Skip to main content

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सांगायचे की कुठलेही क्षेत्र किंवा विषय घ्या या देशाने महानतम व्यक्तींची फौज उभी केली आहे. महानतेत थोडेफार अधिक उणे आहे. नाही असे नाही. पण कुठल्याही क्षेत्रावर / विषयावर एकापेक्षा जास्त व्यक्ती, वस्तु किंवा स्थळ यांनी आपले महानपण सिद्ध केले आहे. थोडक्यात महानतेला काँपिटिशन आहे. अगदी चित्रपटात सुद्ध शोले की मुगले आझम की मदर इंडिया की पथेर पांचाली अशी चर्चा चालु शकते. पण एका क्षेत्रांत काही स्पर्धा नाही काही वाद विवाद नाहित काही दुमत नाही. जानी दुष्मन, क्लर्क, सावरिया, गायब हे कितीही उत्तम स्पर्धक असले तरी ते अजरामर गुंडा च्या पासंगालाही पुरत नाहित. गुंडा इज अ डिफरंट क्लास. त्याला काही स्पर्धा नाही. आणि गुंडा म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काहीच उभे राहत नसेल तर हाय कंबख्त तुने हिंदी पिक्चर्स देख्याच नही. वैष्णोदेवी म्हटल्यावर देवीची मुर्ती, अमरनाथ म्हटल्यावर शंकराची पिंड, तबला म्हटल्यावर झाकीर हुसैन आणि शोले म्हटल्यावर गब्बर आठवत नसेल तर मी एकवेळ समजु शकतो. पण गुंडा म्हटल्यावर मिथुन आठवत नसेल तर तुम्ही तुमचा जन्म, शिक्षण, अनुभव इत्यादी इत्यादी सर्व अक्ष्ररशः मातीमोल केले आहेत असे ठाम विधान करायला हरकत नाही. गुंडा हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. उद्या युनिव्हर्सिटीत जर त्याच्यावर १०० मार्कांचा पेपर आला तर त्याच्यावर आपल्या शाळेतल्या पेपरसारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला कसे शाळेत संदर्भासहित स्पष्टीकरण द्या किंवा कोण कोणास म्हणाले सरखे प्रश्न असायचे तसेच प्रश्न गुंडाच्या पेपरमध्ये असतील, थोड्या फरकाने. म्हणजे कोण कोणास म्हणाले ऐवजी कोणी कोणाचा रेप केला किंवा कोणी कुणाचा खून केला असे. अजुन अवघड प्रश्न विचारायचा असेल तर "---------" ला मारण्याआधी "========" त्यला ------------- म्हणतो. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरण कांती शाह आणी मिथुन पण देऊ शकायचे नाहित. संदर्भ तर मूळातच नाही. मरा लेको १० पैकी ० गुण घेउन. परीक्षार्थ्याला अजुन पिडायचे असेल तर मिथुन ने किंवा मुकेष ऋषीने चित्रपटात कत्तल केलेल्या लोकांची संख्या विचारा. त्याला अजुन ताप द्यायचा असेल तर त्या सगळ्यांची नावे विचारा. ती ब्रह्मदेवालादेखील माहिती असणे शक्य नाही. आणि गुंडामधले एक एक हिरे डायलॉग शोधायचे झाल्यास तो एक स्वतंत्र पी एच डी चा विषय होउ शकतो. " मेरे पास मा है" किंवा " चिनॉयसेठ जिनके घर शिशेके होते है वो दूसरो पे पत्थर नही फेका करते" किंवा "आपके पाव बहुत खूबसुरत है, इन्हे जमीं पर मत रखियेगा, मैले हो जायेंगे" किंवा "ठाकूर ने हिजडो की फौज बनायी है" किंवा गेलाबाजार "जली को आग कहते है बूझी को राख कहते है, जिसके आग से बारुद निकलता है उसे विश्वनाथ कहते है" असे डायलॉग्स त्या त्या कलाकाराला अभावाने मिळाले. एका पिक्चर मध्ये फार तर एक आणी असे अनेको पिक्चर केल्यावर एक अजरामर. पण गुंडातले सगळेच ड्वायलाक डोळ्यात पाणी आणतात. अनुषंगाने येतीलच पुढे. तर आता गुंडाची ष्टोरी. म्या पामर फारसे काही सांगु शकणार नाही. पण दुष्टाविरुद्ध सुष्ट असा एकुण गाभा आहे. दुष्ट कोण आणी सुष्ट कोण हे ज्याचे त्याने ठरवावे. तर होते असे की २ नामचीन गुंड असतात "लंबु आट्टा" आणि "बुल्ला ". त्यातला बुल्ला म्हणजे आपला मुख्य खलनायक मुकेश ऋषी. एक राजकारणी लंबु आट्टाला दुसर्‍या एका राजकारण्याला मारण्याची सुपारी देतो कारण त्या दुसर्‍याने बुल्लाला पहिल्या राजकारण्याला (तो गृहमंत्री असतो बरे) मारण्याची सुपारी दिलेली असते. इथे लंबु एकावर एक फ्री या योजनेअंतर्गत राजकारण्याबरोबर बुल्लाला पण उडवण्याचे ठरवतो (पुराने दुष्मनी हो अजुन काय.) "साले को मैने दूध पिला पिलाकर पाला. आज वो मेरी छाती चबाना चाहता है असे आपला लंबु