एका जत्रेची सत्यकथा ! (ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये . )

प्राची अश्विनी जनातलं, मनातलं
ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा . सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते. सरदाराला एक राणी होती पण त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याचे नायकिणी, दासी यांच्याशी सुद्धा संबंध होते. सरदाराला जरी औरस संतान नसले तरी वेगवेगळ्या दासींपासून झालेले दोन दासीपुत्र होते. पुढे वसुलीतील काही भांडणावरून सरदाराचा खून झाला . तो कुणी केला याचा काही शोध लागला नाही . साहजिकच सर्वांना वाटले की विधवा राणी काही आता वसुली वगैरे भानगडीत पडणार नाही . पण राणी होती खमकी . तिने नोकाराला बरोबर घेऊन वसुलीचे काम सुरूच ठेवले. बरं राणी हयात असेपर्यंत सरदाराच्या संपत्तीवर अनौरस मुलाना काही हक्क सांगता येईना . त्यामुळे त्यांनी राणीलाही मारायचा डाव आखला . त्याप्रमाणे ती वसुलीला त्या गावात आली असताना रात्रीच्या वेळी तिच्या डोक्यात मोठ्ठा दगड घालून ठेचून तिला ठार मारले . मारेकऱ्यांना कुणी बघितले नव्हते यामुळे याहीवेळी कोणी सापडले नाही . सर्व आता सुरळीत होईल असे वाटत असताना त्या दासीपुत्राच्या कुटुंबातील कुणी कर्ता माणूस अचानक मरण पावला . काही दिवसानंतर अजून कोणी मृत्यू पावले. अशा दुर्घटना वारंवार होऊ लागल्या . सगळे घाबरले . राणीचा शाप भोवतोय असे त्यांना वाटू लागले . गावात तेव्हा भगत म्हनुन्लोक असत . ते अशा गोष्टींमध्ये सल्ला देत असत . भगताकडे गेल्यावर त्याने सांगितले," राणीचे दिवस ( मरणोत्तर क्रियाकर्म) केले गेले नाही म्हणून हा त्रास होतोय . तर तिचे यथोचित श्राद्ध करा आणि जिथे तिला ठार मारले तिथे प्रसाद नेउन ठेवा .पण घरातील पुरुषांनी मात्र तिथे त्या दिवशी जाऊ नका " त्याप्रमाणे त्या घरातील पुरुषांनी केस कापले , श्राद्ध केले , ज्या दगडाने तिला मारले त्या दगडापाशी वडे आणि वाटाण्याची आमटी हा श्राद्धाच्या वेळचा प्रसाद ठेवला . घरातील सर्व पुरुष त्यावेळी गावाबाहेर थांबले . त्यानंतर दर वर्षी ,राणीला मारले साधारण त्या तिथीच्या आसपास त्या कुटुंबातील लोंक ही प्रथा पाळू लागले . बाजूच्या जंगलात त्या सुमारास डुक्कर किंवा सश्याची शिकार करत आणि ती मिळाल्यानंतर काही दिवस सोडून श्राद्धाचा मुहूर्त पकडला जाई . हळूहळू त्या दगडाच्या भोवती शेड बांधली . लोक जातायेता त्याला नमस्कार करू लागले , घुमटीचे छोटे देऊळ झाले. त्या देवळात प्रसाद तसेच थोडीफार दक्षिणा जमा होऊ लागली . आता प्रश्न आला या दक्षिणेवर, उत्पन्नावर हक्क कोणाचा ? इतक्या वर्षांत ते