २. वैयक्तिक टीकाटिप्पणीला मी उत्तर देत नाही. ३. माझ्या मूळ प्रतिसादाचा रोख हा भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. प्रस्तुत लेखमालेतही तेच मांडण्यात आले आहे. इथे अभियांत्रिकी शिक्षणाची आलेली सूज हीसुद्धा अनियंत्रित भांडवलशाहीचीच कमाल आहे. (तळटीपः मी साम्यवादी नाही.)

In reply to by एस

संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 19:55
भांडवलशाहीच्या आंधळ्या स्वागतामागील धोके विसरता कामा नयेत ह्याकडे होता. भांडवलशाही असो वा साम्यवाद, संधींची किमान समान उपलब्धता आणि मानवविकासाच्या शक्यता ह्या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी तिथल्या व्यवस्थेत मुळातच नैतिकतेचे एक अधिष्ठान असायला लागते. ते नसेल तर जगातली कुठलीही राज्यव्यवस्था तेथील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचे कल्याणकारी ध्येय्य प्राप्त करण्यास असमर्थ ठरते. यासाठी धन्यवाद!

प्यारे१ Fri, 07/17/2015 - 13:09
उत्तम लेखमाला. आधीच्या भागात लिहिलेलं carry forward आणि नापास न करणे यामध्ये भरडले गेलेलो आम्ही विद्यार्थी. त्यात अभ्यास का करायचा याचा पोच नव्हता, आर्थिक परिस्थिति व्यवस्थित पास झालो तरच शेवटच्या वर्षीपर्यंत जाऊ शकण्याची होती, सुरुवातीला पैसे जास्त जाण्याचा अपराधगंड, नापास झाल्याचा न्यूनगंड, नंतर कोडगेपना (यात कानानं ऐकू न येणं आणि त्यामुलं शिकवलेलं न समजणं हे सगळांच् होतं. ) carry forward चा एक फ़ायदा म्हणजे सबमिशन नंतर कॉलेज नव्हतं. मग विषय नंतर काढत बसलो. नोकरी करत करत. नोकरी करत स्वतपुरते का होईना पैसे मिळवत विषय त्यामानानं लवकर सुटले. असो!

सस्नेह Fri, 07/17/2015 - 14:46
माहिती अन अभ्यासपूर्ण लेखमाला. ..पण काहीशी नकारात्मक. याबरोबरच अभियांत्रिकीव्यतिरिक्त इतर करिअरसंधी यावर माहिती आली असती तर सकारात्मक झाली असती. अमुक करू नये, यापेक्षा तमुक केले तर कसे, हे वाचायला आवडेल.

खेडूत Fri, 07/17/2015 - 14:55
नकारात्मक आहे यावर सहमत. मालिकेचा परीघ 'इंजिनियारिंग प्रवेशाचा निर्णय' इतकाच ठरवला होता अन्यथा खूप लांबले असते. सध्या प्रवेशप्रक्रिया चालू आहे आणि पालक भरकटताना दिसताहेत म्हणून पटकन लिहून पूर्ण केली. सरकार आणि संस्था हा बाजार चालू ठेवतील, पण 'आपण नियंत्रण करूयात' हा संदेश द्यायचा होता. शिवाय सर्वच पर्यायी करीयर्स बद्दल मला माहिती नाही....

मोहनराव Fri, 07/17/2015 - 18:30
एक अतिशय उत्तम लेखमालिका. सध्याची परिस्थिती इतकी वाईट झाली आहे हे माहित नव्हतं. शिफ्ट्मध्ये कॉलेजेस चालतात हे ऐकले नव्हते. आजकालच्या फिज ऐकुन तर डोळे फिरतात. माझे शिक्षण त्या मानाने खुपच कमी खर्चात झाले. मीपण एक सिओईपी मधुन पासआऊट झालेला अभियंता. मला ती सीट २ राऊंड्ला मिळाली होती. नशिब चांगले म्हणायचे बाकी काय. पहिल्या राऊंडला एक बालेवाडी इथे नवीन निघालेल्या कॉलेजला मिळाला होता प्रवेश. इमारत अजुन बांधकाम अवस्थेत असुनसुद्धा क्लासेस चालु होते. काही विद्यार्थ्यांना विचारले असता ते म्हणाले दर्जा एकदम टुकार आहे, इथे अजिबात प्रवेश घेऊ नकोस. कुठल्या एका पुढार्‍याचे कॉलेज होते. असो. सगळा शिक्षणाचा बाजार झालाय बाकी काही नाही.