आट्टा म्हणतो. इथे "तुने मेरा दूध पिया है, तु बिलकुल मेरे जैसा है" वगैरे गाणे टाळल्याबद्दल दस्तुरखुद्द देवानेच लंबु आट्टाला "दूध पिलाने" काबिल बनवले असावे. तर असो. यानंतर एक रक्तरंजित मारामारी सुरु होते. लगेच लंबु बुल्लाच्या एका माणसाला मारतो. तो माणूस लांबच लांब तलवार पोटात खुपसलेली असताना तलवार धरुन बुल्ला बुल्ला करत येतो आणी मगच प्राण सोडतो. इथेच "मेरा नाम है बुल्ला. रखता हू खुल्ला" आणि "मेरा नाम है चुतिया, करता हू मे अच्छो अच्छो की खडी खटिया" (म्हणजे शक्ती कपूर. बुल्लाचा "काही करु न शकणारा" भाऊ) आणि "मेरा नाम है पोते जो अपने बाप के भी नही होते" मोहन जोशीची आणि "मेरा नाम है इबु हटेला, मा मेरी चुडैल की बेटी, बाप मेरा शैतान का चेला, खायेगा क्या केला" हरीश पटेलची एणट्री होते. आणी मग "लाशे इस तरह से टपकती है जैसे नन्हे मुन्हे बच्चे की नुन्नी से पेशाब टपकता है" ( हे सगळे पिक्चर मधले डायलॉग आहेत. माझी चूक नाही). इथे बुल्ला आणि चुतिया ही जोडी जमवुन कांती शाहने प्रतिभेचा जो अलौकिक अविष्कार दाखवला आहे त्यासाठी स्टीव्ह्न स्पीलबर्गनेही मान खाली घालावी (आपण घालतोच) यानंतर बुल्ला लंबु आट्टाच्या भावाला मारतो. लंबु आट्टा "छत्री होती है खोलने के लिये, चादर होती है ओढने के लिये और लडकी होती है छेडने के लिये" असे म्हणत बुल्लाच्या बहिणीवर भर रस्त्यात बोलु नये ते करुन तिला मारतो. बुल्ला आपल्या बहिणीच्या शवापाशी उभा राहुन "लंबु ने तो तुझे लंबा कर दिया, माचिस की तिली को खंबा कर दिया. तु तो कटेला पुर्जा मतलब मुर्दा हो गयी" असे म्हणुन आपण ज्या सहजपणे कोपर्‍यावरच्या वाण्याकडे जातो तसे लंबु आट्टाच्या अड्ड्यावर जातो. लंबु आट्टा बुल्लाला " मे तेरे को एड्स से बचाने के लिये कॉडम बन जाऊंगा. पर मेरे को मत मार" असे भावनिक आवाहन करतो. तरी बुल्ला त्याला खपवतोच. यानंतर भर शहरात, संसद भवनाबाहेर १०-१२ पोलिसांसमोर, फक्त एका सुर्‍याचा त्यांना धाक दाखवुन बुल्लाचा एक गुंड (आपला स्पॉट नाना) गृहमंत्र्याचा खून करतो. आणि पळत पळत तिथुन थेट विमानतळावर जातो. तिथे "मै हू जुर्म से नफरत करनेवाला, शरीफो के लिये ज्योती गुंडो के लिये ज्वाला" असे म्हणणारा इथुन तिथुन मिथुन स्पॉट नानाला पकडवुन देतो. इथे पहिला प्रचंड मोठा धक्का. मिथुन विमानतळावर कूली असतो. हे राम. आता दूसरा धक्का. पुढच्याच शॉटला मिथुन शिपयार्ड मध्ये कूलीगिरी करत असतो. तो नक्की कुठे कूली म्हणून काम करतो की राजाबाबू मधल्या गोंद्याप्रमाणे नुसताच कूलीचा गणवेष घालुन फिरतो हे शेवटपर्यंत गौडबंगाल राहते. त्यानंतर मिथुन बुल्लाच्या एका गुंडाला फ्रीष्टाइल कुस्तीच्या एका आखाड्यात साधारण साडेनऊ सेकंद हात पिरगाळुन आणि एक ठोसा मारुन लोळवतो. त्यानंतर बुल्लाच्या गुंडांची गाठ मिथुन च्या हवालदार बापाशी पडते. पण तो पडला म्हातारा, मार खातो. ऐनवेळेस येउन मिथुन त्या गुंडांनाही लोळवतो. त्याचा बदला म्हणुन बुल्लाचा गुंड मिथुनच्या बहिणीला पळवुन नेतो आणि तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न करतो. पण ऐनवेळेस येउन गुलशन नावाचा एक सज्जन माणुस तिला वाचवतो. मग ते दोघे प्रथेनुसार गाणे गातात. मिथुनचा पिक्चर असल्याने ऊटीच्या बॉटेनिकल गार्ड्नमध्ये गातात. आणि मग लगेच अजून एका बिदाईच्या गाण्यामध्ये लग्नही करतात. लग्नानंतर असे कळते की मूळात तो गुलशन बुल्लाचाच माणूस असतो. तो लग्नानंतर मिथुन च्या बहिणीला शक्ती कपूर च्या हवाली करतो. नपुंसक असला तरी तो मूळात आद्य बलात्कारी शक्ती कपूर असल्याने व्हिटामिन सेक्स (म्हणजे काय मला माहिती नाही. कांती शहाला विचारा. आपली मजल च्यायला व्हिटामिन बी च्या पुढे जात नाही) खाउन तिच्यावर बलात्कार करतो. त्यात ती मरते. मग तो स्वतःच तिला कुठेतरी घेउन जातो. दरम्यान मिथुन सारख्या दिसणार्‍या (आणि त्यामुळेच बराच वेळ तो मिथुनचा भाऊच आहे असे आपण समजत असलेल्या) मिथुनच्या पाळीव