दोन्ही दासीपुत्र मरण पावले होते . पण त्यांची मुले होती . ती कोर्टात गेली . केस चालू झाली . सर्व जुन्या लोकांच्या साक्षी झाल्या आणि वरती संगितलेली माहिती बाहेर आली . ज्याने कर्म केले त्याला त्याचे फळ या न्यायाने त्या दोन्ही कुटुंबाना खरेतर त्या घुमटीचे उत्पन्न मिळायला पाहिजे . पण गोम इथेच होती . एका कुटुंबाला स्वत:ला दासीपुत्र म्हणून घेणे लाजिरवाणे वाटत असे म्हणून त्यांनी आपली जात बदलून मराठा करून घेतली होती . विरुद्ध बाजूच्या वकिलांनी हाच मुद्दा कोर्टासमोर मांडला आणि त्या आधारे त्यांचा उत्पन्नावरील हक्क उडवून लावला . आणि केस जिंकली . दरवर्षीच्या श्राद्धाची प्रथा चालूच राहिली . घुमटीचे छोटे देऊळ झाले . हळूहळू त्या दगडाच्या बाजूला एक देवीची मूर्ती आली . देऊळ मोठे झाले . आणि देवळाचा बिझिनेस चालू झाला . काही वर्षांपूर्वी ऐकण्यात आले की देवीची मोठी मूर्ती बसवण्यात आली आणि दगड काढून टाकण्यात आला . भाविकांची गर्दी वाढतच आहे . अजूनही जत्रेच्या वेळी वाडे आणि काळ्या वाटण्याची आमटी हा नैवेद्य दाखवला जातो . ७५ सालापर्यंत त्या विशिष्ठ आडनावाचे लोक जत्रेच्या वेळी क्षौर ( केस कापणे) करत असत . त्या जागी जत्रेच्या पहिल्या दिवशी फिरकत नसत . सध्या काय होते माहित नाही . हे सर्व सांगायचे कारण की परवा विकीपीडीया मध्ये या जत्रेची आणि देवस्थानाची (?) माहिती वाचली . त्यात या देवीचा उगम ४०० वर्षे सांगितला आहे , एवढेच नाहे तर एक गाय इथल्या दगडावर आपणहून दुध देत असे कुणा गावकऱ्याने हे पाहिले किंवा त्याच्या स्वप्नात आले असेही सांगितले आहे .( विकिपीडियात कुणी चुकीची माहिती सुद्धा फीड करू शकतात . ) म्हणून वाटले की ही सत्य माहिती समोर यायला हवी . १ ज्यांच्या हयातीत ही घटना घडली ते सर्व केव्हाच मरण पावले . ही केस कोर्टात लढली गेली तेव्हा त्या केसशी जोडले गेलेले लोक देखील आता हयात नाहीत. ( माझ्या आजोबांनी ही केस चालवली होती) . त्यावेळी लहान असलेले लोक किंवा माझे वडील ज्यांना ही माहिती त्यांच्या वडिलांकडून मिळाली ते सर्व आता सत्तरीत किंवा त्याहून वयस्कर आहेत . त्या पिढीबरोबर ही माहिती सुद्धा नष्ट होईल . म्हणून इथे सांगायचा प्रयत्न केलाय . खरे तर त्यासाठी त्या स्थानाचे नाव सांगायला हवे . पण हल्लीच्या सुसंस्कृत , पुढारलेल्या महाराष्ट्रात जिथे नरेंद्र दाभोलकरांची दिवस ढवळ्या हत्या होते तिथे नाव सांगायची हिम्मत नाही . २ ही केस कोर्टात लढली गेली . कोर्टात सर्व केसेस ची माहिती जपून ठेवली जाते म्हणून अजूनही ती माहिती असावी असे वाटते. ३ देऊळ चित्रपट पाहिल्यानंतर ही घटना पुन्हा आठवली .
वर्गीकरण