माहितगार Sat, 07/18/2015 - 17:56
वास्तवदर्शी लेख मालिका आवडली. एकदा पुण्यातील एका अगदी छोट्या कंपनीसाठी संगणक अभियंते निवडताना प्लेसमेंट सर्वीसचे चार्जेस कंपनीचे मालक देत नाही म्हणाले म्हणून कँडीडेटच्या पगारातून पैसे घेणार्‍या प्लेसमेंट सर्वीस कडून ४-५ कँडिडेट घेतले. सहा साडेसहा हजाराच्या जॉबसाठी मुले उड्यामारून तयार होती कारण ग्रामीण भागातून आलेली बरीच (अभियंता) मुले रोजंदारीचे आयटीया लेव्हलचे कामगार म्हणून तीन साडेतीन हजारावर (१२ तास) काम करत होती त्यातले पहिल्या महिन्याचे चाळीस टक्के प्लेसमेंट एजन्सी घेणार. आणि एवढे करून हे जॉबही परमनंट असणार नाहीत म्हणजे दर सहा महिन्यानी प्लेसमेंट एजन्सीला चाळीस टक्के देणे आले. प्लेसमेंट एजन्सीला त्यांचे चाळीस टक्के मिळावेत आणि मुलांनी सहा महिन्याच्या आतही जॉब सोडू नये म्हणून त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार थोडक्यात अभियंत्यांकडून वेठबिगारी. बर्‍याच मुलांच्या ग्रामीण पालकांनी कोरडवाहू जमीन ठेवण्यापेक्षा आहे नाही ती जमीन विकून ह्या मुलांना मोठ्या आशेने अभियांत्रिकी शिक्षण दिलेले ज्ञान आणि एक्सपोजरच्या अभावाने आणि स्पर्धा ह्या कारणांनी मुले अपेक्षीत पगार सोडाच शहरातील स्वतःच्या जेवणाचे आणि राहाण्याचे पैसे मिळाले तर पुरे. वर जिथे जिथे मुले लिहिले त्यात अभियंत्या मुलीही आल्या. अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली. अर्थात अशा महाविद्यालयातून बाहेर पडलेला कठीण परिस्थितीला तोंड देणारा विद्यार्थीवर्ग निमुटपणे सहन करत असतो मिसळ पाव सारख्या संकेतस्थळावरून त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलते व्हावयास हवे तरच त्यांच्या समस्यांच्या गांभीर्याचा अंदाज समाजापुढे अधीक व्यवस्थीतपणे पुढे येऊ शकेल.

In reply to by माहितगार

आदूबाळ Sat, 07/18/2015 - 19:23
अशीच परवड एम बी ए ची कॉलेजेस अत्याधिक प्रमाणात काढूनही केली गेली.
एमबीए हा इंजीनियरिंगपेक्षा भयानक प्रकार आहे. एका जाणत्या माणसाला या बाबत लिहितं करायच्या प्रयत्नात आहे.

In reply to by माहितगार

पैसा Sun, 07/19/2015 - 10:26
त्यांच्या सर्टीफीकेट्सची ओरीजनल्स या प्लेसमेंट कंपन्या ठेऊन घेणार
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात? शाळा कॉलेजात ठेवणे वेगळे. हे बेकायदेशीर वाटते. आणि कंपन्या तरी थेट भरती का करत नाहीत? त्यांच्याकडे एच आर वाले लोक असतातच.

In reply to by पैसा

सतिश गावडे Sun, 07/19/2015 - 11:21
ओरिजिनल्स कशा काय ठेवता येतात?
सन्माननीय हे हल्ली फ़्रेशरच्या बाबतीत सर्रास होते. मुळ कागदपत्रे कंपनीकडे अडकून पडल्याने वेठबिगारी करण्यापलीकडे पर्याय नसतो.