माकडाकडुन मिथुनला त्याची (आणी माकडाची. मिथुनची बहिण मिथुन बरोबर माकडालाही राखी बांधत असते. बरोबरच आहे म्हणा. नक्की कोणाला राखी बांधावी असा गोंधळ होत असावा) बहिण मेलअसावा)कळते. माकडच त्याला क्राइम सीन पाशी घेउन जाते. तिथे शक्ती कपूर कथेची गरज म्हणुन मिथुनची वाट बघत बसलेला असतो. मिथुन त्याच्यामागे धावतो आणि मग तिथे बुल्ला, इबु हटेला, पोते, चुतिया, मंत्री दीपक शिर्के त्यांना सामील असलेला पोलिस इंस्पेक्टर असे सगळे त्याला एकाच ठिकाणी भेटतात. उगा सगळ्यांना वेगवेगळा भेटत राहिला तर पिक्चर पुर्ण व्हायला ४ भाग लागायचे. त्यानंतर काही काळाने बुल्लाला सामील असलेला इस्न्पेक्टर मिथुनच्या हवालदार बापालाही टपकवतो. बापाच्या खूनाने खवळलेला मिथुन थेट बुल्लाच्या घरी जाउन त्याला संपवण्याची धमकी देतो. डेटही फिक्स करतो. "आज पहिली तारीख है. द, चार, छे, आठ, दस. बस" म्हणजे हा एक एक करत सम तारखांना खलनायकांना संपवणार. मग एका गाण्यात तो बापाला अग्नी देतो. हे बरे असते. बहिणीला पण असेच एका गाण्यात चितेवर चढवलेले असते. नशीब प्रत्येक खलनायकापाठी एक गाणे नाही आहे. नाहितर संगीत चित्रपट झाला असता तो. याच गाण्यात मिथुन एका बेवारस मुलीला गोद घेतो. मध्येच ही मुलगी कुठुन आली या रहस्याचा भेद शेवटी होतो. मिथुन त्याच्या प्रेयसीला (अर्रे हो. गंगा नावाची एक प्रेयसीही आहे. गरज पडेल तेव्हा जमेल तेवढे कपडे काढुन मिथुनबरोबर नाचायचे हेच तिचे मुख्य काम) "तुम इसे मा, और मै इसे बाप बनके पालेंगे" असे सांगतो. त्याबरोबर कुठलेही आढेवेढे न घेता ती माऊली "देखो ना भगवान भी कितना दयालु है. हमने तो अभी शादी भी नही की और भगवान ने हमारे गोद भी भर दी" असे ऐकवते. त्यानंतर मिथुनच्या बहिणीला फसवलेला गुलशन अजुन एका मुलीला फसवतो. तिला वाचवण्यासाठी मिथुन गुलशनाला शोधुन काढुन त्याला मारतो. मग त्याच्याकडुन इबु हटेलाचा पत्ता मिळवुन त्या मुलीला वाचवतो आणि डोक्यावर एक बुक्की मारुन इबु हटेलाला गळ्यापर्यंत मातीत डकवतो. तो बुक्की मारतो तसा ज्या खड्यात हटेला ग़ळ्यापर्यंत बुडतो तो आपोआप बंद होतो. मग त्याचे डोके उडवुन मिथुन त्याला खपवतो. त्यानंतर मिथुन दीपक शिर्के च्या मागे लागतो. तो मंत्री असल्याने त्याच्यामागे साधारण १०० पोलिसांचा ताफा असतो. मिथुन बरोब्बर त्याच्या गाडीच्या खिडकीच्या काचेला एक गोळी मारुन त्याची आख्खी गाडी उलटवतो. मग मंत्री गाडीतुन बाहेर पडुन त्याचे १०० अंगरक्षक पोलिस जिथे उभे असतात त्याच्या बरोब्बर उलट्या दिशेला पळतो. मिथुन त्याच्यामागे. पोलिस त्याच्यामागे. मग बीचवर ते दोघे थोडावेळ लपंडाव खेळतात. पण मिथुन त्याला बरोबर शोधुन काढतो. तो मंत्र्याला गोळी घालणार हे दिसत असुनही पोलिस नुसतेच पळत पळत येतात. दरम्यान बुल्लाचा हस्तक मंत्र्याला उडवतो. पण पोलिस मात्र न केलेल्या खुनासाठी मिथुनलाच पकडतात. मिथुन बिचारा भंजाळतो की च्यायला मी नाही मारला तर कोणी मारला. दरम्यान त्याच दुपारी अटक, आरोप निश्चिती, खटला, सुनावणी असे सगळे होउन मिथुनला उम्रकैद देखील होते. त्यावेळेस इतर २० एक पोलिसांसमोर बुल्लाचा इंस्पेक्टर मित्र त्यानेच मिथुनच्या बापाला मरले असल्याचे सांगतो. मग मिथुनही "भिगी हुई सिगरेट कभी जलेगी नही और ये तय है की तेरे मौत की तारीख कभी टलेगी नही" असा सज्जड दम देतो. त्याच रात्री मिथुन लॉकअप मधुन पळुनही जातो. मग हा येड इंस्पेक्टर त्याला कुठल्याश्या पठारावर बोलवतो आणि २०-२५ स्वयंचलित गाड्या घेउन त्याच्या समाचाराला जातो (स्वयंचलितच असणार. कारण एवढ्या गाड्यातुन मिळुन अवघे ६ जण बाहेर पडतात). नॉट टु मेंशन, एका फटक्यासरशी एकाला मारुन मिथुन त्या इंस्पेक्टरलाही खपवतो. मग बुल्ला मिथुनला मारायला त्याचे खास गुंड पाठवतो. हे सगळे रामायणासारखे वाटते माहिती आहे का. प्रहस्त मेला, अतिकायला पाठवला, तो ही मेला मग कुंभकर्ण गेला, मग इंद्रजीत आणि मग सग्ळ्यात शेवटी रावण. तर हे बुल्लाचे गुंड