101 टिप्पण्या 25,271 दृश्ये

Comments

चिनार नवीन

पटण्यासारखं आहे !! सगळ्या देवस्थानांची थोड्याफार फरकाने अशीच कथा असेल का ? OMG मधला संवाद आठवला "these are not god loving people .these are god fearing people "

पिलीयन रायडर नवीन

रोचक माहिती.. आधी तुम्ही नाव का सांगत नाही हे समजत नव्हतं.. पण आता समजलं.. वाईट वाटलं की आपण जीवच्या भीतीने बोलुही शकत नाही आहोत..

योगी९०० नवीन

एक गाय इथल्या दगडावर आपणहून दुध देत हे मी आमच्या कोकणातल्या देवीबद्दल सुद्धा ऐकले आहे. तिथेही जत्रा होते पण पंढरपूरशी तुलना नाही.

योगी९०० नवीन

In reply to by योगी९००

माका पण समजला... हे मी आमच्या कोकणातल्या देवीबद्दल सुद्धा ऐकले आहे. तिथेही जत्रा होते पण पंढरपूरशी तुलना नाही. हे मी आमच्या आरोंद्याच्या देवी विषयी ऐकले होते. पण वरील लेख वेगळ्याच देवीच्या संदर्भात आहे.

स्वप्निल रेडकर नवीन

अवांतर : माज्या यूज़रid मधला काना काढून टाकायचा असेल तर संपादन मधे कुठे पर्याय आहेत? इथे माझी त्या मोठ्या जत्रेत हरवलेल्या मुलसारखी स्थिती झालिय martahi टाइपिंग करताना. मदत करा प्लीज़

अत्रुप्त आत्मा नवीन

धर्मकारणामधे,..मूळ कारणं काळाआड गेल्यामुळे अनेक गोष्टी,ह्या अश्या का? ,याचा पत्ता लागत नाही. जो अनेकदा लागणं अत्यंत आवश्यक असतं. बरं..सत्य काय आहे? हे (त्यांना..) कळे पर्यंत, कट्टर मनोवृत्तीचे लोक,ह्या गोष्टींमधे काहि घातक अगर वैट चालत असेल्,तर ते बदलूहि देत नाहीत. आंम्ही पानशेत मागे ५४ किलोमिटर आत,खोल जंगलात एका आदिवासी पाड्यावर नवचंडी होमाच्या कामाला गेलो होतो. तिथे देव अंगात धरणारा माणुस, होमाची पूर्णाहुती झाल्यावर ..बलिपूजेचा दिवा नदिला सोडून येतो.आणि तिकडून तसाच नाचत नाचत येऊन पेटत्या होमकुंडात नाचुन्,त्यात फतकल मारुन बसतो. अशी प्रथा पाळली जाते,हे मला आदल्या दिवशी कळलं. ते थांबविता येणं,काहि केल्या शक्य नाही,हे ही कळलं. तसा कोणताही प्रयत्न केल्यास मार खावा लागेल,याचीहि तेथल्या स्थानिक गुरुजिंकडून कल्पना देण्यात आली. आणि दुसर्‍या दिवशी त्या अंगात देव'वाल्या माणसानी सर्व काहि तसेच्या तसे केले. आंम्ही देवळात गपचुप पणे पहात उभे राहिलो. त्यानी पेटत्या होमात नाचुन फतकल मारल्या नंतर, चहुबाजुला निखारे उडाले. त्यात ज्यांना भाजलं..ती लोकं आनंदानी तेथील देवीच्या पायावर "प्रसाद मिळाला" म्हणून (नंतर) लोटांगणं घालत होते. आणि या देव'धर्‍या माणसाला तर अंगावर अनेक ठिकाणी भाजले होते. अर्थात तो आधीच सर्व अंगाला भरपूर राख चोपडून आल्यामुळे , फार भाजलं ही नसावं. पण आजुबाजुच्या भावुक पब्लिकमधली मोठ्यांबरोबर (त्याच मोठ्यांनी आणलेली..) लहान मुलं ही ठिणग्या उडून भाजत होती.त्याचं काय????? :( त्यांना माहित तरी होतं का?, आपल्याला आपले पालक्,कोणता प्रसाद-देत आहेत.??? :( नंतर भरपूर चलाखि करून पाड्यावरच्या लोकांना आणि तेथील स्थानिक पुरोहिताला विचारलं,तेंव्हा कळलं की हा तिथल्या एका अतीप्राचीन अंधःश्रद्धेशी जोडलेला प्रकार होता. पण ती श्रद्धा म्हणजे काय? याच उत्तर "गावचं संकट होमात नेऊन टाकणे" अश्या पद्धतीची संदिग्ध उत्तरं मिळाली. मला तर ती जुन्या नरं-बळीची रीत वाटत होती..जी आता केवळ होमात नाचल्यानी/बसल्यानी कमी स्वरुपात शिल्लक राहिली होती. हे संपूर्ण सविस्तर इथे मांडायचं कारण, प्राची अश्विनी , यांनी- देवळाच्या कहाणी मागचं सत्य जसं जाहिर केलं. तसं न केल्यानी (अर्थातच..माहित असताना..), काय काय-चालू राहु शकतं , हे कळावं. इतकच आहे.