In reply to by सतिश गावडे

खेडूत Sun, 07/19/2015 - 13:11
भयन्कर आहे! असं हैदराबादला करतात हे ऐकलं होतं. महाराष्ट्रात असं काही ऐकलं नव्हतं. म्हणूनच हल्ली कंपन्या पार्श्वभूमी तपासण्यासाठी वेगळ्या संस्था नियुक्त करतात. खरा अनुभव नसतो आणि असे दोन वर्षे ओलिस राहून बाहेर पडणारे 'बिचारे' मुलाखतीस येतात.

माहितगार Sat, 07/18/2015 - 20:28
मिपाकरांनी फाट्यावर मारलेल्या माझ्या डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने या धागा लेखातून या धाग्यासाठी एक अनुषंगीक अवांतर मुद्दा. ... *वाढत्या लोकसंख्येचा बेरोजगारी वरील प्रभाव; शैक्षणिक क्षेत्रातून मागणी पेक्षा पुरवठा अधिक देणार्‍या शैक्षणिक संस्थांचे खर्चीक ढोंग व त्यातून उत्पन्न होणारी छूपी बेरोजगारी आणि उद्योजकाता विकास चळवळीच्या अपयशाचा परामर्ष: आरक्षण विषयाचे विश्लेषण होताना ज्या काही महत्वाच्या मुद्यांची चर्चा होताना दिसत नाही त्यात एक म्हणजे वाढती लोकसंख्या आणि त्या मानाने रोजगाराची अनुपलब्धततेतून येणारा सामाजिक दबाव. यातीलच समांतर मुद्दा शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचाही आहे. शैक्षणिक पात्रतेस अनुसरून रोजगार नसलेल्या छूप्या बेरोजगारीचा प्रश्न नवीन नाही, गेल्या वीसवर्षातील यातील नवीन बाब म्हणजे शिक्षणाचे खासगी करण झाल्यानंतर ज्या उज्वल भवितव्याची स्वप्ने यूवकांना दाखवून त्यांच्या कडून भरमसाठ देणग्या घेऊन शिक्षण दिल त्या प्रमाणात त्यांना प्रत्यक्षात रोजगार संधी उपलब्ध झाल्या नाहीत यातील एक कारण पुरवठा आणि मागणी यातील तफावत राहील आहे. ग्रामीण भागातील उंच देणग्या देऊनही रोजगार प्राप्त न झालेल्या यूवकांना मुंबई पुण्यात ज्या वेठ बिगारीला तोंड द्याव लागत ते ज्या संवेदनशील लोंकांनी जवळून अनुभवल असेल तेच सांगू शकतील अथवा त्या अनुभवातून गेलेले तरूणच त्यांची लाजीरवाणी स्थिती समोर मांडू शकतील. लोकसंख्येचे प्रश्न आणि हा असंतोष समाजात खदखदत असणे आश्चर्याचे नाही ही गोष्ट येथे लक्षात घेणे जरूरीचे वाटते. पण याच उत्तर उद्योजकता विकासात आहे की आरक्षणात हे या प्रश्नाला शांत चित्ताने भिडल्या नंतरच कळू शकते. ....

अत्यंत पोटतिडकीने लिहिलेली आणि वाचकांचे डोळे खाडकन डोळे उघडणारी लेखमाला. हे असे फक्त इंजिनीरिंग मधेच चालले आहे असे नाही , सर्वच क्षेत्रात शिक्षणाची अशी वाट लावायचा विडा उचलला आहे या शिक्षण सम्राटांनी . सरस्वतीला यांनी लिपस्टिक लाउन बाजारात उभे केले आहे. पैजारबुवा,