रिंगण करुन मिथुनला बडवतात. एक गुंड अ‍ॅक्शन रिप्ले मध्ये त्याला थोबाडावर ६ किक्स मारतो. मग कावळ कावळा खेळल्याप्रमाणे मिथुन आळीपाळीने सगळ्यांकडे जाउन मार खातो. आणि मग कंटाळा आल्यावर चिडुन एक एक करत सगळ्यांना खपवतो. त्यानंतर सिनेमाचा हायलाइट येतो. आख्खा पिक्चर चुकवला तरी चालेल पण हा भाग चुकवु नका. मिथुनला कळते की त्याला सापडलेली मुलगी लक्की चिकना नावाच्या बुल्लाच्या कुंटणखान्याच्या दलाल / मॅनेजर ने टाकलेली असते. मिथुन तिथे पोचतो. लक्की चिकना त्याचा कुंटणखाना झोपाळावजा हलत्या खाटांवर चालवत असतो. (त्यांना नंबरही असतात). इथे मिथुनची लक्की चिकनाच्या गुंडांबरोबर तरंगत्या खाटांवर मारामारी होते. खाटा इतस्तत: उडत असतात आणि दरम्यान कुंटणखान्यातल्या वेश्या त्या खाटांवर निवांत झोपलेल्या किंवा झोका घेत असतात. मरण्यापुर्वी चिकना मिथुनला सांगतो की ती मुलगी बुल्लाची नाजायज औलाद आहे. लक्की चिकनापाठापाठ मिथुन पोते ला संपवतो. मग बुल्ला आणी चुतिया मिथुनच्या प्रेयसीचा विनयभंग करुन तिला मारतात. मग मिथुन लंडनहुन आणलेल्या व्हिटामिन सेक्स च्या गोळ्या खाउन मर्द बनलेल्या चुतियाला परत नामर्द बनवुन मारतो. त्यावर भावाच्या कलेवरावर अश्रु ढाळणार बुल्ला चुतियाच्या शवाला उद्देशुन म्हणतओ "अर्रे अभी तो तेरे ट्युब मे लाइट आया था और शंकर ने तेरा फ्युज उडा दिया" मग बुल्ला साधारण शे सव्वाशे रिक्शा घेउन मिथुनला मारायला जातो. मिथुनही "कसम खा के आ गया है इंतकाम का ये अंगारा. बजाऊंगा आज तेरी मौत का नगारा" अशी आरोळी ठोकतो. मग यमकात अजुन थोड्या डायलॉग्स ची देवाणघेवाण होते आण मग सगळ्या रिक्षा मिथुनवर तुटुन पडतात. त्याआधी मस्शिनगन्स चालवल्या जातात. येड्यांना कळतच नाही त्याचा मिथुनवर काय परिणाम होणार. मिथुनही तयारच असतो. तो रॉ़केट प्रोपेलर्स काढतो आणि २०-३० रॉकेट्स रिक्षावर सोडतो. एकाही रिक्षाचे चाकही पंक्चर होत नाही. एक दोन रिक्शा उडेपर्यंत मिथुनचे रॉकेट्स संपतात. मग तो रॉकेट प्रोपेलर उलटे करुन गुंडांना मारतो. भात्यातले बाण संपल्यावर धनुष्याच्या प्रत्यंचेने अभीरांना मारणार अर्जुन आठवल्याशिवाय राहवत नाही. मग घमासान लढाई होते. मग अचानक बुल्ला कुठनतरी मिथुनने सांभाळलेली त्याची मुलगी पैदा करतो. ती त्याचीच मुलगी आहे हे मिथुनने सांगुनही तो तिला मारण्यासाठी हवेत उडवतो. मिथुन जाँटी र्‍होडसला लाजवेल अश्या सफाईने तिला झेलतो, मात्र ती हातात असल्याने बुल्लाचा मार खात राहतो. तेवढ्यात कुठुनतरी मिथुनचा जुळा भाऊ असल्याचा भास निर्माण करणारे मिथुनचे माकड तिथे येतो, मिथुन मुलीला माकडाकडे उडवतो आणी ते माकडही मिथुनला लाजवेल अश्या सफाईने मुलीला झेलते. मग काय निर्धास्त होउन मिथुन बुल्लाला धू धू धुतो, मग अचानक विमानातुन स्पॉट नाना येतो. (खरे सांगा. खरे सांगा. हा अजुन जिवंत आहे हे तुम्ही विसरला होता ना. कांती शाहही विसरला होता बहुधा त्यामुळे तो असा अचानक येतो). मग मिथून त्याची मान मोडुन आणि बुल्लाला हेलिकॉप्टरच्या खिळ्यामध्ये खुपसुन मारतो. एक मात्र मानले पाहिजे की मिथुनने सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मारले. इबु हटेलाचे शीर तलवारीने धडावेगळे करुन, लक्की चिकनाची मान सुरीने कापुन, चुतियाला नामर्द बनवुन, पोतेला गोळी घालुन, इंस्पेक्टरला बायोनेट खुपसुन आणि या दोघांना हे असे. अखेर चित्रपट संपतो. पाचा उत्तराची कहाणी सफळ संपुर्ण होते. तर मी तुम्हाल आज मिथुन व्रत सांगतो. पडदे बंद करायचे, पंखा फुल्ल स्पीड, चखणा जमवायचा मस्त, वेफर्स, चणे शेंगदाणे वगैरे, टीव्हीला हार घालायचा, स्प्राईटची ( आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाने योग्य ते पेय निवडावे) बाटली उघडायची आणि चवीचवीने व्हिडोवर गुंडा बघायचा. उतु नका मातु नका घेतला वसा टाकु नका. एकदा गुंडा पुर्ण पाहिलात की तुम्ही जगातला कुठलाही चित्रपट पाहु शकता. इति गुंडापुराणम संपुर्णम.