पगला गजोधर नवीन

हि माहिती आंतरजालावर आणल्याबद्दल अभिनंदन.

आदूबाळ नवीन

सत्य माहिती समोर यायला हवी .
हे कोणतं देवस्थान आहे? नैवेद्याच्या तपशीलावरून तळकोकणातलं वाटतंय. आणि तिथे सावंतवाडी संस्थानही होतं.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

अनेक देवदेवतांच्याभोवती जे अंधश्रद्धांवर आधारीत दिव्यत्व निर्माण केले गेले आहे त्यामागे बर्‍याचदा अर्थकारण आणि सत्ताकारण (लोकांच्या मनावरची पकड आणि पर्यायाने राजकिय सत्ता) आहे असेच दिसते. गोबेल्सचा एक नियम सांगतात : "असत्य मोठ्याने खूप वेळा सांगितले की त्याचे सत्य बनत." याचाच आधार घेऊन अर्थ-सत्ताकारणाला सोईच्या काल्पनिक कथा वारंवार सांगून चमत्कारांचे वलय निर्माण केले जाते आणि मूळ खरा पण गैरसोईचा इतिहास दडपूण ठेऊन काही काळाने लोकांच्या आठवणीतून नष्ट केला जातो.

सतीश कुडतरकर नवीन

मला नाही भीती मरणाची. हे घ्या मु. पो. मसुरे, आंगणेवाडी तालुका: मालवण जि: सिंधुदुर्ग रा: महाराष्ट्र हि कथा आजीकडून कळली होती.

अभिरुप नवीन

मानला तर देव नाही तर दगड हेच खरे. देव माणसांमध्ये शोधला तर अखिल मानवजातीचे कल्याण होइल.

सतीश कुडतरकर नवीन

सर्वात प्रथम १९८५ मध्ये मालवणला शाळेत असताना गेलो होतो. त्यावेळेस जत्रांच्या हंगामात एकमेकांच्या गावात जाण्याची चढाओढ असायची. आंगणेवाडी त्यापैकीच एक. गर्दी अजिबात नसायची. पैसा आला, दळणवळण थोड सुकर झालं आणि मुंबईचा चाकरमानी जो फक्त मे आणि गणपतीच्या दिवसात गावी यायचा तो जत्रांमध्ये सुद्धा दिसायला लागला. खरतर मालवणचे ग्रामदैवत देऊळवाड्यातला रामेश्वर फ़ेमस आणि आजूबाजूच्या गावातले देव या रामेश्वराला भेटायला येतात. पण नव्वदच्या दशकात तर अचानक लाट आली आणि सगळा फोकस आंगणेवाडीच्या भराडीवर गेला.

खंडेराव नवीन

एका वेगळ्या विषयावर लिहील्याबद्दल. सगळ्या देवांचा बाजार करून ठेवलाय आपण. या सगळ्या स्वप्नात देव आलेल्या मंदीरांची कथा अशीच काहीशी असेल.