खेडूत गुरुवार, 07/23/2015 - 09:24
प्राथमिक प्रवेश फेरी आता झाली आहे- यात विशेष रस असल्याने यावर्षी किती जागा मोकळ्या जागा रहातात त्याची उत्सुकता आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या जागी काही ना काही कारणाने हजारो लोक्स जातच नाहीत. परिणामी त्या मोकळ्या राहतात. आता समुपदेशन सुरु झाले आहे. त्यातून उरलेले प्रवेश होतील. मेडिकलला मात्र जरी दुसऱ्या फेरीत मिळणार असेल तरी पहिले जिथे मिळाले तिथे रीतसर प्रवेश घ्यावाच लागतो. खासगी असले तरी . आभियांत्रिकीलाही २००० साला पर्यंत असं होत होतं की जागांपेक्षा दोनतीन हजार अर्ज जास्त येत. तितक्या लोकांना प्रवेश मिळत नसे. तेंव्हा रिपोर्ट न करणारे या प्रक्रियेतून बाद होत. यावर्षी असेही अर्जच कमी आल्याने पासष्ठ हजार मोकळ्या जागा असणार हे आपण पाहिलं आहे. आता मिळूनही प्रवेश न घेणारे किंवा अन्य अभ्यासक्रमाला जाणारे त्यात वाढतील. कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत . खालील आलेखात पन्नास प्रकारच्या शाखांपैकी प्रातिनिधिक फक्त पाच शाखांची आकडेवारी पहा. n पुणे, विदर्भ, शिवाजी, मुंबई, मराठवाडा या क्रमाने विद्यापीठामधे अनावश्यक संस्था आहेत असे दिसते. हे अत्यंत रोचक आहे. अन्य छोट्या विद्यापीठात एकूण जागाच कमी, त्यामुळे रिकाम्या जागाही कमी आहेत. जसे बाटु- लोणेरे, किंवा गोंडवन विद्यापीठ. ते इथे परिणाम करत नसल्याने धरले नाहीत. सोयीसाठी पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा आणि विदर्भातल्या प्रत्येकी दोन विद्यापीठांना एकत्र केले आहे. (तसेही नुसत्या राजकारणानेच त्यांना वेगळे केलेय!) आता दहा ऑगस्ट पर्यंत अचूक आकडा कळेल. पण लेखात म्हटलेली लालसा विभागवार स्पष्ट होते! जनता हुशार आहे. सुमार संस्थांना मस्त फाट्यावर मारले आहे. एका संस्थेत कुठल्याश्या शाखेत सर्व १२० जागा म्हणजे दोन्ही तुकड्या मोकळ्या राहिल्या आहेत ! (त्याला परवानगी देणारे आता कुठे असतील?) विशेष म्हणजे शासकीय अभियांत्रिकी (अवसरी-पुणे ) मध्ये इलेकट्रोनिक्सच्या १७ जागा मोकळ्या गेल्या. मंत्र्यांनी मनमानी करत गावाकडे काढलेले सरकारी कॉलेज असल्याने हुशार मुलांनी पाठ फिरवली आहे. एकूण बरीच माहिती मनोरंजक आहे. पालक सुजाण असल्याचे पाहून आनंद वाटला ! अधिक सविस्तर संस्थानिहाय माहितीसाठी या ठिकाणी पाहता येईल.

In reply to by खेडूत

राही गुरुवार, 07/23/2015 - 11:00
'जनता हुशार आहे. सुमार संस्थांना फाट्यावर मारले आहे' तेच तर. मागणी होती म्हणून पुरवठा बेबंद वाढला. गैरव्यवहार वाढले. हे अर्थात गैरव्यवहारांचे समर्थन नाही, ती 'का?' या प्रश्नाची चिकित्सा आहे. मागणी घटली की आपोआपच या संस्था बंद पडतील किंवा नवी कुरणे शोधतील. जनता मेंढरांसारखी वागताना दिसली तरी त्यात एक व्यवहार असतो, रोजीरोटीचा व्यवहार. आणि व्यवहारवाद हे एक उघडे-नागडे, कुरूप असे वास्तव असते.

In reply to by खेडूत

पैसा गुरुवार, 07/23/2015 - 11:53
कॉलेजे लोकांना बोलवू-बोलवून नेऊ लागलीत .
हे कधीच सुरू झालंय. २ वर्षांपूर्वी माझ्या मुलाला सीईटी नंतर असे कित्येक ईमेल्स आणि एसेमेस आले. आमचे कॉलेज असे आणि तसे, फीमधे सवलत देऊ वगैरे. त्याला गोव्यात आम्ही रहातो तिथेच सरकारी कॉलेजमधे मेक्यानिकलला पहिल्याच राउंडमधे अ‍ॅडमिशन मिळाल्याने महाराष्ट्र सीईटीला चांगले मार्क्स असूनही बाकी काही विचारही केला नाही.