वाचने 45198
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

:)) :)) मस्त परिक्षण! बाकी (एसपेशिअली विलन क्याराक्टरस) पात्रांची नावं ठेवण्यात बॉलीवूडचा हात किंवा कुठलाही अवयव कुणिच धरू शकत नाही. ;)

संवादलेखकाचं नाव काय आहे????????????? त्यानं आधीच व्रतस्थ होऊन संवाद लिहीलेले का? संवाद म्हणजे सामन्यतः तीर्थप्राशनानंतरचे मंत्र वाटतात! डिस्क्लेमरः तीर्थ प्राशनानंतर/च असं/च होत असावं असा माझा अजिबात दावा नाही, त्याशिवाय जास्त राडे होतात. हो उगाच कुणाला आक्षेप नको. - सध्या 'सोबर'(हे आत्म्यासाठी) प्यारे

In reply to by प्यारे१

या नितांतसुंदर कलाकृतीला आपल्या समर्थ लेखणीने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या महान संवादलेखकाचे नाव आहे बशीर बब्बर. (येथे स्वाभाविकच कानाला हात लावण्यात आला आहे.) "लगता है बुल्ला का थूक चाटा है तूने... पेशाब पिया है उसका!!" जमेल? जमेल कोणाला याहून आर्त संवाद लिहायला??

मस्त धुतलाय राव.. लगे रहो.. 'गुंडा' एम बी ए च्या अभ्यासक्रमात अशी लिंक पाहिली होती मध्ये.. :))

देवाचं वर्णन करताना समस्त वेद, शास्त्र, ग्रंथ पुराणे अपुरी पडतात आणि ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे तो दशांगुळे उरतोच त्याचप्रमाणे 'गुंडा' वर आजवर इतकं लिखाण होऊनही त्याची पूर्ण व्याप्ती होत नाही आणि तो दशांगुळे उरतोच. तस्मात आजच बघा आणि अनुभूती घ्या.