पुणेकर भामटा नवीन

म्हणती देव मोठे मोठे । पूजताती दगड गोटे ।। कष्ट नेणती भोगती । वहा दगडाते म्हणती ।। जीव जीव करूनी वध । दगडा दाविती नैवेद्य ।। रांडा पोरे मेळ झाला । एक म्हणती देव आला ।। नाक घासूनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ।। एका जनार्दनी म्हणे । जन भुलले मूर्खपणे ।। ------------------------सन्त एकनाथ महाराज.

बाबा पाटील नवीन

यांच्यात घंटा दम नसतो,आमच्या गावातली अंगात येण्याची प्रथा आमच्या परमपुज्य गुर्जी असलेल्या पिताश्रींनी दिलेल्या आयड्याच्या कल्पनेने झटक्यात बंद झाली होती( अंगात आलेल्या माणसाच्या पायाजवळ सराटे/गोक्षुर कंटक फेकायचे) लय सुमडीत नाचत राव.

कविता१९७८ नवीन

In reply to by बाबा पाटील

हे काय असत, या भागात बर्‍याच जणाच्या अंगात येत एकदा हा उपाय करून पहायला हवा

पैसा नवीन

प्रसादाबद्दल वाचून शंका आलीच होती. ती खरी ठरली. आमच्या लोकांचं एकूण औघड आहे.

हाडक्या नवीन

In reply to by वगिश

जानकारांन्नी प्रकाश टाकावा.
तुम्हास "माहितगार लोकांनी प्रकाश टाकावा" असे म्हणावयाचे आहे काय ??

आदूबाळ नवीन

In reply to by वगिश

तो कोर्टाचा निर्णय मिळाला तरच बदलता येईल. विकीपिडिया वर "अनसपोर्टेड अ‍ॅट्रिब्यूशन" करायला बंदी आहे.

विकास नवीन

In reply to by आदूबाळ

http://en.wikipedia.org/wiki/Aangnechi_wadi खालील मजकूर दिसतो... This article has multiple issues. Please help improve it or discuss these issues on the talk page. This article does not cite any references or sources. (July 2008) This article provides insufficient context for those unfamiliar with the subject. (July 2009)

माहितगार नवीन

In reply to by वगिश

विकीपीडिया वर चूकीची माहीती असल्यास बदलतेा येतोे. जानकारांन्नी प्रकाश टाकावा.
धागा लेखात उल्लेख झालेला लेख बहुधा इंग्रजी विकिपीडियावरचा लेख असावा (मराठी विकिपीडियावर या विषयावर बहुधा अद्याप लेख नसेल असे वाटते.) आदूबाळ म्हणतात तसे विकिपीडियावर संदर्भासहीत लेखन करणे अभिप्रेत असते. सध्या इंग्रजी विकिपीडियावरचे लेखन संदर्भा सहीत केलेले दिसत नाही. पण सध्याच्या माहितीसाठी आंतरजालावर खासकरून मराठी वृत्तपत्रात संदर्भ उपलब्ध दिसतात. एक संदर्भ पेशवाईकाळात चिमाजी अप्पांनी मंदीरासाठी इनाम दिल्याचा दिसतो आहे, आणि ते खरे असेल तर तो संदर्भ धागा लेखातल्या मुद्यांशी जुळत नाही. अर्थात मराठी वृत्तपत्रातील लेखनही बर्‍यापैकी संशोधनात्मक दूर राहीले माहितीस किमान दुजोरा देण्याचेही पथ्य पाळले जात नाही त्यामुळे ऐकीव पलिकडे त्या संदर्भाचे सध्याचे मोल किती याची साशंकता राहतेच. उपरोक्त लेखातील कोर्टकेसचा उल्लेखही केवळ ऐकीव स्वरुपाचाच उरतो हे इथे लक्षात घेतले पाहीजे. पेशवाई दफ्तरातून अथवा वंशजांकडून काही कागदपत्रे उपलब्ध होतात का आणि कोर्टातून उपरोक्त धागालेखात वर्णन केलेल्या केसची कागद पत्रे मिळवून मगच कोणत्याही संदर्भांना नेमकेपणा येईल. अर्थात धागा लेखास आलेले काही प्रतिसाद बघता धागा लेखक म्हणतात तशी समाजात चर्चा असावी एवढे फारतर म्हणता येईल. आदूबाळ म्हणतात तसे दुसरा प्रमाण पुरावा समोर येई पर्यंत सध्याच्या स्थितीत मटाने केलेले पेशवाई कालीन असल्याचे उल्लेख प्रमाण मानण्या पलिकडे विकिपीडियन्सच्या हाती दुसरा पर्याय आहे असे वाटत नाही. (चुभूदेघे)