अभिजित - १ Sat, 08/01/2015 - 18:44
विना अनुदानित कोलेज मध्ये या वर्षी ८० हजार जागा रिकाम्या राहणार आहेत. बिच्चारे कोलेज चालक. केंद्र सरकार या करता योग्य पाऊले उचलत आहे. हे बघा .. थोडक्यात विना अनुदानित ला ३२०० बकरे मिळतील जे एरवी NIT मध्ये जाऊ शकले असते. आहे कि नाही सरकार डोकेबाज ? http://www.loksatta.com/kg-to-college-news/nit-waste-of-space-this-year-3200-1128241/ विविध कारणांमुळे प्रवेश रद्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा अन्य प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमधून भरण्याऐवजी त्या रिक्तच ठेवण्याचे अनाकलनीय धोरण 'नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी'ने (एनआयटी) राबविल्याने देशातील 'आयआयटी'खालोखाल प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या तंत्रशिक्षण संस्थेतील तब्बल ३२०० जागा यंदा चक्क वाया जाणार आहेत. थोडय़ाफार गुणांनी एनआयटीचा प्रवेश हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर यामुळे मोठा अन्याय होणार आहे

In reply to by अभिजित - १

खेडूत Mon, 08/03/2015 - 15:54
एन आय टी आणि नव्या आय आय टीज मध्ये हल्ली (२००९ नंतर )जागा शिल्लक रहातात. अश्या एकूण ९० संस्था एकत्र अ. भा. पातळीवर प्रवेश प्रक्रिया करतात . गेल्या वर्षी सुद्धा बरोब्बर २ ऑगस्टला अशाच मोकळ्या राहिलेल्या जागांबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने या संस्थांना सुनावले होते. मनुष्यबळ मंत्रालयाला पुढील वर्षी (२०१५-१६) उपाय शोधण्यास सांगितले होते. त्यामुळे यावर्षी ते झाल्यास विद्यार्थी पुन्हा न्यायालयात जातील आणि किमान पैसे परत मिळवतील. या संस्थांना अश्या जागांचे या वर्षी १४.५ कोटी रुपये मिळाले तरी पुढच्या तीन वर्षात मिळू शकणारे १०० कोटी बुडणार आहेत . त्यामुळे असे करणे मुळीच शहाणपणाचे नाही ! मात्र हे इतर राज्यातल्या खासगी संस्थांच्या फायद्यासाठी केले जाते असे नाही. देशभरात अभियांत्रिकीच्या सुमारे साडेपाच लाख जागा मोकळ्या रहातात. या तीन हजाराने त्या संस्थाना फरक पडत नाही. निव्वळ लाल फितीच्या कारभाराचा नमुना आहे! मागास विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरत असते. खासगी संस्था ते सरकारकडून मिळवतात. त्यामुळे कसेही करून इनटेक वाढवणे , मागास विद्यार्थ्यांना आकर्षित करून, प्रवेश देऊन शासनाकडून शुल्क उकळणे - सर्वांना उत्तीर्ण करून पुढील वर्षीचे उत्पन्न निश्चित करणे असा खेळ चालू असतो. त्यापुढे जाउन अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचे पैसे लाटण्याचेही प्रकार झाले आहेत. यावर्षीच्या ८०,००० मोकळ्या जागांमध्ये मागास विद्यार्थांच्या जागा ७०% असू शकतात. याचे कारण मुळात गरजच नसताना प्रवेश क्षमता वाढली आहे . अजून १५ दिवसांत अधिकृत आकडेवारी मिळेल असा अंदाज आहे.

अभिजित - १ Sat, 08/01/2015 - 18:46
आणि अजून एक . मागास वर्गीय विद्यार्थी लोकांचे भले व्हावे म्हणून त्यांना आरक्षण आहेच. पण या खासगी कोलेज मध्ये पण त्यांना जागा असतात आणि त्यांची करोडो रु ची फ़ी दयाळू सरकार भरते. अर्थात कोलेज चालाकंचे भले व्हावे हाच खरा हेतू. इतर ठिकाणी सरकार कडे पैसा नाही . पण इथे उडवायला आहे. सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे भाजप सरकार येउन पण हा प्रकार अजून हि चालूच आहे. खेडूत साहेब जरा याच्यावर पण प्रकाश टाकाल का ? नक्की किती जागा / सरकार दर वर्षी किती पैसे भरते इथे ?