मृत्युंजया, एक दिवस काही निवडक मंडळी जमवून सलग क्लर्क, जानी दुश्मन आणि गुंडा बघायचा प्लॅन करुयात रे! कमीत कमी हे तीन तरी बघायचेच. कोण कोण येतय रे???

In reply to by अन्या दातार

चलेगा चलेगा. तिन्ही पिक्चर महान आहेत. जानी दुष्मन तर आपला खास प्यारा :). तिन्ही पिक्चर पचवुन जिवंत राहिलेले फार कमी लोक जगात आहेत आणी याव्यतिरिक्त सावरिया, गायब, प्लॅट्फॉर्म आणि मृत्युदाता देखीला पाहिलेला (आणी जिवंत राहिलेला) बहुधा मी एकटाच ;)

In reply to by मृत्युन्जय

मी पण आहे जिवंत. बहुतेक सावरिया बघितला नाही म्हणून असावा. ;) पण त्याची कसर मी हिटलर, चांडाळ, पापी गुडीया, हिरालाल पन्नालाल आणि बाप नंबरी बेटा दस नंबरी पाहून भरुन काढलीय असे वाटते. :)

खरेच शब्द नाहीत....... 'गुंडा'चे इतका उत्कृष्ट परीक्षण आजतागायत पाहण्यात नाही...... तुम्हाला 'गुंडाशिरोमणी' पुरस्कार देण्यात येत आहे.......

चुतिया हे नाव नै हो. चुटिया असे नाव आहे हे. गुंडाप्रेमीच्या हृदयाला घरे पडतात हो. बाकी गुंडा एफ ए क्यू ची ही साईट बघा. http://gunda-faqs.blogspot.in/ शिवाय इबू हटेलाच्या इंट्रोडक्शनमधली सूचकता अजून प्रत्यक्षपणे सूचित करायला पाहिजे होती. कांती शाहची बायकोदेखील गुंडा पिच्चरमध्ये आहे. पण रोल कोणता हे कळ्ळे नै. नीट पाहिले पाहिजे ;) पण या महाकाव्याबद्दल काही लिहायचे म्हंजे लै अभ्यासाचे अन मोठे औघड काम. तुम्ही ते उत्तम पार पाडलेय. मुळात हा विषयच असा आहे की "गुंडोच्छिष्टं जगत्सर्वं", "यदी हास्ति तदेवास्ति यन्नेहास्ति न् तत्क्वचित्" अशी त्याची प्रख्याताख्या आहे . बाकी पिच्चर म्हंजे यापुढे "शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात्" ;)

In reply to by बॅटमॅन

देवा ही साईट महान आहे. लैच खतरणाक आहे. हे आधी वाचले असते तर गुंडाचे परीक्षण म्या पामराने लिहायचे धार्ष्ट्य दाखवले नसते.

कोणत्याही चित्रपटाचं परीक्षण असं आजपर्यंत वाचलं नाही! त्या कलर्कसाठी अन्याचा तसा या गुंडासाठी मृत्युंजया तुझा जाहीर सत्कार करायला पाहिजे!

In reply to by मृत्युन्जय

जानी दुश्मनचे परिक्षण वाचुन मी तो अक्खा पिच्चर पाहिला... आणि त्यानंतर निर्वाणाच्या शोधात संतांना संन्यास वगैरे घेऊन रानोमाळ का व्यर्थ भटकावे लागते असा प्र॑श्न पडला. मी शरीर नाहि, मन नाहि, बुद्धी नाहि, मी कशातच काहि नाहि अशी निर्गुण निराकार स्थिती प्राप्त झाली. मी तर उपकारापुरता देखील उरलो नाहि. अर्धवटराव

भारीय एकदम च... बाकी आपण इथून तिथून मिथून चे जबरदस्त पंखे... त्यामुळे टीम्गल टवाळकी करायचा प्रश्नच नाय उद्भवत :)

वरती ज्यांनी ज्यांनी "परिक्षण भारी आहे आहे" वगैरे म्हटलय त्यांच्याशी असहमत. गुंडा मध्ये मटिरिअलच इतकं थासोन भरलय की नुसतं आहे तसं वर्णन केलं तरी पुरावं. आणि ह्या धाग्यात तेच केलं गेलेलं आहे. चित्रपट कहर आहेच.

=)) बा मृत्युंजया अरे काय बाबा.... कहर लिहिलं आहेस =)) भयाण खपलोय. फारा दिवसांनी मिपावर काहीतरी निखळ , मनोरंजक वाचायला मिळालं. धन्स

खतरनाक लिहीले आहे. लोळलो हसून. जबरी परीक्षण! एकदा नीट बसून बघू म्हणून आजपर्यंत यूट्यूबचे तुकडे सोडले तर हा बघितलेला नाही. पण आता बघावाच लागणार. :) महान परीक्षण!

जबरी परीक्षण.. लिंक असेल तर डकवा..नाही एकदा नीट बसून बघू म्हणतो.