माहितगार नवीन

In reply to by माहितगार

धागा लेखानुसार मंदीराच स्वरुप सुरवातीस अत्यंत कौटूंबीक आणि मर्यादीत होत आणि कोर्टकेस्च्या काळात आजच्या सारख सार्वजनिक उत्पन्न मंदिरास नसावे. आणि सार्वजनिक उत्पन्न नसतानाही उत्पन्नाच्या वाट्यावरून जर कोर्ट केस होत असेल मंदीराच्या नावे काही जमीन अथवा इनाम असण्याची शक्यता दिसते. आणि ज्या मंदिराच्या नावे जमीन/ इनाम असेल ते मंदीर कोर्टकेसच्या काळापेक्षा जुने आणि इनाम देणार्‍यास पुरेसे महत्वाचे वाटले असावे. त्यामुळे धागा लेखातील माहिती काही लोकांत अंशतः चर्चीत असलेली असली तरी प्रथमदर्शनी माहिती नेमके निष्कर्षा पर्यंत येण्यासाठी पुरेशीही ठरत नाही. (चुभूदेघे)

प्राची अश्विनी नवीन

In reply to by माहितगार

माहितीबद्दल धन्यवाद! चिमाजी अप्पा यान्च्या माहितीबद्दल लिन्क मिळेल का?

प्राची अश्विनी नवीन

In reply to by प्राची अश्विनी

कोर्ट केसचे कागदपत्र माझ्याकडे नाहीत , १९८५ साली आजोबांच्या मृत्युनंतर ती सर्व कागदपत्रे जाळून टाकली , पण कोर्टात असावीत असे वाटते त्या कागदपत्रातील माहिती प्रमाणे ( ही माहिती माझ्या वडिलांनी वाचली होती पण आत्ता कागदपत्रे हाती नसल्याने अर्थात ऐकीव म्हणावी लागेल ) १ त्या जागी आधी कुठलेही मंदीर नव्हते . २ राणीच्या मृत्युनंतर काही वर्षातच घुमटी उभी राहिली . ती जागा सरदाराच्या मालकीची असल्याने या घुमटीवर त्याच्या वंशजांचा अधिकार होता . १९२८-२९ दोन वर्षे केस चालली . या केसच्या वेळी त्या घुमटीचे/देवळाचे उत्पन्न जरी आत्ता इतके नसले तरी बऱ्यापैकी असावे . (मुख्यत: नारळाचे ) केसनंतर दोन वंशजान्पैकी एकाचा अधिकार उडवून लावण्यात आला .(कारण आधी सांगितले आहे) ३ न्यायाधीश ब्रिटीश होते . ४ त्यावेळी वयस्कर लोकांच्या साक्षी झाल्या होत्या . तसेच जागेचा इतिहास ( संस्थानिकांची साक्ष , सरदाराचा वतननामा , इत्यादी ) कोर्टासमोर सादर केले गेले . ५ त्यावेळी मंदिराचे बांधकाम राणीच्या मृत्युनंतर काही वर्षात झाले असे सिद्ध झाले . जुन्या केसचा निकाल वगैरे शोधण्यासाठी नंबर माहित असावा लागतो . जाणकारांनी अधिक माहिती द्यावी

माहितगार नवीन

In reply to by प्राची अश्विनी

मी काल गूगल करताना वेगळी लिंक होती ती पुन्हा दिसल्यावर देईन. तुर्तास ह्या लिंकेवरील माहितीतही चिमाजी अप्पांचा उल्लेख दिसतो आहे. अर्तात ऐतिहासिक गोष्टींबाबत प्रमाण संदर्भ विश्वासार्हपणे पडताळणे याला शॉर्ट्कट असू शकत नाही अस माझ व्यक्तीगत मत आहे.