बबन ताम्बे Tue, 08/11/2015 - 19:13
त्यानंतर चित्र क्लीअर होईल. पण अंदाजे ६०००० जागा रिकाम्या रहातील असा अंदाज आहे. जिथे जागा भरल्या जाणार नाहीत अथवा खूप कमी भरतील, ती कॉलेज बंद पडायच्या मार्गावर आहेत. वाईट तिथल्या स्टाफचे वाटते. त्यांच्या नोकरीचे काय?

खेडूत Mon, 07/25/2016 - 10:53
धागा वर काढत आहे- मुख्यतः जे पालक येत्या वर्षा दोन वर्षांत पाल्याला अभियांत्रिकीला पाठवू इच्छितात आणि त्या क्षेत्राची माहिती नाही, त्याना उपयोग व्हावा. या वेळची प्रवेश प्रक्रिया- २०१६ संपली. यावर्षीही पालक आणि विद्यार्थी, दोघांनीही ते सजग असल्याचे दाखवून दिले आहे. मोकळ्या जागा रहात असल्याने नियमावलीचे पालन करत सरकारने तीस हजार जागा आधीच कमी केल्या होत्या. त्यामुळे आधीच्या १,६५,००० जागांच्या तुलनेत यावर्षी १,३५,००० जागा होत्या. कॉलेजांनीही विद्यार्थी आकर्षित करण्यासाठी फी कमी केली आहे. त्यांपैकी अवघ्या ७१,००० जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे निम्म्या जागा रिकाम्या रहाण्याचा ट्रेंड तसाच राहिला आहे. आता पुढच्या वर्षी ही सूज अजून उतरते का ते पहायचे! एक रोचक गोष्ट अशी: पुणे (२९ हजार) आणि मुंबई (१७ हजार) या दोन विद्यापीठ क्षेत्रांत ६५% प्रवेश झालेत. म्हणजे अवघे ३५% प्रवेश उर्वरित महाराष्ट्रात झालेत. त्याच पुणे विभागात सहा महाविद्यालये अशी आहेत, जिथे पैसे देऊन एकही प्रवेश झाला नाही! म्हणजे मागासवर्गीय कोट्यातून १०-२० टक्के प्रवेश केवळ फी पडत नाही म्हणून झाले. अशी महाविद्यालये विदर्भात सर्वाधिक आहेत. (अश्या एका ठिकाणी पहिला विद्यार्थी महाराष्ट्रात गुणवत्ता क्रमाने ९२००० वा आलेला आहे.) आता सर्व नियम मोडीत काढून उद्यापासून पुन्हा तीन दिवस 'प्रवेश प्रक्रिया- चौथा भाग' होत आहे. हा, 'जो जे वांच्छील तो ते लाहो' राऊंड आहे, त्यामुळे अजून एक-दोन हजार लोक्स आंत येतील. डिप्लोमा (पदविका) साठी २५ हजार जागांसाठी अवघे १५००० अर्ज आले आहेत. याचा परिणाम असा होतोय, की प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे पगार साताठ महिने अडून रहात आहेत. त्यातून काही अन्य समस्या उभ्या रहात आहेत. हे हजारो विद्यार्थी आता अन्य व्यवसायाभिमुख अभ्यासाकडे वळत आहेत, असे एका प्राध्यापकाने सांगितले. ' जे होते ते चांगल्यासाठीच' असं म्हणून निरीक्षण करत आहे...!

In reply to by खेडूत

अभ्या.. Mon, 07/25/2016 - 11:04
खेडुतराव, ह्याला पूरक बातमी. वस्तुस्थिती माहीत नाहीये पण परवाच्या आयटीआय प्रवेशप्रक्रियेला सोलापूर आयटीआय समोरील रस्ता ब्लॉक. 2 किमी लाईन.

In reply to by अभ्या..

खेडूत Mon, 07/25/2016 - 11:13
खरंय. डिप्लोमाधारक हाताने काम करत् असूनही ते कामगारवर्गात मोडत नाहीत. त्यांना युनियन करता येत नाही. त्यापेक्षा नक्की जॉब मिळवून देणारे शिक्षण म्हणून आय टी आय करण्याकडे ओढा आहे.