इथे बुल्ला आणि चुतिया ही जोडी जमवुन कांती शाहने प्रतिभेचा जो अलौकिक अविष्कार दाखवला आहे त्यासाठी स्टीव्ह्न स्पीलबर्गनेही मान खाली घालावी
जबर्‍या खपलो आहे. पण आमच्या मनोजबाबूंच्या कलर्क ला गुंडा पुढे तुच्छ लेखल्याबद्दल गट्टी फू :)

In reply to by चावटमेला

पण आमच्या मनोजबाबूंच्या कलर्क ला गुंडा पुढे तुच्छ लेखल्याबद्दल गट्टी फू
साफ असहमत, तीव्र नापसंती दर्शवण्यात आली आहे. अहो गुंडा कुठे अन कलर्क कुठे???? कुठे तो कांती शाहचा (ठरकी) ऐरावत अन कुठे ही तट्टाणी? समस्त गुंडाभक्तांची मांदियाळी तुम्ही बघा अन मग कळो येईल महात्म्य त्याचे. (कट्टर गुंडाभक्त: गुंडा-काफरांना कन्व्हर्ट करणे हाच आमचा धर्म).

उगा तुमच नाव मृत्युंजय आहे म्हणुन तुम्ही जगलात, आमचा काय भरोसा की हा पिक्चर पहाताना आम्ही सिधे स्व्र्ग सिधरणार नाही? तुमच्या धाडसाची करावी तेव्हढी तारीफ कमीच.

त्या वर्षी ह्या सिनेमा ला ऑस्कर साठी नामांकन मिळाल होतं का हो???

ल्लै बेक्कार, राव.. नक्की बघणार हा पिक्चर..

वर म्हटल्याप्रमाणे मालमसालाच इतका आहे की आणखी वेगळे लिहिण्याची गरजच नाही. पण, संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत, रहमानला पंचमदा आणि मदनमोहन बरोबर, अभिनयात शाहरुखला बाकीच्यांबरोबर, सौंदर्यात मधुबालाला ढीगभरांबरोबर आणि लेखकांमधे पुलंबरोबर वपुंना बसवल्यामुळे डोळे प्वाणावले.

In reply to by तिमा

रहमानला पंचमदा आणि मदनमोहन बरोबर, अभिनयात शाहरुखला बाकीच्यांबरोबर, सौंदर्यात मधुबालाला ढीगभरांबरोबर आणि लेखकांमधे पुलंबरोबर वपुंना बसवल्यामुळे डोळे प्वाणावले.
बाकी सहमत पण रहमान इतका वाईट नै बरं का :)

In reply to by तिमा

तिमा अहो याद्या प्रातिनिधिक आहेत. मला स्वतःला शाहरुख आवडत नाही. पण बर्‍याच जणांना आवडतो म्हणुन टाकले नाव. तशी अभिनयाची लिष्ट कधी संजीव कुमार, दिलीप कुमार, अमरीश पुरी आणि बलराज साहनी शिवाय पुर्ण होइल का? पण ते तसे जुन्या काळातले म्हणून माझ्या लिष्टेत नाही. रिस्पेक्टिव्ह भक्तांनी राग मानुन घेउ नये. बाकी पु ल आणि व पु दोन्ही आमचे आवडते. त्यामुळे त्याबद्दल काही लिहित नाही.

In reply to by तिमा

देवा माफ करा. वाटल्यास आख्खा लेख उडवायची विनंती करतो सं मं ला पण वपु आणि संध्याची तुलना नका हो करु. म्हणजे पुल = मधुबाला आणि वपु= संध्या असा प्रकार नाही हा.

तुमच्या आवडीबरोबरच आमची छोटीशी भर - क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर - राहुल द्रविड ह्या यादीत नसल्याने निषेध. गायन = लता / आशा / किशोर / रफी - तलत महमूदला सगळे विसरले पण! :( संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन - आअम्चा आरडी नसल्याचा तीव्र निषेध! अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी - नूतन? बलराज सहानी? आणि शारुकला अ‍ॅक्टींग येते?? सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर - मधुबाला असताना ढीगभरांची आठवण तरी कशी येते म्हणते मी? :P लेखक = पु ल / व पु / सावंत - हे सापेक्ष असते म्हणा. पुल हे वपु आणि सावंतापेक्षा किती किती तरी उजवे असे माझे मत. जीए? कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे - बोरकर/ इंदिरा संत/ शांताबाई/ आरती प्रभू/ ग्रेस ? पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ - कोकण/ केवळ माझा सह्यकडा? ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड - अजिंठा वेरुळ, महाराष्ट्रातले गडकिल्ले

In reply to by यशोधरा

रह्मान / पंचमदा / मदनमोहन - आअम्चा आरडी नसल्याचा तीव्र निषेध! - स्वारीच हां,एकदमच माफी. आरडी आहे.एसडी वाचावे. मराठी चालतील का? श्रीनिवास खळे/ अशोक पत्की/ आनंद मोडक/ हृदयनाथ मंगेशकर/ भास्कर चंदावरकर.