माहितगार नवीन

In reply to by प्राची अश्विनी

ह्या लोकसत्ता वृत्तात सुद्धा तीच चिमाजी अप्पांची कथा रिपीट होऊन आलेली दिसते. शेवटी, मराठी पत्रकार मंडळी द्यावयाच्या माहितीची शहानिशा कितपत करत असतील माहितीस वेगळ्या माध्यमातून दुजोरा कितपत घेतात त्या बद्दल तेच जाणोत.

सतीश कुडतरकर नवीन

In reply to by बहुगुणी

कोकणच्या राजा आणि त्याच्या समर्थकांचा स्वतःचा वाहतूक व्यवसाय असल्याने दरवर्षी फुकट अथवा अगदीच किरकोळ मोबदल्यात आंगणेवाडीची यात्रा घडवण्यात येते. या वाहतूक व्यवसायातील हितसंबंधांमुळेच कोकण रेल्वेच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले.

खटपट्या नवीन

ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे पटकन दुखावल्या जातात त्यांनी हा लेख वाचू नये
हा ढीश्क्लेमर टाकल्यामुळे वाचनसंख्या वाढणारच आहे. बाकी माहीती उत्तम..

प्राची अश्विनी नवीन

In reply to by खटपट्या

एकदा ट्रेन मध्ये माझ्या वडिलांनी एका परीचीतास ही माहिती सांगितली . शेजारी बसलेल्या काही लोकांनी ती ऐकल्यावर वडिलांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या , पुन्हा असे कुठे बोललात तर …म्हणून धमकीही दिली होती .

स्पंदना नवीन

या अश्या लेखांची अतिशय गरज आहे आपल्याला. "जिकडं खोबरं तिकडे चांगभल!!" असा एक लेख याच विषयावर लिहीला होता तो शोधते आहे. पण गायब झाला आहे, मिळत नाही आहे. :(

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by स्पंदना

शोध घेतला असता हे मिळाले... या लेखाबद्द्ल धागाकर्तीचे धन्यवाद. अडीच वर्षांपूर्वी कार्ला येथील एकवीरा देवी मंदिरात प्रथमच गेलो होतो. तेव्हा लोक बिनधास्तपणे बळी देण्यासाठी प्राणी आणत होते. मी आजवर कधीच हा प्रकार पाहिला नव्हता. विदर्भामध्ये गाडगेबाबांनी केलेल्या लोकजागृतीमुळे असले प्रकार कधीच बंद पडले.

सतीश कुडतरकर नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

मुख्य म्हणजे बौध्द लेण्यांमध्ये ते एकविरा मंदिर हेच मुळी घुसखोरीच उत्तम उदाहरण आहे.

प्रचेतस नवीन

In reply to by बॅटमॅन

घुसखोरी असं रूढार्थाने नाय म्हणता येणार. मूळात सातव्या आठव्या शतकात भारतातून बुद्ध धर्मांचा संपूर्ण र्‍हास, तसेच ब्राह्मी लिपी अनोळखी झाली होती. कित्येक शतकं पडीक अवस्थेत घालवल्यावर ह्या लेण्यांमध्ये नंतर स्थानिक देवता मूर्तीरूपात स्थापल्या गेल्या. किंवा वोटीव स्तूपाच्या उठावाला भागाला शेंदूर फासून गणेशामध्ये रूपांतरीत करण्यात आलं.

बॅटमॅन नवीन

In reply to by प्रचेतस

तसं असेल! प्वाइंटाचा मुद्दा हा की इन अ‍ॅडिषन टु दीज़ प्रोसेस, प्रत्यक्ष घुसखोरीही करण्यात आलेली आहे.

बॅटमॅन नवीन

In reply to by प्रचेतस

विजापूर जिल्ह्यात काही उदा. आहेत असे तत्रस्थ संशोधकांनी सांगितले आहे. जैन बस्तीत लिंगायत मूर्ती इ. त्या केसमध्ये शेकडो वर्षे पडीक असेलसे वाटत नाही.

सतीश कुडतरकर नवीन

In reply to by प्रचेतस

कॉलेज संपल्यावर आमच्या एका कोळी मित्राबरोबर देवी दर्शनासोबत बोकड प्रसाद आणि मदिराप्राशन करून मातीचा सुगंध घेण्यात मज्जा आलेली.

धमाल मुलगा नवीन

In reply to by बॅटमॅन

काय राव, मुळ महाभारताच्या श्लोकांमध्ये घुसखोरी, 'बुध्दीदाता' गणपतीची मेनष्ट्रीममध्ये केलेली घुसखोरी अशा काही उदाहरणांपुढे नुसत्या मुर्ती घुसवल्याची ती काय मातबरी? :) तत्कालीन समाजकारण आणि समाजावर असलेला धर्माचा पगडा, त्यातून वर्चस्व खेचण्यासाठी धर्माचा वापर करणं असा साधा सोपा 'पोलिटिकल सोशिओलॉजिकल' फ्याक्टर है त्यो. आता ह्ये आमच्यासारख्या आडान्यानं सांगायला पायजे व्हय? :)

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by धमाल मुलगा

लेखकाचं नाव लक्षात नाही. पण पुस्तक छान आहे. पृथ्वीवर मानव हा परग्रहावरुन येऊन स्थिरावला अश्या कल्पनेवर पुस्तक आधारित आहे. एक जण घेउन गेलीये...परत मिळालं की लेखकाचं नाव सांगतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by टवाळ कार्टा

आणलं असतं रे...पण तिच्या नवर्‍याकडे दंबुक आहे =))...थोडक्यात तिच्या गळ्यात लायसन आहे =))

काळा पहाड नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दंबूकवरून, पाटील डॉक्टर साहेब दंबूक वर लेख लिहिणार आहेत त्याची आठवण झाली.

सतीश कुडतरकर नवीन

मला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिर आणि व्यवस्था विषयी लिहायचं आहे. मिपावर नक्कीच लिहीन. कारण आज जे लोक कोकण आमचा म्हणून इतिहासाचा/पुराणाचे दाखले देतात त्यांना उघड पाडायचं आहे, त्यात माझीही जात आली. तत्कालीन सामाजिक उतरंडीमध्ये नीचतम पातळीवर असलेल्या जाती जमाती हेच इथले मुळ रहिवासी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच नातेवाईक असल्याने तिथल्या बऱ्याचश्या गावांमधील देवळात जाणे झाले आहे आणि बरीचशी माहिती गोळा केली आहे.

प्राची अश्विनी नवीन

In reply to by सतीश कुडतरकर

आपल्या लेखाच्या प्रतिक्षेत! कोकणातील सर्व जुनी, स्वतःचे स्वतंत्र वास्तुस्थापत्याचे अस्तित्व असलेली छोटी देवळे आता चकाचक मोठी आणि एक छाप नवीन शैलीत बदलत आहेत .देवळांवरती या बदलासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात . वाईट वाट्ते .

अप्पा जोगळेकर नवीन

धन्यवाद. दादरचे सिद्धीविनायक मंदिर आणि उद्यान गणेश हीदेखील २५ वर्षांपूर्वी अतिशय सामान्य देवळे/टपर्‍या होत्या असे ऐकून आहे.

आदूबाळ नवीन

In reply to by अप्पा जोगळेकर

उद्यान गणेश अगदी २००५/०६ पर्यंत लहानसं, छान, शांत होतं. आमच्या हपीसची मुंबई शाखा समोरच होती. जेवल्यावर पाय मोकळे करायला तिथे जात असे.