ज्योतीने तेजाची आरती, मृत्युंजय गुंडायण गाती गुंडासारख्या उच्च प्रतीच्या सिनेमाला तितक्याच उच्च प्रतीचं परीक्षण लिहून तुम्ही न्याय दिलेला आहे. हा पिक्चर काही वर्षांपूर्वी पाहिलेला होता. महाभारत पहिल्यांदा वाचल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात रहातात तसंच गुंडा मधलं 'मेरा नाम है बुल्ला' वगैरे लक्षात होतं. पण आता पुन्हा एकदा त्या कथेचं सार वाचल्यावर पारायणाचं पुण्य लाभलं.

In reply to by राजेश घासकडवी

आज बर्‍याच दिवसांनी हा धागा उघडला. मजा आली.

गुंडा रुपी गीतेचा पहिला अध्याय, इथे सर्व पात्र आपापली ओळख करून देतात. पहिल्या आठ मिनिटांमधेच दोन खून दाखवून आगामी आतिशबाजीची झलक दिसते. https://www.youtube.com/watch?v=czt_Eroo_bs तसंच ह्या सिनेमात सर्वत्र पसरलेल्या ड्वायलाक रूपी रत्नभांडारातील हे एक रत्नः http://www.youtube.com/watch?v=UPC90Rclfoo

अहो, लिहिण्यासारखे इतके आहे या चित्रपटात, कोणत्याही लेखक / समिक्षकाच्या आवाक्याबाहेरचं आहे ते.. उदा : प्रभूजी जेव्हा चूटीयाचा पाठलाग करत असतात, तेव्हा तो (ती /ते?) स्वत्।च्या घरात बाथरूममध्ये जाऊन लपतो.. येथे त्याच्या घरात "लेडीज टॉयलेट" व "जेंट्स टॉयलेट" अशी स्वतंत्र व्यवस्था असते, हे चाणाक्ष प्रेक्षकांच्या नजरेतून सुटत नाही. असे असंख्य फायनर नुआन्सेस कांती शाह या महामानवाने इतके सहजगत्या पेरलेत... मान गये!!

गुंडाला न्याय मिळाला नाही ह्या परिक्षणात असं आपलं माझं मत आहे.

In reply to by आदिजोशी

तो न्याय तसा कुठल्याही परीक्षणात मिळणार नाही. उपनिषदात वर्णिल्याप्रमाणे परमात्मा जसा अख्खे विश्व व्यापूनही दशांगुळे शिल्लक उरतो, तसाच गुंडाही प्रत्येक परीक्षणाबाहेर दशांगुळे उरतोच. प्रत्येक परीक्षण म्हंजे एक नवा विचार आहे-प्रत्येक साच्यात गुंडा फिट बसत असल्याने "क्षणे क्षणे यन्नवतामुपेति, तदेव रूपं रमणीयताया:" ही रमणीयतेची व्याख्या त्याला एकदम फिट्ट लागू पडते. भगवद्गीतेचा अर्थ प्रत्येकाने जसा आपापल्या मताप्रमाणे लावलाय-कधी प्रवृत्तीपर, कधी निवृत्तीपर, कधी द्वैतपर तर कधी अद्वैतपर, तद्वतच गुंडाचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या चष्म्यानुसार लावलाय. पण मूळ सत्य हे कायम दशांगुळे वरच असणार. कांती शहालासुद्धा याचा अर्थ लागेल की नाही हे सांगता येत नाही. "सो अङ्ग वेद यदि वा न वेद".

In reply to by आदिजोशी

तुमचे मिथुनायण वाचले असल्याने त्यापुढे हे परीक्षण अगदीच फिक्के आहे हे मान्य करावेच लागेल. खरे सांगतो तुम्ही गुंडावर लिहाल (आणि लोहावर पण) म्हणुन इतके दिवस परीक्षण लिहिले देखील नाहे. पण गुंडामध्ये इतका मसाला भरला आहे की शेवटी राहवले नाही आणि ब्यामॅ म्हणतात त्याप्रमाणे गुंडावर कितीही लिहा कमीच पडेल.

In reply to by आदिजोशी

पण तुम्हाला प्रतिसाद खरडी अशा जमेल त्या माध्यमातून सुचवत होती ना पब्लिक गुंडा ला हाती घ्या म्हणून, तेव्हा का हात आखडता घेतलात? असो. त्याबद्दल जे जसं आहे तसं लिहिलं तरीसुद्धा धमाल ठरतं.

In reply to by मन१

अनेक मित्रांनी सुचवलं की गुंडा वर लिहा. मिथुनायण मालिकेचा शेवट गुंडाने करायचा असं ठरवलं असल्याने आधी इतर सिनेमे घेतले. दुर्दैवाने नंतर कार्यबाहुल्यामुळे एक नवा शब्दही लिहिणे जमले नाही. पण गुंडा वर लवकरच लिहिणार ह्याची खात्री ठेवा.